Thursday 28 December 2023

शहरातील हरित-पट्टे, नद्या व शाश्वत विकास !













शहरातील हरित-पट्टे, नद्या व शाश्वत विकास !


व्यवसाय व सरकारी धोरणे यामध्ये फरक ठेवणे किती महत्त्वाचे आहे याची मला जाणीव झाली आहे. जर व्यावसायिकांनी धोरणे तयार करायला सुरुवात केली, तर आपल्याला राजकारण्यांना व्यवसाय करण्यासाठी आमंत्रित करावे लागले. परंतु त्याऐवजी राजकारण्यांना संतुलित निर्णय घेता यावेत याकरता योग्य माहिती देऊन सक्षम केले तर, आपण आपल्या सहकार्याचे चांगले परिणाम दिसून यावेत याकरता अधिक जोरकसपणे आपली बाजू मांडणारे प्रतिनिधी तयार करू शकतो ! … ल्युसी जोन्स.

   ल्युसीली एम. जोन्स या कॅलिफोर्नियातील भूकंप वैज्ञानिक व भूकंप विज्ञान व भूकंपातील सुरक्षितता या विषयावरील सार्वजनिक वक्त्या आहेत व अनेक रिअल इस्टेट संस्था व पायाभूत सुविधा उभारणाऱ्या प्रकल्पांना व्यावसायिक विकासासाठी भूकंपाच्या पैलूविषयी सल्ला देतात. त्यामुळेच त्या व्यवसाय व राजकारण व धोरणे तयार करण्यातील त्यांची संबंधित भूमिका यामध्ये इतक्या स्पष्टपणे फरक करू शकतात यात काहीच आश्चर्य नाही. ज्याप्रकारे त्या व्यवसाय, राजकारण व त्यांची धोरण निर्मितीमधील भूमिका यामध्ये स्पष्टपणे फरक करू शकतात, खरोखरच आपल्याकडे, विशेषतः पुण्यामध्ये कुणीतरी अशी ल्युसी जोन्स असायला हवी होती, म्हणजे आपले आयुष्य बरेच सोपे झाले असते (अर्थात आपण असे सल्ले ऐकले असते तर ). कृपया कंसातील उपरोधिक टिप्पणीकडे दुर्लक्ष करा, जो माझा अविभाज्य भाग आहे, याचे कारण म्हणजे शहराविषयीची विविध धोरणे व त्यामुळे शहरामध्ये झालेला गोंधळ. जेव्हा नगर नियोजन, जमीनीचा वापर, पर्यावरण किंवा व्यवसाय हा विषय असतो तेव्हा हे अधिक होते. ल्युसी यांचे वरील अवतरण (व उपरोध) वापरण्याचे कारण म्हणजे अलिकडेच नदी किनाऱ्यावरील हरित पट्ट्यांमधील तथाकथित अवैध बांधकाम (आपण जमीनीच्या त्या भागाला अजूनही नदी म्हणू शकतो का, हा वेगळा विषय आहे पुन्हा उपरोध) व संपूर्ण पुणे मधुन वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या निळी-रेषा व लाल-रेषेवरून अलिकडे झालेला वाद (म्हणजे गोंधळ).आता बरेच पुणेकर मला विचारतील की त्या आता नद्या राहिल्या आहेत का किंवा कोणत्या व्याख्येनुसार आपण त्यांना नद्या म्हणू शकतो. परंतु दुर्दैवाने अजूनही असे काही पुणेकर आहेत जे त्यांना नद्या मानतात व त्यांच्या संरक्षणासाठी लढतात, म्हणजे मला म्हणायचे आहे की त्या नद्यांचे जे काही शिल्लक राहिले आहे त्यासाठी. त्याहूनही अधिक असे पुणेकरही आहे ज्यांना नद्या, निळी रेषा, लाल रेषा, हरित पट्टा याविषयी काहीही समजत नाही, तरीही त्यांचे या सगळ्याबद्दल मत असते (म्हणूनच तुम्ही पुणेकर आहात) व अडचण म्हणजे बहुतेक वेळा माध्यमे व अगदी मायबाप सरकारचाही पुणेकरांच्या या वर्गवारीमध्ये समावेश होतो, हे माझ्या नैराश्याचे मुख्य कारण आहे व म्हणूनच मी हा लेख लिहीत आहे.

      एवढी प्रस्तावना पुरेशी असेल तर आता मी तुम्हाला सांगतो की हरित पट्टा म्हणजे नदी काठचा जमीनीचा असा भाग, इथे आपण ज्या नदीविषयी बोलतोय त्या मुठा नदीच्या पात्राला तो समांतर आहे. डीपी म्हणजेच शहराच्या विकास योजनेचा वापर नदीभोवतालची किंवा नदीतील जैवविविधता राखण्यासाठी करणे अपेक्षित आहे. आधी मी ही संकल्पना स्पष्ट करून सांगतो, वर्षानुवर्षे जेव्हा या नद्यांमध्ये शुद्ध पाणी वाहात असे, जमीन फारशी महाग नव्हती किंवा तिला आजच्यासारखी मागणी नव्हती तेव्हा नदीपात्राच्या अवतभोवती झाडा-झुडुपांच्या स्वरूपात भरपूर जैवविविधता होती, ज्यामध्ये अनेक प्रकारची झाडे, झुडुपे, गवत यांचा समावेश होता. ही जैवविविधता अनेक पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्यासाठी आशा होती व ती एकप्रकारे नदीच्या पाण्यातील जीवनासाठी वरदान होती, यामुळे जमीनीचा हा संपूर्ण भाग तसेच नदीचे पाणी असे एक संपूर्ण जीवन चक्र होते. हे जीवन चक्र सुरक्षित ठेवण्यासाठी काही खऱ्या शहाण्या लोकांनी (म्हणजे नगर नियोजनकर्त्यांनी) असा विचार केला की त्यांनी अशा जमीनी हरित पट्टे म्हणून घोषित केल्या, जेथे कोणत्याही प्रकारच्या विकासाला परवानगी दिली जाणार नाही, अगदी शेतीलाही परवानगी दिली जाणार नाही, तर अशी जैवविविधता सुरक्षित राहील. परंतु त्यांनी आपली हाव व लोकसंख्येचा व तिच्या गरजांचा विचार केला नाही, ज्या पुण्यामध्ये व त्या भोवतालच्या शहरांमध्ये जी नागरी विकासाची केंद्रे आहेत तेथील जमीनीच्या प्रत्येक तुकड्यावर वाढत चालल्या आहेतहरित पट्टे सोडाच आपण वाढत्या लोकसंख्येमुळे नद्याही अरुंद केल्या आहेत व त्यांचा गळा घोटला आहे. परंतु हरित पट्ट्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जमीनींसाठी तयार करण्यात आलेली धोरणे तशीच आहेत, त्यामुळे ज्या कारणाने ते ना-विकास विभाग म्हणून घोषित करण्यात आले तो हेतूच साध्य होत नाही.

      पुण्यातील व भोवतालच्या टेकड्यांचेही असेच झाले जेथे घनदाट हिरव्या झाडांऐवजी झोपडपट्ट्यांचीच गर्दी झाली आहे. परंतु सुदैवाने जो हरित पट्टा चर्चेमध्ये आहे तो पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये राजाराम पुलापासून ते म्हात्रे पुलाला जोडणारा आहे, तसेच ही जमीन खाजगी मालकीची असल्यामुळे तो पट्टा टिकून राहिला. त्यांनी या पट्ट्याचा वापर लग्न, सार्वजनिक सोहळे, कार पार्किंग, छोटी उपहारगृहे यासाठी करण्याचा विचार केला. विनोद म्हणजे स्थानिक प्रशासकीय संस्था हरित पट्ट्यासाठीची धोरणे त्यांच्या सोयीनुसार बदलत राहिली, ही धोरणे किती व्यवहार्य आहेत याचा विचार केला नाही. सर्वप्रथम हरित पट्ट्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकासाला परवानगी नव्हती, ज्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर क्षेत्रामध्ये असते त्याचप्रमाणे हा भाग आहे तसाच ठेवायचे असे ठरविण्यात आले. त्यानंतर १ एकरहून अधिक म्हणजे जवळपास 40,000 चौरस फुटांचे भूखंड पाडण्यात आले, ज्यावर उपाहारगृहे, व्यायामशाळा इत्यादींसाठी साधारण 4% इमारती उभारण्याची परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणे जनावरांचे गोठे किंवा शेळी पालनासाठी (पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात, हाहाहा) परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणे 40,000 चौरस फुटांपेक्षा कमी जागा असलेल्या भूखंडांवर काहीही करण्याची परवानगी देण्यात आली नाही, आता याचे कारण काय हे देवालाच माहिती. नंतर 2017 च्या सुधारित विकास योजनेअंतर्गत, जमीनीच्या क्षेत्रामध्ये साधारण १०% बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली, ज्याचा वापर, उपाहारगृहे, जलतरण तलाव, मनोरंजनाचे उपक्रम इत्यादींसाठी करण्यास परवानगी देण्यात आली. इथेही १०% का यासाठी काहीही तर्कशुद्ध कारण नव्हते, कदाचित मोठ्या भूखंडांच्या योजनेच्या आराखड्यामध्ये खुल्या जागांवर १०% बांधकामाला परवानगी असते असा विचार करण्यात आला. परंतु ते निवासी भूखंडांच्या आराखड्याच्या बाबतीत होते ज्यांची मालकी एका व्यक्तीकडे किंवा व्यक्ती समूहाकडे होती, तर हरीत पट्ट्यातील भूखंड पूर्णपणे वैयक्तिक मालकीचे आहेत हे नियोजनकर्ते पूर्णपणे विसरले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा तथाकथित एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीपीसीआर, म्हणजेच काही विशेष शहरी भाग भाग वगळता, संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी इमारतींच्या बांधकामाचे समान नियम) तयार करण्यात आली तेव्हा हरित पट्ट्यातील जमीन मालकांना सर्वात मोठा फटका बसला. त्यानंतर नियोजनकर्त्यांनी पर्यावरणाचा विचार करून या हरित पट्ट्यांमध्ये अनेक वापरांसाठी परवानगी दिली असली तरीही, या वापरांसाठी किती जागेवर बांधकाम करण्यास परवानगी आहे हे नमूद करायचे ते विसरले. परिणामी अगदी १०% बांधकाम क्षेत्राची सुविधाही काढून घेण्यात आली. सध्या अशी परिस्थिती आहे की, या हरित पट्ट्यांमध्ये कोणत्याही आकाराचा भूखंड असला तरी एक चौरस फूट बांधकामालाही परवानगी दिली जात नाही. त्याचशिवाय, पुणे महानगरपालिका या हरित पट्ट्यातील रिकाम्या भूखंडावरही व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारते व उच्च न्यायालयाने हरित पट्ट्यांमधील जमीनींसाठी टीडीआर देण्याचा निर्णय देऊनही, कोणतीही भरपाई किंवा टीडीआर (विकास हक्क हस्तांतर) न देता रस्ते बांधणीसाठी जमीन अधिग्रहित करते. आता मला सांगा किती पुणेकरांनी त्यांच्या कष्टाच्या पैशातून खरेदी केलेल्या जमीनींच्या बाबतीत अशी धोरणे स्वीकारली असती, या जमीन मालकांची एकमेव चूक म्हणजे त्यांचा या जमीनी नदीला लागून होत्या जी आता नदी राहिलेली नाही हे पण कटू सत्य आहे.

     अशा सर्व अडचणी येऊनही, सुदैवाने या हरित पट्ट्यातील जमीन मालक झटपट पैसा कमावण्याच्या लोभाला (म्हणजे हव्यासाला) बळी पडलेले नाहीत व त्यांनी शक्य तितक्या चांगल्याप्रकारे हिरवाई जपली आहे, हे मी या भागामध्ये अगदी रस्त्याच्या पलिकडेच राहणारा रहिवासी म्हणून अगदी शपथेवर सांगू शकतोमी दररोज सकाळी उठतो तेव्हा मला माझ्या बाल्कनीतून या भागातील सर्वात हिरवागार पट्टा दिसतो, जेथे अतिशय पुरातन वृक्ष अजूनही टिकून आहेत, जे असंख्य पक्षांचे घर आहेत व त्यांच्या किलबिलाटाचे संगीत दररोज सकाळी ऐकायला मिळते. विकास नियंत्रण नियमांनुसार हरित पट्ट्याच्या वापरांवर सर्व निर्बंध असूनही हे शक्य आहे. इथे कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी नसली (सध्या तरी) तरीही पूर्वी काही परवानग्या देण्यात आलेल्या आहेत, तसेच हरित पट्ट्यांचे मालक या जमीनी लग्न-कार्यांसाठी तात्पुरता मंडप उभारून वापरतात, भारतामध्ये ही अगदी सर्रास आढळणारी बाब आहे व हे अवैध नाही. परंतु महानगरपालिका यालादेखील अवैध ठरवते व तेथे अतिक्रमणविरोधी कारवाई करते जो माझ्या मते हरित पट्ट्यातील भूखंड मालकांवर अन्याय आहे. मी असे म्हणत नाही की हरित पट्ट्याची जैवविविधता जपू नका, कारण मी या जैवविविधतेचा थेट लाभधारक असल्यामुळे असे म्हणणारी शेवटची व्यक्ती असेन. परंतु आपण या हरित पट्ट्यातील हिरवाईही राखली जाईल तसेच जमीन मालकांचेही पूर्णपणे नुकसान होणार नाही अशाप्रकारे संतुलन साधले पाहिजे. यावरील एकमेव तर्कसंगत, शाश्वत, व्यवहार्य व अंमलात आणण्यासारखा तोडगा म्हणजे, हरित पट्ट्यांचा काही प्रमाणात वापर करण्याची तसेच काही बांधकाम करण्याची परवानगी द्या ज्यामुळे इथल्या हिरवाईला अपाय होणार नाही किंबहुना ती वाढेल. त्याचप्रमाणे आजूबाजूला डीजे, फटाके, ध्वनीप्रक्षेपक यासारख्या गोष्टींचा त्रास होणार नाही, तर जमीन मालकांना पुरेसा पैसा कमवता येईल व त्यांना या हरित पट्ट्यांना झोपडपट्टीमध्ये रुपांतरित करावे लागणार नाही, जे सध्या या शहरामध्ये सगळीकडे होताना दिसत आहे जे एकेकाळी हिरवेगार होते.

    त्यानंतर लाल रेषा व निळ्या रेषेवरून वाद सुरू आहे ज्या अनुक्रमे शंभर व तीस वर्षातील पुराच्या पाण्याची पातळी दर्शवतात. नदीचे पाणी व त्याच्या प्रवाहाविषयी पूर्णपणे आदर राखत, जर आपण नदी पात्रातून मेट्रो रेल्वेच्या मार्गाला परवानगी देऊ शकतो, तर या पात्राचा काही वापर करण्याची परवानगी देण्यासाठी आपण काही तोडगा का काढू शकत नाही, उदाहरणार्थ जेव्हा पूर नसेल तेव्हा निळ्या रेषेमध्ये तात्पुरते मंडप उभारणे. तुम्ही भिंती किंवा तत्सम बांधकाम करू शकत नाही हे मान्य आहे कारण त्यामुळे निळ्या रेषेतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल. परंतु या निळ्या रेषेमध्ये जर उद्या अवैध झोपड्या उभारण्यात आल्या तर आपण त्यांचे काय करणार आहोत. याच शहरामध्ये इतरत्र नदी काठी असलेल्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भात आपण काहीच करत नाही तसेच इथेही होणार का हे मला माननीय हरित लवाद व प्राधिकरणांना विचारायचे आहे (आवाहन करायचे आहे). त्याचप्रमाणे हा वापर संपूर्ण समाजासाठी (म्हणजेच नागरिकांसाठी) आवश्यक असतो, कारण लग्नासाठी किंवा संगीत सोहळ्यांसाठी हजारो लोक जमू शकतील असे कोणतीही ठिकाण शहरात इतरत्र कुठे आहे, हे तथ्यही आपण पाहिले पाहिजे. याच तर्कानुसार व्याघ्र प्रकल्पांमध्ये अगदी कोअर क्षेत्रांमध्ये पर्यटनाला परवानगी असते व या जंगलांच्या बफर क्षेत्रामध्ये रिसॉर्टला परवानगी असते. कारण जर आपण या जंगलातील स्थानिकांची काळजी घेतली तरच, आपण येथील वन्यजीवन जगवू शकू, आपल्याला हरित पट्ट्यांचे संवर्धन करायचे असेल तर हाच तर्क लागू होतो.

   मला कल्पना आहे की, हा लेख वाचून अनेक जण मला दुटप्पी म्हणतील, कारण एकीकडे मी स्वतः वन्यजीवप्रेमी किंवा हरित विचारसरणीचा व्यक्ती म्हणवतो व दुसरीकडे मी हरित-पट्ट्यांवर बांधकामांना परवानगी द्या किंवा ते वापरण्यायोग्य करा असे म्हणतो. परंतु जोपर्यंत तुम्ही संतुलित वाढ किंवा शाश्वत या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला पर्यावरणासाठी ढोबळपणे एकतर्फी धोरणे तयार करून ते साध्य करता येणार नाही. नाहीतर कायदे, नियम व धोरणे केवळ कागदावरच राहातील; हे लक्षात ठेवा, या वैधानिक इशाऱ्यासह निरोप घेतो !



संजय देशपांडे

smd156812@gmail.com























Wednesday 27 December 2023

वय वाढतांना , 55 पूर्ण  !














वय वाढतांना , 55 पूर्ण  !


प्रत्येक वर्षागणिक सगळेच लोक वयाने वाढतात परंतु त्यातले मोजकेच लोक मोठे होतात व आपल्याला जी वर्षे मिळाली त्यांच्यासाठी कृतज्ञ असणे हे निश्चितच मोठे होण्याचे एक लक्षण आहे”… मी.

प्रिय दादा व छोटा,

     सर्वप्रथम मी तुम्हा दोघांविषयी कृतज्ञता (थँक यु) व्यक्त करतो कारण तुम्हा दोघांमुळे मला माझ्या वाढदिवशी लिहीण्याची व माझ्या वाढत्या वयाचे किंवा मोठे होण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण करण्याची आणखी एक संधी मिळाली. हा वाढदिवस माझ्यासाठी अधिक विशेष आहे कारण मी पंचावन्न ओलांडेन व आता मी स्वतःच्या नजरेत किंवा भोवतालच्या समाजाच्यादृष्टिने तरुण म्हणुन नक्कीच गणला जाणार नाही. त्यातच या डिसेंबरमध्ये दादाचे लग्न झाल्यावर मी सासरा होईन त्यामुळे समाज मला ज्येष्ठ व्यक्ती हे बिरूद देईल. काही वर्षांपूर्वी या गोष्टींची मला भीती वाटली असती (वरवर दाखवले नाही तरी आतून नक्कीच वाटली असती) व आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या मनात जरा विचलीतच भावना असते. कारण मी मागे वळून पाहतो तेव्हा मला तुम्ही रांगत असलेली दोन लहान मुले किंवा गणवेश घालून शाळेच्या बसमध्ये बसणारी लहान मुले दिसतात, आता तुम्ही मोठे झाला आहात व तुमच्यापैकी एक तर आता गृह्स्थाश्रमात प्रवेश करून स्वतःचे आयुष्य सुरू करतोय. मी एका विवाहित पुरुषाचा बाबा आहे, व्वा ! मी आरशात पाहतो तेव्हा मला वाढत्या वयाची अचानक जाणीव होते, विरळ झालेले करडे केस, पाठीला आलेला थोडासा बाक, दिवसातील पहिले पाऊल टाकताना घोट्यामध्ये होणारी वेदना, दुखरा गुडघा सगळे काही जाणवू लागते व अचानक माझ्याकडे रोखून पाहणारा आरशातील चेहरा अनोळखी वाटू लागतो. हा मी नव्हेच असे वाटू लागते व वाढदिवसाची मजा, धमाल कमी होते. परंतु काळजी करू नका, मी जे काही लिहीले आहे ते जे दर वाढदिवसाला केवळ वयाने वाढतात त्यांच्या बाबतीत होते. माझे बरेचसे मित्र त्याच्या मुलाच वा मुलीच लग्न ठरले आहे म्हणून एकीकडे आनंदी असतात, परंतु आतमध्ये खोलवर कुठेतरी ते अतिशय दुःखी असतात किंवा त्यांना वाईट वाटत असते की त्यांचे आता वय झाले आहे व आता त्यांना कुणीही तरूण किंवा हॅपनिंग मानणार नाही व मी त्यांना दोष देणार नाही कारण मोठे होणे म्हणजे नेमके काय हे जेव्हा तुम्ही समजून घेत नाही तेव्हा असे होते.

    म्हणूनच मी असे म्हटले की मी तुम्हा दोघांचा (व तुमच्या पिढीचा) आभारी आहे कारण माझ्या वाढदिवशी तुमच्यासाठी काहीतरी लिहीण्याची ही परंपरा जपत असताना मला मोठे होण्याचा अर्थ समजला, कारण ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे व मुक्कामाचे ठिकाण अजून आलेले नाही. परंतु, या वर्षांमध्ये मला कितीतरी गोष्टी समजू लागल्या किंवा आपण म्हणू शकतो की या गोष्टींकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली कारण एकीकडे या वर्षांमध्ये मला वयाने दिलेल्या जखमांचे व्रण, वेदना, त्रास, अपमान, भीती जाणवली असली तरीही या सर्व वर्षांमध्ये कितीतरी उत्तम गोष्टीही झाल्या आहेत, माझ्या आयुष्यात तुम्ही दोघे आलात, माझ्या प्रियजनांसोबतचे सुंदर क्षण आहेत (या नावाची यादी लहान असली तरीही क्षण असंख्य आहेत), मी कितीतरी पुस्तके वाचली, अनेक ठिकाणी प्रवास केला, अनेक तरुणांशी संवाद साधला, काही बुद्धिमान लोकांना भेटता आले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वर्षातील प्रत्येक दिवसाने मला काहीतरी नवीन शिकवले आहे व मी जे काही शिकलो त्याचा वापर करण्यासाठी मला संधी दिल्या. दादा व छोटा, या वर्षांमध्ये मला जाणीव झाली की मी किती भाग्यवान आहे कारण माझे पालकच शिक्षक होते व त्यामुळे मला नेहमी विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहता आले व योग्य-अयोग्य काय हे समजून आयुष्याचे मोल जाणून घेता आले व त्यानुसार जगता आले. त्याचप्रमाणे तुमची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती कारण आजी व अब्बूंसोबत राहात असल्यामुळे मी काही चूक केली तर माझे पालक माझ्याविषयी काय विचार करतील असा विचार मनात येत असे. आता तुम्ही सोबत असल्यामुळे मी योग्य मार्गाने वाटचाल करत राहतो, कारण मी माझ्या आई-वडिलांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो व ते जे काही आहेत त्यासाठी त्यांचा आदर करतो, त्याचप्रमाणे तुम्हीही एक दिवस माझ्याकडे पाहाल व तुम्हाला मी ज्याप्रकारे आयुष्याची निवड केली त्याविषयी तुम्हाला लाज वाटणार नाही, मी हे पैलू किमान लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.

     दादा आता तुला हा वारसा पुढे चालवायचा आहे कारण तुझी आव्हाने माझ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहेत. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालो, जो एका अर्थाने आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखविण्यामध्ये मोठा अडथळा होता तर दुसरीकडे ते एक वरदान होते किंवा योग्य मार्गावर चालण्याचे व मला जे काही साध्य करणे शक्य झाले आहे त्यातच आनंद मानण्याचे पाठबळ त्यातून मिळत होते! तुमचा बाबा आर्थिकदृष्ट्या व सुखसोयींच्या बाबतीत कदाचित मध्यमवर्गीय नसेल परंतु तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीत, मी जगताना कोणती मूल्ल्ये जपली आहेत हे कधीही विसरू नका, किंबहुना माझ्या व तुमच्या आजी-आजोबांच्या सर्वोत्तम गोष्टींचा जास्तीत जास्त चांगला वापर करून घ्या. मी आता वैयक्तिक दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला आदेश देणे किंवा हे करा किंवा ते करू नका असे सांगणे थांबवले आहे कारण तुम्ही आता मोठे होऊन त्याच्या पलिकडे गेला आहात, व त्या आघाडीवर मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे परंतु वडिलांची जबाबदारी किंवा पालकत्व खरेतर कधीही संपत नसते; फक्त तुम्ही ते ज्याप्रकारे निभावता त्यामध्ये फरक पडतो हे मी शिकलो आहे. मला सांगावेसे वाटते की आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी मी समाधानी आहे ज्याचे श्रेय तुम्हा दोघांना व त्या सर्व लोकांना जाते ज्यांनी आयुष्याच्या अनेक आघाड्यांवर नशीबवान ठरवले आहे, किंबहुना समाजातील लाखो लोकांपेक्षा बराच नशीबवान आहे व मी त्यासाठी कृतज्ञ आहे. दादा व छोटा, हा माझा मोठे होण्याचा प्रवास आहे कारण आयुष्य आपल्याला अनेक गोष्टी देते तर अनेक गोष्टी काढूनही घेते परंतु बहुतेकवेळा आपला तोटा आहे असेच आपल्याला वाटते कारण आपले आयुष्यात जे काही नुकसान झाले आहे त्याकडेच आपण पाहतो; कृतज्ञ राहिल्यामुळे आपल्या बरेचदा जमेच्या बाबी पाहण्यास मदत होते व समाधानी राहण्याचा हाच मार्ग आहे, मी जाणीवपूर्वक आनंदी हा शब्द वापरलेला नाही कारण कधीतरी तुम्हाला स्वतःलाच या दोन शब्दांमधील फरक समजेल!

मला असे वाटते वर्षभरासाठी एवढे बोधामृत पुरेसे आहे व यावर्षातून काय शिकायला मिळाले हे मी आता सांगतो (सरतेशेवटी), तर

. एखादी व्यक्ती धडपडली असेल तर तिला सावरण्यासाठी मदत करण्यास तुम्ही कधीही कचरू नका

. तुमच्यापेक्षा एखादी व्यक्ती भुकेली असेल तर तुमच्या थाळीत जे काही आहे ते त्या व्यक्तीला देण्यास मागे-पुढे      पाहू नका

एखाद्याला कौतुकाची गरज असेल तर त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला कधीही रोखू नका

एखादी व्यक्ती जे योग्य आहे त्यासाठी झटत असताना त्यांच्यासोबत उभे राहण्यापासून स्वतःला थांबवू नका

. तुम्हाला रडावेसे वाटत असेल तुमचे अश्रू कधीही रोखू नका

. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात तुम्हाला मदत करणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तीचे आभार मानण्यापासून स्वतःला        रोखू नका

. तुम्ही चूक आहात असे जग म्हणत असले तरीही तुम्हाला जे योग्य वाटते त्यावर विश्वास ठेवण्यापासून स्वतःला 

    रोखू नका … (परंतु त्यासाठी आधी तुमचे योग्य व अयोग्य काय आहे ते ठरवा व त्याच्या व्याख्या तयार करा)

. तुम्हाला जेथे बुद्धिमत्ता वा शहाणपणा जाणवते तेथे नतमस्तक होण्यापासून कधीही स्वतःला रोखू नका

. एखादी कला कितीही निरुपयोगी वाटली तरीही ती शिकण्यापासून स्वतःला रोखू नका… आणि

१०. एखादी व्यक्ती तुमच्याएवढी सुदैवी नसेल तर कधीही त्यांच्या सोबत आपले नशीब सुद्धा वाढुन घेण्यापासुन 

     स्वतःला रोखू नका

    दादा व छोटा, या नंतर मी आरशात पाहात असताना जेव्हा मला ही जाणीव होते, तेव्हा माझ्याकडे निरखून पाहणारा चेहरा ओळखीचा वाटू लागतो, तो तजेलदार चेहरा माझ्याकडे पाहून स्मितहास्य करतो, माझ्यासोबत चाळीस-पन्नास वर्षे राहात असताना मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तो कृतज्ञ आहे असे मला सांगतो; तुम्हा दोघांसह निखिल, केतकी, रोहित एम, श्रुती, सिया, तनिषा व तुम्हा सर्व तरुण मंडळीचे, तसेच डिज्ने, मार्व्हल, डिस्कव्हरी चॅनलचे सुद्धा (डीसी) माझ्या मोठे होण्यातील सहभागासाठी आभार!



संजय देशपांडे

smd156812@gmail.com





















 

Saturday 16 December 2023

 









बांधकाम स्थळीचे अपघात टाळतांना, भाग  1


“सुरक्षितता नशिबाने साध्य होत नाही याची मला जाणीव झाली आहे. दैनंदिन कामकाजामध्ये सुरक्षिततेचा समावेश असलाच पाहिजे,विशेषतः आपल्यापैकी ज्यांना कामाच्या ठिकाणी अधिक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांच्यासाठी” … जेना वॉर्थाम

     जेना वॉर्थाम या एक अमेरिकी पत्रकार आहेत. त्या द न्यूयॉर्क टाईम मासिकासाठी सांस्कृतिक लेखिका आहेत व द न्यूयॉर्क टाइम्स पॉडकास्टचे सूत्रसंचलन करतात. एक पत्रकार म्हणून जेना यांनी त्यांच्या कारकि‍र्दीमध्ये अनेक अपघात पाहिले असतील, म्हणूनच अपघाताविषयी व सुरक्षिततेविषयी त्यांची मते इतकी नेमकी व अचूक आहेत. मी बऱ्याच दिवसांनी अपघातांविषयी लिहीतोय ( ते देखील बांधकामस्थळी झालेल्या अपघाताविषयी ) हे एका अर्थाने चांगले लक्षण आहे, कारण  जेव्हा अपघात होणार नाहीत अशी तुम्हाला खात्री असते तेव्हाच अपघात होतात, असे म्हणतात. अलिकडेच पुण्यामध्ये ( दुसरीकडे कुठे! ) एक दुर्दैवी अपघात झाला, ज्यामध्ये एक शाळकरी मुलगा अपघातग्रस्त होता, त्याच्या आईसोबत तो एक प्रकल्पाला लागून असलेल्या पदपथावरून जात असताना त्याच्या डोक्यामध्ये एक लोखंडी तुकडा पडला (ज्याचा वापर प्लंब-बॉब लेव्हल मोजायचे एक उपकरण म्हणून केला जातो). मी याच्या तपशीलात जाण्याआधी, तुम्हाला अगदी स्पष्टपणे व प्रामाणिकपणे सांगतो की या अपघातासाठी एखाद्या संस्थेला दोष देण्यासाठी किंवा कोण दोषी आहे असा निष्कर्ष काढण्यासाठी हा लेख नाही (हे काम तपास संस्थेचे आहे, ज्या पुरेशा सक्षम आहेत). तर हे केवळ अभियंता व एक सामान्य माणूस म्हणून ( व एक बांधकाम व्यावसायिक म्हणून ) केलेले विश्लेषण आहे, जे अतिशय महत्त्वाचे आहे केवळ रिअल इस्टेट विकासकांसाठीच नव्हे तर त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटकासाठी, कारण अपघात सूचना देऊन होत नाहीत अर्थात धोक्याचे इशारे नेहमी मिळत असतात व आपण या विशिष्ट घटनेकडे अशाप्रकारे पाहिले पाहिजे. 

     त्यानंतर या अपघाताविषयीची तथ्ये शोधण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाने स्थापित केलेल्या समितीचा मी सदस्य होतो, याआधीही मी अशा समितीमध्ये काम केले आहे व अपघातांच्या सर्व पैलूंचा मला थोडासा अनुभव आहे. हा अनुभव आपण इतरांपर्यंतही पोहोचवला पाहिजे असे मला वाटले, कारण जागरुकता निर्माण करणे हा अपघात रोखण्याचा एक मुख्य मार्ग आहे. बांधकाम स्थळी काम करताना गेल्या तीस वर्षात मला बऱ्याच अपघातांना बघता आले आहेत व आत्तापर्यंत ( सुदैवाने ) या अपघातांमुळे अपघात टाळण्यासाठी माझ्या कामाच्या ठिकाणी एक धोरण तयार करण्यास मला मदत झाली आहे.

      मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो की, तुम्ही कितीही काळजी घेतली असली तरीही कोणत्याही ठिकाणी किंवा कुठल्याही प्रकल्पामध्ये अपघात होऊ शकतात व म्हणूनच त्यांना अपघात असे म्हणतात; निष्काळजीपणा किंवा अपघात टाळण्यासाठी काहीही प्रयत्न न करणे किंवा कोणतीही यंत्रणा नसणे ही खरी समस्या आहे. माझ्या लेखाचा हाच मुद्दा आहे व कोणतीही तपास संस्था जेव्हा एखाद्या अपघाताविषयी तपास करते तेव्हा तिला यामध्येच रस असतो. वाहन चालवताना होणाऱ्या अपघाताचे उदाहरण घ्या, तुम्ही जर रस्त्यावर सामान्य वेगाने चालवत असाल व अचानक कुणीतरी तुमच्या कारसमोर आले व त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो अपघात असला तरीही एका व्यक्तीचा जीव गेल्यामुळे पोलीस ( तपास संस्था) एफआयआर दाखल करतात व तुम्ही वेगाने गाडी चालवत होता का किंवा गाडी चालवताना दारू प्यायला होता का किंवा तुम्ही लाल सिग्नल तोडला का किंवा चुकीच्या मार्गिकेमध्ये वाहन चालवत होता का किंवा वाहन चालवताना इन्स्टाग्रामवरची रील पाहण्यात गुंग होता का हे तपासतील, कारण तुम्ही तसे करत असाल तर तो केवळ अपघात न राहता निष्काळजीपणा ठरतो ज्यामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला. प्रत्येक संबंधित तपास किंवा नियामक अधिकारी या दृष्टीकोनातूनच प्रत्येक अपघाताकडे पाहील ज्यामुळे तुमच्या (आमच्या) बांधकामस्थळावर कुणाचातरी जीव गेला व या पैलूलाच सुरक्षितता असे म्हणतात. तुम्ही अपघात टाळण्यासाठी बांधकाम स्थळी सुरक्षिततेसाठी पुरेशा खबरदाऱ्या घेतल्या आहेत का हे अतिशय महत्त्वाचे आहे व त्यासाठी तुमच्याकडे एक यंत्रणा आहे का हे कोणत्याही अपघाताच्या तपासाच्यावेळी अतिशय महत्त्वाचे असते व दुर्दैवाने रिअल इस्टेटमध्ये एका सुनियोजित  यंत्रणेचा अभाव असतो ही वस्तुस्थिती आहे. इथे मी विकासकांसाठी तसेच बांधकाम स्थळावरील अपघाताशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी (उदाहरणार्थ आर्किटेक्ट, आरसीसी सल्लागार इत्यादी) तिहेरी यंत्रणा सुचवेन ज्या अपघात  टाळण्यासाठी आहेत  आणि अपघातानंतर  ज्यांनी विकासकाला व त्या अपघातामध्ये सहभागी असलेल्या निष्पाप लोकांना वाचविण्यास मदत केली आहे!

     सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक बांधकामाविषयक कामाच्या जबाबदाऱ्यांची कागदोपत्री अतिशय स्पष्ट व तपशीलवार नोंद करून ठेवा, ज्यामध्ये त्या कामाच्या सुरक्षिततेच्या पैलूचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, तुम्हाला इमारतीच्या दर्शनी भागाला काचेची तावदाने लावायचे काम द्यायचे असेल, तर ती तावदाने लावण्यासाठी आवश्यक असलेले जोडकाम करणे, त्या जोडकामासाठी तरापे उभारणे, त्या जोडकामाची रचना कशी असेल ते ठरवणे, अशी प्रत्येक पायरी व त्या प्रक्रियेमध्ये केली जाणारी प्रत्येक कृती, तसेच आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना, तसेच ते कोण करेल हे नमूद करा. उदाहरणार्थ, जर इमारतीच्याभोवती असलेली सुरक्षा जाळी काचेची तावदाने लावण्यासाठी उभारलेले मचाण (मजुरांना काम करता यावे यासाठी उभारलेला तात्पुरता सांगाडा/मंच ) उभारण्यासाठी काढायची असेल, तर सुरक्षिततेसाठी कोणती पर्यायी सोय करण्यात आली आहे व ते कोण करणार आहे हे काचेची तावदाने लावण्याचे काम ज्या एजन्सीला दिले आहे तिच्या वर्क ऑर्डरमध्ये तुम्ही स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. तुमच्या बांधकामाच्या ठिकाणी इमारतीमध्ये प्रत्येक टप्प्यावर करायच्या प्रत्येक कामासाठी किंवा दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेसाठी हे लागू होते. आर्किटेक्ट किंवा स्ट्रक्चरल डिझायनर यासारख्या सल्लागारांचे तपशीलही संभाव्य अपघाताचे तपशील व सुरक्षा उपाययोजना नमूद करताना त्यामध्ये दिले पाहिजेत. आपण कुणालातरी बळीचा बकरा बनवण्यासाठी हे करत नसून, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसंदर्भातील आपापले कर्तव्य पार पाडताना प्रत्येकाला जबाबदार बनविण्यासाठी हे आहे. सुरक्षा उपाययोजनांची जबाबदारी निश्चित करण्याच्या या पैलूकडे, बहुतेक विकासकांचे दुर्लक्ष होते किंवा ते त्याकडे काणाडोळा करतात व त्यानंतर त्यांना तपास संस्थेच्या ताशेऱ्यांना सामोरे जावे लागते कारण अपघाताच्या प्रकरणांमध्ये जर कुणाचीच जबाबदारी निश्चित करण्यात आली नसेल तर व्यवसायाचे मालक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा.

     त्यानंतर येते कारागिरीची प्रक्रिया व बांधकाम स्थळावरील कामाच्या सर्व प्रक्रियांमध्ये सुरक्षा उपाययोजनांचा समावेश करून घेणे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला बांधकामाच्या ठिकाणी काम करायची परवानगी देता तेव्हा प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक आरोग्य तपासण्यापासून (म्हणजे मजुरांपैकी कुणाही व्यक्ती दारू प्यायलेली आहे की किंवा तिला काही आजार आहे का), तसेच सुरू असलेल्या कामांवर सतत देखरेख करण्यापर्यंत प्रत्येक लहान गोष्ट महत्त्वाची असते. लहान किंवा एकच इमारत असलेल्या बांधकाम स्थळांवर सुरक्षा अधिकारी ठेवणे परवडत नाही हे मान्य आहे,परंतु तुम्ही तुमच्या पर्यवेक्षकालाच सुरक्षा उपाययोजनांविषयी प्रशिक्षण देऊ शकता व मालक म्हणून या दृष्टिकोनातूनही तुम्ही बांधकामस्थळाला भेट दिली पाहिजे. सुरक्षा पट्ट्याशिवाय उंचीवर काम करणारा मजूर,कामाच्या ठिकाणी खेळणारे मजुराचे लहान मूल किंवा उंच मजल्यावरील स्लॅबला कोणत्याही सुरक्षेशिवाय ठेवलेले कट-आउट, तुमचे डोळे व ज्ञानेंद्रिये अशा त्रुटी शोधण्यासाठी प्रशिक्षित असली पाहिजेत व ती प्रशिक्षित होईपर्यंत कोणत्या गोष्टी तपासायच्या आहेत याची एक यादी तयार करा व बांधकामाच्या ठिकाणी दररोज तिच्यावर बरोबरची खूण करण्याची सवय ठेवा.त्याचप्रमाणे बांधकाम स्थळावरील शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करा, कारण सुरक्षितता हा एक दृष्टिकोन आहे व ज्या मजुरांच्याबाबतीत थेट अपघात होऊ शकतो, ते जोपर्यंत स्वतःच्या सुरक्षिततेविषयी विचार करत नाहीत तोपर्यंत अपघात कमी होणार नाहीत. त्याचप्रमाणे आमची समिती ज्या विशिष्ट घटनेचा तपास करत होती, त्यातील पीडित बांधकामावरी कर्मचारीवर्गाचा भागही नव्हता तर शेजारून येणारा-जाणारा सामान्य नागरिक होता व शहरी केंद्रामध्ये काम करताना हा पैलूही ध्यानात ठेवला पाहिजे. बांधकामाचे स्थळ त्याचशिवाय शेजारील मालमत्ता व भोवतालच्या लोकांना सुरक्षित ठेवणे या दोन्ही गोष्टीही तितक्यात महत्त्वाच्या आहेत. तिसरा  पैलू  आहे दस्तऐवजीकरणाचा तसेच बांधकाम स्थळी लिखित व दृश्य नोंदी ठेवण्याचा, जो रिअल इस्टेटचा आणखी एक कच्चा दुवा (कमजोर कडी) आहे; कारण या विशिष्ट अपघातामध्ये पदपथ व इमारती दरम्यान पत्र्याचा अडथळा होता, परंतु पदपथावर फरशी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे स्थानिक संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विकासकाला ते पत्रे हटविण्यास सांगितले, असे विकासकाचे म्हणणे आहे व अशा कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशावेळी लिखित संज्ञापन महत्त्वाचे असते, कुणावरही आरोप करण्याऐवजी किंवा एखाद्या संस्थेला दोष देण्याऐवजी संबंधितांची जबाबदारीची निश्चित करणे व काहीतरी कृती करणे आवश्यक असल्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे असते. विकासकांनी हे समजून घेतले पाहिजे की बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या कोणत्याही अपघातासाठी त्यांचीच मानगुट पकडली जाणार असते,म्हणूनच प्रत्येक संस्थेशी प्रत्येक संज्ञापन हे लिखित स्वरूपात झाले पाहिजे व त्याच्या नोंदी ठेवल्याच पाहिजेत व हे वेळच्यावेळी झाले पाहिजे,कारण तुमच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाचा पुरावा म्हणून त्याची कधी गरज पडेल हे तुम्ही सांगू शकत नाही.विशेषतः सरकारी संस्थांसोबत तसेच शेजारील इमारती किंवा आस्थापनांसोबत, सुरक्षिततेच्या समस्यांविषयी संवाद साधणे महत्त्वाचे असते. आमच्या प्रकल्पांपैकी एकामध्ये माझ्या निदर्शनास आले की माझ्या भूखंडाला लागून असलेल्या सोसायट्यांपैकी एकीची कुंपणाची भिंत थोडीशी वाकलेली होती. मी तात्काळ तिची छायाचित्रे काढली व त्या सोसायटीला एक पत्र लिहीले व त्या पत्राची एक प्रत स्थानिक पोलीसांना व सार्वजनिक संस्थांना पाठवली, त्यांच्या भिंतीच्या स्थितीविषयी इशारा दिला व भविष्यात ती भिंत कोसळल्यास कोणत्याही नुकसानासाठी आम्ही जबाबदार असणार नाही असे नमूद केले. त्यांच्यापैकी कुणीही दखल घेतली नाही परंतु माझ्याकडे त्याची लेखी नोंद आहे, यालाच कागदपत्रांच्या बाबतीत चोख असणे असे म्हणतात !

     त्याचप्रमाणे आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे व तुमच्या इमारतीच्या चारही बाजूंवर चोवीस तास सीसीटीव्हीने देखरेख करणे यासारख्या गोष्टी आपल्या बांधकाम स्थळावरील प्रत्येक घडामोडी टिपण्यासाठी अत्यावश्यक आहेत, ज्यामुळे आपल्याला कोण त्याचे किंवा तिचे सुरक्षिततेबाबतचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले हे समजले आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग जपून ठेवा, अशा यंत्रणांसाठी खर्च करा कारण ते विम्यावर खर्च करण्यासारखे आहे, तो पैशाचा अपव्यय नाही. बांधकाम स्थळावर आणीबाणीच्या वेळी संपर्क करण्यासाठी असलेली नावे व क्रमांक ठेवा व अशा सर्व व्यक्तींचा एक व्हाट्सॲप ग्रूप तयार करा, म्हणजे एक मेसेज पाठवताच सर्व व्यक्तींना इशारा दिला जाईल. अपघाताच्या परिस्थितीत काय करायचे यासाठी तुम्ही सहा महिन्यातून एकदा सराव कवायत केली पाहिजे म्हणजे सुरक्षिततेविषयी त्याची किंवा तिची जबाबदारी कुणाला समजली आहे हे तुम्हाला समजेल. तसेच बांधकाम स्थळ जर मोठे असेल तर दर महिन्याला सुरक्षिततेचे लेखा परीक्षण करून घ्या. तसेच सर्व बांधकाम स्थळावरील लिफ्ट, काँक्रीट मिक्सर व पंप यासारख्या यंत्रसामग्रीची व्यवस्थित देखभाल करणेही अतिशय महत्त्वाचे आहे व त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होऊ शक शकते. 

    इथे, सार्वजनिक संस्थेची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे कारण रिअल इस्टेट हे असंघटीत क्षेत्र आहे व बहुतेक कामे ही हाताने होतात व त्यात काम करणाऱ्या लोकांना तांत्रिक प्रशिक्षण मिळालेले नसते. काही मोठ्या संस्था वगळता बहुतेक ठिकाणी कारागीर हे केवळ सरावाने एखादे काम करत असतात व त्यासाठी त्यांना सुरक्षिततेचे कोणतेही व्यवस्थित प्रशिक्षण दिले जात नाही, जे अत्यावश्यक आहे. पुणे महानगरपालिका, अग्निशमन विभाग क्रेडाई एकत्रितपणे बांधकाम स्थळावरील मजुरांसाठी मूलभूत सुरक्षितता नियमांविषयी व बांधकाम स्थळावरील प्रक्रियांविषयी संक्षिप्त अभ्यासक्रम सुरू करू शकतात व बांधकाम स्थळावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो बंधनकारक असला पाहिजे.

बांधकाम स्थळावरील सुरक्षिततेविषयी खालील दहा मुद्दे मी अनुभवातुन शिकलो आहे, ते शेअर करीत आहे …

. सुरक्षितता या शब्दाचा अर्थ समजून घ्या.

२. बांधकाम स्थळावरील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण द्या.

३. बांधकाम स्थळावरील बालके व लहान मुलांची काळजी घ्या.

४. सर्व यंत्रसामगी व्यवस्थित कार्यरत स्थितीत ठेवा. त्यांच्या देखभालीची एक व्यवस्था पाळा !

५. बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्हीने देखरेखीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करा.

६. ज्या सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत त्यांची दस्तऐवजामध्ये व्यवस्थित नोंद ठेवा.

७. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या घटकांविषयी प्रत्येक संबंधित व्यक्तीच्या जबाबदाऱ्या निश्चित करा.

८. सुरक्षिततेविषयी जागरुकता निर्माण करण्याविषयी सातत्याने प्रयत्न करा उदा.भित्तीपत्रके लावा, व्हाट्सॲपद्वारे 

    संदेश,व्हिडिओ इत्यादी पाठवा.

९. बांधकाम स्थळावरील सुरक्षिततेच्या समस्यांविषयी संबंधीत सरकारी यंत्रणांशी योग्यप्रकारे व वेळेत संवाद साधा.

१०. विकासक म्हणून,तुम्ही जोपर्यंत सुरक्षिततेचे पालन करणार नाही तोपर्यंत दुसरा कोणी येऊन नक्कीच करणार        नाही !

मित्रांनो,अपघात कुणालाच नको असतात कारण त्यामुळे केवळ जीवित हानीच होत नाही तर अपघाताशी संबंधित सर्वांना मोठा आर्थिक फटकाही बसतो, यामुळे व्यवसाय करण्याचा हेतूच साध्य होत नाही व अपघाताला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो टाळणे,जे केवळ आपल्यावरच अवलंबून आहे हे लक्षात ठेवा; एवढे बोलून निरोप घेतो! 


संजय देशपांडे 

smd156812@gmail.com