Sunday 25 May 2014

“दिल है छोटासा छोटीसी आशा”!























दिल है छोटासा छोटीसी आशा”!

आशा निर्माण करणारा योद्धा!

तुम्ही मागे उभे राहून नेतृत्व करणे व इतरांना आघाडीवर ठेवणे अधिक चांगले, विशेषतः विजय साजरा करता तेव्हा ! जेव्हा धोका असतो तेव्हा तुम्ही आघाडी घेतली पाहिजे. अशाप्रकारे लोक तुमचे एक चांगला नेता म्हणून कौतुक करतीलनेल्सन मंडेला.”

आदरणीय मोदी सर,

मी तुम्हाला पत्र लिहीताना काय म्हणून संबोधित करावे अशा विवंचनेत होतो, म्हणूनच शेवटी नरेंद्र दा म्हणायचा निर्णय घेतला कारण त्यामध्ये एक सहजता व आपलेपणा वाटतो. मी संजय देशपांडे महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक स्थापत्य अभियंता/बांधकाम व्यवसायिक; मला माहिती नाही की माझे शब्द कधी तुमच्या कानापर्यंत पोहोचतील किंवा नाही, कारण मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या शहरात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला पत्र लिहीलेले नाही, त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहीणे ही तर दूरची गोष्ट याला कारण म्हणजे तुम्ही एखादे पत्र लिहीता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर तुम्ही भावना व्यक्त करत असता. माझ्या आयुष्यात समाजातील काही चांगले नेते/राजकारणी आले नाहीत असे नाही मात्र त्यांना कधी पत्र लिहावेसे वाटले नाही हेहि तितकेच खरे आहे. मंडेला यांच्या वरील अवतरणाच्या उत्तरार्धाप्रमाणे, तुम्ही जेव्हा धोका होता तेव्हा सर्वांचे नेतृत्व केले व नेत्याने संकटाचा सामना कसा केला पाहिजे हे दाखवून दिले! या अवतरणाचा पूर्वार्ध अजूनही खरा व्हायचा आहे कारण तुम्हालाही खरा धोका (हा कदाचित चुकीचा शब्द असेल) माहिती आहे, मात्र काहीतरी करुन दाखविण्याची जबाबदारी समोर असल्याने तुम्हाला  अजुन बराच काळ पुढे उभे राहून नेतृत्व करणे आवश्यक आहे.
नरेंद्र दा तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना आव्हान करता ते पाहून मनात एक विचार येतो हा केवळ योगायोग आहे का, की तुमच्याच नावाच्या एका व्यक्तिने अनेक दशकांपूर्वी "माझ्या बंधु आणि भगीनिंनो" केवळ या एका वाक्याने पाश्चात्य जनसमूहाला सुद्धा जिंकले होते व या देशाला स्वतःच्या सामर्थ्याची सतत जाणीव करुन दिली होती, मी स्वामी विवेकानंदांविषयी बोलत आहे, त्यांचे आयुष्य फारच लहान होते मात्र नक्कीच अनुकरणीय होते! त्यांनी सामान्य माणसाला जीवनाचे मूल्य समजून घ्यावे व एखाद्या उद्देशासाठी ते समर्पित करावे हे सांगण्याचा प्रयत्न केला व तुम्ही तुमच्या प्रचारातून यापेक्षा काही वेगळे सांगत नव्हता असे मला वाटते. यामध्ये काही फरक असेल तर तो एवढाच की तुम्ही आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून हे करायला सांगत होता, अर्थात ते आमच्याच भल्यासाठी होते. तुम्ही येईपर्यंत व आम्हाला जागे होण्याचे किंवा खरेतर परिपक्व होण्याचे आवाहन करेपर्यंत आम्ही लोकशाही म्हणून अतिशय अपरिपक्व होतो. याचे उदाहरण म्हणजे बहुतांश शिक्षित व अशिक्षित लोकही निवडणुकांबाबत आपल्या एका मताने काय फरक पडतो असा विचार करत होते; याचे कारण निवडणुका ज्याप्रकारे लढल्या जात व जिंकल्या जात यामध्ये होतेतुम्ही आम्हाला आमच्या शक्तिची जाणीव करुन दिली. मी गेल्या वीस वर्षांपासून मतदान करत आहे मात्र पुण्यातल्या ज्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये मी राहतो तिथे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मतदानासाठी रांग पाहिली. या ठिकाणी पूर्वी मतदान म्हणजे सुट्टीचा दिवस असे वातावरण असायचे! त्या दिवशी व त्याक्षणी मी तुमचा जास्त आदर करु लागलो, कारण हा एका दिवसाचा परिणाम नव्हता किंवा चमत्कार नव्हता, तर एका माणसाने केवळ स्वतः च्या नव्हे तर हजारो हातांचा वापर करुन हे घडवून आणले. धर्मनिरपेक्षतेचा टेंबा मिरवणा-या आपल्या या देशात धार्मिक विजोडता समाजातील प्रत्येक स्तरावर आहे मग निवडणूक असो किंवा नोकरी किंवा अगदी लग्नासारखी वैयक्तिक बाब असो. मात्र तरीही प्रत्यक्ष धर्मनिरपेक्ष नसलेल्या आपल्या देशात परिवर्तन हे प्रत्येक गावात व शहरात दिसून आले.
आपण धर्मनिरपेक्षतेचा वापर आत्तापर्यंत फक्त सोयीस्कररीत्या करत आलो आहोत, आपली जात किंवा धर्म केवळ आपल्या फायद्यासाठी वापरले आहे. मात्र यावेळी संपूर्ण राष्ट्राचा व समाजाचा विकास ही खरी जात किंवा धर्म आहे हे जाणून आपण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन मतदान केले. नरेंद्र दा तुम्ही प्रचारादरम्यान काय जागृत केले आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? केवळ मतदात्यांचा आत्मविश्वास किंवा तुमच्या वक्तव्यावरील विश्वास नाही तर तुम्ही या देशातील प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आशा जागृत केली आहे जी मरणासन्न अवस्थेत होती. इथे मी सामान्य माणूस म्हणतो तेव्हा कोट्याधीश व्यवसायिकांपासून ते रस्त्यावरील रिक्षावाल्यापर्यंत सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो! जो देश प्राचीन काळापासून आशेवर जगत आला आहे, ज्याचा तेहतिस कोटी देवांवर किंवा अल्लाह किंवा येशूवर विश्वास आहे व त्यांचा देव त्यांना कोठल्याही वाईट स्थितीतून बाहेर काढू शकेल असा विश्वास होता, त्यांचा या देशातील परिस्थितीवरील विश्वासच उडाला होता! या देशाला आता काही भविष्य नाही अशी एक सर्वसाधारण भावना होती व मी देखील त्यास अपवाद नव्हतो.

तुम्ही आयन रँडची ऍटलस श्रग्ड ही कादंबरी वाचली असेल व त्यामध्ये आपण दररोज जी अनुभवतो तशीच परिस्थिती दाखविली आहे. त्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाला प्रश्न विचारतोहू इज जॉन गॉल्ट?” म्हणजे देवालाच माहिती! यातून सभोवतालच्या परिस्थितीविषयी नैराश्य व असहाय्यतेची भावना व्यक्त होते. जे जिवापाड मेहनत करत आहे व ज्यांना समाजासाठी खरोखर चांगले करायचे आहे त्यांचे केवळ आदर्शवादी लोक कोणतेही धोरण नसलेल्या शासनकर्त्यांच्या मदतीने शोषण करत आहेत असे दृश्य होते.
माझी पिढी विश्वास बाळगायला विसरली होती म्हणूनच आम्ही चमत्काराची आशा करणे सोडून दिले होते व तुम्ही नेमके तेच करुन दाखवले. आपण विसरतो की चमत्कार हा आपल्यातच असतो व आपण तो घडवू शकतो. आमच्यापैकी प्रत्येकाला जो बदल हवा होता तो घडवून आणण्याठी सामाईक समूह किंवा संवाद गट नव्हता व तुमच्या नकळत तुम्ही तो समूह झालात व वॉट्स-ऍप किंवा फेसबुकवर करतो त्याप्रमाणे लोकांनी तुमच्या माध्यमातून बदल शेअर केला किंवा घडवून आणला! जेव्हा इंटरनेटची बिजे रोवली जात होती तेव्हा त्यामुळे समाजात काय बदलणार आहे याची कुणालाच जाणीव नव्हती, त्यामुळे केवळ समाजच बदलला नाही तर संवादाच्या संकल्पनाच बदलल्या व कोठलाही समाज हा संवादाशिवाय असूच शकत नाही ! तुमचा प्रचार हा अभ्यासाचा विषय होता व मला खात्री आहे की यापुढे व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयांच्या, तसेच युद्धप्रशिक्षण देणा-या महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात त्याचा निश्चितच समावेश होईल. याचे कारण म्हणजे माझ्या मते ते एक युद्धच होते ज्यात तुम्हाला दृश्य तसेच अदृश्य शत्रुंशी लढायचे होते. असे म्हणतात की राजकारणात कुणीही कायमचे शत्रू नसतात; या नाण्याची दुसरीही बाजू आहेत. याचाच अर्थ राजकारणामध्ये तुमचे कुणीही कायम मित्रही नाहीत
मी चांगल्या चित्रपटांचा व चांगल्या पुस्तकांचा चाहता आहे. हॅरी पॉटर या प्रसिद्ध चित्रपटात, हॉगवर्ट शाळेचा मुख्याध्यापक डंबलडोर एकदा म्हणतो, “शत्रूंविरुद्ध उभे राहण्यास धैर्य लागते मात्र तुमच्या मित्रांविरुद्ध उभे राहण्यास त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धैर्य लागतेव मला वाटते हा संवाद तुमच्याबाबतीत अगदी चपखल लागू होतो!

मी तुमची युद्धकथा म्हणालो कारण तुम्ही एकाचवेळी विविध पातळ्यांवर लढत होता, सर्वप्रथम हा लढा विरोधी पक्षांशी होता त्यानंतर पक्षांतर्गत तथाकथित मित्रांशी व सर्वात शेवटी संपूर्ण देशातील सामान्य माणसाच्या मरणप्राय झालेल्या आशांशी होता! हे सर्व करण्यासाठी आठ महिन्यांपेक्षाही कमी काळ होता व या राज्यातील बत्तीस राज्यांपैकी केवळ एका राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री हीच शिदोरी हाताशी होती! माझ्या माहितीप्रमाणे ब-याच काळानी तुम्ही देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचलेले एकमेव मुख्यमंत्री आहात, पण देशात इतरही यशस्वी मुख्यमंत्री होते. यामुळे यशाचे श्रेय नक्कीच तुम्हाला जाते व ज्या यशाचे कुणी स्वप्नही पाहू शकले नाही ते तुम्ही कसे साध्य केलेत हा अभ्यासाचा विषय आहे! या दणदणीत विजयासोबत तुमच्या विरोधकांना आदराने वागविण्याची मोठी जबाबदारीही तुमच्यावर आहे; आपण इतिहासात पाहिले आहे की सिकंदराने राजा पुरुचा पराभव करुनही त्याला राजासारखे वागविले.
आपल्या देशात दुर्दैवाने आपण पराभवाचे विश्लेषण करण्यात निपुण आहोत मात्र आपण विजयाचे विश्लेषण क्वचितच करतो कारण आपण त्याविषयी अगदी अज्ञानी असतो किंवा नेमकेपणाने सांगायचे झाले तर भावनिक मूर्ख असतो. मात्र मला खात्री आहे की २०१९ साली तुम्ही तुमचे प्रगती पुस्तक दाखवाल असे जेव्हा तुम्ही म्हणाला होता तेव्हा तुम्हाला यशाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे याची जाणीव होईल.

आत्ता युद्धाचा पहिला भाग जिंकल्यानंतर अधिक अवघड भागाची सुरुवात झाली आहे. देशाच्या आशा पुनरुज्जीवित करणे हे झोपलेल्या राक्षसाला जागे करण्यासारखे आहे, हा राक्षस मागणी करायला सुरुवात करेल व शेकडो भाषा, संस्कृती, जाती व धर्मांच्या या देशात हे महाकाय काम आहे. जीवनाच्या अपेक्षांविषयी बोलायचे झाल्यास मला वाटते की १२० कोटी जनता असलेल्या देशातील चांगल्या जीवनाची व्याख्या एकसारखीच आहे. भारतीय पाश्चिमात्य देशांमध्ये अतिशय यशस्वी झाले आहेत याचे कारण म्हणजे आपल्या जीवनाकडून अतिशय कमी अपेक्षा आहेत. “दोन वेळचे जेवण, स्वतःचे घर आणि शक्य असल्यास एखादी गाडीआपली चांगल्या जीवनाची एवढी साधी सोपी सरळ व्याख्या आहे व त्यासाठी कष्ट करायची आपली तयारी असते; व यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे कुणालाही या मूलभूत गरजा मोफत नकोत! लोकांनी दंगली व जातीवादाविषयी कितीही भीती घालू देत, यासर्वांचे मूळ लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न होण्यामध्ये आहेत. त्याशिवाय आपले नेते आपल्याशी दूरान्वयेही संबंध नसलेल्या कारणांसाठी आपल्यात भांडणे लावण्यात पटाईत आहेत. स्वतःच्या अपयशापासून लोकांचे लक्ष हटविणे हाच त्यामागचा उद्देश आहे. या देशातील सामान्य माणूस अजूनही माणुसकी विसरलेला नाही कारण आपल्याकडे अजूनही आल्या-गेलेल्याला त्याची जात वा धर्म न विचारता पाणी देण्याची पद्धत आहे. म्हणूनच तुम्ही जेव्हा विकासाची साद घातलीत, तेव्हा सामान्य माणसाला त्यातील फरक व तुमच्या प्रचाराचे महत्व समजले व त्यांनी प्रचंड बहुमताने तुम्हाला प्रतिसाद दिला!! एकापरीने लोकशाहीवादी भारताच्या परिपक्वतेचे हे लक्षण आहे.

शहराचा किंवा देशाचा विकास म्हणजे केवळ जीडीपी, विमानतळे, आयटी पार्क्स किंवा मोठे मॉल्स नाही तर सामान्य माणसाला दैनंदिन जगण्याचा संघर्ष कमीत कमी किती करावा लागतो यातून ते दिसून येते. आम्हाला शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा हव्या आहेत व या सर्व सेवांसाठी पैसे मोजण्याची आमची तयारी आहे. या सुविध रास्त दरात प्रत्यक्षात उपलब्ध करुन देणे हे खरे आव्हान आहे. वर्षानुवर्षे आम्हाला सुजलाम् सुफलाम् भारताची सुंदर स्वप्ने दाखविण्यात आली आहेत व प्रत्यक्षात कोण सुजलाम् सुफलाम् होत आहे हे आम्ही पाहातच आहोत!”. मला खात्री आहे की तुम्हाला हे माहिती आहे किंवा हे सर्व समजले असेल पण, केवळ एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे तुमच्यापर्यंत पोचवायचे होते ! कृपया हा दृष्टिकोन व तुमचे विचार प्रत्येक ज्येष्ठ किंवा कनिष्ठ कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण यानंतर तुम्हाला त्याची गरज पडणार आहे. कारण जेव्हा राज्यातील शिपाई सुद्धा राजाचीच भाषा बोलतात व राजाप्रमाणेच त्यांची नैतिकता असते तेच राज्य यशस्वी झालेले आहे हा धडा आपण इतिहासातून शिकलो आहोत!

तुम्ही सध्या ज्या पदावर आहात, तिथे लाखो लोक तुमच्याकडून काहीना काही अपेक्षा करतील. मात्र माझी इच्छा आहे की अच्छे दिनच्या मोहिमेमध्ये मी माझे काय योगदान देऊ शकतो हे तुम्ही मला सांगावे, कारण या देशाच्या आशा निर्माण करणा-या योद्ध्यास ही सर्वोत्तम दिलेली दाद आणि साथ असेल!!

जय हिंद!!



संजय  देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


Sunday 18 May 2014

हर जंगल कुछ कहता है !














































मी जेव्हा प्राण्यांचा डोळ्यात पाहतो तेव्हा मला प्राणी दिसत नाहीत, मी एक सजीव, एक मित्र पाहतो व मला त्या डोळ्यात एक आत्मा जाणवतो... ए.डी.विल्यम्स.

कुणाही वन्यजीव प्रेमीचे या महान लेखकाच्या शब्दांविषयी दुमत नसेल! दरवेळी जंगल तेच असले तरी गोष्ट वेगळी असते, इतकी जबरदस्त ताकद जंगलांमध्ये आहे! या गोष्टींमुळेच मला जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा माझे पाय आपोआप जंगलाकडे खेचले जातात. आपल्या आयुष्यात संधी नेहमीच अवचित येतात केवळ आपण तो क्षण साधण्यासाठी सतत तयार असले पाहिजे! मलाही अलिकडेच काही वन्यप्रेमींसोबत पेंच व ताडोबाच्या जंगलांमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्यासोबत किर्लोस्कर उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा श्री. अतुल किर्लोस्कर, वन्यजीव तज्ञ किरण पुरंदरे, अनुज खरे, वन अधिकारी राजेंद्र कदम, देशातील सर्वोत्तम वन्यजीव छायाचित्रकारांपैकी एक विक्रम पोद्दार असे सर्वजण होते! किलोस्कर उद्योग समूह पर्यावरणाविषयक संवेदनशीलतेविषयी ओळखला जातो. पेंच जंगल व नेचर वॉक चालविणा-या अनुज यांनी या समूहाच्या व्यवस्थापकीय संचालकांसाठी मध्यप्रदेशातील पेंच येथील भेट आयोजित केली होती, ज्याद्वारे वनविभागाला काही मदत होऊ शकेल. कोणताही व्याघ्र प्रकल्प चालविणे महाकाय काम आहे. अनेकांना असे वाटते की ते प्राणिसंग्रहालय चालविण्यासारखे आहे मात्र ते अजिबात खरे नाही. व्याघ्र प्रकल्प हा जंगलाचा संरक्षित भाग असतो, मात्र या संरक्षणाला कोणत्याही प्रत्यक्ष सीमा नसतात, या सीमा केवळ कागदी नकाशांवरच असतात. प्राण्यांना कोणत्याही सीमा माहिती नसतात व मनुष्य-प्राण्यांमधला संघर्ष अभयारण्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.  आम्ही एकप्रकारे पेंच राष्ट्रीय अभयारण्याचे पाहुणे होतो व वनविभागाच्या विश्रामगृहात राहात होतो, तिथे मोबाईलचे नेटवर्क किंवा वृत्तपत्रे किंवा दूरचित्रवाहिन्या असा बाह्य जगाशी काहीएक संबंध नव्हता, तो जंगलाचा खराखुरा अनुभव होता! अभयारण्याचे क्षेत्र संचालक श्री आलोक कुमार यांनी आम्हाला अभयारण्याची प्रशासकीय बाजू दाखविण्यामध्ये अतिशय स्वारस्य दाखविले. यावेळी वनविभागाच्या चमूशी अतिशय चांगला संवाद झाला यामध्ये श्री. जोशी, अभयारण्याचे एसपी, श्री. तैवाडे, गेम रेंजर व श्री. तिवारी उप रेंजर यांचा समावेश होता. त्यांनी आम्हाला अभयारण्याचा विस्तार, त्यातील व आजूबाजूच्या परिसरातील वनस्पती व प्राणी, त्यांच्या समस्या व त्या सोडविण्यासाठी वनविभागाने केलेले प्रयत्न याविषयी सविस्तर सादरीकरण दिले! यातील मुख्य समस्या म्हणजे अभयारण्यातील हरिणांची संख्या जवळपास ५०,००० आहे जे वाघासारख्या प्राण्यांचे भक्ष्य असतात मात्र या हरिणांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गवतही लागते. त्यांच्यासाठी कुरणे तयार करणे हे एक मोठे काम आहे.

यावेळी आम्हाला एका वाघिणीला पेंचहून पन्ना अभयारण्यामध्ये हलविण्याविषयी अतिशय रोचक गोष्ट ऐकायला मिळाली. करमाझीरीर गावातल्या लोकांना त्या वाघिणीची अतिशय सवय झाली होती व ती गावासाठी सुलक्षणी ठरली होती, तिला पाहायला अनेक पर्यटक येत, त्यामुळे तिला पेंचमधून इतरत्र हलविण्यासाठी अतिशय विरोध झाला. तेव्हा श्री आलोक कुमार यांनी गावक-यांना विश्वासात घेतले व त्यांना सांगितले की, ये तो आपकी बेटी है और एक दिन घर छोडके जाना ही है, तो आप प्यार से उसे बिदा किजियेम्हणजेच ही तर तुमची मुलगी आहे, एक दिवस तिला घर सोडून नव-याच्या घरी जावेच लागते तर तिला प्रेमाने-आनंदाने निरोप द्या! ही युक्ती कामी आली! अशा गोष्टी केवळ जंगलातच घडू शकतात व यातून एक प्रकारे ma^नेजमेंटचे शिक्षणच मिळते !

आणखी एक महत्वाची समस्या म्हणजे पेंच नदीमध्ये अवैध मासेमारीचा धोका सतत असतो, ही नदी या अभयारण्याला मध्यप्रदेश व महाराष्ट्रात विभागते. एवढ्या मोठ्या अभयारण्यासाठी अवैध मासेमारी हा कसा धोका असू शकतो असा विचार करुन आम्ही आधी हसलो मात्र त्यातील अर्थकारण धक्कादायक आहे! जोशी यांनी समजून सांगितल्यावर आम्ही थक्क झालो; ते म्हणाले जवळ २०० नौका अवैध मासेमारी करतात, एक नाव दररोज साधारण दिवसाला १००० किग्रॅ मासे पकडते. या माशांमध्ये रोहू, काटला इत्यादींचा समावेश होतो. स्थानिक बाजारापेठेत हे मासे ४०-५० रुपये प्रति किलो दराने विकले जातात. त्यानंतर अनेक निर्यातदार हे मासे जवळपासच्या गावात व तिथून जबलपूर, सिवनी व नागपूर या शहरांना पाठवतात. तिथे हे मासे १५०-२०० रुपये प्रति किलो अशा दराने विकले जातात. म्हणजे २०० नौकांनी दररोज १००० किग्रॅ मासे पकडले तर एकूण उलाढाल दररोज २ कोटी रुपयांचा घरात जाते व वर्षाला ७०० कोटी रुपयांच्या घरात जाते! आता तुम्हाला समजेल की एवढी मोठी समस्या का आहे! अभयारण्याच्या आजूबाजूला राहणारे हजारो लोक, अनेक राजकारणी तसेच सरकारी अधिकारीही हा जाळ्यात सहभागी आहेत नाहीतर असे होणे शक्यच नाही. या लोकांशी लढण्याचे प्रचंड मोठे काम वनविभागासमोर आहे, या लोकांचे स्वतःचे खबरे असतात जे त्यांना धाडीविषयी आगाऊ सूचना देतात, त्यानंतर कोळी त्यांची नाव पाण्यात बुडवून ठेवतात व पोबारा करतात. त्यांना नाव कुठे बुडवून ठेवली आहे हे नेमके माहिती असते, दुस-या दिवशी ते परत येतात, नाव काढून पुन्हा मासेमारीला सुरुवात होते. मासेमारीमुळे नदीतील जैवविविधतेचे संतुलन ढासळते कारण दरवर्षी अभयारण्यामध्ये स्थलांतर करणा-या पक्ष्यांचे ते भक्ष्य आहे व मासेमारीमुळे हे जीवनचक्र बिघडते. तसेच जंगलातील शिकार बाहेर घेऊन जाण्यासाठी होणा-या हालचालीमुळे संपूर्ण वन्यजीवन विचलित होते. आम्ही वन संरक्षकांना स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याची व त्यांच्यासाठी स्कूबा डायव्हर्सच्या सूटची सोय करण्याची संकल्पना मांडली. यामुळे वनसंरक्षण कोळ्यांनी नौका कुठे बुडवून ठेवल्या आहेत हे शोधून त्य नष्ट करु शकतील. अशाप्रकारे बोटीच नष्ट केल्यामुळे अवैध मासेमारीचे चक्र संपुष्टात येऊ शकेल. जंगलामध्ये करता येतील अशा कितीतरी गोष्टी आहेत!!
आम्ही आजूबाजूच्या जंगलांना भेट दिली व मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष कमीत कमी व्हावा यासाठी वन विभाग करत असलेले प्रयत्न पाहिले. याचे कारण म्हणजे केवळ मजेसाठी एक दिवस येऊन वाघ पाहणे वेगळी गोष्ट आहे व वाघ मुक्तपणे फिरतो त्याठिकाणी दिवस-रात्र राहणे ही वेगळी गोष्ट आहे. विचार करा आपल्यापैकी किती जण किमान एका दिवसासाठी तरी असे करु शकतील व इथे आपण संपूर्ण आयुष्य अशा प्रकारे घालविणा-या व्यक्तिंविषयी बोलत आहोत! अभयारण्याच्या कर्मचा-यांकडे अभयारण्याच्या सीमेवर राहणा-या लोकांना प्राण्यांचे शत्रू नव्हे तर मित्र बनविण्याचे अतिशय मोठे काम आहे येथे जंगलाला कुंपणाची भिंत घालण्यासारखी कामे केली जातात ज्यामुळे हरिण व रान डुक्करांचे कळप आजुबाजुच्या शेतांमध्ये शिरुन पिकांचे नुकसान करु शकत नाहीत व गावक-यांना प्राण्यांचे मित्र बनवितात !
आम्ही जास्तीत जास्त जंगलातील जागांना भेट देण्याचा प्रयत्न केला. घनदाट जंगलांमधील वन संरक्षक राहतात त्या चौक्या व त्यांची जीवनशैली पाहिली. जंगल हे प्राण्यांसाठी व तसेच वनविभागाच्या जमूसाठी एक चांगले स्थान व्हावे यासाठी अभयारण्याचा चमू झटक आहे, त्यांच्या कामाचा भार कशाप्रकारे थोडाफार हलका करता येईल हाच यामागचा उद्देश होता!
या संपूर्ण कालावधीमध्ये आम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा आम्ही जंगलात फेरफटका मारत होतो, सफारीमध्ये ज्या गोष्टी पाहता येत नाहीत त्या मी पाहायचा प्रयत्न करत होतो कारण भरपूर वेळ होता, व हा फेरफटका केवळ व्याघ्र दर्शन करणा-या सफारींसारखा नव्हता! या भेटीतले काही अनुभव देत आहे...

एक धडा कोल्ह्याचा !
मध्यप्रदेशातील पेंचमध्ये उन्हाळ्यातील एका उष्ण दिवशी आम्ही एका कोल्ह्याला लाल रानकोंबडा मारताना पाहिले. पाठलाग व शिकार करताना थकल्यामुळे कोल्हा एका तलावाजवळ विश्रांती घेत होता. कोल्ह्याने त्याच्या डोक्यावर घिरट्या घालणा-या कावळ्यांपासून वाचण्यासाठी आपली शिकार तळ्याच्या पाण्यात ठेवली. आश्चर्य म्हणजे पाण्याच्या प्रवाहामुळे शिकार तळ्याच्या मध्यापर्यंत पोहोचली, बिचारा कोल्हा आता अडचणीच आला कारण तळे खोल होते व त्यात भरपूर चिखल होता. शिकार परत मिळविण्याच्या निश्चयाने त्याने तळ्याला चक्कर मारली व शिकारीसाठी आपला जीव धोक्यात घालायचा निर्णय घेतला व पाण्यात उडी मारली, भरपूर झटापटीनंतर त्याला शेवटी शिकार मिळाली व असा मूर्खपणा पुन्हा कधीही करायचा नाही अशी शपथ घेऊन त्याने तिथून पोबारा केला! इतक्या परिश्रमाने मिळालेली शिकार कधीच हातातून सोडायची नाही हा धडा तो नक्कीच शिकला असेल! आम्ही जवळपास अर्धा तास चाललेल्या या नाट्यमय घडामोडींची छायाचित्रे घेतली. अशा घटनांमुळे जंगल जिवंत होते व आम्ही परत जाताना पुन्हा येण्याचे आश्वासन देतो!
शानदार वन्यजीवन !

वन्य श्वान ही एक अतिशय चमत्कारिक प्रजाती आहे त्यांच्याविषयी फारसा अभ्यास झालेला नाही तसेच दस्तऐवजात नोंदही झालेली नाही! मात्र जंगलात सर्वजण त्यांना टरकतात, अगदी वाघही त्यांच्यापासून एक अंतर राखून असतो! काही वेळा तुम्ही त्यांना दिवसभर आळसावून पडून राहतात, डबक्यात खेळत असतात व दुस-या दिवशी ते गायब होतात व अनेक दिवस ते तुमच्या दृष्टिसही पडत नाहीत! आम्ही अतिशय सुदैवी होतो कारण आम्ही एक चितळ खाणा-या जवळपास ३० वन्य श्वानांचा कळप दिसला. त्यांना असे कळपात पाहणे चित्तछरारक असते, प्रत्येकजण शिकार खाण्यासाठी उत्सुक होता मात्र पहिला घास घेण्याचा ज्येष्ठ सदस्यांचा मान राखला जात होता! आपल्यासारख्या तथाकथित माणसांना यातून कितीतरी शिकण्यासारखे आहे!
मला प्रत्यक्ष पाहा!

वाघ/वाघिणीला पाहणे हे कोणत्याही वन्यजीव प्रेमीचे स्वप्न असते! मी पेंचनंतर ताडोबाला भेट दिली, तेथील प्रसिद्ध तेलियाचे चार बछडे आता लहान राहिलेले नाहीत; किंबहुना या भागातील त्या राजकन्या झाल्या आहेत. वाघ शोधण्यातील खरी मजा त्यांच्या पाउलखुण शोधण्यात आहे, कुणाही प्राण्याचा इशारा नाही, माग काढत त्या जंगलाच्या राणीपुढे उभे ठाकणे व तिला प्रत्यक्ष पाहणे यातील मजा काही औरच! तिची डौलदार चाल पाहणेही आनंददायक असते मात्र तुम्ही वन्यजीव निरीक्षणातील तुमचा अनुभव वापरुन तिच्या हालचालींचा योग्य अंदाज बांधणे हे त्यापेक्षाही आनंददायक असते!

आधुनिक कावळ्याची गोष्टच जणु !

मध्यप्रदेशातील पेंचमध्ये जुनावणी नावाचा लहानसा मातीचा बंधारा आहे. चारही बाजूने डोंगराने वेढलेल्या या ठिकाणी वाघ हमखास दिसतात, तिथे मी एका बगळ्याने बेडूक पकडलेला पाहिला; ही अतिशय सामान्य घटना होती मात्र त्यानंतर जे काही घडले ते अतिशय रोचक होते! बगळ्याने तो जिवंत बेडूक पाण्याच्या काठाशी नेला व त्याचा मागील पाय पाण्यात बुडविला व पुन्हा मान वर उललली, असे ५-६ वेळा झाले! त्यानंतर माझ्या लक्षात आले की बगळ्यासाठी तो बेडूक गिळण्यास अतिशय मोठा होता व त्याने चोच उघडली असती तर तो निसटला असता. म्हणून त्याने बेडकाचा मागील पाय पाण्याला टेकू दिला, म्हणजे बेडकाला असे वाटेल की त्याला सोडून देण्यात आले आहे व तो स्वतःला पुढे ढकलेल म्हणजेच प्रत्यक्षात तो बगळ्याच्या तोंडात जाईल!!! जंगलातल्या या अशाच क्षणांमुळे आपल्याला येथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते!! वा जंगलातील अशी घटना आपल्याला आयुष्य शिकवतात, जसे येथे पुढे जाणे म्हणजे प्रगती नव्हे हे मी शिकलो !

जंगल हा आश्चर्यांचा खजिना आहे!
ताडोबातील दुपारचा फेरफटका थोडासा कंटाळवाणा होता, उकडत होते, सूर्य ढगांपलिकडे असल्याने जंगल शांत होते व आम्हीही ढेपाळलेले होतो, मात्र अनेक वर्षांच्या अनुभवाने मी शिकलो आहे की जंगल तुम्हाला फार काळ असे ढेपाळलेले राहू देत नाही! माझा अंदाज खरा ठरला, माझी जिप्सी अग्निरेषा ओलांडत होती तेव्हा एक काळा कळप हळूहळू आमच्या दिशेने सरकत होता, तो मादी अस्वलांचा कळप होता!! जणू तो क्षण टिपण्यासाठीच सूर्य ढगातून बाहेर आला व एक लांबून व एक अगदी जवळून छायाचित्र घेता आले, हे मी अस्वलांचे आत्तापर्यंत सर्वात जवळून घेतलेले पहिले छायाचित्र होते, कारण त्यांच्या काळ्याभोर केसांमुळे तपशील टिपण्यासाठी कॅमेरा एकाठिकाणी केंद्रित करणे अतिशय अवघड असते! पुन्हा एकदा जंगलाच्या पेटा-यातून आणखी एक आश्चर्य समोर आले! अशावेळी लोक ज्याप्रकारे वागतात ते अतिशय दुःखदायक होते, अनेकदा प्राणी अग्निरेषेचा वापर रस्ता ओलांडण्यासाठी करतात व इथे बहुतेक जिप्सीचालक नेमक्या अग्निरेषेवरच वाहने थांबवत होते, त्यामुळे प्राण्यांना त्रास होत होता व मार्ग बदलावा लागत होता. वन विभागाने अशा ठिकाणी थांबू नका असे फलक लावणे आवश्यक आहे कारण अशा अग्निरेषांवर प्राण्यांना मोकळेपणाने रस्ता ओलांडता येतो!

जंगल सतत देते!

असे म्हणतात की जंगल तुम्हाला कधीही दुःखी राहू देत नाही! मी मलबार धनेश पक्षाच्या एका चांगल्या छायाचित्राच्या शोधात होतो. मध्यप्रदेशातील पेंचमध्ये भरारी घेणारा मोठा व सुंदर धनेश मी अनेकदा पाहिला मात्र या पक्षाचे एक चांगले छायाचित्र मला मिळू शकले नाही. मी जेव्हा अभयारण्यातील करमझिरी येथील विश्रामगृहात परत आलो व सुरक्षा रक्षकाशी बोलत होतो तेव्हा तो म्हणाला "सहाब यहां झरने के बाजू मे जो बरगद का पेड है वहा आके बैठता है दोपहरको" म्हणजे तुम्ही जो पक्षी शोधत आहात तो वडाच्या झाडावर दररोज दुपारी येऊन बसतो! मी झटपट माझे दुपारचे जेवण उरकले व वडाच्या झाडाकडे निघालो व खरोखरच तिथे धनेश पक्षी होता!! मला छायाचित्रे देण्यासाठीच तो जणू खुणावत होता व आरामात बसला होता:)
माझा जंगलावरील विश्वास पुन्हा एकदा बळकट झाला की ते आनंद शोधण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण आहे!!

जंगलातील सौंदर्य म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्षण एकदाच अनुभवता येतो, तो चुकल्यास क्षण हातातून निसटून जातो! त्यामुळे तुम्हाला अतिशय जागरुक असावे लागते व तुम्हाला त्यात स्वारस्य असले पाहिजे! जंगलांच्या भेटीतून आपल्याला हेच शिकायला मिळते की तुमच्या आजूबाजूला घडणा-या अगदी लहानशा गोष्टीकडेही लक्ष द्या. जंगलात अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा अनुभव तुम्ही केवळ एक व्यक्ती म्हणून घेऊ शकता व केवळ एकदाच घडणा-या गोष्टीचे छायाचित्र घेण्याची संधी मिळणे हा देखील असाच एख अनुभव आहे! हा अनुभव शब्दात व्यक्त करता येणार नाही; ज्या व्यक्तिने हा अनुभव घेतला आहेत केवळ त्यालाच ते समजू शकेल.
सर्वात शेवटी श्री. अतुल किर्लोस्करांविषयी थोडेसे, ज्यांना मी अतुलदा असे म्हणतो. त्यांना कदाचित लेखाचा हा भाग फारसा आवडणार नाही कारण ज्यांना स्वतः विषयी फारसे बोललेले आवडत नाही असे हे व्यक्तिमत्व आहे, मात्र माझ्या जंगलाच्या प्रत्येक सफारीतून मी काहीतरी शिकलो आहे व एका उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा असलेल्या व्यक्तिसोबत अशाप्रकारे जंगलाचा अनुभव घेणे म्हणजे दुग्धशर्करा योग होता. या प्रवासात धाब्यावरील कळकट कपातून चहा पिताना असो किंवा तळपत्या उन्हात जंगलातील पायपीट असो, त्यांनी आपले पद किंवा संपत्तीचा बडेजाव कधीही मिरवला नाही. अगदी लहानशी गोष्ट जाणून घेण्याविषयीही ते उत्सुक असत व कोणत्याही विषयावरील त्यांची प्रतिक्रिया अतिशय संयत असे! मला खात्री आहे की अतुलदांसारख्या पदावरील अधिकाधिक मंडळींनी जंगलास भेटी दिल्या, तिथल्या समस्या जाणून घेतल्या व मदत केली तर केवळ जंगलांसाठीच नाही तर वन्यजीव प्रेमींसाठीही ती सर्वोत्तम बाब असेल!

या अनुभवांसोबत मी मध्यप्रदेशातील पेंचचा निरोप घेतला, लवकरात लवकर परत येण्याचे आश्वासन देऊन!!

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स






Thursday 15 May 2014

साने सर नावाच्या महान व्यक्तिस सलाम !




















सल्लागार म्हणून माझी सर्वात मोठी ताकद म्हणजे अज्ञानी होणे व काही प्रश्न विचारणे ….पीटर ड्रकर

सल्लागार म्हणून या नावाची ओळख करुन देण्याची गरज नाही, आज आपण एका सल्लागारांविषयीच बोलणार आहोत पण जे एक स्ट्रक्चरल डिझायनिंग सल्लागार होते. वृत्तपत्रांमध्ये अलिकडेच एक लहानशी बातमी आली होती की श्री. वाय एस साने यांचे निधन, शहरातील अनेक सामान्य नागरिकांनी या बातमीकडे कदाचित दुर्लक्ष केले असेल! यशवंत शंकर साने, लोक त्यांना वाय एस साने म्हणून ओळखायचे तर माझ्या वयाचे अभियंते त्यांना केवळ साने सर म्हणून ओळखत! ७०च्या दशकात जेव्हा या शहरामध्ये रिअल इस्टेट क्षेत्र बाल्यावस्थेत होते तेव्हा हा माणूस कॉलेज ऑफ इंजिनिरिंग, पुणे येथे  नेटाने स्ट्रक्चरल डिझायनिंग विषय शिकवत होते व त्यानंतर एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे शहरातील रिअल इस्टेट उद्योगाच्या तांत्रिक बाजूविषयी फारशी माहिती नसलेल्या बांधकाम व्यवसायिकांसाठी रचनाशास्त्राविषयी सल्लासेवा सुरु केली. त्यानंतर
वाय एस साने अँड असोसिएट्सने कधीही मागे वळून पाहिले नाही, ८०च्या दशकात पुण्यातला  जवळपास ९०% प्रकल्पांच्या स्ट्रक्चरल डिझायनिंग सरांनी केले, एवढा त्यांचा दबदबा होता.

तोपर्यंत स्थापत्य अभियंता झालेल्या प्रत्येक मुलाचे मध्यपूर्वेत जाऊन नोकरी करणे व सरकारी सेवेत जाणे हेच स्वप्न असे, मात्र वाय एस साने अँड असोसिएट्सच्या स्थापनेनंतर रचनात्मक अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. स्थापत्य अभियंता म्हणून महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर वाय एस सानेमध्ये रुजू होणे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जायचे, असे सरांचे वलय होते. त्यावेळची रिअल इस्टेट क्षेत्रातील परिस्थिती विचारात घेता, सरांच्या कामगिरीचा हा अतिशय महत्वाचा पैलू आहे. सर्वसाधारणपणे चांगला शिक्षणतज्ञ क्वचित चांगला व्यवसायिक किंवा सल्लागार म्हणून यशस्वी होऊ शकतो अशी एक धारणा आहे; कारण शिक्षणतज्ञ म्हणून तुमचा भर थेअरिवर असतो जे सल्लागार म्हणून तुमच्या दूरदृष्टीस मारक ठरते! मात्र सरांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रभुत्वाचा वापर स्वतःला सल्लागार म्हणून प्रस्थापित करण्यासाठी अतिशय नेमकेपणाने केला. ते केवळ सिद्धांताचेच जाणकार नव्हते तर चांगली इमारत बांधण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा आहे हे त्यांना माहिती होते.

महान सल्लागार ड्रकर यांनी म्हटल्याप्रमाणे सल्लागाराचे यश तो त्याच्या ग्राहकास आर्थिक बाबतीत तसेच कामाच्या दर्जाच्या बाबतीत कशाप्रकारे आनंदी व समाधानी ठेवतो यावर अवलंबून असते! साने सरांनी जणु ड्रकरचे तत्व अंगी बाणवले होते, आधि सांगितल्या प्रमाणे तेव्हाचा रिअल इस्टेट उद्योग बाल्यावस्थेत होता त्यामुळे तांत्रिक सल्लागारच महत्व बांधकाम व्यवसायिकांना पटवून देणे हे एक मोठे काम होते. हे काम अजिबात सोपे नव्हते कारण तेव्हा रिअल इस्टेट उद्योगातील लोकांनी ज्ञानाचा किंवा ज्ञानी माणसाचे आदर करणे तर दूरच पण अगदी प्राथमिक सल्लागार/वास्तुविशारद यासारख्या व्यवसायिकांचाही आदर केला जायचा नाही, अशा काळात त्यांना स्ट्रक्चरल डिझायनिंग सारख्या विषयाचे महत्व पटवून देणे प्रचंड मोठे काम होते !
साने सर केवळ तांत्रिक सल्लागारच झाले नाहीत तर अनेक मोठ्या रिअल इस्टेट उद्योगसमूहांचे कौटुंबिक सल्लागार झाले व या उद्योग समूहांच्या अनेक पिढ्यांना बांधकाम विषयक सल्ला देत राहिले. मला आठवते आहे की ते प्रत्येक कामावर जातीने लक्ष ठेवत, स्लॅब तपासण्यासाठी बांधकामाच्या ठिकाण जात, इमारतीचा सर्वात वरचा मजला असलेल्या लिफ्ट रुमच्या वरच्या स्लॅबपर्यंत स्वतः जात !

साने सरांची आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या ग्राहकाने केलेल्या कोणत्याही मागणीसाठी मग ती कितीही विचित्र मागणी असली तरी ते कधीच नाही म्हणत नसत.
केवळ ग्राहकांना खूश करण्यासाठी नाही तर त्यांच्या मागण्या ते रचनेच्या सुरक्षा पैलूस हात न लावता, रचनाशास्त्रातील एक आव्हान म्हणून स्वीकारत. मी वास्तुविशारदांशी नियोजनाविषयी अनेकदा चर्चा करताना, आपण आपल्या गरजेप्रमाणे रचना करु, रचनाशास्त्रानुसार प्रत्यक्षात कसे उतरवायचे ते सर बघून घेतील अशा विधानांनी आमच्या चर्चेची सांगता होत असे ! अलिकडच्य काळात मी एका सिमेंट कंपनीची जाहिरात पाहिली त्यामध्ये लोक एका उंच इमारतीत शांतपणे झोपल्याचे दाखवले जाते व पार्श्वनिवेदन सुरु असते कीलाखो लोग चैन की निंद लेते है हमारी सुरक्षा कवच में व त्यानंतर सिमेंटचे नाव झळकते ! म्हणजेच त्या इमारतींच्या बांधकामात ते विशिष्ट सिमेंट वापरल्यामुळे अनेक लोक शांतपणे झोपू शकतात ! ही अतिशय प्रभावी जाहीरात आहे, अनेक बांधकाम व्यवसायिकांनीही याचप्रमाणे साने सरांच्या हातात इमारतीची रचनात्मक आखणी सोपवून हाच अनुभव घेतल्याचे मी पाहिले आहेसाने सरांनी रचलेल्या व देखरेख केलेल्या सदनिकांमध्ये राहणा-या लाखो लोकांसाठीही हे तितकेच खरे आहे.

मला असे वाटते की साने सरांची अनेक ग्राहक असलेला सर्वात यशस्वी रचनाशास्त्रविषयक सल्लागार होणे ही सर्वात मोठी कामगिरी नाही, तर त्यांनी इमारतीशी संबंधित प्रत्येक व्यक्तिच्या मनात विश्वास, सहजता निर्माण केली ती सर्वात महत्वाची आहे. मग स्वतः बांधकाम व्यवसायिक असो, वास्तुविशारद, बांधकामावरील अभियंता किंवा फिटर जो बांधकामाच्या साखळीतील सर्वात शेवटचा घटक असतो, जो मजबूत करण्याचे काम करतो! बांधकामाच्या ठिकाणी काहीही समस्या आली तरी साने सर आहेत असा विश्वास प्रत्येकाला वाटत असे व सर्वजण आरामात असत !
दुसरा एक महत्वाचा पैलू म्हणजे उपलब्धता, व्यवसायिकदृष्ट्या यशस्वी सल्लागाराच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात त्याच्यापर्यंत पोहोचणे ही कोणत्याही व्यवसायिकासाठी डोकेदुखी असते. मात्र जेव्हा सेलफोन नव्हते त्या काळामध्येही सानेसरांच्या सर्व ग्राहकांना माहिती असायचे की सायंकाळी चार वाजता साने सर त्यांच्या कार्यालयात हजर आहेत व भेटीसाठी कोणतीही वेळ न घेता बांधकामाशी संबंधित कोणतीही समस्या घेऊन त्यांच्याकडे कुणीही जाऊ शके !

ते सल्लागार म्हणून एक आदर्श व्यक्ती होतेच मात्र एक चांगला माणूसही होते. नेमके हेच आजकालचे तथाकथिक यशस्वी लोक विसरत आहेत. साने सर मोठी कॉर्पोरेट रिअल इस्टेट फर्म असो किंवा एका इमारतीपुरता लहान उभरता बांधकाम व्यवसायिक असो ते दोघांनाही त्याच प्रेमाने व प्रामाणिकपणे सेवा देत असत; आजकालचे जग पाहता असा दृष्टिकोन अतिशय दुर्मिळ आहे.
ते कधीही अगदी लहानशाही कामाला नकार देत नसत किंवा बांधकामावरील अभियंत्याची बांधकामाच्या ठिकाणी भेट देण्याची व रचनात्मक समस्येविषयी त्याला मार्गदर्शन करण्याची विनंती कधीही फेटाळत नसत. त्यांचे मार्गदर्शन स्लॅब व खांबांपुरतेच मर्यादित नसे, बांधकामाशी संबंधित कोणतीही समस्या असो मग ती वॉटर प्रूफिंगसंदर्भातील असली तरीही ते त्यावर विचार करण्यास उत्सुक असत!


केवळ बांधकाम व्यवसायिकच त्यांचे ग्राहक नव्हते तर रचनात्मक लेखा व सुरक्षा याविषयावरील अनेक सरकारी संघटनांच्या सल्लागार मंडळावर होते व शहराच्या अनेक सामाजिक समस्यांवर योगदान देत होते. एक सल्लागार व माणूस म्हणून ते परिपूर्ण होते व तेच त्यांचे सर्वात मोठे यश होते असे मला वाटते! पुणे आज महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते व शहराला ही ओळख मिळवून देणा-या आधारास्तंभांपैकी एक साने सर होते व त्यांनी तयार केलेल्या मार्गावर चालून आपण त्यांना सर्वोत्तम आदरांजली देऊ शकतो. दूर्दवाने रिअल इस्टेट क्षेत्र कधीही प्रामाणिकपणा व सचोठीसाठी ओळखले जात नव्हते व जात नाही मात्र आपण साने सरांसारख्या व्यक्तिस आपला आदर्श मानले तरच या उद्योगासाठी काही आशा आहे असेच मी म्हणेन. मला त्यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य मिळाले व मी जे काही पाहिले त्या आधारेच मी हे लिहीत आहे व हीच माझी त्यांना श्रद्धांजली आहे! त्यांनी एका लहानशा सल्लागार संस्थेला एका कॉर्पोरेट (स्ट्रक्चरल डिझायनिंग) समूहात रुपांतरित केले व त्यांचे वारस हे ही जबाबदारी समर्थपणे संभाळत आहेत. मात्र यापुढे पुण्यातील रिअल इस्टेट उद्योग साने सरांच्या पितृतुल्य सल्ल्यास मुकेल हे निश्चित

सरते शेवटी सांगावेसे वाटते कि तुम्ही किती प्रकल्प पूर्ण केले आहेत किंवा तुम्ही किती पैसे कमावले यावरुन तुम्ही किती महान आहात हे ठरत नाही, तर तुम्ही गेल्यानंतर लोक तुम्हाला कसे लक्षात ठेवतात यावरुन तुम्ही किती महान आहात हे ठरते व या निकषानुसार साने सरांचे स्थान त्यांनी रचना केलेल्या व निरीक्षण केलेल्या गगनचुंबी इमारतींपेक्षाही फार उंच आहे !

संजय देशपांडे



संजीवनी डेव्हलपर्स