Monday 22 July 2019

पुन्हा एकदा महानायक नं १ !





















पुन्हा एकदा महानायक नं १ !

मला यशाचं एखादं खात्रीशीर सूत्रं माहिती नाही. मात्र मला इतक्या वर्षात नेतृत्वाची काही वैशिष्टे सार्वत्रिक असल्याचं जाणवलंय व लोकांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये संघटित करणे, त्यांचे गुण, त्यांचे विचार व संघटितपणे काम करण्याच्या त्यांच्या प्रेरणेला प्रोत्साहन देण्यासाठी मार्ग शोधणे यांचा त्यात  नक्कीच समावेश होतो”. …महाराणी एलिझाबेथद्वितीय.

प्रिय नरेंद्र मोदी सर व सहकारी यांस,

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात वयस्कर कार्यरत राष्ट्र प्रमुख  आहेतत्यांचे वय 93 वर्षे असून  त्या जवळपास 67 वर्षांपासून सत्तेत आहेतत्या कधीही कोणत्याही शाळेत किंवा महाविद्यालयात गेल्या नाहीत, तर त्यांनी घरातच ज्ञानाचे धडे गिरवले. आपल्या देशाला स्वातंत्र मिळून आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही झाल्यानंतर चारच वर्षात त्या महाराणी म्हणून नियुक्त झाल्या.म्हणजे एकाप्रकारे इंग्लंडच्या राणींची कारकीर्द व आपली लोकशाही साधारण एकाच वयाच्या आहेत. म्हणून मला आपल्या देशातील यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या संघाच्या विजयाचे वर्णन करताना, त्यांचे वरील अवतरण अतिशय चपखल वाटले. या अवतरणातून असे दिसून येते की काही वेळा (यावर बरेच जणं असं म्हणतील की खरंतर अनेकदा) शिक्षणावरून एखाद्या व्यक्तीची क्षमता, बुद्धिमत्ता किंवा हुशारी ठरत नाही. अनेक लोकांची (म्हणजे बहुतेकांची) अशी अपेक्षा होती की या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत येणार नाही व तुम्ही ज्या मताधिक्यानं निवडून आलात त्याची तर कुणीच अपेक्षा केली नव्हती. मात्र तुमचा एवढ्या मताधिक्यानं विजय ही काळ्या दगडावरची रेघ होती हे कुणाला उमगलंच नाही. अर्थात हे समजण्याइतकी दूरदृष्टी किंवा हुशारी देशातल्या फारशा लोकांकडे (म्हणजेच तुमच्या विरोधकांकडे) नाही, ती माझ्याकडेही नाही!

मी काही तुमची स्तुती करण्यासाठी किंवा तुमच्याकडून काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेनं हे लिहीत नाही. मात्र तुम्ही दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या मताधिक्यानं सत्तेत आल्यानं त्यासोबत स्तुती ओघानंच येतेच (मात्र ती बऱ्याचदा ईर्षेनेही किंवा अगदी मत्सरानेही केली जाते). तुम्ही आधीही काही दशकांपासुन सत्ता म्हणजे काय हे जाणून आहात. मात्र एका राज्याचे मुख्यमंत्री असणं आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हे देखील तुमच्या समकालीन अनेकांना समजलं नाही. खरंतर एका महिलेला अनेक वर्षांपूर्वी हे समजलं होतं. त्यावेळी आम्ही शाळकरी होतो. तिच्या देशाला एका सच्च्या नेतृत्वाची गरज होती. मात्र नेतृत्व करत असताना तिलाही तिचा अती आत्मविश्वास नडला असं मला वाटतं. अर्थात मी काही तिच्या कर्तुत्वाचं विश्लेषण करू शकत नाही किंवा मी तिचा समकालीनही नाहीमात्र आज मी पन्नाशीत असताना तुमच्या यशाचं (अर्थात तुम्ही याला यश म्हणाल किंवा नाही हे सुद्धा मला माहिती नाही) इतरांच्या किंवा तुमच्या विरोधकांच्या (ते सुद्धा आता फारसे उरलेले नाहीत) दृष्टिकोनातून थोडंफार विश्लेषण करू शकतो. 2014 मध्ये बदलाची लाट होती त्यामुळे तुम्ही व तुमचे सहकारी सत्तेत आलात असं म्हणता येईल, मात्र 2019 हे खऱ्या अर्थानं आव्हान होतं. जसे की आपण 1983 मध्ये पहिल्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकला, पण या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी आपल्याला 28 वर्षं लागली. त्याचप्रमाणे पहिल्यांदा कोणताही विजय मिळवणं कदाचीत तुलनेने सोपं असते, मात्र सातत्यानं विजयी होणं अवघड असतं व यातूनच खरे विजेते इतरांहून कसे वेगळे असतात हे दिसून येतं.

पुन्हा स्तुतीचा वर्षाव करतोय, पण तुम्हाला व तुमच्या सहकाऱ्यांना सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेला विजय त्याच योग्यतेचा होता. एकशे वीस कोटी लोकसंख्येच्या या वैविध्यपूर्ण देशात, नावात कुठेही गांधी नसताना दुसऱ्यांदा एवढ्या प्रचंड बहुमतानं निवडून येणं हे खरोखरंच विशेष आहे. हे नेमकं का विशेष आहे याचं विश्लेषण मला करावसं वाटलं. बहुतेक लोकांना असं वाटत होतं की भाजपा पुन्हा सत्तेत येईल मात्र मताधिक्य 2014 पेक्षा कमी झालेलं असेल, त्याचप्रमाणे सत्तेत येण्यासाठी बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील असेही तर्क होते. तुमच्या पक्षातले बरेच इच्छुकही या अनिश्चितेवर पोळी भाजण्यासाठी तयार होते, कारण सत्तेसाठीच्या वाटाघाटी किती अटीतटीच्या असू शकतात हे आपण सगळे जाणतो. मात्र देशात जे काही झालं त्यामुळे या सगळ्या किंतु-परंतुला पूर्णविराम मिळाला. मला शंका वाटते की तुम्हाला स्वतःला तरी आपण एवढ्या प्रचंड मताधिक्यानं जिंकू असं वाटलं होतं कातुम्हाला वाटलं असेल तर मला तुमच्याविषयी असलेला आदर अनेकपटींनी वाढेल यात शंका नाही.
आता मूळ विषयाकडे येऊ ते म्हणजे विश्लेषण व पुढचा मार्ग कसा असेल. आता बरेचजण असे म्हणतील की यशाचं विश्लेषण करायची काय गरज आहे, कारण आपल्या देशामध्ये यशाला कोणत्याही कारणाची किंवा तर्काची गरज नसते. अपयशालाच या सगळ्या कुबड्यांची गरज असते. मला माहितीय की तुम्हाला नेमक्या याच दृष्टिकोनावर हसू येईल. कारण तुमच्यासाठी 2019 चा विजय कधीच इतिहासजमा झाला असेल व तुम्ही 2024 ची तयारीही सुरू केली असेल यात शंका नाही. मला असं वाटतं याचसाठी विश्लेषण अतिशय महत्वाचं आहे कारण गेल्या पाच वर्षात ज्या काही चुका झाल्या तुम्हाला त्यांची पुनरावृत्ती नक्कीच करावीशी वाटणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निश्चलनीकरण (नोटबंदी” हा अधिक सोपा व लोकप्रिय शब्द वाटतो) व त्यानंतर जीएसटी लागू करणे ही तुमची सर्वात अपयशी उपाययोजना ठरली असं अनेक लोकांना वाटतं. मात्र माझ्यामते नोटबंदी हे तुमचं ब्रह्मास्त्र (सर्वोच्च अस्त्र) होतं. खरंतर प्रत्येक चतुर्थ-श्रेणीतील (म्हणजे गरीब) किंवा त्याखालील वर्गातील व्यक्तींनी जेव्हा त्यांच्या श्रीमंत मालकांना भांबावुन पळताना व एका रात्रीत कवडीमोल ठरलेल्या त्यांच्या पैशांचं काय करायचं या विवंचनेत पाहिलं तेव्हा त्यांना मनापासुन आनंद झाला! मला असं वाटतं आपण भारतीय जेव्हा एखाद्याला आपल्यापेक्षा जास्त अडचणीत पाहतो तेव्हा आपल्याला अतिशय आनंद होतो (माफ करा मित्रांनो, पण ही मानवी प्रवृत्ती आहे). म्हणूनच सलीम-जावेद यांच्या पटकथांनी चित्रपटगृहांवर अधिराज्य गाजवलं. मूठभर श्रीमंत व शक्तीशाली लोक लाखो गरीब व निराधार जनतेचं शोषण करत असताना एक निडर तरूण या सगळ्यांना पळता भुई थोडी करतो अशा आशयाच्या त्यांच्या कथा असत. अशाच कथांनी “आम जनतेनं त्या निडर तरुणाला सुपरस्टार पदावर नेऊन ठेवलंआपल्याला या पटकथा व आताच्या परिस्थितीमध्ये साधर्म्य वाटत नाही का. नोटबंदी हा फक्त एकच उपाय झाला, असे अनेक उपाय करण्यात आले ज्यामुळे “सामान्य जनता आनंदी झाली. मध्यम वर्गाला स्वयंपाकाच्या गॅससाठी दिलं जाणारं अनुदान सोडून देण्याचं आवाहन असो किंवा हे अनुदान लाखो लाभार्थींच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करणे असो. या सगळ्यामुळे ते आपोआपच गरीबी हटाओ मोहीमेचा भाग झाले. अशाप्रकारे एकेका शस्त्राचा विरोधी पक्षांवर वार करण्यात आला मात्र त्यांना ते समजलंच नाहीअसं म्हणतात ज्या शस्त्राचा वार होईपर्यंत शत्रूला दिसतच नाही ते सर्वोत्तम शस्त्र मानावे, मात्र तुम्ही आणखी एक पाऊल पुढे गेलात. तुमची शस्त्रं शत्रूवर (म्हणजे विरोधकांवर) आदळूनही त्यांना ती दिसली नाहीत किंवा जाणवलीच  नाहीत. तुम्ही व तुमच्या सहकाऱ्यांनी तुमच्या प्रचारासाठी आपल्या लष्कराचाही वापर करून घेतला असा तुमच्यावर आरोप झाला. तुम्हीच काही दहशतवादी हल्ले घडवून आणले असं म्हणण्यापर्यंतही काही जणांची मजल गेली. तुम्ही या सर्व टीकेला धीरानं तोंड दिलं, मात्र यामध्ये विकास, बेरोजगारी, दुष्काळ, जलसिंचन, महागाई वगैरे मुद्दे मागे पडले. हे शस्त्र वापरण्याचा तुमचा हेतू नसतानाही ते लागू पडलं. अगदी सर्जिकल स्ट्राईक विषयावरच्या चित्रपटानंही 300 कोटी रुपयांच्यावर कमाई केली. खरंतर यावरूनच कुणाही शहाण्या माणसाला सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांचा अंदाज यायला हवा होता. पण या देशात व विशेषतः राजकारणात शहाणी माणसं अभावानंच आढळतात. यातली सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही जे काही करता ते सामान्य माणसासाठीच करता व मतदारच तुमचे मायबाप आहेत यावर लोकांचा विश्वास निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी झालात. कुणाही व्यक्तीला अलिकडच्या काळात हे साध्य झालं नव्हतं व तुम्ही ते एकहाती करून दाखवलंतुमच्यावर माध्यमांचा वापर करून घेणे, दिखावेबाजी करणे तसंच अगदी तुमच्या विदेश दौऱ्यांवरूनही टीका झाली. मात्र सरतेशेवटी मतदारांना तुमच्याविषयी काय वाटतं हे महत्वाचं, विरोधकांना नाही.

यात शेवटचा आघात होता जीएसटी. देशातला मतदान न करणारा 10उच्चभ्रू वर्ग 90% लोकांची मालमत्ता नियंत्रित करतो. जीएसटी लागू करायचा निर्णय घेऊन तुम्ही स्वतःची (तसंच तुमच्या पक्षाची) कबर खोदून घेतलीय अशी टीका झाली. मात्र 10श्रीमंतांच्या हातात 90% जनतेची मालमत्ता असली तरीही निवडणुका या 90लोकांच्या मतांवरच जिंकल्या जातात हे लोक विसरतात. जे 10% लोक तुमच्या निर्णयांवर नाखुश होते, ते मतदान करायची तसदीही घेत नाहीत कारण कोणतंही सरकार आलं तरी त्यांचंच आहे असं त्यांना वाटतं. मात्र तुमचं सरकार तसं नाहीतुम्ही 90% वर्गातल्या लोकांसाठी काम करत आहात हे तथाकथित श्रीमंत वर्गाला कधी समजलंच नाही (किंवा त्यांनी विश्वास ठेवला नाही). हाच 90वर्ग तुमच्यामागे ठामपणे उभा राहिला. मात्र एक गोष्ट विसरून चालणार नाही की आपल्याला व्यवसाय हवेत. आपल्याला केलेल्या गुंतवणुकीवर नफाही हवाय (म्हणजेच मूल्यवाढ) कारण त्यामुळेच कोणताही व्यवसाय चालू शकतोया देशामध्ये आणखी एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं मात्र तरीही इथे श्रीमंत होणं पाप मानलं जातं. आपल्या भोवतालची यंत्रणाच अशी आहे की प्रत्येक श्रीमंत स्त्री-पुरुषामागे काहीतरी गुन्हा लपला असलाच पाहिजे असंच सगळ्यांना वाटत असतं, तुम्हाला हा गैरसमज दूर करावा लागेल.अमेरिकेमध्ये आपण पहिल्या पाच सर्वात श्रीमंत व्यक्ती पाहिल्या तर त्या मध्यमवर्गातून आल्याचं आपल्याला दिसेल. आपल्या देशामध्ये मात्र तुम्हाला काय दिसते, सर्वात श्रीमंत व्यक्तींना वारशानंच श्रीमंती मिळालीय, अमेरिका आणि आपल्यात हाच फरक आहे. तुम्हाला अशी एक व्यवस्था तयार करावी लागेल ज्यामध्ये सामान्य माणूस कायदेशीर मार्गाने श्रीमंत होऊ शकेल.

मला असं वाटतं आता तुमचा सहकारी (म्हणजेच तुम्ही) पुन्हा सत्तेत आल्यानं खरा धोका विरोधकांकडून नाहीच (खरंतर आता कुणी उरलेलंच नाही) तर स्वपक्षीयांकडुनच आहे. सर्वोच्च स्थानी असल्यावर हीच समस्या असते, लोकांची तुमच्याकडून नेहमी सर्व आघाड्यांवर जिंकण्याचीच अपेक्षा असते. सामान्य जनतेची स्मृती अतिशय कमी असते व जनता जनार्दनालानेहमी नवीन समस्या शोधून त्या नेत्यांसमोर मांडायची सवय असते याची तुम्हाला जाण आहे. असे म्हणतात की तुम्ही काही वेळा काही लोकांना खुश करू शकता मात्र नेहमी सर्व लोकांना खुश करू शकत नाही. आपला देश एवढा मोठा आहे की सर्वांना खुश करणं हे एक मोठं आव्हानच आहे. त्याचप्रमाणे संपत्ती महत्वाची आहे तसंच श्रीमंत लोकही महत्वाचे आहेत. तुम्ही श्रीमंत लोकांकडून थोडीशी संपत्ती काढून घेऊ शकता व गरीब लोकांना थोडंसं श्रीमंत करू शकता. पण हा देश व्यवसाय, व्यापार, नवप्रवर्तन यावर चालतो व या सर्व गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजेत व त्यांचं जतन केलं पाहिजे. तुमची शस्त्र विरोधकांवर बेसावधपणे वार करतात, आता कुणी राजकीय पक्ष तुमचा विरोधक नसेल तर मतदारच तुमचे विरोधक असतील. एखादा नेता दीर्घकाळ सत्तेत असल्यावर हळूहळू कुठेतरी असंतोषाची बिजं पसरू लागतात (सध्याही दिसतंय) जो भविष्यात डोकं वर काढतो. हा असंतोष एखाद्या शस्त्रासारखा वार करू शकतो. जाणत्या माणसांनी म्हटलंय की सत्ता मिळवण्यापेक्षा ती पचवणं अतिशय कठीण असतं, म्हणूनच तुमच्यासमोरचं खरं आव्हान तुमच्या  सहकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीतल्या यशाचा किंवा विजयाचा खरा अर्थ समजून सांगणं आहे (त्यांनी तो पचवणं). असं झालं तरच त्यांचं ठोकं ठिकाणावर व पाय जमीनीवर राहतील.

मला असं वाटतं या देशासमोरचा सर्वात मोठा धोका म्हणजे आपली लोकसंख्या, जी काही दशकांमध्ये चीनलाही मागे टाकेल. जवळपास 120 कोटी (ती लवकरच 150 कोटींवर पोहोचेल) लोकांसाठी अन्न हवं व 240 कोटी हातांसाठी काम हवं. 120 कोटी लोकांना कामात गुंतवून उत्पादकता (तसंच सकारात्मकता) वाढवणं हे मोठं काम आहे. आपण हा लोकसंख्यारुपी भस्मासूर वेळीच नियंत्रणात आणला नाही तर गृहबांधणी, सार्वजनिक आरोग्य, कृषी, वाहतूक, शिक्षण या सगळ्यांशी संबंधित धोरणे अपयशी ठरतील. आपल्याकडे मर्यादित जमीन आहे व एफएसआय किंवा टीडीआर देऊन आपण आणखी घरे बंधू शकतो व ती सगळ्यांना परवडणारी बनवू शकतो. मात्र या कुटुंबांसाठी पाणी, या घरांसाठी वीज, कचरा टाकण्यासाठी जागा, या घरांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था आपण कुठून करणार आहोत अशा प्रश्नांमुळे तुम्ही आधीच विचारात पडले असाल. लोकसंख्येच्या या भस्मासुरामुळेच लहान शेतकऱ्यांना टिकून राहणे अशक्य झाले आहे. कुटुंबाचा आकार मोठा झाल्यावर त्यांच्या मागण्याही वाढतात व शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या पूर्ण करणं अवघड होऊन जातं व परिणामी देशभरात आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळतात.

देशाला असलेला दुसरा सर्वात मोठा धोका म्हणजे आपण सामाजीक अशांततेच्या ज्वालामुखीवर बसलोय. आपला तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद किंवा सामान्य भाषेत सांगायचं तर समाजातील जात तसंच धर्माच्या आधारे असलेली समाजातील दुफळी हा इतका संवेदनशील विषय आहे की आत्तापर्यंत कुणीही सत्ताधारी त्याला हात लावण्यास धजावलेला नाही. आपल्या मनावर या गोष्टींचा एवढा पगडा असतो की कुणीही जात व्यवस्थेविषयी (आरक्षणाविषयीही) उघडपणे बोलत नाही. आपल्या देशात विनोद म्हणजे जेव्हा दोनअनोळखी लोक एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांचं नाव (म्हणजेच अडनाव) जाणून घेतल्यावर हा कोणत्या जातीचा आहे किंवा असेल असाच विचार आधी मनात येतो. त्यानंतर पुढे होणार संवाद हा या घटकावर अवलंबून असतो. अनेक वाचकांना माझं निरीक्षण पटणार नाही, विशेषतः आयटीच्या पिढीतल्या तरुणांना. काही शहरांमध्ये किंवा काही भागांमध्ये त्यांचं म्हणणं बरोबर असेल पण खाजगी क्षेत्रात किंवा अगदी सर्वोच्च संस्थांमध्येही जातपात अस्तित्वात असते हे ढळढळीत सत्य आहे. याबाबतीत बोलायचं तर आपण भारतीय खरंच महान आहोत, आपल्याला समाजात समानता हवी असते मात्र आपले (जातीचं) विशेष स्थान न गमावता. या सगळ्या समुदयांना विशेष स्थान हवं असल्यामुळेच आपण समाज म्हणून कधीच एकजूट होऊ शकत नाही व स्वतःला एक राष्ट्र मानत नाही ही समस्या आहे. बऱ्याच जणांना हे आवडणार नाही किंवा ते स्वीकारणार नाहीत मात्र लोकसभा निवडणुका असोत किंवा ग्रामपंचायत निवडणुका, सर्व राजकीय पक्ष कशाप्रकारे तिकीट वाटप करतात ते पाहा. उमेदवारी देण्याचा पहिला निकष (आर्थिक बळ हा निकष अर्थातच असतो) एखाद्या मतदारसंघामध्ये विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे किती मतदार आहेत त्यानुसार उमेदवाराची निवड केली जाते. मला असं वाटतं भ्रष्टाचारापेक्षाही ही दोन सर्वात मोठी आव्हानं आहेत. मी प्रत्येक भारतीय माझ्याच धर्माचा, जातीचा किंवा कुटुंबातला आहे असा विचार करू लागलो तर आपल्या बहुतेक समस्या सोडवल्या जातील. मला खात्री आहे की प्रत्येक भारतीयाला आपला धर्म, जात व समुदाय एकच असल्याची जाणीव व्हावी हे तुमच्याही कार्यक्रम पत्रिकेवर असले पाहिजे.

या देशाच्या (म्हणजेच सामान्य माणसाच्या) तुमच्याकडून अजूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. आम्हा भारतीयांची देवावर नेहमी गाढ श्रद्धा असते. देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आम्हाला वाटतो. म्हणूनच आम्ही मंदिर, मशीद, चर्च सगळीकडे देवाला साकडं घालतो. आम्ही जीवापाड प्रेम करतो, संवेदनशील, भावनिक आहोत, त्याचप्रमाणे सडकून टीकाही करतो, आम्ही बहुतेकवेळा बुद्धीपेक्षा भावनेनी निर्णय घेतो, होय आम्ही तुमचे मतदार आहोत, आम्ही भारतीय आहोत!

मी माझ्या लेखात कुठेही मर्यादा ओलांडली असेल तर मोदी सर मला माफ करा. मी वर नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांची तुम्हाला जाणीव असलेच मात्र तुमच्या विजयामुळे अजूनहीअचंबीत असलेल्या लोकांसाठी मी ते लिहीलं आहे. या देशाला महासत्ता बनवण्यासाठी नाही तर भारत हा नेहमीच महासत्ता होता याची देशाला तसंच देशवासीयांनाही जाणीव करून देण्यासाठीच अनेक शुभेच्छा. हे दाखवून द्यायची वेळ आता नक्कीच आलीय!

जय हिंद!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment