Thursday 17 October 2019

आभाळ फाटले,स्मार्ट शहर बुडाले !


















पहिल्या पूरानी काहीच अक्कल आली नसेल म्हणूनच कदाचित देव दुसरा पूर पाठवतो”… निकोलस चँफर्ट

सबॅस्टियन-रॉश निकोलस, यांना निकोलस चँफर्ट व सबॅस्टियन निकोलस डी चँफर्ट म्हणूनही ओळखतात. ते एक प्रसिद्ध फ्रेंच लेखक होते व त्यांच्या लेखनात विनोदी वाक्यप्रचार व म्हणींचा सढळ वापर असायचा. निकोलस यांच्यासारख्या प्रगल्भ व्यक्तींमुळेच युरोपचा प्रदेश विज्ञान व  कला विषयात  प्रगत आहे तसंच त्यांची निसर्गाबाबतची जाणीवही प्रगल्भ आहे.वरील अवतरणात देवानं युरोपात पूर पाठवताना हात आवरता घेतला असला तरीहीतो आपल्या स्मार्ट पुणे शहरातला पूर थांबवण्याचं मात्र नाव घेत नाहीये आपल्या स्मार्ट नागरिकांना तरी या मॉन्सूनमध्ये असाच अनुभव येतोय. पुणे पावसाळ्यातील पुराच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकेल असा विचारही कुणी केला होता का?आपण वर्षानुवर्षे मुंबई पावसाळ्याला तोंड देण्यात कशी अपयशी ठरते हे अगदी जवळून पाहात असतानाआपल्याकडेही असं होणं ही काही अभिमानाची बाब नाही.आत्तापर्यंत पाऊस, पर्यावरण, माणसानं (बांधकाम व्यावसायिकांनी) नैसर्गिक जलस्रोतांवर केलेलं अतिक्रमण, झपाट्याने होत असलेली वृक्षतोड, काँक्रिटीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेली सदोष गटारे, प्लास्टिकच्या वापरामुळे तुंबलेली गटारे व अशा इतर अनेक कारणांमुळे पूर येतो व प्रचंड नुकसान होते याविषयी कितीतरी लिहीण्यात आलंय. मी तीस वर्षांहून अधिक काळापासून पुण्यात राहतोय व इथला पाऊसही पाहिलाय, पण यावेळी पावसामुळे आलेली आपत्ती अभूतपूर्व आहे. आपण नेहमीप्रमाणे पावसाला दोष देतोय पण हा निसर्ग आहे व निसर्गाला कुणी थांबवू शकत नाही.पण आपण निसर्ग चक्रात व्यत्यय नक्कीच आणू शकतो व आपण सध्या तेच पाहतोय नाही काआता हा लेख पुरासाठी कुणालातरी दोष देण्यासाठी नाही, ते करण्यासाठी बरेच जण आहेततर मला पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे तर्कशुद्ध विश्लेषण करण्यासोबतच त्यासाठीच्या उपाययोजना मांडायच्या आहेत. एक लक्षात ठेवा या पुरासाठी केवळ पाऊसच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकजण जबाबदार आहे व म्हणून आपण यापुढे काय व कशाप्रकारे करू शकतो हे पाहू.

सर्वप्रथम आपण पावसामुळे आलेल्या पुरामुळे शहरात व नागरिकांना कायत्रास होतोय, गैरसोय होतेय किंवा नुकसान झालेय हे पाहू. सगळ्यात मनःस्ताप हा असंख्य सोसायट्यांच्या सिमा भिंतींचे / वा रिटेनिंग भिंतींचे झालेले नुकसान व त्यामुळे पार्किंगमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे.त्यानंतर जवळपासच्या नाल्यातले (जे आधी ओढे होते) किंवा अगदी रस्त्यावरचे (जे आता नाले झाले आहेत) पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे ही घरे कोसळली यामध्ये प्रामुख्याने पत्र्यांच्या व निकृष्ट दर्जाच्या (सांगायची गरजच नाही) विटांनी बांधलेल्या अवैध घरांचा समावेश होता, यामध्ये रहिवाशांचे जीव गेले तसेच मालमत्तेचे नुकसान झाले.दर्जेदार बांधकाम असलेल्या कायदेशीर घरांना म्हणजेच बंगल्यांनाही पुराचा फटका बसला ज्यामुळे फारशी जीवित हानी झाली नसली तरीही मालमत्तेचे नुकसान नक्कीच झाले. रस्त्यांवर हजारो वाहने पुराच्या पाण्यात अडकून राहिली व त्यातही काही दुर्दैवी वाहून गेली त्यामुळे वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तसेच लोकांचे जीवही गेलेपाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेक झाडेही उन्मळून पडली व अनेक ठिकाणी लहान पूल किंवा साकवही वाहून गेले.अनेक ठिकाणी मीटर, ट्रान्सफॉर्मर, वीजवाहक तारा वगैरे विजेचे साहित्य खराब झालेआणखी एक नुकसान अतोनात झालं ते म्हणजे पुराच्या पाण्यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडल्याने, बचाव कार्यात तसंच पुरानंतरच्या कामांमध्ये अनेक लोकांचा बहुमूल्य वेळ वाया गेला. आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांनी आता पावसाचा धसका घेतलाय, आता थोडासाही पाऊस पडला की लोक घाबरून किंवा गोंधळून जातात. एकेकाळी शांत व आनंदी म्हणून नावलौकिक असलेल्या या शहराचं हे मोठं नुकसान आहे. आता हे शहर पूर्वीसारखं आहे असं आपल्याला म्हणता येईल का, संध्याकाळी ऑफिसमधून घराकडे निघताना आपली नजर आधी आकाशाकडे जाते. आकाशात ढग असतील तर भीतीनं काळवंडलेले चेहरे पुरामुळे काय नुकसान झालंय हे सांगतात.

ही सध्याची परिस्थिती आहे आणि माझा असा प्रश्न आहे की जर पावसामुळे पूर आला नसेल तर त्याला जबाबदार कोण, देव?या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देण्याएवढे आपण मूर्ख असू असं मला वाटत नाही. मग जर आपण मूर्ख नसू तर पुरासाठी व त्यामुळे झालेल्या नुकसानासाठी जबाबदार कोणतसंच दुसरा प्रश्न म्हणजे आपण पाऊस नियंत्रित करू शकत नाही पण आपण पूरही नियंत्रित करू शकत नाही का, याचे उत्तर करू शकतो असा असेल तर पुन्हा पहिला प्रश्न त्याची जबाबदारी कुणाची आहे? तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर होय असं आहे, आपण पूर नियंत्रित करू शकतोआणि पूर टाळणं ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण ती जबाबदारी पार पाडली नाही तर पुरामुळे होणाऱ्या नुकसानाला आपण सगळे जबाबदार आहोत. विनोद म्हणजे शहरात काहीही वाईट झालं (उदाहरणार्थ पूर) तरी त्याला सगळे जबाबदार आहेत असं आपण म्हणतो तेव्हा एकमेकांना दोष द्यायची स्पर्धा सुरू होते, खरंतर दुसऱ्याला दोष देणे हा आपला राष्ट्रीय खेळ घोषित केला पाहिजे ईतके आपण त्यात पारंगत आहोतपूर नियंत्रणाची जबाबदारी सगळ्यांची असली तरीही प्रत्येकाची भूमिका निश्चित असली पाहिजे व आपण नेमके हेच करत नाही. आपण सगळ्यांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण अपयशी ठरला आहे. आपल्या निष्काळजीपणासाठी आता आपण एकमेकांकडे बोट दाखवत आहोत.या पुरासाठी अनुक्रमे पुणे महानगरपालिका (म्हणजे तिचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी), जलसिंचन विभाग, महसूल, पोलीस, न्यायव्यवस्था, स्वयंसेवी संस्था, वास्तुविशारद, नगर नियोजन, नागरी विकास, माध्यमं आणि हो बांधकाम व्यावसायिक (आपण त्यांना कसं विसरू शकतो) सगळे जबाबदार आहेत व त्यांच्यापैकी कुणीही हे स्वीकारणार नाही. त्याशिवाय सामान्य माणसंही (म्हणजेच नागरिक) पुरासाठी तितकीच जबाबदार आहेतकारण वर नमूद केलेल्या व्यक्ती कमी अधिक प्रमाणात पुरासाठी कारणीभूत असतील तर सामान्य माणूस वर नमूद केलेली माणसं करत असलेल्या प्रत्येक उद्योगात सहभागी आहेत.पुरामध्ये सर्वाधिक नुकसान झोपडपट्ट्यांचं झालंय, पण कुणीही या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या माणसाला तो तिथे राहायला का गेला हे विचारत नाही. अशा घरांमध्ये नैसर्गिक आपत्तींपासून काहीही संरक्षण नसते आणि हे संपूर्ण व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे झालं आहे. हा तर्क लावला तर मला माहितीय अनेक लोक माझ्यावरच आगपाखड करतील, “त्याला कायदेशीर घर परवडत नसल्यामुळे त्यानं अवैध घरात राहण्याचा पर्याय निवडला, हा त्याचा दोष आहे का?” मला मान्य आहे की हा त्याचा दोष नाही, पण असा तर्क लावला तर कुणीही कुशल किंवा सुशिक्षित बेरोजगार माणूस उद्या बँक लुटेल आणि म्हणेल मला नोकरी मिळाली नाही किंवा मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही, म्हणून मी बँक लुटली”, न्यायालय त्याचा युक्तिवाद मान्य करून त्याला सोडून देईल का? याचे उत्तर नाही असे आहे, मात्र या प्रकरणात आपण त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात अपयशी ठरल्यामुळे, निसर्गानं न्याय केला आणि शिक्षा दिली. मी पीडितांविषयी पूर्णपणे सहानुभूती राखून हे विधान करतोय. मी हे म्हणतोय कारण मला माणसांचं तर माहिती नाही पण देवाचा न्याय अंधळा आहे. त्यानं नक्कीच चुकीच्या व्यक्तीला शिक्षा दिली आहे व निसर्ग देवता अशीच वागते. निसर्गासाठी माणसाने गुन्हा केला आहे म्हणून माणसांना शिक्षा देण्यात आली आहे. आपण जसं आपापली कामं ठरवून घेतो पण त्यानुसार ती करत नाही. कारण ती न करण्याची शिक्षा दुसऱ्या कुणाला तरी मिळेल हे आपल्याला माहिती असतं. पूर हे अशा गुन्ह्याचं उत्तम उदाहरण आहे.

कदाचित याच कारणामुळे पुरानेचुकीच्या माणसांना शिक्षा दिली आहे कारण तथाकथित जबाबदार माणसं (जी पुरामुळे प्रभावित झाली नाहीत) पूर नियंत्रित करण्यातील आपापली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली आहेत.आता त्याच्या जबाबदारीविषयी बोलू, सर्वप्रथम वर नमूद केलेल्या प्रत्येक संस्थेचे म्हणजेच सरकारी विभागांचे कर्तव्य, भूमिका, जबाबदारी किंवा कामाची कक्षा आधी निश्चित करा. त्यानंतर ती राजपत्रात प्रकाशित करा, कारण या देशामध्ये एखाद्या गोष्टीची कागदोपत्री नोंद झाल्याशिवाय, कुणीही त्याची दखल घेत नाही हे कटू सत्य आहे.कुणाची जबाबदारी काय आहे हे व्यवस्थितपणे स्पष्ट करा व एखादी जबाबदारी विहीत वेळेत पूर्ण झाली नाही तर त्यांना त्यासाठी शिक्षा द्या, उदाहरणार्थ नैसर्गिक जलस्रोतांवर झालेली अतिक्रमणे कोणत्या विभागाने व किती काळात हटवली पाहिजेत.त्याआधी या सगळ्या नैसर्गिक जलस्रोतांची सीमा निश्चित करा, मग ते नाले असतील, ओढे किंवा नद्या.त्यानंतर पावसाचे पाणी किंवा मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या वाहिन्यांची समस्या येते. ही गटारांचे बांधकाम बरेचदा सदोष असते तसेच ती तुंबलेली असतात, यामुळे पावसाचे पाणी या गटारांमधून वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरून वाहू लागते.पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेली गटारे सुस्थितीत असावीत व त्यांची देखभाल केली जावी यासाठी कोण जबाबदार असेल. पुरामध्ये झालेलीजीवितहानी व वाहतुकीच्या खोळंब्याचे एक मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी झाडे पडली, म्हणूनच रस्त्याच्या कडेने असलेल्या सर्व झाडांचे सर्वेक्षण केले पाहिजे जे काँक्रिटीकरणातही बळी पडू शकते. आता काँक्रिटीकरणाला नावं ठेवण्यापेक्षा त्यामुळे झाडाचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई करणं महत्त्वाचं आहे. अशा झाडांभोवतीचा भाग मोकळा करा, म्हणजे पाणी आत झिरपू शकेल व मुळे खोलवर रुजू शकतील.असेही आढळून आले आहे की जी झाडे उन्मळून पडली ती परदेशी झाडे होती म्हणजे रेन ट्री ,गुलमोहर किंवा सुबाभूळ, म्हणूनच अशी झाडे आधीच शोधा व ती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. अशा झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापा. या फांद्या पावसामुळे जड होतात व झाडावरील भार वाढल्यामुळे ते उन्मळून पडते.पावसाळ्यामध्ये जी नासधूस झाली त्यानंतर सगळीकडे फरसबंदी करण्याच्या आपल्या योजनेचा विचार करण्याची व आणखी जागा उघडी ठेवण्याचा विचार करण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे पावसाचे पाणी जमीनीत झिरपू शकेल.आपल्याकडे नगर नियोजन प्राधिकरण असले पाहिजे जे आपल्याला शहरातील विशेषतः पाणी तुंबणाऱ्या भागांचा आराखडा देईलत्यानंतर पाणी तुंबणाऱ्या भागांची तसेच पूरग्रस्त भागांची नोंद करेल व अशा भागांमधून पावसाच्या पाण्याची निचरा होण्यासाठी स्थानिक उपाययोजना देईल. म्हणून हे काम विशिष्ट काळात पूर्ण करण्यासाठी चमू तयार केले पाहिजेत.

त्याचसोबत न्यायालय व पोलीस विभागाने संबंधित जबाबदार विभागांनी केलेल्या कारवाईला पाठिंबा दिला पाहिजे, नाहीतर अशा कारवाईला स्थिगिती मिळवणे किंवा काम थांबवणे हीच अतिक्रमण करणाऱ्या संस्थांची काम करण्याची पद्धत दिसते. ही प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित असतात, त्यामुळे प्रकरण न्यायालयांतर्गत असल्याचे कारण देऊन जबाबदारी टाळणे सहज शक्य होते. पोलीसांची भूमिकाही अतिशय महत्त्वाची असते कारण या देशात लोक खाकीचा आदर करत नसले तरी तिला किमान घाबरतात (किमान आत्तापर्यंत अशीच परिस्थिती आहे). जोपर्यंत पोलीसांकडून व्यवस्थित संरक्षण मिळत नाही तोपर्यंत जलसिंचन विभाग असो किंवा पुणे महानगरपालिका अथवा वन विभाग कोणताही विभाग अवैध बांधकाम पाडू शकत नाही. मात्र पोलीस विभाग आत्तापर्यंत अशाप्रकारे संरक्षण देण्यात अपयशी ठरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची दैनंदिन कामे पार पाडण्यासाठीही त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. म्हणून पोलीस विभागाला इतर विभागांना मदत करता यावी यासाठी पुरेसे मनुष्यबळ व पायाभूत सुविधा द्या. पूर नियंत्रणासाठी कारवाई करणे ही सुद्धा एक जबाबदारी आहे. त्याचवेळी न्यायालयाने पूर नियंत्रणातील कोणत्याही अडथळ्याच्या वादासंबंधी वेगाने कारवाई करावी एवढीच विनंती मी करू शकतो, कारण न्यायालयालाच आदेश कोण देणार?राजकारण्यांना (म्हणजे निवडून आलेल्या सदस्यांना) माफ करू नका  ते कोणत्याही कृती योजनेच्या आड आल्यास त्यांना निवडून आलेल्या पदावरून निलंबित करा किंवा पुढील निवडणूक लढविण्यापासून प्रतिबंधित करा,  हाच एकमेव उपाय आहे.

मी काल रात्री हा लेख लिहीत असताना, पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनीक वाहतुकीच्या सर्विस व्हॅनवर एक मोठे पिंपळाचे झाड पडले. पिंपळासारखे देशी वृक्ष का उन्मळून पडतात याची कारण शोधता येऊ शकतात पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सर्विस व्हॅनचा चालक झाड पडल्याने दोन तास व्हॅनमध्येच अडकून पडला, बाहेर पडू शकला नाही कुठुनही काहीच मदत न आल्यानं त्याचा अखेर तडफडुन मृत्यू झाला.या स्मार्ट शहराच्या मध्यवर्ती भागात एका माणसाचा अपघात होतो, आपण दोन तासांनंतरही त्याची सुटका करू शकत नाही तरीही निर्लज्जपणे आपण स्मार्ट शहर म्हणून मिरवतो,धन्य आहे!पुरानंतरच्या नाहीतर कुठल्याही आपत्तीनंतरच्या परिस्थितीसाठीही जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आलीय हे आता तरी मान्य करा . या सगळ्या जबाबदाऱ्या असल्या तरीही त्या वेळेत पूर्ण केल्या जात नाहीत हे वारंवार सिद्ध झाले आहे. म्हणूनच मी वाचकांना पुन्हा एकदा जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतोय, एवढंच मी म्हणू शकतो.  

हे झालं सरकारी विभागांविषयी, पण खाजगी क्षेत्रं, तसंच माध्यमं, बांधकाम व्यावसायिक, सामान्य माणूस यांच्यावर कोणत्याही पगारी नोकरीच्या कर्तव्याचं बंधन नसलं तरीही नैतिक कर्तव्याचं बंधन असतं. हे नैतिक कर्तव्य केवळ निसर्गाप्रतीच नाही तर संपूर्ण शहराच्या सुरक्षेप्रती आहे. खाजगी क्षेत्रातील लोकांनी स्वतःला याची आठवण करून दिली पाहिजे.माध्यमांनीही केवळ पूर येऊन गेल्यानंतर जागे होऊ नये, बातम्यांचे मूल्य वाढविण्यासाठी पुरामुळे झालेल्या नुकसानाची छायाचित्रे दाखवू नयेत. तर वर्षभर वरील सर्व विभाग व त्यांच्या कामगिरीवर लक्षं ठेवले पाहिजे, यंत्रणा जिथे अपयशी ठरेल त्याविषयी लोकांना जागरुक केले पाहिजे. त्यानंतर येतात बांधकाम व्यावसायिक, मी जेव्हा बांधकाम व्यावसायिक म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ एखाद्या विकास योजनेच्या दृष्टिनं नाही तर निसर्गाच्यादृष्टिने अवैध असलेल्या इमारती किंवा बांधकामाशी संबंधित कुणीही व्यक्ती असा होतो. अनेक जण माझ्या या विधानाशी सहमत होणार नाही, म्हणजे याचा अर्थ तथाकथित डीपी निरुपयोगी आहे कायावर मला एकच प्रतिप्रश्न करावासा वाटतो आपण एवढे नुकसान झाल्यानंतरही केवळ कार्यालयात बसून तयार केलेल्या एखाद्या नकाशानुसार काम करणार आहोत की आपल्याला खरोखरच माणसाच्या जिवाची काळजी आहे.बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, बांधकाम सल्लागार, बांधकामस्थळावरील अभियंते, प्लंबिंग तसंच इलेक्ट्रिकल सल्लागार या सगळ्यांनी केवळ एफएसआय, खर्चाची बचत, विक्रीयोग्य क्षेत्र यांचा विचार करू नये तर मानवी जीवनाचा विचार करून इमारतीचे नियोजन करावे.प्रत्येक व्यक्तीने घर खरेदी करताना विजेच्या मीटरची जागा, तळमजल्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीची गटारे या सगळ्या सुविधा व्यवस्थित पाहिल्या पाहिजेत, केवळ उंची सोयीसुविधांवर भाळू नये. कारण पुरासारख्या आपत्तीच्यावेळी त्या काही कामाच्या नसतात. मला जातक कथामधली एक गोष्ट आठवतेय, त्यात एक पंडित (म्हणजे एक शिकलेला माणूस) बोटीत बसून नदी ओलांडून दुसऱ्या गावात चाललेला असतो, ही बोट एक स्थानिक माणूस वल्हवत असतो. या प्रवासात तो पंडीत नावाड्याला विचारतो, तू वेद वाचले आहेत का, यावर नावाडी खजील होऊन उत्तर देतो, नाही. त्यावर पंडित म्हणतो तुला सांगतो, तुझं निम्मं आयुष्य वाया गेलंय. थोडं अंतर गेल्यानंतर पंडित पुन्हा नावड्याला विचारतो, तू उपनिषदे (तत्वज्ञान व पौराणिक ज्ञानाविषयी पुस्तके) वाचली आहेस का, त्यावर पुन्हा नावाडी उत्तर देतो, नाही. पंडित नावाड्याला म्हणतो, तुझं तीन चतुर्थांश आयुष्य वाया गेलंय. नाव आणखीन पुढे जाते, तेवढ्यात वादळ सुरू होतं, नाव हेलकावे घेऊ लागते.आता नावाडी पंडिताला विचारतो, महाशय तुम्हाला पोहता येतं का, त्यावर पंडित घाबरून म्हणतो नाही, मला पोहता येत नाहीयावर नावाडी म्हणतो, अहो तुमचं तर संपूर्ण आयुष्य वाया गेलं आता!

स्मार्ट नागरिकांनो, जातक कथा हजारो वर्षं जुन्या असल्या तरीही अजूनही आपल्या भोवती पंडित व नावाड्यांसारखी माणसं आहेत,प्रश्न असा आहे की आपल्याला पंडित व्हायचंय की नावाडीयाच्या उत्तरावरच पुढील पुराच्या वेळी आपलं आयुष्य वाया गेलं की सार्थकी लागलं हे ठरेल. तोपर्यंत पावसाचा आनंद घ्या!

संजय देशपांडे
संजीवनीडेव्हलपर्स

No comments:

Post a Comment