Sunday 6 October 2024

रस्ता, पाऊस आणि वाहतुकीची समस्या !





























रस्ता, पाऊस आणि वाहतुकीची समस्या !                                                 

दर्जा म्हणजे जेव्हा कुणीही आपल्यावर नजर ठेवत नसेल तेव्हाही योग्य तेच काम करणे.”  हेन्री फोर्ड

काही नावांचा परिचय करून द्यावा लागत नाही व वरील अवतरणाचे लेखकही अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. माझा आजचा लेख अशा विषयासंदर्भात आहे ज्याबद्दल न लिहीण्याची मी शपथ घेतली होती (स्वतःपुरतीच), तो म्हणजे पुणे शहरातील रस्त्यांची परिस्थिती व वाहतूक, अशावेळी लेखाची सुरुवात करण्यासाठी हे शब्द अतिशय चपखल वाटतात. वाहन उद्योगाचे जनक मानल्या गेलेल्या व्यक्तीशिवाय यासाठी दुसरे कोण अधिक योग्य असू शकते? परंतु मी फोर्ड यांचे शब्द त्यांच्या वाहन उद्योगातील पार्श्वभूमीमुळे नव्हे तर त्यांचा कामविषयी दृष्टिकोन व दर्जाविषयीचा त्यांचा आग्रह यासाठी वापरले आहेत. मी रस्ते व वाहतुकीच्या विषयावर लिहीणार नाही अशी शपथ घेतली होती आणि त्याच कारण म्हणजे याविषयी खूप ठिकाणी लिहीण्यात आले आहे व तरीही दरवर्षी परिस्थिती अधिकच वाईट होत चालली आहे. त्यामुळे लेखक व वाचक या दोघांनाही होणारा मनस्ताप कशाला वाढवायचा असा विचार मी केला. परंतु मला झेनच्या एक गोष्ट आठवते की एक डॉक्टर होता जो जखमी सैनिकांना बरे करत असे व ते सैनिक जेव्हा पुन्हा लढायला जात तेव्हा त्यांना मरण पावलेले किंवा पुन्हा जखमी झालेले पाहून तो उद्विग्न होत असे. जेव्हा तो एका गुरूला त्याचे विचार बोलून दाखवतो तेव्हा तो गुरु डॉक्टरला समजावतो की त्याचे काम जखमींना बरे करणे हे आहे कारण तो डॉक्टर आहे, तर सैनिकाचे काम लढणे हे आहे, त्यामुळे त्याबाबत उद्विग्न होऊन कसे चालेल. त्यामुळे मीदेखील धीर एकवटला आणि पुण्यातील सर्वाधिक लिहील्या जाणाऱ्या विषयाबद्दल म्हणजे वाहतूक व रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल लिहायचे ठरवले. त्यांचवेळी आपण इथे आणखी एका पैलूकडे दुर्लक्ष करत आहोत व तो म्हणजे पाऊस, बरेच जण म्हणतील की त्यात काय मोठेसे? पावसाळ्यामध्ये वाहतुकीची दैना होते हे आपण सगळे जाणतो व रस्तेही खराब होतात, ज्यामुळे जखमेवर मीठच चोळले जाते. परंतु हा विषय एवढा साधा नाही म्हणूनच मी त्याच्याकडे बोट दाखविले !

बहुतेक लोक वाहतुकीमुळे होणारा उशीर व गोंधळासाठी सार्वजनिक वाहतुकीला दोष देतील कारण ते महत्त्वाचे कारण आहे. परंतु बऱ्याच गोष्टी इतर पैलूंवरही अवलंबून असतात. वाहतुकीच्या कोंडीवर आगपाखड करणाऱ्या किती जणांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बससेवेसाठी वाट पाहण्याइतपत संयम दाखवला आहे किंवा अगदी अलिकडे मेट्रोने प्रवास करून पाहिला आहे, असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. किंवा किती जण त्यांच्या ४ चाकी/ २ चाकी वाहनांऐवजी ऑटोरिक्षा किंवा ओला/उबर (खाजगी टॅक्सी) वापरतात असेदेखील आपण विचारले पाहिजे. यावर लोकांची उतावळी उत्तरे काय असतील हे मला माहिती आहे, आम्ही असे का करू, एवढी वाट कोण पाहील, सार्वजनिक बस वाहतूक एकदा पाहा, ती आम्ही वापरावी अशी अपेक्षा कशी करू शकता? तुमचे म्हणणे चूक आहे असे मी म्हणणार नाही, परंतु हा उतावीळपणाही वाहतुकीची कोंडी होण्याचे एक मुख्य कारण असू शकते, जे आपण रस्त्यावर अनुभवले आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे, बरोबर? सार्वजनिक वाहतूक किंवा टॅक्सी किंवा रिक्षा न वापरण्याची शेकडो कारणे असतील, परंतु अशी कोणतीही वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी थोडी तडजोड स्वीकारावी लागते, जर संपूर्ण शहराला तडजोड करायची नसेल तर, अशा वृत्तीने वाहतुकीची समस्या कधीही सुटणार नाही हा माझ्या लेखाचा विषय आहे.

आता मुख्य विषयाकडे वळू तो म्हणजे रस्त्यांची परिस्थिती व वाहतुकीच्या वेगावर त्याचा परिणाम. रस्त्यांची दैना होण्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाचे पाणी साचणे, त्यामुळे जर आपल्याला चांगले रस्ते हवे असतील, तर आधी आपण पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावायला शिकले पाहिजे. हे कदाचित अतिशय सोपे वाटू शकते, परंतु त्यासाठी अगदी सुरुवातीपासून नियोजनाची गरज आहे, जे होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या देशामध्ये शहराचा विकास आधी होतो व नंतर आपण रस्ते बांधतो अशी आपली कार्यशैली आहे. त्यामुळे आपले रस्ते पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात हमखास अपयशी ठरतात, जे होताना दिसत आहे. दरवर्षी पावसामुळे एखाद्या ठिकाणी पाणी साचते व पाणी मग ते वाहते असो किंवा साचलेले, कोणत्याही बांधकामाचा सर्वात मोठा शत्रू आहे (मग ते अगदी काँक्रिटचे असले तरीही). ज्या ठिकाणी पाणी वाहते असते तिथेही पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याचा पृष्ठभाग वाहून जातो. म्हणूनच रस्त्यांवर खड्डे पडू नयेत यासाठी आपण या पाण्याचा प्रवाह कमी केला पाहिजे, पण आपण त्या संदर्भात काहीच करत नाही. वेळोवेळी हे सिद्ध झाले आहे की पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी बंद गटारे पावसाच्या पाण्याचे स्वरूप बदलल्याने ते वाहून नेण्यास अपुरी आहेत व दुसरे म्हणजे आपण पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या बंद गटारांमध्ये (किंवा कुठेही) कचरा फेकत असल्यामुळे ती सतत तुंबतात. आपण पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्रत्येक पावसाळ्यापूर्वी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ न केल्याबद्दल दोष देतो. परंतु ही गटारे स्वच्छ करण्याची गरजच का पडते असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. याचे कारण म्हणजे या शहराच्या नागरिकांना ज्या वस्तू नको असतात त्या ते या पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारांच्या अवतीभोवती टाकून देतात, ज्यामुळे महापालिकांचे काम आणखी अवघड होते. पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असतात, परंतु दरवर्षी सफाई कामगारांना त्यामध्ये सोफा सेट (अर्थातच वापरता येणार नाही असा), मृत जनावर सुद्धा व अशा अनेक काहीबाही गोष्टी आढळतात. यामुळे तसेच या वाहिन्यांचा आकार अपुरा असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर किंवा जिथे शक्य आहे तिथुन वाहते. याचे एकमेव कारण म्हणजे नागरिकांची निष्काळजी वृत्ती. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा आकार वाढवला तरीही त्या तुंबल्यावर पावसाळ्यात त्यांचा काहीही उपयोग होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. या शहरामध्ये, आपण आपल्या खुल्या नद्यांनाही सोडत नाही व त्यामध्ये कचरा फेकत राहतो (मी अतिक्रमणांचा उल्लेखही केलेला नाही), याचे प्रमाण इतके असते की शेवटी महानगरपालिकांना प्रत्येक पुलावर तुरुंगासारख्या जाळ्या  उभाराव्या लागतात म्हणजे नागरिक या नद्यांमध्ये कचरा फेकू शकणार नाहीत, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांमध्येही कचऱ्याशिवाय दुसरे काय दिसेल अशी आपण अपेक्षा करू शकतो.

त्यानंतर पावसाचे पाणी रस्त्यावर वाहण्याचे आणखी एक महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित कारण म्हणजे, सार्वजनिक असोत किंवा खाजगी आपण जमीनीच्या प्रत्येक तुकड्याचे काँक्रिटीकरण केले आहे. अनेक लोक मला विचारतात की, आपल्याकडे पावसाच्या पाण्याच्या संधारणासाठी नियम किंवा कोणत्याही बांधकामासाठी धोरण नाही का; त्यावर माझे उत्तर असते, आहे, परंतु आपल्याकडे वाहने चालवताना हेल्मेट घालणेही सक्तिचे आहे! कोण पाळतात ? यातला उपहास बाजूला ठेवा परंतु आपण कितीतरी गोष्टींविषयी बोलत असतो व पावसाच्या पाण्याचे संधारण हे त्यापैकी एक आहे. तोपर्यंत एकेदिवशी आपण पावसाच्या पाण्यात वाहून जाणार नाही तोपर्यंत आपण त्याची जिबात फिकीर करणार नाही. जे सध्या घडताना दिसत आहे, पावसामुळे आपले रस्ते खराब होत आहेत परंतु आपण ते स्वीकारत नाही. जर आपण पावसाचे बहुतांश पाणी जमिनीत शोषून घेतले तर रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी असेल, त्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबण्याचे किंवा पाणी वाहण्याचे प्रमाण कमी असेल व परिणामी रस्त्याच्या पृष्ठभागाचे नुकसानही कमी होईल, हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या अगदी पहिल्या वर्षाला असलेला मुलगादेखील तुम्हाला सांगू शकतो. परंतु आपण सगळे अभियांत्रिकी क्षेत्रातले जाणकार मात्र पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाच्या या तर्काकडे दुर्लक्ष करत आहोत. याचे कारण म्हणजे, आपल्या नागरी धोरणांनी निसर्ग व विकासाचे संतुलन राखण्याकडे दुर्लक्ष केले आहे, मग ते पाणी असो, हरित क्षेत्र असो किंवा जमीनीचा पृष्ठभाग, आपल्याला जर रस्ते चांगले करायचे असतील तर आपण यामध्ये सुधारणा केली पाहिजे. सर्व नवीन इमारतींमध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आवश्यक आहे, परंतु आपण त्याकडे व त्यातून काय परिणाम साध्य होत आहे यावर देखरेख करत आहोत का, असे करण्यासाठी आपल्याकडे कोणती व्यवस्था आहे? परिणामी, प्रत्येक विकसित प्रकल्पांच्या (काही अपवाद वगळता) परिसरातून लाखों लिटर पावसाचे पाणी बाहेर वाहून जाते. त्यानंतर आपल्या पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या एकतर तुंबलेल्या असतात किंवा अपुऱ्या असतात, त्यामुळे हे पाणी कुठे जाईल, या प्रश्नाचे उत्तर कुणाला मिळाले आहे का, तर रस्त्यावर हेच उत्तर आहे !

याचे खरे उत्तर म्हणजे पाणी नेहमी आपली वाट शोधत गुरुत्वाकर्षामुळे सखल भागांमध्ये जाईल. या प्रश्नाचे उत्तरही विज्ञानाचा अभ्यास करणारा एखादा मुलगाही देऊ शकेल, परंतु आपण या साध्या विज्ञानाचा स्वीकार करण्यास तयार नाही. माझ्या सोसायटीच्या मागे एक नाला आहे (जो पूर्वी ओढा होता). पुणे महानगपालिकेच्या सांडपाणी विभागाने अलिकडेच आमच्या तसेच शेजारच्या सोसायटीला आमच्या कुंपणाच्या भिंती तोडू देण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांची यंत्रसामग्री साफसफाईसाठी नाल्यामध्ये जाऊ शकेल. ही परिस्थिती कशी निर्माण झाली याचा कुणीही विचार करत नाही कारण या नाल्याच्या अनेक किलोमीटरच्या पट्ट्यात त्याला लागून असलेल्या इमारतींच्या कुंपणाच्या भिंती आहेत, ज्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही तिथपर्यंत पोहोचणे अवघड होते, अशावेळी पावसाचे पाणी त्या दिशेने कसे वाहून जाईल. इथेही आपण असंख्य वैध - अवैध बांधकामांद्वारे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा असा प्रत्येक नैसर्गिक मार्ग अडवून टाकला आहे व परिणामी आता वाहण्यासाठी मार्ग शोधणे आपण पाण्यावरच सोपवले आहे, जे सरतेशेवटी होईलच. माझ्यावर विश्वास ठेवा आपण खरोखरच पाण्याच्या बाँबवर बसलोय! आमच्या इमारतीबाहेर असलेला हा नाला शहरातील हजारो अशा पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहे जे काही दशके पूर्वीपर्यंत पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे काम करत असत. विकसित परिसरांमधून पावसाचे जे काही पाणी बाहेर येत असे ते एकतर जमीनीमध्ये झिरपत असे किंवा अशा नैसर्गिक ओढ्यांमार्फत वाहत जाऊन नदीला मिळत असे. आता या सर्व स्रोतांमध्ये काही अडथळा आला आहे किंवा अतिक्रमणे झाली आहेत व पाणी वाहून नेण्याचे काम आता रस्ते करत आहेत, हेच पावसाळ्यामध्ये रस्ते खराब होण्यामागचे मुख्य कारण आहे.

शेवटचा परंतु अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातील हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळेही रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण मोठी झाडे लावता येतील अशा आणखी जागा तयार केल्या पाहिजेत व त्यांची मुळे जमीनीमध्ये पावसाचे पाणी शोषून घेतील. आपण रस्तांवर मोठ-मोठे दुभाजक बांधतो व त्यांच्यामध्ये झाडे लावतो. परंतु त्यांच्या मुळांपर्यंत कधी पावसाचे पाणी पोहचतच नाही त्याचे काय. झाडांचे हे जे काम आहे त्या पैलूविषयी कोण विचार करत आहे, पुन्हा एकदा उत्तर आहे, कुणीही नाही. या सर्व समस्या पुरेशा नसतील तर रस्त्यावर प्रत्येक ज्ञात व अज्ञात कारणांसाठी वर्षभर रस्ते खोदण्याचे काम सुरू असते व या प्रक्रियेमध्ये रस्त्याचे पृष्ठभाग खराब होतात. यामागची कारणे सरकारी विभागांधील समन्वयाचा अभाव तसेच संबंधित सेवांचे ढिसाळ नियोजन हे असू शकतात, परंतु ही रस्त्याच्या पृष्ठभागासाठी एक महत्त्वाची समस्या आहेसरतेशेवटी, एखाद्या रस्ते विभागाला याचा दोष स्वीकारावा लागतो परंतु आपण सर्वजण या ना त्या मार्गाने रस्त्यावरील खड्ड्यांना, रस्त्यांच्या स्थितीला व वाहतुकीच्या कोंडीला जबाबदार आहोत हा माझ्या लेखाचा विषय आहे.

शहराने (म्हणजेच सरकार/नियोजनकर्ते/नागरी संस्थांनी) रस्त्यांच्या पृष्ठभागांवर खुल्या गटारांद्वारे पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच काँक्रिटच्या रस्त्यांना योग्य उतार दिला पाहिजे, तसेच नैसर्गिक जलस्रोतांमधील अडथळे दूर केले पहिजेत, म्हणजे ते हे पावसाचे पाणी (वाहून जाणारे) नद्यांपर्यंत नेऊ शकतील, जे काही दशके पूर्वीपर्यंत होत असे. रस्त्याच्या कडेला जमीनीवर झाडांसाठी पुरेशी जागा सोडा म्हणजे पाणी जमीनीमध्ये झिरपू शकेलत्याचवेळी नवीन तसेच पूर्ण झालेल्या प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाच्या पाण्याचे संधारण परिणामकारकपणे होईल याकडे लक्ष ठेवा (आपण आशा तरी ठेवू शकतो), म्हणजे पावसाचे कमी पाणी रस्त्यांवरून वाहील. विकासाच्या या पैलूसाठी विकास नियमांमध्ये बदल करा व हे वेगाने करा म्हणजे वाहनतळासाठी आणखी जागा मिळावी या हव्यासापोटी आपण जमीन खणणार नाही, किंबहुना त्याऐवजी ते वर बांधा म्हणजे जमीनीला तिचे काम करता येईल, म्हणजेच पावसाचे पाणी शोषून घेणे व झाडांना आधार देणे. सार्वजनिक वाहतूक सशक्त करणे ही उपाययोजना काही एका रात्रीत राबवता येणार नाही, तसेच नागरिकांचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन कसा आहे यावरही ते अवलंबून आहे, परंतु रस्त्यावरील खड्डे वाहतुकीचा खोळंबा होण्यासाठीचे कारण होऊ नयेत. स्मार्ट शहरासाठी हे नक्कीच भूषणावह नाही व एकमेकांकडे बोटे दाखवून दोषारोप करून ते साध्य होणार नाही तर एकमेकांना सहकार्य करूनच ते साध्य होईल; एवढे सांगून निरोप घेतो!

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com 

 











No comments:

Post a Comment