तुम्ही कितीही धार्मिक पुस्तकं वाचली, त्याविषयी
बोललात, तरी तुम्ही ती प्रत्यक्ष कृतीत आणली नाहीत तर त्यांचा तुम्हाला काय उपयोग?- गौतम बुद्ध
धार्मिक स्थळांना
भेट देण्याच्या बाबतीत मी काही फारसा भाविक वगैरे नाही. असं म्हणतात की तुमचा योग
असेल तर त्या ठिकाणाहून तुम्हाला बोलावणं येतं आणि सगळ्या गोष्टी अनुकूल घडतात. असाच एक अनुभव
मला नुकताच आला जेव्हा मी एकाच आठवड्यात दोन धार्मिक स्थळांना भेट दिली. या दोन्ही स्थळांमधलं अंतर भरपूर होतं, हा अनुभव मला तुम्हाला सांगावासा
वाटतोय! दोन्ही ठिकाणांचं भक्तगणांसाठी विशेष
महत्व आहे आणि दररोज हजारो लोक परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात. एक आहे शेगाव
जे संत गजानन महाराज यांच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरं आहे वणी जे अर्धे शक्तिपीठ
आणि सप्तश्रृंगी देवीचे निवासस्थान मानले जाते.
पुण्याच्या तुलनेत विचार करायचा झाला
तर शेगाव हे विदर्भातलं एक लहानसं, पाण्याचं दुर्भिक्ष आणि गरीबी असलेलं गाव आहे. इथे
भेट देणाऱ्यांपैकी बरेच जण गरीब असतात आणि गेल्या काही वर्षांपर्यंत इथे सार्वजनिक
सोयी सुविधा फारशा नव्हत्या. मात्र इथल्या मंदिराच्या विश्वस्त मंडळाने जागेचा कायापालट
केला आहे, त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव घेण्यासाठी या जागेला भेट द्यायला हवी. शिर्डी
किंवा तिरुपतीसारखं हे देवस्थान श्रीमंत नाही, तरीही त्यांना भक्तांकडून जे मिळेल त्याची
पै-पै तिथल्या सुविधांसाठी वापरण्यात आली आहे. सर्वप्रथम त्यांनी बस आणि रेल्वे स्थानकापासून
भाविकांना नेण्यासाठी मोफत वाहतूक व्यवस्था पुरवली आहे. बहुतेक लोक हे इथे बस किंवा
रेल्वेने येतात, आधी रिक्षावाले आणि खाजगी वाहनचालक पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे
मागायचे आणि पर्यटकांसमोर ते पैसे देण्यावाचून काही पर्याय नसायचा कारण हातात सामान
घेऊन २-३ किलोमीटर चालणे शक्य नसायचे. आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाची या बससेवेमुळे
अतिशय चांगली सोय झाली आणि ही सेवा थोड्या-थोड्या वेळाने दिवस-रात्र सुरु असते. मंदिर
तुमच्यासाठी काय करतंय याची एक झलक इथेच तुम्हाला मिळते.
निवासाची गरज लक्षात घेऊन मंदिराच्या
विश्वस्तमंडळाने मंदिराच्या भोवताली भक्तनिवासाच्या स्वरुपात शेकडो खोल्या बांधल्या
आहेत आणि त्या भक्तांना अतिशय नाममात्र दरात उपलब्ध करुन दिल्या जातात. त्या फार आरामदायक
नाहीत मात्र त्या राहण्यायोग्य आहेत आणि त्यामुळे गरज पूर्ण होते. याठिकाणी केवळ ४०/- रुपये दराने थाळी दिली जाते ज्यामुळे भाविकांचा वेळ आणि पैसे
दोन्ही वाचतात आणि शेगावसारख्या लहान ठिकाणी मिळणारे हे सर्वोत्तम जेवण आहे!
मंदिराच्या आवारात आरोग्य सुविधाही उपलब्ध आहे, त्यामुळे भाविकांना काही
आरोग्य समस्या असेल तर तिचा लाभ घेता येतो. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयांची
सोय करण्यात आली आहे, जी आपल्या देशात अपवादानेच दिसते. ही शौचालये अतिशय स्वच्छ असून
त्यामध्ये पुरेसे पाणीही उपलब्ध असते. भक्तनिवासाच्या प्रत्येक मजल्यावर गरम पाणी आणि
पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्यामुळे भाविकांना बाटलीबंद पाणी विकत
घ्यावे लागत नाही. प्रत्येक ठिकाणी मंदिराचे विश्वस्त मंडळ भक्तांची काळजी घेते आणि
त्यासाठीच शेगाव मंदिर संस्थान वैशिष्टपूर्ण ठरते.
देवस्थानाने ४०० एकर जागेवर “आनंदसागर”
नावाची विस्तीर्ण बाग तयार केली आहे, तिलाही आवर्जून भेट द्यावी कारण तिचे वर्णन शब्दात
करता येणार नाही. ही बाग भक्तांना ध्यान किंवा साधना करण्यासाठी आहे. अनेक वर्षांपासून
पडलेल्या या ओसाड जमीनीवर अक्षरशः जादू करण्यात आली आहे. आता ते सर्व पर्यटकांचे आकर्षण
केंद्र बनले आहे, त्यातून उत्पन्नही मिळते आणि मंदिराला भेट दिल्यानंतर इथे भेट देणे
सार्थ ठरते. बागेमध्ये मंदिरे, तलाव, झरे,
महाराष्ट्राची सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक
प्रगती करणाऱ्या विविध संतांचे पुतळे, विस्तीर्ण मोकळी जागा आणि भरपूर हिरवळ आहे. पाणी
आणि हिरवळ यांची कमतरता असलेल्या विदर्भात ही जागा म्हणजे अनेक जीव आणि वनस्पती यांचे
निवासस्थान आहे. बागेत, भक्तनिवासात आणि मंदिरामध्येही निवासाच्या सोयीविषयी माहिती
आणि महत्वाच्या ठिकाणांसाठी रेल्वेचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. यातून मंदिर, पर्यटकांची
किती काळजी घेते हे दिसून येते. आपल्या देशात पर्यटकांना व्यावसायिक पद्धतीने सोयी
दिल्या जात नाहीत तेव्हा अशा सोयी पाहिलं की खूप बरं वाटतं.या सर्वात आणखी एक उल्लेखनीय गोष्ट
म्हणजे तिथली स्वच्छता! समाजाच्या सर्व स्तरातील
हजारो लोक इथे भेट देतात मात्र तुम्हाला कचरा क्वचितच पहायला मिळतो! स्वयंसेवकांचा एक गट इथे सतत स्वच्छता करण्यात गुंतलेला असतो आणि सर्व कचरापेट्या
लगेच स्वच्छ केल्या जातात. लोकांचे तंबाखू आणि पानाविषयीचे प्रेम पाहता इथे तंबाखू
किंवा पानाच्या पिचकाऱ्यांचे एकही डाग दिसत नाहीत हे उल्लेखनीय आहे. प्रशासकीय संस्थेने
मनावर घेतले तर ती किती चांगले काम करु शकते हे केवळ इतर मंदिरेच नाही तर नगरपालिका
आणि खाजगी क्षेत्रही, इथून शिकू शकतात! मला असं वाटतं इथल्या
स्वच्छतेचा अनुभव घेण्यासाठी शेगाव मंदिराला भेट दिली पाहिजे! इथे आढळणारी आणखी एक अपवादात्मक बाब म्हणजे शेवगावमध्ये प्रवेशासाठी कुठलाही
कर नाही किंवा पथकर नाही.
या पार्श्वभूमीवर मी जेव्हा नाशिक जवळच्या
आणखी एका महत्वाच्या देवस्थानाला, वणीला भेट दिली तेव्हा प्रचंड फरक जाणवला. तिथे रस्ता
दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हता, मंदिर डोंगरावर आहे त्यामुळे पायथ्यापासून डोंगरावर
मंदिरापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहनाने किंवा चढून जावे लागते. वणी देवस्थानाचा पूर्ण
आदर राखून सांगावेसे वाटते की सगळीकडे कचरा, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी असे दृश्य
दिसते. येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंग, निवास किंवा शौचालयांचीही सोय नाही. राहण्याची
जी काही थोडीफार सोय उपलब्ध आहे त्यामध्ये सांडपाण्याची नीट व्यवस्था नाही, गटारे उघडी
आहेत. गर्दीच्या वेळी पाणी मिळणे अवघड होते कारण पाणी पुरवठ्याचा कायमचा स्त्रोत नाही,
एवढ्या सगळ्या गैरसोयींनंतर आपल्याला प्रवेशासाठी कर भरावा लागतो तेव्हा आपण हा का
देत आहोत असा विचार येतो?
आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे नैसर्गिक
स्त्रोतांचा वापर, शेगावमध्ये भक्तनिवासापासून ते आनंदसागरपर्यंत पाणी उकळण्यासाठी
सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात आली आहे कारण या परिसरात सौर ऊर्जा मुबलक उपलब्ध आहे. वणीमध्येही
पवन ऊर्जेचा वापर करण्याचा विचार केला जाऊ शकतो कारण हे ठिकाण उंचावर आहे. आपण तिथे
देवीच्या दर्शनासाठी जातो हे मान्य असले तरी भाविकांच्या भावनांचा पूर्ण आदर राखून
एक प्रश्न विचारावासा वाटतो जर शेगावमध्ये हे शक्य होऊ शकते तर वणीमध्ये का नाही? एक चांगली बाब म्हणजे वणी देवस्थानाला परिस्थिती बदलायची
आहे आणि त्यासाठी ते कृती आराखडा तयार करत आहेत, म्हणूनच इच्छा आहे तेथे मार्ग आहे!
मी नुकताच एक अहवाल वाचला की महाराष्ट्रात
गेल्या वर्षी ५ कोटी पर्यटकांनी भेट दिली आणि त्यापैकी बहुतेक भाविक होते आणि आपण त्यांना
काय सुविधा दिल्या हे पाहिले तर त्यांच्या मनात आपल्या धार्मिक स्थळांची कशी प्रतिमा
निर्माण झाली असेल याचा विचार करायला हवा! शेगाव आणि वणी
या दोन्ही ठिकाणी स्थानिक प्रशासकीय संस्था, मंदिर व्यवस्थापनाच्या तुलनेत निष्क्रिय
आहेत. शेगावमध्येही व्यवस्थित रस्ते किंवा रेल्वे अथवा बसस्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या
रस्त्यावर दिशा दाखवणारे फलक नाहीत, पार्किंग सुविधा किंवा सुसज्ज माहिती केंद्र या
फारच दूरच्या गोष्टी झाल्या. वणीला जाताना घाटातील रस्ता चांगला करण्यात आला असला तरी
अजूनही बरीच सुधारणा करायची गरज आहे आणि ही केवळ स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे.
शेगावमध्ये मंदिर व्यवस्थापन मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करते
मात्र मंदिराच्या आवाराबाहेर वणीसारखीच किंवा राज्यातील इतर ठिकाणांसारखीच परिस्थिती
आहे. याबाबत कुणी काही बोलत नाही किंवा तक्रार करत नाही याचं वाईट वाटतं! बऱ्याच लोकांना असं वाटतं की दर्शन घेताना कष्ट झाले तर अधिक पुण्य मिळतं मात्र
आपण विसरतो की देवाला सुद्धा अशा परिस्थितीत रहायला आवडणार नाही आणि विशेषतः ती मानवनिर्मित
असेल तर अजिबात नाही!
महान बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे दानपेटीमध्ये
दान करण्याऐवजी किंवा अभिषेक करण्याऐवजी प्रत्येक पर्यटकाने आपला वाटा उचलला पाहिजे
तरच आपल्या प्रार्थनेला अर्थ असेल आणि ती देवापर्यंत पोहोचेल!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स