Monday 29 April 2024

जागतिक वन दिन, चिमण्या आणि वाघ !

 

































ज्या गोष्टी तुमच्यासाठी मोलाच्या आहेत किंवा तुमचे ज्यांच्यावर प्रेम आहे केवळ त्याच गोष्टी तुम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करता” … मी.

सुदैवाने, जेव्हा जंगल, वन्यजीवन, निसर्ग असा विषय असतो तेव्हा मला योग्य अवतरण शोधत बसावे लागत नाही, कारण माझ्याकडेच अशी कितीतरी अवतरणे आहेत. मी माझ्या स्वतःच्या ज्ञानाचे कौतुक करत नाही तर तुमचे जेव्हा निसर्गावर प्रेम असते किंवा तुम्हाला त्याचे मोल जाणवते तेव्हा तुमच्यावर त्याचा अनेक मार्गांनी वरदहस्त असतो, त्यामुळेच वरील शब्दांचा विचार करणे व ते व्यक्त करता येणे हे केवळ एक उदाहरण झाले. २१ मार्च रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय वन दिन, जो २० मार्च रोजी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक चिमणी दिवसानंतर साजरा केला जातो, या दोन दिवसांच्या निमित्ताने आज मी माझा लेख लिहीत आहे. या वर्षीच्या वन दिनाची संकल्पना आहेजंगले व नाविन्यपूर्ण कल्पना: एका अधिक चांगल्या जगासाठी नवीन उपाययोजनाचिमणी  दिना साठी कोणतीही संकल्पना (माझ्या माहितीप्रमाणे) नसली तरीही, आपण तशी एक तयार करू शकतो, कारण वन दिनाच्या संकल्पनेचा विचार करता तो देखील या उपक्रमाचाच  एक भाग आहे. वन दिनाची संकल्पना काय आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊ म्हणजे नाविन्यपूर्ण संकल्प, अधिक चांगल्या जगासाठी उपाययोजना हे घोषवाक्य म्हणून उत्तम आहे. परंतु अशा घोषवाक्यांचे आयुष्य फक्त तेवढ्या वर्षापुरते असते असे मला वाटते. तुम्हाला मी उपरोधिकपणे बोलतोय असे वाटत असेल तर मला गेल्यावर्षीच्या वन दिनाचे घोषवाक्य सांगा (गूगल न करता)! गेल्यावर्षीची संकल्पना होती “वन व आरोग्य, निरोगी लोकांसाठी निरोगी जंगले तयार करणे”. तुम्ही या दोन्ही संकल्पनांची सांगड घालू शकत असाल तर यावर्षीची संकल्पना गेल्यावर्षीच्या वन दिनाच्या संकल्पनेचा पुढचा भागच असल्यासारखा आहे. कारण तुम्हाला जंगले निरोगी असावीत असे वाटत असेल तर तुम्ही निरोगी जगासाठी उपजीविकेचे अधिक चांगले व प्रभावी  मार्ग शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना तयार केल्या पाहिजेत, आता तुम्हाला हे समजले असेल अशी मी आशा करतो.

आता वन दिनाच्या संकल्पनेकडे पुन्हा वळूया परंतु त्याआधी, ज्यांना वन दिनाविषयी काही माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो (म्हणजेच ज्यांना जंगलांची फिकीर नसते त्यांच्याविषयी). जगभरातील सर्वप्रकारच्या जंगलांच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी २०१२ साली संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेने २१ मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला. यानिमित्ताने विशेषतः विकसनशील व विकसित देशांमध्ये जंगले व झाडांचा समावेश असलेले विविध स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले जाते. 

इथेच यावर्षीच्या वन दिनाचे महत्त्व अधिक आहे, कारण विकसित देशांमध्ये आधीच वनक्षेत्र, तसेच वन्यजीवन जवळपास संपुष्टात आले आहे; संपूर्ण युरोप किंवा जपानचे उदाहरण घ्या तेथे फारसे वन्यजीवन अस्तित्वात नाही. एक लक्षात ठेवा, हरित क्षेत्र महत्त्वाचे आहेच परंतु केवळ झाडे किंवा वृक्षारोपण म्हणजे जंगल नव्हे (हा माझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे), परंतु जेथे झाडे, गवत, झुडुपे, जलाशय, कीटक तसेच बिबट्या, वाघ किंवा सिंहासारखी मोठी हिंस्र श्वापदे असे संपूर्ण जीवनचक्र अस्तित्वात असते त्याला आपण जंगल म्हणू शकतो  व आपल्या देशाला सुदैवाने अतिशय समृद्ध जंगलांचे वरदान लाभले आहे. याच कारणाने अविकसित व विसनशील देशांसाठी वन दिनाचे महत्त्व अधिक आहे कारण आपल्याकडे अजूनही संवर्धन करण्यासाठी काही आहे. परंतु आपण केवळ नैसर्गिकपणे जंगले सुरक्षित ठेवू शकत नाही व म्हणूनच नाविन्यपूर्ण कल्पना महत्त्वाच्या आहेत. दशकानुदशके व शतकानुशतके, मानवी लोकसंख्या सातत्याने वाढत आहे कारण आपले आयुष्य आरामदायक व निरोगी बनविण्यासाठी आपण नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या आहेत. आता आपण जंगलांचे जीवन निरोगी बनविण्याची वेळ आली आहे, कारण जंगले आपणहून स्वतःला वाचवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा आपण जंगलाचे आयुष्य निरोगी असायला हवे असे म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ जंगलात व भोवताली राहणाऱ्या जंगलातील आयुष्य असा होतो व त्यासाठी आपण वन विभागापासूनच सुरुवात केली पाहिजे ज्यामध्ये त्यांना ते महत्त्वाचे आहेत याची जाणीव करून देण्याचा समावेश होतो. असे झाले तरच त्यांना जंगलाचे संरक्षण करण्याचे त्यांचे काम अतिशय आवडेल. दुर्दैवाने, अर्थसंकल्पातील तरतुदींपासून ते पायाभूत सुविधांपर्यंत, ताडोबासारखी काही मोजकी अति महत्त्वाची अभयारण्ये सोडल्यास, इतर सरकारी विभागांच्या तुलनेत वनविभागाकडे दुर्लक्ष केले जाते किंवा उपेक्षा केली जाते ही वस्तुस्थिती आहे. यामुळे परिणामी वन विभागाच्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. लोक या सेवेत रुजू होतात कारण ही सरकारी नोकरी आहे परंतु हे तेवढ्यापुरतेच मर्यादित असते, त्यांना त्यांची नोकरी आवडत नाही तसेच ते सामान्य माणसाला जंगलावर प्रेम करायला लावू शकत नाहीत किंवा त्याचे संरक्षण करू शकत नाहीत. सर्वप्रथम ही त्रुटी स्वीकारली पाहिजे, जंगले निरोगी करण्याच्यादृष्टीने उपाययोजना राबवण्यासाठी ही सुरुवात असेल. मी अनेक जंगलांना भेटी देतो व वनरक्षक किंवा वन मजुरांशी बोलतो. प्रत्यक्ष जंगलामध्ये काम करताना त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, निवासाच्या सोयींपासून ते वाहने किंवा जीवन संरक्षक साधनांपर्यंत अगदी मूलभूत पायाभूत सुविधांच्या परिस्थितीसह सर्वकाही निकृष्ट आहे व असे असूनही त्यांनी जंगलांचे संरक्षण करावे अशी आपण अपेक्षा करतो. तुमचा माझ्या शब्दांवर विश्वास नसेल तर प्रत्यक्ष जंगलात जाऊन, वन रक्षकांसोबत राहून बघा. या विभागात रुजू होताना इथल्या परिस्थितीची त्यांना जाणीव असते व अनेकजण म्हणतील की देशाच्या सीमेवर याहूनही खडतर परिस्थिती असते. परंतु लष्कराच्या सैनिकांना मिळणारा पाठिंबा व पायाभूत सुविधा (तसेच आदरही) पाहा व वन रक्षकांना काय मिळते ते पाहा, म्हणजे तुम्हाला यातील फरक जाणवेल. वन विभागाच्या अगदी सर्वोच्च अधिकाऱ्यांनाही (आयएफएस कॅडरमधील) नेहमी आयएएससारख्या त्यांच्या समकक्ष सेवांच्या  खाली  ठेवले जाते. त्यामुळे वन विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना त्याच कॅडरच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागते. परंतु एका भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्याने आयएफएस अधिकाऱ्याला उत्तर देणे का अपेक्षित नसते, आपल्याला जर जंगलाचे स्थान सर्वोच्च ठेवायचे असेल तर हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. इथे मी वेगवेगळ्या विभागांमध्ये भेदभाव करत नाही, परंतु तुम्ही जंगलांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय वनसेवा विभागाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर जंगलाशी संबंधित सर्व निर्णयांचे अधिकार त्या कार्यालयांतर्गत असले पाहिजेत, ज्यामध्ये आर्थिक नियोजनाचाही समावेश होतो, हा अगदी साधा-सरळ तर्क आहे, बरोबर तुम्ही वनक्षेत्रातील कामकाजाचे लेखापरीक्षक म्हणून महसूल अधिकाऱ्याची (आयएएस) नियुक्ती करू शकता, परंतु वन क्षेत्रातील सर्वोच्च अधिकारी म्हणून किंवा प्रत्येक निर्णयाशी संबंधित अंतिम निर्णय घेणारा अधिकारी म्हणून नव्हे; असे मला वाटते, जर आपल्याला जंगले निरोगी व्हावीत असे वाटत असेल, कारण हे त्या संबधित योग्य ज्ञान असलेल्यांचे  काम आहे !

त्याचवेळी वनविभागानेही जंगलांच्या बाबतीत आम्हालाच सगळे कळते असा दृष्टीकोन सोडून दिला पाहिजे. ते खाकी गणवेश घालतात व जंगलावर त्यांचा अधिकार असला तरीही जंगल म्हणजे सातत्याने समृद्ध होत जाणारा ज्ञानसागर आहे व जंगलाविषयी आपल्याला सर्वकाही माहिती आहे असा दावा कोणताही व्यक्ती कधीही करू शकत नाही. जेव्हा विषय जंगलांचा व जंगलाभोवती राहणाऱ्या लोकांचा असतो वन विभागाने इतर व्यक्तींनी मांडलेल्या नाविन्य कल्पना किंवा देऊ केलेल्या उपाययोजनांचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे जे क्वचितच होते. आपण जेव्हा वनविभागाला व्यवस्थितच पायाभूत सुविधा देऊ शकत नाही, तिथे आपण जंगलात व भोवतालच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी योग्य गोष्टी तयार केल्या जातील अशी अपेक्षा कशी करू शकतो. म्हणूनच आपली माननीय न्यायपालिका (न्यायालये) जंगलांचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेवर ताशेरे ओढते व या संदर्भात त्यांना एकच कारवाई माहिती आहे ती म्हणजे वन्यजीव पर्यटनाला प्रतिबंध करा किंवा ते थांबवा. खरेतर वन्य पर्यटन हा जंगलांचे संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे शिल्लक असलेले एकमेव राज मार्ग आहे. तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे परंतु आधी आपण तंत्रज्ञान कशासाठी व कसे वापरणार आहोत हे ठरवा. कारण जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) दिशेने जात आहे, परंतु निसर्ग हा कोणत्याही बुद्धिमत्तेच्या पलिकडचा आहे. आपण केवळ तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी जंगलाचे संरक्षण कसे करायचे हे त्याच्याकडून शिकू शकतो. तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वाघांसारखे वन्य प्राणी मानवी वसाहतींजवळ आल्यावर किंवा येत असल्याची सूचना मिळू शकते. परंतु वाघाला जंगलातून बाहेर पडून एखाद्या गावामध्ये शिरायची गरज का पडते, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा चुकीचा वापर करण्याचा हा परिणाम आहे हे लक्षात ठेवा

कल्पना करा आपण जर आपण जंगलामध्ये पुरेशा पायाभूत सुविधा देत नसू किंवा त्याचा विचार करत नसू तर चिमणीसारख्या क्षुल्लक पक्ष्याचा विचार कोण करेल. आपण प्रत्येक गावातून व शहरातून प्रगती, वाढ किंवा विकासाच्या नावाखाली चिमण्यांना अक्षरशः हुसकावून लावले आहे. आपण केवळ आपल्या गरजा किंवा आरामाचा (म्हणजे माणसाच्या) विचार करतो. परंतु चिमण्यांसारख्या प्रजातींना हव्या असलेल्या जागेचे किंवा त्यांच्या गरजांचे काय, ते कोण करेल व आपण चिमणी दिवस साजरा करतो, हे म्हणजे अगदी जखमेवर मीठ चोळण्यासारखे झाले. चिमण्यांना त्यांचे घरटे बांधण्यासाठी जागा हवी असते, त्यांना थोडा एकांत हवा असतो, थोडे पाणी हवे असते, अन्न म्हणून धान्याचे काही दाणे हवे असतात, मातीत अंग घुसळण्यासाठी थोडीशी जमीन हवी असते (धूळ, चिखल) व आपण त्यांना त्यांच्या या मूलभूत गरजांपासूनच वंचित केले आहे. आपल्याला असे वाटते की चिमणी दिवस साजरा करून आपल्याला चिमण्या परत मिळू शकतात, आपण वेडे आहोत. सर्वात शेवटी मी अलिकडेच फेसबुक केलेल्या पोस्टविषयी (मी तेवढेच करू शकतो), जवळच असलेल्या एका व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या मृत्यूविषयी ती पोस्ट होती. काही वाचकांनी (अर्थातच विकसित देशांमधील) वाघांची संख्या वाढत असेल तर आपण त्यांचा प्रजनन दर का नियंत्रित करत नाही किंवा आपण विशिष्ट भागामध्ये माणूस व प्राण्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी त्यांची संख्या संतुलित राहील अशाप्रकारे त्यांचे स्थलांतर का करत नाही असे प्रश्न विचारले. त्यांच्या भावनांविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की यातून वन्यजीवनाविषयी व जंगलांविषयी आपले अज्ञान दिसून येते. आज आपण काही नियंत्रित करणे आवश्यक असेल तर आपण माणसांचा जन्मदर नियंत्रित केला पाहिजे, वाघांचा जन्मदर नव्हे. आपण वाघांसाठी (म्हणजे वन्यजीवनासाठी) आणखी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असेल, तर आपल्या नियोजनामध्ये आपण जंगलाच्या काही भागाचाही समावेश केला पाहिजे. आपण सर्व माणसांना वन्यजीवनासोबत सौहार्दाने राहण्यास शिकवले पाहिजे, असे झाले तरच जंगलांचे आरोग्य चांगले राहील अशी थोडीफार आशा आहे.

जंगले सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांना निरोगी करण्यासाठी सर्वोत्तम उपाययोजना म्हणजे, ज्ञानाची देवाण-घेवाण करणे व आपल्यातच कोणताही भेदभाव न करता सामायिकपणे त्याचा वापर करणे. म्हणजे आपण कोणत्याही गटाशी संबंधित असू उदाहरणार्थ वन विभाग, महसूल विभाग, स्वयंसेवी संस्था, खाजगी क्षेत्र, संशोधक किंवा अगदी गृहिणी असलात तरीही आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे व एका उद्देशाने हातमिळवणी केली पाहिजे. परंतु असे करण्यासाठी एखादी सामायिक व्यासपीठच नाही, म्हणूनच २०२४ सालच्या वन दिनी हेच पहिले पाऊल उचलूया, एवढे बोलून निरोप घेतो!

संजय देशपांडे.

smd156812@gmail.com




























No comments:

Post a Comment