Thursday, 12 February 2015

जैवविविधता ; जबाबदारी माझी, तुमची, प्रत्येकाची !




























मित्रांनो, पुण्यातल्या जैवविविधतेविषयी थोडंसं, याबाबतची परिस्थिती सगळीकडे सारखीच असली, तरी कृपया वाचा व इतरांनाही सांगा...

काही दिवसांनी आपल्याकडे कोक विरुद्ध पेप्सी एवढीच जैवविविधता उरेल. आपण एकाच वेळी संपूर्ण जगाची भूरचना एखाद्या बिनडोक चुकीप्रमाणे करत आहोत.”... चक पालनिक 

चार्ल्स मायकल चक हा अमेरिकी कादंबरीकार व मुक्त पत्रकार आहे, तो त्याचे लेखन रुढी, परंपरा, कायदे, नियम इत्यादींचे उल्लंघन करणारे असल्याचे सांगतो. तो फाईट क्लब या पुरस्कारप्राप्त कादंबरीचा लेखक आहे, ज्यावर एक चित्रपटही तयार झाला. मात्र त्याचे वरील विधान काल्पनिक नाही, आपण दररोज वाचतो की एखादा प्राणी, पक्षी किंवा झाडाची प्रजाती नामशेष होत चालली आहे, त्यामुळे आज ना उद्या त्याचे शब्द खरे ठरणार आहेत! जैवविविधता हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे व पुणेही त्याला अपवाद नाही! यातली सकारात्मक बाब म्हणजे या शहरात ब-याच जणांना त्याची जाणीव आहे व जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणा-या अनेक स्वयंसेवी संस्था आपल्याकडे आहेत; मात्र यातली खेदाची बाब म्हणजे या प्रयत्नांना सरकार, सामान्य माणूस व माध्यमांची साथ मिळत नाही! सर्वजण सोयीस्करपणे बांधकाम व्यावसायिक नावाच्या प्राण्याच्या माथ्यावर खापर फोडतात जो सामान्य माणसांसाठी घरे बांधण्याचे काम करतो!

मी नमूद केल्याप्रमाणे आपल्या शहरात अनेक स्वयंसेवी संस्था प्रामाणिकपणे काम करत आहेत व लोकांना शहरातील व आजूबाजूच्या जैवविविधतेच्या महत्वाविषयी जागरुक करत आहेत. आपल्यापैकी ब-याच जणांना जैवविविधता म्हणजे काय हे माहिती असेल मात्र आपल्या शहरी जीवनामध्ये त्याचे काय महत्व आहे याची जाणीव नसेल. ब-याचजणांना त्याविषयी काहीच माहिती नसेल केवळ वृत्तपत्रातून किंवा त्यांच्या मुलांचा अभ्यास घेताना हा शब्द गेला असेल, सुदैवाने पर्यावरणशास्त्र हा विषय शाळेमध्येच सक्तिचा करण्यात आला आहे! किंवा हा शब्द अजिबात न ऐकलेल्या सुदैवी व्यक्तिंसाठी म्हणून सांगतो, जैवविविधता हा शब्द एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपल्याला मिळणा-या विविध प्रजातींचे समृद्ध वैविध्य स्पष्ट करतो किंवा दर्शवतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा पुण्याच्या जैववैविध्याविषयी बोलत असतो तेव्हा आपण पुणे व आजूबाजूच्या परिसरातील पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, कीटकांच्या, माशांच्या व झाडांच्या प्रकारांविषयी व संख्येविषयी सांगत असतो. इथे प्राणी म्हणजे खारीपासून ते कुत्र्यांपर्यंत व झाडांमध्ये वडापासून ते अगदी काँग्रेस गवतापर्यंत, पक्षांमध्ये स्थानिक कबुतरांपासून नेहमीच्या चिमण्यांपर्यंत व मासे म्हणजे नदीमध्ये रहाणा-या सजीवांपैकी जे काही मिळते ते सर्व; अर्थात इथे आपल्या  नदीला नदी म्हणायचं का असा प्रश्न पडतो पण तो मुद्दा नंतर! मित्रांनो हा खरोखरच काळजीचा विषय आहे व अलिकडेच मला बायोस्फिअर नावाच्या प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या एका परिसंवादात सहभागी होण्याची संधी मिळाली, या परिसंवादाचा विषय होतापुणे जैव विविधता, दशा आणि दिशा. पुण्याचं खरोखर भाग्य आहे की पुण्यामध्ये काही व्यक्ती झपाटल्याप्रमाणे नद्या, वृक्ष, डोंगर इत्यादींचे संवर्धन करत आहेत, अशी माणसे हीच पुण्याचा सांस्कृतिक कणा आहेत. याच ख-या अर्थाने आपल्या संस्कृतीमधील सेलिब्रिटी व्यक्ती आहेत, सचिन पुणेकर, हेमा साने मॅडम, निनाद घाटे सर, राजगुरु सर व महाजन सर ही यापैकीच काही नावे आहेत; या सर्वांनी जैवविविधतेच्या विविध पैलुंचा अभ्यास केला आहे व पुण्याच्या पर्यावरणाचा ते चालता बोलता विश्वकोश आहेत! परिसंवादात सहभागी झालेले पाहुणे पुण्याच्या जैवविविधता क्षेत्रात काम करणारे दिग्गज होते व मी एकटा वगळून सगळे वयाने सत्तरीच्या पुढचे होते! या विषयातील त्यांचा अधिकार सांगायचा तर त्यापैकी एका वक्त्याने पुण्यातील नद्यांवर १९६० साली पीएचडी केली होती जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता! हे सर्वजण पुण्यातल्या नद्या, डोंगर व आजूबाजूच्या परिसराचा गेली ६० वर्षे अभ्यास करत आहेत व हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या तुलनेत माझा पुण्याशी संबंध बराच नंतरचा म्हणजे १९८६ सालापासूनचा आहे व मी नदी केवळ प्रदूषित स्वरुपातच पाहिली आहे! त्यामुळे मी सर्वप्रथम या सगळ्या दिग्गजांचं काय म्हणणं आहे हे ऐकण्याचा त्यानंतर या विषयावर स्वतःची बाजू मांडण्याचा निर्णय घेतला!

ज्या व्यक्ती इथे ७० वर्षांहूनही अधिक काळ राहात आहेत त्यांच्याकडून शहराच्या जैवविविधतेविषयी जाणून घेणं अतिशय रोचक होतं; शहराच्या गतकाळात गेल्यासारखं वाटत होतं! यातून काही रोचक तथ्ये मला समजली की, १९४० साली नदीचे पाणी गाळलेल्या पाण्याइतके स्वच्छ होते व लोक थेट नदीतील पाणी पीत असत, १९६० साली नदीतील सजीवांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा नदीत माशांच्या जवळपास ७० प्रजाती होत्या. सध्या नदीमध्ये माशांच्या जेमतेम २ प्रजाती उरल्या आहेत, ज्यापैकी बहुतेक तिलापिया हे आफ्रिकी प्रकारचे मासे आहेत जे स्थानिक नाहीत व त्यांनी इतर सर्व माशांच्या प्रजातींना मारुन टाकले आहे. नदीच्या काठाने ऑर्किडची झाडी होती व जैवविविधता इतकी समृद्ध होती की शहरापासून ते विठ्ठलवाडी म्हणजे सिंहगड रोडपर्यंत जवळपास २०० विविध प्रकारची रोपे, वेली, झाडे होती; आता नदीकाठी सगळीकडे जलपर्णीची वाढ झालेली दिसते, क्वचितच कुठेतरी झाडेझुडुपे आढळतात, ऑर्किड तर कुठेच दिसत नाहीत! सर्वात वाईट बाब म्हणजे नदीवर कुणाचे नियंत्रण आहे हे कुणालाच माहिती नाही, तिची देखभाल करणे हे जलसिंचन विभागाचे काम आहे असे महापालिका म्हणते तर जलसिंचन विभाग ते महापालिकेचे काम असल्याचा दावा करतो! खवले मांजर (मुंगी भक्षक), मुंगूस, घोरपड, विविध प्रकारचे साप, मोर, ससे व हरिणे असे प्राणी किंवा पक्षी शहरात सगळीकडे भरपूर दिसत. माकडांच्या टोळ्या दिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात फिरत असत व संध्याकाळी कात्रज किंवा सिंहगडसारख्या जंगली भागात परत जात असत. त्यांचे वास्तव्य असलेले शहरातील तसेच शहराबाहेरील भागांना जोडणा-या  रस्त्यांलगतचे मोठ्या झाडांचे लांबलचक पट्टे तोडून टाकण्यात आले, त्यामुळे त्यांच्या शहरातील खेपाही संपल्या ! पुण्यात व आजूबाजूच्या परिसरात जवळपास ४० प्रकारचे बेडूक होते आता तुम्हाला फारफार तर ३ किंवा ४ प्रकारचे पाहायला मिळतात ते देखील पावसाळ्यामध्ये कारण त्यांना प्रजननासाठी जागाच उरलेली नाही! नदीला नियमितपणे पूर येत असे व आजच्या मॉर्डन कॉलेजपर्यंत पाण्याची पातळी वाढत असे! रात्रीचे आकाश स्वच्छ असायचे व उघड्या डोळ्यांनी हजारो तारे पाहता यायचे व आता आपल्याला केवळ धुरकट व अंधूक चंद्र दिसतो! वरील वर्णन वाचले की आपण एखाद्या पुरातन शहराविषयी विस्मरणात गेलेल्या साम्राज्याप्रमाणे बोलतोय असं वाटेल; हे साम्राज्य आहे जैवविविधतेचं! वक्त्यांपैकी एक, वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या,त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना नदीकाठी भटकंती करायला घेऊन जात व निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा विषय शिकवत असत हे आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी आले, आता मात्र  या सर्व विविध प्रकारच्या वनस्पती नष्ट झाल्या आहेत! मी जेव्हा शहरातली जैवविविधता नष्ट झाल्याचे नमूद केले तेव्हा त्यावर सर्वजण सहमत झाले! हे अतिशय गंभीर नुकसान आहे व दुर्दैवाची बाब अशी की आजच्या पिढीला त्यांनी काय गमावले आहे हेच समजत नाही! किंबहुना बरेच जण प्रश्न विचारतात की त्यात काय मोठेसे, आपण प्रगती केलेली नाही का, काही वेली व फुलझाडांपेक्षा विकास अधिक महत्वाचा नाही का, आपल्या आजूबाजूला साप व माकडे दिसली नाही तर काय मोठासा फरक पडतो, आपल्यासमोर यापेक्षा अधिक चांगले विषय नाहीत का ज्याविषयी आपण वादविवाद करु शकू! ज्या व्यक्तिने निसर्ग अनुभवलेला नाही किंवा ती निसर्गासोबत राहिलेली नाही तिला जैवविविधतेचे महत्व पटवून देणे अतिशय अवघड आहे हे खरे आहे! कारण आजकालची गरज किंबहुना हाव वेगळी आहे, आपण केवळ आपल्या घरामध्ये कोणत्या सोयी सुविधा आहेत, आपल्या इमारतीची उंची व आपल्या कार्यालयातील वातावरणाचा विचार करतो. आपल्या कार व त्यासाठी पुरेसे इंधन हवे असते, अर्थात कार लावायला जागा व चालवायला रस्ते हवे असतात. आपल्याला आपल्या नळांना पाणी हवे असते, ते जोपर्यंत मिळतंय तोपर्यंत ते कुठून येतंय याची आपल्याला चिंता नसते! आपले रस्ते नदी काठांवर अतिक्रम करताहेत, तिथली हिरवाई नष्ट करताहेत, नदीत आपण फेकत असलेल्या कच-यामुळे शेकडो पक्षी व माशांचे वसतीस्थान नष्ट होत आहे याची आपल्याला काळजी नसते. आपण स्वतःला शहाणे व हुशार म्हणतो व त्याचवेळी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक संसाधनांवर केवळ आपलाच हक्क आहे असे आपल्याला वाटते! आपण आपल्या हव्यासापोटी इतके आंधळे झालो आहोत की विकास म्हणजे इतर प्रजाती नष्ट करणे नाही हे आपण विसरलो आहोत! जेव्हा आपण केलेल्या नुकसानाची जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा आपण एकमेकांकडे बोटे दाखवतो! अर्थात या परिसंवाद काही चांगली तथ्येही सांगण्यात आली, की पुणे व आसपासच्या परिसरात मोठ्या झाडांच्या सर्वाधिक म्हणजे जवळपास ५०० प्रजाती आढळतात त्यामुळे या जैवविविधतेच्या बाबतीत पुणे देशातील बहुतेक सर्वात समृद्ध शहर आहे! १९४० साली शहरात केवळ १४ उद्याने होती ही संख्या आता ११४ वर गेली आहे! मात्र हे पुरेसे नाही, जोपर्यंत आपण काही ठोस सकारात्मक पावले उचलत नाही तोपर्यंत जैवविविधतेच्या बाबतीत भविष्यात काळोखच आहे हे कटू सत्य आहे व त्यासाठी कुणीतरी पुढे येऊन जैवविविधतेची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे! तो कुणीतरी एखादा सरकारी विभाग किंवा स्वयंसेवी संस्था नाही तर आपल्या सर्वांमध्येच आहे!

हे शहर आधी काय होते व आता काय झाले आहे हे ऐकल्यानंतर, क्षणभर मी निःशब्द झालो; अर्थात मी देखील या शहरात आलो तेव्हा थोडीफार जैवविविधता पाहिली आहे, जवळपास तीस वर्षांपूर्वी ते राहण्यासाठी नक्कीच अधिक चांगले होते. मात्र आपल्या या शहराला लोकसंख्या, प्रदूषण व नियोजनातील अपयश हे शाप मिळालेले आहेत, त्यामुळे शहरातील जैवविविधता पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळाल्या, तेव्हा मी फक्त एवढेच म्हणू शकलो, कीहोय, जैवविविधतेच्या पातळीवर शहराचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी मी सुद्धा जबाबदार आहे व एक बांधकाम व्यावसायिक म्हणून ती पूर्ववत व्हावी म्हणून मी माझी भूमिका पार पाडली पाहिजे!” आपले निसर्गावर कितीही प्रेम असले, आपण पर्यावरणाचा कितीही आदर करत असलो तरीही आपण झाडावर किंवा उघड्यावर राहू शकत नाही. मात्र आपण आजूबाजूच्या जैवविविधतेचे किती नुकसान केले आहे व आपण त्याची भरपाई कशी करु शकतो हे विचारात घेऊन आपल्या इमारती बांधू शकतो. निसर्गामध्ये संगणकासारखी परत मागे अशी काही आज्ञा नसते, आपण जे काही नष्ट केले ते हजारो इथे होते, आपण मात्र काही वर्षातच ते नष्ट केले! आपण ज्या भल्या मोठ्या नाल्याला नदी म्हणतो तिचा प्रवाह सामान्य होण्यासाठी व लोकांनी थेट तिचे पाणी पिण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतील त्यानंतर नदीत व तिच्या काठाने जीवन निर्माण होईल; मात्र आपण किमान ही प्रक्रिया आज व माझ्यापासून सुरु करु शकतो! मी माझ्या इमारती बांधताना जास्तीत जास्त झाडे लावू शकतो व ती जगवू शकतो. आणखी एक महत्वाची बाब म्हणजो लोकांना जैवविविधतेचे रक्षण करण्यात त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करुन देणे, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी नक्कीच माझ्या ग्राहकांना ती करुन देऊ शकतो. मी ब-याचदा जेव्हा माझ्या घराजवळ नदीवरील पुलावरुन चालत जातो तेव्हा तिथे नदीत कचरा विशेषतः घरातील निर्माल्य टाकू नये असे लोकांना आवाहन करणारा फलक दिसतो. मात्र दररोज कुणीतरी त्या फलकाखाली उभा राहून नदीत कचरा फेकताना मी पाहतो. हे कचरा  टाकणारे काही बांधकाम व्यावसायिक नाहीत, ते तुमच्या-आमच्यासारखेच सामान्य नागरिक आहेत व साध्याशा कृतीने अनेक प्रजातींचे घर असलेल्या जलाशयाचे नुकसान करत आहेत. मात्र त्यांना त्यांच्या लहानशा कृतीचा परिणाम जाणवत नाही व त्यांना हे कुणी सांगायला जात नाही! मला असे वाटते एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी केवळ माझ्या इमारतींचाच नाही तर निसर्गाचे संवर्धन करण्याचाही प्रसार केला पाहिजे व हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे माझी स्वतःची कृती!
हे शक्य व्हावे यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अधिकाधिक लोकाभिमुख व्हायला पाहिजे व कोणत्याही प्रकल्पाचे नियोजन करतानाच साने मॅडम किंवा महाजन सरांसारख्या व्यक्तिचा सल्ला घेतला पाहिजे. पर्यायवरणवाद्यांनीही बांधकाम व्यावसायिकांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे कारण शेवटी बांधकाम व्यावसायिकच घरे बांधणार आहेत, त्यामुळेच त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा बदल शक्य होणार नाही! बांधकाम व्यावसायिक व पर्यावरणवादी एकत्र येऊ शकतील अशा एखाद्या सामाईक मंचाशी नितांत गरज आहे कारण त्यातच जैवविविधतेचे भविष्य आहे. यामध्ये माध्यामांनीही आपली भूमिका पार पाडली पाहिजे अशा प्रयत्नांना किंवा परिसंवादांना पहिल्या पानावर कधीच प्रसिद्धी मिळत नाही, असे असेल तर मग सामान्य माणूस या समस्यांविषयी कसा जागरुक होईल? प्रत्येक वृत्तपत्रामध्ये क्रीडा किंवा अर्थविषयक पानांसारखे हरित पान का नसावे, ज्यामध्ये विविध व्यक्तिंनी हिरवाईसाठी केलेल्या प्रयत्नांविषयी माहिती देता येईल, प्रसिद्धी देता येईल! जैवविविधतेचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण कुठेतरी जबाबदार आहे, मग ते प्रत्यक्षपणे असेल किंवा अप्रत्यक्षपणे. बरेच जण म्हणतील मी कसा काय जबाबदार आहे कारण मी कधीच नदीत कचरा फेकत नाही, मी कधीही झाड तोडलेले नाही किंवा एखादी चिमणी मारलेली नाही! मात्र काहीही न करुन आपली जबाबदारी संपते का, मी जैवविविधचे नुकसान होऊ नये म्हणून काय केलेले नाही याच्या बढाया मारण्यापेक्षा तिचे रक्षण करण्यासाठी मी काय केले आहे हे स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे! स्वतःला प्रश्न विचारा की मी किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केला आहे का. तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला विचारा तो त्याच्या इमारती बांधताना जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी काय करतो. तुमच्या लोकप्रतिनिधींना विचारा नाल्याचे काँक्रिटीकरण करण्याऐवजी त्याच्या बाजूने झाडे व रोपे का लावण्यात आली नाहीत. महापालिकेच्या क्षेत्र अभियंत्यांना विचारा रस्त्यांच्या दुतर्फा अजिबात माती मोकळी न सोडता संपूर्ण फरसबंदी का करण्यात आली आहे, ही माती पावसाचे पाणी शोषण्यासाठी तसेच चिमण्यांना धुलीस्नान करण्यासाठी वापरता आली असती. तुम्हाला आजूबाजूच्या निसर्गाविषयी काय वाटते याविषयी फेसबुकसह सर्व माध्यमांवर लिहा व त्याविषयी आपल्या काय जबाबदा-या आहेत याची जाणीव प्रत्येक व्यक्तिला करुन द्या. निसर्गाच्या संवर्धानासाठी ज्या गोष्टी करायला हव्या होते असे तुम्हाला वाटते, मात्र ते करण्यात आलेले नाही त्याविषयी किमान आवाज उठवायला सुरुवात करा!

मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या जैवविविधतेमुळे आपले आयुष्य रंगीत व जगण्यासाठी योग्य होते; ते शब्दांमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण त्यासह जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे म्हणतात की प्रत्येक प्रजातीचे सत्तर लाख वर्षांचे जीवनचक्र असते, व मानव जातीने वीस लाख वर्षे आधीच पूर्ण केलेली आहेत, मात्र आपण ज्याप्रकारे इतर प्रजातींची जीवन चक्रे नष्ट केलेली आहेत त्यानुसार ही वीस लाख वर्षे सत्तर लाख वर्षांएवढी किंवा त्यापेक्षा अधिक आहेत व या प्रक्रियेमध्ये आपण स्वतःचे जीवनचक्रही नष्ट करत आहोत! त्यामुळेच आता आपल्या हातात पन्नास लाख वर्षे नाहीत, म्हणूनच आपण निसर्गाचे संवर्धन आजच केले पाहिजे; आपल्याला हे मूलभूत सत्य समजले तरच आपण स्वतःला माणूस म्हणवून घेऊ शकू नाहीतर डायनासॉरना जितकी वर्षे जगता आले तितकी वर्षे जगण्याची संधीही आपल्याला मिळणार नाही! शेवट आपल्या कल्पनेपेक्षाही वाईट असेल सगळीकडे कोणताही रंग किंवा सुवास नसेल, फक्त काळे पांढरे रंग आणि धूर असेल! आपण जगलो तरीही जगण्यासाठी योग्य काहीही शिल्लक नसेल!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



Tuesday, 3 February 2015

गोष्ट एका स्वच्छ्तागृहाची !


























तुमचा देश तुमच्यासाठी काय करु शकतो हे विचारु नका; तुम्ही तुमच्या देशासाठी काय करु शकता हे विचारा.” …जॉन एफ. केनडी

जॉन फित्झगेराल्ड केनडी, यांना लोक जॅक केनडी किंवा केवळ जेएफके म्हणून ओळखतात. जानेवारी १९६१ ते नोव्हेंबर १९६३ साली हत्या होईपर्यंत ते अमेरिकेचे ३५वे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वयाच्या ४३व्या वर्षी, अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले ते दुसरे सर्वात तरुण (थिओडर रुझवेल्ट यांच्यानंतर) अध्यक्ष होते, व २०व्या शतकात जन्मलेले पहिले अध्यक्ष होते. आजतागायत, केनडी हे एकमेव रोमन कॅथलिक अध्यक्ष व पलित्झर पुरस्कार विजेते अध्यक्ष आहेत. जेएफके हे आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय व सर्वात वादग्रस्त अमेरिकी अध्यक्षांपैकी एक असल्यामुळे त्यांची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही. मात्र त्यांचे वरील विधान ऐतिहासिक तसेच प्रेरणादायी आहे; कारण सरकार किंवा देश नावाच्या व्यवस्थेकडून आपण जेव्हा काही अपेक्षा करतो तेव्हा आपलेही त्या व्यवस्थेप्रती काही कर्तव्य आहे हे आपण नेहमी विसरतो! त्यामुळे वरील अवतरण ख-या अर्थाने डोळे उघडते! आम्ही वर्षभरापूर्वी सुरु केलेल्या एका लहानशा उपक्रमासंदर्भात मला वरील विधान आठवले जो आता पथदर्शी मानला जात आहे व जेएफके यांचे विधान त्या उपक्रमाने सार्थ ठरवले आहे. आम्ही तीन वर्षांपूर्वी पुण्यातील एक सार्वजनिक स्वच्छतागृह दत्तक घेतले त्यासंदर्भात मी बोलत आहे.

मला प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं की आम्ही जे काही केलं ते काही अतिशय महान होतं असं मला वाटत नाही किंवा त्यामुळे माध्यमांनी किंवा स्थानिक प्रशासकीय संस्था किंवा शासनकर्त्यांनी त्याची दखल घ्यावी असं नाही मात्र काही गोष्टी सहज घडतात. ते केवळ एका लहानशा कंपनीने चांगल्या हेतूने आपला समाज, आपला परिसर अधिक चांगला बनविण्यासाठी उचललेले एक पाऊल होते! ज्यांना याची पार्श्वभूमी माहिती नाही त्यांच्यासाठी थोडीशी आधीची माहिती किंवा फ्लॅशबॅक देतो

चार वर्षापूर्वी मी खांद्याला दुखापत झाल्यामुळे नेहमीसारखं सकाळी बॅडमिंटन खेळू शकत नव्हतो, त्यामुळे मित्रांशी चहासोबत गप्पाटप्पा मारायला वैशालीत जात असे. माझ्या घरापासून ते एफसी रोडवरील वैशालीपर्यंत, मी कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौक ओलांडून जात असे. या ठिकाणचे एक सार्वजनिक स्वच्छ्तागृह अतिशय दयनीय अवस्थेत होती, त्या  स्वच्छतागृहाच्या  बांधकामाचीही तशीच अवस्था होती व वापरही तसाच होता; तिथून इतकी दुर्गंधी यायची की रस्ता ओलांडताना तिथून जावसंही वाटत नसे. रहदारीच्या वेळी त्या स्वच्छ्तागृहच्या बाजुने रस्ता ओलांडणं ही अतिशय मोठी अडचण होती. या परिसरातल्या रहिवाशांनाही मनपा कडे तक्रार करुन हे स्वच्छ्तागृह हटविण्याची मागणी केली होती कारण तिचा उपयोग होण्यापेक्षा ती जास्त त्रासदायकच ठरली होती! त्यामुळे एक दिवस मी त्यासंदर्भात काहीतरी करायचं ठरवलं. मी मनपा मधल्या माझ्या काही मित्रांना संपर्क केला व त्या स्वच्छ्तागृहाची इतकी वाईट अवस्था का आहे अशी विचारणा केली? अपेक्षेप्रमाणे, निधीची कमतरता, अपुरे मनुष्यबळ अशाप्रकारची कारणे देण्यात आली; म्हणून मी विचारले की मी तिची देखभाल केली तर? मला खात्री आहे की यामुळे मी वेडा आहे किंवा विनोद करतोय असंच त्यांना वाटलं असेल, मात्र मी गांभीर्याने बोलतोय असे म्हटल्यावर व माझा निर्धार पाहिल्यानंतर संबंधित अधिकारी म्हणाले की मला त्यासाठी अर्ज करावा लागेल कारण कुणा व्यक्तिने किंवा संस्थेने आतापर्यंत असे केलेले नाहीम्हणजे आत्तपर्यंत कुणीही स्वतःहून अचानक सार्वजनिक स्वच्छ्तागृह दत्तक घेण्यासारख्या विचित्र गोष्टीची विनंती केलेली नाही

मी तात्काळ माझ्या कार्यालयातून त्या सार्वजनिक स्वच्छ्तागृहाची मोफत, अगदी कोणती जाहिरातही न करता देखभाल करेन असा प्रस्ताव पाठवला! त्यावेळी मला माहिती नव्हतं की मी त्यासाठी काय व कसं करणार आहे, त्यामुळे मी माझ्या काही सहका-यांसोबत एक छोटीशी बैठक घेतली. माझ्या सहका-यांना त्यावेळी ही कल्पना म्हणजे बॉसच्या डोक्यातलं नवीन खूळ असंच वाटलं असेल मात्र त्यांनी मान्य केलं कारण शेवटी बॉस हा बॉस असतो! सार्वजनिक स्वच्छ्तागृह सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण किमान तिची डागडुजी करुन तिथे एक पूर्णवेळ सफाई कर्मचारी ठेवू शकतो असे आम्ही ठरवले! मात्र असा अर्ज करुन जवळपास तीन महिन्यांनंतरही मनपाच्या अधिका-यांकडून काहीच उत्तर मिळाले नाही. मी रोज त्या स्वच्छ्तागृह वरुन चौक ओलांडून जात होतो, तिची देखभाल करण्याचा विचार दिवसेंदिवस बळकट होत चालला होता!

त्यानंतर एक दिवस एका कार्यक्रमात मला संदीप खर्डेकर व खासदार वंदना चव्हाण भेटल्या. सार्वजनिक वर्तनासंदर्भातील समस्यांविषयी अनौपचारिक चर्चेदरम्यान मी त्या सार्वजनिक स्वच्छ्तागृह संदर्भात केलेल्या अर्जाविषयी व मला मनपाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दोघे जण लगेच कामाला लागले व मला वंदना दीदींकडून कॉल आला की महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात याविषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. खासदारांनीच हस्तक्षेप केल्याने सूत्रे वेगाने हालली व मला श्री सुरेश जगताप, उप आयुक्त, घन कचरा व्यवस्थापन यांच्याकडून पत्र आले की आम्ही त्या स्वच्छ्तागृहाची देखभाल करु शकतो मात्र त्यावर कोणतीही जाहिरात करता येणार नाही तसेच मनपाचे प्रभाग पातळीवरील आरोग्य निरीक्षक वेळोवेळी त्याची तपासणी करतील. आम्ही त्या प्रभागाच्या नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांना संपर्क केला व त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आम्ही त्या स्वच्छ्तागृहाची प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी गेलो तेव्हा आणखी एक अडचण समोर आली; तिथे पाणी पुरवठाच होत नव्हता! मी माधुरी मॅडमना सांगितलं की मी एक लहानशी टाकी बसवू शकतो मात्र दररोज तिथे पाणी कुठून आणू, रोज टँकरनी पाणी आणणं अशक्य होतं. यावर त्या म्हणाल्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था होईल व त्यांनी खरंच आठवडाभरात ती केली. आता मूलभूत सगळ्या गोष्टी तिथे होत्या, व बांधकाम क्षेत्रातच असल्याने डागडुजी करणं फारसं अवघड नव्हतं. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात टाईल्स बसविणे, नळजोडणी, रंग-रंगोटी, सिन्टॅक्सची छोटी टाकी बसविणे इत्यादी कामे झाली.

आणखी एक गोष्ट म्हणजे, स्वच्छ्तागृहाच्या आजूबाजूची जागा व्यवस्थित वापरली गेली पाहिजे असे मला वाटत होते, कारण तिचे रुपांतर कचरापेटीत झाले होते व तिथे दारुच्या बाटल्यांपासून ते विविध प्रकारचा कचरा टाकला जायचा! म्हणून तिथे आम्ही फुलांचा वाफा फुलवायचं ठरवलं व पुन्हा जगताप सर व माधुरी मॅडमकडून परवानगी घेतली. आम्ही रातराणीसारखी फुलझाडे लावली म्हणजे तिच्या वासामुळे वातावरण आणखी चांगले वाटेल व त्याचा खरोखर उपयोग झाला. त्यानंतर आम्ही सफाई कर्मचा-याचा शोध घ्यायला सुरुवात केली, ज्याची फारसं आकर्षक नसलेलं काम करायची इच्छा असेल कारण त्याला सर्वप्रकारच्या लोकांना तोंड द्यावं लागणार होतं. आम्हाला एक शिक्षण सोडलेला मात्र चुणचुणीत मुलगा मिळाला, त्याला महिन्याला दहा हजार पगार द्यायचं ठरवण्यात आलं. आम्ही त्याला काम समजावून सांगितलं, साफसफाईसाठी साहित्य दिलं व थोडंसं प्रशिक्षणही दिलं. दर वीस मिनिटांनी तो स्वच्छ्तागृह स्वच्छ करेल तसंच लोकांनाही ते स्वच्छ ठेवण्याच्या व तिचा गैरवापर न करण्याच्या सूचना देईल असं ठरवण्यात आलं. यामुळे आणखी एक समस्या समोर आली की लोक त्याचं का ऐकतील? म्हणून आम्ही संबंधित अधिका-याच्या परवानगीने एक लहानसा फलक आतमध्ये लावला की या स्वच्छ्तागृहाची देखभाल संजीवनी करत आहे व इथल्या परिस्थितीसंदर्भात काहीही मदत हवी असल्यास आमच्या दोन कर्मचा-यांचे क्रमांक देण्यात आले होते. आम्ही स्वच्छ्तागृहाच्या बाजूने थोडी शोभेची झाडे लावली, त्यानंतर तिचा संपूर्ण चेहरा मोहराच पालटला.

मी मनपाला हे स्वच्छ्तागृह दत्तक घेण्याविषयी अर्ज केल्यापासून ते हे सर्व होईपर्यंत साडेचार महिने गेले, देखभालीपेक्षा दत्तक घेणे हा शब्दप्रयोग अधिक समर्पक वाटतो; व २८ जानेवारी १४ रोजी आम्ही सर्व संबंधितांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभाने सुरुवात केली. आम्ही त्याविषयी फारशी वाच्यता केली नाही कारण आधी हा प्रयोग कसा चालतोय ते पाहू मग आपण जे आश्वासन दिले ते आपल्याला पूर्ण करता येते का हे पाहू असा विचार केलाआम्ही तिथे एक प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी वही ठेवली जे लोकांना सुरुवातीला थोडे विचित्र वाटले कारण कोणत्याही सार्वजनिक स्वच्छ्तागृहा तुम्हाला सफाई कर्मचारी तुम्हाला हे स्वच्छ्तागृह कसे वाटले असे विचारताना दिसतो?” मात्र तिथल्या परिस्थितीविषयी तसेच आमच्या प्रयत्नांविषयी चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या व आमचा आत्मविश्वास वाढलादिवस भुर्रकन उडून गेले व अचानक जानेवारीच्या दुस-या आठवड्यात १५ तारखेला मला आठवण झाली की या उपक्रमाला जवळपास एक वर्ष झालं आहे व मी संदीप खर्डेकर यांना संपर्क केला, ते म्हणाले हा वर्धापन दिन साजरा का करु नये? २८ जानेवारी १५ रोजी आम्ही सगळे त्या ठिकाणी जमलो त्यामध्ये पुण्याचे माननीय महापौर दत्ताजी धनकवडे, आमदार मेधा कुलकर्णी, वंदना ताई व माधुरी मॅडम व सुरेश जगताप असे सर्वजण उपस्थित होते. या परिसरातल्या दुकानदारांनी व नागरिकांनी आधी या स्वच्छ्तागृहाचा किती त्रास व्हायचा आणि आता ही किती चांगली सोय झाली आहे अशा प्रतिक्रिया नोंदवल्या व माझ्या मते हीच आमच्या कामाची खरी पावती होती. आता असा निर्णय घेण्यात आला आहे की ही योजना सगळीकडे राबवायची व अधिकाधिक लोकांना/कंपन्यांना पुढे येऊन यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. माझे मित्र विक्रांत वर्तक व आदित्य जावडेकर यांनी संयुक्तपणे महिलांच्या स्वच्छ्तागृहाच्या देखभालीचा खर्च उचलला आहे. या एका स्वच्छ्तागृहाच्या देखभालीसाठी महिन्याला एकूण १५,००० रुपये खर्च येतो असा आम्ही हिशेब काढला, मला विश्वास वाटतो की एवढा खर्च आपण नक्कीच देऊ शकू! या खर्चातून सफाईचं काम करणा-या मुलाला त्याचं शिक्षण पूर्ण करता येईल हे वेगळं सांगायला नको!

मित्रांनो आम्ही राबवलेल्या वेगळ्या उपक्रमाची जाहिरात करण्यासाठी मी ही माहिती इथे देत नाही; आम्ही केवळ आमच्या मनात जे आलं ते करत गेलो व आम्ही ते करु शकलो कारण आम्ही आमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला. असं म्हणतात की एखाद्या घराचं स्वयंपाकघर तुम्हाला त्या घराची संस्कृती सांगतं; कोणत्याही शहरातील सार्वजनिक शौचालय तुम्हाला त्या शहराची संस्कृती सांगतं, आता आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की आपल्या शहराची संस्कृती काय आहेआपण स्वतःलापूर्वेचं ऑक्सफर्ड किंवाराज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणवतो व आपल्या सार्वजनिक शौचालयांची स्थिती पाहा; बहुतेकांची जशी परिस्थिती आहे ती आपल्यासाठी शरमेची बाब आहे! आपल्या शहराला भेट देणा-या कोणत्याही पाहुण्याची हिंमत झाली व त्याने सार्वजनिक शौचालय वापरलेच तर त्याचे आपल्या शहराविषयी काय मत बनेल? आपल्यापैकी अनेकांनी विदेशी प्रवास केला आहे व तिथल्या स्वच्छतेविषयी आपल्याला फार कौतुक वाटते, आपण कधी विचार केला आहे का की तिथे सार्वजनिक ठिकाणे कोण स्वच्छ ठेवते; दुसरे कुणी नाही तरच लोकच ती स्वच्छ ठेवतात! शेवटी लोक म्हणजे तरी कोण आपणच, जे इथे राहतो! जर आपणही योगदान देऊ शकत असू तर आपण प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर का अवलंबून राहायचंएखादे दिवशी आपल्या घराची साफसफाई करणारा माणूस आला नाही तर आपण सरकारकडून कुणीतरी साफसफाई करण्यासाठी येण्याची वाट पाहात बसतो का? याचप्रकारे रस्ते, शौचालये किंवा कोणतीही सार्वजनिक ठिकाणेही आपलीच आहेत व ती चांगली व्हावीत यासाठी आपण नक्कीच योगदान देऊ शकतोयामुळे किती रोजगार निर्मिती होईल हे सुद्धा पाहा, केवळ पुण्यातच अशी जवळपास आठशे सार्वजनिक शौचालये आहेत व ती अपुरीच आहेत हे सत्य आहे! आपण आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी वाढदिवसांपासून ते लग्नांपर्यंत कितीतरी गोष्टींसाठी पैसे खर्च करतो मात्र आपण ज्या समाजाचा एक भाग आहोत त्यासाठी मात्र आपण थोडाफार खर्च करायला विसरतो! केवळ स्वच्छ्तागृहाची देखभालच नाही तर आपण तिथे जाण्याचा रस्ता दाखविणारे फलकही लावू शकतो. यामुळे अधिकाधिक लोकांना त्याविषयी समजेल व इकडे तिकडे घाण करण्याऐवजी ते त्या सुविधेचा वापर करतील! इथे शासनकर्त्यांकडून व स्थानिक प्रशासकीय संस्थांकडून एक लहानशी अपेक्षा आहे की त्यांनी अशा संकल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे म्हणजे त्यांच्यावरील कामाचा भार थोडा कमी होईल. लक्षात ठेवा कोणतीही व्यवस्था सामान्य माणसाचे जीवन अधिक चांगले बनविण्यासाठी आहे व सामान्य माणूस स्वतः या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार असेल तर आणखी काय पाहिजे!

यावर्षी हे स्वच्छतागृह दत्तक घेण्याला तीन वर्षे पूर्ण झाली; पण ही केवळ एका स्वच्छ्तागृहाची गोष्ट झाली, मात्र ही प्रत्येक स्वच्छ्तागृहाची गोष्ट होऊ शकते; कोणताही प्रवास कितीही लांबचा असला तरी त्या दिशेने एक पाऊल उचलल्यावर तो सुरुच होतो. हा प्रवास करण्यापासून इतर कुणी नाही तर आपणच स्वतःला रोखून धरत असतो! त्यामुळे व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडत बसण्यापेक्षा तिचा एक भाग व्हा, असे झाले तरच आपण एक समाज होऊ,  नाही तर आपण केवळ बिनडोक प्राण्यांचा एक कळप होऊ जो स्वतःच आपल्या भविष्याचा घात करेल; आता काय व्हायचं हे तुमच्या हातात आहे!


संजय देशपांडे
 smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स





Thursday, 29 January 2015

माझा आकाशाचा तुकडा !





















कोण म्हणतं तुम्हाला हातात चंद्र घेता येत नाही? आज जेव्हा मखमली आकाशात चंद्र उगवेल चांदण्या चमकू लागतील, तुमच्या खिडकीतून बाहेर पाहा, त्यानंतर तुमचा हात उंच करा व तुमची बोटे त्या तेजोवलयाच्या भोवती ठेवा. अगदी बरोबर हे किती सोपं होतं!” ………व्हेरा नझारियन

व्हेरा नझारियन ही एक अमेरिकी-रशियन लेखिका असून काल्पनिक, वैज्ञानिक कादंबऱ्या व इतर नवलाईच्या कादंबऱ्या लिहीते, ज्यामध्ये मिथ पंक, ऍन आर्टिस्ट यांचा समावेश आहे, नॉरिलाना बुक्स ही तिची प्रकाशन संस्था आहे. तिच्या वरील अवतरणामध्ये तिने आकाशाच्या अदभुतपणाचे  वर्णन केले आहे, मात्र ती काल्पनिक नाही तर निसर्गाची जादू आहे जी आपल्यापैकी कुणीही आपल्या खिडकीतून अनुभवू शकतो. मात्र विशेषतः पुण्यासारख्या महानगरात राहणाऱ्या लाखो लोकांसाठी स्वतःचं आकाश केवळ कल्पनेतच उरले आहे. नेहमीप्रमाणे बरेच जण विचार करत असतील की हा विषय कुठल्या दिशेने चालला आहे, अलिकडेच मी माझ्या बहिणीशी गप्पा मारत होतो. पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत तिची एक चांगली सदनिका आहे, तरीही ती बदलण्यासाठी माझ्या मागे लागली आहे, त्यासाठी ती मला फक्त एवढेच म्हणाली की, “संज्या, मला मोठी गच्ची असलेली सदनिका हवी आहे जिथून मला आकाश पाहता येईल!. एवढ्या एकाच कारणासाठी मला माझी सदनिका बदलायची आहे कारण तिथे चांगल्या ठिकाणापासून ते सुखसोयींपर्यंत सर्व काही आहे मात्र आकाश दिसत नाही!” तिच्या शब्दांमुळे नाही तर आकाशाविषयीच्या तिच्या भावनांमुळे माझे विचारचक्र सुरु झाले. आकाश दिसणे हे एखाद्या घरासाठी इतके महत्वाचे आहे का? आम्ही अशा एका ठिकाणाहून आलो आहोत जेथे अपार्टमेंट, संकुल वगैरे ऐकिवातच नव्हते व बहुतेक घरे एक मजली होती व त्यातून आकाश नेहमी दिसायचे, मग ते अंगणातून असेल किंवा परसातून असेल किंवा घराच्या गच्चीतून असेल! मला इथे प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की मला आंगण किंवा सज्जा या शब्दांना समानार्थी शब्द सापडले नाहीत, केवळ स्थापत्यशास्त्राच्या भाषेत ते समजावून सांगण्यापेक्षाही एखाद्या व्यक्तिने ते अनुभवावे लागतात! या जागांमुळे आकाश नेहमी तुमच्या नजरेच्या टप्प्यात असायचे, मला माझे बालपण आठवते व मी आकाशाखाली किती वेळ घालवला हे जाणवते! मी पुण्यासारख्या महानगरामध्ये नक्कीच या गोष्टीला मुकतो व या गोष्टीला मुकणारा मी एकटा नाही. आपल्यापैकी बहुतेकांच्या लहानपणी स्वच्छ सूर्यप्रकाशात आकाशाकडे बघत राहण्याच्या आठवणी असतील, विस्तीर्ण निळाशार आकाशातून पांढऱ्या धुराची रेघ सोडत जाणाऱ्या जेट विमानामुळे उत्तेजित झाल्याचे आठवत असेल, अशा व्यक्तिंना नक्कीच आकाशाची आठवण येत असेल! आता आपण दिवस रात्र काँक्रिटच्या किंवा काचेच्या भिंतीमध्ये असतो, कृत्रिम प्रकाश आपल्या सेवेसाठी असतो व आपल्याला आपल्या खिडकीतून बाहेर डोकविण्यासाठी व आकाश पाहण्यासाठी क्वचितच वेळ मिळतो, त्यामुळे आपल्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन काही वेळ आकाशाखाली घालवणे तर दूरचमला खरोखर इथे वाचकांना व माझ्या मित्रांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही जिथे राहता किंवा काम करता त्या इमारतीच्या गच्चीवर तुम्ही शेवटचे कधी गेला होता व दिवसा किंवा रात्री एक तासभर फक्त आकाश न्याहाळले? मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेकांना हे आठवायला अतिशय वेळ लागेल, मी सुद्धा असे क्वचितच करतो व माझ्या कार्यालयाला लागून तसंच माझ्या घरातल्या अभ्यासिकेला लागून एक लहानशी गच्ची आहे, त्यामुळे मी थोडासा वेळ आकाशाखाली घालवतो! त्यातून मला काय मिळते हे शब्दातून व्यक्त करता येणार नाही, ते अनुभवले पाहिजे! मला असे वाटते की हे आकाश पाहायला मिळावे यासाठीच घरात लहानशी का होईना पण एक गच्ची अतिशय महत्वाची आहे! आधुनिक जीवनशैलीमध्ये, आपले वैयक्तिक घर व खाजगी गच्ची मिळणे शक्य नाही मात्र आपल्याकडे बाल्कनी व घराला जोडून गच्ची असू शकते जिथून आपल्याला आपले आकाश पाहता येते. तरीही इमारतीच्या रहिवाशांसाठी एक सामाईक गच्ची असली पाहिजे जी सर्वांसाठी कायदेशीरपणे तसेच नैतिकपणे खुली असली पाहिजे! माझ्या लहानपणी आम्ही उन्हाळ्यात गच्चीवर झोपत असू, आम्ही जुन्या गावात राहत होतो जिथल्या गच्च्या सामाईक असत, त्यामुळे मित्रांशी गप्पाटप्पा मारत व भुताखेतांच्या गोष्टी करत आकाशाखाली झोपणे यात खरोखर गंमत होती! ते खऱ्या अर्थाने सामुदायिक जीवन होते व त्या जीवनाचा छप्पर किंवा गच्ची आणि आमचे आकाश हा महत्वाचा भाग होता!
 काळाच्या ओघात घराच्या रचनेसंबंधीच्या संज्ञा कशा बदलत गेल्या हे पाहणेही अतिशय रोचक आहे मात्र या जागांचा वापरही बदलला आहे का? नाही, असे मला स्वतःला वाटते. मी वीस वर्षांहून अधिक काळ घर बांधणीशी संबंधित आहे, विविध आकारांची व वेगवेगळ्या गरजांनुसार घरे बनवताना काही गोष्टी मात्र अजिबात बदललेल्या नाहीत. किंमती वाढताहेत, जागा कमी होतेय, नियमांचाही परिणाम होत असतो व काही वेळ आपल्याला असे वाटते की नियोजनातील एखादा घटक नामशेष होत चालला आहे किंवा मागे पडलाय मात्र तो तात्पुरता परिणाम असतो. शेवटी मानवी सभ्यता निर्माण झाल्याच्या काळापासून माणसाच्या त्याच्या घराविषयीच्या गरजा फारशा बदललेल्या नाहीत.

एका घरात तुम्हाला सुरक्षित, खुशाल व शांत वाटले पाहिजे तसेच ते दिसायलाही चांगले असले पाहिजे. आता टिकाऊ साहित्य, कुलुपे, दरवाजे इत्यादी वापरुन आपण घर सुरक्षित बनवू शकतो मात्र ते शांत व सुंदर कसे बनवायचे, म्हणजेच बाहेरील व्यक्तिंना ते कसे सुंदर दिसेल. इथे बांधकाम व्यावसायिकांना तसेच रचनाकारांना घर निसर्गाला अधिक पूरक बनविण्याचे महत्व समजू लागते, घरात राहणाऱ्यांना त्यातून शांतता मिळावी यासाठी तो एक खात्रीशीर मार्ग आहे, आपल्याला असे एक ठिकाण हवे असते की जेथून आपण असुरक्षित न वाटता निसर्गाशी एकरुप होऊ शकू, अशा वेळी सज्जा किंवा जिला आपण बाल्कनी म्हणतो ती समोर येते. मात्र नेमकेपणाने सांगायचे झाले तर ती बाल्कनी नाही; ती वरच्या मजल्यावर मुख्य घराला जोडून खुली जागा असते जिथून मोकळे आकाश पाहता येते जिथे तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात येता. ही खोलीला जोडून गच्ची असते इमारतीच्या छतावर नाही.

मध्य भारतामध्ये उन्हाळ्यात अतिशय उष्णता असते तिथे सज्जाला गवाक्ष म्हणजे बहुतेकवेळा दगडावर कोरलेली नक्षीदार जाळी लावलेली असते. यामुळे दोन हेतू साध्य होतात, एक म्हणजे उष्ण झळांपासून संरक्षण होते व दुसरे म्हणजे सज्जा कुणालाही दिसतही नाही, त्यामुळे घरातील बायका रहदारीतून येणाऱ्या जाणाऱ्यांचा किंवा आजूबाजूचा त्रास न होता ती वापरु शकतात. बऱ्याच हवेली किंवा वाड्यांना तळ मजल्यावर मध्यभागी चौक असे मात्र त्यालाही मर्यादा होत्या कारण तिथून आकाश दिसायचे मात्र उंच सज्जावर मिळते तशी वाऱ्याची झुळूक किंवा आजूबाजूचे दृश्य पाहायला मिळत नसे. अशा सुरक्षित सज्जाचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जयपूरचा हवामहल! विविध मजल्यांवर प्रत्येक सज्जाचे संरक्षण करण्यासाठी लाल दगडाची नक्षीदार जाळी बसविण्यात आली आहे ज्यामुळे अतिशय सुंदर दर्शनी भाग तयार झाला आहे. उत्तर भारतामध्ये अशा सज्जा प्रत्येक मजल्यावर तयार केल्या जातो  म्हणजे तुम्हाला कोणत्याही मजल्यावरुन सुंदर दृश्य दिसून शकते व हवेची झुळूकही मिळते. अनेक हवेल्या आजही दिमाखात या सज्जा व योग्य ठिकाणी त्यांचे रक्षण करणाऱ्या जाळ्या मिरवतात. बऱ्याचदा खिडकीसारखे ठिकाण तयार केले जाते जिथे तुम्ही बसून आजूबाजूचे दृश्य पाहू शकता. युरोपातही पुरातन काळापासून घर बांधताना बाल्कनी किंवा वरांडा नावाने अशा जागा तयार केल्या जात असत. बऱ्याचदा अशी ठिकाणे बोगनवेलींसारख्या शोभेच्या वेलींनी सुशोभित केली जातात, ज्यामुळे रंगीबेरंगी परिणाम मिळतो. किंबहुना अनेक कुटुंबामध्ये अशा ठिकाणी सकाळची न्याहारी किंवा रात्रीचे जेवण घ्यायची परंपरा आहे, ज्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात निवांतपणा मिळतो.

एफएसआय व बहुमजली इमारतींच्या नंतरच्या काळात बाल्कनी हा शब्द रुढ झाला त्याची संकल्पना सज्जासारखीच असली तरी बऱ्याच ठिकाणी आकाराच्या बाबतीत त्याची चुकीची अंमलबजावणी केली जाते, ती केवळ चार फूट असल्यामुळे तुम्हाला हालचाल करायला फारशी जागा उरत नाही तसेच आजूबाजूचे दृश्यही मर्यादित दिसते. जागेच्या कमतरतेमुळे बाल्कनीची जागाही खोलीतच घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा रचनाकारांना तुमचे स्वतःचे मोकळे आकाश कसे द्यायचे प्रश्न सतावू लागला व यातूनच जोडलेली गच्ची ही संकल्पना पुढे आली. अनेक जणांना वाटत असेल की ती विकासकांसाठी कमाईची आणखी एक संधी असते, मात्र मला असे वाटते की तुमच्या घराच्या आकाराच्या तुलनेत एक जागा असली पाहिजे जिथून मोकळे आकाश किंवा आजूबाजूचा परिसर दिसला पाहिजे, कारण अशाच ठिकाणी तुम्ही चार भिंतींच्या बंधनातून मुक्त होता व या मोकळेपणामुळे तुमचे मनही निसर्गासाठी खुले होते. ज्या घरात तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात येण्यासाठी जागा नाही ते कसले घर! दुर्दैवाने मी अशा गच्च्या विचित्र प्रकारे झाकल्या गेल्याचे किंवा बंद केल्याचे पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा मूळ उद्देशच अपयशी होतो, तसेच संपूर्ण इमारतीचे सौंदर्य खराब होते. लोक सुरक्षेच्या नावाखाली लोखंडी पत्रे किंवा फायबरचे पत्रे किंवा लोखंडी गज वापरतात व हा भागही बंद करायचा प्रयत्न करतात. सुरक्षेच्या नावाखाली लोक जेव्हा या लोखंडी गजांच्या भयंकर रचनांनी घराला लागून असलेली गच्ची बंदिस्त करतात तेव्हा ते पाहताना अतिशय त्रास होतो. मी रहिवाशांच्या सुरक्षेच्या विरुद्ध नाही, मात्र शेवटी सुरक्षा ही आपल्या मनात असते, ती व्यवहार्य मार्गाने मिळवता येते हे आपण समजून घेतले पाहिजेअशा जोडून असलेल्या लहान गच्च्या झाकून आपण स्वतःला आकाशाला आपल्यापासून दूर करतोय हे आपण विसरतो! अर्थात प्रति चौरस फूट दर आकाशाला भिडलेले असताना नागरिकांना दोष देऊ शकत नाही, प्रत्येक चौरस इंच महत्वाचा असतो व या बंदिस्त भिंतींविरुद्धच्या या स्पर्धेत आकाश हरते हे सत्य आहे.

आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे आपल्या भोवती वाढत असलेले काँक्रिटीकरण, या प्रक्रियेत केवळ माणसांना नाही तर इतर सजीवांनाही निवारा व सुरक्षित ठिकाण हवे आहे हे आपण विसरतो, आपल्या घरासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या अनेकांना विस्थापित करत आहोत! तुम्ही पुण्यात किंवा इतर कोणत्याही वाढत्या शहरात पाहिले असेल की पूर्वी भारद्वाज, साध्या चिमण्या, बुलबुल, मैना व अगदी फुलपाखरे यासारखे असंख्य पक्षी दिसायचे, मात्र आता आपल्याला हे पक्षी दिसत नाहीत. याचे साधे कारण म्हणजे त्यांच्यासाठी अशी जागाच उरलेली नाही की जिथे ते थोडावेळ विश्रांती घेऊ शकतात, जिथे त्यांना अन्न व पाणी नैसर्गिकपणे उपलब्ध असेल. ते त्यांची घरटी विटांच्या भिंतींवर किंवा काँक्रिटच्या स्लॅबवर किंवा आपल्या दर्शनी भागात बसविलेल्या काचेच्या तावदानांवर बांधू शकत नाहीत! अशा वेळी आपण थोडेसे लक्ष दिले व मदत केली तर या सज्जांवर त्यांना अन्न व पाण्यासाठी एक चांगले ठिकाण मिळू शकेल. अशाप्रकारे आपण जैवविविधतेला हातभार लावू, पक्षांसाठी थोडे पाणी व अन्न ठेवा, थोडी रोपे लावा व काय फरक पडतो ते पाहा! मी माझ्या कार्यालयातील खोलीला जोडून असलेल्या एका लहानशा गच्चीवर हा अनुभव घेतला आहे. मी सुरुवातीला केवळ पाण्याचा वाडगा ठेवू लागलो, दररोज दुपारी तिथे अंघोळीसाठी व पाणी पिण्यासाठी पक्षांचा मेळावा भरतो व त्यांच्याकडे नुसते पाहात राहण्यानेही माझे मन प्रसन्न होते, दररोज या पक्ष्यांमध्ये एका नव्या पक्षाची भर पडते त्यामुळे त्यांचा मेळावा अधिक रंगीबेरंगी होतो.

मित्रांनो तुमच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढा व तुमच्याकडे सुदैवाने सज्जा असेल तर तिथे काही वेळ घालवा, दिवसातील या काही मिनिटांमुळे तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो ते पाहा! आपण आपल्या घरात व आजूबाजूला असलेल्या अशा जागांचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे व ज्या हेतूने त्या बनविण्यात आल्या आहेत त्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अलिकडेच मी वास्तुविद्याविशारद व जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य श्री. राजीव मिश्रा यांचे अतिशय सुंदर वाक्य वाचले, तेच इथे देतोय;चंद्रप्रकाशाने संपूर्ण आभाळ व्यापलेले असते; मात्र ते तुमची खोली किती व्यापेल हे तिच्या खिडक्यांवर अवलंबून असते”! माझ्या मते या वाक्याचा अर्थ असा होतो की आकाश अथांग आहे व त्याने पृथ्वीला वेढलेले आहे, त्यामुळे आपण सगळे त्याला पाहू शकतो; केवळ त्याकडे पाहण्यासाठी आपल्याला स्वतःचे एक माध्यम हवे असते! आणि आपली गच्ची यापेक्षा उत्तम मध्यम कोणते असते ! अशा गच्चीवर निवांतपणे बसा, तिथे काही आरामदायक क्षण अनुभवा, गरम चहाचे घोट घ्या, उगवता सूर्य पाहा किंवा कठड्याच्या गजांना पकडून पहिल्या पावसात चिंब भिजून मॉन्सूनचे स्वागत करा, एखाद्या उबदार दुपारी खुर्चीत बसून परिकथांचे पुस्तक वाचा व काही वेळा अंधार असताना दूरवरील तारे पाहा व त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करा! शेवटी घर म्हणजे केवळ काँक्रिटची एक स्लॅब, चार भिंती व महागडी अंतर्गत सजावट विकत घेणे नाही; तर या भिंतींमधून बाहेर पडुन असणारे तुमचे  आकाश म्हणजेच खरे घर व ते खरच मोफत मिळते!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स