Wednesday 24 July 2019

जागतीक व्याघ्र दिन आणि मनुष्य-प्राणी संघर्ष !



























आपण जेव्हा निसर्गात वन्यप्राण्यांना सामोरे जातो तेव्हा नेहमी दयाळूपणा व सहानुभूती दाखवली पाहिजे.” … पॉल ऑक्स्टन

वरील अवतरण श्री पॉल ऑक्स्टन यांचे असून ते वाईल्ड हार्ट वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संस्थापक/संचालक व वन्यजीवन छायाचित्रकार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील, वाईल्ड हार्ट वाईल्डलाईफ फाउंडेशन ही लहानशी संघटना अतिशय मोठं काम करण्यासाठी झटतेय. आम्ही सर्वाधिक धोका असलेल्या वन्यप्राण्यांना मदत करण्यासाठी जगतो. आम्हाला प्राण्यांचं संगोपन करायला आवडतं व आम्ही प्रत्येक प्राण्याला आमच्याकडून शक्य ती सर्व मदत व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, ह्या संघटनेचे ब्रिदवाक्यआहे.

मी पॉलचे हे शब्द यापूर्वीही वापरले आहेत. मात्र काही शब्दांची ताकदच अशी असते की तुम्हाला ते पुन्हा-पुन्हा आठवतात व पॉलचे वरील शब्दही असेच आहेत आणि वाघांच्या संवधर्नाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 जुलैला जागतिक वाघ दिन अथवा आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा करतात.सेंट पिटर्सबर्ग येथे 2010 साली झालेल्या व्याघ्र परिषदेत याची सुरूवात करण्यात आली. या पार्श्वभुमीवर याव्याघ्र दिनाचं पॉलचे वरील शब्द मला परत एकदा शेअर करावेसे वाटले.   या व्याघ्र दिनाचं घोषवाक्य आहेत्यांचे अस्तित्व आपल्या हाती, ऐकायला तर छान वाटतंय नाही का पण यासंदर्भात आपल्या भोवतालची परिस्थिती काय आहे? मला आपल्या महाराष्ट्रातली गेल्या चार वर्षातली परिस्थिती पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवलीय की लोकांमध्ये वन्य जीवनाविषयी जागरुकता वाढतेययाचं श्रेय सरकारला (म्हणजेचवनविभागालाही), अनेक सामान्य लोकांना तसंच स्वयंसेवी संस्थांना द्यावं लागेल. हो फेसबुकसारख्या समाजमाध्यमांनाही द्यावं लागेल जिथे अनेक लोक (छायाचित्रकार) त्यांच्या जंगलातल्या क्षणांची छायाचित्रं टाकतात आणि त्यामुळेच आणखी बरेचजण वन्य जीवनाविषयी विचार करायला उद्युक्त होतात. यातही वाघांची छायाचित्रं सर्वाधिक लक्षं वेधून घेतात ही वस्तुस्थिती आहे. एक लक्षात ठेवा आपलं राज्य सगळ्यात प्रगत व शहरीकरण होत असलेलं राज्य आहे. मात्र यामुळेच वन विभागाचं काम सर्वात अवघड आहे. कारण वन्यजीवनाला सर्वाधिक धोका निसर्गाकडून किंवा कोणत्याही मोठ्या प्राण्यापासून नाही तर माणसापासून आहे. कारण वाघाकडे सुळे व धारधार पंजे आहेत, बिबट्याकडे वेग आहे, हत्तीकडे शक्ती आहे, अस्वलाकडे नखं आहेत ज्यामुळे तो मानवी शरीरातील मांसाचे तुकडे पाडु शकतो, रानडुकरालाजमीन खणण्यासाठी सुळे असतात, सापाकडे दंशामध्ये विष असतं, मधमाशीकडे डंख असतो, पक्षी आकाशात उंच भरारी घेऊ शकतो मात्र या सगळ्याची माणसाकडे जे आहे त्याच्याशी तुलना होऊच शकत नाही ते म्हणजे आपला मानवी मेंदू. या मेंदूच्या मदतीनेच आपण जेसीबी, ट्रॅक्टर, चेन सॉ, काँपॅक्टर व इतरही अनेक प्रकारची यंत्रे बनवतो आणि वर नमूद केलेल्या प्राण्यांची सगळी शक्ती आपल्या बुद्धिमत्तेतून तयार झालेल्या यंत्रांच्या ताकदीपुढे निष्प्रभ ठरते. यामुळेच मानव विरुद्ध प्राणी या संघर्षात नेहमी प्राण्याला माघार घ्यावी लागते. माघार घ्यावी लागते म्हणजे एकतर आपण जिला प्रेमानं प्राण्यांचीवसाहत (राहण्याची जागा) म्हणतो ती सोडून जावं लागतं किंवा नामशेष व्हावं लागतं. अलिकडे आपल्याला हे प्राणी नामशेष होतानाच दिसून येताहेत. माणसांची आणखी एक गोष्ट प्राणी कधीच करू शकत नाहीत ती म्हणजे, माणसं संघटित होऊ शकतात, मतदान करून सरकार स्थापन करू शकतात, त्यांना आरामशीरपणे राहता यावं यासाठी कायदे तयार करू शकतात, प्राणी मात्रं असं काहीच करू शकत नाहीत. माणसं जेव्हा त्यांना आरामात राहता यावं म्हणून कायदे तयार करतात तेव्हा त्या कायद्यांच्याकेंद्रस्थानी माणसंच असतात ज्यात प्राण्यांना अजिबात जागा नसते. माणसं सरकार स्थापन करतात, नागरी विकास, रस्ते, जलसिंचन, परिवहन यासारखे इतरही अनेक विभाग स्थापन करतात. या विभागांमुळे त्यांचं आयुष्य सुखकर होतं पण प्राण्यांना मात्र जाच होतो ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच माणसानं आणखी एक विभाग बनवला तो म्हणजे वन विभाग.

म्हणूनच वन्य प्राण्यांच्या अस्तित्वासाठी वन मंत्री व त्यांच्या विभागाची भूमिका फार  महत्वाची ठरते. विद्यमान वनमंत्र्यांनी या विभागाचा कार्यभार हाती घेईपर्यंत या विभागाला कुणी गांभिर्यानं घेत नसे कारणकदाचीत हे असं एकमेव खातं आहे जे माणसांसाठी नाही. अर्थातच त्यामुळे निवडून आलेल्या बहुतेक व्यक्तींना (म्हणजेच मंत्री) जंगले, प्राणी किंवा झाडांना हाताळण्यात फारसा रस नव्हता. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये बराच बदल झालाय, वाघ व बिबट्यांचे मृत्यू होत असले तरीही आपल्या राज्यामध्ये वाघांची संख्या वाढलीय ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. नागपुरला वाघांची जागतिक राजधानी म्हणतात. हा शाही प्राणी जगाच्या बहुतेक भागांमधून नामशेष होत असताना ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रात मात्र वाघटिकून आहेत तसंच त्यांचीही संख्याही वाढतेय. राज्याच्या पश्चिम भागात कोल्हापूर जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे नवीन अभयारण्य सुरू झालं आहे. तसंच वन्य प्राण्यांचं जीवन थोडं सुकर करण्यासाठी इतरही अनेक पुढाकार घेण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे वन विभागामध्ये काम करणाऱ्या माणसांचीही काळजी घेणे, कारण हीच माणसं वन्य प्राणी व त्यांच्या निवासस्थानाचं संरक्षण करण्यासाठी जबाबदार आहेतया लोकांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ते वन्य जीवनाची काळजी घेऊ शकतील अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो? मी गेल्या काही वर्षामध्ये पाहिलेला बदल म्हणजे वन विभागासाठी चांगल्यापैकी निधीची तरतूद केली जाऊ लागलीय. हा अगदी शंभर टक्के बदल नसला तरीही ही मोठी गोष्ट आहे. त्याचवेळी वनीकरणावर व शहरी लोकांमध्ये वन्य जीवन संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यावर अधिक भर देण्यात आलाय. हे महत्वाचं आहे कारण तुम्हाला जोपर्यंत कशाचं संरक्षण करायचंय हेच माहिती नसेल तर तुम्ही त्याचं संरक्षण कसं कराल? मी आपल्या राज्याच्या मंत्रालयाला (जिथे राज्याची सगळी धोरणं तयार केली जातात) अनेकदा भेट देतो पण अलिकडे झालेल्या भेटीत पहिल्यांदाच संपूर्ण तळमजल्यावर वन्यजीवनाची छायाचित्रं लावलेली पाहिली, त्याचप्रमाणे एका भल्यामोठ्या वाघीणीचा पुतळा तुमचं स्वागत करतो. हेच आवश्यक आहे कारण जेव्हा सामान्य माणूस, राज्यकर्ते वन्यजीवनाचा प्राधान्यानं विचार करत असल्याचं पाहतो तेव्हा ते महत्वाचं असलं पाहिजे असं त्याला वाटतं. यातून एक स्पष्ट संदेश दिला जातो. यासाठी मी वन विभागाच्या चमूला व वनमंत्र्यांना पैकीच्या पैकी गुण देईन. ते स्वतः चंद्रपूर मतदार संघातले आहेत, जिथे सर्वाधिक जंगल तसंच माणूस व प्राण्यांमधला संघर्षही आहे. त्यामुळेच राज्यातल्या इतर भागातल्या कोणत्याही शासनकर्त्यांच्या तुलनेत त्यांना जंगलाचं महत्व तसंच समस्या अधिक चांगल्याप्रकारे समजत असाव्यात. एकापरीनं सध्याचे वनमंत्री हे वन्यजीवनासाठी एकप्रकारे वरदानच आहेत कारण अर्थ खातंही त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे ते स्वतःच वन्यजीवनासाठी निधीची तरतूद करू शकतात.

खरंच या सगळ्या प्रयत्नांमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, पेंच, उमरेड-करंडला किंवा टिपेश्वर या सगळ्या ठिकाणी वाघांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. वाघ हा वन्य जीवनाच्या शीखरस्थानी असल्याने हे एकप्रकारे सुदृढ वन्य जीवनाचे निदर्शक आहे. मात्र यामुळे मनुष्य व प्राण्यांमधील संघर्षातही वाढ झाली आहे. अनेकांनी मनुष्य व प्राण्यांमधील संघर्षाविषयी ऐकलं असेल मात्र अतिशय कमी जण त्याचा नेमका अर्थ जाणतात. हे अगदी सोपं आहे, जंगल हे वन्य प्राण्यांचं घर आहे, ज्यामध्ये फक्त वाघ किंवा बिबट्याचाच नाही तर सशापासून ते हरणापर्यंत व साळींदरापासून ते इतरही हजारो वन्य प्रजातीपर्यंत सर्वांचा समावेश होतोया प्राण्यांचं घर असलेल्या जंगलांना लागून मानवी वसाहतीही असतात व माणसांची लोकसंख्या प्राण्यांपेक्षा झपाट्यानं वाढते. आपल्या वाढत्या लोकसंख्येसोबतच जीवनाच्या सुखसोयीही वाढतात.त्यामुळेच माणसांना वाढत्या लोकसंख्येसाठी अधिक जमीन हवी असते म्हणून ते प्राण्यांच्या घरांवर म्हणजेच जंगलांवर अतिक्रमण करतात. अर्थातच प्राणी प्रतिकार करायचा प्रयत्न करतात. वाघ जंगलांना लागून असलेल्या मानवी वसाहतींवर हल्ले करतात किंवा बिबटे, गाय किंवा शेळ्यांसारखे पाळीव प्राणी मारतात किंवा हरिणांचे कळप जंगलांशेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांची पिके खाऊन टाकतात. असा अनेकप्रकारे संघर्ष होतो. माणसांना वन्य प्राण्यांचे हल्ले आवडत नाहीत, त्यांच्या सुखसोयी नष्ट करणाऱ्या प्राण्यांना ते त्यांच्या शस्त्रांनी ठार मारतात, यालाच माणूस व प्राण्यांमधला संघर्ष म्हणतात. हा संघर्ष सर्व जंगले व त्यांच्या आसपासच्या भागात सुरू असतो. हा संघर्षच वन विभागासाठी सर्वात मोठं आव्हान आहे.

मला खात्री आहे की वनविभागालाही हे माहिती असेल व वन्य प्राण्यांसाठीची ही लढाई जिंकण्यासाठी ते योग्य ती पावलं उचलतील. याचं कारण म्हणजे वन्य प्राण्यांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी केवळ आहेत ती जंगलं पुरेशी नाहीत तर मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी नवीन जंगलंही तयार करणं आवश्यक आहे याची त्यांना जाणीव आहे. जशी माणसांना वाढत्या लोकसंख्येसाठी जागा हवी असते तशीच प्राण्यांनाही जागा आवश्यक असते पण त्यांच्याकडे माणसासारखी बुद्धिमत्ता किंवा यंत्रसामग्री किंवा त्यांची काळजी घ्यायला सरकार नसतं. म्हणूनच आपली बुद्धिमत्ता व यंत्रसामग्री या प्राण्यांसाठी वापरणं हे वनमंत्री व त्यांच्या विभागाचे काम आहे.

आपल्या राखीव जंगलाच्या परिसरात जेव्हा एखादा वाघ मारला जातो, ता.क. (साल 2019 मध्येच आपण जवळपास 12 वाघ गमावलेत) किंवा गावकरी एखाद्या बिबट्याला मारहाण करतात किंवा तो एखाद्या लहान मुलाला मारतो किंवा एखादा हत्ती शेतकऱ्यांना पळता भुई थोडी करतो, तेव्हा या सगळ्या घटनांना वर्तमानपत्रात मुखपृष्ठावर प्रसिद्धी मिळते. सगळी माध्यमं ही समस्या उचलून धरतात व लोक त्याला माणूस व प्राण्यांमधला संघर्ष म्हणतात. मात्र अगदी आपल्या  पुणे  शहराभोवतालच्या भागात फुलपाखरं, पक्षी, मुंगूस, बेडूक, कोल्हा, ससा, तरस, मासा किंवा अगदी माकडं (ही यादी न संपणारी आहे) या संघर्षामध्ये पराभूत (म्हणजे नामशेष) होत आहेत. माणूस-प्राण्यांमधल्या या संघर्षापेक्षाही कितीतरी पटीनं मोठ्या असलेल्या शहर व वन्यजीवन संघर्षाची कुणालाच फिकीर नाही. माणसांसाठी व त्यांच्या वाढत्या गरजांसाठी जागा करून देण्यासाठी जशी शहरं वाढताहेत तसं आपण प्रत्येक प्रजातीला आपल्या शहरांमधून किंवा गावांमधूनच नाही तर या पृथ्वीवरूनच नामशेष करतोय. तुम्ही जेव्हा एखादं झाड तोडता तेव्हा ते अनेक पक्षी, खारी, माकडं किंवा फुलपाखरांचं घर असतं. विचार करा त्यांच्याकडे आपल्यासारखं एका रात्रीत सामान हलवण्यासाठी मूव्हर्स अँड पॅकर्सची सोय नसते. तसंच त्यांना एखादा वास्तुविशारद किंवा कंत्राटदार बोलावून त्यांच्यासाठी नवीन घरंही बांधता येत नाही, मग त्यांनी कुठे जायचे ?

आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शहरातलं मानवनिर्मित कोणतंही अतिक्रमण (म्हणजे अवैध घरं) हटवणं किती अवघड असतं. ही गरीब माणसं कुठं जाणार असं आपलं सरकार म्हणतं व मानवतेच्या दृष्टिकोनातून ही सगळी अवैध घरं नियमित करतंमात्र एखाद्या दिवशी एखादी जमीन निवासी किंवा औद्योगिक म्हणून जाहीर करताना आपण ज्या पक्ष्यांच्या, कीटकांच्या, प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या प्रजातींचं ते कायदेशीर घर होतं त्यांच्याविषयी क्षणाचाही विचार करत नाही. त्यांना त्यांच्या घरातून हाकलून देतो, आता याला माणूसकी म्हणावी की काय?

मी पुन्हा एकदा सांगतो की, घरं, रस्ते, उद्योग किंवा कोणतंही बांधकाम करू नका असं माझं म्हणणं नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण आपल्यासाठी आरामदायक घरं बांधत असताना सगळीकडेच वन्यजीवनासाठीही थोडी जागा ठेवली पाहिजे, जे आपण सध्या करत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठीच आपण आपल्या वनविभागाची रचना वन्य जीवन विभाग म्हणून केली पाहिजे. ज्याप्रमाणे आयएएस अधिकारी प्रत्येक सरकारी विभागाचे प्रमुख असतात, त्याचप्रमाणे आयएफएस अधिकाऱ्यांना म्हणजेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही प्रत्येक विभागाच्या नियोजन चमूमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आपल्याकडे जसा नागरी नियोजन विभाग असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे वन्य जीवन नियोजन विभागही असला पाहिजे. असं झालं तरंच आपलं संपूर्ण जीवन वन्यजीवन-केंद्रित होईल. तरच प्राण्यांसाठी काही आशा असेल, ज्यामध्ये वाघ हा शिखरस्थानी आहे. माझ्या मनात सहजच (स्वैरपणे) हा विचार आला. मात्र असा विचार येण्यामागेही एक कारण आहे, तुम्ही कोणतंही वर्तमानपत्र उघडा, तुम्हाला वन्यजीवनाविषयी काहीतरी वाईटच वाचायला मिळतं. त्याशिवायही वन्यजीवनासंदर्भातल्या अनेक वाईट बातम्या असतात ज्या प्रसिद्धच होत नाही, पण त्या घडत असतात. त्या घडू नयेत यासाठी आपल्याला झपाट्यानं पावलं उचलावी लागणार आहेत. आता वाघ वाचवा म्हणून नुसती जनजागृती करणं बसं झालं (म्हणजे ती सुरूच राहील), आता प्रत्यक्ष कृती करायची वेळ आहे. वाघ व त्याचं घर म्हणजेच जंगल वाचवण्यासाठी केवळ कुणा वनमंत्र्यांचे किंवा वन विभागाचे प्रयत्न पुरेसे नाहीत तर आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

आपण वन्यजीवनाविषयीच्या आपल्या दृष्टिकोनात अमूलाग्र बदल केला (आपण केवळ तेवढंच करणं आवश्यक आहे) तरच आपल्याला जागतिक वाघ दिन साजरा करायचा अधिकार आहे. नाहीतर वाघ किंवा कोणत्याच प्रजातीसाठी जमीन (घर किंवा निवासस्थान) उरणार नाही. त्यानंतर फक्त वाघ दिवस असेल, मात्र तो दिवस पाहायला वाघच उरणार नाहीत!

संजय देशपांडे
संजीवनी  डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment