Monday, 20 August 2018

सर्वोत्तम शहर,एक जबाबदारीसुद्धा !
































रुक्ष, निष्क्रिय शहरं एक प्रकारे स्वतःच्या विनाशाचं बीजच रोवत असतात. मात्र उत्साहाने सळसळणारी, विविधतेने नटलेली, जोशपूर्ण शहरं स्वतःच्याच नवनिर्मितीची बिजं रुजवत असतात, त्यांच्यात स्वतःच्या समस्या सोडवण्याची व गरजा पूर्ण करण्याची ऊर्जा व क्षमता असते.”… जेन जेकब्ज.

जेन जेकब्ज या अमेरिकी वंशाच्या कॅनडियन लेखिका व कार्यकर्त्या होत्या. समाज, नागरी नियोजन व ऱ्हास हे प्रामुख्याने त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. त्यांचं अमेरिकेतील 1950 च्या दशकातील नागरी नूतनीकरण धोरणांवर समर्पकपणे टीका करणारं द डेथ अँड लाईफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज (1961) हे पुस्तक अतिशय गाजलं. या पुस्तकाने केवळ नियोजनातील समस्यांचाच उहापोह केला नाही तर त्या काळातील विचारसरणीवरही मोठा प्रभाव टाकला. जेकब्ज त्यांच्या लेखनाशिवाय, स्थानिक परिसर नष्ट करणाऱ्या नागरी-नूतनीकरण प्रकल्पांना ठाम विरोध करण्याकरता तळागाळात केलेल्या कामासाठीही ओळखल्या जातात. बहुतेक लेखक अनेक पुस्तके लिहीतात मात्र त्यातील एखादंच पुस्तक साहित्याच्या इतिहासात त्यांचं नाव कोरून जातं. द डेथ अँड लाईफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज या पुस्तकाद्वारे जेन यांनी ही किमया साध्य केली आहे. मी माझ्या आधीच्या काही लेखांमध्ये या पुस्तकाचा उल्लेख नागरी नियोजनाचे बायबल, भगवद्गीता किंवा कुराण असा केला आहे. मी जेन यांच्या पुस्तकांची तुलना या धर्मग्रंथांशी केल्यामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या असतील तर मला माफ करा. पण नागरी नियोजनाच्या क्षेत्रासाठी जेन यांचं काम किती महत्वाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी मी ही तुलना केली.

पुण्यानं अलिकडेच राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं. म्हणूनच याविषयी बोलण्यासाठी मला जेन यांचे शब्द अतिशय चपखल वाटले. देशातील 40 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं व जवळपास चौदा निकषांवर या सगळ्या महत्वाच्या शहरांची तुलना करण्यात आली. त्यातूनच पुण्याला राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत पहिलं स्थान मिळालं, ही बातमी वर्तमानपत्रात सगळीकडेच हेडलाईन होती. हे चौदा निकष आहेत, सुरक्षा व सुरक्षितता, वीज पुरवठा, खात्रीशीर पाणीपुरवठा, जमीनीचा मिश्र वापर, अर्थव्यवस्था व रोजगार, प्रशासन, आरोग्य, गृहबांधणी समावेशकता, ओळख व संस्कृती, शिक्षण, सार्वजनिक ठिकाणे, प्रदूषणात घट, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व सर्वात शेवटचे म्हणजे परिवहन व गतिशीलता. या सर्व क्षेत्रांमध्ये शहरात कशाप्रकारे काम करण्यात आलं आहे यावरूनच त्या शहरातल्या नागरिकांचं आयुष्य कशाप्रकारचं आहे हे ठरतं.

तर सर्वप्रथम मी या सन्मानाबदद्ल शहरातल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो! शहरात काही समस्या निर्माण झाली (म्हणजे त्यातील सेवांच्या संदर्भात) तर आपण लगेच यंत्रणा, प्रशासकीय संस्था, सरकार किंवा एकमेकांना दोष देतो. म्हणजे सरकार (आपल्या इथे पुण्याचे नगरसेवक असं म्हणावं लागेल) प्रशासनाला दोष देते, प्रशासन राजकारण्यांना (अर्थात उघडपणे नाही) तसेच नागरिकांना (बहुतेकवेळा बांधकाम व्यावसायिकांना) दोष देते, बांधकाम व्यावसायिक भ्रष्टाचार व लाल फितीच्या कारभाराला दोष देतात, स्वयंसेवी संस्था वरील तिघांनाही दोष देतात व बिचारे नागरिक त्यांना या शहरात राहावं लागतंय म्हणून त्यांच्या नशीबाला दोष देतात. मात्र जेव्हा शहराला राहणीमानाच्या क्षमतेबद्दल पहिला क्रमांक मिळतो तेव्हा कुणीही इतरांचे अभिनंदन करत नाही, तर सगळ्यांमध्ये त्याचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू होते, त्यात पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधक कुणीच मागे नसतं. खरंतर टीका करणं हा पुणेकरांचा स्थायीभाव आहे, त्यामुळे अनेकांनी लगेच ही गुणांकनाची पद्धत कशी चुकीची आहे, तसंच वर नमूद केलेल्या चौदा निकषांच्या संदर्भात शहरातील त्रुटींवर बोट ठेवत पुण्याला मिळालेला सन्मान कसा चुकीचा आहे अशी टीका करायला सुरूवात केली आहे (मी त्यांना पूर्णपणे दोष देत नाही)काही पुणेकरांनी त्याही पुढे जाऊन टीका केला की पुण्याला पहिला क्रमांक मिळवून देण्यात बांधकाम व्यावसायिकांचाच हात आहे, म्हणजे त्यांना मंदीमुळे विकल्या न गेलेल्या त्यांच्या सदनिका विकता येतील. मला असं वाटतं बांधकाम व्यावसायिकांना राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात अशाप्रकारे हस्तक्षेप करणं शक्य असतं तर त्यांनी इतके दिवस नक्कीच वाट पाहिली नसती! बहुतेक पुणेकरांनी उपहासाने प्रतिक्रिया दिली की, “राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांमध्ये पुण्याचा क्रमांक पहिला असेल तर इतर शहरांची स्थिती काय असेल याचा विचार केलेलाच बरा!”

ही शेवटची प्रतिक्रीया अतिशय महत्वाची आहे त्यातला उपहासाचा भाग काही वेळ बाजूला ठेवू, ज्याप्रमाणे अमेरिकन लोकांना त्यांच्या देशाबाहेर जगात काय चाललं आहे याचं सोयरसुतक नसतं (खरंतर बहुतेक अमेरिकन लोकांना त्यांच्या गावाबाहेर सुद्धा काय चाललं आहे याची महिती नसते), त्याचप्रमाणे पुणेकरांना पुणे शहराच्या पलिकडे काय चाललं आहे याविषयी कल्पना नसते. आता हिंजेवाडी आयटी पार्क, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाकण तसंच तळेगाव औद्योगिक क्षेत्रं यामुळे पुणेकरांना ही ठिकाणंही अस्तित्वात आहेत याची जाणीव झाली आहे, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे. काही महिन्यांपुर्वी गडचिरोली पोलीसांनी (पुणेकरांसाठी सांगतो, गडचिरोली हा महाराष्ट्राच्या पूर्वकडे असलेला एक जिल्हा आहे.) एका मोठ्या नक्षलवादविरोधी मोहीमेत तीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. मी या मोहिमेनंतर त्यात सहभागी असलेल्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांचं अभिनंदन करणारं एक पत्रं लिहीलं. त्यांचे प्रमुख डॉ. हरी बालाजी व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख या दोन्ही तरूण आयपीएस अधिकाऱ्यांनी मला धन्यवादपर पत्र पाठवलं. त्यात त्यांनी जे लिहीलं होतं ते अतिशय महत्वाचं होतं, पुण्या-मुंबईतल्या लोकांना गडचिरोली याच राज्यात व देशात आहे हे महिती असल्याचं पाहून अतिशय उत्साह व आनंद वाटला. आपण आपल्या शहरावर टीका करतो, पण आपल्याभोवती काय परिस्थिती आहे हे आपण पाहू म्हणजे आपल्याला ही जीवनशैली मिळाल्याबद्दल आपण किती सुदैवी आहोत याची जाणीव होईल. त्यासाठी आपल्या राज्याबाहेरच्या कशाला आपल्या राज्यातल्याच इतर शहरांशी तुलना करू. मी विदर्भातल्या एका अतिशय लहान गावातून आलोय. माझ्या कामामुळे मला राज्यभरात फिरण्याची व राज्यातल्या इतर शहरांमध्ये पायाभूत सुविधा व एकूणच जीवनाची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याची संधी मिळाली.
 सर्वप्रथम पुण्याला मिळालेला सन्मान योग्यच आहे कारण पुण्यामध्ये जशी राजकीय परिस्थिती आहे, नोकरशाही (लाल फित) आहे तसंच नागरिकांचा दृष्टिकोन आहे इतर शहरातही तशीच परिस्थिती आहे. पुण्याशी (म्हणजे पुणे महानगरपालिकेशी) स्पर्धा करणाऱ्या इतर सगळ्या शहरांमध्येही महानगरपालिका आहे, निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासकीय व्यवस्था आहे, त्यांनाही राजकीय हस्तक्षेप, जीएसटीसारख्या घटकांमुळे महसूलात आलेली तूट, चुकीची कर रचना किंवा निःश्चलनीकरणामुळे आलेली मंदी यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या इतर शहरांनाही पुण्यासारखंच लोकांनी मालमत्ता कर वेळेत न भरणे, अतिक्रमणे, अवैध बांधकामे (म्हणजे झोपडपट्या), अर्थसंकल्पातील तुटपुंज्या तरतुदी व इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तरीही या शहरांच्या तुलनेत नागरिक म्हणून पुण्यामध्ये आपल्या कितीतरी अधिक चांगल्या सेवा (म्हणजेच जीवन शैली) मिळतात ही वस्तुस्थिती आहे. फक्त इतर शहरांची परिस्थिती अतिशय वाईट असल्यामुळे आपल्याला पहिला क्रमांक मिळालाय असं नाही. तर यात इतरही अनेक बाबी आहेत ज्याविषयी कुणीही कधीच बोलत नाही. म्हणूनच आपल्याला ज्यांच्यामुळे पहिला क्रमांक मिळाला आहे त्यांचं मला अभिनंदन करावसं वाटतं. शहराची प्रशासकीय संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेचं हे मोठं यश आहे त्याचप्रमाणे शहराला हा सन्मान मिळवून देण्यात एमएसईडीसीएल (मला अजूनही एमएसईबी म्हणायला आवडतं), जलसिंचन विभाग, पोलीस विभाग यांचंही मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक संघटना, खाजगी क्षेत्रं व स्वयंसेवी संघटनांचं योगदानही आपापल्या परीनं मोठं आहे.

तुम्ही वर नमूद केलेले चौदा निकष पाहिले तर त्यापैकी प्रत्येकाचा शहरातील जीवनावर परिणाम होतो, मात्र त्यातही पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सुरक्षा/सुरक्षितता व शिक्षण हे सर्वात महत्वाचे आहेत. कोणत्याही शहरात हे चारही घटक व्यवस्थित असतील तर सर्व इतर घटक विशेषतः रोजगार येणारच.

आता अनेक पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक, रहदारी याचं काय असा प्रश्न पडेल? आपल्याला जेव्हा शिक्षणासाठी व नोकरीसाठी सगळीकडे फिरावं लागतं तेव्हाच आपल्याला वाहतुकीची गरज पडते. हे शहर किमान लोकांना सगळीकडे फिरण्यासाठी एक निमित्त तर देते, इतर शहरात तर रोजगारच नाही किंवा शिक्षणाच्या चांगल्या सोयी नाहीत ज्यासाठी नागरिकांना रोज ईतका प्रवास करावा लागतो. बऱ्याच जणांना माझा हा दृष्टिकोन आवडणार नाही आणि अर्थातच मी शहरातल्या वाहतुकीच्या भयंकर कोंडीचं समर्थन करत नाही, पण किमान या रहदारीच्या मागचं कारण तरी स्वीकारू की या शहरात नागरिकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत हे शहर बहुसंख्य नागरिकांना जगण्यासाठी फक्त एक कारण देत नाही तर ते कारण पूर्ण करायला संधीपण देते! पुण्यातल्या पाणीपुरवठ्याविषयी बोलायचं तर तो शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे असं म्हणता येईल, अर्थात मी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोताविषयी बोलतोय वितरणाविषयी नाही. आपलं सुदैव आहे की एकाच शहरासाठी जवळपास पाच धरणं आहेत. तुम्ही इतिहासाची पानं उलटून पाहा, ज्या शहराला वापरण्यायोग्य मुबलक पाणी मिळालं त्यांचीच भरभराट झाल्याचं दिसून येईल. विदर्भासारख्या प्रदेशातून आलेल्या माझ्यासारख्या माणसाशिवाय पाण्याचं महत्व कुणाला जाणवू शकेल. अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणी पुरवठा हीच एक समस्या आहे. वीज पुरवठ्याच्या बाबतीत, एमएसईडीसीएलच्या पुणे परिमंडळातून (प्रदेशातून) सर्वाधिक महसूल मिळतो. बहुतेक गावांमध्ये व शहरांमध्ये वीज कपातीची समस्या असताना पुण्याला मात्र चोवीस तास वीज पुरवठा होतो, म्हणूनच ते सर्वप्रकारच्या उद्योगांचे आवडते ठिकाण आहे.
 सुरक्षा व सुरक्षिततेविषयी बोलायचं तर याबाबतीतही अनेकजण टिका करतील की शहरात अजिबात कायदा व सुव्यवस्था नाही. मात्र तुम्ही आपल्या राज्यातल्या इतर गावांना व शहरांना भेट दिलीय का? विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी अजूनही चित्रपटगृहांमध्ये सुद्धा पुरुषांचा व स्त्रियांचा विभाग वेगळा असतो! तसंच बहुतेक शहरांमध्ये स्त्रिया रात्री उशीराचा सिनेमाचा खेळ पाहायला जाऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे रात्र जीवन पाहा. काही घटनांचा अपवाद वगळता हे महानगरांपैकी नक्कीच सर्वात सुरक्षित शहर आहे. याचे योग्य ते श्रेय पुणे पोलीसांना तसंच शहराच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीला (म्हणजेच नागरिकांना) दिलं पाहिजे, जी प्रत्येक पाहुण्याला आदरानं व प्रेमानं आपलसं करते. शिक्षण क्षेत्रात सिंबायोसिस, भारती विद्यापीठ, डी वाय पाटील, एमआयटी, व्हीआयटी यासारख्या खाजगी संस्था तसंच सीओईपी, फर्ग्युसन कॉलेज, एसपी कॉलेज, एमईएस कॉलेज यासारख्या अनेक दर्जेदार सरकारी महाविद्यालयांमुळे हे निश्चितच पूर्वेचं ऑक्सफर्ड आहे. या सगळ्या शैक्षणिक संस्था सर्व प्रकारच्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवतात, त्यामुळेच इथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याच कारणाने पुणे रहाण्यासाठी अधिक योग्य आहे, ज्यामुळे देशभरातून लोक इथे येऊन स्थायिक होतात. मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे पाणी, वीज, सुरक्षा व शिक्षण हे मुख्य घटक असतील तर बाकीच्या गोष्टी आपोआप येतीलच, त्यानंतर तुम्हाला फक्त शहराच्या वाढीचं नियंत्रण करावं लागेल. मला असं वाटतं आपण इथून पुढे या वाढीचं योग्य नियंत्रण करण्यावरच लक्षं केंद्रित केलं पाहिजे. कारण चांगलं शहर असणं हा एक प्रकारे शापही आहे, त्यामुळे सगळेच जण या शहराकडे आकर्षित होतात, याचाच परिणाम वाहतुकीची कोंडी, लाखो अवैध बांधकामांच्या स्वरूपात आपण अनुभवतोच आहोत.

वरील परिच्छेदाचा शेवटचा भाग काळजी करण्यासारखा आहे, देशातील राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांमध्ये अव्वल क्रमांक पटकावणं ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे, मात्र त्यामुळे आपण परिपूर्ण झालो असं होत नाही हे आपण स्वतःला बजावलं पाहिजे. हा सन्मान आपल्या प्रवासातला मैलाचा दगड आहे असं मानलं पाहिजे. हा सन्मान शहरातल्या अनेक उद्योगांसाठी (रिअल इस्टेटसाठीही) नक्कीच वरदान ठरेल, मात्र कोणतंही बिरूद (म्हणजेच सन्मान) जबाबदारीशिवाय मिळत नाही. आता आपल्यावर शहरातल्या नागरी पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. वर्गात एखादा विद्यार्थी पहिला आल्यानंतर त्याचे किंवा तिचे शिक्षक तसंच पालक आणखी मार्कांची अपेक्षा करतात. आता आपण पहिल्या क्रमांकाचे शहर ठरल्यामुळे आपल्याविषयीच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आपण त्या पूर्ण करण्यात अपयशी ठरलो तर आगामी काही वर्षात हा सन्मान इतर कोणत्या शहराला दिला जाईल. तोपर्यंत तरी या यशात आनंद मानूया आणि आगामी आव्हानांना तोंड द्यायला सज्ज होऊ. लक्षात ठेवा कोणतंही शहर त्यातल्या इमारती, उड्डाणपूल किंवा उद्योगांमुळे सर्वोत्तम होत नाही, तर शहरातील नागरिकांमुळे, त्यांच्या शहराविषयीच्या दृष्टिकोनामुळे सर्वोत्तम होते. म्हणूनच आपल्या शहराला मिळालेला हा सन्मान टिकवून ठेवणं आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती करणं ही आपल्या सगळ्यांचीजबाबदारी आहे.


संजय देशपांडे
Mobile: 09822037109



Monday, 13 August 2018

वन्यजीव चित्रपट महोत्सव,नागरीक आणि क्रेडाई !





















काँक्रीटचं शहर काँक्रीटसारखी रुक्ष माणसं तयार करतं! पण समाजाला फुलांसारख्या माणसांची,आकाशासारख्या माणसांची, झऱ्या सारख्या माणसांची, फुलपाखरासारख्या माणसांची, व जंगलासारख्या माणसांचीही गरज असते!”...  मेहमत मुरत इल्दान.

मेहमत मुरत इल्दान, हे आधुनिक तुर्की नाटककार, कादंबरीकार व विचारवंत आहेत. व फार कमी जणांना भारतात हे माहित असेल की त्यांनी मोहनदास करमचंद गांधी या नावाचे नाट्यसुद्धा लिहीले आहे! मानवतेच्या मूर्तीविषयी, राष्ट्रपित्याविषयी नाटक लिहीणाऱ्या व्यक्तीशिवाय मानवतेविषयी जास्त चांगले कोण लिहू शकते! मेहमत यांचे शब्द मला आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यामध्ये अलिकडे झालेला एक कार्यक्रम. पुणे शहर हे कला व संस्कृती संवर्धनाच्या बाबतीत फार सुदैवी आहे. कारण संस्कृती हा या शहराचा कणा आहे. ज्या शहरांनी आपली कला व संस्कृती जिवंत ठेवली, ती वाढण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तीच शहरे समृद्ध झाली. होय, कला व संस्कृतीसाठी जागेचा घटक अतिशय महत्वाचा असतो. इथे जागेचा अर्थ एफएसआयसारखा स्केअर फुटात जागा असा होत नाही, तर जागा म्हणजे  जी शहरातील नागरिकांच्या मनात असेल ती जागा ! आपल्याला असे नागरीक पाहिजे जे कला सादर करू शकतील, कला क्षेत्रात काम करू शकतील असे नागरिक असे नागरीक कलाकारांची दखल घ्यायला उत्सुक असतील त्याचबरोबर पहिल्या दोन वर्गवाऱ्यांमधील नागरिकांना आर्थिक तसंच सक्रीय पाठिंबा देणारे नागरिकही असले पाहिजेत तरच शहरामध्ये संस्कृती वाढेल. सुदैवाने पुण्यामध्ये तिन्ही वर्गवारीतले नागरिक आहेत, म्हणूनच पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे हे सांगायची गरज नाही. मित्रांनो विशेषतः बिल्डर मित्रांनो कृपया लक्षात घ्या, शहराचा हा अतिशय महत्वाचा पैलू आहे व या शहरातल्या संस्कृतीमुळे लोकांना येथे आनंदी व सुरक्षित वाटते. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना इथे स्थायिक व्हावेसे वाटते. हेच लोक रिअल इस्टेटसाठी ग्राहक म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर सदनिका खरेदी करणारे आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.

आता या प्रस्तावनेचा काय संदर्भ आहे असा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी सांगतो, निसर्ग व पर्यावरण संवर्धन हे कला व संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. निसर्गप्रेमी किंवा निसर्गाचा शोध घेणाऱ्या या कलाकारांच्या रूपाने आपल्याला निसर्ग अनेक स्वरूपात भेटीस येतो. निसर्गामध्ये लाखो आश्चर्ये आहेत व ती पाहण्याचे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. आपल्यापैकी सगळ्यांनी कधीना कधी ऍनिमल प्लॅनेट किंवा डिस्कव्हरी चॅनल पाहिले असेल व त्यातल्या वन्य जीवनाचे अद्भुत चित्रण पाहून थक्क झाला असाल, जे निसर्गाचेच एक रूप आहे. मात्र आपण अनेकदा पाहिले असेल की हे माहितीपट भारताबाहेरील जंगलांचे असतात (म्हणजे आफ्रिका, ब्राझील वा ईतर) आपल्याला या जंगलांविषयी आपुलकी वाटत नाही कारण आपल्याला अशाप्रकारचा प्रदेश भोवताली दिसत नाही. आपल्या देशामध्ये अतिशय वैविध्यपूर्ण वन्यजीवन असूनही वन्य जीवन छायाचित्रण अजूनही केवळ मूठभर लोकांसाठीच (म्हणजे थोडक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांसाठी) आहे. एखाद्या व्यक्तीची इच्छा असली तरी तिला वन्य छायाचित्रण छंद म्हणून क्वचितच परवडतो किंवा त्यातून अर्थार्जन करता येतं. खरंतर लेह-लडाखचे शून्यच्या खाली जाणाऱ्या तापमानातील वन्यजीव, कच्छच्या रणात 50 अंशाहून अधिक तापमानातील निसर्ग, पूर्वेकडील राज्यांमधील सदाहरित जंगले (नागालँड, अरुणाचल), पावसाने ओथंबलेले पश्चिम घाट, त्याशिवाय आपण मध्य भारतातील कान्हा व्याघ्र अभयारण्यातील हिरवी कुरणं कशी विसरू शकतो, निसर्गाची एवढी विविधता असलेला आपला देश वन्य जीवप्रेमींसाठी खरोखरच वरदान आहे. आपला एकमेव देश आहे जिथे वाघ व सिंह दोन्हीही आहेत, एकाच जंगलात नसले तरी देशात आहेत. बेदी बंधू, नल्ला मुथ्थू व किरण घाडगे यासारख्या काही व्यक्ती हे वन्य जीवन सौंदर्य त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवताहेत व त्याचे महितीपट बनवत आहेत. पण तरीही अनेक भारतीयांना आपल्याकडे किती उत्तम निसर्गसौंदर्य आहे याची जाणीव नाही व जाणीव असली तरीही केवळ काही जणच या स्थळांना भेट देऊ शकतात. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे किंवा तिच्याकडे काय ठेवा आहे हेच माहिती नसेल, तर आपण त्यांना भारतातील अशा जंगलांच्या संवर्धनाविषयी कसे जागरूक करणार आहोत. दुसरीकडे आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहोत (चीनपेक्षा फार मागे नाही) व ही लोकसंख्या आपल्या समृद्ध वन्य जीवनाला सर्वात मोठा धोका आहे.  आपल्या 120 कोटींहून अधिक लोकसंख्येमुळे आपण सातत्याने प्रत्येक जंगल, तळे, पर्वत, टेकड्यांवर अतिक्रमण करतो आहोत,माणसाने अगदी समुद्रालाही सोडलेले नाही.
जोपर्यंत आपण सामान्य माणसांना या समस्यांविषयी जागरूक करत नाही तोपर्यंत तो याबाबतीत स्वतःहून काहीतरी करेल अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो. लोकांना वन्य सौंदर्य अनुभवायला मिळावे तसंच आपण स्वतःचीच संपत्ती कशी नष्ट करत चालले आहोत याची जाणीव होण्यासाठी माहितीपटांशिवाय उत्तम माध्यम कोणते असू शकते. म्हणूनच पुण्यामध्ये नेचर वॉकचे अनुज खरे यांनी महाराष्ट्र वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला वन्यजीवन महितीपट महोत्सव वन्यजीवन संवर्धनाच्या दिशेने अतिशय महत्वाचे पाऊल होते, जो शहराच्या संस्कृतीचा अतिशय महत्वाचा भाग आहे.

आता तुम्ही विचाराल की क्रेडाईची (विकसकांची संघटना) वन्य जीवन माहितीपट महोत्सवातील भूमिका काय आहे? बांधकाम व्यावसायिकच धडाक्याने काँक्रीटची जंगले उभारून निसर्ग नष्ट करण्यामध्ये पुढे नसतात का? या महोत्सवात महान वन्यजीव माहितीपट निर्माता नल्ला मुथ्थू रणथंबोरमधली वाघीण मछलीवरील माहितीपट बनवतानाचे अनुभव सांगत असताना; त्यांच्या पाठीमागे वाघाचे छायाचित्र (योगायोग म्हणजे हे मीच काढलेलं छायाचित्रं होतं) असलेला कापडी फलक लावला होता, त्यावरचे क्रेडाई पुणेचे प्रतीक चिन्ह पाहून अनेकांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. वन्यजीवप्रेमी व क्रेडाई एकत्र आल्यामुळे माहितीपट महोत्सव अधिक औत्सुक्याचा विषय झाला. महोत्सवात दाखवण्यात आलेल्या बहुतेक माहितीपटांमध्ये काही अपवाद वगळता बहुतेकांमध्ये विशिष्ट प्रजाती किंवा अभयारण्याच्या एखाद्या भागाचे संवर्धन करण्यासाठी स्थानिकांची (कोणत्याही अभयारण्याच्या आत व भोवती राहणारे स्थानिक लोक) भूमिका किती महत्वाची आहे हे दाखवण्यात आले. मी आधी म्हटल्याप्रमाणे बहुतेक ठिकाणी लोकांची गरज किंवा हाव आपल्या देशातील वन्य जीवनासाठी मोठा धोका झाली आहे. जोपर्यंत आपण स्थानिकांना संवर्धनातील त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देत नाही व त्यांना त्यांची हाव नियंत्रणात ठेवायला लावत नाही तसंच त्यांच्या गरजा दुसऱ्या मार्गाने पूर्ण करायला लावत नाही तोपर्यंत वन्य जीवनाचे भविष्य अतिशय भयाण आहे. हे खरे असेल तर पुणे शहरात किंवा भोवताली वन्य जीवन म्हणजेच जैवविविधतेचे संवर्धन करण्याविषयी काय, ती कुणाची जबाबदारी आहे? या शहरातील पक्षी, फुलपाखरे, झाडे, फुले, नद्या, डोंगर व अगदी प्रत्येक कीटकाचे रक्षण करायची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे व बांधकाम व्यावसायिकही (क्रेडाईचे सदस्य) याच शहराचे नागरिक आहेत. म्हणून आपल्याला भोवताली हिरवंगार शहर, पक्ष्यांचा किलबिलाट हवा असेल तर बांधकाम व्यावसायिकांना नागरिकांसाठी घरे बांधताना त्यांना इतर प्रजातींच्या घरांचही संरक्षण करायचं आहे याची जाणीव ठेवावी लागेल. म्हणूनच असा प्रयत्न करणाऱ्या लोकांना सहकार्य करणे त्या दिशेने पहिली पायरी होती जे या महितीपट महोत्सवाद्वारे वन्य जीवन संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पुणे हे वन्य जीवन संवर्धनाविषयी जागरुकतेसाठी ओळखले जाते. अधिकाधिक लोक विशेषतः तरुण लोक आपले समृद्ध वन्यजीवन जाणून घेण्यासाठी देशाच्या विविध भागात भटकंती करत आहेत. अगदी पुणे जिल्ह्यातही अनेक प्रजातींचा समृद्ध वारसा आहे. देशातल्या कोणत्याही अभयारण्याला भेट द्या, तुम्हाला तिथे हमखास पुण्याचे लोक भेटतील. या ठिकाणचे लोक पुणेकरांच्या उत्साहासाठी तसेच वन्य जीवनाविषयी त्यांच्या जागरुकतेविषयी त्यांचा आदर करतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हीच आजची शहरातील पिढी रिअल इस्टेटची भविष्यातली ग्राहक आहे व वन्य जीवन संवर्धनाशी संबंधित होण्यामागचा क्रेडाईचा व्यावसायिक हेतू मी लपवून ठेवत नाही,आणि त्यामध्ये काहीही चुकीचे नाही असे मला वाटतेएखादी कंपनी (म्हणजे बांधकाम व्यावसायिक) घोड्यांच्या डर्बी रेसला प्रायोजित करू शकतो किंवा त्यांच्या प्रकल्पाच्या प्रसिद्धीसाठी एखाद्या बॉलिवुड अभिनेत्याला ब्रँड दूत म्हणून नियुक्त करू शकते, तर मग वन्य जीवन संवर्धनाला पाठिंबा देऊन तोच आपला मार्केटिंगचा  कणा बनवायला काय हरकत आहे? लक्षात ठेवा कोणतीही संवर्धनाची कृती चिरस्थायीही असली पाहिजे. त्याकरता राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठी पैसे आवश्यक असतात, तुम्ही ज्या कारणा साठी पैसे खर्च करता त्यावरून तुमचा जगण्याचा दृष्टिकोन काय आहे हे लोकांना समजतं. आणि जर रिअल इस्टेट वन्यजीवन संवर्धन चळवळीसाठी पैसे खर्च करत आहे तर मी म्हणेन की या चळवळीतील आपल्या भूमिकेविषयी जागरुक होणं हे या माहितीपट महोत्सवाचं फलित आहे. हे त्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल आहे. वन्यजीवन माहितीपट महोत्सवासारखे कार्यक्रम आपल्या शहराचा एक अविभाज्य भाग आहेत, त्यामुळे शहरातले बांधकाम व्यावसायिक नाही तर दुसरं कोण त्यामध्ये योगदान देणार?
त्याचवेळी क्रेडाईच्या सदस्यांचे ग्राहक कोण आहेत हे विसरून चालणार नाही. याच शहरातले नागरिक त्यांचे ग्राहक आहेत व त्यांनाच वन्य माहितीपट महोत्सवात दाखवलेले माहितीपट पाहायचे आहेत. अर्थात महितीपटातली चित्तधरारक दृश्य पाहून, आश्चर्यचकित होऊन क्रेडाईचे या माहितीपट महोत्सवाला पाठिंबा देण्यासाठी आभार मानून नागरीकांची जबाबदारी संपत नाही. अहो तुमची जबाबदारी त्याहूनही मोठी आहे. मी नेहमी सांगतो की तुमच्याकडे तांत्रिक ज्ञान असलेला चांगला बांधकाम व्यावसायिक असेल व तो तुम्हाला तुमच्या पैशांचा मोबदला देणारे घर बांधुन देणार असला, तरी या शहरातल्या बिचाऱ्या चिमण्या, मैना, बुलबुल किंवा फुलपाखरांना सेवा देण्यासाठी क्रेडाईचा सदस्य असलेला कुणीही बांधकाम व्यावसायिक नाही. तुम्हाला आणि मलाच त्यांचं घर बांधायचं आहे. तुम्ही जसं तुमचं घर घेताना त्यासाठी चोखंदळपणे चांगल्या व आधुनिक सुखसोयींची निवड करता, त्याचप्रमाणे तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला त्याने किंवा त्याच्या कंपनीने शहरात किंवा शहराभोवती वन्य जीवन संवर्धनासाठी काय केलं आहे हे विचारा? मला असं वाटतं असं केलंत तरच तुम्हाला स्वतःला जबाबदार पुणेकर म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. त्यानंतरच क्रेडाईचा वन्य जीवन माहितीपट महोत्सवातील सहभाग सार्थकी लागला असं मी म्हणेन.  किमान प्रत्येक बांधकाम व्यावसायिक क्रेडाईचा सदस्य तरी झाला पाहिजे. कारण ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती जंगलात जाऊन वन्य जीवन संवर्धनासाठी काही करू शकेलच असे नाही, पण तो किंवा ती किमान त्याबाबत जागरूक होऊन या संवर्धनात हातभार लावू शकतात.  त्याचप्रमाणे प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला वन्य जीवनासाठी प्रत्यक्षरित्या काहीतरी करणे शक्य नाही पण तो जर क्रेडाईचा सदस्य असेल तर अप्रत्यक्षपणे त्याचा या कामाला हातभार लागेल. कारण ही संघटना नेचर वॉकसारख्या संस्था तसंच वन विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवते. ही वन्य जीवन संवर्धनाच्या दिशेने सुरूवात असेल. त्याशिवाय तुम्ही तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला त्याची कंपनी वन्य जीवन संवर्धनासाठी वैयक्तिकपणे काय करू शकते याविषयी मार्गदर्शन करू शकता पण त्यासाठी आधी तुम्ही त्यातली तुमची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. असं झालं तरच माणसाव्यतिरिक्त इतर प्रजातीही जगण्याची काही शक्यता आहे. नाहीतर पृथ्वीवर फक्त माणूस आणि काँक्रीटची जंगलंच उरतील, ज्यामध्ये जीवन तर असेल पण त्याचं काहीही मोल नसेल. मात्र वन्य जीवन महितीपट महोत्सवाचा फलक व त्यावरचं क्रेडाईचं नाव पाहून, मला व अनेकांना  सगळं काही संपलेलं नाही नक्कीच वाटलं. वन्यजीव प्रेमी म्हणून वन्य जीवन संवर्धनाची आशा जिवंत राहणं याहून अधिक मी काय मागू शकलो असतो!

संजय देशपांडे
Mobile: 09822037109