Friday, 22 November 2024
इंडियन क्रिकेटटीम, मायदेशात व्हाईट वॉश आणि आयुष्याचा धडा !

Wednesday, 13 November 2024
ताडोबाच्या सुपर मॉम्स , भाग 2 , जुनाबाई !
ताडोबाच्या
सुपर मॉम्स, भाग 2, जुनाबाई !
“भगवान हर जगह नही होता है, इसीलिए तो उसने माँ को बनाया”… बॉलिवुड चित्रपट “मॉम”
( देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवले )
जेव्हा लेखाचा विषय आई हा असतो तेव्हा लेखाची सुरुवात करण्यासाठी आपल्या बॉलिवुड चित्रपटांपेक्षा आणखी चांगले काय असू शकते आणि माझ्याकडे संवाद निवडण्यासाठी कितीतरी पर्याय होते. तरीही मॉम या चित्रपटातील वरील संवाद या लेखासाठी अतिशय चपखल आहे असे मला वाटले व ताडोबातील सुपर मॉम या लेखमालेतील दुसरा भाग सादर करताना मला अतिशय आनंद होतोय. ज्यांनी या मालिकेतील आधीचा भाग वाचलेला नाही त्यांच्यासाठी सांगतो की ताडोबातील वाघीणींना मी (अनेक वन्यजीवप्रेमींच्या वतीने दिलेली) एक प्रकारची मानवंदना दिली आहे ज्या खरेतर ताडोबातील सुपर मॉम आहेत. ही लेखमाला म्हणजे या वाघीण मातांचा प्रवास किती खडतर असतो हे लोकांना समजावे यासाठीचा प्रयत्न आहे. योगायोगाने मॉम चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखा हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांनी साकारली होती व प्रसिद्धीला येण्यापर्यंतचा त्यांचा प्रवासही थोड्याफार प्रमाणात ताडोबातील सुपर मॉमसारखाच खडतर होता. त्याच वेळी मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की माझ्या लेखामध्ये काळवेळ, ठिकाणांचे, तसेच वंशावळीविषयीचे संदर्भ यासंदर्भात त्रुटी असू शकतात कारण मी कोणी वन्यजीवन किंवा ताडोबाच्या जंगलाचा संशोधक नाही. मी निव्वळ एक पर्यटक आहे ज्याला जंगलांविषयी इतर पर्यटकांपेक्षा थोडे अधिक माहिती आहे. त्याचप्रमाणे माझ्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या पार्श्वभूमीमुळे मी जे काही पाहतो व ज्याचे निरीक्षण करतो त्याला तर्काची जोड देऊ शकतो. ही लेखमाला ताडोबाचा (जे आधीच प्रसिद्ध आहे) किंवा काही विशिष्ट वाघांचा किंवा एकूणच वाघांच्या प्रजातीचा उदोउदो करण्यासाठी नाही तर एकूणच या उमद्या प्राण्याचे महत्त्व व त्याची केवळ स्वतःच्याच संवर्धनामध्ये नव्हे (म्हणजे टिकून राहण्यामध्ये) तर हजारो लोकांचे जीवनमान सुधारण्यामध्ये तसेच पूर्ण वन्यजीवनाचे भवितव्य सुरक्षित करण्यामध्ये किती महत्त्वाची भूमिका आहे हे लोकांना समजावे यासाठी हा लेखप्रपंच आहे !
इथे, अनेक जण विचारतील हे जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही का, कारण काही वाघ (म्हणजे वाघ प्रत्यक्षपणे) स्वतः संवर्धनाचे एवढे मोठे काम कसे करू शकतात. किंबहुना ताडोबासारख्या ठिकाणी वाघांचे तसेच वन्य संवर्धन यशस्वी होण्यासाठी आपण माणसेच जबाबदार नाही का, व त्यासाठी माणसांची पाठ थोपटायला नको का? अशा सर्व लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की वाघांवर ही वेळ कुणी आणली, वन्यजीवनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची वेळ कुणामुळे आली, माणसांमुळेच, बरोबर? म्हणूनच, आपण वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत असू तर काही महान करत नाही, कारण आपण आपलीच पापे धुण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे श्रेय या माता असलेल्या वाघिणींचे आहे ज्या माणसांच्या प्रयत्नांशी जुळवून घेत आपल्याला वन्यजीवन संवर्धनाचे प्रयत्न करण्यासाठी मदत करत आहेत, हे लोकांना माहिती असले पाहिजे, म्हणूनच हा लेख लिहीत आहे. मला सुदैवाने (म्हणजेच नशीबाने) अनेकदा ताडोबाला भेट देण्याची व या मातांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली कारण त्यामुळे मला त्यांच्या योगदानाची व प्रयत्नांची केवळ जाणीवच झाली नाही तर मला वन्यजीवनाविषयी किंवा एकूणच जीवनाविषयी बरेच काही शिकता आले व वन्यजीवन संवर्धनासाठी सहजीवनाचे महत्त्व समजून घेता आले. यापैकी काही वाघिणींना मी दशकभरापासून पाहात आलो आहे व लहान बछड्यांपासून ते बछड्यांची आई होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला आहे व तो अद्भूत आहे व त्यातील काही क्षण कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहतील. म्हणूनच एकप्रकारे या सर्व वाघिणींना ही माझी वैयक्तिक मानवंदनाही आहे. मी त्यांचा उल्लेख सुपर मॉम असा करतो, कारण आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांची सेवा व त्याग उल्लेखनीय असतो. त्याग हे मातृत्त्वाचेच दुसरे नाव आहे, परंतु त्यांच्या त्यागाचे कौतुक करण्यासाठी आपण काय करत आहोत, हा प्रश्न मी स्वतःला विचारला व म्हणूनच ही लेखमाला लिहिण्याचे ठरविले. या बहुतेक वाघिणींमध्ये त्या वाघाच्या कुळातील आहेत याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट सामाईक आहे, ती म्हणजे त्यांना स्वतःच्या अस्तित्वा आणि जागेसाठी द्यावा लागणारा लढा! यासाठी आधी त्यांना स्वतःच्या आईसोबत व नंतर मोठे झाल्यानंतर त्यांच्या भावंडांसोबत झगडावे लागते व त्याशिवाय माणसांसोबत जागेसाठी सतत झगडा सुरूच असतो व तो दिवसेंदिवस अधिक खडतर आणि क्रूर होत चालला आहे व तरीही त्या स्वतःच्या तसेच वन्यजीवनाच्या अस्तित्वासाठी सुरू असलेला लढा सोडण्यास तयार नाहीत, म्हणूनच त्या सुपर मॉम ठरतात! अशीच एक सुपर मॉम आहे जूनाबाई, वाघीण !!...
मदनापूर एक्सप्रेस, सुपर मॉम जुनाबाई !
साधारण सात वर्षांपूर्वी एका तरुण वाघीण आणि तिच्या पाठोपाठ चालत असलेली चार गोंडस बछडी असे एक छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते (त्या काळी फक्त फेसबुक होते) व छायाचित्रकाराने त्यास अतिशय समर्पक मथळा दिला होता, "मदनापूर एक्सप्रेस"! त्यादिवशी ताडोबाच्या कोलारा बाजूकडील अभयारण्याने वन्यजीव प्रेमींच्या जगात प्रवेश केला (म्हणजे वाघांची छायाचित्रे काढणाऱ्यांच्या). तोपर्यंत ताडोबा म्हणजे केवळ मोहार्लीकडील बाजू (हे ताडोबाच्या पहिल्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे) असेच समीकरण होते. अनेक लोकांना माहितीही नव्हते की अभयारण्यामध्ये कोलारा/चिमूरच्या बाजूनेही प्रवेश करता येतो व इथेही वाघ दिसून येतात, ज्यासाठी बहुतेक लोक इथे भेट देतात. त्याचवेळी मदनापूर व कोलारा बफर क्षेत्रेही उघडण्यात आली. स्थानिक गावातील एका वृद्ध (जुना) स्त्रीवरून (बाई) तिथल्या वाघिणीला जुनाबाई हे नाव देण्यात आले होते. त्या महिलेला त्या जंगलातील कुणा वाघाने मारले असावे असे मानले जाते. हा जंगलाचा पट्टा आता या वाघिणीचे क्षेत्र झाले आहे, आता तिची अनेक बछडी जंगलाच्या जैवविविधतेचा भाग आहेत. गेल्या जवळपास आठ वर्षांपासून ती कोलारा/मदनापूर/पळसगाव बफर क्षेत्राची (ही गाभा क्षेत्राला अगदी लागून असलेली गावे आहेत) अनभिषिक्त राणी आहे. तिचे काम सोपे नाही, कारण एकीकडे हा मानवी वसाहतींनी बराच गजबजलेला भाग आहे तर दुसरीकडे जंगलाचा हा भाग म्हणजे नर वाघांसाठी ताडोबाच्या गाभा क्षेत्रातून बाहेरील जंगलांमध्ये जाण्यासाठीचा मार्ग आहे. एखाद्या वाघाच्या हद्दीमध्ये अधिकार क्षेत्रावरून होणाऱ्या लढाईत अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातून बाहेर काढण्यात आलेले नर वाघ बहुतेक वेळा जंगलाच्या या बफर क्षेत्रामध्ये आसरा घेतात, तसेच ज्या नवीन वाघांना जागेच्या शोधात ताडोबाच्या गाभा क्षेत्रात प्रवेश करायचा असतो तेही याच मार्गाने जातात व या पट्ट्यावर जुनाबाईचे राज्य आहे. मी अतिशय नशीबवान आहे की गेल्या पाच वर्षांपासून मला जुनाबाईला पाहण्याचा योग येत आहे व ती ज्याप्रकारे वेगवेगळ्या नर वाघांना तसेच माणसांना समोरे जाते ते कौतुकास्पद आहे. एकीकडे तिला नव्या नर वाघांशी जुळवून घ्यावे लागते व दुसरीकडे माणसांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे लागते जे जंगलाच्या बफर क्षेत्राच्या या भागामध्ये मोठ्या संख्येने आहेत. नर वाघांबाबत असलेली अडचण म्हणजे वाघिणीला एखाद्या दुसर्या वाघापासून झालेली बछडी असतील व तो वाघ त्या जंगलातून निघून गेला तर नवीन नर वाघ वाघिणीच्या आधीच्या बछड्यांना मारून टाकण्याचाच प्रयत्न करतो जे कुठल्याही आईसाठी अतिशय वेदनादायी असते. परंतु निसर्ग असाच असतो, काहीवेळा जरा निर्दयी. जुनाबाईच्या क्षेत्राचे भौगोलिक स्थान असे आहे की तिथे सातत्याने नवीन वाघांची ये-जा सुरू असते, तरीही ती बऱ्याच बछड्यांना वाढवू शकली आहे जी ताडोबासाठी खऱ्या अर्थाने भेट आहे. माणसांना तोंड देण्याविषयी बोलायचे झाले, तर ती आता त्याला सरावली आहे, या जंगलांमध्ये वाघांसोबत राहणाऱ्या माणसांपासून जुनाबाई कसे अंतर राखून राहते हे पाहणे खरोखरच हृद्य असते (ते बफर क्षेत्र असल्यामुळे येथे माणसाच्या वावराला परवानगी असते). मी अनेकदा स्थानिक गुराखी (मेंढपाळ) त्यांची गुरेढोरे घेऊन जंगलातील रस्त्यांवरून घेऊन जाताना पाहिले आहे किंवा ते त्यांच्या शेळ्या-मेढ्या चरत असताना त्यांची राखण करत बसलेले असतात. त्यांच्या अवती-भोवती असलेल्या झुडुपांमध्येच जुनाबाई विश्रांती घेत आहे याची त्यांना जाणीवही नसते, परंतु ती अतिशय सतर्क असते व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. ज्या क्षणी हे मेंढपाळ अथवा गुराखी जंगलातून बाहेर जातात किंवा त्यांच्या गुराढोरांना बफर क्षेत्राच्या दुसऱ्या भागात घेऊन जातात, त्यांच्या मागे ती सावकाश झुडुपांमधून बाहेर येते व तिच्या अन्नाचा शोध सुरू करते किंवा तिच्या हद्दीवर खुणा करू लागते. त्याचप्रमाणे, मी जुनाबाईला तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी किंवा तत्सम दैनंदिन कामांसाठी जंगलामध्ये आलेल्या किंवा दुसरीकडे जाण्यासाठी या रस्त्यांवरून जात असलेल्या गावातील महिलांना तोंड देतानाही पाहिले आहे. असे असले तरीही ती कधीही त्यांना अचानक या महिलांच्यासमोर रस्त्यावर येऊन किंवा त्यांच्या वाटेत येऊन त्यांना कधीही घाबरवत नाही. जुनाबाई इतकी वर्षे टिकून आहे कारण माणसे आता तिच्या आयुष्याचा भाग असल्याचे व त्यांच्यावर हल्ला केल्याने तिचे किंवा तिच्या बछड्यांचे भले होणार नाही हे तिला माहिती आहे. ती माणसांवर नजर ठेवून असते परंतु त्यांच्यापासून एक सुरक्षित अंतर राखून ती त्यांच्या असण्याचा आदर करते व हा अनुभव अतिशय सुखावणारा आहे. त्याचवेळी जेव्हा जंगलात एखादा नर वाघ असतो, तेव्हा ती तिच्या बछड्यांना जंगलाच्या एका भागात ठेवते व नर वाघाला भुलवून जंगलाच्या दुसऱ्या भागात नेते जेणेकरून तो त्यांचा पिता नाही अशी बछडी सुरक्षित राहू शकतील!
त्याचवेळी जेव्हा ती तिच्या बछड्यांसोबत असते तेव्हा ती अतिशय सतर्क असते व सतत सावध नजर ठेवून असते. माझ्या अलिकडच्या सफारीमध्ये मला तिचे हे कौशल्य अतिशय जवळून पाहता आले. आम्ही एका ठिकाणी वाट पाहत असताना, जुनाबाई दाट झुडुपांमध्ये विश्रांती घेत होती व तिची दोन लहान बछडी तिच्या अवती-भोवती होती. त्या झुडुपांमध्ये एका लहानशा झरोक्यातून आम्ही तिला पाहू शकत होतो. ज्या वाघिणीची बछडी आहेत ती शक्यतो अशाच जागा निवडते म्हणजे ती शिकारीसाठी गेली असताना त्यांना लपवून ठेवू शकते. स्वतःसाठी व बछड्यांसाठी रात्रभर शिकार करून ती थकून गेली असावी व ती शिकारीला गेली असताना, मागे सोडलेल्या बछड्यांचे रक्षण करण्याचा ताण सतत असतोच, म्हणूनच या आई असलेल्या वाघिणींसाठी विश्रांती हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. बछडी पूर्णपणे जागी होती व खेळण्याच्या मनस्थितीत होती तर जुनाबाई गाढ झोपलेली होती. आम्ही आजूबाजूला असल्याची तिला जाणीव होती, परंतु आमचा तिच्या बछड्यांना धोका नसल्याचेही ती जाणून होती. त्यामुळेच ती निश्चिंतपणे झोपलेली होती व ती उठते का व बछड्यांना घेऊन जवळपासच्या पाणवठ्यावर जाते का याची आम्ही वाट पाहात होतो. अशा प्रसंगी केवळ संयमच आवश्यक असतो कारण वाघ सलग काही तास झोपू शकतो ज्यामुळे तुम्ही वैतागू शकता. परंतु आता या वाट पाहण्याच्या या खेळाचे आम्ही आता अनुभवी खेळाडू झालो आहोत, त्यामुळे वेळ हळूहळू पुढे जात होता. अचानक थोड्या अंतरावर आम्हाला इतर प्राण्यांचे इशारा देणारे क्षीण आवाज ऐकू आले व जंगली कुत्र्यांचे आवाजही ऐकू येत होते. जुनाबाई ताडकन तिच्या पायांवर उभी राहिली, जणू काही ती झोपलीच नसावी. एका झटक्यात ती रस्त्यावर आमच्या जिप्सीच्या पुढ्यात उभी होती व तिच्या बछड्यांना सुरक्षित जागेवरून न हालण्याच्या सूचना देत होती. तिचे डोळे काही धोका आहे का याची पडताळणी करण्यासाठी संपूर्ण परिसराची छाननी करत होते, वाघांना जंगली कुत्र्यांचा धोका असतो. तिचे कान टवकारलेले होते व ते अगदी बारिकशा आवाजाचाही वेध घेत होते जेणेकरून जंगली कुत्र्यांचा आवाज कोणत्या दिशेने येत आहे याचा अंदाज लावता येईल. तिने या संपूर्ण जागेला वळसा घालण्याचे ठरवले व ती निघून गेली, मी अत्यंत तत्परतेने उत्तम प्रकारे आपले कर्तव्य बजावणारी सुपर मॉम पाहिली होती!!. ती जवळपास तासभर झोपलेली होती व ती कधी उठेल याचा काही भरवसा नव्हता. जंगली कुत्र्यांचा अस्पष्टसा आवाज ऐकूनही तिच्या बछड्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ती क्षणार्धात ताडकन उठली व आपला थकवा बाजूला ठेवत संपूर्ण परिसराचा फेरफटका मारून आली व धोक्यास स्वतः तोंड देण्यासाठी सज्ज होती. जंगली कुत्री ही वाघांची कट्टर शत्रू असतात व ते झुंडीने हल्ला करत असल्यामुळे वाघालाही इजा करू शकतात. तरीही तिच्या बछड्यांसाठी जुनाबाई त्यांच्याशी दोन हात करायला सज्ज होती. जंगलामध्ये आता जुनाबाई या वृद्धेच्या नावे एक मंदिर आहे, व आपली ही सुपर मॉम अनेकदा येथे घुटमळताना दिसते. म्हणूनच तिचे नामकरण जुनाबाई वाघीण असे करण्यात आले आहे. जुनाबाईच्या कुळाविषयी सांगायचे झाले तर ती ताडोबातील आणखी एक सुपर मॉम छोटी मधू हिची मुलगी असल्याचे काही जण म्हणतात जिचे सध्या जुनोना बफर क्षेत्रावर नियंत्रण आहे. तर काही जण म्हणतात की ती ताराची मुलगी आहे. ताडोबातील सुपर मॉमविषयीच्या लेखमालेतील याआधीच्या लेखामध्ये मी छोटी मधूविषयी लिहीले आहे, अर्थात कुणीही या माहितीची खात्री करू शकत नाही व अनेकजण असेही म्हणतात की हे क्षेत्र रिक्त असल्यामुळे जुनाबाईने बाहेरून येऊन त्यावर ताबा मिळवला. परंतु एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे जुनाबाई आणखी एका सुपर मॉमची आई आहे, या वाघिणीचे नाव आहे विरा जी जुनाबाईच्या हद्दीला लागून असलेल्या जंगलामध्ये राज्य करते, ज्याला बेलारा असे म्हणतात. तिला दोन धिटुकली बछडी आहेत, त्यामुळे जुनाबाई आधीच सुपर आजी झाली आहे !
जुनाबाईसारख्या वाघिणींनी वन्य पर्यटनासाठी आणखी एक गोष्ट,खुप चांगली केली आहे ती म्हणजे त्या त्यांच्या बछड्यांसाठी सुपर मॉम आहेत त्याचसोबत त्या माणसे व जंगलांमध्येही आरामशीरपणे वावरतात. म्हणूनच बहुतेक त्यांची बछडी जेव्हा मोठी होतात तेव्हा ती माणसांना बुजत नाहीत किंवा घाबरत नाहीत. त्यामुळे पर्यटकांनाही त्यांना पाहताना मजा येते, जे वन्य पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे व यामुळेच जगभरातील पर्यटकांमध्ये ताडोबा अतिशय लोकप्रिय आहे. असे करत असताना, अप्रत्यक्षपणे जुनाबाई (व तिच्यासारख्या इतरही वाघिणी) अनेक स्थानिक गावकर्यांचीही आई झालेली आहे. ती तिच्या बछड्यांसोबत मदनापूर/कोलारा बफर क्षेत्रात दिसून येत असल्यामुळे तिथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे व येथील अनेक कुटुंबांसाठी तो उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. याच कारणाने जुनाबाई ताडोबातील सर्वोत्तम सुपर मॉमपैकी एक आहे व तिचा कार्यकाळ मोठा असावा याच शुभेच्छा मी तिला देतो.
अर्थात जुनाबाईसारख्या सुपर मॉमसाठीही बछड्यांना वाढविण्याचे काम दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे कारण वाघांची संख्या वाढत आहे व जागा तेवढीच आहे किंबहुना कमी होत चालली आहे. यामुळे क्षेत्रासाठी वारंवार लढाया होऊ लागल्या आहेत व यामध्ये दुसऱ्या नर वाघांपासून झालेले बछडे बळी पडतात. हे जंगल मोठे आहे, परंतु एवढेही मोठे नाही की एक आई तिच्या बछड्यांना सगळ्यांच्या नजरांपासून वाचवू शकेल. सरतेशेवटी काही बछडी इतर वाघांकडून मारली जातात. एवढ्यातच जुनाबाईची एक साधारण वयात आलेली बछडी दुसऱ्या वाघिणीने मारली. आपण जुनाबाईसारख्या सुपर मॉमना शक्य तेवढी जागा देऊ शकतो व त्यांच्या जीवनात कमीत कमी अडथळा आणू शकतो. त्यासाठी वन्यजीवन पर्यटन महत्त्वाचे आहे, कारण तरच जुनाबाई भोवती असलेल्या स्थानिकांची तिने त्यांचे एखादे जनावर किंवा मेंढी मारले तर त्यांची हरकत नसेल. कारण तिला जगण्यासाठी हे करणे आवश्यक असल्याचे ते जाणतात व जुनाबाईच्या जगण्यावर त्यांचेही जगणे अवलंबून आहे, म्हणूनच सुपर मॉम जुनाबाईला उदंड आयुष्य लाभो !
वाघीण जुनाबाईची जादूच अशी आहे की मी तिच्यासोबत आणखी दोन किंवा तीन सुपर मॉमविषयी लिहीण्याचा विचार केला होता, परंतु मी जेव्हा लिहीण्यास सुरुवात केली तेव्हा तिनेच संपूर्ण जागा व्यापली. मला तुमच्या वाचनाच्या संयमाची परीक्षा घ्यायची नाही त्यामुळे ताडोबातील आणखी काही वाघिणी म्हणजेच सुपर मॉमविषयी लेखमालेतील पुढील लेखात जाणून घेऊ, असे आश्वासन देऊन निरोप घेतो...!
खालील लिंकवर तुम्ही आणखी काही क्षण पाहू शकता...
https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720321143099/
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स

Wednesday, 6 November 2024
रतन टाटा नावाची शाळा !!
रतन टाटा नावाची शाळा!!
“प्रत्येक वस्तूंची एक योग्य किंमत असते, ते दिसल्यानंतरच तुम्हाला त्या वस्तूंचे मोल मिळते.” ― वॉरन बफेट
“जेव्हा आव्हानांना तोंड द्यावे लागले, तेव्हाच
धाडसी नाविन्यपूर्ण तोडगे निघतात. जर आव्हानेच नसतील, तर साध्या
मार्गानेच जाण्याची आपली प्रवृत्ती असते” … रतन टाटा.
“तुम्हाला जेव्हा आफ्रिका व आशियाच्या काही
भागातील कमालीचे दारिद्र्य दिसते, तुमच्याभोवती भुकेली व कुपोषित मुले
दिसतात, व तुम्ही अगदी खुशालीने व ऐषोआरामात जगत आहात याची जेव्हा जाणीव होते,
तेव्हा
मला असे वाटते एखादी असंवेदनशील, कोडगी व्यक्ती असेल तरच तिला या बाबत
आपण काही तरी करावे असे वाटणार नाही”… रतन टाटा.
“आपल्यामागे काही शाश्वत कंपन्यांचा समूह सोडून
जावा असे मला वाटते ज्या नैतिकता, मूल्ये याबाबत उल्लेखनीय काम करतील व
आपल्या पूर्वजांनी जे माघारी ठेवले आहे ते कार्य सुरू ठेवतील”… रतन टाटा
जेव्हा आपल्या नजरेतून
श्री. रतन टाटा असा लेखाचा विषय असतो तेव्हा श्री. बफेट यांच्याशिवाय मला अधिक चांगल्याप्रकारे मार्गदर्शन कोण करू शकेल. मी या दोघांची तुलना करत नाहिये कारण केवळ एखादा मूर्खच चंद्र व सूर्याची तुलना करेल, दोन्ही आपापल्या जागी सर्वोत्तम व वैशिष्ट्यपूर्ण आहेत, जशी ही दोन नावे आहेत. परत हा तर्क वापरला तर श्री. बफेट व श्री. टाटा, पूर्णपणे वेगळ्या जगात राहात होते मात्र जसा सूर्य आपला दिवस उजळून टाकतो तर चंद्र आपल्याला रात्री प्रकाश देतो, परंतु ते दोन्ही एकाचवेळी या जगात असू शकत नाहीत, तरीही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा प्रकाश सतत असतो, त्याचप्रमाणे या दोघा प्रज्ञावंतांचे शब्द आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सध्या आपल्या राज्यामध्ये निवडणुकांचे बिगुल वाजले आहे व बहुतेक लोकांनी श्री. रतत टाटा यांच्या निधनाबद्दल त्यांच्या समाज माध्यमांवरून आदरांजली वाहून आदर व्यक्त करून झाला आहे (?) असो, यापैकी बहुतेकांना रतन टाटा १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिवंत होते हे त्यांच्या इन्स्टाग्राम/फेसबुक खात्यावरून किंवा वॉट्सॲपच्या चॅटबॉक्सवरून समजले व जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी आली त्यानंतर त्यांनी आदरांजली वाहिली. अनेक चौकांमध्ये (कोपऱ्यांवर) गणपती/दुर्गा मंडळांमध्ये श्री. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले. त्या दिवशी आपल्या पंतप्रधानांपासून ते बॉलिवुडच्या तारे-तारकांपर्यंत प्रत्येकाने त्यांच्या फेसबुक/इन्स्टाग्रामवर श्री. रतन टाटांविषयी काही ना काही लिहीले व ज्यांचे या समाज माध्यमांवर खाते नाही (अजूनही असे काही लोक आहेत) त्यांनी त्यांच्या वॉट्सॲपच्या ग्रूपमध्ये श्री. टाटांविषयी संदेश पाठवले, तो दिवस संपला व श्री. रतन टाटा यांचा जीवनप्रवासही संपला! आता तुम्ही म्हणाल, तू पण हे लिहितोच आहेस ना, मग तू सुद्धा ज्या लोकांना हसतो त्यांच्यात सामील झालास. तुम्ही असा विचार करत असाल तर ते खरे आहे, आणि तुम्ही काय विचार करावा यावर माझे नियंत्रण नाही. मी हा लेख केवळ श्री.रतन टाटा यांना आदरांजली म्हणून लिहीत नाहीये तर त्यांनी (म्हणजे टाटा समूहाने) मला जे काही शिकवले ते माझ्या मुलांपर्यंत व माझ्या कामातील सहकार्यांना, तसेच स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी इच्छुक असलेल्या कुणापर्यंतही पोहोचवण्यासाठी हे लिहीत आहे.
मला सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते,
मी
श्री. रतन टाटा यांच्याविषयी जे काही सांगत आहे ते मी त्यांच्याविषयी बातम्यांमधून
जे वाचले, समाज माध्यमांमध्ये त्यांची जी भाषणे ऐकली आहेत, तसेच
एक व्यवसाय समूह म्हणूनच नव्हे तर एकूणच समाजासाठी टाटा समूहाच्या योगदानाविषयी मी
जे काही वाचले आहे त्या आधारावर लिहीले आहे. मी कधीही श्री. रतन टाटांना पाहिलेले
नाही, त्यांच्या कोणत्याही व्यवसायासाठी काम केलेले नाही, त्यामुळे
महाभारतामध्ये ज्याप्रमाणे एकलव्य द्रोणाचार्यांकडून शिकला (कृपया गूगल करा)
त्याचप्रमाणे मीदेखील श्री. टाटांकडून काय शिकलो ते शेअर करीत आहे. मी इथे केवळ एक
तुलना केलेली आहे, श्री. टाटा हे अनेक बाबतीत द्रोणाचार्य आहेत
परंतु मी अगदी १% देखील एकलव्यासारखा नाही, परंतु मी
प्रयत्न नक्की केला एवढेच मी म्हणू शकेन. मी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात
आलेल्या किंवा पाठवण्यात आलेल्या संदेशांचा महापूर पाहात होतो. त्यामध्ये काही
जणांनी अगदी इथपर्यंतही लिहीलेले होते की श्री. रतन टाटा यांनी ताजमहाल हॉटेल
बांधले व त्यांना दत्तक घेण्यात आले होते व अजूनही बरेच काही लिहीण्यात आले होते.
श्री. रतन टाटांनी पहिले ताज महाल हॉटेल बांधले नाही तर ते जमशेदजी टाटा यांनी
बांधले. श्री. रतन टाटा यांनी ताज हॉटेलची नवीन इमारत जी जुन्या हॉटेल शेजारीच उभी
आहे ती बांधली असेल. श्री. रतन टाटा
यांना टाटा कुटुंबामध्ये दत्तक घेण्यात आले नव्हते तर त्यांच्या वडिलांना दत्तक
घेण्यात आले होते. परंतु याची फिकीर कोण करते, कारण लोक श्री.
रतन टाटांना त्यांची आदरांजली वाहण्यात तसे संदेश इतरांना पाठवण्यात व्यग्र होते.
प्रत्येकालाच ते करायचे होते कारण टाटा हा ब्रँडच तसा आहे, हा माझ्या
लेखाचा विषय आहे. मी या लेखाच्या सुरुवातीलाच श्री. रतन टाटा यांची तीन अवतरणे
वापरली, ज्यातून ते एक व्यक्ती म्हणून कसे होते व तुम्ही त्यांच्याकडून किती
शिकू शकता हे तुम्हाला कळलेच असेल. खरेतर तेवढेही पुरेसे आहे पण असो....
टाटा उत्पादनांविषयी समजलेली एक गोष्ट ज्याची
आपल्याला कधी जाणीवही होत नाही ती मला तुम्हाला आज सांगाविशी वाटते. माझी टाटा या
नावाशी पहिली ओळख शालेय जीवनात झाली. मुंबई ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग
क्रमांक ६ माझ्या खामगावच्या घरासमोरून जात असे, त्यावरून ये-जा
करणाऱ्या ट्रकवर इंग्रजीमध्ये “T” हे अक्षर कोरलेले असे. नंतर ते अक्षर
म्हणजे टाटा हि माझी पहिली ओळख, आणि मग आपण जे मीठ खरेदी करतो ते
सुद्धा टाटाच बनवितात, हे समजले, ती फक्त सुरुवात
होती. मी आयुष्याच्या मार्गावर माझा प्रवास सुरू केला, तशी माझी अनेक
टाटा ब्रँड व उद्योगांशी ओळख झाली. त्याकाळी त्यातले फार कमी मला परवडू शकत होते व
ताज हॉटेलसारख्या ब्रँडविषयी तर मी फक्त वाचतच राहिलो. मी टाटा ब्रँड खरेदी करू
शकत असो किंवा नसो, एक गोष्ट मात्र तशीच राहिली त्यांची ग्राहक व
सेवेप्रती असलेली बांधिलकी, जी सर्वोच्च आहे. मी रतन टाटांविषयी
पहिल्यांदा वाचले जेव्हा ९०च्या दशकात टेल्कोमधील (स्वयंचलित वाहने तयार करणारी
टाटा समूहातील एक कंपनी) कामगारांचा कुप्रसिद्ध संप झाला होता. त्यावेळी आम्ही नुकतेच
अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडलो होतो व टेल्कोमध्ये नोकरी मिळणे म्हणजे
एच१बी व्हिसा (कृपया गूगल करा) मिळवण्यासारखे होते. मी स्थापत्य अभियंता
असल्यामुळे मला टेल्कोमध्ये नोकरी कधीही मिळणार नाही हे मला माहिती होते, तरीही
स्थापत्य अभियंत्यांसाठी टाटा हायड्रो व टाटा पॉवरचे पर्याय होते, अर्थात
तेथे प्रवेश मिळणेही तितकेच अवघड होते. त्यानंतर मला समजले की टाटांच्या मालकीचे
धरणही आहे व त्यामुळे माझा कंपनीसाठीचा आदर अधिकच वाढला, कारण धरण
कुणाच्या मालकीचे असते! त्यानंतर मी श्री. रतन टाटा व ब्रँडविषयी आणखी वाचायला
सुरुवात केली व दोन्हींमुळेही मी अक्षरशः थक्क झालो होतो. कारण एका कंपनीचे
नेतृत्व करणाऱ्या एका माणसाला पैसे कमवण्यासोबतच समाजही घडवायचा होता, ज्यासाठी
आपल्या देशातील व्यावसायिक ओळखले जात नाहीत! टाटांनी सुरू केलेल्या संस्थांची यादी
इथे देत आहे, त्यापैकी काही संस्था या अजूनही
त्यांच्याद्वारेच चालवल्या जात आहेत …
• टाटा
इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च
• टाटा
इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस
• टाटा
मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर
• टाटा
मेडिकल सेंटर
• टाटा
मेमोरियल सेंटर
• टाटा
रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर
• टाटा
थिएटर
• टेरी
स्कूल ऑफ ॲडव्हान्स स्टडीज
• स्कूल
ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज
• सर
दोराबजी टाटा अँड अलाईड ट्रस्ट्स
• सर
रतन टाटा ट्रस्ट
• इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
• होमी
भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विशाखपट्टणम्
• द
एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट
मी जाणीवपूर्वक ही नावे त्यांच्या लिंकसोबत
दिली आहेत म्हणजे कुणालाही या संस्थांविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर तो/ती
संबंधित लिंकवर क्लिक करून तसे करू शकतात (माझ्यासारखे अजूनही काही वेडे आहेत).
वरील संस्थांवर एक नजर टाकली तर तुम्हाला टाटांचे योगदान व रतन टाटा का महान आहेत
हे समजेल. अर्थात, यापैकी अनेक संस्था या श्री. रतन टाटा यांनी
सुरू केलेल्या नव्हत्या परंतु उत्तराधिकारी म्हणून किंवा नेतृत्व करत असताना
त्यांनी केवळ या संस्थांचे कामकाज व्यवस्थित चालेल हेच पाहिले नाही तर त्यांचा
विस्तार व्हावा यासाठी प्रयत्नही केले, तसेच काही नवीन संस्थांची सुरुवातही
केली. ही अतिशय मोठी गोष्ट आहे कारण आपल्यापैकी कितीजण विशेषतः समाजासाठी पैसे
खर्च करण्याच्या बाबतीत आपल्या पालकांचा वारसा पुढे चालवतात, या
प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला रतन टाटांचा लोक का
आदर करतात हे समजेल.
अनेक वर्षे सरली व माझ्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात माझ्याकडे जे काही मर्यादित अधिकार होते त्यामध्ये मी रतन टाटांचे दोन प्रकारे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे आधी तुमचे काम तुम्हाला शक्य तितके जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे करण्याचा प्रयत्न करा व त्यातून पैसे कमवा जे कदाचित इतरांच्या तुलनेत कमीही असतील व दुसरे म्हणजे तुम्हाला शक्य आहे त्याप्रकारे समाजाला काहीतरी परत देण्याचा प्रयत्न करा. या प्रयत्नातूनच मी TERI, म्हणजे द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या संपर्कात आलो जी आधी टाटा एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट होती. कल्पना करा जेव्हा ऊर्जा, प्रदूषण, पर्यायवरण यासारख्या संज्ञा माहिती असणारे फारसे लोक नव्हते त्या काळात टाटांनी ही संस्था स्थापन केली, जी पूर्णपणे पारंपारिक ऊर्जा संवर्धनासाठी समर्पित आहे. एक लक्षात ठेवा उपदेश किंवा व्याख्यान देणे सोपे असते परंतु तुमच्या प्रयत्नांची कुणी दखलही घेत नसताना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून अशी संस्था उभारणे हे सीमेवर ज्या लोकांना तुम्ही ओळखतही नाही त्यांच्यासाठी लढण्यासारखे आहे, याचसाठी रतन टाटा महान आहेत. मी जेव्हा माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला व थोडेफार पैसे कमावले तेव्हा मला टाटांच्या सेवांपैकी काही उपभोगता आल्या ज्याविषयी मी कधी स्वप्नही पाहिले नव्हते व ताज हॉटेलमध्ये जाणे त्यापैकी एक होते. तेथे मला जाणीव झाली की, तेथे ऐवळ ऐषोआरामाला महत्त्व नाही कारण तुम्ही उत्तमोत्तम वस्तू खरेदी करू शकता व अतिशय सुंदर सजवलेले हॉटेल बांधू शकता परंतु तिथे दिली जाणारी सेवा व तुमच्या ग्राहकाला तो विशेष आहे अशी जाणीव करून देणे हे ताज हॉटेलचे वेगळेपण आहे, हाच टाटांचा स्पर्श आहे, याची जाणीव होऊ लागली. त्याचवेळी समाज माध्यमांचे आगमन झाले होते व इथेही श्री. रतन टाटा सार्वजनिक व्यासपीठांना ज्याप्रकारे सामोर जात (म्हणजे वापर करत) त्यातून त्यांचे वेगळेपण दिसून येते. बहुतेक बड्या व्यक्ती बातम्यांमध्ये राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करून समाज माध्यमांचा वापर करत श्री. रतन टाटा यांनी कधीही कुणाविषयीही अशाप्रकारची विधाने केली नाहीत, याला अपवाद फक्त एकच तो म्हणजे जेव्हा त्यांनी श्री. मुरेश अंबानी यांच्या गगनचुंबी घराविषयी केलेली टिप्पणी व त्यातून त्यांची मानवीय बाजूच दिसून येते. याबाबत टेल्कोच्या कारखान्यातील उपाहारगृहामध्ये एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे. श्री. रतन टाटा जेव्हा या कारखान्याला भेट देत तेव्हा ते कामगारांसोबत त्यांच्या उपाहारगृहामध्येच जेवत, जिथे एक फलक लावलेला होता, “आमचे कामगार जे जेवतात तेच आमचे अधिकारीही जेवतात”. माझे शब्द अगदी नेमके नसतील परंतु त्याचा आशय हाच होता, पाय नेहमी जमीनीवर ठेवा व संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करू नका ज्यामुळेच प्रामुख्याने आज आपला समाज अस्वस्थ आहे, हे जात, पैसा, पद, धर्म अशा अनेक स्वरूपाचे अडथळे आहेत, जे श्री. रतन टाटांनी कधीही जुमानले नाहीत.
व्यावसायिक आघाडीवरही त्यांचा प्रवास सुलभ
नव्हता, ज्यातून आपल्याला जाणीव होते की साम्राज्य जेवढे मोठे तेवढे त्याचे
नेतृत्व करणाऱ्याचे सिंहासन अधिक काटेरी असते. या प्रवासात अनेक फटके बसले,
मग
१ लाख रुपयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या कारमुळे म्हणजेच नॅनोमुळे झालेला तोटा व
स्वयंचलित वाहनांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ब्रँडना तोंड द्यावे लागण्यापासून
ते टाटा निर्मित घरगुती वाहनांना ट्रक निर्मात्यांची कार म्हणून मारण्यात आलेले
टोमणे असोत, परंतु रतन टाटांच्या नेतृत्वाखाली कंपनीने या
टीकेला सर्वोत्तम प्रकारे तोंड दिले ते म्हणजे कामगिरीतून. याचवर्षी टाटाने
पहिल्यांदाच घरगुती वाहनांच्या (कारच्या) विक्रीमध्ये सुझुकीला (मारुती) मागे
टाकले आहे व हे यश एका रात्रीतून मिळालेले नाही, हे लक्षात ठेवा.
त्याचवेळी इंग्लडचा अभिमान असलेल्या जॅग्वार व रेंज रोव्हर या कार कंपन्या आता
भारतीय म्हणजे टाटांच्या मालकीच्या आहेत, एखाद्या कंपनीकरता यापेक्षा गौरवास्पद
बाब कोणती असू शकते? नेतृत्वाच्या बाबतीत त्यांनी तरुण पिढीकरता वाट
मोकळी करून देत ते आपल्या पदावरून निवृत्त झाले, परंतु हा निर्णय
त्यांच्या अंगलट आला, त्यांनी हस्तक्षेप करून झालेले नुकसान कमी
करण्याचा प्रयत्न केला व व्यवसाय म्हणजे काय हे जगाला दाखवून दिले. खरे तर यापैकी
बहुतेक गोष्टी अनेक व्यासपीठांवर उपलब्ध आहे, तर मी श्री. रतन
टाटा यांच्याकडून काय शिकलो, हा माझ्या लेखाचा गाभा आहे व ते मी
मुद्द्यांच्या स्वरूपात देत आहे…
१.कोणतेही उत्पादन तयार करताना तुमचे शंभर
टक्के प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागला
तरीही.
२. पैसे जरूर कमवा परंतु ते योग्य कारणासाठी
वापरण्यासही शिका.
३. तुम्ही व्यावसायिक आहात व तुमचा व्यवसाय
नफ्यात चालवणे हे तुमचे काम आहे परंतु त्याहीआधी तुम्ही एक माणूस आहात.
४. यशाने तुम्हाला नम्र केले पाहिजे, तरच
तुम्ही त्यासाठी योग्य आहात.
५. तुमचा ज्या मूल्यांवर विश्वास आहे त्यासाठी
ठाम भूमिका घेण्यास घाबरू नका.
६. तुम्ही स्वतःचे चारित्र्य घडवले तरच तुम्ही
दीर्घकाळ टिकणारा ब्रँड तयार करू शकता.
७. शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे,
(हे
कालातीत ज्ञान आहे, परंतु अतिशय कमी लोक त्यानुसार जगू शकतात),
तुम्ही
किती संपत्ती कमावली यावरून तुम्ही कोण आहात हे ठरत नाही, तर तुम्ही काय
मागे सोडून जाणार आहात, यावरून ते ठरेल !
मी आत्तापर्यंत जे काही लिहीले आहे त्याच्या
१०% देखील मी प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवू शकलेलो नाही. परंतु मला खात्री आहे की
श्री. रतन टाटांनी हे वाचले असते तर मला यातून जे काही समजले आहे ते जाणून
घेतल्यानंतर त्यांना आनंद वाटला असता व मी प्रयत्न करत राहतो, मी
हे माझ्या मुलांसाठी व सहकार्यासाठी लिहीत आहे! असो, ज्या देशामध्ये
लोक अनेक दिवस लग्न सोहळे साजरे करण्यामध्ये किंवा एखाद्याच्या मृत्यूचा शोक
करण्यामध्ये वाया घालवतात, तिथे श्री. रतन टाटा यांच्या
मृत्यूनंतर टाटा समूहातील कंपन्यांचे काम एका मिनिटासाठीही थांबले नाही, यालाच
मी जगण्यातून व अगदी मृत्यूमधूनही आदर्श घालून देणे असे म्हणतो. श्री. रतन टाटा यांच्याविषयी अनेक संदेश आले
असतील (केवळ एक दिवसभर) परंतु नियमितपणे त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न
करणे ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम आदरांजली ठरेल, जी त्यांनाही
आवडली असती, हे लक्षात ठेवा. माझ्या सहकाऱ्यांनो, एवढे
सांगून निरोप घेतो!
...
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd56812@gmail.com
