Sunday 29 March 2020

श्रद्धा, सबुरी आणि लॉकडाऊन





























जेव्हा जीवन जगणे कठीण करते, तेव्हा सर्वसामान्य माणूस झुकतो व शरण जातो, मात्र काही माणसं जीवनाहूनही कणखर होतात व जगण्याला पुरून उरतात”...

वरील वाक्य दुसरं कुणी नाही तर मीच म्हटले आहे, त्यासाठी लॉकडाऊनच्या काळातल्या तत्वज्ञानाचे आभार! सर्व काही थंडावून अप्रत्यक्षपणे जवळपास पंधरा दिवस उलटून गेलेत व संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन होऊन आता एक आठवडा झालाय. यातली सगळ्यात चांगली बाब म्हणजे लोक सहकार्य करताहेत (त्यांच्याकडे दुसरा काय पर्याय आहे) व सर्वात वाईट बाब म्हणजे आपण सगळे निरुपयोगी झालो आहोत व आपल्याकडे वेळ असूनही आपण आपली सृजनशीलता वायफळ (मजेशीर नाही) विनोद करण्यात, गोंधळ निर्माण करण्यात व नकारात्मकता पसरवण्यात वाया घालवतोय. थोडक्यात आपल्याला शांतपणे बसून काहीतरी सृजनशील करायची सवयच नाही. मी हे बहुसंख्य लोकांविषयी बोलतोय, असे थोडेफार लोक आहेत जे हा लॉकडाऊनचा काळ काहीतरी उत्पादक तयार करण्यासाठी वापरताहेत, ज्यामुळे इतरांना नैराश्यावर मात करता येईल. तासन् तास काहीही न करता बसून राहिल्यानं बऱ्याच जणांना नैराश्य यायला सुरूवात झालीय. 

उदाहरणार्थ काही जण ऑनलाईन व्यायामाचे कार्यक्रम आयोजित करत आहेत, काही जण ऑनलाईन कलाकुसरीच्या वस्तू बनवायला शिकवतंय, काही महिला (पुरुषही) स्वयंपाकाचे ऑनलाईन वर्ग घेत आहेत, जागतिक आरोग्य संघटनाही शांत राहण्यासाठी ऑनलाइन सूचना देत आहे, अशी ही यादी लांबलचक आहे. मात्र एकीकडे बहुतेक वॉट्सप ग्रुप्स पुन्हा पुन्हा तेच ते फॉरवर्ड पाठवण्यात व्यग्र आहेत, यातल्या १०० पैकी ९९ जणांनी ते वाचले किंवा आपण काय फॉरवर्ड करतोय हे पाहिलेही नसते. अशाप्रकारेफॉरवर्ड करून ते दोन गोष्टी साध्य करायचा प्रयत्न करत आहेत, एक म्हणजे त्यांचा मोकळा वेळ घालवताहेत व दुसरे म्हणजे वॉट्सपवर आपलं अस्तित्व जाणवून देण्याचा प्रयत्न करताहेत. 

त्यानंतर काही माणसं अशीही आहेत, जी बाहेर जाऊ शकताहेत जी इतरांना शक्य होईल ती सर्व मदत करताहेत, ती रस्त्यावर, त्यांच्या कार्यालयातून या युद्ध परिस्थितीला तोंड देताहेत, यातले बहुतेक सरकारी कर्मचारी व काही सामाजिक संघटनांची माणसं आहेत. 

काल पाऊस पडला आणि वॉट्सपवर एक संदेश आला की, "आज तारीख व वार काय आहे याविषयी तुम्ही कदाचित गोंधळून गेला असाल तर आता पाऊस पडल्यामुळे हा कोणता हंगाम आहे असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल!" हे जरी कल्पक असलं तरी आपण आपली सृजनशीलता अधिक चांगल्या कारणांसाठी वापरायला काय हरकत आहे कारण सृजनशीलता चुकीच्या कारणानं वापरण्यासारखा दुसरा अपव्यय नाही. मी असं म्हणत नाही की विनोद करणं चूक आहे व विनोद करूच नका पण तो केवळ आयुष्याचा एक भाग आहे हे विसरू नका. नाहीतर विनोदाचा अतिरेक झाल्यानं आयुष्यच एक विनोद होऊन जाईल.

आता लॉकडाऊनच्या अंमलबजावणी विषयी बोलू, हळूहळू आपल्याला परिस्थितीची जाणीव होतेय. आपल्याकडे बाँबस्फोट, दहशतवादी हल्ले, भूकंप, पूर, स्वाईनफ्लू यासारख्या अनेक आपत्ती येऊन गेल्या आहेत, तरीही आपण त्यातून काही शिकलो नाही, किमान यावेळी तरी आपत्तीला तोंड देण्याचा धडा आपण विसरणार नाही अशी आशा आहे. प्रशासनाला लोकांना घरात ठेवण्यासाठी व या आपत्तीमध्ये स्वतःची जबाबदारी समजून घ्यावी यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागता हेत त्यावरून कुणीच यासाठी तयार नव्हतं हे आपल्याला दिसून येतंय.तुम्ही सतत भीतीखाली जगू नये हे मान्य आहे पण तुम्ही किमान काळजी तरी घेतली पाहिजे हे तुमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या लोकांकडून अपेक्षित आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा तेवढीच जबाबदार आहे कारण साथीच्या रोगांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी बचाव प्रशिक्षण कुठे आहे. जाऊ द्या हा केवळ विनोद होता जिथे आग लागणे किंवा बाँबस्फोट यासाठी सराव प्रशिक्षणही आयोजित केले जात नाही तिथे मी साथीच्या रोगांसाठी सराव प्रशिक्षणाची अपेक्षा कशी करू शकतो. आपल्या येथे काही पोलीस सराव प्रशिक्षण आयोजित करतात, त्यासाठी एखाद्या प्रसिद्ध मॉलमध्ये दहशतवादी आल्याची कल्पना केली जाते (हा मॉल प्रसिद्ध असणे अतिशय आवश्यक आहे नाहीतर आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल). त्यानंतर कमांडो येऊन त्यांची सुटका करतात, दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये पोलीस शिपायांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. त्यांनी मॉलमध्ये प्रवेश करताना काहीही संरक्षण नंतर आपत्ती काळाचे संरक्षनार्थ साधने घातलेली नसतात (पोलीस रस्त्यावर फिरत असतात त्याप्रमाणे) आणि खेळ संपतो. मला आठवतंय एक पोलीस शिपाई अशाच एका सराव प्रशिक्षणात लाईफ जॅकेटसारखं मूलभूत संरक्षणही न घेता ती बाँबसदृश वस्तू हाताळत होता, जाऊ दे; ते सराव प्रशिक्षण असल्याचं त्याला माहिती होतं.जर संबंधित सरकारी विभागांमध्ये अशी परिस्थिती असेल तर या स्मार्ट शहरातल्या निम्म्याहून अधिक बहुमजली इमारतीतल्या अग्निशामक यंत्रणा बंद आहेत, कधीच दुरुस्त केलेल्या नाहीत व पूर्ण झालेल्या इमारतींमध्ये राहणारी माणसे इमारतीच्या सुरक्षा लेखा परीक्षणावर १०% ही खर्च करत नाहीत. अशावेळी मी सरकारनं आपत्तीसाठी सराव प्रशिक्षणं घ्यावीत व सज्ज राहावं अशी अपेक्षा कशी करू शकतो. शेवटी सरकारही "लोकांनी, लोकांचे व लोकांसाठी चालवलेले असते", खरंच आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा सरकार आणि लोकांचा ताळमेळ उत्तमच आहे नाही का!
मी उपहासात्मक किंवा नकारात्मक बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल, एक चाचणी घ्या; तुमच्या कोणत्याही दहा मित्र मैत्रिणींना कॉल करा/वॉट्सप करा (या चाचणीत तुमचाही समावेश होतो) व त्याला/तिला स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा संपर्क क्रमांक, पत्ता व इतर क्रमांकविचारा (त्याला किंवा तिला याचा काय अर्थ होतो हे देखील विचारा) व अगदी दोन लोकांनीही बरोबर उत्तर दिलं तर मी माझे शब्द या शेयारिंग मधून शब्दशाहा परत घेईन. खरतर मी तुम्हाला आव्हान देतोय हाच समाज म्हणून आपण याच नाही तर कोणत्याही आपत्तीबाबत किती अजाण आहोत याचा पुरावा आहे. खरी आपत्ती कोणताही इशारा देऊन येत नाही. खरंतर बहुतेक आपत्तींचा इशारा आधी मिळालेला असतो, मात्र आपण मूर्खासारखे वॉट्सप संदेश पाठवत बसतो आणि या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो, अर्थात हा स्वतंत्र विषय आहे.

जेव्हा एखाद्या साथीच्या रोगासारखी आपत्ती येते, तेव्हा मानवी शरीराच्या वैयक्तिक रोगप्रतिकारक्षमतेचा प्रश्न येतो. या बाबतीत आपण जगातील कुठल्याही देशाच्या पुढे आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार आपल्या देशातल्या जवळपास ९०% लोकांना पीण्यायोग्य पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीही उपलब्ध नाहीत व तरीही ते जगत असतात. मी साधारण दोन दशकांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा युरोपच्या सहलीला गेलो होतो, तेव्हा मी मित्राला हॉटेलमधून निघायच्या वेळी सोबत प्यायला पाणी घ्यायचं का असं सहज विचारलं, कारण पाणी विकत घेणं महाग पडेल हे मला माहिती होतं.त्यावर माझा मित्र अभिमानानं मला म्हणाला, पाणी सोबत न्यायची गरज नाही, युरोपात तू कुठलाही नळ उघडून त्याचं पाणी पिऊ शकतोस, ते पिण्यासाठी सुरक्षित असेल आपल्या देशात, नेमकी याच्या उलट परिस्थिती असते, तुम्ही कुठलाही नळ उघडा किंवा पाण्याची भांडी पाहा, ते पाणी पिण्यासाठी असुरक्षित असतं तरीही आपण ते पितो, आपलं आयुष्य सुरळीतपणे सुरू असतं, त्यामुळे आपण काहीही पचवू शकतो, आपल्यामध्ये बहुतेक विषाणू किंवा जीवाणूंच्या हल्ल्यांविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता असते. ही पुण्यासारख्या स्मार्ट शहरातली परिस्थिती आहे, तुम्ही खेड्यांमध्ये किंवा अगदी गावांमध्ये गेलात तर लोक जिथलं पाणी पितात ते पाहून तुम्हाला चक्कर येईल. हे कटू सत्य आहे, भारतातल्या पाण्याच्या स्थितीविषयी ताजी (वास्तविक जीवनातील) दृश्य पाहण्यासाठी गुगलवर शोध घ्या. मी चेष्टा करत नाहीये रोग प्रतिकार क्षमते विषयी बोलायचं तर पाणीच काय लोकांना स्वच्छते विषयक मूलभूत सोयीही मिळत नाहीत, आपली सार्वजनिक रुग्णालये गलिच्छ आहेत (त्यातली बहुतेक) व अगदी आपल्या डॉक्टरांनाही कोंदट खोल्यांमध्ये मोठमोठ्या शस्त्रक्रिया करायची सवय असते जिथे पुरेशी प्रकाश व्यवस्था किंवा जीवनावश्यक ती साधनेही नसतात. या देशामध्ये हजारो महिलांना आगगाडीच्या डब्यात, बस स्थानकावर, रस्त्यावर, शेतात प्रसूती वेदना सुरू होतात व तिथेच त्यांची प्रसूती होते. त्यांना फारशी सुटीही मिळत नाही की लगेच बाळाला छातीशी घेऊन कामाला जुंपतात; तरीही या देशात आयुष्य थांबत नाही, सुरूच राहतं!

मात्र आता आपला भूतकाळ मागे सोडू आणि यातून धडा घेऊन काहीतरी नवीन लिहू. कारण प्रत्येक वेळी काहीतरी चमत्कार होऊन आपण वाचणार नाही. आपण आपल्यातल्या रोगप्रतिकारक क्षमते सोबतच चांगल्या सवयीही लावून घेतल्या पाहिजेत. याची सुरूवात स्वतःपासून केली पाहिजे, वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छता राखून थोडा अधिक चांगला नागरी समाज घडवला पाहिजे. केवळ पेट्रोल व गॅसच्या किमती किंवा आरक्षण यासारख्या विषयांवरच आवाज न उठवता सार्वजनिक आरोग्याचे मुद्देही मांडले पाहिजेत.

काही वेळा मला आपल्या देशवासियांची शारीरिक पेक्षाही मानसिक रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे असं वाटतं, नाहीतर जिथे प्रत्येक दिवशी यातना भोगाव्या लागतात (बहुतेकांना) अशा विपरित परिस्थितीत कुणी कसा जगू शकतो? पण यामुळेच मला आपण सध्याचं युद्ध जिंकू अशी आशाही वाटते. आपल्या देशामध्ये श्रद्धा सबुरी आणि सबुरी हे दोन शब्द परमपवित्र मानले जातात, या दोन्हींमुळेच आपली रोगप्रतिकार क्षमताही जास्त आहे, जय हो!

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
इमेल: smd156812@gmail.com

Saturday 28 March 2020

शिस्त, समाज आणि लॉकडाऊन




























शिस्त शिकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही लहान असताना तुमचे पालक व शिक्षक जे शिकवतात त्याचे डोळे झाकून पालन करणे; सर्वात अवघड मार्ग म्हणजे शिस्तबद्धपणे वागण्याशिवाय दुसरा काही उपाय नसताना ती स्वीकारणे”...विन्स लोंबार्ड.

विन्स हे अमेरिकेच्या क्रीडा इतिहासातील एक सर्वोत्तम प्रशिक्षक व अतिशय शिस्तप्रिय होते. राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या ६व्या दिवशी मी पहाटे (मी सामान्यपणे सकाळी लवकरच उठतो) उठलो तेव्हा पोलीसांची गाडी ध्वनी क्षेपकाद्वारे एक घोषणा करत होती, सकाळचा फेरफटका मारायला/जॉगिंग करायला आलेल्यांनी परत घरी जावं नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ती घोषणा होती. माझ्यासाठी दिवसाची सुरूवात पहिल्यांदाच एवढी विचित्र झाली होती. एरवी कधी आपण यावर हसलो असतो, मात्र ही हसायची वेळ नाही. आपण सध्याच्या कोव्हिडविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाविषयी असंख्य विनोद/विडंबनं/व्यंगचित्र एकमेकांना पाठवत असलो तरीही आतून आपण सगळे धास्तावलेलो आहोत हे नक्की, आपण वरवर ते नाकारत असलो तरीही. भीती नक्कीच आहे, पण मला त्याची लाज वाटत नाही. किंबहुना ती आहे हे स्वीकारल्यानं त्यावर मी अधिक चांगल्याप्रकारे मात करून पुढची वाटचाल करू शकेन. मी खाली वाकून पाहिलं तेव्हा मला बऱ्याच स्त्रिया व पुरूष व्यायामाचा पोशाख घालून नदीला लागून असलेल्या १०० फूट रुंद रस्त्याच्या पदपथावर चालताना दिसले, काही जण शरीराला ताण देणारे व्यायामही करत होते. मग अचानक जाणीव झाली, अरेच्चा देशभर लॉकडाऊन लागू आहे. आपण एका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, स्वतः सुरक्षित राहण्यासाठी घरात बसणे अपेक्षित आहे. इथे लोक मात्रहा नेहमीसारखाच दिवस असल्याप्रमाणे रस्त्यावर निघाले आहेत. हा त्यांचा भाबडेपणा किंवा शूरवीरपणा नाही, तर निव्वळ बिनडोक अडाणीपणा आहे.

आता माननीय पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्या दिवशी जेव्हा संध्याकाळी ५ वाजता टाळ्या व थाळ्या वाजवून वैद्यकीय व्यावसायिकांचे आभार मानून त्यांना पाठिंबा द्यायचं आवाहन केलं होतं तेव्हा रस्त्यावर मोर्चे काढणाऱ्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा करता येईल.आपण बिनडोक अडाणी आहोत हे हजारो वेळा सिद्ध झालंय, मग ते लाल सिग्नल तोडणं असतो किंवा दुचाकीवर जाताना हेल्मेट नघालणं असो किंवा आपली चकचकीत एसयूव्ही १०० किमी/तास वेगानं चालवताना सीट बेल्ट वापरणं अपमानास्पद वाटणं असो किंवा अगदी किराणा सामान खरेदी करायला गेल्यावर रांगेत उभं न राहता धक्काबुक्की करणं असो. या देशामध्ये दैनंदिन जीवनाविषयीचा असा बिनडोक अडाणी दृष्टिकोन आपण केवळ पाहातच नाही तर त्याचा भागही होतो. लोकशाहीच्या नावाखाली असं करण्यात आपल्याला अभिमान वाटतो, अशावेळी पोलीसांकडे या पांढरपेशा नागरिकांना कायदेशीर कारवाईची धमकी देऊन रस्त्यावरून हुसकावून लावण्याशिवाय काय पर्याय असतो. कारण या नागरिकांना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी व्यायाम न करता घरात बंद राहिलं पाहिजे हे चांगलं ठावूक आहे.

आपणा भारतीयांचा चलता है दृष्टिकोन टिकून राहण्यासाठी किंवा तो बळकट होण्यासाठी फक्त आपले शिकलेले नागरिक नाही तर ही यंत्रणा जिला आपण सरकार म्हणतो ती सुद्धा शंभर टक्के जबाबदार आहे. कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती सारखी आहे याचा भरवसा देण्यासाठी आपल्या न्यायदेवतेचे डोळे झाकलेले असतात, पण शासनकर्ते व अंमलबजावणी करणारे त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतात, हेच आपल्या अशा दृष्टिकोना मागचं मुख्य कारण आहे. याचं अगदी लहानसं उदाहरण आहे लाल सिग्नल तोडणे, वाहतूक पोलीस अनेकदा याकडे डोळेझाक करतात, मात्र जेव्हा हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू होते तेव्हा त्याच वाहनचालकाला बिनाहेल्मेट वाहनासाठी पकडतात. लोक प्रवेशबंदी असलेल्या रस्त्यांवर बिनधास्तपणे प्रवेश करतात व १०० पैकी ९० वेळा पकडले जात नाहीत आणि जेव्हा ते पकडले जातात तेव्हा काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 

आपण आपले घर सोडून सगळीकडे थुंकतो, आपण नद्यांमध्ये, रस्त्यावर आपल्याला हवा तसा कचरा फेकतो, रस्त्याच्या कडेला कुठेही सगळ्यांकडे पाठ करून लघवी करायला उभे राहतो आपल्याकडे कुणीही पाहात नाही असं आपल्याला वाटत असतं (आपल्याकडे सार्वजनिक शौचालये अतिशय कमी आहेत हे देखील त्याचे कारण आहे) वआपल्याकडे सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता तर अतिशय दयनीय असते, कोणतेही सार्वजनिक स्वच्छता गृह किंवा उद्यान किंवा ऐतिहासिक वास्तूला भेट द्या व तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का हे स्वतहाच पाहा. प्रत्येक गाव, शहर किंवा महानगरांमध्ये आधीपासूनच अरुंद असलेल्या रस्त्यांवर अगदी लहानसहान प्रसंगांसाठी (गल्लीतल्या एखाद्या भाईचा वाढदिवस) मोठमोठे मोर्चे, मिरवणुका काढल्या जातात व स्पिकर्सची भिंत उभारून कर्कश्श आवाजात संगीत लावलं जातं. या देशात सर्वोच्च न्यायालयानं यावर बंदी घालूनही, प्रत्येक गावात, शहरात व महानगरात असे प्रकार होत असतात व कायद्याची अंमलबजावणी करणारे त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावर लोकांचीच मागणी असल्याने अशा मिरवणुका काढायला परवानगी द्यावी लागते, आम्ही काय करू शकतो अशी भूमिका घेतली जाते. आपल्याकडे घरे बांधण्यासाठी नियम व कायदे असतात ज्यातून गृहनिर्माण संकुल तयार होते. मात्र देशभरात हजारो लोक त्यांच्या मर्जीने कुणाच्याही परवानगीशिवाय घरे बांधतात व लाखो लोक ती खरेदी करतात व त्यात राहू लागतात. तर हेच सरकार माननीय न्यायालयाला लोकांच्या गरजेच्या नावाखाली ही अवैध बांधकामे वैध करायची परवानगी मागते. असं असूनही आपण नागरिकांमध्ये कायद्याचे पालन करायची वृत्ती असावी अशी अपेक्षा करतो, लोकहो आपण कुणाला मूर्ख बनवतोय? इथे तुम्ही काहीही केलं तरी, चालतं हो, भाऊ!”  या एका वाक्यानं सगळं खपवून घेतलं जातं.

पैसा, पद किंवा अगदी शारीरिक ताकदही नसलेल्या सामान्य माणसाने कधी कायद्याचे उल्लंघन केल्यास, प्रत्येक सरकारी यंत्रणा त्या व्यक्तीला पकडायला सज्ज असते. मात्र पैसा किंवा पद असलेल्या एखाद्या माणसाने कोणताही कायदा मोडल्यास त्याच्यावर किंवा तिच्यावर कारवाई होताना क्वचितच पाहायला मिळते.जेव्हा हजारो लोक कायदा मोडतात व बेशिस्तपणे वागतात तेव्हा ती सामान्य माणसं असूनही, लोकआग्रहामुळे कायदा त्यांना शिक्षा द्यायला धजावत नाही. त्यामुळे अशा समाजावर जेव्हा एखादी आपत्ती ओढवते, आपण शिस्तपालन करावं, घरात बंद राहावं अशी अपेक्षा केली जाते तेव्हा ते साध्य होईल अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो?

खरतर सध्या रस्त्यावर इतकी कमी वर्दळ आहे तसंच अनेक लोक अजूनही घरातच राहणं पसंत करताहेत हा एक चमत्कारच आहे, कारण हा देशच एक चमत्कार आहेकाही दशकांपूर्वी "अमर, अकबर, अँथनी" नावाच्या चित्रपटात, अमिताभ बच्चन चोरीचे सोने घेऊन पळणाऱ्या खलनायकाकडे पाहू एक संवाद म्हणतो, “ऐसा आदमी लाईफ में दोईच बार भागता है, ऑलिम्पिक का रेस हो या तो पोलीस का केस हो म्हणजे आपल्या देशात माणूस इतक्या वेगाने केवळ दोनदाच धावतो, एकतर त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला असेल तर किंवा पोलीस त्याच्या मागे लागले असतील तर.हा भारत आहे; आपल्याकडे कधीही विन्स लोंबार्ड यांच्यासारखे प्रशिक्षक नव्हते पण आपल्याकडे कुठल्याही देशाहून कित्येक पटींनी चांगले पालक व शिक्षक आहेत. पण आपल्याला सर्वात अवघड मार्गानेच शिस्त शिकायची असेल, तर असू देत; “तोपर्यंत जे चाललंय ते चालू द्या भाऊ, आपलाच देश आहे”!

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
इमेल: smd156812@gmail.com


Friday 27 March 2020

कठीण समय, कठीण उपाय आणि लॉकडाऊन




















“कठीण काळ, कठीण उपाययोजना"... इथान हंट.

हा माणूस कोण आहे व हे अवतरण कुठले आहे हे अनेकांना सांगायची गरज नाही, तरीही याविषयी अनभिज्ञ असलेले अनेक निष्पाप आत्मे आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, हा मिशन इम्पॉसिबल या हॉलिवुडपटातील मुख्य पात्राच्या तोंडचा संवाद आहे!

आपले प्रिय पंतप्रधान धक्कादायक (आणीबाणीचे असं लिहीण्याचे धाडस नाही) निर्णय घेण्यात पटाईत आहेत व या कोव्हिडविरुद्धच्या लढाईत धक्कादायक निर्णय घेतले जाणं स्वाभाविक आहे. कारण संपूर्ण देशानं कधीच लॉकडाऊन अनुभली नव्हती (वर्तमानपत्रंही नाहीत, मला आठवत नाही असं शेवटचं कधी झालं होतं), याचा नेमका काय अर्थ होतो व त्याची अंमलबजावणी कशी केले जाते याविषयी बहुतेक जनता (अगदी पोलीसही) अनभिज्ञ होती व आहे. काहीवेळा १३० कोटी हा त्रासदायक आकडा असु शकतो विशेषतः एवढ्या लोकांना त्यांच्या घरात बंद करायची वेळ येते तेव्हा. कारण आपण काही कायद्याचे किंवा नागरी नियमांचे काटेकोर पालन करणारे म्हणून ओळखले जात नाही, याला केवळ मुंबईकरांचा अपवाद आहे कारण शिस्त हाच जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे हे ते जाणतात. याशिवाय मुंबईनंच संचारबंदीच्या स्वरुपातील सर्वाधिक लॉकडाऊन अनुभवली आहे मग त्या जातीय दंगली असोत, बाँबस्फोट किंवा दहशतवादी हल्ले. पण हा आधीच्या सगळ्या हल्ल्यांहून वेगळा आहे.

या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सरकारच्या दृष्टिकोनाविषयी पूर्णपणे आदर आहे, तरीही काही प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष झालंय व लोक त्याविषयी आता कुजबुजू लागले आहेत. लवकरच हा आवाज मोठा होईल की या सगळ्या लॉकडाऊनमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाचं कायहे खरंच एक युद्ध आहे, त्यामुळे त्यात नुकसान होईल, जखमा होतील, त्रास होईल, वेदनाही होतील, आपण त्यासाठी तयार आहोत. पण आपण विजयाची फळे चाखायला सुखरूप आणि सुद्रुड राहिलो तरच युद्ध जिंकलं असं म्हणता येईल. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी जवळपास सर्वच उद्योगांमध्ये आधीपासूनच असलेल्या आर्थिक मंदीमुळे हालाखीची परिस्थिती होती. काही दिवसांची बंदी हरकत नाही, पण जवळपास महिनाभऱ संपूर्ण लॉकडाऊन झाल्यानंतर, अनेक व्यवसाय किंवा उद्योग, जर त्यांच्यासाठी लवकरच काही पॅकेज जाहीर करण्यात आले नाही तर पुन्हा सुरूच होऊ शकणार नाहीत. 

माननीय पंतप्रधान साहेब, हॉटेल, पर्यटन, मनोरंजन यासारखेच उद्योग नाही तर ऑटो उद्योग व रिअल इस्टेट क्षेत्रही आपल्याकडे आशेने पाहात आहे. ज्याप्रमाणे लष्कर प्रत्येक जवानाची काळजी घेते, त्याचप्रमाणे या युद्धामध्ये केवळ देशासाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी जवानाप्रमाणे काम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. लोक केवळ एखाद्या विषाणूमुळे होत असलेल्या प्राणहानीमुळेच नाही तर भविष्या विषयीच्या अनिश्चिततेमुळे व प्रामुख्याने आर्थिक समस्यांमुळे धास्तावले आहेत. या देशामध्ये केवळ कामगारांनाच पोटासाठी कष्ट करावे लागतात असं नाही तर लक्षावधी लोक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी विविध सेवा किंवा किरकोळ कामे किंवा व्यवसायांवर अवलंबून आहेत. यामध्ये देशभर पसरलेली चहाची दुकाने, पानांची दुकाने यापासून ते अगदी डोक्यावर लोखंडी पेटी घेऊन गल्लोगल्ली जाऊन खारी बिस्किटं विकणाऱ्या माणसांपर्यंत, ते ओला, उबरच्या चालकांपर्यंत ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज काढलेलं आहे सगळ्यांचा समावेश होतो. ही यादी प्रचंड मोठी आहे.त्याशिवाय लक्षावधी पांढरपेशा सुशिक्षत उद्योजक आहेत ज्यांचं एक दिवस अंबानी, अदानी, अझीम प्रेमजी किंवा नारायण मूर्ती व्हायचं स्वप्न आहे.या लोकांनी त्यांचं अख्खं जीवन त्यांच्या वैयक्तिक उद्योगासाठी किंवा व्यवसायासाठी झोकून दिलंय. आता हे व्यवसाय महिनाभर बंद ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही, कारण घड्याळाची टकटक व बँकेचं व्याज कधीही थांबत नाही याची त्यांना जाणीव आहे. आपण त्यांना व्याजमाफी दिली (एक आशा) किंवा मुदत वाढवून दिली तरी आधीच महसुलाचं जे नुकसान झालं आहे, विक्रीचे सगळे अंदाज कोलमडून पडले आहेत त्याचं काय त्याशिवाय नोकरी जाण्याची भीती आहेच, सामान्य मध्यमवर्गीय भारतीय माणसासाठी (किंवा बाईसाठी) जीवापेक्षाही नोकरी गमावण्याची जास्त भीती असते कारण त्या व्यक्तीचं तसंच तिच्या कुटुंबियांचं संपूर्ण आयुष्य या नोकरीशी निगडित असतं.प्रत्येक क्षेत्राच्या महसुलावर परिणाम होणार असल्यानं साहजिकपणे नोकऱ्यांवरही परिणाम होईल हे समजण्याइतपत सगळेच सुजाण आहेत. लॉकडाऊन काही दिवसात संपेल पण जनतेच्या मनातली भीती इतक्या लवकर जाणार नाही. यामुळे प्रत्येक क्षेत्रातील व्यवसायावर परिणाम होणं स्वाभाविक आहे.

यात दिलासा देणारी बाब म्हणजे बजाज व टाटांनी रोजगार कपात होणार नाही असा लगेच भरवसा दिला. पण हे सगळे नावाजलेले उद्योगसमूह आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात राखीव निधी आहे. पण अनेक मध्यम उद्योग खर्च व उत्पन्नाची जेमतेम गाठ घालत होते व आहेत, दुसरे म्हणजे आपले काही मोठमोठे व्यावसायिक जे बोलतात (किंवा ट्विट करतात) त्याप्रमाणेच नेहमी वागतात असं नाही, अनेक जणांना मी कुणाविषयी बोलतोय हे समजलं असेल. ज्येष्ठ उद्योजकांनी घेतलेला हा निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह आहे, पण तरीही लहान व मध्यम व्यवसायांना असुरक्षित वाटेलच. कारण मोठमोठे उद्योग समूह अशाप्रकारे घोषणा करत असतील तर उत्पन्नामध्ये निश्चितपणे घट होणार आहे हाच त्यांचा अंदाज आहे. मी आधी नमूद केल्याप्रमाणे आपण जेव्हा मध्यमवर्ग असा उल्लेख करतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त मधल्या फळीतले कर्मचारी असा होत नाही तर समाजातील एक संपूर्ण वर्ग ज्याचे उत्पन्न एकतर पगाराच्या स्वरुपात मर्यादित आहे किंवा त्यांच्या व्यवसायाची उलाढाल मर्यादित आहे.म्हणजे एखादी घरगुती खानावळ चालवणारी बाई आहे, तिची डबे बनवण्याची क्षमता मर्यादित आहे, तसंच तिचं मासिक उत्पन्नही मर्यादित आहे. तिच्या विक्रीत थोडीशी घट झाली तरी तिच्या उत्पन्नावर परिणाम होईल पण तिचे खर्च मात्र कमी होणार नाहीत. तसंच तिला तिच्या या घरगुती खानावळीच्या व्यवसायाची उलाढालही वाढवता येणार नाही.याचे एक उत्तम उदाहरण माझ्या घरात आहे. मी माझ्या काही सदनिका एका मोठ्या कंपनीला भाड्याने दिल्या आहेत, जी नोकरदार एकट्या राहणाऱ्या लोकांना भाड्याने घरे देते. लॉक डाउनच्या चौथ्या दिवशी त्या कंपनीच्या कामकाजाच्या प्रभारी अधिकाऱ्यानं मला कॉल करून अतिशय कमी सदनिका भाड्यानं गेल्याबद्दल व मार्च तसेच एप्रिलच्या भाड्यात बदल करण्याविषयी चिंता व्यक्त केली. अर्थात मी काही त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून नाही (म्हणजेच पूर्णपणे अवलंबून नाही) म्हणून मी म्हटलं, ठीक आहे आपण काहीतरी मधला मार्ग काढू. पण मालमत्ता भाड्याने देऊन मिळणारे उत्पन्न हाच एखाद्या निवृत्त कुटुंबाचा उत्पन्नाचा स्रोत असेल तर काय? मध्यम वर्गात मोडणारी अशी लाखो कुटुंब आहेत ज्यांच्या गरजा केवळ दिवसाला एकवेळच्या जेवणापेक्षा अधिक आहेत. कामगार वर्गाविषयी (जो खऱ्या अर्थाने गरीब आहे) पूर्णपणे आदर राखत म्हणावसं वाटतं की, भारतामध्ये काही वेळा कामगार वर्गातलेच असणं अधिक चांगलं ही वस्तुस्थिती आहे, कारण त्यांना फक्त आजची काळजी असते; त्याउलट मध्यम वर्गच रोज उद्याची व परवाची चिंता करत जगत असतो.
सरकार एखादं पॅकेज जाहीर करून या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जेवणाची सोय करेल पण माझ्या स्कूटरच्या व घरांच्या हप्त्यांचं काय? माझ्या मुलांच्या शाळेच्या फीचं काय, माझ्या पालकांच्या वैद्यकीय खर्चाचं काय, माझ्या महिन्याच्या वाणसामानाच्या खर्चाचं काय? जेव्हा हनुमानाच्या शेपटीसारखी खर्चाची यादी वाढत जाते तेव्हा संकटमोचक म्हणून आम्ही तुमच्याकडेच पाहतो हे लक्षात ठेवा पंतप्रधानजी! म्हणूनच, माननीय पंतप्रधान सर, तुमच्या टीमनं प्रामुख्यानं पांढरपेशा मध्यमवर्गाच्या मनातली अनिश्चितता लक्षात घेऊन काहीतरी घोषणा केली पाहिजे (म्हणजे लवकरात लवकर केली पाहिजे). कारण बहुतेक वेळा या मध्यमवर्गाकडेच दुर्लक्ष केले जाते हा या देशाचा इतिहास आहे. अर्थात लोकांनाही प्रत्येक अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागेल व तेदेखील अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कृपया आमचीही काळजी घ्या, कारण या कोव्हीडरुपी लंका दहनामध्ये आम्हीतुमची सेना म्हणून, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत!

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
इमेल: smd156812@gmail.com