Sunday, 22 March 2015

वाघांच्या पलीकडले ताडोबा !



















जंगलातल्या वाघाला तुम्ही कॅमे-यात कशा प्रकारे  बंदीस्त करता त्यापेक्षा त्या क्षणांचा आनंद तुम्ही घेतला आहे ना हे जास्त महत्वाचे आहे...संजय

मार्च महिन्याच्या मध्यावरची ती एक सकाळ होती आणि ताडोबामधील तो प्रसिद्ध उन्हाळा अजून सुरू व्हायचा होता.मोहार्ली गेटमधून माझ्या जिप्सीनं प्रवेश करताच आम्हाला जामुनझारीच्या बाजूने भेकर (बार्कींग डीअर ) विशिष्ट प्रकारे ओरडण्याचा  आवाज आला. त्यामुळे बांबूच्या झाडांमधून असलेल्या वळणदार रस्त्यावर आमच्या गाडीचा प्रवास सुरू झाला. आमच्या नजरा त्या घनदाट झाडीत अपेक्षित पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांचा शोध घेऊ लागल्या कारण या रंगामुळे जंगलात  वाघ कोणाच्या दृष्टीस पडणं कठीण असतं. अचानक आमच्या गाडीपुढे आम्हाला एक मोठा काळा प्राणी चालतां ना दिसला. जिप्सीच्या चाकांचा आवाज येताच तो थांबला आणि मागे वळला. क्षणभरासाठी माझा श्वासही थांबला. ते पूर्ण वाढ झालेले नर अस्वल होते. अस्वलांच्या विक्षिप्त सवयीप्रमाणे पुढील दिशेला चालत जाण्याऐवजी १८० अंशांचे वळण घेत ते थेट आमच्या दिशेने चालत येऊ लागले. नर अस्वलाला समोरा-समोर पाहणे माझ्या स्वप्नापलिकडले होते, मी माझा कॅमेरा काढला आणि माझ्या वाढलेल्या श्वासांच्या वेगाने त्याचे फोटो काढू लागलो. तुम्ही ज्याची कधी कल्पनाही केली नसेल तेच समोर आले तर....त्यामुळे माझी ताडोबाची सफर अशा अनोख्या पद्धतीने सुरू झाली. ताडोबाच्या जंगलात दरवेळी फक्त मलाच नाही तर प्रत्येकाला काहीतरी पहिल्यांदाच बघायला मिळते, फक्त त्यासाठी आपल्यात संयम असावा लागतो आणि जेव्हा ते येतं तेव्हा ते अनुभवण्याची समयसूचकता हवी.

 मित्रांनो मी गेल्या अनेक वर्षापासून जंगलांची सफर करत आहे आणि दरवेळी ही जंगले मला काहीतरी नवीन देत आहेत. पुढे ताडोबातील पांढरपौनी इथे आम्ही वाघीण बघायला मिळेल याची वाट पाहत होतो. पण एका कर्णकर्कश आवाजाकडे आमचे लक्ष वेधले गेले. आमच्या मागे असलेल्या गवतातून तो आवाज येत होता, दोन जंगली कावळे एका छोटयाशा वस्तूवरुन भांडत होता. कॅमे-याच्या माध्यमातून जेव्हा मी जवळून पाहिले तेव्हा मला जाणवले की हे एक दुर्मिळ नाट्य घडते आहे आणि आम्ही त्या कावळ्यांवर आमचे सारे लक्ष केंद्रीत केले. एका वटवाघूळाला कावळे जिवंत खात असल्याचे ते दृश्य होते. त्या वटवाघुळाची जात मला ओळखता आली नाही. ते बिचारे वटवाघुळ जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, पण आपल्या तीक्ष्ण चोचीने ते कावळे त्या वटवाघुळावर तुटून पडले. आमच्यासोबत असलेल्या मार्गदर्शकानेही गेल्या १५ वर्षाच्या काळात आपण कावळ्यांनी जिवंत वटवाघुळ खाल्ल्याची घटना पहिल्यांदाच पाहिली असल्याचे सांगितले.
वरील घटना हे क्रौर्य असले तरी निसर्गाचा भाग आहे, आपण फक्त त्याचे कौतुक करु शकतो. हे कमी होते की काय म्हणून जंगलाने आम्हाला आणखी एक मोठा आश्चर्याचा धक्का दिला. आमची जिप्सी मोहार्ली रेंजमधून कोल्सा रेंजमध्ये निघाली असताना चालकाने अचानक गाडीचा वेग कमी केला, समोर रस्त्यावर एक पूर्ण वाढ झालेला गवा पडला होता, त्याला कोणी मारले आहे हे समजण्यास आम्हाला एक सेकंदही लागला नाही. आमच्या विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या एकमेव जिप्सीने लाईट चमकवून शिकारी जवळपास असल्याचा इशारा आम्हाला दिला. तेवढ्यात झाडीतुन एक वाघीण तिथे आली आणि ती आपल्या भक्ष्यावर तुटून पडली. एवढेच नाही तर ईतर भक्षकांच्या भीतीने तो मेलेला गवा रस्त्याच्या पलिकडे दाट झाडीत खेचून नेण्याचा प्रयत्न ती करु लागली, पण तिला ते शक्य झाले नाही. हा सारा घटनाक्रम आपल्या कॅमे-यात कैद करण्यासाठी मी  स्तब्ध होऊन क्लिक करत राहिलो. एखाद्या वन्यप्रेमी व्यक्तीसाठी हा सारा अनुभव स्वप्नवत होता, पण तो बिचारा गवा  मात्र निष्प्राण  डोळ्यांनी तिथे मरुन पडला होता. वन्यप्रेमींसाठी आपली स्वप्न पूर्ण करणारे असे हे ताडोबा अरण्य... फक्त ती स्वप्न सत्यात उतरताना पाहण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.

विक्रम पोतदार हा माझा मित्र आणि एक कुशल वन्यजीव छायाचित्रकार माझ्या सोबत होता. माझ्यापेक्षा खुपच चांगला छायाचित्रकार असलेला विक्रम ते संपूर्ण दृश्य पाहून आनंदून गेला होता. आमच्या विरुद्ध दिशेला तीन जिप्सी उभ्या होत्या. माझ्या छायाचित्रांमधून त्या जिप्सी वगळणे मला शक्य होते, पण त्यातील काही जिप्सी मी छायाचित्रांमध्ये जाणीवपूर्वक येऊ दिल्या कारण फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांनाच नाही तर जंगल सफरीसाठी पहिल्यांदाच आलेल्या सामान्य पर्यटकांनाही असा अनुभव मिळू शकतो हे मला दाखवून द्यायचे होते कारण जंगल हे फक्त काही मोजक्या लोकांचे नाही तर प्रत्येकाचे आहे.आपल्यासमोर घडणा-या घटनेत आपण दंग होऊन जातो, ते क्षण असे असतात की जणू काळ तिथेच थांबतोया जादूलाच जंगल म्हणतात. जंगलातील हे अनुभव कोणत्याही कॅमे-यात बंद करता येत नाहीत म्हणूनच हे अनुभव कथन करण्यासाठी मी स्वत: माझी उदाहरणे द्यायला सुरूवात केली.  जंगलातील प्रत्येक सहलीत अशा अनेक घटना घडतात आणि जंगल सफर करणा-यांचे अनुभव सारखेच असतात पण त्यात काहीतरी वेगळेपणाही असतो. जेव्हा फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर मी काढलेली छायाचित्रे टाकतो तेव्हा मी किती भाग्यवान आहे किंवा त्यांना अशी दृश्य बघता आली नाहीत अशा कॉमेंट्स येतात, पण जंगलात कोणीही कमनशिबी नसतो.मी असे म्हणेन की काही जण थोडे जास्त भाग्यवान असतात आणि प्रत्येक क्षण हा वेगळा आणि एकमेवाद्वितीय असतो. एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जंगल म्हणजे फक्त वाघ नाही तर त्यापेक्षा खूप काही आहे आणि ताडोबा आपल्याला तेच शिकवत असते. माझे पुढील अनुभव सांगण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगतो. ताडोबा अरण्याबाबत पर्यटकांना माहिती व्हावी या विशेष हेतुने माझा जागतिक दर्जाचा छायाचित्रकार मित्र विक्रम पोतदार याच्या सोबत मी ताडोबामध्ये होतो.

ताडोबा हे प्रसिद्ध आहे मी मान्य करतो पण बहुतांश पर्यटक हे ताडोबामध्ये फक्त  वाघ बघण्यासाठी येतात, छायाचित्र काढतात आणि वाघाचे दर्शन झाल्याने सेलिब्रेट करतात आणि निघून जातात, बस्स एवढंच! पण ताडोबाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अधिका-यांशी झालेल्या चर्चेतून आम्हाला जाणवले की पर्यटकांना ताडोबा काय आहे आणि समाजासाठी जंगलाचे महत्व त्यांना आधी समजावून घेऊ द्या, तसेच ताडोबासारख्या जंगलाबाबत प्रत्येकाची जबाबदारी काय आहे याची जाणीव त्यांना होऊ द्या. त्यामुळेच ताडोबा नेमके काय आहे ते त्यांच्यापुढे मांडणे महत्त्वाचे आहे. हा विचार माझ्या मनात माझ्या गेल्यावेळच्या ताडोबा भेटीतून आला.एक तरुण अधिकारी गजेंद्र नरवणे यांनी आम्हाला अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका सुरक्षा रक्षकाची गोष्ट सांगितली. या हल्ल्यात तो सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या उपचाराचा खर्चही खूप होता. तेव्हा मी असा मुद्दा मांडला की ही घटना ताडोबाला भेट देणा-या पर्यटकांपुढे का मांडली गेली नाही, या कारणासाठी ते नक्कीच मदत करतील. हीच संकल्पना मग पुढे आली कारण आज ताडोबाच काय पण राज्यातील कोणतेही जंगल आणि पर्यटकांमध्ये कोणता दुवाच अस्तित्वात नाही. एकदा पर्यटक जंगलाच्या दरवाजातून बाहेर पडून सिमेंच्या जगात पोहोचले की या जंगलाने आपल्याला दिलेला आनंद ते विसरुन जातात. आपण जर कोणत्या तरी मार्गाने प्रत्येक पर्यटकाच्या संपर्कात राहिलो तर जंगलाबाबतच्या समस्यांवर त्यांची मदत घेता येईल तसेच त्यांच्या भोवतालच्या जंगलाचे रक्षण करण्याचे प्रयत्नही ते त्यांच्या परिने करतील. आमच्या चर्चेचा हा सारांश होता. त्यामुळे आम्ही हे मुद्दे क्षेत्र संचालक श्री. गरड, एपीसीसीएफ श्री. कळसकर आणि श्री. मोई पोक्कीम या पूर्व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्हाला या संकल्पनेवर काम करण्यास सांगितले. या चर्चेमुळे आमच्या या ताडोबा  भेटीची सुरूवात झाली.चार दिवस ताडोबा जंगलाच्या विविध विभागांमधून आम्ही फिरत होतो. जंगलातील वनसंपदा, भौगोलिक रचना, प्राण्याची ठिकाणे, ताडोबाशी संबंधित लोक या सगळ्यांची छायाचित्र आम्ही घेतली. ताडोबाशी कोणत्याही प्रकारे संबंध असलेल्या प्रत्येकाशी आम्ही संवाद साधला. ताडोबासारख्या मोठ्या आकाराच्या जंगलाचा व्याप सांभाळणे जिकीरीचे काम आहे आणि त्यासाठी बऱ्याच मूलभूत सुविधांची गरज असते. यात पर्यटकांसाठी रस्ते बांधणीपासून ते वनकर्मचा-यांसाठी कल्याणकारी कामांचा समावेश होतो. उदा. जंगलाच्या आतमध्ये वनसंरक्षक आणि कामगारांसाठी राहण्याची सोय करणे व  ईतर अनेक आणि या सर्वांसाठी पैशाची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी सरकारतर्फे निधीची तरतूद केली जाते हे मान्य, पण तो निधी योग्यवेळेस योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. जंगलातील अनेकांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट जाणवली की प्रत्यक्षात जंगलात काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे वरिष्ठ यांच्यात संवादाचा अभाव आहे. तसा प्रत्येक संस्थेत वरपासून खालपर्यंत संवादाचा थोडाफार अभाव असतो. पण वनविभागात मात्र अधिकारी वर्ग आणि जंगलातील गार्ड किंवा fa^रेस्टर यांच्या राहण्याच्या परिस्थितीत बरीच  तफावत असते. जसे मी नेहमी म्हणतो सुरक्षित अशा जिप्सीतून जंगलाची सफर करणे, फोटो काढणे आणि त्यानंतर तुमच्या आरामदायी अशा निवा-यात आराम करण्यासाठी परतणे हे खूप सोपे आहे. पण त्याच जंगलात जेव्हा तुम्हाला दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस ४८ डिग्री सेल्सिअस तापमान, मुसळधार पाऊस आणि थंडीमध्येही रहावे लागते तेव्हा त्याच जंगलाचा तुम्हाला तिटकारा यायला लागतो. त्यामुळेच ताडोबाच्या आतील भागात कनिष्ठ पातळीवर होणारी नेमणूक ही शिक्षा समजली जाते अशी भावना त्या कर्मचा-यांनी आमच्यापाशी व्यक्त केली. परिणामी प्रत्यक्ष जंगलात काम करणारे कर्मचारी सतत बदलत असतात. यावरुन व्यवस्थेमधील पोकळी दिसून येते. जर आपल्याला ताडोबा जागतिक पातळीवर न्यायचे असेल तर या गोष्टी सुधाराव्या लागतील. त्यानंतर अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाची कथेप्रमाणे बाहेरील समाज अनेक मार्गांनी आपल्या जंगलाचे रक्षण करणा-या या लोकांच्या मदतीसाठी एकत्र येऊ शकतो. अनेकजण जंगलाशी संबंधित समस्यांवर काम आणि सहकार्य करायला तयार आहेत. पण त्यांनी सरकारला थेट पैसा द्यावा अशी अपेक्षा करता येणार नाही कारण सामान्यांचा सरकारवर विश्वास नाही हे कटु सत्य आहे. पण आपण जर त्यांना जंगलामधल्या सेवा सुविधांसाठी थेट पैसे देण्यास सांगितले तर आपण दिलेल्या पैशांचा होणारा चांगला उपयोग पाहून ते तयार होतात. उदा. कोलसा भागात सौरपंपांसह कूपनलिकेची गरज आहे मग आपण एखाद्या एजन्सीकडे काम देऊन लोकांनी त्या कंत्राटदाराला थेट पैसे देऊन वनविभागाच्या देखरेखीखाली काम पूर्ण करुन घेऊ शकतो. अशाप्रकारच्या देणग्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या कूपनलिकांवर देणगीदारांची नावे लिहिण्याचा पर्यायही आपण देऊ शकतो.नुकतेच कान्हा जंगलात आम्ही जंगलातील मजुरांसाठी जंगलात वापरता येणा-या बुटांचे वाटप केले, अशाप्रकारे उपक्रम समाजाच्या निधीतून राबवले जाऊ शकतात. पर्यटकांसमोर ताडोबाचे योग्य विपणन करण्यामागे हे आणखी एक कारण आहे.

खरेतर विपणन हा योग्य शब्द नाही पण ताडोबाचे वैभव लोकांपर्यंत पोहोचवणे असा त्याचा मतितार्थ आहे. सध्या ताडोबा हे वाघांचे राज्य आहे पण हे तेवढ्यापुरतच मर्यादित आहे का? दरवर्षी इथे हजारो पर्यटक येतात, वाघांचे फोटो काढतात, त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात आनंदाने परत जातात आणि थोड्याच दिवसात ताडोबाला विसरतात. पर्यटकांनी ताडोबाला पुन्हा भेट देण्याबरोबरच त्यांनी ताडोबाच्या कायम संपर्कात रहावे यासाठी आपल्याला काही करायची गरज आहे.ज्यांनी ताडोबाला भेट दिली आहे त्यांच्यासाठी हे आहे... आणि ज्यांनी आतापर्यंत भेट दिली नाही, त्यांच्या पर्यटनाच्या यादीमध्ये ताडोबाचे नाव सर्वात आधी असेल यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण ताडोबाला प्रायोगिक प्रकल्प बनवला पाहिजे आणि त्यानंतर हाच उपक्रम भोर, पेंच, मेळघाट आणि राज्यातील इतर जंगलांमध्येही राबवता येऊ शकतो.प्राथमिक स्तरावर आम्ही खालील गोष्टी सुचवल्या आहेत-
सगळ्यांत आधी इंटरनेटचे ज्ञान असलेल्या आणि संगणक तज्ज्ञ अशा दोन व्यक्तींचा एक गट तयार करावा. महत्त्वाचे म्हणजे गरड सर आणि पोकिम सर यांच्यासारख्या उच्चस्तरीय अधिका-यांचा त्या गटावर दबाव असणे. दुसरे म्हणजे नियोजनपूर्वक आणि वेगाने कृती करणे. यासाठी मी काही उपयुक्त सूचना तुम्हाला सांगत आहे-
१.      ताडोबाची एक सचित्र माहिती पुस्तिका आणि लेख तयार करा. यातून ताडोबा हे केवळ वाघांसाठीच नाही तर आपल्या जगासाठीही किती महत्त्वाचे आहे ते समजेल. ताडोबासारखी ठिकाणे ही माणसासाठी निसर्गाची भेट आहे हे त्यांना समजू द्या. पण या दैवी देणगीचं संवर्धन करण्यासाठी पगारी लोकांव्यतिरिक्त आणखीही बरंच काही करण्याची आवश्यकता आहे.या माहितीपुस्तिकेत वरिष्ठ वनाधिका-यांचे संदेश असतील, तसेच ताडोबाला आवश्यक असलेल्या सोयी सुविधा आणि प्रत्येक सदस्याचे योगदान याचा समावेश असेल. हे अत्यंत सोप्या भाषेत असेल तेच त्यात उदाहरणे आणि विक्रमने काढलेली छायाचित्रे असतील. ही माहितीपुस्तिका पर्यटक ताडोबामधून परत जाताना स्मरणिका म्हणून सोबत नेतील. आपण शुल्कामध्येच या माहितीपुस्तिकेच्या किंमतीचा समावेश करू तसेच तीन किंवा त्यापेक्षा जास्त सफारींवर माहितीपुस्तिका मोफत अशी योजनाही राबवू. त्याशिवाय एक खास माहितीपुस्तिका बनवून प्रवेशद्वारावर विक्रीला ठावता येईल. यातून ताडोबाला उत्पन्न मिळू शकेल.
२.    ताडोबाला भेट देणा-या सर्वांचे इ-मेल आपल्याकडे आहेत. जी-मेलवर एक ग्रूप बनवून आपण एक इ-कॅलेंडरही बनवू शकतो. हे इ-कॅलेंडर सर्व सदस्यांना दर महिन्याला पाठवले जाईल, त्यात ताडोबामधील त्या महिन्याचे सर्वोत्कृष्ट छायाचित्र आणि घडामोडी यांचा समावेश असेल. या कॅलेंडरसोबतच ताडोबाचे बातमीपत्रही असेल. आपण राबवत असलेल्या कल्याणकारी उपक्रमांमध्ये संचालक आणि इतर लोकही योगदान देऊ शकतात. आपल्याला येणा-या अडचणी आणि आपण ताडोबाचे संवर्धन करण्यासाठी त्यातून कसा मार्ग काढतो, हेही त्यात असेल. हे छोटं असलं तरी मुद्देसूद असेल. यामुळे पर्यटकांच्या संपर्कात राहणे शक्य होईल. कारण सध्या प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो आणि त्यावर ई-मेल उपलब्ध असते. अशाच एका स्वंयसेवी संघटनेच्या इ-कॅलेंडरची लिंक पाठवित आहे.
3. या महिन्यात ताडोबामध्ये सामाजिक स्तरावर काय घडले याची माहिती आपण या माध्यमातून देऊ शकतो. तसेच ताडोबासाठी लोक कशा प्रकारे योगदान देऊ शकतात याबाबत आवाहन करू शकतो. अनेक लोक मदत करायला उत्सुक असतात, पण आपल्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होईल की नाही याबद्दल ते साशंक असतात. आपल्या कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहिल्यास, त्यांचा पैसा योग्य हातांमध्ये असल्याचा विश्वास त्यांना वाटेल.
४. ताडोबाचे राज्य, राष्ट्र आणि जगासाठी असलेलं महत्त्व, ताडोबाची वैशिष्ट्ये आणि ताडोबाची कार्यपद्धती याबद्दलचे ४० मिनिटांचे सादरीकरण आपण तयार करू. ताडोबात काम करणा-या सदस्यांचे संदेश, भरपूर दृश्यं, तसंच ताडोबामधील वनस्पतींबाबतची माहिती तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ताडोबापुढे असलेली आव्हाने यांची सामग्र माहिती देणारे ते एक कलात्मक सादरीकरण असावे. दोन जणांचा एक गट मोठ्या शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सादरीकरणासाठी आपण पाठवूया. त्यामुळे लोकांना विशेषत: तरुणांना ताडोबाच्या आत नेमके काय आहे याची माहिती होईल. आपण याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर पुण्यापासून तयार करू. आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील वन्यप्रेमी आणि सँक्च्युरी एशियाज नेटवर्क आणि किर्लोस्कर फाऊंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून देशातील मोठ्या शहरांपर्यंत पोहोचता येईल.
५. केसरी आणि वीणा वर्ल्डसारख्या पर्यटन संस्थांपुढे आपण सादरीकरण करु. या संस्थांचे पर्यटक आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे या माध्यमातून ताडोबाची आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिरात करु शकतो.  आपल्याला खूप ही करता येऊ शकते, पण त्यासाठी आपल्याकडे चांगली दृश्य माहिती आणि लिखित माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हे सर्व पर्यटकांना उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. ताडोबा हे आधीच प्रसिद्ध आहे. आता फक्त यामागील लोकांच्या प्रयत्नांची माहिती पर्यटकांना करुन देणे आणि त्याही पुढे जाऊन आधी राज्यातील आणि नंतर देशातील प्रत्येक पर्यटकाच्या तसेच नागरिकाच्या मनात हे रुजवावे लागेल हा पुढचा टप्पा असेल.
६. ताडोबाचे फेसबुक पेज बनवल्यास त्यावर लोक आपले अनुभव,छायाचित्र आणि ताडोबासाठी योगदान देऊ शकतील.
७. ताडोबामध्ये मार्गदर्शकांच्या दोन श्रेणी आपल्या तयार करता येतील. मार्गदर्शक हे जंगल आणि पर्यटकांमधील दुवा असतात.तसेच ताडोबामध्ये परदेशी त्याचप्रमाणे अहिंदी भाषक राज्यांमधीलपर्यटकही भेट देतात. त्यांच्याशी उत्तम इंग्रजी बोलणारे मार्गदर्शक नेमण्याची हीच वेळ आहे. आपण या मार्गदर्शकांना अधिक चांगले मानधन देऊ शकतो आणि ते ग्राहकांकडून वसूल करु शकतो. जगभरात जिथे जास्त पर्यटक भेट देतात आणि भाषा ही एक अडचण असते तिथे विशिष्ट भाषा बोलणारे मार्गदर्शक नेमण्याची पद्धत आहे. यामळे स्थानिक मुलांनासुद्धा शिक्षण आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळून चांगला रोजगार मिळू शकतो.
८. आपण मोहार्ली गेटपासून ते ताडोबा तलावापर्यंत आणि परत तेलियापर्यंत मुख्य रस्त्या दाखवणारा दीड तासाच्या छोट्या सहलींचा विचार करु शकतो. बसमधून होणा-या सहली शाळकरी विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी शुल्कात असतील आणि दुपारच्यावेळी ताडोबा जेव्हा बंद असते ती वेळ सोडून अशा सहली आयोजित करता येऊ शकतात. यामुळे जास्तीत जास्त मुले ताडोबा बघू शकतील आणि ते भविष्यात हीच मुले जंगलाचे रक्षक बनतील.
९. प्रवेशद्वारावर उत्तम स्वच्छतागृहाच्या सोयीसह माहिती देण्यासाठी संवाद केंद्र असणे आवश्यक आहे. या केंद्रात पर्यटक तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांची छायाचित्रे लावलेली असतील. स्थानिक खेड्यांमधील जीवनाचे दर्शन घडवणारी माहिती छायाचित्रांसह तिथे लावलेली असेल. ताडोबाशी संबंधित चलचित्र बघता येतील असे खुले प्रेक्षागृह असणे आवश्यक आहे.

१०. ताडोबाबाबत दुर्लक्षिला जाणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोहार्ली गावाची स्वच्छता. येथील लोक सकाळचे सर्व नैसर्गिक विधी उघड्यावर ताडोबाकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर करतात.ताडोबासारख्या आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेल्यापर्यटनस्थळासाठी ही बाब नक्कीच चांगली नाही. हाच प्रकार ताडोबाच्या परिसरातील कच-याचा आहे. हा सगळा कचरा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर टाकला जातो आणि हा प्रकार ताडोबामधील जैवविविधतेच्यादृष्टीनं अत्यंत घातक आहे. या अत्यंत मूलभूत गोष्टी आहेत आणि एकदा आपण यावर काम करायला लागलो की नंतर या प्रक्रियेत समावेश असलेल्या इतर गोष्टींवरही मार्ग काढू शकतो. लोकांपर्यंत जंगल पोहोचणे महत्त्वाचे आहे. समाजात  दोनप्रकारचे लोक असतात एक म्हणजे ताडोबासारख्या विशेष राखीव जंगलांना भेट देणारे आणि दुसरे ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीही जंगल बघितलेले नाही. परत पहिल्या प्रकारात जंगलात वाघ बघितलेले आणि न बघितलेले लोकही मोडतात. ज्यांनी वाघ बघितलेला आहे त्यांना त्यांची जबाबदारी समजावून देण्याची ताकद वाघातच असते. पण आपले उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांनी जंगलाला भेट देणे आणि वनसंरक्षणाच्या जबाबदाराची जाणीव निर्माण करणे हे आहे.

मान्य आहे की वाघ हा ताडोबाचा राजदुतच आहे मात्र ताडोबामध्ये वाघाशिवायही बरंच काही आहे. अगदी लहानशा पक्षांपासून ते फुलपाखरांपर्यंत ते रंग बदलणा-या रबराच्या झाडापर्यंत, जंगल चैतन्यानं ओथंबलेलं असतं व जंगलाची ही बाजू समजून घेतली की आपला आजूबाजूला बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो! ताडोबाने पर्यटकांना वाघ पाहण्याचा आनंद देण्यासोबतच आपण निसर्गाचं देणं लागतो ही जाणीव रुजवली पाहिजे. ही जाणीव रुजल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येक जण जंगलाचा दूत होईल व ताडोबातल्या वाघांसाठी यापेक्षा अधिक चांगली गोष्ट कोणती असू शकते!

शेवटी माझ्या ताडोबा भेटीतला थोडासा व्यक्तिगत अनुभव सांगतो जी माझी व्यक्तिगत कमाईच  आहे, प्रवेशद्वारापाशी एक कँटर म्हणजे खुली बस उभी होती जी पर्यटकांना जंगलाची सफर घडवते, त्या बसवर एका डरकाळणा-या वाघीणीचं चित्र होतं! ते छायाचित्र अगदी ओळखीचं वाटलं व नंतर मला जाणीव झाली की ते मीच काढलेलं होतं! आता हा आनंद शब्दात कसा व्यक्त करता येईल! ही भावना व्यक्त करण्यासारखी नाही तर स्वतः अनुभवण्यासारखी आहे! मी काढलेलं वाघीणीचं चित्र ताडोबामध्ये पर्यटकांसाठीच्या बसवर प्रदर्शित करण्यात आलं होतं हे पाहून मला अतिशय आनंद झाला! अशा लहान गोष्टी आपल्या ला  जो अवर्णनीय आनंद देतात त्या कितीही बालीशपणाच्या वाटल्या तरीही आपण त्या करत राहिलं पाहिजे व आपल्याला जे आवडतं ते जोपासलं पाहिजे कारण त्यातूनच तुम्हाला निखळ आनंद मिळतो! मला असं वाटतं ताडोबासारख्या ठिकाणांहून मिळणारा हा आनंद अनमोल आहे आणि तो अनुभवण्यासाठी तरी तेथे जायलाच हवं !

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स





Wednesday, 25 February 2015

डिपी नावाचा तमाशा !











































नोकरशाही म्हणजे कोणत्याही चांगल्या कामाचा दु:खद अंत करणारी यंत्रणा.                … अल्बर्ट आईनस्टाईन!

हे काही माझ्या तोंडचे शब्द नाहीत तर हे ज्यांचे विधान आहे त्यांची बुद्धिमत्ता व विज्ञानामध्ये उत्तरोत्तर प्रगतीसाठीचे त्यांचे समर्पण वादातीत आहे, म्हणूनच मी बिनधास्तपणे त्यांच्या विधानानेच लेखाची सुरुवात करतोय. कोणत्याही पीढीमध्ये ज्यांची ओळख देण्याची गरज नाही अशी अगदी बोटावर मोजण्याइतकी नावं आहेत व आईनस्टाईन हे त्यापैकीच एक आहेत. बरेच जण विशेषतः माझे अनेक नोकरशाहीतील मित्र नक्कीच नाराज झाले असतील की मी हे विधान का निवडले व हा विषय कोणत्या दिशेने चालला आहे? फारसा तर्क लावण्याची गरज नाही कारण आपण ज्या शहरात राहतो ते आपल्या मेंदुला पुरेसे खाद्य देते, केवळ आपण त्याचा वापर केला पाहिजे. या लेखात मी सध्याचे शहर किंवा जुने शहर किंवा तुम्ही त्याला जे काही म्हणत असाल त्याच्या विकास योजनेविषयी म्हणजेच डीपीविषयी सांगणार आहे

ज्या भाग्यवान महाभागांना एखाद्या शहराचा डीपी म्हणजे काय हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक शहराला भविष्यातील विकासासाठी एक योजना हवी असते. शहरातील नागरी प्रशासनाला शहरातील विकासाचे नियोजनबद्धपणे नियंत्रण करता यावे म्हणून नियम व कायद्यांसह तपशीलवार योजना तयार केली जाते. त्यामध्ये शहराच्या हद्दीतील सर्व जमीनीचे  नकाशे तयार करण्याचा व ही जमीन योग्य हेतूने वापरली जात आहे का हे पाहण्याचा समावेश होते जे एका चांगल्या शहरासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ घर बांधणीसाठी कितीही प्रचंड मागणी असली तरीही आपण सर्व जमीन निवासी हेतूने आरक्षित ठेवू शकत नाही. कुठल्या नियोजनाच्या केंद्रस्थानी घर बांधणी असली तरीही केवळ घरे बांधून उपयोग नाही तर त्यांच्यासाठी इतर पायाभूत सुविधाही उभाराव्या लागतात उदाहरणार्थ कार्यालयांसाठी जागा, बाजार व मॉलसारख्या व्यावसायिक जागा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी व कचरा प्रकल्प, मनोरंजन व इतर अशा अनेक सुविधाही जेवढी घरे असतील त्या प्रमाणात असल्या पाहिजेत. त्याचवेळी सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक बागा व मैदाने असली पाहिजेत, व या सर्वांचे नियोजन करताना आपण निसर्गाचे म्हणजेच शहरातील व आजूबाजूच्या भागातील झाडा-झुडुपांच्या, प्राणी-पक्षांच्या रुपातील जैवविविधतेचे संवर्धन केले पाहिजे. म्हणजेच शहरातील नद्या, डोंगर, जंगल व जैवविविधतेचे म्हणजेच प्राणी व पक्षांच्या प्रजातींचे संवर्धन केले पाहिजे. या सर्व घटकांचेच एकत्रितपणे चांगले शहर बनते. या सर्व हेतूने केवळ जमीनीची तरतूद करुन पुरेसे होत नाही तर तुम्हाला ते प्रत्यक्ष साकार करण्यासाठी मूलभूत नियम तयार करावे लागतात. म्हणजेच विशिष्ट भूखंडामध्ये आपण किती चौरस फूट जागेवर घरे बांधू शकतो किंवा इमारतीची उंची किती असली पाहिजे व उंच इमारतींसाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे. ये-जा करण्याच्या रस्त्यांची रुंदी व त्यांचा इमारतीच्या स्वरुपाशी संबंध व अशा इतर अनेक अटींचा प्रत्येक इमारतीचा आराखडा मंजूर करताना विचार करावा लागतो, हा आराखडा भविष्यातील प्रत्येक स्थितीचा विचार करुन तयार करावा लागतो. हा डीपी जवळपास वीस वर्षांसाठी असतो, त्यामुळे त्यामध्ये लोकसंख्या वाढीसारख्या भविष्यातील आव्हानांचा व शहराच्या गरजांचा विचार झाला पाहिजे. आजचे रस्ते सध्याच्या वाहनांसाठी कदाचित पुरेसे वाटतील; बरेच जण माझ्या विधानावर हसतील मात्र माझ्यावर विश्वास ठेवा मी केवळ एक उदाहरण देत आहे, आपण सार्वजनिक वाहतुकीची चांगली तरतूद केली नाही तसेच कार्यालय, शाळा, मनोरंजानाची ठिकाणे यासारख्या जागी घेण्यासाठी कमीत कमी प्रवास करावा लागेल असे आपण नियोजन केल्याशिवाय पाच वर्षांनंतर हेच रस्ते पुरेसे पडणार नाहीत! हे सर्व नियोजन व नियमावली व धोरणांना विकास योजना व डीसीआर म्हणजे विकास नियंत्रण नियम असे म्हणतात, जो सध्या आपल्या शहरातील चर्चेचा विषय झाला आहे!

मात्र आपण हे करण्यात अपयशी झाल्याचाच अनुभव आपल्याला सगळीकडे येत आहे. याआधी तयार करण्यात आलेले डीपी शहराच्या वाढीचा अंदाज बांधण्यात अतिशय अपयशी ठरले आहेत व परिणामी आपल्याला रहदारीचा गोंधळ व अपुरी सेवा दिसत आहे. दररोज रस्ते खणले जातात, अगदी नव्याने तयार केलेले रस्तेही खणले जातात! मग ते ऑप्टिकल फायबरसाठी असोत किंवा गॅस पाईपलाईनसाठी किंवा एमएसईबीच्या वीजेच्या केबल्स घालण्यासाठी,  या सेवांसाठी रस्त्यांचे नियोजन करतानाच तरतूद करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत व संपूर्ण शहराला त्यामुळे त्रास होतो. आधीच्या डीपींमध्ये कचरा डेपो म्हणजेच कचरा टाकण्यासाठीच्या ठिकाणासारख्या आवश्यक मूलभूत गोष्टींसाठी तरतूद करण्यात आली नव्हती व वर्षानुवर्षे आपण फक्त फुरसुंगी कचारा डेपोवरच अवलंबून आहोतशहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या अत्यावश्यक सेवांचीही कमतरता आहे व याआधीच्या डीपींमध्ये त्यासाठी काहीही तरतूद नाही. रोहित्र केंद्रांसाठी कोणतीही तरतूद नव्हती जी संपूर्ण शहरात वीज वाहिन्यांचे जाळे तयार करण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे एमएसईबीचे जाळे शहराच्या मध्य भागात अतिशय कमकुवत झाले. डीपी व्यवस्थित तयार केलेला नसेल तर शहराचे व नागरिकांचे काय होते याची ही काही उदाहरणे आहेत व गेल्या काही वर्षाच असेच चालले आहे.

आता डीपीविषयी ज्ञान मिळाल्यानंतर लोक विचारतील की जुन्या किंवा सध्याच्या शहराचा डीपी म्हणजे काय? सध्याचे शहर म्हणजे काय? पूर्वीपासूनच संपूर्ण शहर अस्तित्वात नव्हते का? त्याचा अर्थ असा होतो की १९५० साली अस्तित्वात आलेल्या पुणे महानगरपालिकेची हद्द व जवळपास पंधरा वर्षे पूर्वीपर्यंत ही हद्द तशीच होती. त्यानंतर आजूबाजूची अठरा गावे पीएमसीच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली ज्याला आपण नवीन शहर म्हणतो व जुन्या हद्दीतल्या शहराला जुने शहर म्हणतो. आता कृपया मला विचारु नका की जुन्या व नवीन शहरासाठी दोन स्वतंत्र डीपी बनविणे हा काय विनोद आहे, कारण मला शंका वाटते की मीच कशाला देवाकडेतरी त्याचे उत्तर असेल का? एकाच शहरासाठी दोन डीपी का आहेत हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. म्हणूनच आपण सध्यातरी जुन्या शहराच्या डीपीवर लक्ष केंद्रित करणार आहोत, तुम्हाला आत्तापर्यंत या संपूर्ण डीपीनाम्याविषयी पुरेशी माहिती मिळाली असेल! भरपूर वाद व चर्चेनंतर जुन्या शहराचा डीपी तयार करण्यात आला व सार्वजनिक करण्यात आला कारण डीपीच्या मसुद्यावर भागधारकांकडून म्हणजे सोप्या शब्दात जनतेकडून किंवा नागरिकांकडून सूचना व हरकती मागवणे बंधनकारक आहे! आपल्या नावाला जागत पुणेकरांनी भरपूर प्रतिसाद दिला व डीपीविषयी जवळपास ऐंशी हजार सूचना आल्या! म्हणूनच पीएमसीने नियुक्ती केलेले तीन व राज्य सरकारने नियुक्त केलेले चार सदस्य असे मिळून सात सदस्यांची एक समिती नागरिकांनी दिलेल्या सूचनांची सुनावणी करण्यासाठी स्थापित करण्यात आली व हे काम जवळपास चार महिने चालले! रस्त्यांची आखणी बदलण्यापासून ते संबंधित भूखंडाचे आरक्षण रद्द करण्यापर्यंत (जे स्वाभाविक आहे) सर्व सूचनांची सुनावणी झाली व त्यामागचा तर्क ऐकून घेण्यात आला, त्यानंतर या समितीने पीएमसीला आपले मत एका अहवालाच्या स्वरुपात देणे अपेक्षित होते! इथपर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते, मात्र या सुनावणीचा निष्कर्ष काढण्याची वेळ आली तेव्हा खरी गंमत झाली! समितीने दोन अहवाल तयार केले म्हणजे राज्याने नेमलेल्या तज्ञ सदस्यांनी वेगळ्या सूचना दिल्या व पीएमसीने नेमलेल्या सदस्यांनी आपल्या सूचना दिल्या! आता हे असं फक्त पुण्यातच होऊ शकतं. आता या दोन्ही अहवालांमधील निष्कर्ष निवडण्यासाठी आणखी एक समिती निवडायची का? माध्यमांमध्ये डीपीशी संबंधित प्रत्येकाकडून जी विधाने केली जात आहेत त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात शहराच्या भविष्याबद्दल फक्त गोंधळच निर्माण होईल. तज्ञ असे म्हणतात की त्यांना शहराचे तपशीलवार नकाशे किंवा नदीची पूररेखा किंवा डोंगराचा आकार यासारखे व इतरही बरेच मूलभूत तपशील देण्यात आले नाहीत! तसेच बहुतेक सूचना वैयक्तिक भूखंडांवरील आरक्षण रद्द करण्याविषयी किंवा प्रस्तावित रस्ते रुंदीकरण रद्द करण्याविषयी होत्या, तसेच काही तज्ञांनी तर असाही दावा केला आहे की त्यांच्या अहवालातील पानेच बदलण्यात आली आहेत! हा गंभीर आरोप आहे व प्रशासनातील किंवा महापालिकेतील कुणीही तो ठामपणे फेटाळलेला नाही! समितीला पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती तर मग तिच्या सदस्यांनी हरकतींच्या सुनावणीचे काम सुरु का ठेवले? महापालिका किंवा संबंधित अधिका-यांनी समितीच्या सदस्यांना एकत्र बसून, विचारविनिमय करुन एकच अहवाल तयार करण्याची सूचना देण्याऐवजी दोन अहवाल का स्वीकारले? त्यांच्यातील मदतभेद अतिशय गंभीर आहेत. एका समितीचे म्हणणे आहे की संपूर्ण शहरात तिप्पट एफएसआय द्या तर बाकिच्यांचे म्हणणे आहे की केवळ मेट्रोच्या मार्गाच्या बाजूनेचे तेवढा एफएसआय द्या! एफएसआयसारख्या मूलभूत मुद्यावर एवढे मतभेद असतील तर मग देवच शहराचे रक्षण करो व काही तज्ञांनी याच शब्दात सांगितले आहे की या डीपीची अंमलबजावणी झाली तर शहराचं वाटोळं होईल 

कारण आपण एफएसआयसारख्या मूलभूत गोष्टीवर निर्णय घेऊ शकत नसू तर जमीनीचा वापर, नदीची मरणप्राय अवस्था, नामशेष होत चाललेली जैवविविधता व दिवसाच्या कोणत्याही वेळी होणारी वाहतुकीची कोंडी व सतत वाढती रहदारी, या सर्व नागरी समस्या दुर्लक्षितच राहतील! अलिकडेच आणखी एक बातमी आली होती जी दुर्लक्षितच राहीली की या वर्षी मेट्रोसाठी करण्यात आलेली तरतूद कोणत्यातरी उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरण्यात आली; ही बातमी खरी असेल तर मग अर्थसंकल्प किंवा डीपी कशाला तयार करायचा? कारण आपण ज्याचे नियोजन करत असू त्याचे पालन करणार नसू व आपण अर्थसंकल्पातील तरतूद नियोजित कारणाऐवजी इतर गोष्टींसाठीच वापरणार असू, तर हे शहराच्या संपूर्ण नियोजनाची खिल्ली उडविण्यासारखेच आहे! सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सध्या डीपी संपला आहे व नवीन डीपी अजून निश्चित झालेला नाही व तो कधी निश्चित केला जाईल हे कुणालाही माहिती नाही, म्हणूनच सध्या कोणताही डीपी नाही तरीही विकासाची कामे सुरुच आहेत! यामुळे शहराचे जे नुकसान होत आहे त्याला कोण जबाबदार आहे? आपले शासनकर्ते म्हणजेच आपण निवडलेले लोकप्रतिनिधी जेव्हा प्रशासनाने अमूक दिले नाही किंवा प्रतिसाद दिला नाही किंवा प्रशासन अकार्यक्षम आहे अशी तक्रार करतात, व माध्यमेही ब-याचदा जेव्हा त्यांचीच री ओढळतात तेव्हा मला खरोखरच आश्चर्य वाटते. हे लोकप्रतिनिधी अशा तथाकथित प्रशासकांची किंवा पदाधिका-यांची नावे का जाहीर करत नाहीत? म्हणजे दोषी व्यक्ती सापडेल व तिच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. तथाकथित तज्ञांची मते जर एवढी नकारात्मक असतील तर हा डीपी रद्द करुन एक नवीन तयार करा किंवा आणखी एक समिती नियुक्त करा व सर्व सुनावण्या पुन्हा घ्या! कारण एकतर तज्ञांचे म्हणणे बरोबर आहे किंवा ते मूर्ख आहेत, दोन्ही परिस्थितीत त्यांचा निष्कर्ष स्वीकारता येणार नाही जे सध्या होत आहे! खरं तर माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी हे सगळे रँबो सर्कसमधील विदुषकाच्या खेळाप्रमाणे आहे, ते एकमेकांना पोकळ बांबूने मारल्याचं नाटक करतात व मारण्याचा आवाज काढतात! दुर्दैवाने इथे कुणी जखमी झाल्याचेही नाटक करत नाही! खरं तर ज्या शहरातील नागरिक स्वतःच्या संरक्षणासाठीही हेल्मेट घालत नाहीत, वाहतुक पोलीस असल्याशिवाय रस्त्यावरील सिग्नलचे पालन करत नाहीत किंवा नदी स्वच्छ ठेवा असे लिहीलेल्या फलकाखालूनच नदीत कचरा टाकतात, ते सर्व अशा सर्कशीच्याच लायकीचे आहेत चांगल्या दिवसांच्या (अच्छे दिन) नाही!  

असे म्हणतात की आपण जे बी पेरतो त्याचीच फळे झाडाला येतात; आपण शहराच्या बाबतीत निष्काळजीपणाचे व निर्लज्ज स्वार्थी दुष्टिकोनाचे बीज पेरले आहे! त्यामुळे आपल्या शहराच्या या अवस्थेसाठी आपणच जबाबदार आहोत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण काळा गॉगल  घालून बसलोय व आपल्याला असे वाटते की आपण स्वर्गाचे दार उघडले आहे मात्र प्रत्यक्षात ते नरकाचे दार आहे! जोपर्यंत आपण आपला गॉगल दूर करत नाही व योग्य रस्त्यावर चालत नाही, आपल्या लोकप्रनिधींना आपण ज्या कामासाठी निवडलं आहे ते काम करायला लावत नाही तोपर्यंत, आपण नरकाच्याच लायकीचे आहोत त्यामुळे आपण तेथेच जाऊ!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




Thursday, 19 February 2015

बांधकाम क्षेत्रातील संधी शोधताना !





















रिअल इस्टेट ही जगातली सर्वोत्तम गुंतवणूक आहे, मात्र जेव्हा मंदी असते, जी कधीतरी येतेच, तेव्हा स्वतःचे स्थान भक्कम ठेवा.”…. स्टीव्हन आयव्ही, वकील.

या न्यूयॉर्क स्थित वकिलाने किती नेमक्या शब्दात रिअल इस्टेट उद्योगाचे वर्णन केले आहे, अर्थात त्याला उद्योग म्हणायचे का असा प्रश्न पडतो!
माझ्यासाठी नवीन वर्षातील चर्चा सत्रे व व्याख्यांनाचे सत्र जानेवारीतही सुरु होते, त्यातल्याच विषयावर हा लेखप्रपंच! मी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या फेररचनेच्या कामात सहभागी होतो व त्यामध्ये रिअल इस्टेटमधील संधी विद्यार्थ्यांना समजाव्यात म्हणजे विद्यार्थ्यांना या उद्योगाचा आवाका समजेल असे सुचवले होते. त्यामुळे या विषयाचा स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेच्या अंतिम वर्षात समावेश करण्यात आला व शासकीय तंत्रनिकेतनाने रिअल इस्टेटविषयी माझे विचार मांडण्यासाठी मला आमंत्रित केले होते. मला असे वाटले होते की एखाद्या लहानशा गटासमोरच बोलायचे आहे, त्यामुळे मी फारशी तयारी न करताच गेलो होतो. मात्र सर विश्वेशरैय्या समागृहात पोहोचताच जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात माझं स्वागत केल्यावर मला जरा टेन्शनच आलं ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर कोणत्याही तयारीशिवाय न बोलणं मी टाळतोच कारण त्यांचं लक्ष सलग पंधरा मिनिटही वेधून घेणं हे मोठं काम असतं, इथे तर मला रिअल इस्टेट उद्योगाविषयी तासभर बोलायचं होतं! मला अनेकदा वन्यजीवन निरीक्षक, पर्यावरणवादी किंवा बांधकाम व्यवस्थापनातील तज्ञ म्हणून अनेक मंचांवर व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र आज पहिल्यांदाच रिअल इस्टेटमधील व्यक्ती किंवा सामान्य माणसाच्या शब्दात मांडायचं झालं तर बांधकाम व्यावसायिक म्हणून बोलवण्यात आलं होतं! मात्र आता परतीचा मार्ग नव्हता मी कॉलेजच्या चमूला नकार देण्यापूर्वीच माझी ओळख देण्यास सुरुवात झाली होती व विद्यार्थी मोठ्या कुतुहलाने माझ्याकडे बघत होते कारण त्यांच्यापैकी बहुतेक पहिल्यांदाच कोणा बांधकाम व्यावसायिकाला प्रत्यक्ष पाहात होते!

मी त्यांच्या डोळ्यातील या कुतुहलाचाच धागा पकडून बोलायला सुरुवात केली, कारण जेव्हा सामान्य माणूस रिअल इस्टेटविषयी व बांधकाम व्यावसायिकांविषयी विचार करतो तेव्हा त्याच्या मनात विचार येतो तो पैशांचा! हाच या उद्योगातील सर्वात मोठा उपहास आहे कारण कुणीही अंतिम उत्पादनाकडे पाहात नाही तर सगळ्यांना त्यातल्या झगमगाटाचं अधिक आकर्षण असतं जो अर्थातच पैशामुळे येतोप्रत्यक्ष व्यवसायात असलेल्या प्रौढ व्यक्तिंनाही रिअल इस्टेट उद्योग कशाप्रकारे चालतो हे समजावून सांगणं कठीण असतं त्यामुळे नुकतीच एक पदविका घेऊन हा व्यवसाय मार्ग म्हणून स्वीकारण्याची इच्छा असलेल्या तरुणांना ते समजावून सांगणं कर्मकठीणच म्हणावं लागेल. मी त्यांना काय सांगणं अपेक्षित होतं? एक बांधकाम व्यावसायिक होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदविची किंवा अगदी शिक्षणाचीही गरज नाही! किंबहुना या उद्योगात मी असे अनेक महाभाग पाहिले आहेत जे विनोदाने म्हणतात की तुम्ही जितके अधिक शिकलेले असाल तितकी रिअल इस्टेट उद्योगामध्ये अपयशी होण्याची शक्यता अधिक असते! कारण शिक्षणामुळे तुम्ही विचार करु लागता व रिअल इस्टेटमध्ये तुम्ही जेवढे अधिक विचार करता तेवढी तुम्हाला त्यातील अनिश्चिततेची जाणीव होते व त्यानंतर तुम्ही निर्णय लांबणीवर टाकता व उशीर हा रिअल इस्टेट उद्योगाचा सर्वात मोठा शत्रू आहे! त्याचवेळी मी विकासकाच्या जबाबदा-या काय आहेत असा विचार करतो, तेव्हा कोणत्याही नाहीत असे उत्तर मिळते! फक्त तुमच्याकडे थोडाफार पैसा असला पाहिजे, तुम्ही या क्षेत्रातील उपलब्ध गुणी कर्मचा-यांना नियुक्त करता व कुणाना कुणाच्या खांद्यावर सर्व जबाबदारी देऊन इमारत पूर्ण करता; मग तो तुम्ही बांधकामाच्या ठिकाणी नियुक्त केलेला वास्तुविद्याविशारद असेल किंवा रचनात्मक सल्लागार किंवा अभियंता!

किंवा त्या विद्यार्थ्यांना मी असे सांगणे अपेक्षित आहे की पीएमसीपासून ते नागरी विकास विभागापर्यंत अनेक प्रशासकीय संस्थांचे नियम सतत बदलत असतात त्यामुळे इथे काहीही शाश्वत नसते! तुम्ही शक्य तेवढी सगळी कागदपत्रे तपासून खरेदी केलेल्या जमीनीच्या मालकी हक्काविषयी वाद असू शकतात कारण, जमीन मालकाच्या एखाद्या वारसाने इतर कोणत्या तरी बांधकाम व्यावसायिकाशी नोंदणी न केलेला करार केला असतो व तुम्ही जमीन मालकाला संपूर्ण पैसे दिल्यानंतर हे तुमच्या लक्षात येते! यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे असा नोंदणी न केलेल्या कराराचा दावा कायद्याद्वारे स्वीकारण्यात येतो व तुम्ही केलेला व्यवहार पाण्यात जातो, हे मी त्यांना सांगावे का? तुम्ही स्पष्ट मालकी हक्क असलेली जमीन खरेदी केल्यानंतरही तुमच्या जमीनीलगत असलेला रस्ता तुमच्या भूखंडात येऊ शकतो किंवा तुमच्या भूखंडापासून काही अंतरावरुनच मेट्रोचा मार्ग जाणार असतो, किंवा तुमचा भूखंड ज्या परिसरात येतो तेथील एफएसआयचे निकष निश्चित करण्यात आलेले नसल्याने तुमचा आराखडा मंजूर होत नाही! उद्याची स्वप्ने पाहणा-या या तरुणांना मी अशा गोष्टी सांगू का? किंवा तुम्ही तुम्हाला माहिती असलेल्या सर्व नियमांचे पालन करुन एखाद्या इमारतीचे नियोजन केल्यानंतर स्थानिक प्रशासकीय संस्थेने तयार केलेल्या नवीन नियमांच्या छपाईत चूक होते व आता ही चूक कधी दुरुस्त होईल हे संस्थेला माहिती नसते व तोपर्यंत तुम्हाला योजना मंजूर करुन घ्यायची असेल तर कमी एफएसआय मिळेल, यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे आर्थिक नियोजनच कोलमडते, या उद्योगात अशा गोष्टीही होतात हे मी या उत्सुक श्रोत्यांना सांगणार आहे का? सर्व कायदेशीर पेच, सरकारी निकषांतून पार पडण्याइतपत तुम्ही सुदैवी असाल व स्तंभ आलेख, सीपीएम व पीईआरटी सारख्या तंत्रांनी सर्व तांत्रिक निकषांचे पालन करुन तुम्ही प्रकल्प सुरु करु शकला; तर एखादी दगड व खडी उत्पादक संघटना संपावर जाते कारण आरटीओने वाळू व खडीसारखे साहित्य वाहून नेण्याच्या नियमांमध्ये बदल केलेला असतो व या साहित्याचे दर दुप्पट करावे लागतात, त्यामुळे एकतर त्यांना वाढीव दराने पैसे द्या नाहीतर त्या संपावर जातील, त्यामुळे तुमच्या ईमारतीच्या बांधकामातील प्रत्येक संबंधित काम खोळंबतेकोणताही सरकारी विभाग या संपात किंवा दर वाढीच्या मागणीत हस्तक्षेप करत नाही! त्यानंतर तुम्हाला कुठूनतरी बातमी समजते की स्थानिक प्रशासनानं वाळू उपशाचा लिलाव केला नसल्यामुळे बाजारात वाळू नाही व तुमच्या कंत्राटदारांचे मजूर काही काम नसल्यामुळे बसून आहेत! या सर्व अडचणींवर मात करत तुम्ही तुमचा प्रकल्प सुरु ठेवता तेव्हा तुम्हा माध्यमांच्या टीकेला तोंड द्यावे लागते की तुम्ही फक्त  पैसे कमावताय व घर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाण्यास केवळ तुम्हीच कारणीभूत आहात!

एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी अनुभवलेले असे किती तरी प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळले व मी एक अभियंताही आहे! मात्र मी स्वतःला बजावले की मी इथे बांधकाम व्यावसायिक म्हणून माझा बडेजाव करण्यासाठी आलेलो नाही तर या तरुणांनी रिअल इस्टेटचा एक भाग बनावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यास आलो आहे! रिअल इस्टेट विकासक होण्यासाठी तुम्ही प्रशिक्षित अभियंतेच असायलाच हवे असे नसले तरीही परिस्थिती झपाट्याने बदलतेय व हे आधीच्या पिढीतल्या विकासकांच्या बाबतीत लागू होते. आता नव्या पिढीतील रिअल इस्टेटमध्ये येणा-या व्यक्ती प्रशिक्षित आहेत व तेही रिअल इस्टेटशी संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रातील. याचे कारण म्हणजे ग्राहक बदलतोय, आता ग्राहक म्हणजे केवळ निवृत्त जोडपी नाही तर बरेच परिपक्व तरुण रक्त आहे जो रिअल इस्टेटच्या ग्राहकांचा चेहरा आहे, ते स्वतः तंत्रज्ञ आहेत किंवा सुशिक्षत आहेत. कोणतीही सुशिक्षित व्यक्ती घरासारख्या, आयुष्यात बहुधा एकदाच घेतल्या जाणा-या उत्पादनाच्या बाबतीत बाबतीत अशिक्षित बांधकाम व्यावसायिक निवडणार नाही! म्हणूनच सर्व अभियंत्यांसाठी ही चांगली बातमी आहे, असे मी या विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचवेळी एखादी अशिक्षित व्यक्ती बांधकाम करत असेल तर एक स्थापत्य अभियंता म्हणून त्याच्यापेक्षा अधिक चांगले बांधकाम करणे व तुमच्याकडे अधिक चांगले ज्ञान असल्यामुळे तुम्ही अधिक चांगले बांधू शकता हे समाजाला दाखवण्याची जबाबदारीही तुमची आहे. म्हणूनच रिअल इस्टेटमध्ये अभियंता असल्यामुळे तुम्हाला अभियंता नसलेल्या किंवा अशिक्षित स्पर्धकांपेक्षा निश्चितच अधिक वाव आहे! अर्थात हे शक्य करणे हे मोठे आव्हान आहे, मात्र आव्हानाशिवाय कामात काय मजा! शिक्षण हे शस्त्र आहे व त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर आहे; त्याला तुमच्या क्षमतांवर मर्यादा घालणारा फास होऊ देऊ नका तर तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे नवीन मार्ग शोधा

गेल्या काही वर्षात ब-याच गोष्टी बदलल्या आहे व ग्राहकांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असते व ते त्याचे कौतुकही करतात. आपल्या ज्ञानामुळे आपण जुन्याच गोष्टी नवीन पद्धतीने करण्याचे मार्ग शोधू शकतो, ज्यामुळे शेवटी ग्राहकांचाच लाभ होईल. यातील सर्वात चांगली बाब म्हणजे रिअल इस्टेटचा आजच्या ग्राहक हे जाणतो.
त्याचवेळी रिअल इस्टेटमध्ये येणे म्हणजे केवळ बांधकाम व्यावसायिक होणे असा अर्थ होत नाही, या उद्योगामध्ये इतरही भूमिका आहेत. या उद्योगाला चांगल्या कंत्राटदारांची गरज आहे, बांधकाम व्यवस्थापन सल्लागर, वास्तु रचनाकार हवे असतात, नळजोडणी व वॉटरप्रूफिंग करण्या-यांची सेवा व इतरही ब-याच गोष्टी आवश्यक असतात. या उद्योगामध्ये जितके अधिक सुशिक्षित लोक येतील तेवढे उद्योगात अधिक सुधारणा होईल. सध्या तिचे स्वरुप अतिशय अव्यावसायिक आहे हे मान्य आहे मात्र तो रिअल इस्टेटचा नाही तर त्यातील लोकांचा दोष आहे. कारण कोणताही व्यवसाय किंवा उद्योगाचा लौकिक त्यात मिळणा-या पैशांवरुन नाही तर त्याच्याशी संबंधित लोकांच्या दर्जावरुन ठरत असतो! रिअल इस्टेटची धोरणे व अव्यावसायिक चेहरा हा त्यातील लोकांमुळे आहे व ज्यांचे अंतिम उद्दिष्ट केवळ पैसा होता, चांगले घर नाही! रिअल इस्टेटसाठी आपल्या देशाची शंभर कोटींहून अधिक लोकसंख्या एक प्रकारे वरदानच आहे; कारण याचाच अर्थ असा होतो की अनेक घरांची आवश्यकता आहे. घर ही माणसाची मूलभूत गरज आहे व अन्न व निवारा या गरजांच्या बाबतीच आपण स्वयंपूर्ण झालो आहोत मात्र घरांची मागणी अधिक व पुरवठा कमी अशीच परिस्थिती आहे. सध्याच्या केंद्र सरकारने घरबांधणीविषयी अतिशय गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आहे व माननीय पंतप्रधानांनी येत्या तीन वर्षात जवळपास दोन कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यास सांगितले आहे व त्यामुळे या क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणावर पैसा तसेच संधी असतील याचा विचार करा! यामुळे रिअल इस्टेट हा व्यवसाय मार्ग म्हणून निवडण्यासाठी सर्वोत्तम उद्योग आहे व स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका घेतल्यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही बिगर तांत्रिक व्यक्तिपेक्षा इथे टिकण्याची जास्त संधी आहे.

आणखी एक मुद्दा आहे रिअल इस्टेटमधील सृजनशीलता, एखाद्या बिगर तांत्रिक व्यक्तिला मोकळ्या जागेवर बांधकामाचा विचार करुन त्यावर ते प्रत्यक्ष साकार करण्यात काय मजा आहे हे कदाचित कधीच कळणार नाही! सध्या या उद्योगामध्ये जुन्यापुराण्या संकल्पना बदलण्यासाठी नव्या कल्पनांची कमतरता आहे, यामध्ये रचनेपासून ते बांधकाम तंत्रांपर्यंत ते उत्पादनाच्या विपणनापर्यंत सर्व बाबींचा समावेश होतोनिसर्गाला पूरक इमारती व परवडण्यासारखी घरे या सारख्या क्षेत्रांमधल्या शक्यता अजूनही पडतळाण्यात आलेल्या नाहीत; व यामध्ये संशोधन व विकास हा सर्वात कमजोर दुवा आहे! तुमच्याकडे असलेल्या तांत्रिक ज्ञानाने तुम्ही उद्योगाला जाणवत असलेली ही कमतरता भरुन काढू शकता. ऑटोमोबाईल किंवा इतर कोणत्याही उद्योगाकडे पाहा ग्राहकांना त्यांच्या गरजा व खरेदीची क्षमता यानुसार हजारो पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत व त्याचवेळी रिअल इस्टेटकडे पाहा व आपण ग्राहकांना कोणते पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत हे पाहा; आपण यातही बरेच मागे आहोत! मला शिक्षणाच्या प्रत्येक शाखेविषयी अतिशय आदर आहे मात्र तरीही रिअल इस्टेटचा प्रामुख्याने संबंध स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंध येतो व स्वाभाविकपणे यातील  प्रशिक्षित व्यक्तिला अधिक महत्व मिळेल हे सत्य आहे. तसेच ज्याला शिक्षण मिळू शकत नाही तो या व्यवसायासाठी अपात्र आहे असा अर्थ होत नाही, त्याला शिक्षण उपलब्ध झाले नाही त्यामुळे तो शिकला नाही; कुणी स्वेच्छेने अशिक्षित राहात नाही हेच खरे! त्यामुळे ज्यांना शिक्षण मिळू शकले नाही त्यांच्यापेक्षा तुम्ही स्वतःला सुदैवी समजा व आता तुमचे उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे देण्याची जबाबदारीही तुमच्यावर आहे हे लक्षात ठेवा; मग तुम्ही बांधकाम व्यावसायिक नसलात तरी बांधकाम रचनाकार असाल किंवा कंत्राटदार असाल!

आपल्या देशात घर हे सर्वात महाग उत्पादन आहे व बहुतेक ग्राहक आयुष्यात एकदाच ते खरेदी करतात. तुम्ही ग्राहकांना तुमचे उत्पादन विकून रिअल इस्टेटमध्ये यशस्वी व्यक्ती बनता तेव्हा तुमची सामाजिक जबाबदारी विसरु नका ती म्हणजे समाजाप्रती तुमची जबाबदारी ज्याने तुम्हाला एक पात्र अभियंता बनविले आहेमाझ्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक होणे म्हणजे तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत किंवा तुमच्या कारचा ताफा किती मोठा आहे असा अर्थ होत नाही तर तुम्ही उद्योगाला व समाजाला काय परत दिले आहे असा होतो! यश तुम्ही किती चौरस फूट बांधकाम केले आहे किंवा तुम्ही किती सदनिका बांधल्या आहेत यातून दिसत नाही तर तुम्ही किती कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातले स्वतःचे घर देऊन आनंद दिला आहे यातच खरे यश आहे! यशाच्या या व्याख्येमुळेच तुमच्या शिक्षकांची तसेच तुमची मान अभिमानाने उंचावेल नाहीतर रिअल इस्टेटमध्ये पुरेसे बांधकाम व्यावसायिक आहेत जे पैशांनी यशस्वी आहेत. सर्वात शेवटची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही आधी अभियंते आहात व नंतर बांधकाम व्यावसायिक, याच्या उलट होऊ देऊ नका, हीच रिअल इस्टेट उद्योगाची तुमच्याकडून अपेक्षा आहे!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स