Friday 11 September 2020










आरे; निसर्गाविरुद्ध विकासाची युद्धभूमी

 

कॉक्रीट जंगलच्या शहरांमधील रहिवाशांना जंगलांचे महत्त्व समजू  शकत नाही; कारण ते समजण्यासाठी त्यांच्याकडे व्यक्तीकडे जंगलातील निसर्गरम्य आठवणी असल्या पाहिजेत!”...  मेहमत मुरात ईल्दान.

आधुनिक तुर्किश नाटककार व विचारवंत मेहमत मुरात ईल्दान यांचा जन्म ईलाझिग १६ मे १९६५ रोजी पूर्वतुर्कीमध्ये झाला. त्यांच्या तत्वज्ञानाचे मला नेहमी आश्चर्य वाटते विशेषतः ज्याप्रकारे ते माणसे व निसर्गाशी संबंध जोडतात ज्या सामान्यपणे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते तुर्कस्थानचे म्हणजेच मध्य पूर्वेच्या वाळवंटातील आहेत म्हणून कदाचित त्यांना निसर्गाचे किती महत्त्व आहे हे समजते किंवा ते जाणतात, जसे तहानलेला वाटसरू वाळवंटातील ऑओसिसच  महत्त्व जाणतो. त्यामुळेच वाळवंटामध्येच एखाद्या व्यक्तीला पाण्याच्या व झाडांच्या स्वरूपातील निसर्गाचे माणसाच्या जगण्यासाठी काय महत्त्व आहे हे माहिती असते. जगभरात इतरत्र (म्हणजे आपल्या देशात) जेथे नद्या, ओढे, तलाव, जंगले व कुरणे मुबलक प्रमाणात आहेत (किंवा होती) त्यांनी कधीही त्यांचे महत्व जाणले नाही परंतु कधी त्याची दखलही घेतली नाही.  त्यामुळेच तर  आपल्या तथाकथित प्रगत राज्यात सगळीकडे पावसाळी मॉन्सूनचे वेळापत्रक विस्कटले आहे, आपल्या स्मार्ट शहरांमध्ये थोडासाही पाऊस पडल्यास पूर येतो, हलक्याशा वाऱ्यामुळे पण झाडे उन्मळून पडतात जी पूर्वी वादळातही मजबूतपणे उभी राहायची, आपल्या ओढ्यांना/झऱ्यांना नाल्याचे किंवा नागझरींचे स्वरूप आले आहे. आपल्या तलावांना दुर्गंधी येते, आपले कधीकाळी हिरवळीने आच्छादलेले डोंगर आता झोपडपट्ट्यांची केंद्रे झाली आहेत यामुळे झोपडपट्ट्यांमधील रहिवासी तसेच आसपासच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांचा जीव साथीचे रोग पसरण्याच्या भीतीमुळेच नाही तर भूस्खलन व आगीसारख्या आपत्तींमुळे धोक्यात आला आहे. आपल्या नद्यांविषयी आपण जेवढे कमी बोलू तेवढे चांगले व आपण सगळ्या स्वरुपातील जंगले म्हणजे झाडे, वेली, कुरणे किंवा झुडुपे (म्हणजे मला म्हणायचे आहे की झाडांखाली वाढणाऱ्या खुरट्या वनस्पती, असो) एखाद्या टक्कल पडलेल्या माणसाच्या डोक्यावरून केस गळावेत त्यापेक्षाही वेगाने कमी होत आहेतहा विनोद नाही तर वस्तुस्थिती आहे किंवा आपण ज्याला प्रगती म्हणजेच यश म्हणजे त्या करिअरच्यामागे धावताना केवळ रहिवाशी पुरुष व महिलांच्या डोक्यावरचेच केस जात नाहीत तर संपूर्ण शहरात जे काही हरित पट्टे उरले आहेत तेसुद्धा आपण गमावत आहोत. कोणताही डॉक्टर किंवा केसांवर उपचार करणारा तज्ञ एकदा गेलेले केस पुन्हा उगवू शकत नाही, त्याचप्रमाणे एकदा गमावलेले जंगल किंवा वन कुणीही पुन्हा उगवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही डोक्यावर केसांचे रोपण करू शकता व ते खार्चिकही असते, त्याचप्रमाणे एक झाडही लावणे त्रासदायक व खार्चिक असते व ते जगेल याची शाश्वती नसते, इथे तर आपण संपूर्ण जंगलच पुन्हा लावण्याविषयी बोलत आहोत. तुमच्या डोक्याचे पृष्ठभागक्षेत्र मर्यादित असते परंतु झाडाझुडुपांविषयी बोलायचे तर, आपण हजारो चौरस मीटर क्षेत्रात जंगलाची फेर लागवड करण्याविषयी बोलत आहोत.

 केवळ झाडेझुडुपेच नाही ज्या हजारो प्रजाती लाखो वर्षांपासून या हिरव्या पट्ट्यांमध्ये राहात आहेत, त्या आपण कशा परत मिळवणार आहोत; म्हणून आपण विकासाची जी व्याख्या करतो त्याविषयी स्वतःलाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. या व्यथेचे किंवा नैराश्याचे कारण म्हणजे मुंबईतील आरेची जमीन आपल्या मायबाप सरकारने आरक्षित जंगल म्हणून घोषित केल्याची बातमी ट्विट करण्यात आली होती (रिट्विट करण्यात आली होती). एखाद्या टक्कल पडलेल्या माणसाला सकाळी उठल्यानंतर आरशात पाहिल्यावर डोक्यावर केसांचे तुरळक पुंजके पाहून जसा दिलासा मिळतो, तसाच काहीसा दिलासा या बातमीने दिला. जे अगदीच अनभिज्ञ (किंवा अजाण)आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, आरे हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दूध प्रक्रिया केंद्र आहे (आणि सरकारी मालकीची जमीने आहे) व शेकडो एकरमध्ये पसरलेली  आहे. ही जमीन संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याला लागून असून, जे की  मुंबईसारख्या महानगराच्या अगदी मधोमध आहे. येथे साठहून अधिक बिबटयांचा  आदिवास असून  इतरही अनेक वन्य  प्रजाती आहेत. आरेच्या जमीनीतही घनदाट जंगल असून, सुदैवाने अजूनपर्यंत तरी तिथली झाडे-झुडपे व अनेक प्रकारच्या प्रजाती इतकी वर्ष टिकून आहेत. आता स्मार्ट लोकांना समजले असेल की हा लेख कोणत्या दिशेने जातोय व त्यासाठी तुम्ही स्मार्ट असायचीही गरज नाही. निसर्ग व माणसातला संघर्ष हा एखाद्या विज्ञानपटासारखा आहे पण दुर्दैवाने निसर्गाकडे त्यांचे माणसांपासून रक्षण करण्यासाठी कुणी जेम्स बाँड किंवा सुपरमॅन किंवा ॲव्हेंजर नाहीत आणि  माणसांची संख्या दरवर्षी कोट्यवधीने वाढत आहे.

अजूनही निसर्गाच्या बाबतीत सर्व काही संपलेले नाही व या युद्धातील सर्वात मोठा विनोद म्हणजे निसर्गाविरूद्धची ही लढाई जिंकणे म्हणजे आपला सर्वात मोठा पराभव असेल हेच मूर्ख मानवाला समजत नाही. निसर्गाच्यावतीने हे युद्ध लढण्यासाठी कुणी जेम्स बाँड किंवा सुपरमॅन नसला तरी अनेक (शत्रूपक्षाच्या सैन्याच्या तुलनेत नगण्य आहेत) ॲव्हेंजर्स आहेत जे या युद्धात निसर्गाच्या बाजूने प्राणपणाने लढत आहेत (म्हणजे आपली लेखणी व कॅमेरा घेऊन). असेच एक नाव आहे बिट्टू सहगल, सँक्च्युरी मासिकाचे संस्थापक, जे अनेक वर्षांपासून जंगले व निसर्गाचा आवाज आहेत. हे मासिक तसेच त्यांच्या फेसबुकवरील ग्रूपचे दोन लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याद्वारे कोणत्याही स्वरूपातील निसर्गासाठी (वन्य जीवनासाठी) धोकादायक असलेल्या समस्यांविरुद्ध सातत्याने आवाज उठवला जातो. बहुतेकवेळा या समस्या माणसांची गरज किंवा त्यांची सोय या नावाखाली केल्या जाणाऱ्या विकासाच्या बाबतीतच असतात. काहीवेळा मेळघाटातील अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण असते किंवा काही वेळा पेंच अभयारण्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग असतो किंवा काहीवेळा सीआरझेडचे (किनारपट्टी नियम क्षेत्र निर्बंध) उल्लंघन असते ज्यामुळे किनारपट्टीची जैवविविधता धोक्यात येते किंवा अशी कोणतीही कृती ज्यामुळे आपल्या राज्यातील किंवा देशातील हरित पट्टा नष्ट होईल. सँक्च्युरी मासिक नेहमी अशा समस्यांविषयी आवाज उठवते व सामान्य माणसाला त्यांची जाणीव करून देते. मुख्य समस्या ही आहे की बहुतेक सामान्य माणसांना असे वाटते की निसर्ग विरुद्ध माणसाच्या या लढाईत त्याचा काय संबंध ते लोक स्वतःला सोयीस्करपणे यापासून लांब ठेवतात व अशाप्रकारे एकप्रकारे निसर्गाच्या विरुद्धच जातात.

सँक्च्युरीशिवाय इतरही असे गट आहेत पण त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी बोलू. आरेच्या जमीनीला आरक्षित जंगल म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे (जर तो खरा असेल तर) असे सध्या तरी म्हणावे लागेल, म्हणजे त्या हरित पट्ट्याला किमान काहीकाळतरी आशा आहे.आरेची ही जमीन काही वर्षांपूर्वी मुंबईतील मेट्रोच्या विकास कामांसाठी वापरण्याचा प्रस्ताव होता, कारण ती सोयीची होती व त्यामुळे प्रकल्पामध्ये लाखो रुपयांची बचत झाली असती असे तज्ञांचे म्हणणे होते. त्यामुळे आपले म्हणजेच लोकांचे लाखो रुपये वाचले असते परंतु यामुळे आपण जंगल व लाखो वर्षांपासून जे विविध प्रजातींचे निवासस्थान आहे ते नष्ट केले असते त्याचे काय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो मी विकासाविरुद्ध नाही, कधीही नव्हतो व कधीही असणार नाही कारण मी स्वतःही एक स्थापत्य अभियंता आहे. पण आता विकासाची व्याख्या नव्याने लिहीण्याची वेळ आली आहे कारण आपण करतो त्या विकासामुळे माणसालाही सुख मिळत नाही तसेच निसर्गाचेही संरक्षण होत नाही, किंबहुना आपण ज्याला विकास म्हणतो त्याच्या प्रक्रियेत निसर्गाचा विनाश करून माणसे आपल्या त्रासात भरच घालतात, हेच आपण अनुभवत आलोय

तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, तर इथे काही उदाहरणे देतो, बांद्रा (मुंबईचे उपनगर) रेक्लमेशन किंवा कोणत्याही समुद्रात भराव घातल्याने संपूर्ण मुंबईमध्ये पूर परिस्थिती बिघडलेली नाही का? त्यानंतर आपल्या शहरांच्या तथाकथित विकास योजना कधीही मुंबईच्या (किंवा कोणत्याही शहराच्या) दिशेने सातत्याने येणारे लोकांचे लोंढे सामावून घेऊ शकत नाहीत. यामुळे कोणतीही आरक्षित जमीन किंवा हिरवे पट्टे म्हणजे डोंगर, कुरणे, जलास्रोत, सागरी किनाऱ्यावरील खारफुटी अशा स्वरूपातील रिकाम्या भूखंडांवर झोपडपट्ट्या किंवा अवैध मानवी वसाहतींचा विळखा घट्ट होत जातो. ह्याच वस्त्या साथीच्या रोगांची प्रादुर्भावाची केंद्रे होतात व इथे राहणाऱ्या लोकांना नरकप्राय आयुष्य जगावे लागते तसेच आपण या ठिकाणी असलेला निसर्गही नष्ट करतो. ठीक आहे, पटत नाही तर आपल्या स्मार्ट पुणे शहराचे उदाहरण घ्या. तुमच्यात हिंमत असेल तर मुळा-मुठा (ही पुण्यातील नद्यांची नावे आहेत) नद्यांच्या काठांवर केवळ एक किलोमीटरच्या पट्ट्यात चालून पाहा आणि तुम्हाला कसे वाटते ते मला सांगा. पर्वतीच्या डोंगरांवर एक नजर टाका व तुम्हाला सिंहगडच्या रस्त्याच्या बाजुने काय दिसते ते सांगा. आपण आपल्या नद्यांचे, तलावांचे, डोंगरांचे, जंगलांचे संरक्षण करू शकलो नाही पण तरी आपण त्याला विकास म्हणतो, तुम्हाला अजूनही असे वाटते का की मी टोकाची भूमिका घेतोय? नाही साहेब, सर्व प्रकारचा विकास निसर्गाला नष्ट न करता शक्य आहे, पण त्यासाठी तुमची इच्छा हवी तरच तसा दृष्टिकोन येतो व योग्य त्या कल्पना सुचू शकतात, हेच सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.

आज एक लहानसे पाऊल उचलल्याने आरेचे जंगल किंवा जमीनीचा लहानसा तुकडा वाचू शकतो (मला अजूनही अशी आशा वाटते) व मात्र शेवटी निसर्गाच्या संवर्धनासाठी उचललेले हे सर्वात मोठे पाऊल असू शकेल. कारण देशात दररोज कुठलातरी हरित पट्टा त्यातील बिबटे, ससे, फुलपाखरे, मुंग्या, चिमण्या, मुंगूस व इतरही अनेक प्रजातींसह कायमस्वरूपी नष्ट होतोय. ते एकदा नष्ट झाल्यावर आपण त्यांना परत मिळवण्याचा प्रयत्नही करत नाही किंवा त्यांचे स्थलांतर करत नाही कारण ते त्यांचे हक्क मागू शकत नाहीत किंवा आपल्याविरुद्ध खटला दाखल करू शकत नाहीतपण एक लक्षात ठेवा तर तुमचा निसर्गावर विश्वास असेल तर परमेश्वर नावाची एक अदृश्य शक्तीही असते. तो किंवा ती आपल्या पद्धतीने परिस्थितीचा आढावा घेत असते व त्याचा पद्धतीने न्याय देते, हे विसरू नका. निसर्गाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या व सध्या त्याच्यावर मिळणाऱ्या विजयात आनंद मानणाऱ्या संपूर्ण मानव जातीला मला एवढेच सांगावेसे वाटते !

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 


No comments:

Post a Comment