Tuesday 1 August 2023

“इर्शाळवाडी”, नावाचा आपत्तीचा धडा !!






















काही लोकांना बदल आवडत नाही, पण जर बदलाचा दुसरा पर्याय केवळ

  आपत्ती असेल तर मात्र बदलायलाच हवे” ... इलॉन मस्क

  • या नावाची ओळख सांगायची गरज नाही परंतु तरीही श्री. इलॉन मस्क हे अमेरिकी अब्जाधीश व्यावसायिक आहेत व इलेक्ट्रिक कार टेस्लाचे निर्माते आहेत व आता जागतिक अभिव्यक्ती मंचाचे (उपरोधाने) म्हणजेच ट्विटरचे मालक आहेत. त्यांचा स्वतःच्या कामाविषयीचा (किंवा जीवनाविषयीचा) दृष्टिकोन वादग्रस्त असला तरीही त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल काहीच शंका घेता येणार नाही, जी त्यांच्या वरील अवतरणातून दिसून येते. या अवतरणाचे कारण अर्थातच एक नैसर्गिक आपत्ती होती ज्याला लोक प्रत्यक्षात एखादा अपघात किंवा दुर्घटना म्हणतील परंतु त्याचा परिणाम भीषण होता (मस्क यांचे कामाच्या ठिकाणी निर्णय जसे असतात त्याप्रमाणे) व नेहमीप्रमाणे आपण संपूर्ण समजातून त्याविषयी प्रतिक्रिया उमटलेल्या पाहतो आहे. सुदैवाने, राजकीय पक्षांनीही आपत्तीसाठी एकमेकांना दोष दिला नाही (किमान आत्तापर्यंत तरी), कदाचित ते सगळे त्यांच्यावर ओढवलेल्या राजकीय आपत्तीला तोंड देण्यात व्यग्र आहेत व सध्यातरी मदत व बचावकार्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ही घटना म्हणजे पश्चिम घाटात सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये, इर्शाळवाडी नावाची एक संपूर्ण वाडी (लहान झोपड्यांचा एक समूह, जो आकाराने खेड्यापेक्षाही लहान असतो) दरड कोसळल्याने जमीनदोस्त झाली. आत्तापर्यंत जवळपास तीस लोकांचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यात आली आहे व शंभरपेक्षा अधिक अजूनही बेपत्ता आहेत. जे वर्तमानपत्र वाचत नाहीत, किंवा केवळ त्यांना ज्यामध्ये रस आहे अशा बातम्या वाचतात, त्यांच्यासाठी सांगतो की जुलै २३ च्या तिसऱ्या आठवड्याच्या रात्री मुसळधार पावसामुळे, डोंगराचा किंवा जमीनीचा काही भाग निखळून डोंगराच्या उतारावर  म्हणा वा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोपड्यांवर येऊन कोसळला. बहुतेक गावकरी झोपेत असल्याने त्यांच्यावर काय आपत्ती ओढवली आहे याची त्यांना जाणीवही झाली नाही. हे ठिकाण रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये आहे. परंतु तिथे पोहोचण्यासाठी शेवटचे पाच ते सहा किलोमीटर अंतर केवळ पायी चालावे लागते (२०२३ मध्येही अजूनही अशी ठिकाणे आहेत). पावसाच्या संततधारेमुळे बचावकार्यही जवळपास अशक्य झाले आहे तरीही आपली यंत्रणा (म्हणजेच सरकार व मदतकार्यात सहभागी असलेले सर्व) सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तरीही हे सगळे दुर्घटना घडून गेल्यानंतरचे आहे व तिथे फारसे कुणीही जिवंत उरलेले नव्हते. माझ्या लेखाचा विषय बचाव कार्य ज्याप्रकारे केले जात आहे त्याविषयी शंका घेणे किंवा त्याला दोष देणे हे नाही तर त्यामागचा हेतू संपूर्ण समाजाला त्याविषयी प्रश्न विचारण्याचा आहे. अशा आपत्तींचा अंदाज लावण्यात आपण किती कुचकामी आहोत हे दाखविण्यासाठी आपल्याला एखाद्या आपत्तीची वाट का पाहावी लागते. आपला त्याबद्दलचा दृष्टिकोन कसा असतो, ती घटना घडल्यानंतरही माध्यमांमध्ये त्याविषयी बातम्या होत्या आपत्ती पर्यटनाच्या (नवीन संज्ञा), आपण अगदी कशाचेही व्यावसायीकरण करू शकतो, अगदी मृत्यूचेही. मदतीच्या नावाखाली किंवा उत्साहाच्याभरात किंवा थोडा साहसी प्रवास करण्यासाठी हजारो लोक दुर्घटनास्थळाला भेट देत आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांना बचाव कार्य करणे अवघड झाले. शेवटी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना इर्शाळवाडीला भेट देणाऱ्या अनधिकृत लोकांसाठी संचारबंदी घोषित करावी लागली. आपण खरोखर आतून एक समाज म्हणून कसे आहोत असा प्रश्न पडतो. एखाद्या दुर्घटनेविषयी गंभीर नसण्याचा हा दृष्टिकोन (म्हणजे त्याविषयी अनभिज्ञ असण्याचा), सगळीकडे दिसून येतो. अगदी रस्त्यावरील अपघातानंतरही, अनेक जण जखमींना किंवा मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याऐवजी छायाचित्रे घेण्यात किंवा सेल्फी घेऊन त्या समाज माध्यमांवर टाकण्यात व्यग्र असतात. ही समस्या आपल्या शिक्षणातच आहे ज्यामध्ये आपले किंवा इतर व्यक्तींचे आयुष्य पणाला लागलेले असते अशा जीवनाच्या कोणत्याही पैलूंबद्दल आपल्याला लहानपणापासूनच संवेदनशील बनवले जात नाही. सर्वप्रथम, आपत्ती म्हणजे काय हे आपण समजून घेऊ, मी ऑक्सफर्डच्या शब्दकोशाबद्दल बोलत नाहीये तर आपण हा शब्द ज्याप्रकारे वापरतो त्याबद्दल बोलतोयआपत्ती म्हणजे अशी एखादी घटना किंवा कृती किंवा घडामोड जिचा आजूबाजूच्या परिसरावर ती घडल्यानंतर व्यापक परिणाम होतो व बहुतेकवेळा हा परिणाम त्या परिसरासाठी हानीकारक असतो. या परिसरामध्ये सजीवांचा (माणसांसह) तसेच निर्जीव गोष्टींचाही समावेश होतो, ज्या या कृतीमध्ये/घडामोडीमध्ये नष्ट होतात किंवा त्यांना त्रास होतो ज्यामुळे आपत्ती होते. ही कृती माणसाच्या चुकीमुळे (सामान्यपणे) झालेली असू शकते किंवा निसर्गाच्या उद्रेकामुळे उदाहरणार्थ चक्रीवादळ, त्सुनामी किंवा भूकंप. परंतु मी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या परिस्थितींमध्ये विनाश व नुकसान होते ज्याला अशा घटनेनंतर आपण आपत्ती म्हणतो.

आता, आपल्या लेखाच्या मूळ विषयाकडे वळू, एखादी आपत्ती केवळ निसर्गाच्या उद्रेकामुळे झाली म्हणजे त्सुनामी किंवा भूकंप तर आपण केवळ आपल्या दुर्दैवालाच दोष देऊ शकतो. परंतु जेव्हा एखादी आपत्ती मानवी चुकीमुळे किंवा निसर्गाने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे होते तेव्हा आपत्तीचे खरे कारण नेहमी काही माणसे किंवा माणसांचा समूह असतो, अलिकडेच झालेल्या आपत्तीचे मुख्य कारणही हेच होते एवढेच मला सांगायचे आहे. काही वर्षांपूर्वी याच पर्वतरांगांमध्ये अशाचप्रकारे दरड कोसळली होती, त्यामध्ये जे गाव पूर्णपणे उध्वस्त झाले त्याचे नाव होते माळीण व त्यामध्ये जवळपास १०० हून अधिक लोकांचा (व पाळीव प्राणी) मृत्यू झाला होता. परंतु आपण त्यातून काहीच शिकलेलो नाही (हे सांगताना अतिशय वाईट वाटते आहे) अशावेळी आपत्तीची जबाबदारी ही निसर्गाची नव्हे तर आपल्यावर म्हणजेच माणसांवर असते. ही गावे व वस्त्या (वाड्या) शेकडो वर्षांपासून पर्वतरांगांमध्येच वसलेली आहेत, परंतु गेल्या काही दशकात आपण पृथ्वीचे किती नुकसान केले आहे ते पाहा, याची कारणे म्हणजे अनियोजित नागरीकरण, अनियंत्रित लोकसंख्या व आपल्या निसर्गाच्या संवर्धनाबाबतचा अडाणी दृष्टिकोन. कोणतीही आपत्ती एका रात्रीत होत नाही (केवळ भूकंप किंवा ज्वालामुखी वगळता), त्याआधी आपल्याला इशारे मिळत असतात तसेच निसर्गाची अंतिम कृती ही माणसाने विविध स्वरूपात केलेल्या अतिक्रमणाचा प्रतिकार किंवा त्या ओझ्याखाली दबल्यामुळे होते, उदाहरणार्थ समुद्रात भराव घालणे, खाणी खोदणे, जंगलतोड, नदीचा प्रवाह बदलणे, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

इर्शाळवाडीमध्ये अलिकडेच झालेल्या घटनेसंदर्भात, अधिकाऱ्यांविषयी व दुर्घटनेत मरण पावलेल्या नागरिकांविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की, इतकी वर्षे या सर्व वसाहती आपापल्या ठिकाणी सुरक्षितपणे राहात होत्या परंतु लोकसंख्या वाढली आहे, तसेच गरजाही वाढल्या आहेत व या परिसरावर निसर्गाचाही प्रकोप होत असतो. सह्याद्रीच्या संपूर्ण पर्वतरांगांवर नेहमी मुसळधार पाऊस पडतो पाण्यामुळे किती नुकसान होऊ शकते हे आपल्याला माहिती नसते किंवा समजत नाही, त्यामुळेच नेहमी डोळे उघडे ठेवले पाहिजेत तसेच अतिशय काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी पर्यावरणवादी तसेच अभियंत्यांनी आपण विकास किंवा वाढ ज्याप्रकारे हाताळत आहोत तसेच आपली जीवनशैली, निसर्गाविषयीचा दृष्टिकोन या सगळ्यांमुळे आपत्ती ओढवू शकते, जे आपण सध्या पाहात आहोतकोणतेही आपत्ती हाताळण्याचे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे ती टाळणे किंवा ती उशीरा व्हावी यासाठी प्रयत्न करणे व दुसरा म्हणजे तिला अशाप्रकारे तोंड देणे की त्यामुळे अतिशय कमी किंवा किमान नुकसान होईल. अलिकडच्या काळात आपण पूर, विशेषतः किनारपट्टीवरील चक्रि‍वादळे किंवा वावटळीसारख्या आपत्तींना तोंड देताना अनेक आयुष्य वाचविण्यात यशस्वी झालो आहोत, परंतु आपण इर्शाळवाडीसारख्या घटनांचा अंदाज बांधण्यात, त्या थांबवण्यात व योग्य ती पावले उचलण्यात अयशस्वी ठरलो आहोत. जेथे दरडी कोसळू शकतात व पूर येऊ शकतो अशी ठिकाणे शोधण्यापासून, तिथल्या रहिवाशांचे स्थलांतर करण्यापर्यंत अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही परिस्थिती केवळ पश्चिम घाटामध्ये वसलेल्या काही दुर्गम खेडेगावांची नाही तर अगदी आपल्या पुणे शहरातही हीच परिस्थिती आहेपुण्याच्या मध्यवर्ती भागात पर्वती टेकडीच्या उतारावर बांधण्यात आलेल्या झोपड्या/अवैध घरे पाहा, पुण्यातील व भोवतालच्या बहुतेक डोंगरांवर अशीच परिस्थिती आहे व याची तुलना इर्शाळवाडीशी करा. आता एखादे लहान मूलही सांगेल आपण आपत्ती नावाच्या एका टाईम बाँबवर राहतोय ज्याची जोरजोरात टिकटिक सुरू आहे, या टाईम बाँबची वात जळतेय परंतु आपण त्याकडे काणाडोळा केलेला आहे व आपल्याला त्यासंदर्भात काही ऐकूही येत नाही. आपला हाच दृष्टिकोन माझ्या लेखाचा विषय आहे कारण एकीकडे आपण नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडत आहोत परंतु आपल्या अगदी डोळ्यांसमोर घडू शकतील अशा आपत्तींबाबत आपण काय करत आहोत, आणखी एक आपत्ती किंवा आपत्तींची मालिका थांबवण्याकरता पावले उचलण्यासाठी आपण कसली वाट पाहतोय.

एकीकडे सरकार अवैध वसाहतींना वाचविण्यात गुंग आहे जेथे आपत्ती कधीही कोसळू शकते, परंतु एक लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यावर कोणतीही आपत्ती ओढवते, तेव्हा ही इमारत वैध आहे किंवा अवैध आहे असे विचार करत नाही, ती त्यासाठी जबाबदार असलेले व जबाबदार नसलेले सर्वकाही नष्ट करून टाकते. मी वर म्हटल्याप्रमाणे निसर्ग कधीही सूड बुद्धीने वागत नाही, आपण त्याच्याशी गैरवर्तन करतो (त्याचा अपमान करतो), निसर्ग फक्त प्रतिक्रिया देतो व दुर्दैवाने त्या प्रतिक्रियेचा परिणाम हा सामान्यपणे आपत्ती असतो. आपण अजूनही पहिल्या पायरीवरच खोळंबलेले आहोत, ती म्हणजे जेथे आपत्ती ओढवू शकते अशी ठिकाणी शोधणे, त्यामुळेच ती थांबवणे किंवा टाळणे व समाजाला अशा आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशिक्षण देणे हे मुंगेरीलाल के सपनेअसल्यासारखेच वाटते. माळीणमध्ये दरड कोसळणे असो किंवा इर्शाळवाडीमध्ये, तिथे कोणत्याही मदतीसाठी किंवा बचावकार्यासाठी पोहोचणे हीच मूलभूत समस्या होती, अशा परिस्थितीत या जागी राहणाऱ्या रहिवाशांना आपण अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी कसे प्रशिक्षण देणार आहोत, कारण तेच स्वतःची मदत करू शकतात. याकरता प्रशिक्षण देणारा संघ का तयार करण्यात आलेला नाही, आपल्याला (म्हणजेच सरकारला) अशा वसाहतींपर्यंत पोहोचून, आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांचे मूलभूत प्रशिक्षण घेण्यापासून कुणी रोखले आहे, पर्वतीच्या टेकडीवर असलेल्या झोपड्यांच्या बाबतीतही हे करता येईल. अशा जागांवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी एक उपग्रह का असू शकत नाही, म्हणजे आपल्याला कोणतीही आपत्ती घडल्यानंतर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे कुणावर तरी अवलंबून राहतो व त्यानंतर तिथे पोहोचतो तसे होणार नाहीएकीकडे आपण एआयविषयी बोलतो (म्हणजेच आर्टिफिशिअल  इंटेलिजन्स  प्रज्ञा, एअर इंडिया नव्हे) व दुसरीकडे आपण (म्हणजेच सरकार) आपत्तीग्रस्त ठिकाणच्या प्रत्यक्ष परिस्थितीमळे आपल्या संसाधनांचे व्यवस्थापन करण्यात असमर्थ असल्याची कबुली देतो, हे काही पटण्यासारखे नाही. याचा अर्थ आपत्तीस्थळी असलेली परिस्थिती व बचावकार्य करणाऱ्या संघाला ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्याकडे मी दुर्लक्ष करतोय असे नाही, त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली आहे व करत आहेत, परंतु त्यामुळे लोकांचे जीव वाचले नाहीत व भविष्यातही वाचणार नाहीत कारण ती आपत्तीनंतर केलेली कृती आहे, बरोबरआपत्ती व्यवस्थापन नावाचा संघ आहे, मात्र ज्याप्रमाणे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर फोर्स १० ची स्थापन करण्यात आली होती त्याप्रमाणे मी आपत्ती व्यवस्थापन दलावर कधीही कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचे ऐकलेले नाही. कारण हे प्रकरणही तसेच आहे, अर्थात येथे हल्लेखोर हा कुणी दहशतवादी नाही तर निसर्ग हे तसेच त्याचा हेतू भीती पसरविणे हादेखील नाही परंतु दुर्दैवाने त्याच्या कृत्यामुळे एकूणच समाजावर होणारा परिणाम मात्र तसाच असतो. इर्शाळवाडीसारख्या ठिकाणी राहणाऱ्या हजारो लोकांना दरड कोसळणे किंवा पूर यासारख्या बाबतीत आता त्यांची पाळी असेल असा विचार करून रात्री झोप लागत नसेल व याचे कारण म्हणजे केवळ आपण त्यांना आपत्तीला तोंड देण्यासाठी योग्य यंत्रणा उपलब्ध करून देऊ शकत नाही, हाच माझ्या लेखाचा विषय आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे पोलीस सगळ्यात शेवटी येतात, त्याचप्रमाणे कोणतीही आपत्ती आल्यानंतर, आपण (म्हणजे समाज, केवळ सरकार नव्हे) आपत्ती व्यवस्थापन नावाचा खेळ सुरू करतो व आपला खेळ संपेपर्यंत पुढील आपत्ती आणखी जोरदार तडाखा द्यायला सज्ज असते, ही दुर्दैवाची बाब आहे. जंगलतोड करण्यापासून ते नद्यांचा प्रवाह बदलण्यापर्यंत ते नैसर्गिक अधिवासांचे नुकसान करून बांधलेल्या अवैध वसाहतींना संरक्षण देण्यापर्यंत, तसेच पावसाच्या पाण्याच्या संवर्धनासारख्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यापर्यंत व निसर्गाला विकासाचा अविभाज्य घटक न ठेवता विकास योजनांची अंमलबजावणी करण्यापर्यंत, आपण स्वतःच आपत्ती निर्माण करतो व नंतर त्यासाठी निसर्गाला दोष देतो; जोपर्यंत आपण ही वस्तुस्थिती स्वीकारत नाही व स्वतःच्या चुका सुधारत नाही, इर्शाळवाडीसारखी घटना पहिल्यांदाच घडली नाही व निश्चितपणे ती शेवटची नसेल, हे लक्षात ठेवा!

संजय देशपांडे.

संजीवनी डेव्हलपर्स.

smd156812@gmail.com

 




















 

No comments:

Post a Comment