Saturday 29 July 2023

गोष्ट, "ऑर्चिड ,यश्विन जीवन च्या पाण्याची" !

 
























पाणी, हे सगळ्यात कमी महत्त्व दिले जाणारे पेय आहे.”… वेन जेरार्ड ट्रॉटमॅन

वेन जेरार्ड लिओनेल ट्रॉटमॅन हे ब्रिटीश-त्रिनिदाद येथील-पुरस्कारप्राप्त लेखक, चित्रपट निर्माता, कलाकार, छायाचित्रकार, संगीतकार, व इलेक्ट्रॉनिक संगीताचे निर्माते आहेत; एवढा बहुगुणी माणूसच पाण्यासारख्या गोष्टीचे अतिशय कमी पण समर्पण शब्दात वर्णन करू शकतो यात काहीच आश्चर्य नाही.पुणेकरांनी वेन यांच्या विधानाला एरवी साथच दिली असती, परंतु आजकाल त्यांनाही पाण्याचे महत्त्व जाणवते आहे. कारण लोकसंख्या वाढतेय व पाण्याचे स्रोत तेवढेच आहेत. अर्थात अजूनही असे बरेच आहेत (म्हणजे पुणेकर) ज्यांना मुबलक पाणी मिळणे हाच नव्हे तर पाण्याचा अपव्यय करणे हादेखील त्यांचा जन्मसिद्ध अधिकार वाटतो. खरे सांगायचे तर मी पुण्यातील तीन विषयांबद्दल लिहायचे किंवा सांगायचे किंवा अगदी विचारही करायचा नाही असे मी ठरवले होता; एक म्हणजे, अनाधिकृत बांधकाम आपल्या राज्याची नागरी विकासाची धोरणे, दुसरे म्हणजे, पुण्यातील वाहतूक/सार्वजनिक वाहतूक व तिसरे म्हणजे, पाणी! मला माहितीय की मला लेखन थांबवावे लागेल व हेदेखील खरे आहे की या तीन विषयांवर मी लिहूनही (काही वेळा वैतागून) या तीन विषयांच्या संदर्भात काहीही बदललेले नाही. तरीही कुठेतरी कुणीतरी विचारप्रवृत्त होईल व बदल होईल, एवढ्या साध्या (मूर्खपणाच्या) विचाराने मी माझी शपथ नेहमी मोडतो मात्र यावेळी मी पाण्याविषयी लिहीतोय कारण त्यासंदर्भातील एक सकारात्मक व चांगली गोष्ट सांगायची आहे, हे देखील दुर्मिळच आहे, असो!

पहिली गोष्ट म्हणजे, मला पुणे महानगरपालिकेने स्थापन केलेल्या भूजल समितीमध्ये (किंवा कक्ष)काम करण्याची संधी मिळाली आहे. हे खरोखरच अतिशय चांगले पाऊल आहे व सरतेशेवटी यंत्रणा (केवळ पुणे महानगरपालिका नव्हे) या अत्यंत महत्त्वाच्या पैलूसंदर्भात किंवा स्रोतासंदर्भात जागी झाली आहे, याला कारण म्हणजे नागरिकांची पाण्याची वाढती मागणी. या समितीमध्ये अनेक उच्चशिक्षित व अनुभवी लोकांचा समावेश आहे,एक स्थापत्य अभियंता म्हणून माझ्यासाठीही हा वैयक्तिक अतिशय चांगला अनुभव आहे. त्याचवेळी आणखी दोन गोष्टी झाल्या, एक म्हणजे यावर्षी उन्हाळा जून अखेरपर्यंत लांबला. या काळात पावसाचा थेंबही न पडल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्येही (म्हणजेच पुणे प्रदेश, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरक्षेत्र विकास प्राधिकरण) पाणी टंचाई जाणवू लागली. नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रे टँकरने पाणीपुरवठा व राजकारणी व पाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे साटेलोटे, तसेच गृहनिर्माण सोसायट्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असल्याच्या बातम्या छापण्यातच समाधानी होती. दुसरी घटना ही उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या झुळुकेसारखी होती व मी पाण्याविषयी लेख लिहीण्याचे मुख्य कारण होती. सुस हे पुण्याच्या पश्चिम भागातील अतिशय झपाट्याने वाढत असलेले  एक उपनगर,जे आधी पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचा भाग होतेव आतापुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आले आहे, तेथे आमच्या एका पूर्ण झालेल्या प्रकल्पातील पाण्यासंदर्भातील ही गोष्ट आहे. आता कृपया मला आधी पुणे महानगरविकास प्राधिकरणामध्ये होते व आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आले आहे म्हणजे काय यासारखे तपशील विचारू नका, कारण त्यामुळे मला नागरी विकास धोरणांविषयी न लिहीण्याची माझी दुसरी शपथ मोडावी लागेल, तर त्याविषयी पुन्हा कधीतरी सांगेन. थोडक्यात सांगायचे तर, सुस हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असले तरीही पाणी पुरवठ्यासंदर्भात तेथे व्यवस्थित पायाभूत सुविधा नाहीत (अजूनपर्यंत) व बहुतेक सोसायट्या पाण्याच्या स्रोतासाठी पाण्याचे टँकर तसेच भूजलावरच (कूपनलिका) अवलंबून आहेत व पुण्याच्या अनेक उपनगरांमध्ये हीच परिस्थिती आहे.

सुदैवाने, पुणे प्रदेशामध्ये भूजल पातळी चांगली आहे व शेतीचे प्रमाण कमी होत असल्यामुळे, भूजल उपसाही कमी आहे त्यामुळे घरगुती वापरासाठी ते पुरेसे ठरतेपरंतु, ही परिस्थिती गेल्या दशकापर्यंत होती, झपाट्याने होत असलेले शहरीकरण व पाणी पुरवठ्याची अपुरी व्यवस्था वितरण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे पावसाचे पाणी नंतर जमीनीत जाते त्यासंदर्भातील आपल्या निष्काळजीपणाच्या दृष्टिकोनामुळे, पाण्याचा स्रोत म्हणून भूजल पातळीची परिस्थिती आता गंभीर (म्हणजे वाईट) झाली आहे. अनेक भागांमध्ये कूप नलिका कोरड्या पडत आहेत व तुम्ही २०० फूट खोल गेलात तरीही पाण्याचा प्रवाह अतिशय कमी असतो जो पिण्यासाठीही पुरेसा नसतो व मध्यवर्ती भागांमध्ये कूपनलिकेची पातळी अतिशय निकृष्ट आहे म्हणजेच ते विविध कारणांमुळे प्रदूषित आहे उदाहरणार्थ सांडपाण्यामुळे प्रदूषण, विविध रासायनिक द्रव्ये तसेच वाहनांमधील इंधन गळून त्यामध्ये मिसळतात व असे पाणी घरगुती कारणासाठी वापरणे अशक्य होऊन जाते. त्याचशिवाय एक गोष्ट आपण सगळेजण जाणतो परंतु त्यासंदर्भात कुणीच काही करत नाही ती म्हणजे (याच कारणामुळे मी आता त्याविषयी लिहीणेही थांबवले आहे) संपूर्ण शहरामध्ये सर्रास काँक्रिटीकरण होत आहे व झाडांची मुख्यतः मोठ्या झाडांची संख्या कमी होतेय, या दोन्ही गोष्टींमुळे भूजलाचे प्रमाण तसेच दर्जा या दोन्ही गोष्टींवर थेट परिणाम होत आहे. आपण आपल्या सर्व पृष्टभागांची फरसबंदी केली आहे, त्यामुळे जेव्हा पावसाचे पाणी या भागात पडते तेव्हा या पृष्ठभागांवरील रसायनांचा व धुळीचा त्याच्याशी संपर्क येतो व ते त्यामध्ये मिसळून वाहात साठवणूक टाक्यांमध्ये जाते (पावसाचे पाणी साठविण्यासाठी केलेल्या तथाकथित टाक्या किंवा खड्डे). हे पाणी जमीनीच्या पृष्ठभागावर (मातीवर) पडले असते तर ते तिच्या विविध थरातून गाळले गेले असते जे प्रत्यक्ष व रासायनिक गाळण्यांसारखे काम करतात व यामुळे पाण्याचा दर्जा अधिक चांगला झाला असता. तसेच पावसाचे पाणी सर्वत्र जिरवले जात नाही ज्याचे आधी संपूर्ण शहरात समान वितरण होत असे, यामुळे जलधारक (जमीनीखाली असलेले पाण्याचे नैसर्गिक साठे) कोरडे पडतात, त्यामुळेच कूपनलिकांमध्येही आणखी पाणी उपलब्ध नसते

त्याचवेळी विकासाच्या नावाखाली (पुनर्विकासाच्याही) आपण अनेक मोठी झाडे कापून टाकतो, त्यामुळे जमीनीची जलधारण क्षमता तसेच गाळण क्षमताही कमी होते, यामुळेही भूजल पातळी खालावण्याचे प्रमाण वाढते. तुम्ही जेव्हा एक मोठे झाड कापता तेव्हा त्याबदल्यात किमान तीन झाडे लावली पाहिजेत असा कायदा आहे, परंतु अशा कायद्यांचे पालन कोण करते व दुसरे म्हणजे अशी किती झाडे प्रत्यक्षात जगवली जातात व तिसरे म्हणजे ही झाडे पुन्हा मोठी होईपर्यंत पावसाचे पाणी जमीनीमध्ये जिरवण्यासंदर्भात काय केले जात आहे. हे सगळे घटक भूजल भरणाशी थेट संबंधित आहेत व मी म्हटल्याप्रमाणे त्याची काळजी कोण करतो, कारण सगळे सरकारकडून (म्हणजे पुणे महानगरपालिकेकडून) त्यांच्याकडे असलेले सगळे पाणी, त्यांच्या ज्याकाही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी दिले जावे अशी अपेक्षा करतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्हीपुण्यात, सुस येथे दोनशे हून अधिक घरांची यश्विन जीवन ऑर्किड ही सोसायटी बांधताना, सुरुवातीपासूनच ही सोसायटी पाण्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण करायची असा निर्णय घेतला होता. सुदैवाने आम्हाला पुरेशी जागा उपलब्ध होती, म्हणून आम्हाला फक्त थोडा सखोल अभ्यास, नियोजन व अंमलबजावणी करायची होती, जी आम्ही केली व सोसायटीचा ताबा देऊन आज पाच वर्षे उलटून गेली आहेत. परंतु आजपर्यंत सोसायटीमध्ये पाण्याचा एकही टँकर आणावा लागलेला नाही (दृष्ट ना लागो)

मला असे वाटते आम्ही अशी एक सोसायटी बांधण्याच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झालो, जेथे पावसाचे पाणी, ज्याचसोबत भूजल व पुनर्प्रक्रिया केलेले पाणी यांचा वापर व झाडांची पुरेशी लागवड करून सोसायटीच्या पाण्याच्या गरजा भागवल्या जातील व उन्हाळ्यामध्येही ती स्वयंपूर्ण होऊ शकेल, जे खरोखरच झाले.  आम्ही मुख्य प्रवेशापाशी व मागील बाजूस (हा आयताकृती भूखंड आहे व पुढील बाजू, लांबीपेक्षा अरुंद आहे) दोन मोठ्या विहीरी बांधल्या व त्यानंतर प्रकल्पाचे नियोजन अशाप्रकारे केले की पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब या दोन विहीरींमध्ये जाईल. प्रकल्पाच्या सर्व बाजुंनी तीनशे जमीनीच्या रचनेचा हायड्रो-जिओटेक (मातीचा अभ्यास करणारी यंत्रणा) अभ्यास करून आम्ही मध्ये तीन कूपनलिकाही बांधल्या व या सगळ्या विहीरी पाणी उपसा यंत्रणेला जोडल्या.त्याचवेळी आम्ही प्रकल्पाच्या कडेने २०० हून अधिक देशी झाडे लावली आहेत व त्यांची व्यवस्थित देखभाल केली आहे. ती झाडे आता मोठी झाली आहेत (आम्ही प्रत्येक झाडापाशी सदनिकाधारकाच्या कुटुंबांचे नाव असलेली पाटी लावून त्यांना ती दत्तक घ्यायला लावली आहेत), या सगळ्या झाडांच्या मुळांमुळे जमीनीची जलधारण क्षमता वाढण्यास मदत झाली ज्यामुळे विहीरी व जलधारक भरण्यास हातभार लागला.त्याचवेळी पुनर्प्रक्रिया केलेले सांडपाणी पाणी जेव्हा जास्त असते (पावसाळ्यामध्ये) तेव्हा आम्ही त्यावर प्रक्रिया करून ते जलधारक तसेच खुल्या विहीरी भरण्यासाठी वापरले. ते वापरण्यापूर्वी आम्ही त्यावर आवश्यक त्या रासायनिक पातळ्यांपर्यंत पुनर्प्रक्रिया करतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही जे काही केले आहे व ते का बरोबर आहे हे रहिवाशांना समजून सांगितले आहे. यामध्ये झाडांची देखभाल करण्यापासून ते वेळोवेळी पावसाचे पाणी साठवण्याच्या टाक्या, गाळण्या तसेच पाणी उपसा यंत्रणास्वच्छ करणे, व परिसर स्वच्छ ठेवणे या सगळ्या गोष्टी सोसायटी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या होत्या. रहिवाशांच्या यासंदर्भातील शिस्तबद्ध दृष्टिकोनाशिवाय हे शक्य झाले नसते.तसेच दैनंदिन गरजांसाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या किंवा विहीरीच्या पाण्याच्या वापराविषयी असलेले गैरसमज किंवा ते निषिद्ध मानणे वगैरेगोष्टींचा त्यांच्या मनावरील पगडा सुटला पाहिजे, कारण रहिवाशांचा पाणी पुरवठ्यासंदर्भातील दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे.किंबहुना आकडेवारीतून असे दिसून आले आहे की पाणी प्रक्रिया केल्यानंतर अगदी जवळपास बिसलेरीसारखे (म्हणजे बाटलीबंद पाण्यासारखे) असते कारण ते दोनदा फिल्टर केले जाते, एक निसर्गाद्वारे (म्हणजे जमीनीमध्ये) व दुसरे यंत्राद्वारे. मी आकडेवारीच्या फारसे खोलात जाणार नाही, परंतु माझे सांगण्याचा सारांश असा की, पुण्यामध्ये वर्षाला सरासरी ३० इंच पाऊस झाला तर यशविन जीवन ऑर्किडच्या संपूर्ण जमीनीवर १५ कोटी लीटर (पावसाच्या स्वरूपात) पाणी असेल, तर सोसायटीला दरवर्षी अंदाजे ५ कोटी लीटर पाणी लागते (जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार) व जर गेल्या पाच वर्षात एकही लीटर पाणी बाहेरून घ्यावे लागले नसेल, तर भूजल + पावसाच्या पाण्याची मोहीम बरीच यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल. तसेच येथे तीनशे हून अधिक झाडे मोठी झाली आहेत ज्यावर अनेक पक्ष्यांची घरे आहेत, आम्ही याहून अधिक आणखी काय चांगली अपेक्षा करू शकत होतो?

अशा चांगल्या गोष्टींमुळेच माझे  वैतागलेपण थोडे कमी होते व एकूणच निसर्गासाठी अजूनही आशा आहे याची मला जाणीवही होते, कारण तुम्ही जेव्हा पाणी वाचवता व ते योग्य प्रकारे वापरता तेव्हा तुम्ही केवळ माणसांचेच नव्हे तर इतरही अनेक प्रजातींचे संवर्धन करू शकता ज्या या यंत्रणेचा तितकाच महत्त्वाचा भाग आहेत. पण पुण्यात व प्रत्येक शहरी भागात डोळे झाकून एखाद्या विशिष्ट प्रकारचा विकास करण्याऐवजी, याचीच पुनरावृत्ती करू शकतो. तसेच तुम्ही कोणताही विकास करताना तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे समजून घ्या व अधिकाधिक चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरण्याचा आपला हव्यास थोडा कमी करूया. सरकारही जेव्हा विकासकांना पावसाच्या पाण्याचा वापर व तत्सम गोष्टी करायला सांगते तेव्हा त्यांनी स्वतःचे-विश्लेषण केले पाहिजे, तुम्हाला भोवताली काय दिसते हे पाहिले पाहिजे. रस्त्याचा प्रत्येक इंच व अवती-भोवती काँक्रिटीकरण केले जाते, पाणी जमीनीत झिरपण्यासाठी जागाच ठेवली जात नाही, तसेच पावसाचे पाणी साठवणाऱ्या टाक्या वर्षभर तुंबलेल्याच असतात. सगळीकडे काँक्रिटीकरण/फरसबंदी केल्यामुळे गवत, कीटक यांच्यासाठी जागाच उरत नाही, यामुळे फुलपाखरे, चिमण्यांसारखे पक्षी कमी होतात व यामुळेच तुमचे शहर काँक्रिटचे जंगल होते.एक लक्षात ठेवा, पावसाच्या पाण्याचे संवर्धन/भूजल यंत्रणा या सगळीकडे सारख्याच पद्धतीने बागडताना येणार नाहीत, तर प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थीनुसार राबवाव्या लागतील व ही अशक्यप्राय गोष्ट नाही. 

मी आज जेव्हा यश्विन जीवन ऑर्किडला भेट देतो व रहिवाशांचे आनंदी चेहरे पाहतो (उन्हाळ्यातही), मला जेव्हा पक्षी, फुलपाखरे, खारी जांभुळ व कडुनिंबाच्या झाडांवरून बागडताना  दिसतात, तेव्हा माझ्या मनात विचार येतो की सोसायटी ही अशीच असली पाहिजे, जेथे प्रत्येकासाठी स्वतःची योग्य अशी एक जागा असेल, अगदी पावसाच्या पाण्याच्या एका थेंबाचीही, या समाधानाच्या भावनेनेच परत पाण्याविषयी लिहिण्याची प्रेरणा दिली !

(तुम्हाला याविषयी काहीही मदत हवी असेल तर यश्विन जीवन सोसायटीचे पदाधिकारी श्री. शास्त्री व श्री. मुळे यांचे, तसेच आमच्या चमूचे संपर्काचे तपशील देत आहे.

श्री.शास्त्री09822463687 / श्री.मुळे09822979690

sales@sanjeevanideve.com )

तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर या गोष्टीचे तपशील प्रत्यक्ष पाहू शकता

https://www.flickr.com/photos/sanjeevani_developers/albums/72177720309891298/with/53057155319/


संजय देशपांडे.

smd156812@gmail.com




















Thursday 20 July 2023

"बाईपण भारी देवा",सगळ्यांवर भारी !!

 



 
















एका स्रीचा सर्वात कट्टर पराभूत करण्यास सर्वात कठीण शत्रू ही बहुतेकवेळा एक स्रीच असते ती त्या स्री मध्येच वास्तव्य करत असते” …

हे काही एखादे अवतरण नाही तर एक विधान आहे किंवा एक विचार आहे, जो बाईपण भारी देवा नावाचा मराठी चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात आला. मला आज हा लेख लिहीताना अतिशय आनंद होतोय कारण तो एका मराठी चित्रपटाविषयी आहे. या चित्रपटाचा कथाविषय हा महाराष्ट्रातील परंपरेचा किंवा संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, तो म्हणजे मंगळागौर! अमराठी लोकांसाठी, तसेच २००० च्या पुढे शतकात जन्मलेल्या मुलांसाठी (ज्यांना अशा परंपरांविषयी माहितीच नसते किंवा तिच्याशी काहीही घेणेदेणे नसते) म्हणून सांगतो, मंगळागौर हा सण (अनेकांसाठी एक सोहळा ) प्रामुख्याने विवाहित महिला श्रावणातल्या मंगळवारी एकत्र येऊन साजरा करतात. यामध्ये लोकगीते (ज्यातून सासरकडच्या विविध नात्यांना कोपरखळी मारली जाते), खेळ, नाच, उखाणे म्हणजेच यमक जुळवून त्यात आपल्या नवऱ्याचे नाव गुंफायचे इतरही बऱ्याच गोष्टी असतात

पारंपरिकपणे मंगळागौरीमध्ये केवळ नवविवाहित विवाहित महिलांनी सहभागी होणे अपेक्षित असते परंतु आपली संस्कृती उदारमतवादी आहे त्यामुळे विधवा तसेच कोणत्याही जातीच्या, वयाच्या किंवा धर्माच्या महिलांनाही त्यामध्ये सहभागी करून घेते जे योग्यच आहे. पूर्वीच्या काळी महिलांचा बाह्य जगाशी फारसा संपर्क नसे त्यांना मोकळेपणाने जगण्याची संधी (विरंगुळ्याचे क्षण) मिळत नसे, अशावेळी त्यांना आनंदाचे काही क्षण मिळावेत आपल्या आधुनिक कॉर्पोरेट संस्कृतीच्या शब्दात सांगायचे तर स्ट्रेस बस्टर म्हणजेच ताण कमी व्हावा ही त्यामागची मूळ संकल्पना होती. हा अस्सल मराठमोळा सण आहे सर्व शहरांमध्ये, गावांमध्ये खेडेगावांमध्येही साजरा करतात स्थानिक संस्कृतीमध्ये तो खोलवर रुजलेला आहे.

आता मंगळागौरीविषयी तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली असेल तर या सणाचा वापर चित्रपटामध्ये किती खुबीने करण्यात आला आहे ते पाहू. अर्थात, मंगळागौरीचा संदर्भ अलिकडच्याच एका लोकप्रिय, बिग बजेट चित्रपटात म्हणजेच बाजीराव मस्तानीमध्ये येऊन गेला आहे. ज्यामध्ये त्यावर रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण यांच्यासारखे मोठे कलाकार होते एक आयटम साँग होते (मी त्यासाठी केवळ हाच शब्द वापरू शकतो, यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा), ज्यामध्ये दोन नायिका पिंगा गं बाई पिंगा या लोकगीतावर ठुमकत होत्या, एवढेच मी त्याविषयी सांगू शकतो. बाईपण भारी देवा  चे वेगळेपण काय आहे, तर हा असा चित्रपट आहे जो मंगळागौरीसारख्या सणांमागचा हेतू नेमका जाणतो, म्हणूनच हा शंभर टक्के देशी चित्रपट आहे, ज्यामध्ये आपल्या काही महिलांची गोष्ट महिलांसाठीच्या सणाभोवती गुंफण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये आपल्याला केवळ मंगळागौरीमागचे तत्वज्ञानच समजत नाही तर तो आपल्याला एकूणच समाजातील महिलांच्या भूमिकेविषयी विचार करायला भाग पाडतो. आणखी एक पाऊल पुढे जात, हा चित्रपट केवळ पुरुषांचेच नव्हे तर महिलांचेही डोळे उघडतो, माझ्यासाठी बाईपण भारी देवा  चे हेच खरे यश आहे, म्हणूनच मी लेखासाठी हा विषय निवडला. मी काही चित्रपट समीक्षक नाही, किंबहुना माझे असे ठाम मत आहे की कोणत्याही प्रकारच्या कलाकृतीवर टीका टिप्पणी करण्याचा कुणालाही अधिकार नाही, कारण ती दुसऱ्या कुणाचीतरी निर्मिती असते. तिला चांगली किंवा वाईट ठरवणारे आपण कोण, नाही का? पण आपण त्या कलाकृतीतून काय संदेश देण्यात आला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, मग तो एखादा चित्रपट असो किंवा पुस्तक. ज्यांनी तो चित्रपट पाहिलेला नाही किंवा पुस्तक वाचलेले नाही त्यांना त्या कलाकृतीचा गाभा समजावा यासाठी त्यांच्यापर्यंत तो पोहोचवू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे मी आधीच स्पष्ट करत आहे.मी हा लेख तुम्ही बाईपण भारी देवा चे परीक्षण करावे असे सांगण्यासाठी लिहीत नाही तर मला त्यातून काय समजले हे तुम्हाला सांगण्यासाठी लिहीतो आहे.

एखाद्या हॉलिवुडपटाप्रमाणे बाईपण भारी देवा  ची सुरुवात भूतकाळापासून होते, त्यानंतर तो आपल्याला प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळख करून देतो. या प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे सहा बहिणी आहेत, त्यातल्या सर्वात मोठ्या सर्वात धाकट्या बहिणीमध्ये जवळपास वीस वर्षांचे अंतर आहे, ही बाब आजच्या पिढीला कदाचित हास्यास्पद वाटेल परंतु साधारण पन्नास-एक वर्षांपूर्वी ही अगदी सामान्य गोष्ट होती. म्हणूनच दोन, सख्ख्या बहिणींमध्येही एका पिढीचे अंतर आहे म्हणजेच सर्वात तरूण बहीण आजच्या (२०२३) महिलेचे प्रतिधित्व करते, जी सहजपणे सर्व आधुनिक साधने संवादाची माध्यमे हाताळते, तर तिच्यापेक्षा वयाने मोठ्या बहिणी हातात सगळ्यात उत्तम सेलफोन असूनही त्याचा वापर फक्त कॉल मेसेज करण्यापुरताच करतात. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे, बाईपण भारी देवा च्या गोष्टीची सुरुवात या बहिणींच्या जन्मापासून (म्हणजे वयाने सगळ्यात लहान बहिणीच्या) म्हणजेच साधारण चाळीस वर्षांपूर्वीपासून होते. आपल्याला त्यांच्या नात्यांमधले बंध उलगडत जातात फळ्यावर रंगवलेल्या वंशवृक्षातून आज काय परिस्थिती आहे हे समजते. कॅमेरा पुन्हा आपल्याला वर्तमानकाळात घेऊन येतो (जसे आपण मिशन इम्पॉसिबल च्या चित्रपटांमध्ये  अनुभवतो,आता एमआय म्हणजे काय हे मला विचारू नका). यातच त्याचे खरे सौंदर्य दिसून येते, कारण मंगळागौरींचा काळ कधीच मागे पडलाय आणि बहिणींमधले नातेबंधही विरळ झालेत. काळाच्या ओघात केवळ त्या वयानेच मोठ्या झालेल्या नाहीत तर एकमेकींपासून इतक्या लांब गेल्या आहेत की बँकेत एकत्र काम करणाऱ्या त्यातील दोन बहिणी एकमेकींशी वरिष्ठ कनिष्ठ कर्मचाऱ्यांसारख्या वागतात, आपण सख्ख्या बहिणी आहोत याची जाणीवही त्यांना क्वचितच होते. इथे चित्रपट आपल्याला विशेषतः महिलांच्या नातेसंबंधांविषयी त्यांच्या अवतीभोवती असलेल्या ताण-तणावांविषयी सांगायला सुरुवात करतो. या ताणतणावांचा त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे बहिणींसारख्या सुरेख नात्यातला ओलावाच त्या हरवून बसतात.

गोष्ट पुढे जाते तशी, आपल्याला सहाही बहिणींचा वर्तमानकाळ समजतो त्यांच्या आयुष्यातली सद्यस्थिती समजते. त्या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे त्यातली कुणीही आनंदी नाही किंवा तिच्या जिवाला शांतता नाही इथेच हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक बाईला एकेका बहिणीचे पात्र आपलेसे वाटते. त्यातली एक निराश आहे कारण तिला मूल नाही तिच्या वयाच्या इतर महिलांनी तरुणपणीच तिला एका अंतरात ठेवले आहे असे तिला वाटत  आहे. एक बहीण दुःखी आहे कारण तिच्या लग्न झालेल्या मुलीची तिच्यापेक्षा तिच्या सासुशीच जास्त जवळीक आहे. एका बहिणीचा पन्नाशीच्या वयात घटस्फोट होतोय, कारण ज्या नवऱ्याने तिच्या बहिणीऐवजी ती सुंदर असल्यामुळे तिला पसंत केले होते (पुन्हा एकदा भूतकाळ)तोच नवरा आता आणखी एक तरूण मुलगी त्याच्या आयुष्यात आल्यामुळे तिच्या प्रेमात पडला आहे. एका बहिणीचे लग्न श्रीमंत कुटुंबात झाले आहे परंतु ती काहीच करत नसल्याबद्दल पतीचे पैसे उडवत असल्याबद्दल तिला सतत टोमणे मारले जातात, म्हणून ती स्वाभिमानासाठी आसुलेली आहे. पाचव्या बहिणीचे लग्न अतिशय परंपरावादी कुटुंबात झाले आहे, तिथे तिला तिच्या गाण्याच्या छंदावर पाणी सोडावे लागले आहे ती नोकरी करतेय, तिची धाकटी बहिणीच तिची बॉस आहे. ती सतत नाराज असलेल्या चिडचिड करणाऱ्या सासऱ्यांच्या धाकात जगतेय. सगळ्यात धाकटी बहीण काम करतेय, चांगल्या पदावर आहे पण तिचा नवरा बिनकामाचा आणि आळशी आहे. तो काहीही करत नाही, तरीही त्याच्या बायकोने त्याच्या आळसाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा करतो.

आता तुम्ही म्हणाल त्यात काय मोठेसे (म्हणजे समस्या) कारण अशी अनेक पात्रे आपण रोजच पाहतो आणि बहिणींच्या नात्यातील बंध कधीच विरळ झाला आहे. त्याच्यामुळे आपापसातील अविश्वास, संवादाचा अभाव ही त्यामागची मुख्य कारणे आहेतप्रश्न असा आहे की यात पुढाकार कोण घेईल नात्यातील दरी भरून काढेल. इथेच मंगळागौरीच्या सणाचा संदर्भ येतो, त्यातली एक बहीण तिच्या विहिणीला हरवायला (स्वतः चा ईगो जपायला ) मंगळागौर स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवते. या स्पर्धेसाठी तिला संघ मिळत नाही म्हणून ती तिच्या बहिणींचा विचार करते एकेक करून वेगवेगळ्या कारणाने का होईना त्या सगळ्या तिच्या संघात सहभागी होतात. या कारणाने जवळपास तीस वर्षांनी सगळ्या बहिणी पुन्हा एकत्र येतात. काळाच्या ओघात शरीराप्रमाणेच मनाचीही पडझड झालीय, जेव्हा या बहिणी एकत्र येतात तेव्हा त्यांना जाणीव होते की आपल्या आयुष्यात कशाची उणीव होती. त्यांनी आपल्याभोवती जी एक अदृश्य भिंत उभी करून ठेवली आहे ती एकेक करून गळून पडते गोष्ट पुढे सरकत जाते.

बाईपण भारी देवा चा सर्वात उत्तम भाग म्हणजे पुरुषांच्या सहाय्यक पात्रांची निवडही अतिशय विचारपूर्वक केलेली आहे, सगळे पुरुष गोष्टीचा भाग असले तरीही बहुतेक वेळा ते पडद्याआड असतात. त्यांच्याविषयी जेव्हा या बायकांच्या मनात विचार येतो तेव्हा त्या किती ओझे घेऊन जगत असतात याची आपल्याला जाणीव होते किंवा ज्या पुरुषांशी त्यांचा संबंध आहे (किंवा ज्याच्यासोबत जगताहेत) त्यांच्याशी असलेल्या नात्याचे स्वरूप आपल्याला समजते. हळूहळू गोष्ट उलगडत जाते आपली प्रत्येक बहिणीच्या पात्राच्या चेहऱ्यामागे असलेल्या खऱ्या बाईशी ओळख होते या प्रक्रियेत तिची स्वतःशी अधिक चांगली ओळख होते. नेहमीप्रमाणे (मी आजूबाजूच्या अनेक महिलांच्या बाबीत हे घडताना पाहतो) प्रत्येक बहीण तिच्या आयुष्यात काही समस्या आहे ही वस्तुस्थितीच नाकारताना दाखवली आहे. आपल्या आयुष्यात सगळे काही व्यवस्थित आलबेल आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, प्रत्यक्षात मात्र तसे नसते. त्यामुळेच त्या सतत दुःखी असतात तणावाखाली जगतात. या बहिणी मंगळागौर स्पर्धेचा सराव करण्यासाठी जशा वरचेवर भेटू लागतात, त्यांच्या नात्यातही हळूहळू मोकळेपणा येऊ लागतो, जो इतक्या वर्षात पूर्णपणे हरवून गेलेला असतो. त्यामुळे त्यांना स्वतःच्या समस्यांशी लढण्याचे धाडस ताकद मिळते हाच बाईपण भारी देवा चा सर्वोत्तम भाग आहे. 

विविध कौटुंबिक आघाड्यांवर लढताना, मुले, काम, भोवतालचे विवेकशून्य पुरुष किंवा तुमच्या स्वतःच्या भूतकाळाला तोंड देताना, तुम्हाला असे कुणीतरी हवे असते जे तुमची भीती, वेदना, सल, भूतकाळ ऐकून घेईल यासाठी तुमच्या सख्ख्या बहिणीशिवाय अधिक चांगले दुसरे कोण असू शकते, कारण तीदेखील तुमच्याच भूतकाळाचाच भाग असते. म्हणूनच, या बहिणी एकमेकींना आपली ताकद बनवतात त्यांच्या वर्तमानकाळाला तोंड द्यायला सुरुवात करतात, यात त्यांना त्यांचे बालपणीचे बंधच नव्हे तर मीपणही गवसते. वैशिष्ट्य म्हणजे यात दिग्दर्शकाची बुद्धिमत्ता संपूर्ण चित्रपटात जाणवत राहते, कारण मंगळागौर स्पर्धेचा निकाल जाहीर होणे बहिणीचा संघ जिंकलेला दाखवणे आवश्यकच वाढले नाही. त्या बहिणी स्वतःची ओळख आपल्या समस्यांशी लढण्याची क्षमता पुन्हा मिळवतात हाच खरा विजय आहे तो कोणत्याही चषकापेक्षा किंवा बक्षिसाच्या रकमेपेक्षा अधिक मोलाचा आहे. बाईपण भारी देवा पाहिल्यानंतर भारवून गेलेल्या महिलांना मला आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते, स्वतःची ओळख पुन्हा मिळवणे तुमचे स्वतःचे आयुष्य जगता येणे म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे किंवा तुमच्या कर्तव्यांची पूर्तता करणे नव्हे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचा आनंद जवाबदाऱ्यांचा ताण यांचा समतोल सहजपणे साधू शकता, यालाच तर जीवन म्हणतात !

या लेखाच्या सुरुवातीच्या विधानात मी एक स्री हीच दुसऱ्या स्री ची कट्टर शत्रू असते तो शत्रू तिच्यातच असतो असे म्हटले होते, बाईपण भारी देवा ची आणखी एक बाजूही आहे. तुमच्यामध्येही एक स्री आहे जी तुमची सर्वोत्तम मैत्रीण होऊ शकते, कारण तुम्ही तुमच्यातल्या स्री ला कसे वागवताय, यावरूनच ती तुमची कट्टर शत्रू होते की घनिष्ट मैत्रीण होते हे ठरेल बाईपण भारी देवा हा चित्रपट बाईपणाच्या याच अगदी मूलभूत तथ्याची तुम्हाला जाणीव करून देतो. म्हणूनच तुम्ही त्यातून काय घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे, एवढे सांगून निरोप घेतो!

 

संजय देशपांडे.

संजीवनी डेव्हलपर्स.

smd156812@gmail.com