Friday, 23 September 2016

वास्तुविशारद आणि वास्तु!





















"तुम्ही फक्त इमारतीचं बाह्य सौंदर्य पाहू नका; ईमारतीच्या पायाचं बांधकाम किती मजबूत आहे यावरूनच काळाच्या ओघात ईमारतीची खरी परीक्षा घेतली जाईल"... डेव्हिड ऍलन को.

या अमेरिकी गायकाच्या अतिशय समर्पक शब्दांनी, मी सिंहगड वास्तुविशारद महाविद्यालयात माझ्या भाषणाला सुरुवात केली. निमित्त होतं बांधकाम तंत्रज्ञान कार्यशाळेचं व बहुतेक विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी होते. मला जेव्हा माझी मैत्रीण व तिथे काम करणारी प्राध्यापिका शिल्पा पांडे हिचं आमंत्रण मिळालं, मी एक अभियंता या भावी वास्तुविशारदांना काय सांगणार आहे असा विचार एक क्षणभर मनात आला. मी अनेकवेळा स्थापत्य अभियांत्रीकी विद्यार्थ्यांसमोर नियोजनामध्ये पर्यावरणाच्या घटकांचा कसा विचार करायचा याविषयी बोलतो, मात्र ते बहुतेक वेळा शेवटच्या वर्षातील विद्यार्थी असतात. मी कधीही वास्तुविशारदच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसमोर बोललो नव्हतो ज्यांचे अजून रचना किंवा नियोजन हे विषय शिकून झालेले नसतात. तरीही मला या वयाच्या मुलांशी बोलायला आवडतं. स्वतःचं डोकं तरतरित ठेवायची ती एक उत्तम संधी असते असं मला वाटतं कारण त्यांच्याशी बोलताना तुम्हाला त्यांच्या एक पाऊल पुढे राहावं लागतं व त्यांच्याइतकीच नात्याने ताजा विचार करावा लागतो! त्यामुळे मला पूर्ण कल्पना होती की मला फार तांत्रिक बोलायचं नाही किंवा अभ्यासक्रमाच्या रचनेविषयी बोलायचं नाही. मला त्यांना महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यावर भविष्यात वास्तुविशारद म्हणून काम करताना कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल, व कोणत्याही बांधकामात वास्तुविशारदाची भूमिका कशी महत्वाची असते हे समजून द्यायचं होतं. त्याचवेळी मला महाविद्यालयाने घेतलेल्या पुढाकाराचंही कौतुक वाटलं कारण ते विद्यार्थ्यांना बांधकामाच्या नव्या तंत्रांची तोंडओळख करून देत होते. इमारत म्हणजे एक नाणं असं मानलं तर वास्तुविशारद व अभियंता या नाण्याच्या दोन बाजू असतात! वास्तुविशारद फक्त कागदावर इमारतीचा आराखडा तयार करण्यात समाधान मानतो व त्या आराखड्यातून प्रत्यक्षात इमारत कशी उभी राहते याचा विचार तो क्वचितच करतो. त्याचवेळी अभियंताही त्याला वास्तुविशारदाकडून मिळालेल्या आराखड्याचे डोळे झाकून तंतोतंत पालन करतो, बांधकामाच्या नियोजनात तो स्वतःचं डोकं घालत नाही. या पार्श्वभूमीवर वास्तुविशारदांना इमारत कशी बांधली जाणार आहे याचं ज्ञान सुरुवातीलाच देणे हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे व अर्थातच मला त्यांच्या भविष्यातल्या कारकिर्दीसाठी याचे महत्व त्यांना समजून सांगायचे होते.

म्हणूनच मी असे एक अवतरण निवडले जे बांधकामाच्या केवळ सौंदर्यापेक्षा त्याच्या पायाचे महत्व अधोरेखित करते. मी सुरुवातीलाच मान्य केलं की मी एका क्षणात हे आमंत्रण स्वीकारलं कारण मला वास्तुविशारदांसमोर बोलायची संधी मिळणार होती, एका अभियंत्याला वास्तुविशारदाला बोलायची संधी क्वचितच मिळते व मला ही संधी नक्कीच दवडायची नव्हती. कारण प्रत्यक्ष काम करताना वास्तुविशारदाचाच वरचष्मा असतो ज्याच्या सूचनांचे पालन अभियंत्याला करावे लागते. माझ्या बोलण्याने पिकलेला हशा शांत झाल्यावर, मी त्यांना जगातल्या काही अत्याधुनिक प्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे दाखवली. यामागे दोन हेतू होते. तरुण श्रोते असतील तर त्यांचं लक्ष्य तुम्ही काय बोलताय याकडे राहावं यासाठी छायाचित्रे अतिशय महत्वाची कामगिरी बजावतात, त्याचप्रमाणे छायाचित्रांची जोड असल्यामुळे तुम्ही जे काही बोलताय ते त्यांना चटकन समजतं. म्हणूनच मी त्यांना क्वालालंपूरमधला पेट्रोनाचा दुहेरी टॉवर दाखवला, स्पेनमधलं गुगनहाएम दाखवलं, दुबईतल्या बुर्ल खलिफा व बुर्ज अल् अरब या इमारतींची तसंच दिल्लीतल्या लोटस टेंपलची छायाचित्रे दाखवली. या जगातल्या अत्याधुनिक इमारती मानल्या जातात, आता ही छायाचित्रं पाहून आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण तुम्ही गुगल करून अशी हजारो छायाचित्रे मिळवू शकता. मात्र लक्षात घ्या तुम्ही या इमारतींविषयी अधिक माहिती गुगल करता तेव्हा सर्वप्रथम त्याच्या वास्तुविशारदाचे नाव दिलेले असते. सिझर पेली याने पेट्रोनाज टॉवरची रचना केली, फ्रँक घेरी यांनी गुगनहाएमची कल्पना केली, ऍड्रेन स्मिथ यांनी जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलिफा या इमारतीचं स्वप्न पाहिलं व ते साकार केलं, टॉम राईट यांनी बुर्ज अरबच्या रुपानं जगातलं सर्वात उंच हॉटेल रेखाटलं व फरीबोर्झ साबा यांनी दिल्लीमधल्या लोटस टेंपलद्वारे भारताला अभिमान वाटेल अशी रचना दिली! तुम्ही गुगलवर शोध घेताना तुम्हाला जाणवेल की मानवी सृजनशीलतेचा विकास डौलाने मिरविणाऱ्या या इमारतींच्या बाबतीत सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते वास्तुविशारदाचं! वास्तुविशारद व ही इमारत बांधण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकामध्ये हाच नेमका फरक आहे. इतर जण त्या निर्मितीचा महत्वाचा घटक असतीलही मात्र केवळ कुणीतरी एकच व्यक्ती ते स्वप्न पाहते व कागदावर प्रत्यक्ष उतरवते म्हणजे इतरांनाही ते पाहता येतं आणि ती व्यक्ती म्हणजे ईमारतीचा वास्तुविशारद असतो
इमारत बांधण्यासाठी अभियंता लागतोच हे मान्य असलं तरीही एका व्यक्तिने त्या इमारतीची कल्पना करावी लागते व म्हणूनच वास्तुविशारद हे अतिशय महत्वाचे असतात! म्हणूनच एखादी इमारत वास्तुविशारदाच्या नावाने ओळखली जाते व अभियंत्याच्या नावाने ओळखली जात नाही. वास्तुविशारद हा इमारतीचा निर्माता व अभियंता ही निर्मिती प्रत्यक्ष साकार करणारा असतो. कोणतीही इमारत नाण्यासारखी असते व अभियंता व वास्तुविशारद या नाण्याच्या दोन बाजू आहेत असा विचार करा, म्हणूनच कोणतेही नाणे त्याच्या दोन्ही बाजू असल्याशिवाय पूर्ण होत नाही. एक वास्तुविशारद म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जे अस्तित्वात नाही त्याची कल्पना करणे व निर्मिती करणे ही एक कला आहे म्हणून वास्तुविशारद हा तुमच्यात असला पाहिजे. मी त्यांना सांगितले की अभियांत्रिकी हे विज्ञान आहे व ज्याचं डोकं चांगलं आहे तो कुणीही ते शिकू शकतो कारण शेवटी तो सगळा सूत्रांचा खेळ असतो. मात्र या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कुणीही वास्तुविशारद बनविणार नाही, तर तुमचे प्राध्यापक तुम्हाला वास्तुविशारद कसे व्हायचे याचा केवळ मार्ग दाखवू शकतील, ज्यावरून तुम्हाला मार्गक्रमण करावे लागेल. मात्र त्याचवेळी वास्तुविशारदाने लक्षात ठेवले पाहिजे की त्याने किंवा तिने ज्या स्वरुपाचा विचार केला आहे त्याला अभियांत्रिकीची सूत्रे व सर्व भौतिक ज्ञानाच्या मर्यादा असतात. म्हणूनच त्यांनी अभियांत्रिकीची तंत्रे ज्यांना आपण बांधकामाच्या पद्धती म्हणतो ती शिकून घेतली तर नक्कीच मदत होईल. वास्तुविशारदाला त्याच्या मर्यादा माहिती असतील तसंच त्याची निर्मिती कशी साकार होणार आहे हे सुद्धा माहिती असेल तर याहून अधिक चांगले काय असू शकते? किंबहुना बांधकाम उद्योग वर्षानुवर्षे विशिष्ट तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकून पडला होता, याचे कारण म्हणजे विशेषतः आपल्या देशात या क्षेत्रात संशोधन व विकासाकडे फारसे कधीच लक्ष देण्यात आले नाही. म्हणूनच एखाद्या वास्तुविशारदाकडे काँक्रिट व पोलादापेक्षा इमारत बांधण्यासाठी काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील, तर ते उद्योगासाठी सर्वोत्तम योगदान होऊ शकते. वास्तुविशारदाला स्थानिक भूगोल, भोवताली उपलब्ध असलेले बांधकामाचे साहित्य माहिती असणे आवश्यक आहे. राजस्थानात वालुकाश्म सहज उपलब्ध असताना तिथे काँक्रिटचे बांधकाम केले तर काय होईल किंवा कोकणात लाल जांभा भरपूर मिळतो अशा वेळी तिथे संगमरवर वापरला तर काय होईल; ती इमारत भयंकर दिसेल व वातावरणाशी विजोड वाटेल. मला व्यक्तिशः असं वाटतं की सर्वोत्तम इमारत इतर इमारतींपेक्षा वेगळीच दिसली पाहिजे असं नाही तर ती सभोवतालच्या परिसरात मिसळून गेली पाहिजे व त्यासाठी प्रत्येक ठिकाणी काय साहित्य उपलब्ध आहे याची माहिती असणे अत्यावश्यक आहे. आणखी एक पैलू म्हणजे बांधकाम खर्च, कुणाही ग्राहकाला तुमच्या रचनेमुळे स्वतःचे खिसे कापून घ्यायला आवडणार नाही!
आता प्रश्न येतो की, वास्तुविशारदाचं काम काय? आता बरेच जण म्हणतील हा काय प्रश्न आहे! मी स्पष्टच सांगितलं नाही का वास्तुविशारदाचं काम इमारतींची किंवा बांधकामांची निर्मिती व रचना करणे? अर्थातच मात्र यात एक अट आहे, वास्तुविशारदाला इमारतीची रचना त्याला किंवा तिला हवी तशी करण्याची मोकळीक नसते, त्याला ती ग्राहकाच्या गरजांनुसारच तयार करावी लागते. त्यामुळे ही सीमारेषा स्पष्टपणे समजून घ्यावी लागते, ग्राहकाला रुग्णालय हवे असेल तर तुम्ही हॉटेलची रचना करून चालणार नाही, मग ते कितीही उत्तम का असेना. त्यामुळे वास्तुविशारदाचे मुख्य काम म्हणजे ग्राहकाच्या मनातले जाणून घेणे व ग्राहकाला काय हवे आहे व त्याच्या गरजा काय आहेत हे समजून घेणे. लक्षात ठेवा ग्राहकाला काय हवं आहे व त्याच्या गरजा काय आहेत यात फरक असतो. इथेच थोडंसं तत्वज्ञान किंवा मानशास्त्राचा आधार घ्यावा लागतो कारण अनेकदा अगदी प्रौढ माणसालाही त्याला नेमकं काय हवं आहे व त्याच्या गरजा काय आहेत यातला फरक कळत नाही. उदाहरणार्थ मी तुमचा ग्राहक आहे व मला माझ्या कुटुंबासाठी एक घर बांधायचं आहे मात्र माझ्या घरात मला नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे व ते घर माझ्या गरजा जास्तीत जास्त पूर्ण कसं करेल हे मला माहिती नाही. यामध्ये ग्राहकाच्या कुटुंबाला जाणून घेणे, त्यांची जीवनशैली, आवडीनिवडी, प्रत्येक सदस्याला आवडणारे रंग, ते त्या घरामध्ये एकत्रितपणे व स्वतंत्रपणे कसा वेळ घालवतात हे समजून घ्यायची गरज आहे! इथे वास्तुविशारदाची भूमिका ग्राहकांच्या कुटुंबाशी त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांप्रमाणे बोलणे, त्यांच्या जीवनशैलीचे विश्लेषण करणे व त्यांना घराची कल्पना तयार करताना ते कुठे कमी पडताहेत हे समजून सांगणे व त्यानंतर त्यांच्यासाठी सर्वोत्तम घराची रचना करणे अशी असते; कारण बहुतेक लोकांना त्यांच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे माहिती नसते. हे प्रत्येक बांधकामाला लागू होते कारण तुम्ही रचना केलेले प्रत्येक बांधकाम, प्रत्येक ग्राहक व त्यांच्या गरजा वेगळ्या असतील.

तुम्ही सर्वजण जेव्हा या महाविद्यालयातून बाहेर पडाल, तेव्हा तुम्हा सर्व प्रकारच्या इमारतींची किंवा बांधकामांची रचना करायची संधी मिळेल, मग तो एखादा पूल असेल किंवा शाळा किंवा प्रदर्शन केंद्र किंवा प्रयोगशाळा; कोणत्याही रचनेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ते बांधकाम कोणते लोक वापरणार आहेत. तुमच्या बांधकामाचं व त्याच्या रचनेचं यश हे तुम्ही नाही तर वापरकर्ता ठरविणार आहे. आजकाल आधुनिक स्थापत्यशास्त्र किंवा नागरी नियोजनामध्ये शाश्वतपणा हा शब्द त्याचा नेमका अर्थ जाणून न घेता सर्रास वापरला जातो. वास्तुविशारदाला तो त्याच्या निर्मितीमधून पर्यावरणाशिवाय आणखी कोणत्या गोष्टी टिकवणार आहे हे माहिती असले पाहिजे, सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला ते बांधकाम जी व्यक्ती वापरणार आहे तिची मानसिक शांतता टिकवता आली पाहिजे. चुकीची रचना वापरकर्त्याची किंवा त्या इमारतीमध्ये राहणाऱ्याची मनःशांती म्हणा किंवा आनंद हिरावून घेऊ शकते व वास्तुविशारदासाठी हे सर्वात मोठे आव्हान असते. ते सार्वजनिक उद्यान असेल तर लोकांना त्या उद्यानामध्ये आरामादायक कसे वाटेल हे समजून घेण्याचा व त्यानुसार जागा तयार करण्याचा प्रयत्न करा. ती जर एखादी शाळा असेल तर शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना वर्गांपासून ते मार्गिकेपर्यंत प्रत्येक कोपरा वापरण्यास अतिशय सहज आहे असे वाटले पाहिजे. यासाठीच वास्तुविशारदाला तो इमारतीची रचना का करतो आहे हे माहिती असले पाहिजे; म्हणजेच तुम्ही कुणासाठी या इमारतीची रचना करताय हे तुम्हाला माहिती असले पाहिजे!

आजच्या युगात हे सगळं करताना तुमच्या समोर असलेलं सगळ्यात मोठ्ठ आव्हान म्हणजे तुमच्या ग्राहकासोबतच निसर्गाच्या शांततेचा समतोल राखणे. एक लक्षात ठेवा, इको-फ्रेंडली किंवा निसर्ग-पूरक असं काहीच नसतं मनुष्य-निर्मित कोणतंही बांधकाम ज्या जागेवर बांधलं जातं ती ओसाड जागा असली तरी तिथे गांडुळासारखे किटक किंवा मुंग्या आनंदाने राहातच असतात. माणूस सोडला तर दुसऱ्या कोणत्याच प्रजातीला स्वतःसाठी घर बांधायला वास्तुविशारदाची सेवा घ्यायचं स्वातंत्र्य नसतं. म्हणूनच स्थापत्यशास्त्राचे ज्ञान घेताना तुमचे मानवाशिवाय इतर प्रजातींबद्दलची आपली जबाबदारी काय आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या स्वप्नातला प्रकल्प साकार करता तेव्हा नैसर्गिक भूरचनेची किंवा पशु-पक्ष्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाची कमीत कमी हानी होईल याचा विचार करा. त्यामध्ये पक्षांसाठी, फुलपाखरांसाठी, इतकंच काय गाडुंळांनाही आपल्यासोबत वाढायला जागा ठेवा. पृथ्वीवर राहायचा अधिकार फक्त माणसालाच नाही तर प्रत्येक सजीवाचा जमीनीच्या लहानात लहान तुकड्यावर तितकाच हक्क आहे. तुम्ही तुमच्या रचनांमधून त्यांना हा हक्क मिळवून देऊ शकता. आपली जीवनशैली जपण्याच्या हव्यासापायी आपण अनेक प्रजातींच्या निवासस्थानावर अतिक्रमण करून त्यांना नामशेष करतो, आपण काही पुरातन काळात परत जाऊ शकत नाही व गुहांमध्ये तसंच झाडांवर राहायला सुरुवात करू शकत नाही. मात्र तुम्ही जेव्हा रचना करता तेव्हा या पैलूचा नेहमी विचार करा, बाकीचं आपोआप सुचत जाईल!

सर्वात शेवटी यशस्वी वास्तुविशारद होण्यासाठी मला काही सूचना द्याव्याशा वाटतात, त्या अगदी सोप्या आहेत; वाचा, पाहा, प्रवास करा, लिहा, जास्तीत जास्त ग्रहण करा व इतरांना सांगा! तुम्हाला जेवढं जास्त शक्य होईल तेवढं वाचा कारण त्यामुळे तुम्ही लोकांविषयी व त्यांच्या गरजांविषयी विचार करू शकाल. कार्टुनपट, सुपर हिरो ते अगदी प्रेमपटापर्यंत सगळे चित्रपट पाहा यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करा कारण त्यामुळे तुम्हाला विविध ठिकाणे पाहता येतील व जगभरातल्या निवासस्थानांविषयी व पृथ्वीवरच्या विविधतेविषयी जाणून घेता येईल. लिहा कारण तुम्हाला जे काही वाटतं ते व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे, एक लक्षात ठेवा एक वास्तुविशारद म्हणून तुमची रेखाटने, आराखडे ही तुमची भाषा आहे. म्हणूनच तुम्ही जे शिकला आहात ते तुमच्या रचनांमधून दिसून येईल. तुम्ही जे पाहिले आहे व ऐकले आहे ते ग्रहण करा, कारण पाहणे व निरीक्षण करणे तसेच ऐकणे व श्रवण करणे यात फरक आहे! तुम्हाला जे समजले आहे ते तुमच्या कुटुंबाला, मित्रांना व शिक्षकांना सांगा कारण तरच तुमच्यामध्ये आणखी ज्ञान ग्रहण करण्यासाठी जागा तयार होईल.

सर्वात शेवटी मी इतकच म्हणेन की एक यशस्वी वास्तुविशारद म्हणजे लठ्ठ शुल्क आकारणारा, अतिश्रीमंत ग्राहक असलेला नाही तर जो त्याच्या इमारतीतल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो तो खरा यशस्वी वास्तुविशारद. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत अनेक इमारतींची रचना कराल मात्र जेव्हा तुम्ही रचना केलेल्या इमारतीसमोर उभे राहाल तेव्हा तुम्हाला तिचा अभिमान व जिव्हाळा वाटला पाहिजे, तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने निर्माता म्हणता येईल! चला तर मग, तुमच्या विविध निर्मितींमधून एका अधिक चांगलं जग तयार करा, माझ्या तुम्हा सर्वांना याच शुभेच्छा आहेत.


संजय देशपांडे


Mobile: 09822037109








Thursday, 15 September 2016

प्रकल्प नव्हे समाज बांधतांना !




















समाज हा केवळ व्यक्तिंचा बनत नाही तर त्यांच्या परस्पर संबंधांमधून बनतो, या नात्यांचे बंध या व्यक्तिंना जोडून ठेवतात   … कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स हा तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार व क्रांतिकारी समाजवादी होता. प्रशियामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला, त्याने नंतर राजकीय अर्थशास्त्र व हेगेलियन तत्वज्ञान यांचा अभ्यास केला. एखाद्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात असं म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, माझ्याकडे कार्ल मार्क्स किती महान होता याचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत! त्याने स्वतःच्या विचारांनी जगाची विचार करण्याची पद्धत बदलली!  माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याचं त्याचं विधान सर्वमान्य झालं व ते मार्क्सचं तत्वज्ञान म्हणून ओळखलं जाऊ लागलं, त्याला एखाद्या धर्माप्रमाणेच मान्यता मिळाली! मला त्याचे समाजाविषयीचे वरील शब्द आठवायचे कारण म्हणजे मला आमच्या दोन पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये अलिकडेच बोलावण्यात आले होते व त्यातले साधर्म्य इथेच संपत नाही. दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन एका वर्षापेक्षा अधिक काळ झाला, त्यातला एक प्रकल्प तर जवळपास चार वर्षांपूर्वी पूर्ण झाला! दोन्ही ठिकाणी तिथल्या सोसायटीचे सदस्य काही सांस्कृतिक उत्सव साजरा करत होते म्हणून मला आमंत्रण होतं. त्यापैकी एका कार्यक्रमात माझा रिअल इस्टेट ब्लॉगर गुरु रवी करंदीकर माझ्यासोबत होता व तो सदस्यांच्या भक्तिभावाने इतका भारावून गेला की दुसऱ्या दिवशी हे सदस्य करत असलेल्या पूजेचे संपूर्ण ध्वनीचित्रमुद्रण करण्यासाठी पुन्हा तिथे गेला!

आता तुमची उत्सुकता फार न ताणता तपशीलाने सांगतो; पहिला प्रकल्प होता दवबिंदू, जो तरुण आयटी अभियंत्यांच्या गरजेनुसार बनवलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पातील सर्व सदस्य धार्मिकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जैन समुदायाचे आहेत. दुसरा प्रकल्प म्हणजे अष्टगंध, ही साधारण तीस सदनिकांची लहानशी सोसायटी आहे, दोन्ही प्रकल्प पुण्याच्या पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. दोन्ही प्रकल्पांमध्ये तरण तलाव किंवा व्यायामशाळा यासारख्या उंची सुविधा नाहीत किंवा सुशोभित स्वागतकक्ष नाही, इथे इटालियन मार्बल किंवा केंद्रीय वातानुकूलन यंत्रणेसारख्या सुविधा नाहीत; तरीही एक गोष्ट मात्र इथे आहे, ती म्हणजे इथल्या रहिवाशांनी जेव्हा माझं स्वागत केलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला निःस्सीम आनंद व उत्साह
दवबिंदूमध्ये, सर्व रहिवासी जैन असल्यामुळे त्यांनी एक लहानसे जैन मंदिर बांधण्यासाठी त्यांच्या मोकळ्या जागेचा वापर केला आहे. इथेही बरेच जण म्हणतील की, मोकळ्या जागी त्यांनी क्लब हाऊस किंवा व्यायामशाळा बांधायला हवी होती किंवा लॉन करायला हवं होतं, जसं आपल्या बहुतेक प्रकल्पांमध्ये असतं. मात्र या प्रकल्पातील मोकळ्या जागांचा खरा उद्देश रहिवाशांना आनंद व शांतता मिळावी, त्यांना एकत्र येता यावं हाच आहे असं मला वाटतं. जर त्यांनी एखादं लहानसं जैन मंदिर बांधलं, जिथे ते एकत्र येऊ शकतील, प्रार्थना करू शकतील व त्यातून त्यांना आनंद व शांतता मिळली तर त्याला कुणाची काय हरकत असू शकते? किंबहुना हे तरुण त्यांचा धर्म ही त्यांची जीवनशैली व्हावी या हेतूनेच एकत्र आले व केवळ एक सोसायटी स्थापन करायची म्हणून हा प्रकल्प तयार झाला नाही तर स्वतःचा एक समुदाय तयार करणं हा त्यांचा उद्देश होता! मला अतिशय आनंद वाटतो की ते ज्या उद्देशाने माझ्याकडे आले होते तो पूर्ण झाला! रवीने त्यांची मुलाखत घेतली व त्यांना पेचात पाडणारे भरपूर प्रश्न विचारले (तो त्यात तरबेज आहे) मात्र त्यांनी एखाद्या साधूप्रमाणे अतिशय संयमाने त्याची उत्तरे दिली, आणि हो त्यातल्या बऱ्याचजणांची जीवनशैली खरोखरच साधूसारखीच आहे

हा अशा काही आयटी व्यावसायिकांचा समूह आहे की जे शनिवार-रविवारी मित्रमंडळींसोबत पबमध्ये दारूच्या पार्ट्या करत नाहीत, सूर्यास्तापूर्वी जेवतात व पहाटे लवकर उठतात, थंड पाण्याने अंघोळ करतात व त्यांच्या मंदिरात पूजेसाठी तयार होतात! आम्हाला त्यांना त्यांच्या संकुलामध्ये मंदिरासाठी जागा करून द्यायची होती! दवबिंदूच्या रहिवाशांनी मला त्यांच्या पर्यूषण पर्वानिमित्त आमंत्रण दिलं होतं. या पवित्र महिन्यात बहुतेक जैन लोक उपवास करतात व जैन साधू व साध्वी शांत व निरामय जीवनाविषयी व्याख्याने देतात. मी रवीलाही माझ्यासोबत घेऊन गेलो कारण त्याला त्यांच्या जीवनशैलीविषयी प्रश्न विचारायचे होते व त्यांच्या घर खरेदी करायच्या अनुभवाविषयी जाणून घ्यायचे होते. यापैकी बहुतेक तरूण मध्यप्रदेश किंवा राजस्थान या राज्यांमधील आहेत. यातली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांचे आईवडील आधी त्यांचे मूळ गाव सोडून त्यांच्यासोबत राहायला तयार नव्हते मात्र जेव्हा त्यांनी दवबिंदूमधील संस्कृती व सामुदायिक जीवन पाहिले, तेव्हा त्यांनी स्वतःहून पुण्याला यायला व मुलांसोबत राहायला सुरुवात केली!

मला असं वाटतं आम्ही केलेल्या बांधकामातून ही सर्वात चांगली बाब झाली, कारण आपल्या कुटुंबामुळे घर तयार होतं आपण दिलेल्या सुविधांमुळे नाही. जर आमच्या घरांमुळे लोक एका कुटुंबाप्रमाणे जवळ येणार असतील तर याहून अधिक चांगलं काय होऊ शकतं? त्यांच्या मुलाखतींमधून या तरूण पिढीला त्यांच्या बांधकाम व्यावसायिकांसोबतच्या संवादाविषयी काय वाटतं हे समजलं; त्यांना असं वाटतं की चांगला बांधकाम व्यावसायिक ठरवताना योग्य संवाद हा अतिशय महत्वाचा घटक आहे. ते अनेक बांधकाम व्यावसायिकांना भेटले मात्र त्यांच्या चौकशीला वेळेत उत्तरे कधीच मिळाली नाहीत, त्यांच्यादृष्टिने हे कामाशी बांधलकी नसल्याचे लक्षण आहे! इथे बांधकाम व्यावसायिक म्हणजे केवळ एक व्यक्ती असं नाही तर त्याचा संपूर्ण चमू असा अर्थ होतो, रिअल इस्टेटने याची दखल घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या सोसायटीच्या सदस्यांनी आमच्या चमूचं कौतुक केलं कारण त्यांच्यापैकी कुणीही ईमेलद्वारे काही विचारणा केल्यास आम्ही त्यांना चोवीस तासात उत्तर दिलं होतं! मी इथे आमचा मोठेपणा सांगत नाही मात्र या अनुभवाचा इतरांना फायदा होऊ शकतो, कोणत्याही व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारे संवाद साधणं हे अतिशय महत्वाचं आहे, मला पूर्णपणे आदर राखत एक कटू सत्य सांगावसं वाटतं की आपण भारतीय त्यात कमी पडतो!

दुसरा प्रसंग बाणेरच्या अष्टगंधमधला होता ज्याचा पहिला टप्पा आम्ही चार वर्षांपूर्वीच पूर्ण केला व हस्तांतरित केला! ज्यांना रिअल इस्टेट उद्योगाविषयी फारशी माहिती नसेल त्यांना कदाचित प्रकल्प हस्तांतरित होऊन चार वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला बांधकाम व्यावसायिकाला सपत्निक बोलावण्याचे विशेष महत्व वाटणार नाही! प्रकल्प हस्तांतरित केल्यानंतर चार वर्षांनी बांधकाम व्यावसायिकाने पुन्हा तिथे भेट द्यायला हिंमत लागते एवढे मात्र मी निश्चित सांगू शकतो! अष्टगंधचे रहिवासी गणेशोत्सव साजरा करत होते व त्यांनी नृत्य, गायन, पाककला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं व त्यांनी मला पारितोषिक वितरणाला प्रमुख पाहुणा म्हणून हजर रहावं अशी विनंती केली होती. मी अतिशय आनंदानं त्यांचं आमंत्रण स्वीकारलं कारण अशा भेटागाठींमधून मला ग्राहकांना भेटता येतं, त्यांची जीवनशैली जाणून घेता येते व यातून व्यवसायाविषयी बरंच काही शिकता येतं. यामध्ये बांधकाम व्यवसायिकाला एक धोका असतोच कारण अशा कार्यक्रमांमध्ये तुम्ही सगळ्या ग्राहकांना समाधानी करू शकत नाही व असे ग्राहक तुम्हाला सार्वजनिकपणे तोंडघशी पाडू शकतात. मात्र तुम्ही आपल्या कामाशी शंभर टक्के बांधील असाल तर कशाला काळजी करायची व मला वैयक्तिकपणे असे वाटते की अशी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. मला आश्चर्यच वाटलं कारण अध्यक्ष/सचिवांनी माझा फक्त सत्कारच केला नाही तर त्यांना स्वर्गासारखं घर दिल्याबद्दल माझे आभारही मानले! माझ्यासाठी हा अतिशय हृदयस्पर्शी अनुभव होता, त्यातल्या कुणीही इमारतींच्या समस्यांविषयी गाऱ्हाणी सांगितली नाहीत, सर्व रहिवासी अतिशय आनंदी व उत्साही होते. दहा दिवस वेगवेगळी कुटुंबं गणपतीची आरती करत होती व आवर्जुन घरी बनवलेलाच प्रसाद वाटला जात होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांनाच त्यांच्या सहकार्यासाठी व सहभागासाठी बक्षिस देण्यात आलं ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच समावेश होता! या सोसायटीला फार मोठी मोकळी जागा नाही किंवा कॉमन रूमही नाही मात्र सगळेजण पार्किंगची जागा अशा कार्यक्रमांसाठी आनंदाने वापरतात.

मला वाटतं अशा प्रकारच्या होत असलेल्या सोसायट्यांमधून समाज तयार होतो, या दोन्ही प्रकल्पांमध्ये आम्ही फार काही उल्लेखनीय काम केले आहे असे मी म्हणणार नाही. त्या साध्या इमारती आहेत व त्यामध्ये पावसाळ्यात क्वचित गळणे किंवा झिरपणे यासारख्या समस्या होतात. पायाभूत सुविधांच्या आघाडीवर या भागामध्ये सांडपाण्याच्या वाहिन्यांचे जाळेच नसणे यासारख्या बाबी आमच्या नियंत्रणाच्याबाहेरच्या होत्या व रहिवाशांना त्याचा जरूर त्रास झाला असता, मात्र संवाद व एकमेकांवर विश्वास सदैव होता

बांधकाम व्यावसायिक म्हणून या प्रकल्पांमध्ये झालेल्या दोन्ही कार्यक्रमांमधून मला जे काही शिकायला मिळाले ते कोणत्याही व्यवस्थापन महाविद्यालयात शिकायला मिळाले नसते; यातून मला समजले की ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी त्यांना महागड्या भेटवस्तू दिल्या पाहिजेत किंवा कारागिरी अद्ययावत असली पाहिजे असे नाही. तुम्ही त्यांना जे काही आश्वासन दिले आहे ते पूर्ण करा. तुमचे काम घर बांधणे आहे ते प्रामाणिकपणे करा व सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही केवळ बांधकाम व्यावसायिक म्हणून नाही तर त्यांच्यातलेच एक आहात अशाप्रकारे त्यांच्यासाठी उपलब्ध व्हा! बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण पूर्ण केलेल्या प्रकल्पांविषयी आपण विचारही करत नाही त्यामुळे त्यांना भेट देणे ही तर फार दूरची गोष्ट झाली, मात्र हळूहळू हा कल बदलतोय. केवळ समाजकार्याच्या दृष्टिकोनातूनच नाही तर विपणनाच्या दृष्टिकोनातूनही शक्य असेल तेव्हा स्वतः तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधणे ही व्यवसायाची गरज आहे. आपण आपल्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधील रहिवाशांनी एकत्र येऊन असे सणवार साजरे करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो, तसंच अशा कार्यक्रमांसाठी आपणही थोडाफार निधी द्यायचा विचार करू शकतो. आपण बांधलेल्या एखाद्या इमारतीला आपण जेव्हा घर म्हणतो तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एकत्र येणं हा कुठल्याही घराचा पाया आहे व बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्हाला फक्त पायाभरणी करायची आहे! रिअल इस्टेटमधल्या लोकांनी व्यवसायाचं हे साधं सोपं गणित समजून घ्यायची वेळ आली आहे, त्यासाठी फार खर्च येत नाही फक्त तुमच्या हातात असलेलं काम तुम्हाला प्रामाणिकपणे करावं लागतं.

बांधकाम व्यावसायिकाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर मला दवबिंदू व अष्टगंधमध्ये झालेल्या कार्यक्रमांमधून मिळालं. नफा मिळवणं हे उद्दिष्ट आहेच, मात्र रहिवाशांचे आनंदी चेहरे मला सांगत होते की तुम्ही एक अशी सोसायटी तयार केली आहे जिथे अनेक पिढ्या नांदणार आहेत, त्यांची सांस्कृतिक भरभराट होणार आहे व त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत; बांधकाम व्यावसायिक म्हणून हे माझं काम आहे याची मी स्वतःला आठवण करून दिली. मी त्या रहिवाशांना सांगितलं; खरंतर मी तुमचा आभारी आहे कारण तुम्ही मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली, कारण कोणत्याही ध्येयाशिवाय जीवनाला काय अर्थ आहे! कार्ल मार्क्सने म्हटल्याप्रमाणे समाजातील व्यक्तिंमधील परस्पर संबंध हा समाजाचा सर्वात महत्वाचा घटक असतो व बांधकाम व्यावसायिकाला केवळ पहिले पाऊल उचलावे लागते; समाज निर्मितीचा हाच मार्ग आहे, केवळ आपल्या नावावर नवे प्रकल्प जमा झाल्याने ते होणार नाही!


संजय देशपांडे


Mobile: 09822037109

Thursday, 8 September 2016

समाधानी ग्राहक आणि बांधकाम व्यवसाय !



















तुमच्या सर्वात असमाधानी ग्राहकांकडून तुम्हाला बरेच काही शिकण्यासारखे असते”... बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. ते गेली अनेक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत  पहिल्या तिघांत आहेत, कदाचित त्यांनी आता ही वर्षं मोजणं सोडून दिलं असेल! जगात अशा काही व्यक्ती आहेत ज्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज भासत नाही, मात्र मला खरोखर असं वाटतं की लोकांना या व्यक्तिंविषयी नेमकी किती माहिती असते? उदाहरणार्थ, मी जेव्हा म्हणतो की बहुतेक लोक श्री. बिल गेट्स यांना ओळखतात, त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडलं त्यानंतर मायक्रोसॉफ्ट सुरु केली व नंतर त्यांनी विंडोज नावाची संगणकप्रणाली तयार केली वगैरे सगळ्यांना माहिती असतं. मात्र किती लोकांना बिल गेट्स एक व्यक्ती म्हणून कसे आहेत किंवा त्यांचं तत्वज्ञान कसं आहे व ते सध्या जिथे आहेत तिथे कसे पोहोचले हे प्रत्यक्षात कुठे माहिती असतं? मला खात्री आहे ही श्री गेट्स यांच्या या पैलूविषयी फारसं कुणालाच माहिती नसेल! जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होणे व ते स्थान वर्षानुवर्षे टिकवून ठेवणे सोपे नाही. विशेषतः तुमच्या व्यवसायाद्वारे तुम्ही जगभरातल्या लाखो लोकांना सेवा देता तेव्हा; तेव्हा या लाखो ग्राहकांना खुश कसं ठेवायचं हे तुम्ही शिकल्याशिवाय तुम्हाला श्रीमंत राहता येत नाही! म्हणूनच त्यांच्या विधानांमधून आपल्याला बिल गेट्स नेमके कसे आहेत, त्यांना त्यांच्या उत्पादनाविषयी काय वाटते व आपल्या ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांचे काय तत्वज्ञान आहे हे समजते

दुर्दैवाने आपल्या देशात, असमाधानी ग्राहकांची संख्या अतिशय सर्वाधिक असताना, रिअल इस्टेट उद्योग त्यातून काहीही शिकलेला नाही. माझे हे निवेदन माझ्या अनेक मित्रांना आवडणार नाही मात्र आपल्या उद्योगाच्या भूतकाळातून व वर्तमानकाळातून आपल्याला हेच दिसून येते हे तथ्य आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ग्राहक न्यायालयामध्ये रिअल इस्टेटच्या ग्राहकांनी दाखल केलेले पन्नास हजारांहून अधिक वाद किंवा खटले प्रलंबित आहेत. इतर कुठल्याही उत्पादनाच्या ग्राहकांपेक्षा ही संख्या मोठी आहे, याचाच अर्थ असा होतो की रिअल इस्टेटमध्ये असमाधानी ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. तज्ञांचा असा दावा आहे की हे हिमनगाचे टोक आहे कारण अनेक ग्राहक बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल करायला समोर येत नाहीत कारण ही प्रक्रिया लांबलचक असते व न्याय मिळेलच याची काही शाश्वती नसते! नक्कीच रिअल इस्टेट उद्योग कुठेतरी चुकतोय किंवा या उद्योगाचं नियंत्रण करणारी यंत्रणा कुठेतरी चुकतेय नाहीतर इथे असामाधानी किंवा नाखुश ग्राहकांचं प्रमाण एवढं मोठं असण्याचं काय कारण आहे? मात्र एका अर्थानी पाहिलं तर ही संख्या फार मोठी आहे असं मी म्हणणार नाही कारण केवळ पुणे शहरात दरवर्षी एक लाखाहून अधिक नवीन घरे बांधली जातात. मात्र या समस्येचे विश्लेषण करण्यासाठी आपण आधी रिअल इस्टेटचे स्वरुप समजून घेतले पाहिजे व त्यानंतर आपण ग्राहकास काय हवं आहे हे विचारात घेऊन रिअल इस्टेटच्या गरजांचे विश्लेषण करू शकतो? त्याचवेळी रिअल इस्टेटमध्ये कोणत्याही माहितीचा किंवा सांख्यिकीचा अचूक किंवा अधिकृत सरकारी डेटा उपलब्ध नाही, आपल्याला जे काही उपलब्ध होतं ते एखाद्या खाजगी कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून घेतलेलं असतं.
रिअल इस्टेट उद्योग जेव्हा ८०च्या दशकात केवळ दिल्ली किंवा मुंबई या शहरांपुरताच मर्यादित होता तेव्हा, बांधकाम व्यावसायिकही कमी होते व ग्राहकांच्या अपेक्षाही मर्यादित होत्या. जमीन ही आजच्यासारखी दुर्मिळ गोष्ट नव्हती व बहुतेक बांधकाम व्यावसायिक हे समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असायचे. मात्र तरीही रिअल इस्टेट कधीही ऑटो किंवा औषधनिर्मिती यासारखा व्यावसायिक उद्योग नव्हता, कारण त्यामध्ये नेहमीच मानवी हस्तक्षेप होता, संशोधन किंवा विकास किंवा यांत्रिक प्रक्रियांचा वापर अतिशय कमी किंवा शून्य होता. इथे बहुतेक व्यवहार बांधकाम व्यावसायिकांनी कशाचे आश्वासन दिले आहे किंवा त्यांच्या माहिती पत्रकात काय छापले आहे यावर अवलंबून असतात. त्याचशिवाय रिअल इस्टेटचे नियंत्रण करणारे कायदे अतिशय गुंतागुंतीचे आहेत, त्यातच मंजुरी देणारी प्राधिकरणे, तसेच करार, नोंदणी यासारख्या प्रक्रियाही असतात ज्या इतर उत्पादने खरेदी करताना कराव्या लागत नाहीत. रिअल इस्टेटमध्ये पूर्वी सगळे व्यवहार समोरासमोर व्हायचे, विक्री दरापासून ते चटई क्षेत्रापर्यंत सगळं काही स्पष्टपणे सांगितलं जायचं, सर्वात महत्वाचं म्हणजं बांधकाम व्यावसायिक नावाचा माणूस ग्राहकांसाठी नेहमी उपलब्ध असायचा! आजकाल विक्री दर प्रत्येक प्रकल्पानुसार बदलतातच मात्र ते प्रत्येक ग्राहकानुसारही बदलू शकतात; तेव्हा दर स्थिर होते व प्रकल्प गडबडीने सुरु करण्यासाठी स्पर्धा नसायची. त्यानंतर ९०च्या दशकात मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खेळू लागला, अचानक जमीनीला सोन्याचा भाव आला व प्रत्येकालाच रिअल इस्टेटशी जोडलं जावं असं वाटू लागलं. तो गरजूंच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारा उद्योग राहिला नाही तर सोन्याची खाण झाली. मला असं वाटतं रिअल इस्टेटला असलेला सर्वात मोठा शाप म्हणजे लोक रिअल इस्टेटचा मुख्य उद्देश काय आहे हेच विसरले. रिअल इस्टेटचा मुख्य उद्देश समाजाची मूलभूत गरज म्हणजे घर बांधणे हा आहे हे विसरून अनेकांसाठी तो केवळ पैसे कमावण्याचा उद्योग झाला

हेन्री फोर्ड यांनी म्हटल्याप्रमाणे, “केवळ पैसे मिळविणारा उद्योग हा वाईट उद्योग असतो”, या व्यवस्थेप्रमाणे, रिअल इस्टेट हळूहळू २०व्या शतकापर्यंत एक वाईट उद्योग झाला! त्यानंतर वर्षागणिक केवळ पैशांच्या बाबतीतच नाही तर एकूणच व्यवसाय म्हणुन पण रिअल इस्टेट उद्योगाची प्रतिष्ठा कमी होत गेली व असामाधी ग्राहकांची संख्या वाढत गेली! याचे कारण साधे होते बहुतेक लोकांनी केवळ दाम दुप्पट होतील किंवा चांगला परतावा मिळेल या आशाने रिअल इस्टेटमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी शहरातील जमीनीचे दर आकाशाला भिडू लागले होते व जमीन खरेदी करण्यासाठीचे युद्ध अधिक कडवे होऊ लागले होतेजमीन मिळविण्यासाठी सुरु झालेल्या या युद्धामुळे कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असलेला दर्जा, मूल्ये, ग्राहक केंद्रित दृष्टिकोन इत्यादी बाबी रिअल इस्टेट उद्योगातून नाहीशा झाल्या. यशस्वी बांधकाम व्यावसायिक होण्यासाठीचे निकष झपाट्याने बदलू लागले; आता बांधकाम व्यावसायिक होण्यासाठी पैसा व ताकद या गोष्टी सर्वात जास्त गरजेच्या झाल्या आहेत. रिअल इस्टेटमध्ये चांगल्या कार्य पद्धतींची कुणालाही फिकीर नाही तसंच ग्राहकांच्या गरजांचा विचार करायची कुणाला गरज वाटत नाही. ज्याच्याकडे जमीन खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा आहे व ती जमीन विकसित करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आवश्य असलेले बळ आहे तो सर्वात पात्र बांधकाम व्यावसायिक ठरतो. दुर्दैवाने ग्राहकांनाही या नव्या पिढीतल्या बांधकाम व्यावसायिकांचीच सवय झाली, त्यातल्या अनेकांकडे काही पर्याय नव्हता, तर अनेक जणांनी केवळ पैसे वाचविण्याच्या लोभाने समोर असलेला पर्याय स्वीकारला. मात्र रिअल इस्टेटमध्ये अजूनही काही वेडी माणसे आहेत जी जुन्या पुराण्या पारदर्शक पद्धतीने व्यवसाय करतात व त्यांना ग्राहक म्हणजे देव असल्याचे वाटते! अर्थातच त्यांच्याकडे नव्या युगातल्या बांधकाम व्यावसायिकांशी बरोबरी करण्याची क्षमता नसते. ते सर्व वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती देऊन ते कसा व्यवसाय करतात किंवा त्यांच्या प्रकल्पाची काय वैशिष्ट्ये आहेत हे सांगू शकत नाहीत. म्हणूनच बहुतेक ग्राहक नव्या विकासकांच्या व त्यांच्या स्वप्नातलं घर देणाऱ्या प्रस्तावांच्या मागे धावत होते. नेमक्या इथेच असामाधानाच्या लाटा रिअल इस्टेटच्या किनाऱ्यावर येऊन पहिल्यांदा आदळल्या.

पानभर जाहिराती छापण्यात किंवा तुमचं उत्पादन विकताना विविध प्रस्ताव देण्यात चूक काहीच नाही मात्र प्रकल्प सुरु करताना व जमीन खरेदी करण्यात झालेली प्रचंड मोठी गुंतवणूक भरून काढताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. कार्पेट व बिल्ड-अप एरियाच्या जागी सुपर बिल्ड अप/चार्जेबल वगैरेसारखे घटक आले व आता अमुक एक रकमेला दोन बीएचके असे सांगितले जाते. यामुळे व्यवहारातली पारदर्शकता पूर्णपणे नाहीशी झाली कारण बहुतेक ग्राहकांना ते त्यांच्या घरांसाठी किती व कसे पैसे देत आहेत हे कधीच समजत नाही. यानंतर आणखी एक शब्द वापरला जाऊ लागला तो म्हणजे प्रिलाँच (प्रकल्प सुरु होण्यापूर्वी बुकींग घेणे), म्हणजे प्रकल्पाची योजना तयार आहे व इतर सर्व मंजुऱ्या मिळायच्या आहेत मात्र तरीही तुम्ही सदनिका आरक्षित करू शकता कारण तुम्हाला हव्या त्या सदनिकेचा पर्याय मिळतो तसेच दरही कमी असतो जो सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतर अतिशय जास्त असेल असा दावा केला जातो! त्यानंतर रिअल इस्टेटच्या शब्दकोशात आणखी एक भर पडली ती म्हणजे पायाभूत सुविधांसाठीचे शुल्क; याचा नेमका अर्थ म्हणजे काय हे मी सुद्धा सांगू शकत नाही केवळ अंदाज बांधू शकतो, याचा अर्थ असा होतो की प्रकल्पाचा भाग असलेल्या गोल्फ क्लब, स्पा व जिम या सुविधांसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. ग्राहकांनीही विचार केला की चांगला व्यवहार आहे व आपल्या स्वप्नातलं घर मिळविण्याची ही शेवटची संधी आहे असा विचार करून त्यांनी आरक्षणाला प्रतिसाद दिला! मात्र हळूहळू हे स्वप्न एक दुःस्वप्न ठरू लागलं कारण प्रकल्प केवळ प्रिलाँच टप्प्यातच राहिला किंवा ताबा देण्याची तारीख इतकी लांबली की ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. प्रिलाँचमध्ये दाखविण्यात आलेला प्रकल्पाचा आराखडा बदलू लागला, जिथे बाग दाखविण्यात आली होती तिथे काँक्रिटाचा आणखी एक टॉवर आला किंवा काही प्रकरणांमध्ये पायाभूत सुविधांचे शुल्क दुप्पट झाले किंवा माहितीपत्रकात दिलेल्या या अनेक सुविधा केवळ सदस्यांसाठीच मर्यादित राहिल्या, घराचे चटई क्षेत्र डिस्नेच्या हनी आय श्रंक द किड्स या चित्रपटासारखे कमी झाले, बांधकामाचा दर्जा इतका सुमार झाला की पहिल्याच पावसात पाणी झिरपल्याने महागड्या अंतर्गत सजावटीचे नुकसान झाले व अशा प्रकारे नाराज होण्याच्या कारणांची यादी वाढतच राहिली! बांधकाम व्यावसायिक कोणत्याही तक्रारींसाठी स्पष्टीकरण द्यायला कधीच उपलब्ध नव्हते, तुम्ही कधीही गेलात तरी तुम्हाला प्रत्येक वेळी कुणी नवीन कर्मचारीच भेटायचा व तो पहातो, करतो, सांगतो यासारखी ठोकळेबाज उत्तरे द्यायचा!

मला असं वाटतं मंजुऱ्या वगैरे मिळविण्याच्या बाबतीत रिअल इस्टेट एकीकडे सर्वात नियंत्रित उद्योग आहे तर दुसरीकडे विक्री दरावर नियंत्रण ठेवण्याचा मुद्दा असेल तर सर्वात अनियंत्रित उद्योग आहे. मात्र कच्च्या मालाचे म्हणजेच जमीनीचे दर, तसेच पोलाद व सिमेंट सारख्या मूलभूत घटकांचे दर अनियंत्रित आहेत! नाराज ग्राहकांच्या दबावामुळे गोंधळलेल्या सरकारने ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी मोफा (एमओएफए) व नंतर रेरासारख्या (आरईआरए) कायद्याच्या कारवाईचा बडगा उगारला. या सर्व असमाधानाच्या पार्श्वभूमीवर किंवा चुकीच्या धोरणांमुळे, रिअल इस्टेटमध्ये व्हायचा तो परिणाम झाला, मंदी आली! लोकांनी प्रामुख्याने दोन कारणांनी घर खरेदी करायचा निर्णय लांबणीवर टाकायला सुरुवात केली, एक म्हणजे त्यांना त्यांचे उत्पादन कधी ताब्यात मिळेल याची खात्री नाही व दुसरे म्हणजे त्याची किंमत! यातला पहिला भाग अधिक महत्वाचा आहे कारण एखादे उत्पादन कोणत्या दराने विकत घ्यायचे किंवा विकायचे हे प्रत्येक व्यक्तिने ठरवायचे आहे!  म्हणूनच रिअल इस्टेटचे अच्छे दिन परत यावेत असं वाटत असेल तर सर्वप्रथम बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण केले पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवा बहुतेक ग्राहकांना केवळ एक साधे आश्वासन हवे असते ते म्हणजे त्यांचे घर वेळेत मिळेल! मला असे वाटते की एक बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही ते करू शकला तर नव्वद टक्के असमाधान कमी होईल! 

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे काही विकत आहात ते पारदर्शकपणे करा; म्हणजे चटई क्षेत्रापासून ते विक्रीयोग्य वगैरे बाबी, आता इथे मुद्दा अनुपाताचा नाही मात्र चटईक्षेत्रापासून ते बिल्ट-अपपर्यंत जागेचे तपशील व्यवस्थित नमूद करा. ग्राहक आजकाल हुशार असतात व ते आपल्या पैशांची किंमत जाणतात, म्हणूनच तुम्ही कशासाठी व कसे पैसे आकारताय हे स्पष्टपणे नमूद करा; त्यामुळे कोणतेही छुपे दर आकारण्याऐवजी तर्कशुद्धपणे, नेमकेपणाने बाजू मांडासर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या ग्राहकांसाठी त्यांना जे काही जाणून घ्यायचे आहे त्यासाठी उपलब्ध राहा. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलेच पाहिजे असे नाही, मात्र तुम्ही तुमचा चमू अशाप्रकारे तयार करा की ते तुमचे योग्यप्रकारे प्रतिनिधित्व करतील केवळ निरोप्याचे काम करणार नाहीत.सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील व जे काही आश्वासन दिले आहे ते पूर्ण करणारी यंत्रणा असेल, तर ग्राहक तुम्हाला फक्त धन्यवादच देतील व तेव्हाच रिअल इस्टेटसाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन येतील! हे मान्य आहे की कधीतरी कुणीतरी अतृप्त आत्मा असेलच जो तुम्ही कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरीही समाधानी होऊ शकणार नाही मात्र तो तुमच्या व्यवसायाचा एक भाग आहे! श्री. गेट्स यांनी असमाधानी ग्राहकांचा शिकण्यासाठी वापर करा असं सांगितलं असलं तरीही आपण सतत फक्त शिकतच राहू शकत नाही हे देखील स्वतःला समजवायला हवं!  
त्याचवेळी ग्राहकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे त्यांच्या वाट्याला येणारे असामाधान हे एक तर त्यांच्या अज्ञानामुळे असते किंवा केवळ काही पैसे वाचविण्याच्या हव्यासामुळे असते! तुमच्या बांधकाम व्यावसायिकाने तुम्हाला फसवले म्हणून प्रत्येकवेळी आरोप करण्याऐवजी, तुम्ही कोणत्या बांधकाम व्यावसायिकाशी हातमिळविणी करताय याचे थोडे डोळे उघडे ठेवून सर्वेक्षण करणे कधीही चांगले. लक्षात ठेवा बाजारात दोन्ही प्रकारचे बांधकाम व्यावसायिक आहेत, एक चांगले व दुसरे वाईट व तुमचा आनंद हा पूर्ण तुम्ही कुणाशी व्यवहार करताय याच्यावरच अवलंबून असतो


संजय देशपांडे


Mobile: 09822037109


Wednesday, 31 August 2016

माळढोकच्या अस्तित्वाचा लढा !





























कुणीतरी अतिशय काळजी केल्याखेरीज काहीही बदलणार नाही, खरच नाही बदलणार ... द लॉरेक्स (या कार्टुनपटातून)

मला लॉरेक्ससारखे कॉर्टूनपट फार आवडतात व हे चित्रपट मनोरंजनासोबतच निसर्ग वाचवा यासारखा अतिशय उत्तम संदेशही देतात. मी जेव्हा डॉ. प्रमोद पाटलांना भेटलो तेव्हा मला लॉरेक्स या कार्टून पात्राचा वरील संवाद आठवला. मला असे वाटले की ते शब्द खरे झाले आहेत! केवळ एकोणतीस वयाचा हा तरुण डॉक्टर इतरांप्रमाणे आपल्या व्यवसायात जम बसविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी माळढोक नावाच्या पक्ष्याच्या संवर्धनाची काळजी करण्याचे काम करतोय! याचं इंग्रजी नाव आहे द ग्रेट इंडियन बस्टर्ड, अशा नावाचा एखादा पक्षी असेल हे कुणाच्या गावीही नाही, अर्थात या नावाशी साधर्म्य असलेली एक  इंग्रजी शिवी मात्र सगळ्यांना माहिती आहे! आता बरेच जण म्हणतील त्यात काय विशेष? आपल्याला आयुष्यात एखाद्या पक्षाच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा इतर महत्वाची कामे नाहीत का, कारण तो पक्षी काळा का गोरा हे माहिती नाही व तो कुठे राहतो याचीही माहिती नाही! त्याचवेळी अनेक जण कदाचित डॉ. प्रमोद यांच्या वेडेपणावर हसतील कारण त्यांनी त्यांची वैद्यकीय पदवी मानवी जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी वापरली पाहिजे जे माळरानावर राहणाऱ्या कुणा तपकिरी व पांढऱ्या रंगाच्या पक्षाला वाचविण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. अर्थात, डॉ. प्रमोद यांच्यासंदर्भात आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे पक्षांच्या संवर्धनासोबतच त्यांचे संशोधनकार्यही सुरु आहे जे आधुनिक जीवनात माणसासाठी सर्वात मोठा धोका असलेल्या मधुमेहाविषयी आहे. डॉ. प्रमोद यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांच्याविषयी तुम्हाला सांगावसं वाटलं, म्हणूनच आधी ते अतिशय तळमळीनं ज्या माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत त्याविषयी जाणून घेऊ. द ग्रेट इंडियन बस्टार्ड या पक्ष्याला मराठीत माळढोक असं म्हणतात.

प्रगती, विकास व शहरीकरणाविषयीच्या आपल्या तथाकथित जिव्हाळ्यामुळे माळढोकसारख्या अजुन किती प्राणी व पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होणार आहेत देवालाच माहीत. नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या यादीमध्ये माळढोक पक्ष्याचं नाव अग्रस्थानी आहे. तपकिरी व पांढरट करड्या रंगाचा आकारानं बराच मोठा माळढोक  पक्षी फक्त भारतातच आढळतो व आता जवळपास असे दोनशे ऐंशी पक्षीच शिल्लक राहीले आहेत. यात आणखी दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या तथाकथित वन्यप्रेमी महाराष्ट्र राज्यात फक्त पंधरा माळढोक पक्षी उरले आहेत. यातले काही नागपूरजवळ वरोरा येथे आहेत तर काही सोलापूरजवळ नानज येथे आहेत. कधीकाही हे पक्षी माळरान असलेल्या ठिकाणी सर्वत्र दिसायचे  पण आता भारतातल्या केवळ काही पट्ट्यांमध्ये ते अखेरचा श्वास घेताहेत. या एका पक्ष्यासाठी देशभरात जवळपास आठ अभयारण्ये आहेत मात्र त्यापैकी केवळ चार ते पाच अभयारण्यांमध्येच त्याचे अस्तित्व उरले आहे.

आता माळढोकचं काय वैशिष्ट्य आहे असे प्रश्न बरेचजण विचारतील, कारण आपल्या देशात पक्षांच्या हजारो प्रजाती आहेत. त्यातले अनेक पक्षी माळढोकपेक्षाही दिसायला सुंदर आणि आकर्षक आहेत. माळढोकपेक्षाही सुंदर व दुर्मिळ पक्षी असले तरीही माळढोकचं निवासस्थान हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. या पक्ष्यांना साधं गवत असलेलं खुलं माळरान हवं असतं जिथे फारशी झाडी नसते म्हणूनच त्यापैकी बरेच पक्षी राजस्थानात पाकिस्तानच्या सीमेला लागू असलेल्या जैसलमेरसारख्या रखरखीत भागात पण टिकून आहेत. या पक्ष्यांना शुष्क गवत असलेल्या माळरानासोबतच थोडासा एकांत हवा असतो जो आपण त्यांना देत नाही. माळढोक नामशेष होत चालले आहेत हे माणूस आपल्या भोवतालच्या पशू-पक्ष्यांच्या नैसर्गिक निवासस्थानावर अतिक्रमण करत असल्याचच एक  लक्षण आहे! आपण आपल्या भोवताली असलेल्या सर्व  सजीवांच्या प्रजातींना त्यांच्या गरजा फार काही मोठ्या नसतानाही, किती वेगाने नामशेष करत आहोत याचा हा एक ईशाराच आहे.  पूर्वी प्रत्येक गावाबाहेर किंवा शहराबाहेर गवताळ झुडपी माळरानं दिसायची; त्यावर माळढोकशिवाय ससा, मुंगूस,तरस,रानमांजर यासारखे प्राणीही दिसायचे. मात्र आता माळढोकसोबतच हे प्राणीही हळूहळू नामशेष होत चालले आहेत व त्याचं मुख्य मुख्य कारण आहे माणूस! माळढोक पक्षी प्रामुख्याने जमीनीवर राहतो व उघड्यावर अंडी देतो त्यामुळे त्याचे साप, कोल्हा, पाली असे बरेच शत्रू असतात. ही अंडी एखाद्या दगडासारखी असतात व तपकिरी खडकाळ पार्श्वभूमीत सहज लपून जातात. मात्र या नैसर्गिक शत्रूंशिवाय माणसाच्या रुपातल्या शत्रूपासून माळढोकला  वाचवणं अवघड आहे. आपण माळढोकची खाण्यासाठी शिकार करतो त्याचशिवाय इतर कारणांनीही ही प्रजाती नामशेष होत चालली आहे. सुरुवातीला आपण त्यांच्या घरावर शेकडो कारणांसाठी अतिक्रमण केले, रस्ते बांधले, कालवे खणले, घराच्या बांधकामांसाठी माळरानाचे भूखंड पाडले, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या मारल्या ज्यामुळे माळढोकच नाही तर इतरही अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. आपली जनावरं माळढोकांचे निवासस्थान असलेल्या माळरानावर तसंच त्यांना एकांत मिळणाऱ्या जागी चरतात, जमीनीवर घातलेल्या त्यांच्या अंड्यांचे नुकसान करतात. यात महत्वाचे म्हणजे, माळढोकाची मादी वर्षातून केवळ एकदाच गरोदर राहू शकतो व एकावेळी एकच अंडे देऊ शकते, यामुळे हा पक्षी नामशेष होण्याची अधिक भीती आहे! आपण माळढोकासाठी झुडपी गवताच्या माळरानांचं संवर्धन करू शकत नसू तर आपण हिरव्यागार जंगलांचं व त्यात राहणाऱ्या वाघांचं संवर्धन कसे करणार आहोत?
 या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद यांच्यासारखी माणसं माळढोकाचं रक्षण करताहेत, काँक्रिटच्या जंगलात पक्षी टिकून राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत! ते माळढोक पक्ष्याचं निवासस्थान असलेल्या भागाभोवतीच्या गावांमध्ये जातात व गावकऱ्यांना या पक्ष्याचं महत्व समजावून सांगतात. ते या भागातल्या शाळकरी मुलांना भेटतात व त्यांची माळढोकशी मैत्री व्हावी यासाठी प्रयत्न करतात. ते त्यांना पक्ष्यांवर व त्यांच्या शत्रूंवर विशेषतः शिकार करणाऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगतात. ते वनविभागासोबत काम करतात व त्यांच्यापरीने जी काही मदत करता येईल ती करतात. दुर्बिणींपासून ते जॅकेटपर्यंत मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देतात तसंच त्यांना या पक्ष्यांच्या निवासस्थानाचं संवर्धन करणं कसं आवश्यक आहे व माळढोक जगावा यासाठी काय काय करता येईल याची जाणीव करून देतात. ते माध्यमांमध्ये लेख लिहीतात व लोकांना पक्षांबाबतची त्यांची काय जबाबदारी आहे याची जाणीव करून देतात. ते शाळा/कॉलेजातील मुलांना पक्षांच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी थोडा वेळ द्यायला सांगतात. आपण माळढोक पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवून जगवू शकत नाही तर आपण त्यांना मुक्त वातावरणात जगवलं पाहिजे. म्हणजेच भोवतालची गवताळ झुडपी माळरानं आपण टिकवून ठेवली पाहिजेत, तरच आपण वर नमूद केलेल्या काही प्रजाती टिकून राहतील.

 भारतातल्या सहा राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे जिथे माळढोक अजूनही दिसतात. पुण्यापासून २०० किलोमीटरवर उत्तर सोलापूरजवळ नानज येथे माळढोक अभयारण्य आहे. हे १९७९ साली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले, म्हणजे इथे माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनाला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. मात्र याच्या हद्दीपासून ते सीमेच्या रक्षणापर्यंत सर्वच बाबतीत वाद आहेत. इथे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आहेत ज्या बिचाऱ्या पक्षांना उडताना दिसत नाहीत व या तारांना धडकून त्यांचा मृत्यू होतो. या अभयारण्यातून रस्ते जातात, तसेच कालवेही आहेत. सतत काहीना काही खोदकाम सुरु असतं त्यामुळे कुरणांची हानी होते व जनावरांना चरताही येत नाही तसंच या भागात माणसांची वर्दळ असते! परिणामी हा भाग अभयारण्य म्हणून घोषित असूनही इथे केवळ तीन माळढोक आहेत, ते सुद्धा क्वचितच दिसतात! कधीकधी मला खरंच प्रश्न पडतो की वन्यजीवन संवर्धनाच्या बाबतीत माणूस म्हणून आपली जबाबदारी आपल्याला समजली आहे का. आपल्याकडे सगळ्याप्रकारची क्षमता आहे यंत्रसामग्री आहे, पैसा आहे, मनुष्यबळ आहे, धोरणे तयार करण्यासाठी सत्ता आहे, तरीही आपण माळढोकसारख्या पक्षांना जगण्याचा व आनंदाने विहार करण्याचा हक्क देऊ शकत नाही! राजस्थान व महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे, मात्र तरीही राजस्थानात माळढोक पक्ष्यांची संख्या जास्त असल्याने तिथून अंडी महाराष्ट्रात आणून ती उबवून इथे पक्ष्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आपण करू शकत नाही. लक्षात ठेवा केवळ एखाद्या भागाला अभयारण्य म्हणून घोषित केल्यामुळे एखाद्या प्रजातीची संख्या वाढणार नाही. आपल्याकडे माळढोक पक्ष्याचं जेमतेम एकच जोडपं उरलं असेल व ते वर्षातून केवळ एकच अंडं घालू शकत असेल तर त्यांची संख्या वाढावी अशी अपेक्षा आपण कशी करू शकू? म्हणूनच आपल्या शासनकर्त्यांनी केवळ लोकप्रिय घोषणा न करता काहीतरी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

 अशा वेळी डॉ. प्रमोद यांच्या प्रयत्नांचा व समर्पणाचा आदर्श केवळ सरकारनेच नाही तर सर्वांनीच घेण्यासारखा आहे. कारण इतर लोक केवळ समाज माध्यमांवर माळढोक व इतर प्रजातींना वाचविण्यात सरकार कसं अपयशी ठरतंय याविषयी टीका करतात व आपलं काम संपलं आहे असं त्यांना वाटतं! जेव्हा आपल्याला काहीतरी करायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे कारणं ठरलेली असतात, आपल्याला आपली नोकरी असते, आपला व्यवसाय असतो, मग एक नेहमीचा प्रश्न विचारला जातो की सरकार काय करतंय? डॉ. पाटलांनी मात्र वैद्यकीय क्षेत्रात असूनही स्वतःहून ही जबाबदारी घेतली आहे व पैसे कमावण्याचा मागे न लागता त्यांच्या अभ्यासाचा भाग नसलेल्या पक्ष्यांना वाचविण्यासाठी स्वतःचा वेळ देत आहेत. आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काहीतरी करायला सुरुवात करू शकतो, आणि खरंतर आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे. तुम्ही डॉ. पाटलांसारख्या माळढोक पक्ष्याचे संवर्धन करणाऱ्या माणसांना आर्थिक मदत देऊ शकता, तुम्ही माळढोक अभयारण्यांना भेट देऊ शकता व तिथे काम करणाऱ्या वन कर्मचारी किंवा गावकऱ्यांसारख्या माणसांना मदत करू शकता, तुम्ही समाजमाध्यमांवर लेख लिहून सरकारला किंवा तुमच्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तिला माळढोक जगावेत व त्यांचं निवासस्थान टिकून राहावं यासाठी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊ शकता, अशा कितीतरी गोष्टी आहेत! भारताची लोकसंख्या एकशेवीस कोटींहून अधिक आहे, विचार करा डॉ. प्रमोद यांच्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाने आजूबाजूच्या केवळ एका प्रजातीचे संवर्धन करायचे ठरवले व त्यासाठी प्रयत्न केले तर काय होईल! हा विचार म्हणजे दिवास्वप्न आहे असं तुम्ही म्हणाल, मात्र आपण अशी स्वप्न पाहिली नाहीत व माळढोक जगावेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले नाहीत तर बिचारे माळढोक ही अस्तित्वाची लढाई हरतील व नामशेष होतील. अशाप्रकारे एक एक प्रजाती नष्ट होत राहिल्या तर पृथ्वीवर फक्त काँक्रिटच्या जंगलांमध्ये राहणारी मानवी शरीरंच उरतील, मग आपल्याला कोण    वाचवेल?


संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स