Thursday 30 April 2020

बांधकाम व्यवसायिकांनो, खंबीर राहा!








एखादा मूर्ख जर एखाद्या अफवेवर विश्वास ठेवणारच असेल, तर त्याला तो तसाच ठेवू देणंच शहाणपणा आहे”.

आता पर्यंत तुम्हा सगळ्यांना समजले असेल की हे सुद्धा लॉकडाऊनमध्ये सुचलेलंच तत्वज्ञान आहे. आता जवळपास चाळीस दिवस होऊन गेलेत, आणखी दहाएक दिवस राहिलेत (आशा करूयात). मी ज्या विषयी लिहीणार आहे त्यासाठी उपहासात्मक (काही त्याला कटुताही म्हणू शकतील) अवतरण वापरल्याबद्दल मला माफ करा, पण त्याचं कारण लॉकडाऊनमुळे आलेलं नैराश्य नाही कारण लॉकडाऊन आपल्याच भल्यासाठी आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे, पण आपण व्यावसायिक तसंच सामाजिक जीवनामध्ये ज्यांना अक्षरशः पूजतो -अश्या काही व्यक्तींच्या (लवकरच तो भूतकाळ होईल) प्रतिक्रिया किंवा विचार ऐकल्यावर केवळ उपहास हाच एक पर्याय उरतो. त्यांच्या नावांचा उल्लेख करायची गरज नाही (शहाण्यांना ते समजेलच) त्यातले एक अतिशय मोठ्या खाजगी बँकेचे अध्यक्ष आहेत व रिअल इस्टेट क्षेत्रात तसंच आंतरराष्ट्रीय अर्थ क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. दुसऱ्या देशातल्या सर्वात जुन्या औद्योगिक व्यावसायिक कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांची सामाजिक बांधिलकी व एवढे मोठे व्यावसायिक साम्राज्य सांभाळण्याची हातोटी याविषयी सगळ्यांना अतिशय आदर वाटतो व असे अनेक जणअजून पण आहेत पण काही हरकत नाही, कारण जेव्हा रिअल इस्टेटवर ताशेरे ओढायचे असतात तेव्हा या देशात सगळेच पुढे असतात.

मी या विषयावर बोलतोय, कारण पूर्वीही अनेक मोठ्या व्यक्तींनी (म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातल्या) ज्यांना आपणच मोठं बनवलं, बांधकाम व्यावसायिक व विकासकांविरुद्ध उघड वक्तव्य, ट्विट केलं आहे, त्याची कारणं काहीही असतील पण त्यातल एकही वक्तव्य एकही चांगल्या गोष्टीसाठी नव्हतं ही वस्तुस्थिती आहे. शहरातले रस्ते पुराच्या पाण्यामुळे तुंबले तर बांधकाम व्यावसायिकांचा दोष असतो, महानगरांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली तर त्याचा दोष बांधकाम व्यावसायिकांचा असतो, झाडे कापली जात असतील तर त्यामागे बांधकाम व्यावसायिकांचा हात असतो, एखाद्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलले व तिथे इमारत बांधण्यात आली तर ते काम बांधकाम व्यावसायिकांशिवाय कोण करणार, नदीवर अतिक्रमण झालं तर त्यामागे बांधकाम व्यावसायिक असतो, प्रदूषणाची पातळी वाढली तर हे बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबीचं काम असतं, ही यादी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत जाते. सुदैवानं आत्तापर्यंत तरी कुणी बांधकाम व्यावसायिकांना साथीचे रोग व विषाणूच्या प्रसारासाठी जबाबदार धरलेलं नाही! पण या विषाणूचा प्रसार किंवा प्रसाराचा धोका झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक असतो हे आपल्या सगळ्यांना माहितीय. नेमक्या याच मुद्द्यावरून आपल्या देशातील सामाजिक आदर्श मानल्या जाणाऱ्या श्री. चारित्र्यवान व्यावसायिक महोदयांनी बांधकाम व्यावसायिकांवर (म्हणजेच रिअल इस्टेटवर) ताशेरे ओढले आहेत की बांधकाम व्यावसायिकांच्या हव्यासामुळेच अवैध बांधकामे म्हणजेच झोपडपट्ट्या फोफावल्या. मुंबई व पुण्यातल्या अशाच भागांमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये साथीचा रोग पसरण्याचा धोका सर्वाधिक असताना, अगदी मोक्याच्या वेळी त्याचं हे विधान आलंय. संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राच्या वतीनं तुमचे आभार श्री. चारित्र्यवान व्यावसायिक महोदय; इतर वेळी हे विधान आलं असतं तर मी केवळ मान झुकवली असती (इतरांप्रमाणे) आणि सोडून दिलं असतं, पण यावेळी नाही. तुमचा तसा हेतू नसेल किंवा माध्यमांनी तुमच्या विधानाचा विपर्यास केला असला किंवा चुकीचं छापलं असलं (विधान दिल्यानंतर नेहमीच असं म्हटलं जातं) तरीही, या देशामध्ये लाखो लोक काही जणांना अजूनही दैवत मानतात. जेव्हा नैतिक मूल्ये, चारित्र्य, चांगल्या पद्धतीं विषयी बोललं जातं तेव्हा तुमचं नाव आवर्जून घेतलं जातं, म्हणूनच मला उत्तर लिहावसे वाटले!

सर, सर्वप्रथम, कोणत्याही भूखंडाविषयी काहीही चुकीचे घडते तेव्हा (वर नमूद केलेल्या गोष्टी) मग ती कायदेशीर जमीन असो किंवा नदीखालची किंवा आरक्षण असलेली असो त्यात बांधकाम व्यावसायिकाचे नाव येणे स्वाभाविक आहे, कारण हाच व्यवसाय नवी इमारती बांधतो किंवा उभारतो. ज्याप्रमाणे नुकताच झालेला विषाणूचा प्रसार एखाद्या सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषाणूशास्त्रात संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेत काहीतरी चूक झाल्यामुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय, तसंच हे आहे. पण या देशातील लक्षावधी लोक ज्या कायदेशीर घरांमध्ये राहात आहेत (तुमचाही त्यात समावेश आहे), त्या हजारो इमारतीही याच बांधकाम व्यावसायिकांनी बांधल्या आहेत, नाही का? या व्यवसायातही काही गैरप्रकार करणाऱ्या संस्था आहेत पण मग त्या ऑटोमोबाईल क्षेत्रातही आहेत ज्या बनावट किंवा नकली सुटे भाग तयार करतात. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते की कुणीही बांधकाम व्यावसायिक तो सुपरमॅन असल्याखेरीज एकटा अवैध इमारत बांधू शकत नाही. प्रत्येक अवैध इमारतीच्या मागे एक बांधकाम व्यावसायिक असतो हे मान्य आहे, पण त्याचप्रमाणे प्रत्येक न-परवडणाऱ्या कायदेशीर घरामागेही एक बांधकाम व्यावसायिकच असला पाहिजे, पण त्याच्यामागे एक संपूर्ण व्यवस्था असते ज्यामध्ये आपलं सरकार, तसंच माध्यमे व समाजाचाही समावेश होतो, ज्याचा तुम्ही व आम्हीही एक भाग आहोत. कोणतीही अवैध इमारत एक रात्रीत उभारली जाऊ शकत नाही, अगदी चीनमध्येही नाही. ज्या व्यवस्थेच एका सामान्य बांधकाम व्यावसायिकाला (माझ्या सारख्या) एक योजना मंजूर करून घेण्यासाठी रेरा, आयओडी/सीसी अशी चक्रव्यूहासारखी प्रक्रिया तयार केली, ती काही महिने या अवैध इमारती बांधल्या जात असताना काय करत होतीमग अशा अवैध इमारतींमध्ये घर किंवा कार्यालय थाटलं जातं, त्यात जे राहतात, ते देखील याच देशाचे नागरिक आहेत सर ज्याप्रमाणे तुमच्या कंपनीच्या कारसाठी ते बनावट सुटे भाग खरेदी करतात त्याचप्रमाणे ते या इमारतींमध्येही राहतात. आता तुम्ही सगळ्या कायदेशीर ऑटोमोबाईल निर्मात्यांना चूक किंवा भ्रष्ट म्हणाल का? तसेच या सगळ्या चारचाकी व दुचाकीने होणाऱ्या प्रदूषणाबद्दल बोलतात तर बरे वाटेल आम्हाला आणि हो, आणखी वाहतुकीच्या दयनीय अवस्थेबद्दल पण बोलाल का सर?

आता झोपडपट्ट्यांविषयी बोलू, या शहरांसाठी त्या एक शाप आहेत हे मान्य आहे पण झोपडपट्ट्यांसाठी तुम्ही केवळ बांधकाम व्यावसायिकांना दोष कसा देऊ शकता? या लाखो लोकांना कायदेशीर घरे परवडत नाहीत म्हणून ते झोपडपट्ट्यांचा आश्रय घेतात. कोणतीही झोपडपट्टी शासनकर्त्यांच्या म्हणजेच सरकारच्या पाठिंब्याशिवाय किंवा संमतीशिवाय शक्य नाही हे ढळढळीत सत्य या देशातल्या अगदी लहान मुलालाही माहिती असतं. पण तुम्ही किंवा इतर तथाकथित चारित्र्यवान व्यावसायिक झोपडपट्ट्यांसाठी सरकारला दोष देत नाहीत, याचं काय कारण आहे हे मी विचारू शकतो का? पोलीस आज त्यांच्या अधिकारांचा वापर करून लॉकडाऊनची अगदी काटेकोर अंमलबजावणी करत आहेत, हेच पोलीस व यंत्रणा धारावीसारखी झोपडपट्टी उभी राहात असताना त्यांचे कान व डोळे का बंद करते, ती उभारली जात असतानाच का पाडत नाहीधारावी नक्कीच एका वर्षात तयार झालेली नाही, तुम्ही जेव्हा तरूण होता तेव्हा तिचा आकार कदाचित लहान असेल. धारावी आजचं अक्राळ विक्राळ रूप धारण करेपर्यंत तुम्ही सगळे तथाकथित दक्षिण मुंबईत  राहणारे उच्चभ्रू नागरिक कुठे होतात? ती पूर्णपणे अवैध आहे म्हणून पाडली जावी अशी कुणी मागणी केल्याचं आठवत नाही.
त्यावर जर तुमची प्रति युक्तिवाद असेल की बिल्डरांच्या नफ्याच्या हव्यासामुळे घरे परवडेनाशी झाली व म्हणूनच झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या तर, हाच तर्क हजारो बेकादेशीर हॉटेल्सनाही लागू होतो. कारण ज्या गरीब प्रवाशांना ताजमहाल हॉटेलसारखी महागडी हॉटेलं परवडत नाहीत त्यांना ही बेकायदेशीर हॉटेल्सच आसरा देतात, नाही का? सर दूरवर टिंबकटूसारख्या एखाद्या भागात बांधलेल्या लहान घरांना परवडणारी घरे म्हणता येत नाही. खरंतर तुम्ही परवडणारी म्हणजे काय याची इतरांसाठी व्याख्याकरू शकता, पण नॅनोसारखी सामान्यांना परवडणारी कार बनवण्याचं एखादं स्वप्न पूर्ण करताना काय होतं हे तुम्हाला चांगलेच माहितीय आहे! संपूर्ण उभारणी, जमीनीचा खर्च, पायाभूत सुविधा, बांधकाम, बाजारपेठेची गरज तसंच ग्राहकाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती या सगळ्यागोष्टी ती परवडण्यासारखी आहे का हे ठरवतात, मूठभर अर्धशिक्षित व्यावसायिक नक्कीच ठरवत नाहीत ज्यांना तुम्ही बांधकाम व्यावसायिक म्हणता.

आता, परवडण्यासारखं काय आहे याविषयी चर्चा सुरू झाली तर कुणीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतच  की! तर आणखी एक नाव जे अतिशय आदरानं घेतलं जाते व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गृहबांधणी म्हणजेच रिअल इस्टेट क्षेत्राच्या नफ्यातूनच  भरारी घेतलीय, त्यांनीही अगदी नेमक्या वेळी बांधकाम व्यावसायिकांना तडाखा दिलाय, सदनिकांच्या विक्री दरामध्ये जवळपास २०% घट करावा असे विधान त्यांनी केलेय, ज्यामध्ये ताबा देण्यासाठी तयार सदनिकांचा समावेश होतो. सर, आम्ही तुमचाही अतिशय आदर करतो, मी तुमच्या दोघांचीही माफी मागतो व लहान तोंडी मोठा घास घेतोय पण सर, घर किंवा कुठलेही उत्पादन विक्रेता व ग्राहक या दोघांनाही परवडलं पाहिजे नाहीतर ते केवळ धर्मदाय कार्य होईल, नाही का? मी समजा असं म्हणालो की माझा प्रकल्प उभारणं मला परवडावं यासाठी आपल्या बँकेने व्याजदर २०% कमी करावा, तर त्यावर एका बँकरचं उत्तर काय असेल? मला उत्तर जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना टिकून राहण्यासाठी तुम्ही जो काही फॉर्म्युला सुचवत आहात त्याविषयी माझ्या ज्ञानात मोलाची भर पडेल. केवळ पुणे, मुंबई किंवा दिल्लीच नाही तर देशात कुठेही जा घरे हे  महागच उत्पादन आहे. अगदी ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. नाहीतर, लग्न पाहावे करून व घर पाहावे बांधून ही म्हण मराठीत आलीच नसती. अर्थात तुमच्यासारख्या दिग्गजांना ती माहिती नसेल कारण ती मराठीभाषेत आहे. मी तुम्हाला त्याचा अर्थ समजावून सांगतो, याचा अर्थ असा होतो की माणसानं त्याच्या आयुष्यात दोन गोष्टी नक्की करून पाहिल्या पाहिजेत एक म्हणजे लग्न करणे व दुसरे म्हणजे घर घेणे कारण माणसाला तोंड द्याव्या लागणाऱ्या या दोन सर्वात अवघड गोष्टी आहेत. रिअल इस्टेट हा अतिशय विचित्र उद्योग आहे यात शंका नाही कारण विचार करा वर्षानुवर्षं या देशात स्वतःचं एक घर बांधणे हे इतके त्रासदायक मानले जाते तर हजारो घरे बांधणे ती सुद्धा इतरांसाठी, किती अवघड असेल!
मोठ्या शहरांमध्ये, अगदी दहा सदनिकांची एक लहान इमारत बांधायला किती वेळ लागतो व तास असतो. हे पण एकदा जाणून घ्या! काही दशकांपूर्वी बांधकाम व्यावसायिक होणं अगदी सोपं होतं व बक्कळ पैसा होता पण सध्याच्या पिढीतल्या बांधकाम व्यावसायिकाचं तसं नाही. मी असं म्हणत नाही की रिअल इस्टेट हा सर्वात अवघड किंवा वाईट व्यवसाय आहे, आजही त्यात पैसा आहे पण त्यात अडथळेही अनेक आहेत ही वस्तुस्थिती आहे. स्वच्छ कायदेशीर जमीन मिळवण्यापासून ते परवानग्या मिळवणे, घरे बांधणे, ती विकणे हे अजिबात सोपे काम नाही, याला आपल्याकडची व्यवस्था जबाबदार आहे. लोकहो, मला तुम्हाला सांगावसं वाटतं की सरकार तसंच माध्यमांना रिअल इस्टेट व तिच्या समस्यांशी काहीही घेणंदेणं नाही. एखादा पूर आला किंवा साथीचा रोग आला तर प्रत्येक सरकारी संस्थेला बांधकाम व्यावसायिकांकडून (म्हणजे क्रेडईकडून) विविध प्रकारची किंवा आर्थिक मदतीची अपेक्षा असते. आणि आज स्वतः कितीही अडचणीत असला तरी बिल्डर सढळ हाताने व दिलदारपणे मदत करतो. पण जेव्हा बांधकाम विषयीक धोरणे तयार केली जातात किंवा मत व्यक्त केले जाते तेव्हा बांधकाम व्यावसायिकांची आठवण कुणालाच होत नाही कारण त्यावेळी आमच्यासोबत काम करणे या देशात निषिद्ध मानले जाते. तुम्हाला परवडणारी कायदेशीर घरे, कमी दरात हवी असतील तर आपण हे बदलायला हवे. ही सगळी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरही जर तुम्ही टीका करत असाल किंवा बांधकाम व्यावसायिकांनाच झोपडपट्ट्या बांधल्या जाण्यासाठी दोष देत असाल किंवा बांधकाम व्यावसायिकांना घरांचे दर कमी करायला सांगत असाल, तर माफ करा सज्जनहो, हे म्हणजे एखाद्या गुरूनं त्यांचे  पोट भरलेले असताना कुणा भुकेल्या भक्ताला उपवासाचं महत्त्व सांगण्यासारखं आहे!

प्रिय श्री. चारित्र्यवान व्यावसायिक व श्री. आर्थिक गुरू (व इतर सर्व) ज्यांना बांधकाम व्यावसायिक व रिअल इस्टेटवर ताशेर ओढण्यात अभिमान वाटतो, मी अशाप्रकारे राग किंवा नैराश्य व्यक्त केलं म्हणून मला माफ करा. आम्हाला देशासाठी तसंच समाजासाठी तुम्ही केलेल्या कामगिरीविषयी व योगदानाविषयी अतिशय आदर वाटतो. पण आमची रेषा पुसूनस्वतःची रेषा मोठी करू नका (हे सुद्धा अकबर बिरबलमधलं उदाहरण आहे)!  आम्हाला तुमचे ज्ञान, बुद्धिमत्ता व अनुभवाविषयी आदरच आहे, पण या सगळ्या गुणांचा वापर इतर सामान्य मर्त्य माणसांना (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांना) थोडे शहाणे करण्यासाठी, अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी केला तर त्यांच कौतुक होईल. तसे  न करता केवळ बिल्डरांना दोष देण्याचे काम ईतर सर्व घटक करतच असतात, एव्हढेच मला सांगावेसे वाटते. ज्यावेळी आपण एकजूट होऊन, एका विषाणूने आपल्यावर लादलेल्या आर्थिक युद्धात लढा दिला पाहिजे त्याच वेळी आपल्याकडून अशा प्रतिक्रिया नक्कीच अपेक्षित नव्हत्या. माफ करा, मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर, मिच्छामी दुकडम्म्हणजेच मनापासून माफी मागतो!


संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
इमेल: smd156812@gmail.com

Saturday 25 April 2020

बांधकाम व्यावसायिकांनो, सीट बेल्ट बांधा आणि गियर बदला!
























मला चंद्राकडून प्रकाश नाही तर अंधाराशी लढण्यासाठी बळ मागायचे आहे”...
लोकप्रिय चित्रपट शराबीमध्ये ज्याप्रमाणे मुन्शीजींची भूमिका साकारणारा ओमप्रकाश जसं विक्की कपूर म्हणजेच अमिताभ बच्चनला म्हणतो की, “शायरी में वजन चाहिए तो इश्क होना जरुरी है, बरखुरदार”, त्याचप्रमाणे कोणत्याही तत्त्वज्ञानाचं मुख्य कारण असतं पिढा सहन करणे, असो हे सुद्धा पुन्हा स्वनिर्मित तत्त्वज्ञान आहे (त्याचं कारणही लॉकडाऊन हेच आहे हे नव्यानं सांगायची गरज नाही). या लॉकडाऊनमध्ये दिवसागणिक सगळं काही व्हर्च्युअल अथवा आभासी व्हायला लागलंय, कारण प्रत्यक्षात काहीच होत नाही मात्र झूमवर मिटींग्स, वेबिनार्स ड्यूओ कॉल्स, वॉट्सॲप ग्रूपवर चर्चा, असं सगळं काही जोरात सुरू आहे. दररोज काहीतरी नवीनचर्चेत असते, ज्यामुळे सर्वत्र अतिशय गोंधळाचे वातावरण आहे. बांधकाम व्यवसायाच्या बाबतीत तर गोंधळ नेहमीच असतो, हा विषाणूच कशाला सरकार किंवा समाजाच्या नियंत्रणात नसलेली कोणतीही समस्या असू दे; उदाहरणार्थ कमी पाऊस, जास्त पाऊस, अवैध बांधकामं, मेट्रो एफएसआय/टीआरडी/टीओडी यापैकी काहीही असलं तरी दोष नेहमी रिअल इस्टेटलाच दिला जातो व परिणामही त्यांच्यावरच होतो. रिअल इस्टेट उद्योग हा अनाथासारखा आहे (कुणी माय बाप नाही) व याच्याशी संबंधित बहुतेक घटकां साठी घरून काम करणे  शक्य नाही; म्हणजे जोपर्यंत आपण व्हर्च्युअल घरे बांधून त्यात लोकांना व्हर्च्युअली राहायला सांगून त्याचे बिट-कॉईनमध्ये पैसे घेई पर्यंत तरी नक्कीच नाही!
मी अर्थातच उपरोधानं बोलतोय, पण परिस्थितीही तशीच आहे कारण सरकारनं आधी २० एप्रिलपासून बांधकामाला सुरूवात करता येईल अशी घोषणा केली, अर्थात ते कसं शक्य होईल याबाबत काहीच स्पष्टता नव्हती तरीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर १९ एप्रिलला सरकारनं (पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी, माननीय उप मुख्यमंत्री व सगळ्यांनी) संध्याकाळी घोषणा केली की पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात (इतर क्षेत्रातकदाचित परवानगी दिली असेल पण मला या क्षेत्रांची जास्त काळजी आहे) म्हणजे पुणे प्रदेशात कशालाही परवानगी नाही. त्याशिवाय अशीही घोषणा करण्यात आलीय की मालमत्ता नोंदणीलाही (म्हणजे सदनिकांच्या) २० एप्रिलला सुरुवात होईल, आता नोंदणीसाठी बाहेर जायला कुणाला व कशी परवानगी दिली जाईल हे देवालाच माहिती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेर एवढी भीती पसरली असताना कुणी बाहेर जायची हिम्मत कशाला करेल? यासंदर्भात माध्यमे तसंच सरकार स्वतःही धोरणांबाबत गोंधळलेलं आहे. म्हणूनच नेहमीप्रमाणे आपण फक्त रिअल इस्टेटच्या भविष्याविषयी चर्चाचर्विचरण करत बसू शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यानं प्रयत्न करूनही, पुणे प्रदेशातील परिस्थिती बिघडली आहे असा समज झाला आहे. पण पुणे व मुंबईमध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे, जवळपास निम्मा महाराष्ट्र (इतर राज्यांमधले लोकही) नोकरी व करिअरसाठी या भागांमध्ये राहात आहेत या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. सगळ्या अधिकाऱ्यांविषयी पूर्णपणे आदर राखत मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की पुणे शहरातल्या परिस्थितीवर कुणाचे नियंत्रण आहे, कारण पोलीस त्यांची स्वतःची परिपत्रके काढतात, पुण महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे आयुक्त आपापली पत्रके काढतात, त्यानंतर जिल्हाधिकारी वेगळे आदेश काढतात त्याउपर मायबाप सरकार ज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा जे कुणी पदाधिकारी असतील ते नवीन निर्बंध लागू करणे, काढून टाकणे किंवा आणखी कडक करण्याविषयी घोषणांची सरबत्ती करतात. तर्कसंगतपणे विचार करता मला असं वाटतं की, ही साथीच्या रोगाची आपत्ती असल्याने सार्वजनिक आरोग्य विभाग नियंत्रकाच्या भूमिकेत असला पाहिजे व इतर सर्व विभागांनी संबंधित मंत्री काय म्हणतात त्याचे पालन केले पाहिजे, जे डॉक्टरही आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता इतर सर्व विभाग त्यांच्या योजना राबवताहेत ज्यात अजिबात समन्वय नाही, हीच खरंतर मुख्य आपत्ती आहे. माफ करा मित्रांनो (म्हणजेच अधिकाऱ्यांनो) पण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून किमान आपल्या येथे तरी अशीच परिस्थिती आहे, मात्र मला तुमच्या प्रयत्नांचं (सरकार म्हणून करत असलेल्या) श्रेय अजिबात काढून घ्यायचं नाही.
असो, तर आता एप्रिल अखेरपर्यंत संपूर्ण पुणे प्रदेशातील हालचालींवर आणखी कडक निर्बंध असणार आहेत, (आता त्याचा अर्थ काय होतो असं विचारू नका)मला फक्त एवढाच प्रश्न पडलाय की बाहेर उन्हाचा पारा ४० अंशांपर्यंत पारा चढलेला असताना बांधकामाच्या ठिकाणी झोपड्यांमध्ये दाटीवाटीनं राहावं लागणाऱ्या व हाताला काम नसलेल्या मजुरांना कसं सांभाळायचं? मी पुन्हा एकदा सांगतो, हा विषाणू ज्या वेगानं पसरतोय त्याचं गांभीर्य मला समजतंय पण त्याचवेळी गरीबांवरचा मानसिक व आर्थिक ताण वाढतोय (रिअल इस्टेट तसंच इतर सर्व उद्योगांमधल्या) या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडीशी आशेची किनार म्हणजे माझ्यासोबत काम करणारी तरुण पिढी रिअल इस्टेटमधील त्यांच्या भावी वाटचालीकडे कुतुहलानं (काळजीनंही) पाहतेय. माझ्या मित्राचा मुलगा मुलगा, जो माझ्यासोबत अभियंता म्हणून काम करतो तसंच माझ्या धाकट्या मुलानं (जो मार्केटिंग मध्ये काम करतो) आमच्या कंपनीतील तसंच संपूर्ण रिअल इस्टेट उद्योगात व सामाजिक पातळीवर काय परिस्थिती असेल याविषयी दहा मुद्द्यांची एक प्रश्नावली पाठवली. मला आनंद झाला, कारण तुम्हाला प्रश्नच पडत नसतील तर याचे दोनच अर्थ होतात एक म्हणजे तुम्ही अगदीच मठ्ठ आहात किंवा तुम्हाला संपूर्ण ज्ञानप्राप्ती झाली आहे. पण तुम्हाला काही प्रश्न असतील व तुम्ही ते विचारायचं धाडस करत असाल तर याचा अर्थ तुम्ही बिनडोक तरी नक्कीच नाही. मी त्याला मेलवर उत्तर पाठवले की मी योग्य ते शंका निरासन करण्याचा प्रयत्न करेन कारण मी आधी एक अभियंता व नियोजक आहे, पण खरा धंदेवालानाही व दुसरे म्हणजे आमच्यापैकी अगदी भल्याभल्यांनीही अशी परिस्थिती कधीच अनुभवली नव्हती, त्यामुळे माझं बरोबर आहे किंवा चूक याची मला खात्री नाहीतरीही माझ्या तर्काप्रमाणे त्याला उत्तरं दिली व तीच इथे देत आहे, त्याचा केवळ बांधकाम व्यावसायिक, त्यांचे कर्मचारी किंवा रिअल इस्टेटशी संबंधित संस्थांनाच नाही तर संपूर्ण उद्योग जगताला थोडाफार उपयोग होईल (विशेषतः व्यवसायातील पुढच्या पिढीला) अशी मला आशा वाटतेमी जशी उत्तरं लिहीली त्याच स्वरूपात ती देत आहे जेणेकरून हा संवाद नैसर्गिक राहील. त्याच्या प्रश्नांमध्ये नाविन्य आहे व तो ज्या प्रकल्पावर काम करतोय त्याविषयी ते आहेत पण हे प्रश्न बहुतेक बांधकामांना (तसंच बहुतेक बांधकाम व्यावसायिकांना) लागू होतात, तर हे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत...
१४ एप्रिल, २०२० रोजी संध्याकाळी ४:५० वाजता रोहित महाजन याने ईमेलवर विचारले:
१४/०४/२०२०
संजय काका, मला काही मुद्द्यांविषयी तुमचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे.

प्रेस्टीज अव्हेन्यच्या( आमचे एक प्रोजेक्ट) बांधकामाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी आपली काय योजना आहे, कारण आपला बराच वेळ वाया गेलाय व संपूर्ण लॉकडाऊन संपेपर्यंत पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असेल?
खरं सांगायचं तर सरकार, पुण्याविषयी व बांधकाम साहित्याच्या वाहतुकीविषयी काय निर्णय घेतील याविषयी आत्ताच काही टिप्पणी करणं घाईचं होईल, म्हणूनच २० एप्रिलच्या आदेशांपर्यंत वाट पाहू. त्यांनी निर्बंध शिथील केले तरीही बाहेरून बांधकामाच्या ठिकाणापर्यंत साहित्य कसं पोहोचेल हा प्रश्नच आहे, पुरवठा साखळी पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल.त्यानंतर आपल्याला कर्मचारी तसंच मजुरांच्या सुरक्षिततेसाठी संसर्गाचा धोकाही विचारात घ्यावा लागेल, जो अजूनही कायम आहे. त्यामुळे मला असं वाटतं लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे ३ मेपर्यंत वाट पाहावी, परिस्थितीचा आढावा घ्यावा व त्यानंतर आपली कृती योजना ठरवावी. आपण आपल्या ग्राहकांना, तसंच रेरासारख्या प्राधिकरणांना व आपल्या बँकांनाही यासंबंधी पत्रं लिहीणार आहोत.
. कोव्हिड-१९च्या परिस्थितीमुळे भविष्यात काय घडणार आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाही किंवा त्याविषयी काही कल्पना नाही (वाईटात वाईट परिस्थिती असेल तर आपण आपल्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना कधीपर्यंत पगार देऊ शकतो) 
मी यासंदर्भात विचार करतोय, पण कंपनीला उत्पन्न नसताना हे जरा अवघड होणार आहे हे सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जवळपास ५० दिवस घरी बसून असताना कोणतीही कंपनी तुम्हाला पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. या काळात कर्मचाऱ्यांचा घर खर्च वा पेट्रोल तसेच हॉटेलिंग इत्यादी बाबींवरील खर्च नक्कीच कमी झाला असला पाहिजे. कंपनीला होत असलेला तोटा त्यांनीही विचारात घेतला पाहिजे, आपल्याला हे कर्मचाऱ्यांना समजावून सांगावं लागेल, जे मी सांगीनच. 
. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर प्रकल्पातील विलंबाविषयी रेराला सूचना देण्याबद्दल आपली काय योजना आहे व ज्यांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत त्या सगळ्या कंपन्या यासाठी अर्ज करतील हे विचार घेऊन त्यांचा दृष्टिकोन किती वास्तववादी असेल. एक शिखर संस्था म्हणून क्रेडाईच्या आगामी परिस्थितीविषयी काही योजना आहेत का?
क्रेडाई ही सामाजिक संघटना आहे व ती सल्ला देऊ शकते किंवा मार्गदर्शन करू शकते, जे ती नक्कीच करेल. रेराने आधीच प्रकल्पांना महिन्यांच्या विलंबाला परवानगी दिली आहे पण या आपत्तीचा परिणाम त्याहूनही बराच अधिक असणार आहे. पण हो, आपण प्राधिकरणांना वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहोत.
. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून परिस्थिती हाताळण्यासाठी आपली काय योजना आहे?
आता सदनिकांची विक्री (खरतर कशाचीही विक्री) ही सगळ्यात अवघड बाब ठरणार आहे कारण लोकांना त्यांच्या स्वतःच्या भवितव्याचीच भीती वाटतेय व ते कदाचित घर भाड्याने घ्यायचा विचार करतील. गुंतवणूकदार असतील पण ते तुम्ही जे दर मागताय त्यासाठी तुम्हाला रडवतील (दर पाडून मागतील). आपल्याला दोन्हींचा समतोल साधावा लागेल व लोकांनी घर घ्यावे यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन यावे लागेल, कारण हाच एकमेव मार्ग आहे. तसंच सध्याच्या ग्राहकांनाही विश्वासात घ्यावे लागेल.
. या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण बँका व त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करत आहोत, प्रकल्प वित्त पुरवठा, कर्ज, व्याजदर इत्यादीं संदर्भातील?
वैयक्तिक पातळीवर बोलायचं तर आपल्याला केवळ एका प्रकल्पाचं कर्ज आहे (सुदैवानं) तेही प्रेस्टीजच्या साईटवर पण तिथे अजूनही आपली विक्रीयोग्य घरे भरपूर आहेत. आम्ही बँकेला कर्जाच्या हप्त्यांसाठी तीन महिन्यांची स्थगिती देण्याची विनंती केली आहे, जी आणखी तीन महिने वाढेल अशी अपेक्षा करता येईल. पण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतःहूनच निधी उभारणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. पण सरकारलाही या बाबीचा विचार करावा लागेल, तसंच मीदेखील विचार करतोय पण वित्तपुरवठा या विषयात मला विशेष गती नाही, त्यामुळे मी या क्षेत्रातल्या एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेईन. पण ज्या विकासकांचे एकाचवेळी अनेक प्रकल्प सुरू आहेत, त्यांना पैसा खेळता ठेवणे, कर्ज फेडणे तसंच बांधकाम पूर्ण करण्यासाठी नव्याने निधी मिळवणे आव्हानात्मक असणार आहे हे नक्की.इथे कंत्राटदार व विक्रेत्यांनीही त्यांच्या पैशांसाठी थोडं थांबायचं मान्य केलं पाहिजे, तरच त्यांच्या हाती काही पडेल. त्याच बरोबर बँकानेही त्यांच्या व प्रकल्पाच्या दृष्टीने योग्य तो विचार केलाच पाहिजे!
 . या काळात जो काही तोटा झाला त्यामुळे उत्पादनाची किंमत वाढवणे हाच एकमेव उपाय आहे का? त्याऐवजी इतर काही पर्याय आहेत का हे कृपया मला सांगा
बांधकाम खर्चात वाढ होणार आहे पण विक्रीच्या दरात नाही हा रिअल इस्टेट तसंच इतर प्रत्येक उद्योगासाठी या आपत्तीचा सर्वात वाईट पैलू. आपल्याला आपले जास्तीचे खर्च शक्य तितक कमी करावे लागतील. सप्लायर्स तसंच कंत्राटदारांशी नव्याने बोलणी करावी लागतील कारण काही भार त्यांनाही उचलावा लागेल!
. कामासाठी पुन्हा लोक मिळणं अतिशय अवघड असणार आहे व सगळी कामं पूर्ण करण्यासाठी हातात अतिशय कमी वेळ असल्यामुळे ते कदाचित जास्त पैसे मागतील, अशावेळी आपली काय करायची योजना आहे?
ही दुधारी तलवार आहे, कारण मजूर, कंत्राटदार व विक्रेत्यांनाही काम हवंच आहे, नाहीतर ते उपाशी मरतील, एकतर इथे काम करा किंवा आपल्या घरी परत जा जिथे त्यांना काहीच काम नसेल एवढेच पर्याय त्यांच्याकडे आहेत. आपल्याला त्यांना हेच समजून सांगावं लागेल, आपण किमान प्रयत्न तरी करू शकतो.
. या काळात बाजारात टिकून राहण्यासाठी खर्च, पगार, वरखर्च व इतरही अनेक गोष्टींमध्ये कपात करावी लागेल; याविषयी तुमचे काय मत आहे?
प्रत्येकाने संबंधित प्रकल्पाचे व व्यवसायाचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे व त्यानंतर कृती केली पाहिजे, थेट कोणताही निष्कर्ष काढू नये, नाहीतर उगाच गोंधळ निर्माण होतो. मी हेच करत आलोय व तुम्हालाही हेच करायचं आहे भविष्यात! 
. रिअल इस्टेटचे दर किमान २०%ने कमी होतील असा अंदाज आहे, असे झाल्यास भविष्यातील विकास योजनांसाठी तुमचा काय व कसा प्रस्ताव असेल?
कोणताही साथीचा रोग असो, युद्ध किंवा आर्थिक आपत्ती, त्यानंतर रिअल इस्टेटचे दर पडतील अशी चर्चा सुरू होते. अशा चर्चा ऐकण्याऐवजी, आपण किती किमतीत बांधकाम करू शकतो व किती योग्य दराने विकू शकतो तसंच ग्राहकांची काय गरज आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यानुसारच काम केले पाहिजे.ज्या व्यक्तीने वारेमाप म्हणजेच क्षमतेहून अधिक कर्ज घेतलेले नाही तिने घाबरायची गरज नाही तर खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व संयम राखला पाहिजे. घरांसाठी ग्राहक येतील, कारण पुण्यातून सध्या बाहेर गेलेल्या या सगळ्या लोकांना पुन्हा पुण्यातच यावं लागेल कारण त्यांना त्यांच्या गावांमध्ये नोकऱ्या किंवा त्यांना आता ज्या जीवनशैलीची सवय झालीय ती मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहेते जेव्हा परत येतील तेव्हा त्यांनाही कमी पैशातच काम करावं लागेल हे वास्तव आहे. आपल्याला घराच्या ग्राहकांना (म्हणजे ज्यांचं स्वतःच्या मालकीचं घर नाही त्यांना) स्वतःच्या मालकीचं घर असणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव करून द्यावी लागेल, कारण खरंतर अशा काळामध्ये घर हीच सर्वोत्तम मालमत्ता तसंच आधार आहे आणि घरून काम करा ही पद्धत ज्या कंपन्या वापरतील त्या कर्मचार्यांनातरी पहिले स्वतःचे घर घ्यावे लागेलच ना!
१०. सगळ्यात शेवटी मी इतर काही पाहिले/वाचले पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल, तर कृपया मला सांगा
या काळात संयम सर्वात महत्त्वाचा आहे व मन संतुलित ठेवायला पाहिजे. तसंच उत्पन्नासाठी केवळ रिअल इस्टेट किंवा एकाच उद्योगावर अवलंबून राहून चालणार नाही, उत्पन्नाचे इतरही स्रोत असले पाहिजेत.सेवा उद्योगाची स्थिती चांगली असेल कारण लोक त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्याशिवाय जगू शकत नाहीत. म्हणूनच आपणही अशी क्षेत्रं कोणती आहेत याचा विचार केला पाहिजे व त्यांच्याकडे समांतर संधी म्हणून पाहिलं पाहिजे. त्याचवेळी घर घेणारा ग्राहकही इथून पुढे चैनीच्या किंवा ऐषो आरामाच्या गोष्टींऐवजी मूलभूत सोयींवर लक्षं केंद्रित करेल. कारण पुढची दोन-तीन वर्षं पैन् पै महत्त्वाची असेल, त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, कारण लोकांची स्मरणशक्ती नेहमी प्रमाणेच अगदी अल्पकाळ असते. पण तुमच्या पिढीनं अशा जागतिक पातळीवरील सामाजिक आपत्तीसाठी सज्ज राहिलं पाहिजे, कारण ही पहिली आपत्ती असेल पण शेवटची नक्कीच असणार नाही, हे लक्षात ठेवा. एका अर्थानं आपल्यापैकी बहुतेकांसाठी ही आयुष्य बदलून टाकणारी घटना होती, अर्थात आपण त्यातूनकाही शिकलो तर. कारण इथून पुढे जीवनाच्या दृष्टिकोनापासून ते जीवनाच्या गरजांपर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत, त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगातही बदल होणं अपरिहार्य आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वत:ला शारीरिकरित्या व मानसिकरित्या खंबीर बनवावे लागेल आणि जीवनशैली तशीच करावी लागेल.
मला असं वाटतं मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा किंवा तर्कशुद्धपणे समजून सांगण्याचा माझ्यापरीनं जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे, मी माझी बाजू स्पष्टपणे मांडलीय; तू व रोहननं आपल्या टीमला वॉट्सॲपवर हे पाठवावं असं मला वाटतं कारण त्यांनाही पुढे परिस्थिती कशी असेल हे समजलं पाहिजेमला अतिशय आनंद वाटतो की तू कामाविषयी बराच विचार केला आहेस, भविष्यकाळ हा आपल्या अपेक्षेप्रमाणे नसेल हे नक्की, पण कदाचित म्हणूनच त्याला भविष्यकाळ म्हणतात! एक गोष्ट मात्र नक्की या कोव्हिडच्या आपत्तीवरून तुमच्या पिढीनं एक धडा नक्की घेतला पाहिजे, जो तुम्ही बहुतेकजण विसरला आहात; तो म्हणजे कष्टाला केवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे, कष्टाला केवळ एकच पर्याय आहे तो म्हणजे जास्त कष्ट बेस्ट लक! 
संजय काका
--
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
ईमेल: smd156812@gmail.com