Thursday 17 January 2019

उजनी जलाशय,आशेचा शेवटचा किरण !




















माणूस एकीकडे अब्जावधी मैल लांब जीवसृष्टी नसलेले ग्रह राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करतोय मात्र दुसरीकडे  आपल्याच  ग्रहावर लाख मोलाची विपुल प्रमाणात असलेली नैसर्गिक रहिवास नष्ट करतोय.” … फ्रीक्विल.

वरील शब्द फ्रीक्विल या टोपण नावाने लिहीणारा पर्यावरणवादी कार्यकर्ता व लेखकाचे आहेत आणि मला आश्चर्य वाटतं की एखादी व्यक्ती इतकं सुंदर लिहूनही पडद्याआड कशी राहू शकते? खरंतर माझं असं मत आहे की जोपर्यंत एखाद्या बुद्धिमान लेखकाचा चेहरा लोकांसमोर येत नाही तोपर्यंत त्याचे शब्द लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत. वरील अवरतरणही त्याला अपवाद नाही असंच मझं मत आहे. तुम्हाला मी जरा तात्विक बोलतोय असं वाटत असेल, पण मी पुण्यापासून  साधारणतः  ९० किलोमीटरवर असलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राला पक्षी निरीक्षण करण्यासाठी नुकतीच भेट दिली. तुम्हाला निसर्गाचं असं लोभस रूप जेव्हा पाहायला मिळतं तेव्हा तुम्ही तात्विक विचार करायला लागला नाही तरच नवल. मी उजनीला भेट दिली तेव्हा माझ्यावरही असाच परिणाम झाला. तिथले विशेष असे फ्लेमींगो तसंच इतरही अनेक प्रकारचे पाण पक्षी पाहायला मिळाले. याआधी मी उजनीला साधारण सहा वर्षांपूर्वी गेलो होतो. ज्यांना या ठिकाणाविषयी माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, हे सगळे उजनी धरणामुळे तयार झालेलं  पाणफुगवटा क्षेत्र आहे. तिथे पुण्याहून गाडीनं जायला साधारण दोन तास लागतात. खरतर संपूर्ण पुणे जिल्हा उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येतो. आणि या धरणाच्या वरील भागात तसंच पठारी प्रदेशातही जवळपास पाच धरणं आहेत. त्यामुळे आपली वरच्या भागातली खडकवासला ,पानशेत,वरसगाव इत्यादी धरणं जेव्हा पूर्ण भरतात तेव्हाच त्यांच्या सांडव्याने  उजनी धरण भरतं. या धरणांमधून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यानेच उजनी धरणात पाणीसाठा होतो. या धरणाचं क्षेत्रं मोठं मात्रं पठारी भागात आहे. या भौगोलिक वैशिष्ट्यामुळेच उजनीमध्ये हजारो स्थलांतरित तसंच स्थानिक पक्षी आहेत  आणि पठारी सपाट जमिनीमुळे येथे पाण्याचा जलाशय उथळ आहे. त्यामुळेच स्थिर पाण्यामध्ये शेवाळ्याची निर्मिती अधिक होते, जे अनेक कीटकांचे तसेच माशांचे खाद्य आहे, फ्लेमींगो देखील फक्त हे शेवाळच खातात.या सगळ्यामुळे फ्लेमींगो सारख्या पक्ष्यांच्या प्रजननासाठी हे उत्तम ठिकाण आहे. सैबेरिया ,आफ्रिका वा ईतर हजारो मैल लांब असलेल्या प्रदेशातून उडून हे पक्षी इथे कसे येतात हे आश्चर्यच आहे. काही पक्षी कच्छच्या रणातून येतात. मात्र दरवर्षी हिवाळा आला की उजनीचं पाणलोट क्षेत्रं पक्षी निरीक्षकांसाठी स्वर्ग होतो. फक्त फ्लेमींगोच नाही तर अनेक बदके, गलसारख्या इतर प्रजाती इथे प्रजननासाठी येतात. या पक्ष्यांसोबतच मार्श हॅरियर, बहिरीससाणा व गरुडासारखे शिकारी पक्षीही येतात. अर्थात मुख्य आकर्षण हे फ्लेमींगोचेच असतं. मला सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांची काही छायाचित्रं काढायची होती. म्हणूनच मी माझ्या दोन मित्रांसोबत दुपार व्हायच्या आधीच उजनीच्या दिशेने निघालो व दुपारी उशीरा पोहोचलो. हे ठिकाण पर्यटकांसाठी अतिशय मोठं आकर्षण होऊ शकतं. मात्र सहा वर्षात इथे फारसं काहीच बदलेलं नाही. या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी कुठेही दिशा दाखवणारे फलक लावलेले नाहीत. इथे सार्वजनीक स्वच्छतागृहा सारख्या कोणत्याही सार्वजनिक सुविधा नाहीत (नेहमीप्रमाणे), साध्या कचरापेट्याही ठेवण्यात आलेल्या नाहीत. उजनीसारख्या सुंदर ठिकाणीही आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खोकी असंच काहीबाही इतस्ततः फेकलेलं दिसतं, यातूनच आपणा भारतीयांची सामाजिक जाणीवे विषयीची उदासीनता दिसून येते. त्याचशिवाय प्रत्यक्ष पाणवठ्या पर्यंत जायला कोणताही व्यवस्थित मार्ग नाही, तिथे फक्त बोटीनेच जाता येते. एक चांगली गोष्ट म्हणजे बोटींना आता डिझेल इंजिन लावलेले असते त्यामुळे पक्षांच्या घरट्यांपर्यंत वेगाने जाता येते. तुम्ही जसे त्यांच्या जवळ पोहोचता, तसा तुमचा गाईड व बोट चालक इंजिन बंद करतात व नाव वल्हवत त्या घरट्यांपासून सुरक्षित अंतरावर थांबवतात. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे हे नावाडी तसंच गाईड आता उपलब्ध होतात व त्यांना पक्षांची तसंच पक्ष्यांच्या प्रजननाच्या जागांविषयी चांगली माहिती असते (ही स्थानिक मुलंच आहेत). यावर्षी सरासरी पाऊस बराच कमी झाला, त्यामुळेच धरण पूर्ण भरले नाही व पाण्याची पातळी खालावली होती. ही परिस्थिती फ्लेमींगोसाठी उत्तम होती, कारण त्यांना उथळ पाणी आवडतं. किनाऱ्यावरून फ्लेमींगोची रांग गुलाबी पांढऱ्या भिंतीसारखीच भासत होती. नाव जशी फ्लेमींगोच्या दिशेने प्रवास करू लागली तसं निसर्गाचं हे अद्भुत दृश्यं पाहून मी थक्क झालो. हजारो पक्षी शांतपणे अन्नाच्या शोधात रांगेत पुढे सरकत होते, काही झोपले होते, काही एकमेकांना स्पर्श करून संवाद साधत होते, आपल्या लांबलचक मानेच्या, लंबूळक्या चोचीच्या वेगवेगळ्या हालचाली करत होते. मी क्षणभर छायाचित्रं काढायलाच विसरून गेलो. अशा दृश्यांमुळेच निसर्ग किती अद्भूत निर्माता आहे याची तुम्हाला जाणीव होते. अचानक काही फ्लेमींगो पळू लागले व पंख पसरून त्यांनी आकाशात भरारी घेतली. फ्लेमींगोची शरीररचना थोडी बोजड असल्यानं, त्यांना इतर पक्षांसारखी लगेच भरारी घेता येत नाही. त्यांना आपल्या विमानांप्रमाणे आधी धावावं लागतं आणि मग भरारी घेता येते. विमान उड्डाणाविषयी विचार करणाऱ्या पहिल्या अभियंत्याला ही कल्पना फ्लेमींगो वरूनच सुचली असावी इतकं त्यांच्या उड्डाणात साम्य आहे. आम्ही या नैसर्गिक विमानांचं एकापाठोपाठ एक उड्डाण पाहात होतो, पुढच्या क्षणी आमच्यावर असलेल्या संपूर्ण आकाशात, गुलाबी, पांढरी व लाल अशी छटा पसरली. त्यांचा हा आकाशतला हा डौलदार विहार पाहून खाली उभ्या असलेल्या आम्हाला त्यांचा हेवा वाटत होता. 

निसर्गाचा हा थक्क करणारा सोहळा इथेच संपला नव्हता. पाण्याच्या पृष्ठभागावर काळे चकचकीत पंख व पांढऱ्या चोची असलेले हजारो कारंड पक्षी बसलेले होते, रुडीशेल बदक, ब्राह्मणी बदक, ठिपकेदार बिल बदक, ससाणे असे अनेक प्रकारचे पक्षी होते. बोट फ्लेमींगोच्या आणखी एका थव्याची दिशेने जात असताना, शेकडो बदकांचा थवा एकाचवेळी उडाला. आमच्या डोक्यावरून काळे ढग जात असल्यासारखं आम्हाला वाटलं. मार्श हॅरियरसारखे शिकारी पक्षीही होते जे इतर अनेक लहान पक्ष्यांना मारण्याची संधी शोधत होते. तुम्हाला शिकारी पक्षी बहुतेकवेळा सकाळी उशीरा किंवा दुपारी दिसू शकतात. कारण याच वेळी इतर पक्षी त्यांच्या जेवणानंतर निवांत असतात असं मला वाटतं. त्यानंतर सूर्य अस्ताला जाऊ लागला तेव्हा संपूर्ण आकाशात लालसर सोनेरी रंगाची उधळण झाली, त्याचं प्रतिबिंब पडून पाणीही चमकत होतं. या पार्श्वभूमीवर फ्लेमींगोच्या काळ्या छायाकृती उडताना दिसत होत्या. आकाश जणू एखाद्या वारली चित्रासारखं भासत होतं, ज्यावर फ्लेमींगो विविध आकृत्या चितारत होते. मी अनेक थक्क करणारी निसर्गदृश्य पाहिली आहेत, मात्र शहराच्या इतकं जवळ, कोणतंही मानवी अतिक्रमण नसलेलं उजनीचं पाणलोट क्षेत्रं त्यात सर्वोत्तम आहे.

मी वर्णन केलेलं सुंदर दृश्य तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. मात्र तुम्हाला स्तिमित करण्यासाठी नाही तर तुम्हाला या ठिकाणाला किती धोका आहे याचा जाणीव करून देण्यासाठी मी हे सगळे सांगतोय आणि बाहेरचं कुणी नाही तर आपण पुणेकरच हा धोका आहे ! संपुर्ण पुणे शहरात कचरा, सांडपाणी, रसायने आपण जे काही नदी प्रवाहात सोडतो ते या जलाशयातल्या ताज्या पाण्याला प्रदूषित करतं आणि ताज्या पाण्यामुळेच जे शेवाळं तयार होतं, ज्यामुळेच पक्षी मोठ्या प्रमाणावर इथे स्थलांतर करतात. त्याचशिवाय कोणतीही संस्था वा अधिकारी भटके कुत्रे व माणसांपासून या पक्ष्यांचं रक्षण करत नाहीत. तसंच पक्षीप्रेमी लोकांव्यतिरिक्त बाह्य जगातील कुणालाही हे ठिकाण फारसे माहिती नाही. स्थानिकांमध्ये या ठिकाणाविषयी प्रेम निर्माण करून तसंच त्यांना संवर्धनामध्ये सहभागी करूनच आपण ते सुरक्षित ठेवू शकतो. सुदैवाने संदीप नांगरेसारखे स्थानिक त्याच्या मित्रांसह उजनीची (भिगवण) ही नैसर्गिक समृद्धी लोकांना दाखवतात, तसंच त्यांच्या घरातच निवास, स्वच्छतागृह इत्याही मूलभूत सोयी उपलब्ध करून देतात. हे ठिकाण एखाद्या युरोपीय किंवा अमेरिकेसारख्या देशात असतं तर त्यांनी हे आत्तापर्यंत जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ बनवलं असतं. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात खरंच अशी क्षमता आहे मात्र इथे आपणा सगळ्यांना (सरकारपासून ते पुणेरांपर्यंत सगळे) वाहतुकीची कोंडी, एफएसआय, पाणी पुरवठा (म्हणजेच कपात) व मेट्रोमध्ये अधिक रस आहे आणि आपल्या शहरापासून फक्त 90 किमी अंतरावर निसर्गाचा खरा खजिना आहे व तो मोफत आहे. मात्र आपण आपल्या निष्काळजीपणामुळे आपण तो नष्ट करतोय.

यासाठी फक्त सरकारला दोष देण्यापेक्षा आपल्याला कितीतरी गोष्टी करता येतील. पुण्यातल्या पर्यटन कंपन्या विविध पर्यटन स्थळांना हजारो सहली आयोजीत करत असतील पण त्या उजनीसारख्या ठिकाणी क्वचितच सहली आयोजित करतात. अशा सहली आयोजित केल्या तर स्थानिकांनाही उत्पन्नाचं एक चांगलं साधन मिळेल तसंच हे ठिकाण जागतिक पर्यटनाच्या नकाशावरही नोंदवलं जाईल. शाळांनीही संदीप नांगरेसारख्या स्थानिकांच्या मदतीने उजनीच्या पाणवठा क्षेत्रात एक दिवसांच्या सहली आयोजित कराव्यात. कारण निसर्ग हा विषय पुस्तकातून नाही तर तो प्रत्यक्ष अनुभवूनच शिकता येईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करू शकतात. अशा ठिकाणांची योग्य प्रसिद्धी केली तर त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. मात्र त्यांची प्रसिद्ध करण्यापूर्वी तिथे पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत, उदाहरणार्थ मुख्य रस्त्यावरून दिशा दाखवणाऱ्या पाट्या, शेवटपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता, सार्वजनीक स्वच्छतागृहे तसेच निवासाची व्यवस्था, तसेच बोटी लावण्यासाठी किंवा त्यात चढण्यासाठी इथे सुरक्षित धक्काही नाही, तो बांधला पाहिजे.

मला खरंच आश्चर्य वाटतं की काहीही अनुकूल नसूनही उजनी पाणवठा क्षेत्रासारखी ठिकाणं अजूनपर्यंत कशी टिकून आहेत, कदाचित हेसुद्धा निसर्गाचं एक आश्चर्यच असावं. उजनीसारखी हजारो पक्ष्यांचं वसतीस्थान असलेली ठिकाणं किंवा पुण्याभोवतालची जंगलं वन्यजीवन झपाट्यानं नामशेष होत असताना केवळ प्राण्यांसाठीच नाही तर माणसांसाठीही आशेचा किरण आहेत. आपली हाव व आपल्या अज्ञानामुळे (म्हणजेच निष्काळजीपणामुळे) आपण स्वतःसाठीच नाही तर इतर अनेक निष्पाप प्रजातींसाठीही धोका बनत आहोत. मात्र उजनीसारख्या ठिकाणांमुळे अजूनही थोडीशी आशा आहे. एक लक्षात ठेवा फक्त आवडीमुळे नाही तर प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही वन जीवन वाचवता येणार नाही आणि  निसर्गाच्या या नियमाला उजनीही अपवाद नाही!

संजय देशपांडे 
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment