Saturday 15 December 2012

वाढणं (Growing up)



 
 
 
 

वाढणं हे कधीच सोपं नसतं. तुम्ही जुन्या गोष्टींना धरुन ठेवता. पुढे काय येणार आहे याचं तुम्हाला कुतुहल असतं. पण मला वाटतं, एखाद्या रात्री, आपल्याला जाणीव होते की जे जुनं आहे ते सोडून द्यायला हवं व जे समोर येणार आहे त्याकडे पाहिलं पाहिजे. इतर दिवस. नवे दिवस. येणारे दिवस. यातली महत्वाची बाब म्हणजे मोठं होण्यासाठी आपण एकमेकांचा द्वेष करायची गरज नसते. मोठं होण्यासाठी आपण केवळ स्वतःला माफ केलं पाहिजे.”...दलाई लामा.

उद्या मी चाळीशी ओलांडेन व आज मागे वळून पाहताना मला जाणवतं की ४ वर्षांहून अधिक काळ मी ब्लॉग लिहीतो आहे, सुरुवातीला ब-याच कालांतराने लिहायचो मात्र नंतर त्यात सातत्य आलं, अगदी मी वाढलो त्याप्रमाणे. मी मागे वळून स्वतःला विचारलं, मी खरंच वाढत आहे का? केवळ सरत्या वयांचा विचार केला तर काळ कधीच खोटं बोलत नाही, त्यामुळे माझं वय वाढतंच आहे, मात्र ते झालं वय होणं, वाढण्याचं काय? तुम्हाला एका व्हिस्कीची जाहिरात आठवतेय का ज्यामध्ये सैफ अली खान, गौतम गंभीर यासारख्या प्रसिद्ध व्यक्ती आपापल्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करताना दाखवल्या आहेत व नंतर त्या स्वतःला प्रश्न विचारतात, हॅव आय मेड इट लार्ज?” (म्हणजे मी खरोखरच काही उत्तुंग करुन दाखवलं आहे का?)
खामगावसारख्या लहानशा गावातून ४४ वर्षांपूर्वी सुरु झालेला माझा प्रवास आज पुण्यासारख्या असंख्य घडामोडी होणा-या शहरात अतिशय स्थिरपणे सुरु आहे. मला आजही १९८६ साली पुणेकर झाल्यानंतरची माझी पहिली भेट आठवतेय, ती एक पावसाळ्यातली सकाळ होती, व पुणे स्थानकाहून कोथरुडपर्यंतचा प्रवास करायचा होता जिथे माझं वसतीगृह होतं. आज मला विश्वास बसत नाही की तो प्रवास मी टांग्यानं केला होता!  तेव्हा मी डोळ्यात उद्याची स्वप्न घेऊन आलेला एक १६ वर्षांचा मुलगा होतो, त्याकाळी खामगावातून पुण्यात येणं हा मोठा बदल होता! आता खामगावातले लोक तुम्हाला जगभरात स्थलांतरित झालेले दिसतील, मात्र २८ वर्षांपूर्वी गावापासून ५०० किलोमीटर लांब राहाणं हे देखील विदेशी जाण्यासारखं होतं. राज्याच्या त्या भागातून आलेल्या लोकांसाठी पुणं सांस्कृतिकदृष्ट्या आजही विदेशासारखंच वाटतं. माझ्या गावात आजही चित्रपटगृहांमध्ये महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे विभाग आहेत, अशा काही गोष्टींची आपण पुण्यात कल्पनाही करु शकत नाही. त्यागावात आजही सायकल रिक्षा आहेत, जे आपल्याला अतिशय अमानवी वाटतं कारण तापमान ४८ अंश सेल्सिअलपर्यंत पोहोचलेलं असताना तो बिचारा रिक्षा ओढत असतो!

मी ८६ साली पुण्यात आलो तेव्हा माझ्याकडे एक लुना होती, माझ्या गावात त्याकाळी लुना म्हणजे चैनीची बाब होती. इथे आल्यानंतर आजूबाजूची वाहनं पाहिल्यावर माझी लुना चेष्टेचा विषय झाली आहे हे मला जाणवायचं, कारण तेव्हाच्या सायकलींची स्थितीही माझ्या लुनापेक्षा चांगली होती. या प्रवासाचा विचार केला तर मी लांबचा पल्ला गाठला आहे असं माझ्या आजूबाजूचे लोक म्हणतील कारण आता मी चांगल्या गाडीतून फिरतो, दिमतीला चोवीस तास चालक असतो, त्यात एसी असल्यामुळे बाहेरच्या तापमानाची चिंता करावी लागत नाही, पण यालाच वाढणं म्हणतात का, असा प्रश्न मी स्वतःला विचारतो.

मी ज्या भागातून आलो आहे तिथे पुण्यासारखी शुद्ध मराठीही बोलली जात नाही व इथे तर इंग्रजी मातृभाषेसारखी बोलली जाते! मला आठवतं की कॉलेजमध्ये एका पुणेरी मुलीनं आम्हाला तिचा वर्ग कुठे आहे हे इंग्रजीत विचारलं, आम्ही कुणीच तिला व्यवस्थित सांगू शकलो नाही. फक्त कसंनुसं हसलो व दुसरीकडे बघायला लागलो! आमचं भाषाकौशल्य अशा प्रकारचं होतं! आता मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातो पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही इंग्रजीतून काही तास व्याख्यान देतो, स्वतःचा ब्लॉग लिहीतो, पुन्हा माझ्या मनात तोच प्रश्न येतो, याचा अर्थ माझी खरंच वाढ झाली आहे असा होतो का?

मी इथे आलो तेव्हा मला माझ्यातल्या त्रुटी, माझी पार्श्वभूमी यांची लाज वाटायची. पहिली दोन-तीन वर्षं केवळ ग्रामीण भागातून आलेल्या, माझ्यासारखी पार्श्वभूमी असलेल्या मुलांपुरतंच मित्रमंडळ मर्यादित होतं. कुठेही गेलो तरी मोकळ्या जंगलातल्या सशांसारखे एकमेकांना चिकटून असायचो व वसतिगृहाच्या आवारातच सुरक्षित वाटायचं. वसतिगृह ते खानावळ एवढाच काय तो रोजचा प्रवास, एखादेवेळी चित्रपट पाहायला किंवा डेक्कन अथवा लक्ष्मीरोडवर भटकंती करायला जायचो. मला आठवतंय एकदा आम्ही मुसळधार पावसात पीएमटीनं सिंहगडला गेलो, गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका शाळेत झोपलो. रात्रभर पाऊस व थंडीमुळे कुणीही झोपू शकलं नाही, त्यामुळे भल्यापहाटेच चढाईला सुरुवात केली. माझ्या नकली आदिदासचे शूज चढताना फाटले व पुढचे सहा महिने मी डेक्कनच्या दुकानांमध्ये केवळ बाहेरुनच शूज पाहात होतो. तेव्हा पैसे अगदीच कमी मिळायचे असं नव्हतं पण असे शूज घेण्याची चैन वारंवार केली जायची नाही. आता माझ्याकडे जॉगिंगसाठी वेगळे, बॅडमिंटनसाठी वेगळे, भटकंतीसाठी वेगळे, कामावर जाण्यासाठी वेगळे व अनौपचारिकपणे घालण्यासाठी वेगळे शूज आहेत! आता माझं मित्र मंडळ प्रचंड विस्तारलं आहे, समाजल्या सर्व वर्गात माझी मित्र मंडळी आहेत. आता मला जगातल्या कुठल्याही भागात फिरायची भीती वाटत नाही, त्या शाळेसारख्या एखाद्या ठिकाणी थांबावं लागत नाही, कुठल्याही हॉटेलात राहू शकतो! पण पुन्हा तोच प्रश्न पडतो, याचा अर्थ असा होतो का मी वाढलो आहे?

शाळकरी वयातला विरंगुळा म्हणजे चित्रपट पाहणं, पुस्तकं वाचणं व बॅडमिंटन खेळणं. चित्रपट गृहात जायचं ते बहुतेक वेळा पीएमटी बसच्या गर्दीत उभं राहून व अनेकदा परत येताना चालत यावं लागायचं कारण तिकीटात सगळे पैसे संपलेले असायचे. अशा वेळी एका कटींग चहा व वडापाव हे आमचं रात्रीचं जेवण असायचं कारण चित्रपट संपेपर्यंत खानावळही बंद झालेली असायची. कुणाकडून तरी मागून किंवा आसपासच्या स्वस्त मराठी वाचनालयातून पुस्तकं आणून वाचली जायची. बॅडमिंटन खेळणं त्याकाळी कल्पनातीत होतं कारण कोर्टचं भाडं, शटलची किंमत वगैरे सगळी खार्चिक बाब होती. मात्र माझ्या मर्यादांची जाणीव असूनही खेळू देणारे मित्र शोधायचो व त्यांच्यासोबत खेळायचो! आज माझ्याकडे स्वतःचं वाचनालय आहे, मल्टीप्लेक्समध्ये जेवण व चित्रपट पाहता येतो, ज्याचा खर्च एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या एका दिवसाच्या पगाराएवढा असेल, शहरातल्या सर्वात चांगल्या बॅडमिंटन कोर्टमध्ये खेळू शकतो! मग वाढ म्हणजे हेच का?

शाळकरी वयात पैसे कमी होते, मित्रमंडळ मर्यादित होतं, एक परिक्षा सोडली तर फारसा कसलाही ताण नसायचा, मात्र त्यात देखील एक मजा होती, बाकी कुठल्याही चिंता नव्हत्या व चिंता करायला वेळही नव्हता. आज आता माझ्याकडे सगळं काही आहे पण त्याच सोबत अनेक चिंता आहेत व त्यांच्याविषयी विचार करायला वेळही आहे. एखाद्या जमीनीचा व्यवहार पूर्ण होईल का, जमीनीच्या मालकी हक्काबाबत काही अडचण तर येणार नाही ना इथपासून ते इगदी माझा तरुण मुलगा कॉलेजमधून सुरक्षित घरी येईल ना इथपर्यंत अनेक चिंता मनात घर करुन असतात. व या चिंतांचा डोक्यावरील ताण जाणवत असतो. मी स्पायडर मॅनमधलं एक वाक्य नेहमी देतो ते मला सारखं आठवतं "मोठ्या ताकदीसोबत मोठी जबाबदारीही येते "; त्याचप्रमाणेमोठं होण्यासोबत मोठ्या चिंताही येतात? त्यानंतर पुन्हा तोच प्रश्न पडतो, मी खरेखरच वाढलो आहे का व असल्यास त्याचं काय कारण आहे?

मला असं वाटतं की आपण प्रत्येकानं स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा तरंच आपल्याला वाढण्याचा अर्थ समजेल, प्रत्येकासाठी त्याची व्याख्या वेगळी असू शकेल. आपण वाढण्याची काय व कशी व्याख्या करतो यामध्येच त्याचे उत्तर येतं? आपल्या आजूबाजूच्या किती गोष्टी बदलत असतात व आपणही त्यासोबत बदलत असतो. मात्र या प्रक्रियेमध्ये आपलं मूळ स्वरुप बदलू न देणं व जगण्यातला आनंद न गमावणं, हेच माझ्या मते वाढणं आहे. वयानुसार आपल्याला अनेक अनुभव येतात मात्र त्या प्रक्रियेत आपण काय मिळवलं व काय गमावलं हा आयुष्याचा ताळेबंद असतो. त्यातून जो निष्कर्ष निघतो त्याद्वारे तुम्ही खरोखर वाढलात की नुसतं वय वाढलं हे ठरत असतं! मला नेमकं माहिती नाही की मी वाढलो आहे किंवा नाही पण मी किमान त्या दिशेनं विचार करायला सुरुवात तरी केली आहे व कदाचित वाढण्याची तीच सुरुवात असेल. आता मी जगाकडे अधिक स्पष्टपणे पाहू शकतो; आजूबाजूची वेदना अधिक तीव्रतेनं जाणवते व इतरांच्या समस्यांविषयीची माझी जबाबदारी अधिक प्रकर्षानं जाणवते. माझ्या आजूबाजूला घडणा-या अगदी लहानात लहान गोष्टीतून आनंद कसा मिळवायचा हे आता मला समजू लागलं आहे; व त्यासाठी बहुतेक वेळा मला माझा अहंकार बाजूला ठेवणं आवश्यक आहे. माझी हाव कोणती व माझ्या नेमक्या गरजा कोणत्या हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे, त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे माझी कर्तव्यं, भावना व त्यानुसार वागणं असा विचार मी करायला लागलो आहे. नुसतं वय वाढणं व वाढणं यामध्ये फरक आहे हे समजू लागलं आहे. माझ्यातला तो मुलगा स्वप्नात किंवा जागेपणीही माझ्याकडे पाहात राहतो. पण आता मला त्याची आठवण येत नाही कारण मला माहिती आहे की काही दिवस तो माझ्यापासून दूर गेला होता मात्र तो पूर्णपणे हरवलेला नाही!

मला आनंद वाटतो की या प्रक्रियेमध्ये तुम्हीही अजून माझ्यासोबत आहात. माझ्या भावना मी तुमच्याजवळ व्यक्त करु शकतो, कुणी त्याला वेडेपणा म्हणेल, कुणी शहाणपण म्हणेल किंवा कुणी त्याला मनाचा बालिशपणा म्हणेल, पण काहीही असलं तरी ती वाढण्याची पहिली पायरी आहे. आपण वाढत आहोत आणि वाढण्यातल्या त्या आनंदात सहभागी होण्यासाठी कुणीतरी सोबत असेल तर त्यात खरोखर एक मौज आहे ! येवढंच काय ते सांगायचंय!
मित्रांनो, ही मौज मला तुमच्यामुळे अनुभवता आली त्यासाठी मी आपला अतिशय आभारी आहे!

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे
संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx
हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा