Wednesday 31 January 2024


पर्यावरण शास्त्र , नगर रचना आणि ताडोबाचे वाघ !












पर्यावरण शास्त्र , नगर रचना आणि ताडोबाचे वाघ !


“तुम्ही जर  मला एक झाड तोडण्यासाठी सहा तास दिले तर  मी पहिले चार तास कुऱ्हाडीला धार लावण्यात वापरीन.” … अब्राहम लिंकन

भविष्य आधीपासूनच दिसतेय – फक्त ते अजिबात एकसमान वितरित नाही… विल्यम गिब्सन

  माझ्या बहुतेक वाचकांना पहिल्या अवतरणाच्या लेखकाविषयी माहिती आहे, तरीही ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो. अब्राहम लिंकन हे नाव अमेरिकेसाठी काय आहे त्यापेक्षाही अधिक म्हणजे ते एक माणूस म्हणून, एक नेते म्हणून, स्वतःला जगातील सर्वात महान देश मानणाऱ्या अमेरिकेसाठी कसे आहेत याची तुलना आपल्या देशासाठी गांधीजी किती मोठे आहेत याच्याशी केली तरच समजू शकेल आणि विल्यम फोर्ड गिब्सन हे अमेरिकी-कॅनडियन काल्पनिक कथा व निबंध लेखक आहेत. त्याचप्रमाणे सायबरपंक या वैज्ञानिक काल्पनिक कथांच्या प्रकाराचेही ते प्रणेते मानले जातात, जो एक गोष्टीवर आधारित ऑनलाईन गेमही आहे, सीडी प्रोजेक्ट रेडमधील ओपन वर्ल्ड आरपीजी ऑफ डार्क फ्यूचर, जो द विचर सिरीज ऑफ गेम्सच्या निर्मात्यांनी तयार केला आहे. लिंकन यांचे अवतरण झाडे तोडण्याविषयी असले तरीही ती केवळ एक उपमा म्हणून घ्या, कारण त्या कामासाठी लागणाऱ्या तयारीविषयी ते बोलत होते, ज्याला आपण नियोजन म्हणतो. म्हणूनच मी हे अवतरण वापरले कारण विषय नियोजनाचा आहे व लिंकन यांचे विद्वत्तापूर्ण शब्द त्याची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम ठरतील असे वाटले. मला सीओईपी, म्हणजेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या देशातील अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी सर्वाधिक आदर केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या महाविद्यालयामध्ये नगर रचनेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी नियोजन विभागाचे विभागप्रमुख असलेल्या डॉ. प्रताप रावल यांनी मला स्वतःच विषय निवडण्याची परवानगी दिली होती ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती. ही पर्वणी होती तसेच आव्हानही होते, कारण मीपर्यावरण अभियांत्रिकी, नगर नियोजन व ताडोबाचे वाघहा माझा विषय म्हणून निवडला होता, जे त्यांनी व त्यांच्या सहकारी डॉ. इशा पानसे यांनी मान्य केले, हे खरोखर अतिशय धाडसाचे होते असेच मी म्हटले पाहिजे.

   आता मी स्वतःला अनुभवी वक्ता म्हणू शकतो (स्वघोषित) कारण व्यासपीठावर उभे राहण्याची आता मला भीती वाटत नाही. परंतु तरीही यावेळी व्याख्यान देण्यापूर्वी माझ्या पोटात गोळा आला होता, कारण समोर कुणी सामान्य श्रोते नव्हते. मला अशा ठिकाणी व्याख्यान द्यायचे होते जिथे साधारण तीस एक वर्षांपूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मला स्वतःलाच प्रवेश मिळू शकला नव्हता. त्यामुळे या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाणे म्हणजे मला जीवन चक्रच पूर्ण झाल्यासारखे वाटले. आणि मला माझ्या आत्मसन्मानासाठी (किंवा ईगोसाठी) सर्वोत्तम व्याख्यान देणे आवश्यक होतेम्हणून मी असा काहीतरी विषय निवडण्याचे ठरवले जो त्यांच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा भाग नसेल, तसेच ज्याचा त्यांना फारसा अनुभव नसेल, व जे माझ्या फायद्याचे असेल (हास्य). परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यांना जे शाळा किंवा महाविद्यालयामध्ये किंवा पुस्तकामध्ये आत्तापर्यंत शिकवण्यात आले नसेल व ते म्हणजे पुढील आयुष्याच्या नियोजनाच्या पैलूविषयी त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी वन्यजीवनाचा वापर करणे.  मी असे जाहीर करून सुरुवात केली की तुम्ही सगळे माझ्या लेखाच्या शीर्षकामुळे बुचकळ्यात पडले असाल, जे अनुराग कश्यपच्या (कृपया त्याच्याविषयीची माहिती गूगल करा) एखाद्या चित्रपटासारखे वाटते, परंतु जंगलात गेल्यामुळेच मला नियोजनाचे महत्त्व समजले. नियोजनाचा पहिला पैलू म्हणजे, तुम्ही कशासाठी नियोजन करत आहात हे समजून घेणे व म्हणूनच ताडोबासारख्या ठिकाणांना भेट देणे महत्त्वाचे आहे, जे नियोजनाच्या बाबतीत अत्यंत यशस्वी आहे. याचे कारण म्हणजे जगभरात जेथे वाघांची संख्या कमी होतेय, ताडोबामध्ये मात्र ती वाढतेय. हे नियोजनाशिवाय शक्य झाले नसते, म्हणूनच मी नियोजनाविषयीच्या व्याख्यानासाठी उदाहरण म्हणून ताडोबाची निवड केली. मी त्या मुलांना वाघांविषयी, तसेच कोअर क्षेत्र व बफर क्षेत्र व ताडोबातील व भोवतालच्या भागातील लोक याविषयी व हा प्रकल्प यशस्वी का झाला व तो कसा चालवला जातो व आता यापुढची आव्हाने कोणती आहे व भविष्यातील प्रवास, याविषयी समजून सांगितले व यासाठीच त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे सांगितले.

   मी त्यांना ताडोबातील वन्यजीवनाची अनेक सुंदर छायाचित्रे दाखवली, परंतु नंतर मी त्यांना तिथले जीवन किती खडतर आहे व तिथल्या लोकांना कशाची गरज आहे हे दाखवले. मी त्यानंतर त्यांना माणसाच्या हस्तक्षेपामुळे (म्हणजे अतिक्रमणामुळे) वन्य प्रजातींच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडथळ्याची अनेक छायाचित्रे दाखवली. नागरी नियोजन किंवा नगर नियोजन हे दुर्दैवाने माणसांद्वारे माणसांसाठीच केले जाते व कदाचित काही दशकांपूर्वी त्याची गरज होती, कारण आपण विसनशील प्रजाती होतो. परंतु आता आपण विकसित प्रजाती आहोत (म्हणजे असे अपेक्षित तरी आहे), त्यामुळे आपण इतर प्रजातींचाही आपल्या नियोजनामध्ये समावेश करून घेण्याची वेळ आली आहेकारण, “आपण ज्याचे नियोजन करतो तेच आपण तयार करतो,” असा एक लोकप्रिय मानशास्त्रीय वाक्प्रचार आहे; उदा, तुम्ही गाड्यांसाठी नियोजन कराल तर तुम्ही उड्डाणपूल बांधता, तुम्ही गुन्हेगारांसाठी नियोजन कराल तर तुम्ही आणखी कारागृहे बांधता व आपल्या घराच्या संदर्भात बोलायचे झाले तर आपण वस्तुंच्या साठवणुकीसाठी आणखी जागेचे नियोजन केले तर आपण नको असलेल्या आणखी गोष्टी गोळा करतो (अडगळीच्या जागा). याचप्रमाणे, आपण जोपर्यंत शहरासाठी (म्हणजे माणसांसाठी) नियोजन करत आहोत तोपर्यंत आपण इतर प्रजाती नष्ट करत राहू किंवा त्यांच्या गरजांविषयी अजिबात विचार करणार नाही, हे त्यांच्यापुढील खरे आव्हान असेल जेव्हा ते नगर नियोजक म्हणून त्यांच्या कारकि‍र्दीला सुरुवात करतील. म्हणून आपण आपले नियोजन करताना त्यामध्ये सर्व प्रजातींवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला पाहिजे किंवा त्यावर भर दिला पाहिजे, तरच आपण त्यांच्यासाठी जागा तयार करू शकू. हा पैलू महत्त्वाचा आहे कारण एकीकडे ताडोबातील वाघांची संख्या वाढली आहे (म्हणजे चंद्रपूरमधील), तर वाघांच्या मृत्यूंची संख्याही आत्तापर्यंतची सर्वाधिक आहे. परिणामी, देशामध्ये २०२३ या वर्षामध्ये जवळपास २०० वाघांचा मृत्यू झाला. या वाघांचा मृत्यू वेगवेगळ्या प्रकारे झाला असला तरीही या सर्व मृत्यूंमागचे मूलभूत कारण एकच आहे ते म्हणजे वाघांसाठीची जागा कमी होणे. ज्याचा अप्रत्यक्षपणे अर्थ असा होतो की वनक्षेत्र कमी होणे किंवा अधिवास नाहीसा होणे व हे वनविभागाचे अपयश नसून एक यंत्रणा म्हणून आपल्या नियोजनाच्या क्षमतेचे अपयश आहे. तुम्हाला जर असे वाटत असेल की २०० वाघांच्या मृत्यूमध्ये काय एवढे मोठेसे, तर ही तुलना पाहा; आपल्या देशामध्ये माणसांची संख्या 150 कोटी आहे तर वाघांची संख्या 3750 आहे. म्हणजेच जवळपास 4,00,000 माणसांच्या मागे एक वाघ आहे व वर्षभरात २०० वाघांचा मृत्यू म्हणजे वर्षभरात जवळपास आठ कोटी माणसांचा मृत्यू होण्यासारखे आहे, आता तुम्हाला या आकड्यांचे गांभिर्य समजू शकेल. तुम्ही असे म्हणू शकता की मला वेड लागले आहे किंवा ही तुलना मुर्खपणाची आहे, परंतु मला नावे ठेवल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही की आपण अशा एका जगाची निर्मिती करण्यात अपयशी ठरलो आहोत ज्यामध्ये प्रत्येक प्रजातीचा जगण्यासाठी व भरभराट होण्यासाठी त्यांची स्वतःची जागा असेल, परंतु आपण आपल्या नियोजनामध्ये केवळ माणसांवरच लक्ष केंदित केल्यामुळे, आपण इतर प्रजातींना संपवित आहोत कारण आपण केवळ माणसांच्या गरजांसाठी नियोजन करत आहोत. खरेतर, इथेही आपण अपयशी ठरलो आहोत कारण तुम्ही प्रदेशनिहाय वाढ बघितली (अर्थातच माणसांची) तर मुंबई-नाशिक-पुणे हा त्रिकोण वगळता महाराष्ट्राचा उर्वरित भाग केवळ काही ठिकाणीच विकसित आहे व या त्रिकोणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे, यामुळे पुणे – मुंबईत पाणी व वाहतूक यासारख्या पायाभूत सुविधांच्या आघाडीवर सुद्धा परिस्थिती ढासळलेली आहे, त्याचप्रमाणे इथे परवडणारी घरे बांधणीचीही समस्या आहे. राज्याच्या इतर सर्व भागांमध्ये रिअल इस्टेटची परिस्थिती फारशी चांगली नाही कारण लोक त्यांच्या करिअरसाठी किंवा चांगल्या जीवनशैलीसाठी स्थलांतर करतात, जो नियोजन अपयशी झाल्याचा थेट परिणाम आहे, ज्यांना आपण धोरणे म्हणतो व त्यांच्यापुढे हेदेखील आव्हान आहे, असे मी त्यांना सांगितले.

  माणसांचे स्थलांतर केवळ एका विशिष्ट प्रदेशाच्या दिशेने झाल्यामुळे त्या प्रदेशातील माणसांसाठी समस्याच निर्माण होतात. त्याचप्रमाणे यामुळे ज्या प्रदेशातून स्थलांतर होत आहे तेथील जीवनाच्या शाश्वततेचेही नुकसान होते. म्हणूनच आपण जेव्हा एखाद्या प्रदेशातील शहरांसाठी नियोजन करण्यात किंवा नियोजनाचा मूळ हेतूच समजून घेण्यात अपयशी ठरतो तेव्हा एकप्रकारे दुहेरी नुकसान होते. या आघाडीवर गिब्सनच्या अवतरणात म्हटल्याप्रमाणे, आपण पायाभूत सुविधांच्या नियोजनाच्या आघाडीवर जो काही गोंधळ करून ठेवला आहे त्यामुळे आपण आधीच अपयशी ठरलो आहोत, नाही का? सर्वप्रथम कुठल्याही प्रजातीला जगण्यासाठी कायमस्वरुपी स्थलांतर करावे लागू नये परंतु हा अतिशय आदर्शवादी विचार झाला किंवा अतिमहत्वाकांक्षी नियोजन झाले. आपण किमान स्थलांतर कमीत कमी व्हावे असा प्रयत्न करू शकतो. आपण अशा एका जगाचे नियोजन केले पाहिजे जेथे वाघ असो किंवा माणूस ते जिथे आहेत तिथे त्यांना सुरक्षीतता आणि स्वतःची जागा मिळू शकेल व त्यांची भरभराट होऊ शकेल. त्यांच्यावर स्थलांतर (जो निसर्गनियम आहे) करायची वेळ आलीच तर त्यांच्यासाठी सुरक्षित मार्ग असले पाहिजेत तसेच योग्य अधिवास असले पाहिजेत ज्यांना आपण माणसे घर म्हणतो व वाघ जंगल म्हणतात. त्यासाठी आपण आता शहर नियोजन किंवा नगर नियोजन यासारखे शब्द न वापरता आता अधिवास नियोजन असा शब्द वापरला पाहिजे, शेक्सपिअरने नावात काय आहे असे म्हटले असले तरीही जेव्हा आपण नियोजनाविषयी बोलतो तेव्हा त्या नावातून हेतू दर्शवला जातो व हा हेतूच आपले भवितव्य निश्चित करेल; एवढे सांगून मी माझ्या व्याख्यानाचा समारोप केला. नियोजनकर्ते म्हणून हे जग एक अधिक चांगले ठिकाण बनविण्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या!

 

 संजय देशपांडे

smd156812@gmail.com





















 

Monday 22 January 2024



नविन वर्षात घर आणि आपले भविष्य निवडतांना !


ते काही पहिल्या नजरेत जडलेले प्रेम नव्हते, तर ते त्याहूनही काहीतरी गहिरे होते. त्या जागेविषयी एक आपलेपणा जाणवला, ती अशी एक जागा होती जीचा मला कायम शोध होता. त्या घराच्या हृदयाची स्पंदने मला जाणवत होती.”... निक्की रो

   निक्की रो ह्या एक थेरेपीस्ट आहेत व हृदयाला उमगलेल्या जीवनाच्या सत्यानुसार त्या जगतात व जगाला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट हीच त्यांची प्रेरणा आहे. जीवनाविषयी अशाप्रकारची समज असलेल्या निक्की घराचे इतक्या सुंदर शब्दात वर्णन करतात यात काहीच आश्चर्य नाही. खरेतर घराच्या हजारो व्याख्या करण्यात आल्या आहेत, परंतु त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे इतर वस्तुंप्रमाणे घर ही काही निर्जिव गोष्ट नसते. ती एक सजीव वस्तूच आहे व तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकला तरच केवळ त्या चार भिंती घर होतात, म्हणूनच घराच्या हृदयाचीही स्पंदने असतात असे निक्की यांना वाटते.

  यामागचे तत्वज्ञान सोडा कारण बऱ्याचजणांना ते अती काव्यात्मक वाटते तरीही माणसाच्या आत्तापर्यंतच्या निर्मितींपैकी घर हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे व त्याचे मुख्य कारण म्हणजे, माकडापासून उत्क्रांती होऊन आजचा माणूस तयार होण्यापर्यंतच्या काळाच्या प्रवासामध्ये हे उत्पादनही विकसित होत गेले आहे. निसर्ग निर्मित दगडी गुहेला स्वतःचे घर बनविण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता अद्ययावत तंत्रज्ञानाने बांधलेल्या, सर्व अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त व आरामदायक घरापर्यंत पोहोचला आहे, तरीही या उत्पादनाविषयीची भावना त्याच आहे. तुम्हाला शांतता मिळावी, तुमच्या कुटुंबासोबत भरभराट व्हावी यासाठी घर बांधले जाते, तुमचे घर शोधताना यावरच मुख्य भर असला पाहिजे, केवळ त्याचा आकार किंवा घराचा पत्ता किंवा सोयीसुविधांवर नव्हेत्याचा सर्वंकषपणे विचार केला पाहिजे जे रिअल इस्टेटच्या दोन्ही बाजूंना समजलेले दिसत नाही. म्हणजे, एकीकडे जर घराचे निर्माते (बांधकाम व्यावसायिक) त्याकडे पैसे कमवून देणारे उत्पादन म्हणून बघत असतील, तर त्या उत्पादनाचे ग्राहक (घराचे ग्राहक) त्याकडे त्याच्या किंवा तिच्या पदरी पडू शकेल असा फायद्यातील एक व्यवहार म्हणून पाहतात. चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे, कुठल्या तरी एका बाजूला तोटा सहन करावा लागेल व ती नमते घेईल एवढी प्रचंड घासाघीस केली जाते. परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेतरी घराचा आत्माच हरवल्यासारखा वाटतो, म्हणूनच मी हा लेख लिहीत आहे. आपण जेव्हा गुहेत राहायचो तेव्हा निसर्गाशी सोहार्दाचे नाते होते, आज आपण घरे बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये निसर्गापासून दूर गेलो आहोत. मी जेव्हा घराच्या ग्राहकांशी बोलतो तेव्हा ही वस्तुस्थितीच अनेक जण मांडतात व अनेक बांधकाम व्यावसायिक, तसेच ज्या भूखंड मालकांच्या जमीनीवर घरे बांधली जातात ते सगळे असे म्हणतात की त्यांना निसर्गाची काळजी वाटते, परंतु घराचा व्यवहार करताना केवळ एकाच पैलूकडे लक्ष दिले जाते व तो म्हणजे ती व्यक्ती त्यातून किती पैसे कमवू शकेल, मग व्यवहारामध्ये त्याची भूमिका काहीही असो, म्हणूनच घरे शोधण्याविषयी माझे मत मांडण्यासाठी मी हा लेख लिहीत आहे.

   मी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की, मी काही कुणी राजा हरिश्चंद्र नाही व मीदेखील रिअल इस्टेटमध्ये घरे बांधून व ती विकून थोडे पैसे कमवण्यासाठीच आलो आहे. परंतु तुम्ही किती पैसे मिळवता व त्यासाठी काय मोल द्यावे लागते, हे दोन घटक माझ्या घर बांधण्याच्या पद्धती नियंत्रित करतात व याचे कारण म्हणजे मी त्या घराच्या मुळ उद्देशची काळजी करतो, ज्यामुळे त्या घराशी संबंधित सगळेजण शांतपणे जगू शकतील व त्यांची भरभराट होईल. आणि माझी “सगळ्यांची” व्याख्या, फक्त माझ्यापुरती व माझ्या कंपनीच्या ताळेबंदापुरती मर्यादित नाही, तर ज्या व्यक्तीने घर खरेदी केले आहे, ज्या कुटुंबाने मला जमीन दिली आहे व अगदी त्या जमीनीवरील झाडांवरील चिमण्या व खारी या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो, कारण मी तेथे घरे बांधण्यास सुरुवात करण्याआधीपासून त्या तिथे होत्या, त्या जमीनीवर त्यांचाही तितकाच मालकी हक्क आहे, मला त्यांच्या शांततेची तसेच भरभराटीचीही काळजी वाटते. हे ऐकून कदाचित विचित्र वाटेल व तुमच्या घराच्या शोधमोहिमेशी संबंधित नसल्यासारखे वाटेल पण ते तसे नाही. तुम्ही कुणाशीही बोला व त्यांना शहराविषयी (पुणे) व निसर्गाच्या किंवा हवामानाच्या ऱ्हासाविषयी काय म्हणायचे आहे ते ऐका, या सगळ्यामागचे कारण रिअल इस्टेटशी (घरांशी) संबंधित आपण सर्व व त्याबाबत आपण निवडलेले चुकीचे पर्याय (म्हणजे आपली हाव) हेच आहे. सध्या भरपूर चटईक्षेत्र उपलब्ध आहे, प्रकल्पांसाठी बरेच पर्यायही उपलब्ध आहेत व प्रत्येकासाठीच जमीन कमी होत चालली आहे व आपल्याला प्रत्येक चौरस इंच चटईक्षेत्र स्वतःसाठी (माणसांसाठी), आपल्या कारसाठी व आरामासाठी हवे आहे व असे करून आपण आपल्या आयुष्यातून (म्हणजे घरातून) निसर्गाला हद्दपार करत आहोत, हे माझ्या लेखामागचे कारण आहे.

   जेव्हा कधीही कुणी घराचा ग्राहक माझ्याकडे घर खरेदी करण्यासाठी येतो किंवा एखादा जमीनीचा मालक त्याची जमीन विकण्यासाठी येतो किंवा एखादी सोसायटी माझ्याकडे पुनर्विकासासाठी येते, ते निसर्ग, प्रदूषण, पक्षी, झाडे या सगळ्यांविषयी अतिशय काळजीने व चिंतेने बोलतात. परंतु जेव्हा अंतिम व्यवहार करायची वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे घर असा निकष कधीच नसतो. तर ग्राहकांना केवळ कमीत कमी पैशामध्ये अधिक जागा हवी असते किंवा जमीन मालकाला मोबदला म्हणून अधिक पैसे हवे असतात किंवा सोसायटीला अधिक चौरस फूट जागा हवी असते, बस्स. घराचा निर्णय घेताना मग तो नवीन ग्राहक असेल किंवा पुनर्विकास होत असलेली सोसायटी असेल! याचे कारण म्हणजे, एखाद्या विकासकाने तुमच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर व्यवहार केला (म्हणजे जास्तीत जास्त पैसे किंवा जागा मोबदला म्हणुन दिली) तर तो हे पैसे परत मिळवण्यासाठी ही संपूर्ण जमीन जास्तीत जास्त क्षमतेने वापरेल व यामुळे तुम्हीही या शहराच्या निसर्गाचा ऱ्हास होण्यामध्ये हातभार लावाल, घर शोधताना किंवा रिडेव्हलपमेन्ट करतांना हा विचार नक्की करा. हे अतिशय कटू वाटेल परंतु सत्य नेहमी असेच असते, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर अवतीभोवती पाहा व घरांचे (रिअल इस्टेटचे) जे व्यवहार होत आहेत व त्यांचा आधार काय आहे हे तपासा. आपल्याला आरामशीरपणे जगता यावे या नादामध्ये, आपण घर नावाच्या उत्पादनाची मूळ संकल्पनाच विसरत आहोत जे तुम्हाला शांतता मिळावी व तुमची भरभराट व्हावी यासाठी बांधले जाते व तुम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये या संपूर्ण भोवतालाचा समावेश करत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही, म्हणूनच मी घर शोधण्याविषयी हा लेख लिहीत आहे.

   याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुम्ही घराची किंमत, पत्ता, नियोजन किंवा सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करा, तर त्याचा अर्थ असा होतो की, या सगळ्या गोष्टींचा व निसर्गाचा समतोल साधणारे घर व सोसायटी निवडा. असे झाले तरच आपण या घरातील सगळ्यांना आरामात ठेवू शकू किंवा त्यांची भरभराट होऊ शकेल. म्हणूनच नेहमीप्रमाणे प्रति चौरस फूट पद्धतीने वाटाघाटी करण्याऐवजी किमान असे घर शोधण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे, कारण या पद्धतीमुळे घर बांधण्याचा व पर्यायाने आपल्या शहरांच्या निर्मितीचा हेतूच फोल ठरला आहे. इथे, बरेच जण विचारतील, की बांधकाम व्यावसायिक जी काही किंमत सांगेल त्याला आपण होकार द्यावा किंवा आपल्या घरासाठी मोक्याची जागा सोडून द्यावी, तर  नाही, अजिबात नाही, मला काय सांगायचे आहे याचे मी एक लहानसे उदाहरण देतो. तुम्ही मुंबईला ह्युंदेई सँट्रो (एक लहान कार) किंवा मारुती सिदानने किंवा टोयोना इन्होवाने किंवा सर्व सुखसोयींनी युक्त मर्सिडीसने जाऊ शकता, या सगळ्या गाड्यांनी जवळपास सारखाच वेळ म्हणजे चार तास लागतात, बरोबर? तरीही सँट्रो चार लाखात येते, सिदान साधारण दहा लाख रुपयात, एसयूव्ही पंचवीस लाखात व एखादी सुखसोयींनी युक्त उंची कार पन्नास लाख रुपयांपर्यंत येते, असे का? वरील सर्व कारविषयी आदर राखत, (मी स्वतःसुद्धा शहरात सँट्रो  चालवतो ), या प्रत्येक वाहनातून प्रवास करण्याचा अनुभव वेगळा असतो, तसेच अपघात झाल्यास सुरक्षिततेची वैशिष्ट्ये कारच्या दर्जाप्रमाणे अधिकाधिक चांगली असतात, त्यामुळे कारच्या किमतींमध्ये हा फरक असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये राहणे हा अनुभवण्याचा विषय आहे व तुमचे भविष्य सुरक्षित असावे व तुमच्या निकटवर्तीयांसोबत तुमचीही भरभराट व्हावी यासाठी तुम्ही हुशारीने निवड करणे आवश्यक आहे तसेच अशाप्रकारच्या घरासाठी थोडे जास्त पैसे द्या, हा साधा तर्क आहे. आणखी एक पैलू म्हणजे, अनेक घरांमध्ये एखादा पाळीव प्राणी असतो (कुत्रा किंवा मांजर) व माझ्याकडेही घरी एक पग आहे, जो दररोज सकाळी साधारण ९ च्या सुमाराला माझ्या दिवाणखान्याला लागून असलेल्या गच्चीमध्ये उन्हात बसतो. जर एखाद्या दिवशी आम्ही गच्चीचे दार उघडे ठेवण्यास विसरलो तर तो दिवाणखान्यामध्ये खिडकीतून सकाळचे ऊन येईल असा कोपरा शोधून तिथे बसतो कारण त्याची त्वचा निरोगी राहण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे हे इतर कुणी नव्हे तर निसर्गानेच त्याला शिकवले आहे. त्यामुळे घराकडून केवळ तुमची मुले व पालकांच्याच गरजा असतील असे नव्हे, तर तुमचे पाळीव कुत्रे किंवा तुमच्या घराच्या टेरेसच्या बागेतील रोपांच्यादेखील सूर्यप्रकाश व नैसर्गिकपणे खेळती हवा अशा गरजा असतील. या सगळ्या लहान-सहान गोष्टींमुळेच ते एक परिपूर्ण घर होते, हे तुम्ही घर शोधताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याचवेळी, तुमच्या घराभोवती खुली जागा आहे का व तुमच्या घरामध्ये तुम्हाला खाजगीपणा मिळतो का या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत व म्हणून तुम्ही बाह्य जगाशी संपर्क तोडा असा होत नाही. याचा अर्थ तुमच्या खाजगी क्षणांमध्ये समतोल साधणे असा होतो व त्याचवेळी बाह्य जगाला सामावून घेईल एवढे पुरेसे खुले घर असले पाहिजे!  लोकहो, नवीन वर्षात तुम्हाला घराची निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील व कोणत्याही बाजारासाठी ही चांगली गोष्ट आहे. त्याचवेळी पुण्यामध्ये शहर म्हणून तुमची व तुमच्या पुढील अनेक पिढ्यांची भरभराट होण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. परंतु एक लक्षात ठेवा तुम्ही घर म्हणून कशा कशाची निवड करता यावरूनच तुमच्या कुटुंबाचे तसेच एकंदरच या शहराचे भवितव्य ठरेल; म्हणूनच चला तर मग, हुशारीने निवड करा व तुमच्या कुटुंबाला तसेच समाजाला भविष्यात शांतपणे जगता येईल व त्यांची भरभराट होईल खात्री बाळगा, तुमच्या घराचा शोध या विषयावर एवढे बोलून निरोप घेतो!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com


 

Tuesday 16 January 2024


हवा प्रदुषण, मृत वाघ आणि 2024  सालाचे स्वागत !














हवा प्रदुषण, मृत वाघ आणि 2024  सालाचे स्वागत !


“मला हे कळलं आहे की, तुम्ही जे काही बोललात ते लोक विसरतील, तुम्ही जे वागलात ते सुद्धा लोक विसरतात, परंतु तुमच्या वागण्यामुळे त्यांना कसे वाटले हे ते कधीही विसरत नाहीत”… माया ॲग्नेलु

    माया म्हणजे अमेरिकेने जगाला भेट दिलेले अजुन एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व, त्या एक लेखिका, अभिनेत्री, समानता जागरुकता निर्माण करणाऱ्या वक्त्या व आणखी बरेच काही होत्या, परंतु त्याहीपेक्षा त्या एक विचारवंत आणि उत्तम व्यक्ती होत्या. माझ्या २०२४ या नवीन वर्षाच्या पहिल्या लेखाची सुरुवात करण्यासाठी, त्यांच्या वरील शब्दांचा उत्तम आधार मिळाला. अर्थात या लेखाच्या शीर्षकाद्वारे तुम्हाला हवी तशी उत्साही आशादायक सुरुवात होत नसली तरीही, २०२३ मध्ये आपल्याला हेच मिळाले आहे व तुम्ही भूतकाळ (किंवा इतिहास) बदलू शकत नाही, तुम्ही एकतर त्यातून शिकू शकता किंवा तो अडगळीत टाकुन देऊ शकता ज्यामुळे तुमचे भविष्य हमखास नष्ट होईल हे मी शिकलो आहे व मायादेखील हे जाणून होत्या. परंतु दुर्दैवानेआपण, म्हणजे जनतेने” (मी जाणीवपूर्वक सरकार किंवा तत्सम शब्द वापरलेला नाही) आपल्या भूतकाळातून धडा घेतलेला नाही ही वस्तुस्थिती आहे)गंमत म्हणजे बहुतेक पुरुषांमध्ये (म्हणझे पुरुष व महिलांमध्ये) मी पाहिले आहे की, जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो तेव्हा त्याच्या यशाचे श्रेय तो त्याची मेहनत, ज्ञान, बुद्धिमत्ता, स्वतःचा दृष्टिकोन इत्यादी गोष्टींना देतो, परंतु जेव्हा एखादा पुरुष जेव्हा अपयशी होतो तेव्हा तो त्याचा दोष शक्य त्या सर्व व्यक्तींना किंवा आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला देतो व कुणालाही दोष देणे शक्य नसेल तर मग ते त्याचे कम नशीब असते. २०२३ या वर्षाच्या बाबतीतही असेच झाले आहे, आता तुम्ही गोंधळून गेला असाल तर मी तुम्हाला समजावून सांगतो, गेल्यावर्षी वाघांची संख्या जवळपास ३५०० हून अधिक झाली व जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५% वाघ भारतातच आहेत. त्यानंतर आपण आपल्या सरकारने (व सगळ्यांनी) पर्यावरणाच्या आघाडीवर घेतलेले अनेक पुढाकार व आपणही त्यासाठी किती प्रयत्न करत आहोत हे दाखवून दिले; आपली लोकसंख्या १५० कोटींच्या पुढे गेली आहे व लवकरच आपण त्या बाबतीतही चीनला मागे टाकू.

      वाघांची वाढती संख्या ही अतिशय उत्तम गोष्ट आहे कारण जंगलामध्ये वाघ जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला प्रयत्न करावे लागतात व ते सुदृढ वन्यजीवनाचे लक्षण आहे. त्याचवेळी, आपल्या देशाने जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या (म्हणजे निसर्गाच्या) संवर्धनासाठी उचललेली अनेक पावले अतिशय अभिमानास्पद आहेत, कारण त्यातून एकूणच पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी आपला चांगला हेतू व काळजी घेण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. त्याचप्रमाणे आपली वाढती लोकसंख्या ज्याविषयी आपले माननीय नेते (सगळेच) नेहमी अभिमानाने बोलतात की यामध्ये पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत तरूण लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे, तसेच जगण्याचे (दीर्घकाळ जगण्याचे) सरासरी वय जवळपास सत्तर वर्षांपर्यंत पोहोचले आहे, हे निरोगी भारताचे चांगले लक्षण आहे. आपण या सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या पाहिजेत व २०२३ सालची कामगिरी म्हणून त्याविषयी आनंद व्यक्त केला पाहिजे. अजूनही अशा बऱ्याच बाबी आहेत, पण हा पणच माझ्या लेखाचा गाभा आहे (नेहमीप्रमाणे) कारण तुम्ही आपल्या कामगिरीविषयी आनंदात असाल तर या तथ्यांवरही एक नजर टाका. २०२३ या वर्षामध्ये देशभरात वाघांचे सर्वाधिक म्हणजे दोनशेहून अधिक (पाच मृत्यू २०२३च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाले आहेत) मृत्यू झाले व ही वाघांच्या मृत्यूची नोंदविण्यात आलेली संख्या आहे, हरवलेल्या (जसे की ताडोबातील माया वाघीण) वाघांना यामध्ये मोजण्यात आलेले नाही. त्यानंतर पर्यावरणाच्या आघाडीवर, जगातील सर्वात प्रदूषित हवा असलेल्या पहिल्या दहा शहरांच्या यादीमध्ये आपल्या देशातील जवळपास पाच शहरांचा समावेश होता, यामध्ये आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीचा सर्वात वरती क्रमांक लागतो. विकसनशील देशांमध्ये आपल्या नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत व त्यानंतर आपल्या पुणे शहराला चांगल्या हवामानाचा अभिमान वाटायचा परंतु आता पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये शहरातील रस्त्यांवरून फिरताना नागरिकांना मास्क वापरावा लागतो, असा इथल्या हवेचा दर्जा झाला आहे. पुण्यामध्ये ४७ लाखांहून अधिक खाजगी वाहने आहेत व जवळपास १० लाख अशी वाहने आहेत की जी शहरामध्ये आहेत परंतु त्यांची नोंदणी शहराबाहेर झालेली आहे. म्हणजे केवळ पुण्यातल्याच (पुणे महानगरपालिका फक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रदेशातल्याही नाही) खाजगी वाहनांची एकूण संख्या पन्नास लाखांच्या वर आहे. ही वाहने दररोज किती सीओ (कार्बन मोनॉक्साडचे) उत्सर्जित करत असतील याचा विचार करा. त्यानंतर लोकसंख्येविषयी बोलताना, तथाकथित तरूण वर्ग बेरोजगार आहे व नोकऱ्यांविषयी प्रत्येक वर्गात उद्विग्नता दिसून येते व म्हणूनच सगळ्या वर्गांमधुन सरकारी शिक्षण संस्था किंवा नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केली जाण्याचे हेच मुख्य कारण आहे.

     मी तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात नकारात्मक गोष्टीने केली असेल तर माफ करा, परंतु मी असे का केले, कारण वस्तुस्थिती कितीही कटू असली तरीही तुम्ही जोपर्यंत तथ्य स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती बदलता येऊ शकत नाही, बरोबर? जर आपण व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असू तर आपण पुढे काय असा विचार केला पाहिजे कारण वाघांची संख्या वाढणे ही एक गोष्ट आहे व त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे ही दुसरी गोष्ट आहे, याच कारणामुळे वाघांची संख्या वाढली तरीही मरण पावलेल्या वाघांची संख्याही वाढली आहे. आपल्या सातत्याने वाढत्या मानवी लोकसंख्येमुळे केवळ वाघांच्या संख्येवरच परिणाम होत नसून एकूणच पर्यावरणालाच धोका निर्माण झाला आहे. या नवीन वर्षात आपण त्याकडे लक्ष दिले पाहिजे व या पैलूसंदर्भात काहीतरी केले पाहिजे ज्याविषयी सर्वजण मौन बाळगून आहेत, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. वाघांची संख्या (व त्यांचे मृत्यू) हा प्रत्यक्षात वन्यजीवनाचा निर्देशांक असतो व माणसांमुळे दररोज केवळ वाघांनाच नव्हे तर बिबटे, हरिण, गेंडे व हत्ती व अशा सर्व प्रजातींना प्रचंड धोका निर्माण झाला आहे. कारण आपण अक्षरशः त्यांच्या वाट्याचे अन्न खात आहोत, त्यांचे पाणी पीत आहोत व आपल्या गरजांसाठी (म्हणजे हव्यासासाठी) त्यांची घरे नष्ट करत आहोत. केवळ वन्यजीवनच नाही, आपल्या १५० कोटींहून अधिक जनतेसाठी जगण्यासाठी जागा हवी आहे, म्हणून आपण आपल्या नद्या, तलाव, टेकड्या, समुद्राचा विनाश करत आहोत. आपण एका मोठ्या तथ्याकडे दुर्लक्ष करत आहोत ते म्हणजे, आपण धान्य उत्पादनासाठी आवश्यक असलेली शेतजमीनही कमी करत आहोत. २०२३ या वर्षात सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती झाल्याचे दिसून आले, यामध्ये भूस्खलन, पूर, अतिवृष्टी, किंवा अनावृष्टी व यामुळे संपूर्ण जीवन चक्र प्रभावित झाले आहे, हे केवळ नैसर्गिक नाही, याचा स्वीकार करा. आपल्या सातत्याने वाढत्या लोकसंख्येमुळे, ज्याप्रमाणे वाघांचे हद्दीरून वाद होतात त्याचप्रमाणे माणसांमध्येही हद्दींवरून भांडणे सुरू झाली आहेत जो धोक्याचा इशारा आहे जो २०२३ या वर्षाने आम्हाला दिला होता कारण नोकऱ्या किंवा शिक्षणासाठी जातीच्या आधारे आरक्षणावरून जे काही वाद सुरू आहेत ते माणसांमध्ये वाघा प्रमाणेच हद्दीवरून होणाऱ्या वादांसारखेच आहेत, नाही काएकीकडे आपण गोंगाट व वायू प्रदूषणासाठी मास्क वापरतो तर दुसरीकडे आपण नवीन वर्षाचे स्वागत ध्वनीक्षेपक, लेझरचे लाईटचे कार्यक्रम व फटाके उडवून म्हणजेत  प्रदुषणात भर टाकुन करतो, आपण कशाप्रकारचा समाज आहोत, असा प्रश्न मला नेहमी पडतो !

     अर्थात सर्व काही एवढे वाईट नाही, वर्ष संपताना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन बातम्यांनी माझे लक्ष वेधून घेतले, त्या आशेच्या किरणासारख्या होत्या, पहिली बातमी डीआरडीओविषयी (आपल्या संरक्षण मंत्रालयाचा संशोधन विभाग) होती, ज्यामध्ये त्यांनी रिडले जातीच्या कासवांच्या वार्षिक प्रजनन काळामध्ये (अंडी घालण्याच्या काळामध्ये) ओरिसा राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळ क्षेपणास्त्रांची चाचणी थांबवली असे नमूद करण्यात आले होते. दुसऱ्या बातमीमध्ये, ताम्हणी घाटामध्ये (पुण्याजवळ) एका अपघातामध्ये, एका वळणावर एक जंगली ससा अचानक कारसमोर आल्याने त्याला वाचवताना ती उलटून अपघात झाला. दोन्ही बातम्यांमध्ये आपला उद्देश व आपण निवडलेला मार्ग दिसून येतो, तसेच एक देश म्हणून तसेच एक व्यक्ती म्हणून निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी आपण काय करू शकतो हे दिसून येते, जे आपल्या भविष्यासारखे आहे. मला अपघातातील कार चालकाविषयी पूर्णपणे सहानुभूती आहे ज्याला सुदैवाने काहीही इजा झाली नाही, तरीही जंगलातून तुम्हाला इतक्या भरधाव वेगाने गाडी चालवण्याची काय गरज आहे हा मुद्दा माझ्या दृष्टीने पुढचा विचार म्हणुन येतो, मात्र आधी त्याने किमान सश्यासारख्या लहान प्राण्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न तरी केला, ते देखील माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. आपल्याला २०२४ हे वर्ष केवळ काही सुदैवी व्यक्तींसाठीच नव्हे तर सर्वांसाठी चांगले असावे असे वाटत असल तर आपण अशाच प्रकारचा दृष्टिकोन दाखवला पाहिजे.

    मित्रांनो, लक्षात ठेवा, नवीन वर्षामुळे केवळ कॅलेंडरवरची तारीख वगळता आपल्या आयुष्यात काहीही बदल होत नाही, आपण आपल्या बाजूने त्या बदलाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला तर आपणच तो बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी, प्रत्येक व्यक्तीने उचललेले एक छोटेसे पाऊल पुरेसे असते, उदाहरणार्थ वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, यावर्षी किमान एक तरी झाड लावणे व ते जगवणे, आपला कचरा उघड्यावर किंवा नदीमध्ये न टाकणे, व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या भोवती घडणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीविरुद्ध शक्य त्या सर्व मार्गांनी तुमचा आवाज उठवणे, मला असे वाटते या उद्देशाने एक प्रतिज्ञा केली तर नवीन वर्ष खऱ्या अर्थाने साजरे होईल व ते समाजासाठी अधिक चांगले होईल, एवढे बोलून निरोप घेतो!



संजय देशपांडे

smd156812@gmail.com