Saturday 17 November 2018

स्टॅन ली,अमर्त्य महानायक !





















तुमच्याकडे अतींद्रिय शक्ती आहेत याचा  अर्थ, तुमचं वैवाहीक कौटुंबिक जीवन उत्तम असेलच असं नाही. अंगात अतींद्रिय शक्ती असल्या म्हणजे व्यक्तिमत्वाच्या, कौटुंबिक किंवा अगदी आर्थिक समस्या नसतील असं होणार नाही. मी अशी पात्रं लिहीण्याचा प्रयत्न केला जी सामान्य माणसंच आहेत पण त्यांच्याकडे अतींद्रिय शक्ती सुद्धा आहेत.”…  स्टॅन ली.

तुम्ही एखादं शक्तिशाली पात्रं लिहीत असाल तर, तुम्ही जोपर्यंत त्याला कुठेतरी सामान्य माणसाप्रमाणे दाखवत नाही तोपर्यंत ते  पात्र वाचकांसाठी रोचक होईल असं मला वाटत नाही.”  स्टॅन ली.

मी 14 नोव्हेंबरला बालदिनाच्या दिवशी वर्तमानपत्रं उघडलं तेव्हा स्टॅन ली यांचं निधन”, हे तीनच शब्द वाचले; आणि बालदिनाची काय ही सुरूवात, असा विचार मनात येऊन गेला! मी त्यांच्या निधनापासून ते किती महान होते, विविध नामवंत व्यक्तींनी, त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वाहिलेली आदरांजली, त्यांची अवतरणं वाचतोय. त्यांचे चाहते समाजाच्या सर्व वर्गातले व सर्व वयोगटातले होते. काही व्यक्तींना हयात असताना जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती, त्याहूनही जास्त त्यांच्या निधनानंतर मिळते. स्टॅन ली यांना प्रसिद्धी, लौकिक, सगळं काही जिवंतपणीच मिळालं मात्र  त्यांची पात्रं त्यांच्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध होती. मला असं वाटतं त्यांनाही असंच आयुष्य आवडायचं, हेच त्यांचं मोठेपण होतं! जे स्टॅन ली यांना ओळखत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, ते मार्व्हल विश्वचे निर्माते होते (मार्व्हलची व्याख्या तुम्ही फक्त कॉमिक  बुक म्हणून करू शकत नाही असं मला वाटतं). ज्यांना मार्व्हलविषयी माहिती नाही त्यांना सांगायचं म्हणजे (मला खरंच अशा लोकांबद्दल वाईट वाटतं, पण ज्या देशात अजूनही काही लोकांना इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत असं वाटतं, तिथे काहीही होऊ शकतं ) मार्व्हलची सुरूवात कॉमिक पुस्तकांपासून झाली ज्यामध्ये  शक्तीशाली महानायकांची पात्रं असायची. त्यानंतर त्यांनी स्टुडिओ या नावानं चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश केला व या शतकातील काही सर्वात लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. यातली सगळी पात्रं स्टॅन ली यांनी लिहीलेली (खरंतर निर्मिलेली असं म्हणावं लागेल) होती! बॉलिवुडच्या चाहत्यांसाठी अतिशय लोकप्रिय चित्रपटाचा आकडा 100 कोटींच्या घरात पोहोचतो. तर मार्व्हलचा “ब्लॅक पँथर एप्रिल 2018 मध्ये प्रदर्शित झाला.  या एकाच सिनेमाने 68,80,09,489.00 डॉलरची कमाई केली. आता या आकड्याला 74 रुपयांनी गुणा व रुपयांमध्ये आकडेमोड करा  या कमाईची, मी प्रयत्न करून थकलो! मार्व्हल स्टुडिओच्या नावे असे जवळपास 20 चित्रपट आहेत
आणि हे सगळे चित्रपट  स्टॅन ली यांची निर्मिती असलेल्या पात्रांवर आधारित आहेत, आता तुम्हाला स्टॅन विषयी थोडी  फार कल्पना आली असेल.

पण मी  स्टॅन  चे यश बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीत मोजण्याचं धाडस (म्हणजे चूक) करणार नाही. त्यांनी जगाला मनोरंजन व आर्थिक यशाशिवाय जे दिलं ते जास्त महत्वाचं आहे. या बाबतीत त्यांना वॉल्ट डिस्नेचे सर्वोत्तम स्पर्धक म्हटलं पाहिजे. कुठलंही क्षेत्रं घ्या, आपल्या जगात सगळ्यांना निकोप स्पर्धा अतिशय आवडते. जेव्हा ही स्पर्धा दोन दिग्गजांमधली असते तेव्हा ती अनुभवण्याएवढी मजा दुसऱ्या कशातही नसते. अमेरिका नावाच्या देशरूपी रंगमंचावर अशी स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते. मग ती टेनिसमध्ये ख्रिस एव्हर्ट व मार्टिना नवरातिलोवा असेल किंवा मुष्ठीयुद्धात मुहम्मद अली व जो फ्रेझर यांच्यात असेल, किंवा संगणक क्षेत्रात स्टीव्ह जॉब्ज व बिल गेट्स यांच्यात असेल, किंवा ग्राहकांच्या गरजा पुरवण्यात वॉल मार्ट व ऍमेझॉनदरम्यान असेल. मात्र यामध्ये अमेरिकेतली किंबहुना संपूर्ण जगातली मनोरंजन क्षेत्रातली सर्वात मोठी व सर्वात दुर्लक्षित स्पर्धा होती ती म्हणजे डिस्ने व मार्व्हल यांच्यातली, म्हणजेच वॉल्ट डिस्ने व स्टॅन ली यांच्यातली. वर नमूद केलेल्या स्पर्धांमधून व्यवसायानं नफा तर झालाच पण त्याशिवाय झालेली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे जग आणखी चांगलं व्हायला मदत झाली, लोकांचं फक्त मनोरंजनच झालं नाही तर त्यांचं आयुष्यही सोपं झालं. संगणक व स्मार्ट फोनचं उदाहरण घ्या, किंवा किती सहजपणे व आरामात ऑनलाईन खरेदी करता येते, विविध मॉल लोकांना किती वेगवेगळ्या योजना देऊ करतात ते पाहा, कोणत्याही खेळामध्ये खेळाडूंची उच्च दर्जाची कामगिरी पाहून प्रेक्षक थक्क होतात. मनोरंजन उद्योगात सर्वात महत्वाचे असतात ते चित्रपट आणि ज्यांचा आधार आबाल वृद्धांना प्रिय असलेले कॉमिक्स होता. मनोरंजन क्षेत्राचा हा घटक अतिशय महत्वाचा आहे. कारण चित्रपट हे असं माध्यम आहे जे तुम्हाला तुमच्या समस्या, काळज्या, चिंता किंवा तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी असतील त्या तीन तास विसरायला लावतं आणि तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातं. या जगात सगळं काही शक्य असतं, तुम्हाला पंख नसताना उडता येतं, तुम्ही शंभराव्या मजल्यावरून उडी मारूनही तुमच्या अंगावर ओरखडाही उठत नाही, तुम्ही तुमचा आकार तसंच चेहरा बदलू शकता, तुम्ही काँक्रीटच्या भिंतीतून आरपार जाऊ शकता, तुम्ही फक्त पर्वतावर नजर रोखून तो हलवू शकता. थोडक्यात सांगायचं तर ते तीन तास तुम्ही  सर्वशक्तीमान महानायक असता.

वॉल्ट डिस्ने यांची त्यांच्या परिकथांच्या माध्यमातून अनेक दशकं मनोरंजनाच्या स्पर्धेत हुकूमत होती. त्यांच्या सगळ्या गोष्टी सुखांत असलेल्या, मनात प्रेम निर्माण करणाऱ्या होत्या. डिस्नेच्या परिकथा अजूनही लाखो लोकांना आवडतात (त्यात माझाही समवेश आहे), पण तुम्ही जसे मोठे होता, आयुष्यातल्या कटू सत्यांना (खरंतर क्रूरतेला) तोंड द्यावं लागतं तेव्हा कुठेतरी तुमच्यातला निष्पापपणा हरवून जातो. नेमकी इथंच स्टॅन ली यांनी डिस्नेवर मात केली. जगानं 2000 व्या शतकात प्रवेश केल्यानंतर आपुलकी, प्रेम, दया यासारख्या शब्दांची जागा तंत्रज्ञानानं घ्यायला सुरूवात केली, त्यासोबतच मनोरंजनाच्या आवडीनिवडीही बदलल्या. लोकांना अजूनही परिकथा आवडतात पण, त्याहूनही मानवी स्पर्श असलेले वास्तवादी महानायक व महानायिका अधिक भावतात, ज्यांनी आता आधुनिक युगातल्या राजकुमार व राजकुमारीची जागा घेतली आहे. आता आधुनिक युगात परिकथांचा क्वचितच सुखांत असतो आणि येथे राजकुमार व राजकुमारीलाही जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, भावनिक आघात व नातेसंबंधांमधील ताण सहन करावा लागतो. स्टॅनचं मोठेपण म्हणजे, त्यानं हे बदल नेमके हेरून त्यानुसार दिशा बदलली. त्याच्या पात्रांविषयीची वरील दोन अवतरणं पाहा, तुम्हाला लक्षात येईल की महानायकही सामान्य माणसांसारखेच असतात, त्यांच्यातही मानवी स्वभावाचे गुणदोष असतात. स्टॅनना त्यांची पात्रं अशीच आवडायचीत्याचं म्हणणं होतं की, “जोपर्यंत तुम्ही तुमचे महानायक तुमच्या आमच्या सारखी दुःखे असलेली करत नाही, तोपर्यंत ते रोचक होणार नाही”, हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना? हिंदू किंवा कोणत्याही धर्माचं तत्वज्ञान काय सांगतं; जोपर्यंत एक जीवन संपत नाही तोपर्यंत नवीन जीवन कसं सुरू होईल. स्टॅन ली यांचे खलनायक अमरत्वासाठी धडपडत असतात, तर त्यांचे महानायक या खलनायकांना अमरत्व मिळण्यापासून रोखत असतात! चांगुलपणा आणि वाईटपणा यांचा अनादीकालापासूनचा लढा लढताना हे महानायक मानसिक डिप्रेशनशीपण लढत असतात

वरील महानायकांची यादी कधीही न संपणारी आहे, त्याची सुरूवात स्पायडर मॅनपासून होते. तो अगदी आपल्या शेजारी राहणारा अनाथ मुलगा आहे, त्याला उपजीविकेचा प्रश्न भेडसावतो, त्याच्या प्रेम जीवनात अडचणी आहेत व दुसरीकडे वाईट माणसांशी तो लढतोय.  आयर्न मॅन म्हणजेच टोनी स्टार्क हा करोडपती, तसंच भपकेबाज माणूस आहे. तरीही या जगातल्या भेदभावामुळे मनात वैषम्य आहे आणि स्वभावात कडवटपणा आहे जो त्याच्या बोलण्यातून सतत व्यक्त होतो. या गुणदोषांमुळे हे पात्रं पूर्णपणे आपले वाटते. त्यानंतर महाशक्तिशाली हल्क, जो सामान्य जगात डॉक्टर बॅनर नावाचा भौतिकशास्त्रज्ञ आहे, स्वतःतल्या हिरव्या राक्षसापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. व्हॉल्व्हेराईन या अमर पात्रालाही सामान्य माणसासारखं मरण हवं आहे. इतरांना मात्र स्वतःच्या शरीरावरची कुठलीही जखम बरी करण्याच्या त्याच्या अतींद्रिय शक्तिचा हेवा वाटतो. पण लोगनच्या (जेव्हा तो व्हॉल्व्हेराईन नसतो) मनावरच्या जखमांचं काय, ज्या त्याला भूतकाळातल्या त्रासदायक आठवणींमुळे झाल्या आहेत, कारण त्याचे सगळे जीवलग मर्त्य असल्यामुळे मरण पावलेत. या पात्रांची यादी न संपणारी आहे. देवाचा अवतार असलेल्या थॉरचीही मानवी बाजू स्टॅननं दाखवली आहे. विविध ग्रहमालांमध्ये लढत असताना त्याला कुटुंबाच्या विनाशाचं, भाऊ दुरावल्याचं दुःख सहन करावं लागतं. तो एका मर्त्य मानवावर प्रेम करत असल्यामुळे, तिथेही त्याला नैराश्य येतंच. स्टॅननं पन्नासहून अधिक पात्र लिहीली, त्यापैकी प्रत्येकाला काहीतरी विशेष शक्ती व काहीतरी शाप होता. फक्त अतींद्रिय शक्ती असल्यामुळे ती पात्रं सामान्य माणसाहून वेगळी ठरतात. बहुतेक पात्रांना लहानपणापासून एक शाप आहे, एकतर ती एकटी आहेत, प्रेमापासून वंचित आहेत किंवा त्यांची स्मृतीच नष्ट झालीय. थोडक्यात स्टॅन यांचे महानायक मनातुन अतिशय दुःखी व निराश आहेत. त्याची किंवा तिची स्वतःशीच लढाई सुरू आहे, ते अगदी तुमच्या आमच्यासारखेच असुरक्षित आहेत, तरीही ते महानायक आहेत. कारण  स्वतःचे दुःख बाजूला ठेऊन ते चांगुलपणाची लढाई लढतायेत.

स्टॅन यांनी नेमक्या याच मुद्यावर स्पर्धकांवर बाजी मारली. त्यांचे महानायक अधिक सच्चे, अधिक जवळचे, अधिक मानवी वाटतात कारण त्यांच्या समस्याही माणसांसारख्याच असतात. अमिताभ बच्चन यांना 70च्या दशकात महानायक पद का मिळालं याचा विचार करा. तो अस्वस्थेचा काळ होता. एक साधारण दिसणारा, उंच माणूस (बच्चन साहेबांच्या अभिनयाविषयी अतिशय आदर ठेऊन), ज्याला भोवतालच्या जगाविषयी अतिशय चीड आहे, तो नुसत्या लाथा- बुक्क्यांनी गुंडांचा नायनाट करतो, हे लोकांना अतिशय भावलं. लोक त्यांना पाहण्यासाठी पुन्हा-पुन्हा चित्रपटगृहात गर्दी करू लागले. हे यश खरंतर सलीम-जावेद या लेखकद्वयीचं होतं, ज्यांनी सामान्य माणसातूनच व्यवस्थेवर चिडलेल्या तरुणाचं पात्रं निर्माण केलं. हा काळही अस्वस्थतेचा आहे.   कदाचीत आपल्यापैकी कुणालाही, अन्न, वस्त्र किंवा उपजीविका यांची काळजी नाही. किंबहुना आपल्यापैकी बहुतेक आपापल्या क्षेत्रात अतिशय यशस्वी आहेत, लठ्ठ पगार घेताहेत, उंची गाड्या, साधनं, महागड्या उपहारगृहांमध्ये जेवण, चौकोनी कुटुंबं सगळं काही इन्स्टा/एफबीवर छायाचित्रं टाकण्यासारखं आहे. पण एवढं असूनही आपण आयुष्यात खऱ्या अर्थानं आनंदी व समाधानी आहोत का? स्टॅननं 2000 नंतरच्या पिढीतली ही अस्वस्थता अचूकपणे हेरली, जी निराश आहेत पण त्याचं नेमकं कारणच त्यांना समजत नाही. त्याच्या कॉमिक्समधून अशी असंख्य पात्रं भेटतात. ही पात्रं डिजिटल क्रांतीनंतर चित्रपटातून मोठ्या पडद्यावर जिवंत झाली.

माझी स्टॅन ली शी ओळख बरीच उशीरा म्हणजे 80च्या दशकात झाली. तेव्हा स्पायडर मॅन मालिका रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर लागायची. पण खामगावसारख्या लहान गावात, मार्व्हलविषयी काहीच ऐकलं नव्हतं. मी जेव्हा अभियांत्रिकीसाठी पुण्याला आलो तेव्हा कॅप्टन अमेरिका, एक्स-मेन व स्टॅनच्या इतर पात्रांची ओळख झाली. त्या पात्रातून जे विचार (नैराश्य किंवा अस्वस्थता) मांडण्यात आले होते ते खरंतर स्टॅनचे होते हे नंतर हळूहळू समजत गेलं. त्यानंतर मार्व्हलच्या प्रत्येक चित्रपटागणिक स्टॅनविषयीचा आदर व कौतुक वाढत गेलं व मला खात्री आहे की ते पुढेही असंच राहील. त्याच्या मृत्यूनंतर आलेली एक प्रतिक्रिया अशी होती की, स्टॅनच्या मृत्यूनं मी माझ्या बालपणाचा एक भागही गमावला”! त्या चाहत्याच्या स्टॅनविषयीच्या प्रेमाबद्दल पूर्णपणे आदर राखत मला सांगावसं वाटतं की; त्याला स्टॅन खऱ्या अर्थानं कळलाच नाही, कारण स्टॅन असं कसं होऊ देईल? स्टॅनची पात्रं कितीही त्रासलेली असली तरीही त्या सगळ्यांमध्ये एक समान धागा होता, तो म्हणजे जगाबद्दल असलेल्या जबाबदारीची जाणीव व चांगुलपणावरचा विश्वास; व या दोन्ही गोष्टी कधीच मरत नाहीतमाझ्या बाबतीत सांगायचं तर, स्टॅन लीनं मला सर्वोत्तम भेट दिली, जे खरंतर फक्त वाक्य आहे, “मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारीही येते”! नुसती शक्ती असून चालत नाही त्यासोबत जबाबदारीची जाणीवही हवी, हीच जाणीव आपल्यापैकी बहुतेकांना नसते. स्टॅन ली मार्टीन लायबर, मी तुझा मनापासून आभारी आहे, स्टॅन ली या नावानं सर्वोत्तम व खरे महानायक घडवण्यासाठी व त्यांना त्यांच्यातल्या सामान्य माणसाला स्वीकारण्याचं व त्यांचा आदर करण्याचं धाडस देण्यासाठी! तुमच्या मृत्यूनंतर मनात पोकळी वगैरे निर्माण झाली नाही, मात्र तुम्ही मला तसंच संपूर्ण जगाला जो विश्वास दिलात की कुणीही महानायक होऊ शकतं, त्याबद्दल पुन्हा एकदा मनात कृतज्ञतेची भावना नक्कीच निर्माण झाली!


संजय देशपांडे 
संजीवनी डेव्हलपर्स
09822037109
smd156812@gmail.com




No comments:

Post a Comment