Friday 18 August 2017

गणेश उत्सव स्मार्ट कधी होणार ?

























सणांमुळे वैविध्याला चालना मिळते, त्यामुळे शेजाऱ्यांमध्ये संवाद वाढतो, त्यामुळे सृजनशीलता वाढते, त्यामुळे नागरिकांना अभिमान वाटेल अशा संधी निर्माण होतात, व त्यामुळे एकूणच समाजाचे मनस्वास्थ्य सुधारते. थोडक्यात त्यामुळे शहरे राहण्यासाठी अधिक चांगली होतात”… डेव्हिड बाईंडर.

डेव्हिड बाईंडर हा न्यूयॉर्क टाईम्सचा 1961 ते 2004 या कालावधीत पत्रकार होता, त्याने पूर्व व पश्चिम युरोप, सोव्हिएत महासंघ, अमेरिका, क्युबा, प्युर्तो रिको यासारख्या अनेक विषयांवर वार्तांकन केले. त्याने 1961 मध्ये बर्लिनमध्ये विदेशी वार्ताहर म्हणून काम केले, तिथे तो बर्लिनची भिंत बांधली जात असताना वार्तांकन करत होता. पत्रकाराच्या नजरेतून संपुर्ण युरोपसारखा सांस्कृतिक प्रदेश पाहिल्यानंतर  साहजिकच तो सणांचे इतके चपखल वर्णन करू शकतो. म्हणूनच मला हे अवतरण गणेशोत्सवात आठवले. तुम्ही कुणालाही पुण्याबद्दल विचारल्यावर पहिल्यांदा आठवतो तो  येथील प्रसिद्ध गणेशोत्सव. या दहा दिवसात संपूर्ण शहर डिन्जेलँडप्रमाणे परिकथेतले शहर भासू लागते. नागरिक शहरातल्या रोजच्या समस्या विसरतात व सगळेजण बाप्पाचे स्वागत व पूजा अर्चना करण्यात गुंग होऊन जातात. प्रत्येक जण आपापल्यापरीने बाप्पाचे जास्तीत जास्त  चांगले स्वागत करायचा प्रयत्न करत असतो. केवळ घराघरातच नाही तर संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण असतं म्हणूनच पुण्याचा गणेशोत्सव विशेष असतो. या निमित्तानं समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येतात व काही काळासाठी स्वतःचे पद, वय, लिंग, जात, धर्म विसरून जातात. लोकमान्य टिळक (श्री. भाऊ रंगारी यांनाही) यांना 125 वर्षांपूर्वी या सणातून नेमके हेच अभिप्रेत होते. या सणाला एवढी समृद्ध व प्राचीन परंपरा असल्यामुळेच पुण्याचा गणेशोत्सव संपूर्ण देशात अतिशय प्रसिद्ध व विशेष आहे!

गणेशोत्सवाला सध्या कसे स्वरुप आले आहे हे पाहण्यापूर्वी आपण पूर्वी तो कसा होता यावर एक नजर टाकू. साधारण तीन ते चार दशकांपूर्वी या सणात आज दिसतो तसा झगमगाट नसे, तसंच गणेश मंडळांकडे फारसा पैसाही नसे. तरीही हा उत्सव दिमाखात व एखाद्या कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे साजरा होत असे. उत्सवादरम्यान समाजातल्या सर्व वर्गांसाठी तसेच सर्व वयोगटातल्या व्यक्तिंसाठी कार्यक्रम आयोजित केले जात असत. मी सार्वजनिक गणेश मंडळांबद्दल बोलतोय एखाद्या वाड्यातल्या किंवा सोसायटीच्या गणेशमंडळाबद्दल नाही, तर या निमित्तानं संपूर्ण परिसरातली मंडळी एकत्र येत असत. प्रत्येकाच्या घरातल्या गणपतींशिवाय परिसरातल्या अळीचा/किंवा पेठेच्या मंडळाचा एक गणपती असे, तिथे विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे तसेच सामाजिक जागरुकता निर्माण करण्यासाठी तशा आशयांचे चित्रपटही दाखवले जात. आरास हा देखील महत्वाचा घटक असे मात्र सण साजरा करताना केवळ त्यावरच लक्ष केंद्रित केले जात नसे. परिसरात घरोघरी फिरून व दुकांदारांकडून वर्गणी गोळा केली जात असे, पण त्यासाठी सक्ती नसायची. गणेशोत्सवात धमाल मौज मजाही केली जायची मात्र इतरांची मनःशांती भंग करून नाही. प्रत्येक कार्यक्रम आयोजित करताना हातात किती पैसे आहेत याची जाणीव ठेवली जायची. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सणाचे उद्दिष्ट मौज-मजा, शांतता व समाजाच्या प्रत्येक वर्गाचा एकोपा हे असायचे. दहाव्या दिवशी होणारी विसर्जन मिरवणूक या उत्सवाचा सर्वोच्च बिंदू असे. या विसर्जन मिरवणुकीमुळेच पुण्याच्या गणेशोत्सवाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे, केवळ राज्यातूनच नाही तर संपूर्ण देशातून लाखो लोक ही मिरवणूक बघायला येतात. रात्रभर जागून या मिरवणुकीत सहभागी होतात, ती खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणारी असते.

याशिवाय सांगायचे म्हणजे पुण्यातील अनेक  राजकीय व्यक्तींची राजकीय कारकिर्दच या गणेश मंडळांमधून सुरु झाली व इथेच पुण्यातल्या गणेशोत्सवाचे चित्रही पालटू लागले. राजकीय नेत्यांना जाणीव झाली की गणेशोत्सवाच्या माध्यमातून लाखो घरांमध्ये (मतदरांच्या घरात) प्रवेश मिळतो मग त्यानंतर या उत्सवांमध्ये पैशांचा ओघ सुरु झाला. हळूहळू गणेश मंडळांमधील कुटुंबे व सामाजिक कार्यकर्त्यांची जागा भाई, दादा व युवा नेता वगैरे प्रकारच्या मंडळींनी घेतली. ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये तिकीट देताना निवडून येण्याची क्षमता, लोकप्रियता विचारात घेतली जाते, त्याचप्रमाणे गणपती मंडळाच्या संघटनांमध्ये कार्यकर्ता किती वर्गणी आणू शकतो यानुसार महत्वाची पदे व सदस्यत्व दिले जाऊ लागले. त्याचसोबत सजावटीवर लाखो रुपये खर्च करायची तसेच मोठ्या राजकीय नेत्यांची तसेच लोकप्रिय व्यक्तिंची छायाचित्रे लावण्याची स्पर्धा सुरु झाली. स्थानिक नागरिकांची कुटुंबे ही मंडळाच्या केंद्रस्थानी राहीली नाहीत तर गणपती मंडळांच्या आरासींचा तसेच कार्यक्रमांचा मुख्य उद्देश गर्दी खेचणे हा झाला. परिणामी गणपती मंडळांची आरास किंवा शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महिला किंवा कुटुंबीय गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यांवर सहजपणे वावरू शकत नाहीत. आता सगळे लक्ष फक्त झगमगती प्रकाशयोजना, महाकाय ध्वनीक्षेपक यंत्रणेवरच केंद्रित असते. त्यातच तथाकथित कार्यकर्ते (स्वयंसेवक) कोणत्यातरी तडक-भडक गाण्यावर हिडीस (ओंगळवाणे) अंगविक्षेप करत असतात. संपूर्ण गणेशोत्सवाच्या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे व केवळ मूठभर लोकांकडून स्वतःची ताकद दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. मला माहितीय अनेक जण या लेखाशी सहमत होणार नाहीत किंवा अनेकांना हा लेख आवडणार नाही मात्र माझ्या पुण्यातल्या गेल्या तीस वर्षांच्या वास्तव्यातलं हे निरीक्षण आहे.

त्यानंतर आपल्या उत्सवाचं स्वरुप पाहा. जेव्हा 125 वर्षांपूर्वी हा उत्सव सुरु झाला तेव्हा व त्यानंतर अनेक वर्षं रहदारीची स्थिती इतकी गंभीर नव्हती. आता समाजाची कार्यपद्धती पूर्णपणे बदलली आहे. लोक दहा दिवस त्यांच्या येण्याजाण्यात इतका अडथळा किंवा एवढं प्रचंड ध्वनी प्रदूषण सहन करू शकत नाहीत. गणेशोत्सव आल्याची चाहुल कशी लागते, पूर्वी रस्त्याच्या कडेने मंडप घालायला सुरुवात झाली की कळायचं उत्सव जवळ आला आहे. आता महिनाभर आधीपासून संपूर्ण शहरात ढोल ताशाचे कर्कश आवाज सुरु होतात. हा उत्सव आहे हे मान्य असलं तरी आपल्याभोवती वर्षभर एवढं ध्वनीप्रदूषण होत असताना आपल्याला त्यात भर म्हणुन अशा ध्वनी प्रदूषणरूपी कर्करोगाची गरज आहे का असा प्रश्न पडतो. मंडपांमुळे रस्ते अडवले जातात, हे फक्त दहादिवसच होत नाही तर जवळपास महिनाभर ते तसेच पडून असतात. यामुळे संपूर्ण शहरातील वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. सण-उत्सव हे या शहराचा अविभाज्य घटक आहेत हे मान्य असले तरीही आपले शहर जसे स्मार्ट होतेय तसा गणेशोत्सवही स्मार्ट होऊ शकत नाही का असा प्रश्न मला प्रत्येक नागरिकाला विचारावासा वाटतो. उदाहरणार्थ आपल्याला मूळातच एवढ्या मंडळांची गरज आहे का, असल्यास आपण रस्ते अडवून व नागरिकांचे कान बधीर करून उत्सव साजरा करायची गरज आहे काशांतपणे आपण आपले उत्सव साजरे नाही का करू शकत ?

उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात ज्याप्रमाणे दसरा मैदानात रावण दहन होते आपणही गणपतीसाठी तशीच कल्पना का राबवू शकत नाही. अथवा दुबईमध्ये ग्लोबल व्हिलेज नावाचे ठिकाण आहे तिथे एका विस्तीर्ण मैदानावर सगळ्या देशांचे शामियाने असतात ज्यावर प्रत्येक देशाची संस्कृती व व्यापार इत्यादींचे प्रदर्शन मांडले जाते. त्याचप्रमाणे आपणही शहराबाहेर मोकळ्या जागेवर गणेश मैदान तयार करू शकतो. अशा प्रकारची मैदाने शहराच्या चारही बाजूंना तयार करता येतील, तिथे सगळ्या मंडळांना आपापले गणेश मंडप उभारता येतील. या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल व शहरामध्ये केवळ सोसायट्या किंवा वाड्यांचे गणपती असतील ज्यामुळे शहराच्या नागरी व्यवस्थापनात किंवा नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. अशा ठिकाणी आपण सांस्कृतिक किंवा कला सादरीकरणासाठी जागा राखून ठेवू शकतो तसेच खाद्यपदार्थ, विक्रेय वस्तुंसाठी जागा ठेवू शकतो म्हणजे या उत्सवावर पोट असणा-या लोकांचे नुकसान होणार नाही! दररोज समाजातील प्रसिद्ध व्यक्ती या गणेश मैदानाला भेट देऊ शकतात व सामायिक मंचावरून जनतेपुढे आपले विचार मांडू शकतात. शेवटच्या दिवशी संपूर्ण शहरात ब्राझिलमध्ये, रिओत होणाऱ्या कार्निव्हलप्रमाणे एकाच मिरवणुकीचे आयोजन केले ज्यात सगळे शहर सामील होऊ शकते!

गणेश उत्सव स्मार्ट व्हावा यासाठी हा केवळ एक विचार मांडला आहे, तो जरा विक्षिप्त वाटू शकतो, अनेकांना मला वेड लागलंय असंही वाटेल. मात्र या उत्सावाचे बदललेले स्वरुप व शहराच्या गरजांचा विचार करता आपल्या पूर्वजांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तो पुनरुज्जीवित करण्यासाठी असाच काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे. कारण तुम्ही गणेशोत्सवाशी संबंधित वाद पाहिले तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक किंवा भाउसाहेब रंगारी आज हयात असते व त्यांनी पुण्यातल्या या उत्सावाचं आजचं स्वरुप पाहिलं असतं तर त्या दोघांनाही हा उत्सव सुरु केल्याची लाज वाटली असती, ज्याला आपण पुण्याचं वैभव किंवा अभिमान म्हणतो. अशीही गणेश मंडळे आहेत जी हा उत्सव जागरुकपणे साजरा करता व विविध सामाजिक समस्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या संधीचा वापर करतात. मात्र अशा मंडळांची संख्या दुर्दैवानं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे.

थोडक्यात सांगायचं तर आपण कशाप्रकारचा समाज होत आहोत याविषयी मी जे लिहीलं होतं ते येथे परत शेअर करतोय ...

काही वर्षांपूर्वी दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यावरून वाद झाला होता, काही महिन्यांपूर्वी राम गणेश गडकरी यांच्यावरून झाला, आता गणेश उत्सवातील लोकमान्य टिळकांच्या छायाचित्रावरून; कोणत्याही व्यक्तिचा आदर त्याचे कार्य तसंच कर्तुत्वावरून होतो, त्याची जात किंवा धर्मावरून नाही हे आपल्याला कधी समजणार! केवळ पुणे किंवा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात लोकांमध्ये जात किंवा धर्माच्या आधारे फूट पाडण्याचे अतिशय लाजीरवाणे काम सुरु आहे. त्यामुळेच आपल्याला संपवण्यासाठी चीन किंवा पाकिस्तान यासारख्या शत्रूंची गरज नाही, आपणच आपल्या  नाशाला पुरेसे आहोत!” आपण जेव्हा गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप देतो तेव्हा ही संस्कृती व एकोप्याची भावना जतन केली पाहिजे, नाहीतर एक समाज म्हणून आपण ज्या मार्गावरून चाललोय ते पाहता  एक दिवशी बाप्पा परत यायलाच नकार देईल!


संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स



No comments:

Post a Comment