Thursday, 17 March 2016

जंगल म्हणजेच मन:शांती !























विश्वाचे अंतरंग समजावुन घ्यायचे असेल तर त्यासाठीचा मार्ग दाट जंगलांमधून जातो.”  जॉन मुईर

जॉन मुईर हे स्कॉटिश-अमेरिकी निसर्गप्रेमी, लेखक, पर्यवरणवादी होते. त्यांनी फार

पूर्वीच अमेरिकेतील वन्यप्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी ठाम भूमिका घेतली. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वत्र वने मोठा असतानाही मुईर यांना जंगलांचे व वन्यप्रदेशाचे महत्व जाणवले व त्यांच्या वरील अवतरणातून आपल्याला दिसून येते की ते काळाच्या किती पुढे होते! मी प्रत्येक वेळी जेव्हा जंगलाला भेट देतो तेव्हा, त्यांच्या अवतरणाचा अनुभव घेतो; व त्यांनी मांडलेला विचार अधिक सखोल समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी वॉट्स-अपवर एका मित्राशी गप्पा मारताना एक प्रश्न समोर आला, तुम्ही मनःशांतीची व्याख्या कशी कराल?” हा प्रश्न त्यानंतर सातत्यानं माझ्या मनात घुटमळत होता. काही वेळा तुम्हाला विचारण्यात आलेले प्रश्न तुम्ही विसरता कारण तुमच्याकडे तेव्हा त्याचे उत्तर नसते किंवा तुमच्यामध्ये त्याचे उत्तर शोधण्याएवढा संयम नसतो. मात्र तो प्रश्न मनातच कुठेतरी दडलेला असतो व तो विशेषतः तुम्ही एकटेच असताना तो पुन्हा अवतरतो येतो. अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी व स्वतःशीच संवाद साधण्यासाठी जंगलाशिवाय दुसरी कोणती चांगली जागा असू शकते! आणि मला जंगलातच जाणवलं की तुम्हाला मनःशांतीची व्याख्या करता येणार नाही कारण तुम्ही सगळ्या गोष्टींची व्याख्या शब्दात करु शकत नाही, काही गोष्टी तुम्हाला स्वतःच अनुभवाव्या लागतात; मनःशांती  देखील अशा गोष्टींपैकी एक आहे!

यासाठीच मी जंगलात पुन्हा पुन्हा जातो व माझ्या मित्रांना तसंच अगदी माझ्या 

घरच्यांनाही हा प्रश्न पडतो की मी वारंवार जंगलात का जातो? अनेकदा तर मी एकाच ठिकाणी किंवा एकाच जंगलात वारंवार जातो! अर्थात मला एक सांगावसं वाटतं की जंगल कधीच एकसारखं दिसत नाही, अनेक महिने किंवा वर्ष तर सोडाच एक पूर्ण दिवसही जंगल एकसारखे नसते व ते कधीच कंटाळवाणे किंवा निरस वाटत नाही तर नेहमी चैतन्याने सळसळत असते. तुम्ही कधी एखाद्या सकाळी शहरापासून दूर जंगलात गेला आहात का जिथे क्षितिजावर तुम्हाला इमारती किंवा आपल्या प्रिय नेत्यांच्या किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या जाहिरातींचे फलक नाही तर स्वच्छ निळे आकाश दिसेल? तुमच्यापैकी बहुतेकांचे उत्तर नाही असे असेल हे मला माहिती आहे, जंगलात गेल्यानंतर तुम्ही स्वच्छ, मोकळ्या आणि ताज्या हवेत श्वास घेता! खरतरं आपल्या शहरी शरीराला व मनाला याची सवयच राहिली नाहीये व ताजी हवा घेण्यापूर्वी तुम्हाला प्रथम जाणीव होते की इथे मोबाईलचं नेटवर्क नाही! मात्र याचा अर्थ असाही होतो की, तुम्ही निसर्गामध्ये पहिले पाऊल टाकले आहे कारण इथे मोबईलचं नेटवर्क नसतं म्हणजे तुम्ही समाज माध्यमांपासून (सोशल मीडिया) दूर असता व जगाशी तथाकथित पद्धतीने जोडलेले नाही. या जगात सगळं काही आहे मात्र मनःशांती  नाही व अशा जगापासून दूर गेल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थांनी आजूबाजूला पाहायला सुरुवात करता, तुमच्या शरीराला व मनाला वेढून टाकणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेऊ लागता! ३जी किंवा ४जी नेटवर्कद्वारे जगाशी जोडले जाण्यात गैर काही नाही मात्र या प्रक्रियेमध्ये कुठेतरी आपण स्वतःपासून दूर जात आहोत व जंगलामध्ये मात्र तुम्ही स्वतःच्या आणखी जवळ जाता! तुम्ही जशी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांची बॅटरी चार्ज करता तसं जंगलात गेल्याने तुम्ही मानसिकरित्या चार्ज होता व एक नवीन उत्साह व चैतन्य अनुभवता! अर्थात हा माझा अनुभव  आहे कारण मला असे लोकही माहीत आहेत ज्यांना जंगले कंटाळवाणे  होतात !

 इथे तुम्ही पहाटे ४.३० वाजता उठता, बाहेर अजूनही अंधार असतो, आकाशात तारे लुकलुकत असतात, तरी तुम्हाला जड किंवा अपुरी झाल्यासारखे वाटत नाही. एक कप गरमागरम चहा घेतल्यानंतर तुम्ही जिप्सित बसता, जिप्सी जंगलाच्या दरवाजातून प्रवेश करते व तुमच्यासमोर जंगलाचे समृद्ध निसर्गसौंदर्य उलगडत जाते. तुम्ही सूर्योदयाच्या वेळी निळ्याशार आकातून बाहेर येणारं लालबुंद सूर्यबिंब कधी पाहिलं आहे का, सूर्योदयाच्या या लालसर छटांमध्ये संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. त्यानंतर तुम्हाला जाणवतं की गर्द झाडी असलेल्या डोंगराच्या वर येणारा सूर्य फक्त पाहिल्यानंही किती ताजंतवानं आणि जिवंत वाटतं! सूर्योदयाच्या वेळी होणारी रंगांची उधळण त्यावेळी आकाशात दिसणारे ढगांचे आकार दररोज वेगळे असतात. त्यानंतर तुम्हाला झाडांचा व फुलांचा गंध जाणवतो, इथे आजूबाजूला कितीतरी झाडं आणि वेली असतात, यापैकी प्रत्येकीच्या उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. तुम्हाला दररोज वेगळा गंध अनुभवायला मिळतो जो बाटलीत अत्तरासारखा बंद करता येणार नाही व जतन करता येणार नाही तर तो अनुभवण्यासाठी तुम्हाला जंगलातच यावे लागेल. इथे तुम्हाला प्रत्येक झाडावर हिरवा, पिवळा व लाल या रंगांच्या असंख्य छटा दिसतात. कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडचे नेलपेंट किंवा लिपस्टिक या छटांचे अनुकरण करु शकणार नाही. आकाशात सूर्य वर येतो तसे तापमानही वाढते व जंगल जरा शांत झाल्यासारखे वाटते मात्र नैसर्गिक व मनुष्यनिर्मित जलाशयांवर कायम वर्दळ असते! जंगलातील संपूर्ण जीवन चक्र पाण्यावर अवलंबून असते, मध्य भारतामध्ये भर उन्हाळ्याच्या दिवसात पारा चढलेला असतो, त्यामुळे प्रत्येक प्राणी किंवा पक्षी कोणत्या ना कोणत्या जलाशयाचा आसरा घेतो त्यामुळे हा भाग अधिकच जिवंत होतो. जंगलात कोणत्याही पाणवठ्यावर जाऊन पाहायला नेहमीच मजा येते कारण पुढे काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नसते. मी नुकतीच ताडोबा अभयारण्याला भेट दिली तिथल्या अनुभवांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे अगदी उन्हाळ्यातल्या गरम वातावरणातही तिथे विविध गोष्टींचं निरीक्षण करत वाट पाहाणं किती रोचक असू शकतं याची तुम्हाला कल्पना येईल.

 ताडोबामध्ये अशाच एका उष्ण दुपारी, पांढरपवनी (बहुतेक पाणवठ्यांना एखाद्या नदीचं किंवा स्थानिक ठिकाणाचं नाव देण्यात आलं आहे) इथल्या एका पाणवठ्यावर आम्ही माया नावाच्या वाघिणीची व तिच्या बछड्यांची वाट पाहात होतो; अचानक दोन जंगली कावळे (हे कावळे आपल्या शहरातल्या कावळ्यांपेक्षा अतिशय वेगळे असतात, शहरी कावळ्यांच्या मानेभोवती करड्या रंगाचा पट्टा असतो तर जंगली कावळे पूर्णपणे काळे असतात व शहरी कावळ्यांपेक्षा त्यांची चोच व पंजे अतिशय मजबूत असतात व ते अतिशय आक्रमकही असतात) जवळपासच्या उंच झाडावरुन उडताना व पाणवठ्याच्या दिशेने येताना पाहिले. पहिल्यांदा मला वाटले ते घरट्यातून अन्नाच्या शोधार्थ निघाले आहेत मात्र काळजीपूर्वक पाहिल्यावर लक्षात आलं की कावळीच्या चोचीत एक अंडे होते त्यानंतर एक फिश ईगल (गरुडाची एक प्रजाती) त्या घरट्याभोवती घेऱ्या मारताना दिसला, त्यानंतर मला लक्षात आले की कावळ्याच्या जोडप्यानं गरुडाचं अंडं पळवलं होतं. कावळे इतर पक्षांच्या घरट्यांमधून अंडी चोरतात हे ऐकलं होतं मात्र प्रत्यक्षात कधी पाहिलं नव्हतं, त्यानंतर कावळीनं चोचीतलं अंडं दाबलं आणि एका घासात गट्टम करुन टाकलं! हा संपूर्ण खेळ काही मिनिटे चालला होता व मी तेवढा वेळ वाघिणीविषयी विसरलो. जंगलाचा अनुभव किती रोमांचक असतो व वाट पाहिल्यानं कसा फायदा झाला हे पुन्हा एकदा दिसून आलं! जंगलात भटकंती करताना तुम्हाला संयमाने वाट पाहावी लागते, तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, एक म्हणजे येथे लहान मधमाश्यांच्या भुणभुणीचा अतिशय त्रास होतो त्यांचा डंख फार भयंकर नसला तरी तुम्ही ज्या प्राण्याची वाट पाहात असता त्यावरुन तुमचे लक्ष विचलित होते. म्हणूनच पूर्ण बाह्यांचा शर्ट घातला तसंच बी रिपेलंट क्रीम लावलं तर उत्तम. तसेच हनी बझर्डने (मधमाशांच्या पोळ्यातून मध पिणारा व खाणारा पक्षी) हल्ला केल्यामुळे पर्यटक ज्या झाडापाशी वाट पाहात होते त्यावरील आग्या माशांचे पोळे उठल्याची एक घटना ताडोबाला घडली. त्यामुळेच तुम्ही जंगलात कुठे वाट पाहता याकडे लक्ष देणे आवश्यक असते व आजूबाजूच्या पक्ष्यांची व प्राण्यांची हालचाल काळजीपूर्वक पाहावी लागते, कारण एखादे माकड किंवा अगदी एखादे अस्वलही मधमाशांना उठवू शकतं व तुम्ही सहजपणे मधमाश्यांचे लक्ष्य ठरता त्यामुळे तुम्हालाच त्रास होतो!

प्रत्येक प्राण्याची किंवा पक्षाची पाणवठ्यावर यायची विशिष्ट वेळ असते तसेच कुठं न उभे राहुन पाणी प्यायचे हे देखील ठरलेले असते, हे सगळे पाहणे अतिशय रोचक असते. जंगलात तुमचे जीवन  हे तुमच्या सवयींवर अवलंबून असते व तुम्ही तुमची सवय बदलली तर तुम्ही धोक्यात येऊ शकता. उदा. वाघ एका ठराविक ठिकाणी पाणी पितो व त्याचा पाणवठ्यावर येणारा मार्गही ठरलेला असतो, एक प्राणी म्हणून तुम्ही त्या मार्गात आडवे आलात  तर त्याचा अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतो व तुम्ही त्याचे सावज होऊ शकता! मात्र हे माहिती असल्यावर तुम्हाला अतिशय संयमाने राहावे लागते व वाट पाहायला शिकावे लागते व हे शिकण्यासाठी पाणवठा हे अतिशय उत्तम ठिकाण आहे! तुम्ही इथे तासन् तास घालवू शकता व जंगली कुत्री पाण्यात किती आरामात डुंबत असतात हे पाहताना हरवून जाऊ शकता, वाघाच्या बछड्यांची पाण्यातली मस्ती आणि गव्यासारख्या  अवाढव्य जनावर पाण्यात व चिखलात कसा आरामात पहुडलेला असतो हे पाहू शकता!

सकाळचा व दुपारचा वेळ पक्ष्यांसाठी असेल तर दुपार ओसरु लागते, सूर्य माळवतीकडे झुकू लागतो तशी जंगलाला जाग येते, कारण बहुतेक प्राणी हे निशाचर असतात म्हणून संध्याकाळच्या वेळेला वाघ व बिबट्यांची शिकारीसाठीची हालचाल जाणवते. पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागतात, हरिणासारखे शाकाहारी प्राणी पाणवठ्याकडून परतत असतात व रात्र घालविण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागतात. मावळतीच्या सूर्य प्रकाशात आकाशात पिवळा ते केशरी अशा विविध रंगांची उधळण होते; या प्रकाशात ताडोबा तलावही न्हाऊन निघतो व तुम्ही त्या केशरी संधीप्रकाशात अंघोळ करणारे व पाणी पिणारे सांबर हरिण पाहून तुम्ही सगळे काही विसरता! संध्याकाळी घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने विविध प्राण्यांच्या हाकाट्यांनी (वाघ किंवा बिबट्या यासारखे हिंस्त्र प्राणी आजूबाजूला आल्याची जाणीव झाल्यास हरिण व माकडे काढतात तो विशिष्ट आवाज) संपूर्ण परिसर भरुन जातो व या सगळ्यात मावळतीच्या संधीप्रकाशामुळे संपूर्ण वातावरणाला एक गूढ वलय लाभते!

आता मला सांगा जीवनात एवढं वैविध्य आपल्याला कुठे पाहायला मिळेल किंवा आपल्या शहरी जीवनात इतका जिवंतपणा आपल्याला अनुभवता येईल का? इथे तुम्ही सर्व ताणतणावातून मुक्त असता, ऑफिसला जायचंय हा विचार नसतो किंवा कामाची उद्दिष्टे गाठायची नसतात किंवा वॉट्स ऍपवर सतत पाठवलेले निरर्थक फॉरवर्ड्स वाचत वेळ घालवायचा नसतो; व इथे मला जाणवतं निसर्ग म्हणजेच मनःशांती !

मात्र जंगलातील भटकंतीचा अनुभव अधिक संस्मरणीय व्हावा यासाठी काही सूचना द्याव्याशा वाटतात उदा. ताडोबामध्ये वन विभागाने नवीन मार्ग खुले केले पाहिजेत म्हणजे पर्यटकांना जंगलाचा न पाहिलेला भाग पाहता येईल, किंवा नवीन मार्ग खुले करता आले नाही तरी मार्ग बदलत राहिले पाहिजे! त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत हे मान्य असले तरीही मला असे वाटते की जंगल ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निर्बंध घातले आहे हे मान्य असले तरीही आपल्या सर्वांना हा अमूल्य ठेवा पाहता आला पाहिजे. हा ठेवा जेव्हा जास्तीत जास्त लोक पाहतील तेव्हाच ते त्याचे संरक्षण करतील! 

मार्गाशिवायच, आणखीही काही साध्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ गाईडचा गणवेश

जाड्या-भरड्या सुती कापडाचा आहे जो त्या भागातल्या उष्ण वातावरणासाठी अनुकूल नाही, यामुळे गाईड अतिशय अस्वस्थ व घामाघूम होतात! जंगलाबाबतच्या अशा बाबींचा निर्णय तज्ञांशी चर्चा करुन घेतला जावा व यासंदर्भात कॉर्पोरेट कंपन्या किंवा व्यक्ती आपले योगदान देऊ शकतात. त्याचवेळी जंगलात व त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांचे आयुष्य किती खडतर आहे हे विसरुन चालणार नाही त्यांना शहरासारख्या सुखसोयी मिळत नाहीत व रोजचे जेवणही मिळवणे अवघड काम असते. म्हणूनच आपण सगळे खुल्या मनाने विचार करु व या लोकांचे आयुष्य अधिक चांगले व्हावे यासाठी कशाप्रकारे योगदान देता येईल याचा विचार करु. असे झाले तरच आपल्याला जंगलातली ही मनःशांती  अनुभवण्याचा हक्क आहे, एवढेच मला म्हणावेसे वाटते!

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif
संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



Sunday, 6 March 2016

विकासाची जबाबदारी कोणाची, मनपा का पीएमआरडीए ?























 चिरस्थायी विकास हा सुखी भविष्याचा एकमेव मार्ग आहे जो आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे .यामुळे आर्थिक विकासासाठी, सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी, पर्यावरण व्यवस्थापन व प्रशासन सशक्त करण्यासाठी एक पायाभूत आराखडा मिळेल”… बानकी- मून.

बान की-मून हे दक्षिण कोरियाई मुत्सद्दी व राजकीय नेते आहेत, तसेच संयुक्त राष्ट्रांचे आठवे व विद्यमान महासचिव आहेत. बान की यांच्यासारख्या, विकासाचा, नागरिकांना सर्वोत्तम पायाभूत सुविधा देण्याचा खरा अर्थ माहिती असलेल्या व्यक्ती देशात सक्रिय असल्यानेच दक्षिण कोरिया आपल्या नागरिकांना उत्तम सुविधा देत आहे! मला एका गोष्टीचं नेहमीच आश्चर्य वाटतं की आपण मोठ-मोठ्या गोष्टी बोलत असतो म्हणजे मेक इन महाराष्ट्र किंवा मेक इन इंडिया असो तसेच नुकतेच आपण मुंबईमध्ये सर्व जागतिक उद्योगांना तसेच तज्ञांना आपली प्रगती पाहण्यासाठी आमंत्रित केले, मात्र त्याचवेळी अगदी आपल्या परसदारातल्या सामान्य समस्या सोडविण्यात मात्र आपण नेहमी अपयशी ठरतो! ताजे उदाहरण द्यायचे झाले तर पुण्यालगतच्या ३४ गावांचे भवितव्य मनपा व पीएमआरडीदरम्यान लटकत राहिले आहे. ज्या बिचाऱ्या लोकांना याविषयी माहिती नाही किंवा ते कदाचित भाग्यवान आहेत की स्मार्ट पुणे शहराबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, अशा लोकांसाठी या विषायावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. अगदी अलिकडेपर्यंत पीएमआरडीए म्हणजे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची निर्मिती झाली नव्हती तोपर्यंत (आता याचा अर्थ काय होतो हे विचारू नका) मनपाच पुणे शहरातील तसेच आजूबाजूच्या खेड्यांची तसेच तेथील नागरिकांची देखभाल करत होती. पुण्याच्या स्मार्टपणामुळे म्हणजे किंवा पुण्याच्या रहाणीमानाच्या  आकर्षणामुळे अलिकडच्या काळात देशभरातील लोक पुण्याकडे आकर्षित झाले आहेत व त्यामुळे जमीनीचे दर भरमसाठ वाढले व ज्यामुळे सदनिकांचे दरही आभाळाला भिडले. स्वाभाविकपणे ज्यांना शहरात घरे परवडत नाहीत त्यांनी मनपा जवळपासच्या गावांमध्ये जमीनी शोधायला सुरुवात केली व त्यामुळे वीस वर्षांपूर्वी जे दृष्य होते तेच पुन्हा दिसू लागले! खरे तर त्या वेळी मनपाच्या हद्दीच्या आजूबाजूच्या परिसरातील जवळपास २७ गावे मनपाच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव होता व तशी अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली होती; विनोदाची बाब म्हणजे या योजनेला मनपानेही मंजूरी दिली होती. मात्र अचानक एका सत्ताधारी पक्षाला जाणवले की ही गावे मनपाच्या हद्दीत समाविष्ट करणे पक्षाच्या हिताचे नाही, असे झाले तर या गावावरील त्यांचे वर्चस्व संपुष्टात येईल, त्यामुळे त्या यादीतून १३ गावे वगळण्यात आली व केवळ १४ गावेत मनपा मध्ये समाविष्ट करण्यात आली. हे होऊन बारा वर्षे लोटली.

ही गोष्ट इथेच संपत नाही; तेव्हा समाविष्ट करण्यात आलेल्या गावांची विकास योजना तयार करण्यासाठी व मंजूर करण्यासाठी जवळपास १२ वर्षे लागली. अजूनही जैव विविधता उद्यान म्हणजेच बीडीपी वगैरेसारख्या काही आरक्षणांचे भविष्य अस्पष्ट आहे, यामुळे या जमीनी झोपडपट्ट्या व अतिक्रमणांना बळी पडतायत! जुन्या व नवीन शहरासाठी दोन स्वतंत्र डीपी तयार करणे हाच एक मोठा विनोद होता यामुळे रिअल इस्टेट उद्योग तसेच शहराच्या पायाभूत सुविधांबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गावातल्या नागरी सुविधांसाठी मनपाच्या ताब्यात आलेल्या शेकडो जमीनी अनावश्यक कामांसाठी वापरल्या जात आहेच, ज्या ठिकाणी खरंतर विविध अत्यावश्यक कामांसाठी पायाभूत सुविधा तयार करता आल्या असत्या! बहुतेक नव्या गावांमध्ये (जी आता मनपात सुद्धा जुनी झाली आहेत) रस्त्यांचे अंतर्गत जाळे नाही, गटारे नाहीत, जलवाहिन्या घातलेल्या नाहीत किंवा त्याला पुरेसा दाब नाही! मनपाला बांधकाम विकास शुल्काच्या स्वरुपात व मालमत्ता कराच्या स्वरुपात महसूल मिळाला मात्र या गावांना आवश्यक त्या पायाभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. अर्थात त्यापैकी बाणेरसारखी काही उपनगरे स्मार्ट मानली जात असली तरीही तिथे पाणी व सांडपाण्याची गंभीर समस्या आहेच. माननीय मुख्यमंत्री जे स्वतः नगर विकास मंत्री आहेत, त्यांनीही अलिकडेच केलेल्या पुण्याच्या दौऱ्यात ही बाब मान्य केली होती!

या पार्श्वभूमीवर उद्योग, आयटी, शिक्षण या क्षेत्रांमुळे रोजगार निर्मिती होत असल्याने घरांची मागणी वाढतच होती त्यामुळे शहरही वाढत राहिलं. त्यामुळे पुन्हा एकदा मनपाच्या हद्दी वाढविण्याची चर्चा सुरु झाली व मनपाच्या आजूबाजूला असलेली जवळपास ३४ गावं हद्दीत सामावून घेतली जातील अशी चर्चा सुरु झाली. नेहमीप्रमाणे हा निर्णय विविध टेबलांवर रेंगाळत राहिला. बऱ्याचशा ग्रामपंचायती विलीनीकरणाच्या बाजूने होत्या मात्र काहींचा विरोध होता, याचं कारण म्हणजे स्थानिक राजकारणावरील किंवा सत्तेवरील पक़ड सैल होईल! मधल्या काळात या गावांमध्ये घरे परवडण्यासारखी होती, त्यामुळे इथे धडाक्यात बांधकामे सुरु होती. त्याला नियंत्रित करणारे स्थानिक कायदेच नव्हते, नगर नियोजन हे तांत्रिक प्राधिकरण होते व जिल्हाधिकारी कार्यालय मंजूरी देणारे प्राधिकरण होते व दोन्ही विभागांकडे केवळ मंजूरी देण्याइतपत मनुष्यबळ होते मात्र बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनुष्यबळ नव्हते. परिणामी या गावांमध्ये कायदेशीर बांधकामांपेक्षा बेकायदा बांधकामे अधिक झाली, सरकारी अधिकारीही हे खाजगीत स्वीकारतात! यापैकी काही इमारती कोसळल्याने त्यात नागरिकांची जीवित हानी झाली, सामान्य माणसाच्या आयुष्यभराची कमाई धुळीला मिळाली. त्यानंतर मनपाच्या हद्दीपासून १० किलोमीटरच्या अंतरापर्यंतच्या टप्प्यात येणाऱ्या जमीनी किंवा गावांसाठी नवीन नियम व अटी तयार करण्यात आल्या. त्यानंतरही मूळ समस्या कायम राहिली कारण सुरु असलेल्या बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही प्राधिकरण नाही, सर्व बांधकाम व्यावसायिक परवानगी घेतीलच असे नाही व ज्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे तेवढेच बांधकाम त्याठिकाणी केले जाईल याची काय खात्री! धोरणांसंदर्भातील याबाबुगिरीमुळे सामान्य माणसाची समस्या तशीच राहिली जो खिशाकडे पाहून या प्रकल्पांमध्ये सदनिका आरक्षित करत होता! म्हणूनच राज्य सरकारने ३४ गावे मनपाच्या हद्दीमध्ये विलीन करण्याची अधिसूचनाही प्रकाशित केली व मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली त्यामुळे लोक खुश होते की त्यांचे रस्ते, पाणी व सांडपाण्याच्या समस्येची आता कुणीतरी काळजी घेईल! मात्र दरम्यानच्या काळात महापालिकेच्या हद्दीबाहेरील क्षेत्राच्या रिअल इस्टेट विकासासाठी पीएमआरडीएची घोषणा करण्यात आली तिची स्थापना झाली नव्हती त्यामुळे या गावांच्या विकासाचं भिजत घोंगडं तसंच राहिलं. मधल्या काळात राज्यातील सत्ता बदलली व सर्वजण गावांचा समावेश महागरपालिकेच्या हद्दीत करण्याचे तसेच त्यांचा विकास करण्याविषयीही विसरून गेले!

सरतेशेवटीमाय बाप सरकारला जाणीव झाली की रोजगार निर्मितीसोबतच शहराचे नियोजन करणेही आवश्यक आहे व पीएमआरडीएची निर्मिती करण्यात आली. पीएमआरडीएची घोषणा करण्यात आल्यापासून ते सहा महिन्यांपूर्वी तिची प्रत्यक्ष निर्मिती होईपर्यंत सात ते आठ वर्षे गेली! त्यानंतर असे ठरविण्यात आले की केवळ मनपा व पीसीएमसीच्या हद्दीला लागून असलेल्या १० किलोमीटरच्या परिघातीलच नाही तर त्यापेक्षाही मोठे क्षेत्र पीएमआरडीएच्या कार्यकक्षेत येईल. हे महाकाय काम आहे मात्र किमान आशेचा किरण तरी दिसत आहे कारण आधीच यामध्ये बराच वेळ गेला आहे तसेच सत्ताधाऱ्यांनी विविध परस्परविरोधी घोषणा केल्यामुळे लोकांचा त्यावरील विश्वासच संपला व त्यांनी आहे ती परिस्थिती स्वीकारली. मी या ३४ गावांमधील बांधकाम व्यावसायिक (अर्थात केवळ कायद्याचे पालन करणारे) व नागरिकांची तुलना अनाथांशी करतो; कारण दोघेही देवाच्या दयेवरच जगताहेत! पुणे शहराच्या हद्दीला लागून असलेल्या भागांमध्ये, रस्ते रुंदीकरण तर सोडाच त्यांची देखभाल कोण करणार आहे हे कुणाला माहिती नसते, कचरा उचलण्याचा प्रश्न अनुत्तरित आहे, सार्वजनिक वाहतूक नाही, गटारे नाहीत तसेच जलवाहिन्याही नाहीत, शाळा, क्रीडांगणे यासारख्या सुविधांची तर कल्पनाही करता येत नाही, नागरी समस्यांची यादी कधीही न संपणारी आहे! असे असूनही या भागातील दर वाढत राहिले, या गावांमधील सदनिका विकल्या जात आहेत; हे पाहून मला खरोखर असा विश्वास वाटते की हा देश आशेवर चालतो! कुणी तरी कुठून तरी येईल व आपले आयुष्य सुधारेल या आशेवर आपण जगत राहतो. पीएमआरडीएच्या रुपाने जेव्हा थोडीफार आशा निर्माण झाली, तेव्हा परत कुठेतरी कुणाचं काहीतरी बिनसलं व ही गावे मनपा मध्ये समाविष्ट करण्याविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली!

 मला असे वाटते की ही गावे मनपा मध्ये समाविष्ट करायची किंवा पीएमआरडीएला ती विकसित करू द्यायची हा मुद्दा नाही तर आपण विकासांच्या जबाबदारीविषयी ठाम भूमिका घेणे महत्वाचे आहे. मनपाला या गावांची काळजी घेता येत असेल तर आत्तापर्यंत विकासकामे का झाली नाहीत किंवा पीएमआरडीएची स्थापनाच का करण्यात आली? ही ३४ गावे अंशतः विकसित आहेत व पीएमआरडीएचा एक महत्वाचा भाग आहेत; या नागरी क्षेत्राचे नियोजन करायचे नसेल तर पीएमआरडीएने तिच्या अधिकारक्षेत्रातील केवळ डोंगर, जंगल व नद्यांचे नियंत्रण करणे अपेक्षित आहे का ज्यावर बांधकाम करणे अशक्य आहे! हा प्रश्न आपण विचारला पाहिजे व त्याचे लवकर उत्तर दिले पाहिजे! मनपा कडे पीएमआरडीएच्या तुलनेत अधिक साधनसामग्री आहे हे मान्य असले तरीही ही ३४ गावे दुभती गाय आहे ही वस्तुस्थिती आहे! पैसे हे शक्ती देणारे टॉनिक आहे व या ३४ गावांच्या विकासातून येणाऱ्या महसुलापासून वंचित ठेवून आपण अप्रत्यक्षपणे पीएमआरडीएच्या मूळ उद्दिष्टालाच सुरुंग लावू. मनपाला हाताळण्यासाठी पुरेशा समस्या आहेत; हे आपण सर्वांनी पाहिलेले नाही का? मनपाच्या हद्दीत असलेल्या १४ गावांना गेल्या बारा वर्षांपासून सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय, त्या गावांमध्ये राहणाऱ्या कुणाही नागरिकाला याविषयी विचारा. मी मनपाला दोष देत नाही मात्र तुमची स्वतःची मुले उपाशी राहत असताना तुम्ही आणखी एखादं मूल दत्तक घ्यायचा विचार करत नाही ना? मनपाच्या हद्दीत ही गावं नव्यानं समाविष्ट केलं तर नेमकं हेच होणार आहे! त्याचवेळी पीएमआरडीएने वेगाने काम केले पाहिजे व तिला मनुष्यबळापासून पैशांपर्यंत आवश्यक त्या सर्व बाबी दिल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे तिच्या अंतर्गत येणाऱ्या प्रचंड मोठ्या क्षेत्राचे नियोजन करता येईल तसंच तिथे पायाभूत सुविधांची उभारणीही करता येईल. पीएमआरडीए ही नियामक संस्था असेल की तिला प्रशासनिक अधिकारही देण्यात आले आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. याचे कारण म्हणजे तिची स्थापना होऊन सहा महिने झाले तरीही योजनांना मंजुरी दिली जात आहे मात्र रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही किंवा पाणी तसेच सांडपाणी यासारख्या मूलभूत समस्या कायम आहेत ज्या बांधकामांइतक्याच महत्वाच्या आहेत, मात्र त्या सोडविल्या जात असल्याचे दिसत नाही!
यातली दुःखाची किंवा दुर्दैवाची बाब म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधी कोणताही राजकीय पक्ष असो, मनपामधील किंवा राज्यातील असो, कुणालाही पुणे शहराविषयी किंवा नागरिकांविषयी चिंता नाही; त्यांना फक्त आपापल्या मतपेट्यांवर नियंत्रण हवं आहे! सर्व राजकीय पक्ष या ३४ गावांमधील नागरिकांकडे मतपेटी म्हणून पाहतात मात्र मतदारांना जगता येईल असं एक चांगलं जीवनही आवश्यक आहे हे ते सोयीस्करपणे विसरतात! हा विषय पुणे शहरासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण भविष्यात बहुतेक लोकसंख्या या ३४ गावांची निवड त्यांचे घर म्हणून करणार आहे, त्यामुळे संपूर्ण पुण्याच्या रिअल इस्टेटचे भवितव्य या गावांच्या विकासाशी निगडित आहे! मला आठवतंय काही वर्षांपूर्वीगॉडझिला व्हर्सेस किंगकाँग”, नावाचा काल्पनिक चित्रपट आला होता. ही दोन्ही काल्पनिक पात्रे जगावर ताबा मिळविण्यासाठी एकमेकांशी लढत होती. त्या युद्धामध्ये लाखो निष्पाप लोकांचे आयुष्य, इमारती व शहरे धोक्यात आली होती! पुण्यामध्येही सध्या हेच चित्र आहे की ३४ गावांवर कुणाचे नियंत्रण असेल, मनपा की पीएमआरडीए! या युद्धामध्ये ज्या नागरिकांनी तिथे घरे विकत घेतली आहेत किंवा ज्या बांधकाम व्यावसायिकांनी या गावांमध्ये जमिनी खरेदी केल्या आहेत त्यांची आयुष्यभराची कमाई पणाला लागली आहे! ३४ गावांवर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या या युद्धात, शेवटी कोण जिंकते हे महत्वाचे नाही तर विजय साजरा करण्यासाठी कोण टिकून राहील हा महत्वाचा प्रश्न मनपा व पीएमआरडीएने परस्परांना विचारला पाहिजे! पुण्याच्या सामान्य नागरिकाला त्याच्यावर मनपाचे नियंत्रण आहे किंवा पीएमआरडीएचे नियंत्रण आहे याने काहीही फरक पडत नाही; त्याला केवळ एक शांत आयुष्य हवं आहे जे कायदेशीर, सुरक्षित व परवडणाऱ्या घरामुळे तसेच जीवनाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्याने शक्य होणार आहे! बिचाऱ्या सामान्य माणसाला त्याच्या मताच्या बदल्यात एवढं तरी मिळालं पाहिजे, कारण त्याच्या अस्तित्वावरच मनपा किंवा पीएमआरडीएचं अस्तित्व अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स








Wednesday, 24 February 2016

शोध , पोलिसातल्या माणसाचा.... !























बहुतेक मध्यवर्गीय गौरवर्णीयांची पोलीसांशी गाठ पडलेली नसते जे नेहमीच शंकेखोर, उद्धट, भांडखोर व क्रूर असतात.  … बेंजामिन स्पॉक

बेंजामिन मॅकलेन स्पॉक हे अमेरिकी बालरोग तज्ञ होते ज्यांचे बेबी अँड चाईल्ड केअर हे पुस्तक, १९४६ साली प्रकाशित झाले व ते त्या काळातील सर्वाधिक खपाचे पुस्तक होते. त्यातून मातांना संदेश देण्यात आला आहे की "तुम्हाला जेवढं वाटतं त्यापेक्षा अधिक माहिती असतं. बेंजामिन यांच्या पोलिसांविषयीच्या अवतरणातून आपल्याला समजतं की सामान्य माणसाच्या मनातली पोलीस दलाविषयीची प्रतिमा अमेरिकेसारख्या प्रगत व सुसंस्कृत देशामध्येही आपल्यापेक्षा फार काही वेगळी नाही! विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात एक गोष्ट मात्र सर्वत्र समान आहे ती म्हणजे पोलीस दलाची प्रतिमा व ती कशी आहे हे सांगायची गरज नाही! दहापैकी केवळ एक व्यक्ती पोलीसांविषयी चांगले बोलत असेल व ते देखील खाजगीत. या प्रतिमेचाच विचार करून संजीवनीला पोलीस दलासाठी काहीतरी करावसं वाटलं! मी याच विचाराने पोलीस महासंचालकांना पत्र लिहीलं, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी केवळ मला प्रत्युत्तरच लिहीलं नाही तर प्रतिसाद दिला. परिणामी मला पुण्याच्या सहआयुक्तांनी संपर्क केला व सामान्य लोकांच्या नजरेत पोलीसांची प्रतिमा बदलण्यासाठी किंबहुना सुधारण्यासाठी काय करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी बोलावलं.

मी कुणी चमत्कार घडवून आणणारा संत महात्मा नाही, मला तसे व्हायचेही नाही. मात्र मला असे वाटते की आपण टीका करण्यात नेहमी पुढे असतो मग ती सरकार नावाच्या बिनचेहऱ्याच्या संघटनेची असो किंवा पोलीसांची असो, मात्र यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी जेव्हा काहीतरी करायची वेळ येते तेव्हा आपल्यापैकी कितीजणं पुढाकार घेतात हा प्रश्न आहे

आता इथे बरेच जण प्रश्न विचारतील की पोलीसांना दया का दाखवायची, त्यांना त्यांचे काम करण्यासाठी पैसे मिळतात; काहीजण असेही म्हणतात की आम्ही कर भरतोय व आपल्या कराच्या पैशांतून त्यांचा पगार दिला जातो त्यामुळे त्यांनी आपली सेवा केलीच पाहिजे! आपण सर्वजण कर भरतो व आपल्या सर्वांवर कुणाची ना कुणाची सेवा करायची जबाबदारी असते. मात्र काही कामे इतरांपेक्षा वरचढ असतात उदाहरणार्थ लष्कर व पोलीस. त्यांना बँकेचा लिपिक किंवा कनिष्ठ अभियंत्याऐवढे पैसे मिळतात. मात्र लष्कराच्या जवानाला किंवा पोलीसांना त्यांचे काम करताना त्यांचा जीवही गमवावा लागतो, इतर किती नोकऱ्यांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तिच्या जीवाला धोका असतोम्हणूनच ही कामे विशेष आहेत व ही कामे करणारी माणसेही! म्हणूनच माझ्या मनात पोलीसांना त्यांचे वलय पुन्हा मिळावे यासाठी काहीतरी करण्याचा विचार आला, मला असे म्हणायचे नाही की त्यांचे वलय पूर्णपणे नष्ट झाले आहे मात्र दहापैकी नऊ लोक जेव्हा एखाद्या संघटनेविषयी नकारात्मक बोलतात तेव्हा नक्कीच कुठेतरी काहीतरी गडबड आहे. ही प्रतिमा कोणत्याही जाहिरातींनी सुधारणार नाही, तसेच पोलीस विभागाला तशीही जाहिराती देण्याची परवानगी नसते, केवळ आपल्या स्वतःच्या कृतींमधून तसे करणे शक्य आहे. हे करण्यासाठी पोलीस शिपायाहून अधिक चांगली व्यक्ती कोण असू शकते, पोलीस दलातील सर्वात कनिष्ट श्रेणीचा हा कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर असतो व यालाच लोकांना तोंड द्यावे लागते!  म्हणूनच मी असा प्रस्ताव दिला की आपण शिपायांसाठी व पोलीस उप निरीक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करू. माझा मित्र अनुज खरे व त्याच्या चमुच्या मदतीने आम्ही हे करणार होतो ज्याने वनरक्षकांसाठी अशाच प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते

खरेतर आम्हाला त्याचा कितपत परिणाम होईल याची खात्री नव्हती कारण वनरक्षकांची गोष्ट वेगळी होती, पोलीस दलाप्रमाणेच त्यांनाही अत्यंत टोकाच्या परिस्थितीत काम करायला लागतं तसंच कामामध्ये समाविष्ट धोके पोलीस दलाप्रमाणेच असतात तरीही पोलीसांना विशेषतः शहर पोलीसांना अनेक लोकांना तोंड द्यावे लागते वनरक्षक मात्र सामान्य माणसापासून दूर जंगलात असतात. त्यामुळेच आम्ही संपूर्ण प्रशिक्षणाचा भर संवाद कौशल्यावर तसेच ते करत असलेल्या कामाचे महत्व समजावून घेण्यावर दिला. नंतरचा भाग दलात नुकत्याच समाविष्ट झालेल्या तरुणांसाठी होता. ही नवीन पिढी अधिक शिकलेली आहे, पूर्वी हवालदार जेमतेम १२वी उत्तीर्ण असत व त्यांना धड मराठीही बोलता येत नसे, इंग्रजीचा तर गंधही नसे. मात्र आता या नव्या पिढीला संगणक व्यवस्थित हाताळता येतो, बरेच जण विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. मात्र काहीवेळा शिक्षण हा एक शाप ठरतो, शिपायाची नोकरी ही केवळ सरकारी नोकरी आहे ही बाब सोडली तर ती सोपी नाही. जेव्हा या तरुणांना जाणवतं की त्यांचे मित्र आरामात एसी कार्यालयात बसून काम करत आहेत तेव्हा कुठेतरी नैराश्य यायला लागतं. पोलीसांच्या कामाचे तास ठरलेले नसतात; अपेक्षांचं प्रचंड ओझं असतं, सुट्ट्या मिळत नाहीत, कौटुंबिक आयुष्य उरत नाही व त्यांना सरकारकडूनही अतिशय निकृष्ट सुविधा मिळतात! या सर्वांमुळे तुम्हाला जाणीव होते की तीन सिंह असलेला खाकी गणवेश घालणे ही फार काही आनंददायक बाब नाही व तिथेच तुम्हाला निराशा येऊ लागते. परिणामी तुम्ही हसणे विसरता, तुमच्याकडे जे कोणी येईल त्याच्यावर तुम्ही रागाचे खापर फोडता, सामान्यपणे हा राग तुमच्याकडे येणाऱ्या सामान्य नागरिकावर काढला जातो किंवा तुम्ही कोणत्या तरी व्यसनाच्या आहारी जाता! 

पुण्याचे सह पोलीस आयुक्त श्री सुनील रामानंद यांनी केवळ आमची संकल्पना ऐकूनच घेतली नाही तर लगेच डीसीपी श्री. तुषार दोशी यांना संपर्क केला व प्राथमिक चर्चेनंतर शहराचा पश्चिम भाग नियंत्रित करणाऱ्या झोन १ मधील पोलीसांच्या चमूसाठी आम्ही पहिले सत्र आयोजित केले! त्यानंतर विख्यात फिटनेस ट्रेनर श्री. अरुण यादव, फोर्ब्ज मार्शल मधील कार्यकारी कर्मचारी तसेच आरोग्य देखभाल व स्वच्छता या विषयातील तज्ञ श्रीमती मेघना पेठे यांनाही सहभागी करून घेतलं. अनुज व आनंद कोलारकर यांनी स्वतःहून संघाची उभारणी व संवाद याविषयावर तर वन्य जीवनासंदर्भात जागरुकता या विषयावर आयएफएस अधिकारी व मुख्य वन संरक्षक (फॉरेस्ट कंझरव्हेटर) असलेल्या श्री. नितीन काकोडकर यांनी वन्य जीवनाविषयी त्यांचे अनुभव सांगायचे ठरवले व राज्यातील वन्य जीवनाचा वारसा याविषयी अतिशय सुरेख सादरीकरण दिले. मी इथे सहभागी झालेल्यांचा काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया देत आहे ज्यामुळे तुम्हाला प्रशिक्षणाचा काय परिणाम झाला हे कळेल. पहिल्या दिवशी सकाळी साधारण पन्नास एक पुरुष व महिला पोलीस जमा झाले, त्यांच्या चेहऱ्यावर जरा गोंधळलेले भाव होते, कारण नेमकं कशाचं प्रशिक्षण असणार आहे हे त्यांना माहिती नव्हतं. आम्ही दरवाजावर होतो व सहभागी झालेल्यांचं स्वागत करत होतो व ते नेहमीच्या गंभीर चेहऱ्यानं आत येत होते, त्यावर अजिबात हसू नव्हतं (असंही तुम्ही कधीही हसऱ्या चेहऱ्याचा पोलीस पाहिला आहे का ते मला सांगा?)! जेव्हा डीसीपी तुषार दोशी तसेच क्रेडई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलालजी कटारिया यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाला सुरुवात झाली तेव्हा आम्ही या प्रशिक्षणाची संकल्पना समजावून सांगितली, मात्र तरीही सहभागी झालेले पोलीस कर्मचारी इथे काय शिकणार आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा सहभागींचे स्वागत करण्यासाठी पुन्हा दरवाजावर गेलो, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य होते व प्रत्येक जण आम्हाला गुड मॉर्निंग म्हणत होता! प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना मुद्दाम विचारलं की पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तिचं तुम्ही कधी हसून स्वागत केलं आहे का किंवा त्यांना गुड मॉर्निंग म्हटलं आहे का? आम्हाला कधीच नाही असं उत्तर मिळालं ज्याचं आम्हाला आश्चर्य वाटलं नाही! अनुजनं त्यांचे संघ बनवले व त्यांना खेळ खेळायला लावले. ज्यामध्ये काहींना पोलीसांची, काहींना गुन्हेगाराची तर इतर सहभागींना ते एकमेकांशी कसे वागतात याचे निरीक्षण करण्याची भूमिका देण्यात आली होती. आपण लोकांशी कसे वागतो याचे प्रतिबिंब पाहायला मिळाल्यानंतर हास्याची कारंजी उडत होती मात्र त्यासोबत त्यांना आपल्या त्रुटीही समजल्या! वन्य जीवन वारसा या विषयावरील सादरीकरणात त्यांनी पांढरा वाघ म्हणजे काय, साप उडतो का असे अनेक प्रश्न विचारले व श्री काकोडकर यांनीही प्रत्येकाची आनंदाने उत्तरे दिली! सुदृढ मन व शरीर तसेच आपण परिसर स्वच्छ ठेवला तर आपली कामाची जुनी जागाही किती चांगली दिसू शकते या विषयावरील व्याख्यान अतिशय महत्वाचे होते! या सत्रांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तसेच एकूण वातावरण अतिशय औत्सुक्याचे तसेच उत्साहाचे होते. जेव्हा एका पोलीस शिपायाने जनुकीय बदलांविषयी चर्चा केली तसेच माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली असेल तर या प्रक्रियेमध्ये विकासाचे मधले टप्पे हरवले का असे विचारले तेव्हा मी आश्चर्यचकितच झालो! याआधी कधीही न अनुभवलेले ज्ञान त्यांना मिळत होते मग ते आरोग्याविषयी असो, स्वच्छता, वन्यजीवन किंवा व्यवस्थापन या विषयाचे असो! हे केवळ कायदा, न्याय याच्या प्रशिक्षणाहून वेगळे होते, त्यांना एक अधिक चांगला माणूस म्हणून घडविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांना जाणवले. समारोपाच्या सत्रात आम्ही त्यांना काय वाटले हे व्यक्त करायला सांगितले. पुढील वर्षी निवृत्त होणाऱ्या एका शिपायाने सांगितले की तो त्याच्या कारकिर्दीत असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला मात्र हे प्रशिक्षण सर्वोत्तम होते व पहिल्यांदाच पोलीसातल्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रम तयार करण्यात आला होताएका शिपायाने सांगितले की आत्तापर्यंत केवळ डीजी किंवा आयुक्तच पोलीस विभागाचे ब्रँड दूत आहेत असे त्याला वाटायचे, मात्र आज त्याला जाणीव झाली की तो त्यांच्या विभागाचा सर्वोत्तम दूत आहे!

महिला शिपाईही अतिशय आनंदी होत्या, केवळ गस्त घालणे तसेच गुन्हे नियंत्रण याशिवाय इतर बाबींचे ज्ञानही किती आवश्यक आहे याची जाणीव झाल्याचे त्या म्हणाल्या, तसेच या प्रशिक्षणामुळे अतिशय ताजेतवाने वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले! त्या लाजत असेही म्हणाल्या की, “सर कृपया आमच्या वरिष्ठांना असे परिसंवाद दर सहा महिन्यांनी आयोजित करायला सांगा, यामुळे आम्हाला अतिशय आनंदी व तणावमुक्त वाटले!” इथे मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे या कार्यक्रमासाठी श्रेयस हॉटेल व मंदार चितळे व त्यांच्या चमूने जेवणाची सोय केली होती. त्यांना सर्व सहभागींची अतिशय चांगली बडदास्त ठेवली. सर्व सहभागी जेवणाचा दर्जा व बडदास्त पाहून अतिशय आश्चर्यचकित झाले कारण कोणत्याही प्रशिक्षणात किंवा बंदोबस्ताच्या वेळीही त्यांची एवढी काळजी घेतली जात नाही! अनेक जणांनी कामाच्या वेळी त्यांना येणारे अनुभव सांगितले ज्यामुळे ते यंत्रणेबाबत थोडे निराश झाले व चिडले होते. मात्र इथे त्यांनी मान्य केलं की ते आपल्या कामाकडे अधिक सकारात्मकपणे पाहतील व चेहऱ्यावर हास्य ठेवतील! या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम म्हणजे सहभागींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या व या प्रक्रियेमध्ये त्यांचा कामाविषयीचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला!

मला असे वाटते की त्या ज्येष्ठ शिपायाने जे सांगितले त्यातून अशा प्रशिक्षणाची गरज व्यक्त होते, म्हणजेच पोलीसातल्या माणसावर लक्ष केंद्रित करणारे प्रशिक्षण. आपण सर्वजण पोलीसांनी नेहमी सतर्क असावे, कर्तव्य बजावण्यासाठी नेहमी उपलब्ध असावे अशी अपेक्षा करतो मात्र पोलीसातल्या माणसाप्रती आपल्या कर्तव्याकडे साफ दुर्लक्ष करतो! सामान्य माणूस व पोलीसांमधील दरी वाढण्याचे हेच मुख्य कारण आहे, कारण दोघेही दुसऱ्यात सुधारणा झाली पाहिजे असा विचार करतातआमच्या प्रयत्नांना यश आलं किंवा नाही हे काळच सांगेल मात्र आम्ही किमान प्रयत्न केला हे महत्वाचं! मला, अनुज व आमच्या चमूला अतिशय समाधान वाटलं की आमच्या अंगावर खाकी गणवेश नसला तरीही काही काळ आम्हीही पोलीस दलाचा एक भाग झालो होतो. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांमध्येही एक पोलीस दडलेला आहे, मात्र इतरांनी आपले कर्तव्य करावे अशी आपण अपेक्षा करतो! आपण जर आपल्यातला पोलीस समजावून घेतला व जागा केला तरच आपल्याला कोणत्याही पोलीसातला माणूस शोधण्याचा अधिकार आहे! यात सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे डीजी श्री. प्रवीण दीक्षित यांनी असे प्रयत्न आवश्यक आहेत हे समजावून घेतले तसेच मला वॉट्सऍप करून, त्यांचा ईमेल पत्ता तसेच सेल क्रमांक सहभागींना देण्याची परवानगी दिली म्हणजे ते प्रशिक्षणाविषयीच्या प्रतिक्रिया थेट त्यांना पाठवू शकतील!
सर्वात शेवटी, एका तरुण शिपायाचा अनुभव आवर्जुन सांगावासा वाटतो. दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्यावेळी माझ्याशी बोलताना तो जेमतेम तिशीतला शिपाई म्हणाला, ”सर गेल्या दहा वर्षांच्या सेवेत आज पहिल्यांदा चेहऱ्यावर हसू घेऊन घरी गेलो व झोपलोही हसतच, प्रशिक्षणातले आमचे सांघिक खेळ व विविध क्षण आठवत होतो, मला इतक्या आनंदात पाहून माझ्या बायकोला अतिशय आश्चर्य वाटलं"! मला असं वाटतं आमच्या प्रयत्नांबद्दल करण्यात आलेलं हे सर्वोत्तम कौतुक होतं किंवा प्रतिक्रिया होती; मी देखील त्याला प्रत्युत्तरादाखल फक्त हसलो, कारण एका पोलीसानं दिलेल्या या प्रतिक्रियेला मी याहून अधिक चांगली प्रतिक्रिया काय देऊ शकत होतो!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स