Saturday, 12 July 2014

माननीय पर्यावरण मंत्री महोदय, शहराला आपली गरज आहे !!













 नैसर्गिक जग बदलत आहे हे सत्य आहे. आपण पूर्णपणे त्या जगावर अवलंबून आहोत. ते आपल्याला अन्न, पाणी व हवा देते. आपल्याकडे असलेला तो बहुमूल्य ठेवा आहे व आपण त्याचे रक्षण केले पाहिजे.”                   
                                           …डेव्हिड अटेनबरो.

प्रिय प्रकाश जावडेकर सर, तुम्ही पृथ्वीवरील जैवविविधतेने सर्वात समृद्ध असलेल्या या देशाचे पर्यावरण मंत्री होणे ही व्यक्तिशः माझ्यासाठी व पुणे शहरासाठीही गौरवाची तसेच अभिमानाची बाब आहे. या देशात केवळ प्राण्याच्या प्रजातींच्या बाबतीतच नाही तर त्यांच्या वसतीस्थानांच्या बाबतीतही विविधता आढळते, हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून, वाळवंट, पर्जन्यवन ते समुद्रापर्यंत ती पसरलेली आहेत! मी जेवढा त्याविषयी विचार करतो तेवढा थक्क होतो! आपण मानवी जैवविविधतेच्या बाबतीतही समृद्ध आहोत. आपल्याकडे एकोणतीस राज्ये, सात केंद्रशासित प्रदेश, शेकडो भाषा, खाण्यापिण्याच्या हजारो सवयी व एकशेवीस कोटींची लोकसंख्या आहे! आपल्या देशाच्या पर्यावरणात या सर्व घटकांचा समावेश होत असल्याने पर्यावरण मंत्र्याची जबाबदारी अतिशय रोचक मात्र तितकीच अवघड आहे! मी तुमच्यावरील महाकाय जबाबदारी पाहता वर दिलेले प्रसिद्ध निसर्गतज्ञाचे अवतरण निवडले! सर डेव्हिड फ्रेड्रिक अटेनबरो हे निसर्गतज्ञ व प्रक्षेपक आहेत व बीबीसीच्या निसर्ग इतिहास विभागाच्या सहकार्याने निर्मित लाईफ या नऊ मालिकांच्या लेखन व सादरीकरणासाठी ते अतिशय प्रसिद्ध आहेत. आपल्यासारख्या विकसनशील देशांपुढील आव्हान त्यांनी किती चपखलपणे मांडले आहे, आपली एकशेवीस कोटींची लोकसंख्या एकीकडे आपली ताकद असली तरी दुसरीकडे त्यांना जगण्यासाठी अन्न व निवारा आवश्यक आहे. म्हणूनच सध्या निसर्ग व मानवातील संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे!

अशा परिस्थितीत तुम्ही एका अशा मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे की ज्याच्या अस्तित्वाची दखल अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत कुणी घेतही नसे! मात्र सध्या मी केवळ पुणे शहर, त्याचे पर्यावरण व रिअल इस्टेट याविषयी बोलणार आहे. मी हे दोन्ही विषय हाताळत असल्यामुळे या शहराचा एक नागरिक म्हणून तुम्हाला त्याविषयी लिहीण्याचा विचार केला. आपल्या रूपानी या शहराचा एक नागरिक अशा एका पदावर बसला आहे की संपूर्ण देश त्याचे कार्यक्षेत्र आहे, मात्र तरीही त्याची पाळेमुळे इथल्या मातीतच रुजलेली आहेत, व अशा माणसाला काही लिहीण्याची संधी मला व या शहराला क्वचितच मिळाली असेल. कोणत्याही विकसनशील देशातील प्रमुख शहराप्रमाणे इथली स्थितीही त्रिकोणासारखी झाली आहे.  या त्रिकोणाचे तीन कोन आहेत; पहिला कोन म्हणजे घर, जी या शहरात राहणा-यांची मूलभूत मागणी आहे, दुसरा कोन म्हणजे पायाभूत सुविधा ज्या या घरांमध्ये राहणा-या लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आवश्यक आहेत व या दोन कोनांमध्ये एक तिसरा कोन येतो तो म्हणजे निसर्ग, वर नमूद केलेल्या दोन घटकांचा समतोल राखताना आपल्याला त्याचे संरक्षण करायचे आहे! या तिन्ही कोनांमधील संघर्ष कायम राहील मात्र त्रिकोणाच्या कोणत्याही कोनाकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाही. या तिन्हींना एकत्र करुनच आपण एका सुदृढ शहराची म्हणजेच समाजाची निर्मिती करु शकतो!

सर, मी पुणे शहराबाहेरील विषयांबद्दल बोलणार नाही कारण तो एक स्वतंत्र विषय होईल व तुमचे कार्यक्षेत्र एवढे व्यापक आहे की त्याचा एका पत्रात समावेश करता येणार नाही! देशात पुण्याला एक विशेष स्थान आहे, हे मी केवळ एक पुणेकर म्हणून बोलत नाही तर इथे कार्यरत विविध संस्था, शहराची भौगोलिक स्थिती तसेच शहराला लाभलेल्या समृद्ध शैक्षणिक व सांस्कृतिक वारशामुळे त्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. हे शहर डोंगर रांगा व टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे एकेकाळी इथली जैवविविधता अतिशय समृद्ध होती हे देखील विसरुन चालणार नाही! हे शहर अगदी अलिकडेपर्यंत संथ जीवनशैली, टुमदार वाडे, कँपातल्या जुन्या इमारती यामुळे निवृत्तीवेतनधारकांचे शहर म्हणून ओळखले जायचे. मात्र गेल्या दोन तीन दशकांमध्ये आयटीमुळे व प्रचंड औद्योगिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे पर्यावरण वगळता सर्व पातळ्यांवर प्रचंड वाढ झाली आहे, आणि जणु मॉल नावाची एक संस्कृती उदयास आली आहे. कधी काळी येथील शांत व नीरव रस्त्यांवर झाडांच्या कमानींमधून टांगे व सायकली चालताना दिसत असत, आता त्यांची जागा लाखो दुचाकी व चार चाकी वाहनांनी घेतली आहे, झाडांच्या कमानींची जागा मॉल्सच्या काचेच्या इमारतींच्या दर्शनी भागांनी किंवा कॉर्पोरेट कार्यालयांनी किंवा उंच बहु मजली निवासस्थानांनी घेतली आहे. आता येथे सायकल तर सोडाच पण रस्त्यावरुन चालण्यासाठीही जागा नाही व आपण श्वासाद्वारे ऑक्सिजन नाही तर कार्बन मोनॉक्साईड घेत आहोत! तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक बांधकाम व्यवसायिक असूनही मी असे कसे लिहू शकतो? मात्र मी इमारतींविरुद्ध नाही कारण त्या या शहरातील नागरिकांची गरज आहे, मात्र कुठेतरी आपण आपली गरज व हव्यास यात गफलत करतोय व इथेच पर्यावरण मंत्र्यांची भूमिका अगदी शहराच्या पातळीवरही अतिशय महत्वाची आहे.

वाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र आपण ती कशी होऊ देतो किंवा तिचे कशाप्रकारे नियोजन करतो यावर ती खरोखर वाढ आहे किंवा केवळ आकारमान वाढणे आहे हे अवलंबून असते! आपण शहरासाठी दोन विकास योजना तयार केल्या आहेत व कदाचित तिसरीही योजना तयार केली जाईल. मात्र आपण अजूनही डोंगर माथा, डोंगर उतार किंवा नदी किनारी असलेले हिरवे पट्टे निश्चित करु शकलेलो नाही, हे पट्टे अनेक पक्षी व प्रजातींसाठी घर बनविण्याकरीता शेवटचे आशास्थान आहेत, शेवटी तेही याच शहराचे नागरिक आहेत. आपण दोन लाख चौरस फुटांहून मोठ्या प्रकल्पांसाठी पर्यावरण मंजूरी बंधकारक केली आहे मात्र शहराच्या विकास योजनेसाठी कोणतीही पर्यावरण मंजूरी आवश्यक नाही, हा कदाचित सर्वात मोठा विनोद असावा! हे म्हणजे तुम्हाला एक बाटली बियर पिण्यासाठी परवाना लागतो मात्र बियर बार चालविण्यासाठी परवाना लागत नाही असेच झाले!

आपण विकास योजना म्हणजे डीपी किंवा प्रादेशिक योजना म्हणजे आरपी सर्व पर्यावरण निकषांचा विचार करुन तयार केली तर प्रत्येक प्रकल्पासाठी पर्यावरण मंजूरी घ्यावी लागली नसती, ज्यामुळे विकासास उशीर होतो व अवैध बांधकामांना चालना मिळते. ज्या कायद्याचे पालन करणे अशक्य आहे त्याचा हेतू कधीच साध्य होत नाही! प्रत्येक पर्यावरणविषयक कायद्याच्या बाबतीतही असेच होत आहे कारण अधिकाधिक लोकांना ते केवळ विकासातील अडथळे असल्याचे वाटत आहे. हे कदाचित खोटेही असेल मात्र पर्यावरण मंजूरी मिळण्यास उशीर होत असल्यामुळे विकासकांची हीच भावना आहे. आपल्याला किती क्षेत्र निवासी असणार आहे व किती रस्ते, शाळा, मैदाने व इतर सुविधांसाठी असणार आहे हे माहिती आहे, त्यानंतर एफएसआय व गृह घनता नियम यासारखे नियम अस्तित्वात आहेत, डीपी किंवा आरपी तयार करताना त्याचा शहरावर व आजूबाजूच्या भागांवर काय परिणाम होणार आहे हे आपल्याला माहिती आहे तर मग आपण नद्या व जलस्त्रोतांसारख्या नैसर्गिक संसाधनांची काळजी पायाभूत पातळीवर का घेत नाही, प्रत्येक प्रकल्पासाठी पर्यावरण मंजूरीसारख्या नियमांनी योजनांची थट्टा का उडवतो. त्याचशिवाय केवळ दोन लाख चौरस फुटांच्या बांधकाम क्षेत्रासाठीच हा निकष का, अगदी काही हजार चौरस फुटाच्या बंगल्याचाही पर्यावरणावर काही ना  काही परिणाम होतोच तर मग, हा निकष लावायचाच असेल तर प्रत्येक बांधकामाला लावा अगदी रस्त्यांनाही, कारण लाखो लोक त्या रस्त्याचा वापर करणार असतात! आजकाल रस्त्यांचे, म्हणजे अगदी उपनगराच्या गल्लीबोळातील रस्त्यांचेही काँक्रिटीकरण करण्याचे खूळ निघाले आहे; हे काम करताना झाडे लावण्यासाठी काहीही जागा ठेवली जात नाही. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे नाल्यांचा/ओढ्यांचा प्रवाह सुरळीत करणे; पावसाचे पाणी वाहून नेणा-या या नैसर्गिक नाल्यांमधील वनस्पती-झुडुपे हटवली जातात व त्यांचे काँक्रिटीकरण केले जाते, यामुळे नाल्याच्या जमीनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते व काठावरील व आजूबाजूची संपूर्ण जैव-व्यवस्था नष्ट होते! या सारख्या कामांसाठी पर्यावरण मंजूरीची गरज नसते का असे माझ्यासारख्या पर्यावरणवाद्याला विचारावेसे वाटते!

यासारखी शेकडो उदाहरणे आपल्याभोवती आहेत, ज्यात प्रशासकीय संस्था आजूबाजूच्या निसर्गाची दखल घेत नाहीत व नंतर शहरातील पर्यावरणाचा नाश झाल्याबद्दल मात्र संपूर्ण रिअल इस्टेट उद्योगाला जबाबदार धरले जाते!
आणखी एक मुद्दा म्हणजे शहरात व आजूबाजूच्या परिसरात जैवविविधता विभाग तयार करण्याचा व अस्तित्वात असलेल्या विभागांचे रक्षण करण्याचा. अगदी अलिकडेपर्यंत शहरातील डोंगर हिरवे होते व अनेक पक्षांचे तसेच सस्तन प्राण्यांचे निवासस्थान होते व आता हे डोंगर व त्यावरील झाडा-झुडुपांचे रक्षण करणे, अनेक स्वयंसेवी संस्था मदत करण्यासाठी तयार असूनही नागरी संस्थेसाठी अवघड काम आहे. आपल्या नद्यांमध्ये अतिशय चांगल्याप्रकारे जैवविविधतेचे संवर्धन करता आले असते. मात्र आता त्या पूर्णपणे प्रदूषित झाल्या असून त्यात डांसांशिवाय काहीच राहु शकत नाही, मात्र आपण त्याबाबत काहीच करत नाही.
किंबहुना शहर पातळीवरच आपण आपल्या आजच्या एकूण गरजांचा परिणाम कसा होईल व या गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजनामध्ये आपला दृष्टिकोन कसा असला हे आपण पाहिले पाहिजे. मला जाणीव आहे की पुणे केवळ एक शहर आहे व संपूर्ण देश तुमचे कार्यक्षेत्र आहे, तरीही आपण पुण्याचा आदर्श निर्माण करु शकतो. पुण्यामध्ये निसर्गास पूरक विकास करुन त्याचे उदाहरण देशाला दाखवू शकतो, तुम्हाला या शहराची इत्यंभूत माहिती असल्याने त्यावर लक्ष ठेवणे सोपे जाईल. आपण शहर पातळीवर पर्यावरण अधिका-यासारखे पद तयार करु शकतो जो अशी सर्व विकास कामे नियंत्रित करेल व विकासकामास उशीर होऊ देणार नाही कारण निसर्गाचे संरक्षण हा विकासातील अडथळा मानला जातो! देशभर आयएएस वर्गाप्रमाणे पर्यावरणासाठीही एक k^ डर तयार करण्याविषयी विचार केला जाऊ शकतो. या व्यक्ती विकासाचा परिणाम काय होईल हे समजून घेण्याएवढ्या सक्षम हव्यात, त्यांना निसर्गाची जाण असावी, शहरासाठी काय योग्य आहे व काय अयोग्य आहे याचा निर्णय त्यांना घेता आला पाहिजे व त्यांनी कोणत्याही प्रस्तावावर लवकर कृती केली पाहिजे!  
सर्वप्रथम शहराची पर्यावरण योजना तयार करुन तिचा डीपी तसेच आरपीमध्ये समावेश करा व त्यानंतर सर्वात लहान घटकाचा विचार करा. धोरणे स्पष्ट व मार्गदर्शकतत्वे व्यवहार्य असली पाहिजेत. आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी, त्यांचे उल्लंघन करणा-या कुणालाही त्वरित व गंभीर शिक्षा दिली जावी म्हणजे कुणीही त्यांचे उल्लंघन करण्याची हिंमत करणार नाही! त्याचवेळी मंजूरी प्रक्रिया सुरळीत व जलद झाली पाहिजे म्हणजे कुणालाही ती गुंतवणुकीतून नफा मिळविण्यातील अडथळा वाटणार नाही. शेवटी कोणत्याही विकासाच्या बाबतीत टिकाऊ हा शब्द आर्थिक संदर्भातही तितकाच लागू होतो.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोन महत्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होत आहे ते म्हणजे सामान्य माणसाला जागरुक करणे व लोकसंख्या नियंत्रण. आपण लोकसंख्या नियंत्रणात ठेवली नाही तर तिच्या गरजा कित्येक पटींनी वाढत जातील व त्यानंतर निसर्ग संवर्धनाची कोणतीही उपाययोजना कुचकामी ठरेल. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पर्यावरण संवर्धनाविषयी त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली तर आपले काम बरेच सोपे होईल!
आपल्याला हे साध्य करता आले तर पुणे देशाची शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी म्हणून आपले नाव सार्थक करेल, नाहीतर हिंदीतल्या म्हणीप्रमाणे, “नाम बडे और दर्शन खोटे अशी गत होईल, म्हणजेच आपण केवळ फुकाचीच शेखी मिरवू, एकेकाळी अतिशय आकर्षक असलेल्या आपल्या शहराची रया गेलेली गत होईल! मी आश्वासन देतो की या मोहिमेसाठी मी माझ्यापरीने सर्वतोपरी मदत करेन, कारण या शहराने आपली प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी स्वतःची किंमत मोजली आहे आणि आता या शहराच्या गरजा पूर्ण करण्याची वेळ आली आहे, ज्या फार मोठ्या नाहीत! या शहरासाठी कदाचित हे शेवटचे आवाहन असेल व तुम्ही ज्या पदावर आहात तिथून तुम्ही निश्चितपणे शहरासाठी पावले उचलून एक निर्णायक भूमिका घेऊ शकता, यासाठी दुसरे आणखी योग्य कोण असू शकते!!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


Sunday, 6 July 2014

गॉडफादर एक विचारधारा !

















प्रत्येक माणूस स्वतःची हाव मोजतो.” …मारिओ पुझो.
माझ्या एका चांगल्या मैत्रिणीने अलिकडेच मारिओ पुझो यांची अत्यंत लोकप्रिय कादंबरी द गॉडफादर वाचली व त्याविषयीचे तिचे मत व्यक्त केले. मी स्वतःही गॉडफादर या व्यक्तिरेखेचा निस्सीम चाहता आहे, व त्याविषयीच्या चर्चेत माझे विचारचक्र सुरु झाले. मी गेल्या तीस वर्षात किमान पंधरावेळा तरी ही कादंबरी वाचली असेन. मी आता अशा पातळीवर पोहोचलो आहे की मी त्या व्यक्तिरेखेचा चाहता आहे, अनुयायी नाही असे म्हणू शकतो! मी आता एखाद्या व्यक्तिरेखेचा चाहता असणे व तिचा अनुयायी होणे यातील फरक सांगू शकतो. या व्यक्तिरेखेचा माझ्यावर मोठा प्रभाव होता व माझ्या कामाच्या अनेक आघाड्यांवर त्याचे प्रतिबिंब दिसून आले, कारण गॉडफादरला त्याच्या स्वाभिमानाइतके प्राणप्रिय काहीही नसते! माझ्या या विचारमंथनातील काही विचार आपल्यासमोर सादर करत आहे...

द गॉडफादर!
हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक परिपक्व, शहाणा, काळजी घेणारा मात्र तितकाच निष्ठूर, हिशेबी माणूस, ज्याला सर्वकाही त्याच्या नियंत्रणात ठेवायला आवडते! तो देवाला भीत असल्याचे दाखवतो मात्र त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांसाठी स्वतः देव बनण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ती धर्मामध्ये गॉडफादर म्हणजे बाप्तिस्म्याच्या वेळी ज्या व्यक्तिच्या नावावर बाळाचे नाव ठेवले जाते व जो आयुष्यभर तुमची काळजी घेतो. मात्र हा शब्द गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांनी चुकीच्या अर्थाने घेतला, कारण या मुखवट्याच्या आधारे सामान्य माणसाची सहानुभूती मिळू शकते.

मी वयाच्या तेराव्या वर्षी ही कादंबरी वाचली, अशाप्रकारचे वाचन करण्यासाठी ते कदाचित चुकीचे वयही असेल! कारण कोणतेही तत्वज्ञान तिच्या दोन्ही बाजू समजून न घेता स्वीकारणे धोकादायकच असते, विशेषतः "जगातील प्रत्येक वस्तू ,विकली जाऊ शकते, तुम्हाला फक्त तिची किंमत माहिती असली पाहिजे" यासारखे! एकदा तुम्हाला विक्रीची किंमत समजली की, "मी त्याला असा प्रस्ताव देईन की तो फेटाळू शकणार नाही"! जगात टिकण्यासाठी हा तर्क अतिशय चांगला असला तरी प्रत्येक व्यवहाराच्या दोन बाजू असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणूनच प्रत्येक प्रस्तावाचा शेवटही दोन प्रकारे होतो. तुम्ही जेव्हा म्हणता की प्रत्येक गोष्टीची किंमत असते त्याचा अर्थ होतो की तुम्ही ती वस्तू खरेदी करण्यासाठी कितीही किंमत मोजायला तयार आहात! तुम्ही जेव्हा म्हणता की मी त्याला असा प्रस्ताव देईन की तो फेटाळू शकणार नाही, याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे ते किंवा जे नाही तेही द्यायला तयार आहात! मात्र तुम्ही जो प्रस्ताव दिला आहे ते त्याला मिळेल याची तुम्ही खात्री करता. एखादे मूलच काय तर किती प्रौढांना या व्यवहारातील किंवा प्रस्तावातील खरा धोका समजेल हा माझा प्रश्न आहे! गॉडफादरचा प्रस्ताव हा दुस-या व्यक्तिसाठी धोका नाही तर एकप्रकारे त्याच्यासाठीच धोका आहे, कारण त्याला हवा असलेला व्यवहार करण्यासाठी तो कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो किंवा जाईल.
तो सर्वांची काळजी घेतो व प्रेमळ आहे मात्र त्याच्या अगदी जिवलगांपैकी कुणाला मारायची वेळ येते तेव्हा, शरीराचा सडलेला भाग काढून टाकणे आवश्यक असते या शब्दात त्याचे समर्थन करतो! मात्र एखादा भाग सडला आहे व किती सडला आहे हे तोच ठरविणार! जर आपल्यापैकी प्रत्येकानेच गॉडफादर बनण्याचा प्रयत्न केला तर अंधाधुंदी माजेल; कारण शेवटी सर्वात शक्तिशाली व निष्ठूरच राज्य करेल.
गॉडफादर आपली सर्व वाईट कामे सामान्य माणसासाठी शांततेच्या नावाखाली खपविण्याएवढा हुशारही आहे. जगातील प्रत्येक राज्यकर्त्याने लाखो लोकांचा जीव घेणा-या युद्धांचे समर्थन करतानाही असाच युक्तिवाद करतात नाही का? मात्र हेच गॉडफादर या व्यक्तिरेखेचे यश आहे कारण तो बहुतेक पुरुषांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतो. मी जाणीवपूर्वक पुरुष म्हटले आहे, कारण स्त्रियांना गॉडफादर ही व्यक्तिरेखा कधीच फारशी आवडली नाही. निसर्गतःच पुरुष व स्त्रियांमध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक तसेच जीवनाविषयीच्या दृष्टीकोनात फरक असतो. एकीकडे प्रत्येक पुरुषाला गॉडफादर व्हायला आवडेल, मात्र स्त्रियांना ती कल्पना फारशी आवडणार नाही, प्रत्यक्ष तसे होणे ही तर फार दूरची गोष्ट! एक स्त्री पुरुषाहूनही निष्ठूर होऊ शकते मात्र एखाद्या विशिष्ट कारणाने किंवा हेतूने. माझे वैयक्तिक मत आहे की जगावर अधिराज्य करायचे म्हणून कोणतीही स्त्री निसर्गतःच निष्ठूर नसते व इतिहासानेही माझे म्हणणे योग्य ठरवले आहे. एखाद्या स्त्रिला प्रत्येक पुरुषावर राज्य करायला आवडेल मात्र तिचे मार्ग वेगळे असतील व ते निश्चितच गॉडफादरसारखे नसतील, मग त्याला त्या स्त्रिचे शहाणपण म्हणा किंवा मूर्खपणा! प्रत्येक नियमाला अपवाद असतातच मात्र आपण सर्वसाधारण वर्गाविषयी बोलत आहोत.
गॉडफादर एकीकडे काळजी घेणारा व प्रेमळ असल्याने त्याचा दरारा असलेल्यांना तो परमेश्वराहूनही मोठा वाटतो. तो ज्यांना आपले मानतो त्यांचे रक्षण करण्यासाठी तो कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतो, मात्र त्याच्या मनात कुठेतरी या मदतीचा जमाखर्च मांडला जात असतो. हिंदीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहेभगवान के घर देर है अंधेर नही म्हणजेच देवाकडे उशीर झाला तरी न्याय नक्की मिळतो. गॉडफादरकडे न्याय आहे मात्र त्यासाठी किंमतही मोजावी लागते; एखाद्याला ती अनेक वर्षांनी द्यावी लागते किंवा एखाद्याला ती द्यावीही लागणार नाही मात्र किंमत नक्की असते. काहीही मोफत मिळत नाही, गॉडफादरसारख्या माणसासाठी जिथे प्रत्येक गोष्टीची किंमत आहे तिथे त्याच्या सेवा फुकट कशा मिळतील! असे असूनही अनेकांना ज्या व्यवस्थेत ते राहतात तिच्यापेक्षा गॉडफादर प्रिय आहे, याचे कारण म्हणजे व्यवस्था सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे!  गॉडफादरच्या व्यक्तिरेखेला जवळपास पन्नास वर्षे झाली आहेत मात्र दुर्दैवाने आपण गॉडफादरच्या यशातून काहीही धडा घेतलेला नाही, संपूर्ण समाजाला रक्षण करण्यासाठी व न्याय देण्यासाठी एका गॉडफादरची गरज लागते हे आपले अपयशच आहे. गॉडफादर हा शब्द इतका प्रचलित झाला आहे की राजकारण, उद्योग, बॉलिवुड अशा सर्व क्षेत्रांमध्ये तो सर्रासपणे वापरला जातो. अनेक यशस्वी लोक मान्य करतात की ते त्यांच्या गॉडफादरमुळे त्या पदावर आहेत! त्यांना कदाचित गॉडफादर या शब्दाचा अर्थही माहिती नसेल मात्र गर्भित अर्थ तोच असतो. आपला आपल्या क्षमतांवरील व व्यवस्थेवरील विश्वास नष्ट होत चालला आहे, नैसर्गिक न्यायासारखी काही गोष्ट अस्तित्वात असते यावर आपला विश्वास नाही, म्हणूनच आपल्याला यशासाठी गॉडफादर लागतो. खरे पाहता गॉडफादरचा कुणीही गॉडफादर नव्हता, त्याने स्वतःसाठीची संधी हेरली व तो गॉडफादर झाला. गॉडफादरचे गुण अंगी बाणवता येत नाहीत ते उपजत असावे लागतात, जेव्हा संधी दिसते तेव्हा ते गुण दिसू लागतात. गुण अंगी बाणवून गॉडफादरसारखे धूर्त, निष्ठूर, हिशेबी होता येत नाही; ते जन्मजातच असावे लागतात. जगण्यासाठी ही तत्वे स्वीकारल्यानंतर तुमचा दृष्टीकोनच तुमच्या जीवनाचे तत्वज्ञान होते.

 अर्थात गॉडफादर त्याच्या व्यवसायाचे प्रशासन ज्याप्रकारे चालवतो त्याचे कौतुक केले पाहिजे. त्याचा व्यवस्थेवर व स्वतःचा व्यवसाय समजून घेण्यावर गाढ विश्वास आहे, प्रत्यक्षात त्याचा व्यवसाय गुन्हेगारी आहे. आश्वासनांचे महत्व तो जाणतो व ती पाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे की तुम्ही स्वतःची आश्वासने पाळली नाही तर तुमच्या ग्राहकाच्या तसेच तुमच्या भोवताली असलेल्या सर्वांच्या मनातून उतरता, यामध्ये कर्मचारी, विक्रेते,  ज्यांच्याशी व्यवहार करावा लागतो ते व्यवस्थेतील अधिकारी, किंवा अगदी तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सामान्य माणसाचा समावेश होतो. गॉडफादर आश्वासन देण्यापूर्वी दोनदा विचार करतो व एकदा आश्वासन दिल्यानंतर ते पाळतो!
 त्याच्या व्यक्तिरेखेचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे त्याचा व्यवसाय गुन्हेगारी आहे मात्र तरीही तो बरोबर व चूक किंवा मी तर म्हणेन की चूक व आणखी चूक यातील अत्यल्प फरक जाणतो! तो अंमली पदार्थांचा प्रचंड नफा असलेला धंदा संपूर्ण तरुण पिढी व्यसनी होईल असे सामाजिक कारण देत नाकारतो; मात्र तसे केल्यास त्या मुलांच्या पालकांच्या मनातील त्याची गॉडफादरची प्रतिमा डागाळेल हे त्यामागचे खरे कारण असते. मला असे वाटते की धोके समजून घेऊन, पैशांची अधिक हाव न करण्याचे शहाणपण व धैर्य त्याच्यात आहे. मी व्यवसायात अनेक महारथी पाहिले आहेत जे त्यांच्या हव्यासापोटी सपशेल अपयशी ठरले व अधिक नफा मिळविण्याच्या नादात चांगल्या चाललेल्या व्यवसायाचा नाश केला! उद्योगात यशस्वी ठरलेल्या व चांगली प्रतिमा असलेल्या कोणत्याही व्यवसायिकाचे यामुळे नक्कीच डोळे उघडतील. फार कमी लोकांना स्वतःच्या क्षमतांची व मर्यादांची जाणीव असते! लोकांशी चांगले संबंध ठेवणे, त्याची सेवा करणा-यांचा आठवणीने व योग्यवेळी आदर-सत्कार करणे, या एका गुणामुळे गॉडफादर लोकांसाठी विशेष ठरतो.

ही व्यक्तिरेखा व तिचा पैसे कमावण्याचा मार्ग याविषयी वादविवाद करताना माझ्या एका चांगल्या मित्राने मला अनेक वर्षांपूर्वी एक प्रश्न विचारला होता, एक चोर अतिशय श्रीमंत आहे, त्याने चोरीकरुन मोठी मालमत्ता जमवली आहे; तो मूळचा ज्या गावचा आहे तिथे रुग्णालयाची नितांत गरज आहे. त्याने आपले नाव दिले जावे वगैरेसारखी कोणतीही अपेक्षा न ठेवता, रुग्णालयासाठी आवश्यक असलेला निधी देण्याची जबाबदारी स्वीकारली तर गावकरी त्याची मदत स्वीकारतील का? मी आजपर्यंत या प्रश्नाचे ठोस उत्तर देऊ शकलो नाही, कारण गावासाठी रुग्णालय आवश्यक आहेच, मात्र लोकांना लुटून मिळालेल्या पैशातून ते उभारले जावे का? तर दुस-या बाजूने विचार केल्यास लुटून मिळालेल्या पैशातून रुग्णालय उभारले तर ते सत्कारणी लागणार नाहीत का! गॉडफादरचे तत्वज्ञान स्वीकारताना आपणही अशाच पेचात पडतो.

यासंदर्भातील आणखी एक रोचक किस्सा म्हणजे कादंबरीवरील आधारित प्रसिद्ध चित्रपटात गॉडफादरची व्यक्तिरेखा साकारणा-या मार्लन ब्रँडो यांनी त्या भूमिकेसाठी मिळालेला ऑस्कर पुरस्कार नाकारला, कारण त्यांना गुन्ह्याचे उदात्तिकरण करायचे नव्हते! माझ्या मित्राने चोर व मंदिराविषयी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणेच ब्रँडोने केले ते चूक किंवा बरोबर हे मला सांगता येणार नाही, तरी त्या कृतीतून गॉडफादर हा परिपूर्ण नव्हता हेच सूचित होतेl!

कोणत्याही सुदृढ समाजाला गॉडफादरची गरज नसते. किंबहुना अशी पात्रे असल्यास सुसंस्कृत माणसे म्हणून आपण अपयशी ठरल्याचे ते प्रतीक आहे. व्यक्तिने स्वतःच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला पाहिजे, त्यास ओळखले पाहिजे व त्याचा आदर केला पाहिजे. तोपर्यंत असे गॉडफादर तयार होतच राहतील जे आपापल्या क्षेत्रात यशस्वी असतील व आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सत्ता गाजवतील, आणि आपल्याला जाणीवही होणार नाही की आपल्यावर त्यांची सत्ता आहे!


संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स





Saturday, 5 July 2014

घर नावाची व्यक्ती !





















एखादे घर फक्त एक ठिकाण नाही तर एक व्यक्ती बनू शकेल का कधी ?” … स्फेफनी पर्किन्स

स्फेफनी पर्किन्स ही एक अमेरिकी लेखिका आहे, तिची अनेक पुस्तके सर्वाधिक खपाची ठरली आहेत व वरील केवळ एक लहानसे वाक्य तिच्या लेखनाची ताकद किती आहे याची ओळख करुन देण्यासाठी पुरेसे आहे! मी घराविषयी अनेक अवतरणे पाहिली आहेत, किंबहुना घराविषयी विविध अवतरणे गोळा करणे हा माझा छंद आहे. याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे ते माझ्या व्यवसायाशी  निगडीत आहे, व दुसरे म्हणजे घर हे इतर बाजारू उत्पादनांसारखे नाही. बहुतेक लोक घराकडे केवळ एक वस्तू म्हणून पाहात नाहीत तर त्या चार भिंतीमध्ये त्यांना राहायचे असते. माझे स्वतःचेही मत आहे की घर म्हणजे केवळ दगड विटांनी बनलेली निर्जीव इमारत नसते. तर घराचा आराखडा तयार करण्यापासून ते बांधकामापर्यंत त्यात भावना गुंतलेल्या असतात व ज्यामध्ये भावना असतात मग घर निर्जीव कसे असू शकते! म्हणूनच मला स्टेफनीचे अवतरण फार भावले, कारण त्यामध्ये घराचा विचार जिवंत व्यक्ती म्हणून करण्यात आला आहे, केवळ काँक्रीटची इमारत किंवा आपण ज्याला अंतर्गत सजावट म्हणतो त्याचा सुशोभित संग्रह नाही!

इथे आपल्या आजच्या विषयाची सुरुवात होते, आपण जेव्हा घर ही एक व्यक्ती असल्याचे म्हणतो तेव्हा आपल्याला या व्यक्तिविषयी किती माहिती असते? अनेकदा घराचा ताबा घेतल्यानंतर, त्यात राहायला सुरुवात केल्यानंतर आपण या व्यक्तिला अधिक जवळून समजून घेऊ लागतो. मात्र ते बांधले जात असताना आपण त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच करत नाही, म्हणूनच एखाद्या नात्यामध्ये गैरसमजुतीमुळे जसा संघर्ष होतो तसाच इथेही होतो.
आता बरेच जण प्रश्न विचारतील की घराला समजून कसे घ्यायचे? घराला समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम त्यास सजीव म्हणून स्वीकारा, म्हणजे तुम्ही त्याच्या किती गोष्टींकडे दुर्लक्ष करता हे जाणवेल. एखाद्या व्यक्तिप्रमाणे घराची उभारणी कशी झाली, त्याच्या शारीरिक मर्यादा कोणत्या आहेत, हे माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे व त्यासाठी तुम्ही त्याच्या निर्मात्याशी म्हणजे बांधकाम व्यवसायिकाशी बोलायला हवे! ज्याप्रमाणे मूल वाढत असताना त्याची योग्य निगा राखावी लागते, त्याचप्रमाणे घर बांधतानाही खूप लक्ष द्यावे लागते. एखाद्या चांगल्या शिक्षकाच्या हातात विद्यार्थाचे सोने होते, त्याचप्रमाणे इथेही साहित्य व कारागिरी अतिशय महत्वाची असते. लक्षात ठेवा ही घर नावाची व्यक्ती किमान ५०-६० वर्षे तुमच्या कुटुंबाचा एक भाग होणार असते, त्यामुळे इतकी वर्षे आजारी न पडता तुमच्यासोबत राहण्यासाठी ती पुरेशी सशक्त असली पाहिजे. असे झाले तरच तुम्हाला तिच्या साथीचा आनंद अधिक चांगल्याप्रकारे उपभोगता येईल. त्याचसाठी तुम्ही तिची निर्मिती व अंतर्गत बाबी समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्येकाने घराच्या कोणत्या आजारपणांना तोंड द्यावे लागणार आहे हे, किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर घराच्या देखभालीविषयी समजून घेतले पाहिजे!
पुण्यामध्ये अलिकडच्या काळात देखभालीचे नेहमी आढळणारे मेन्टेनन्सचे काम म्हणजे घरातील भिंतींना पडलेल्या भेगा. ब-याचदा या भेगा ताबा मिळाल्यानंतर वर्षभरात दिसून येतात व लोक त्यामुळे काळजीत पडतात कारण त्या अतिशय वाईट दिसतात व दुसरे म्हणजे त्यामुळे घराच्या तब्येतीविषयी आपल्या चिंता वाटू लागते. अशाप्रकारे भेगा पडण्याची अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम आपण या भेगांचे स्वरुप पाहिले पाहिजे. पुण्यामधील बांधकामामध्ये वापरलेल्या पद्धती व कारागिरीनुसार साधारणपणे तीन प्रकारच्या भेगा पडतात. पहिल्या प्रकारच्या भेगा भिंतीच्या पृष्ठभागावर कुठेही पडतात. त्या खोलवर नसतात तर केवळ रंग व प्लास्टर अशा पृष्ठभागावरच असतात. या भेगा प्रामुख्याने वाळूमध्ये मातीची टक्केवारी अधिक असल्यामुळे तसेच औष्णिक ताणामुळे (थर्मल स्ट्रेस) पडतात. पुण्यामध्ये मिळणारी बहुतेक वाळू ही नदीतील असते व त्यामध्ये चिकणमातीचे कण असतात व ही चिकणमाती कोरडी झाल्यानंतर आकुंचन पावते व त्यामुळे भेगा पडतात. आणखी एक कारण म्हणजे उन्हाळ्यात रात्री १५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते तर दुपारी ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, त्यामुळेच बांधकामाच्या आकुंचन-प्रसरणामुळे अशाप्रकारच्या भेगा पडतात. या भेगा धोकादायक नसतात व बांधकामाच्या वेळी योग्य तंत्र वापरुन त्यांचे प्रमाण कमी करता येते. वाळू धुवून व चाळणीद्वारे गाळून घेतली पाहिजे म्हणजे प्लास्टर करण्यापूर्वी त्यामध्ये कमीत कमी माती असेल. प्लास्टर केल्यानंतर पाणी मारणेही महत्वाचे आहे. आजकाल बरीच रसायने मिळतात जी आपण मसाल्यात (मॉर्टर) अधिमिश्रण म्हणून घालू शकतो व त्यामुळे उष्णतेचा ताण कमी होतो व मसाला अधिक लवचिक होतो. अशी सर्व खबरदारी घेतल्यानंतरही अशा भेगा पडण्याची शक्यता असते, याचे कारण म्हणजे आपण बांधकामासाठी सध्या वापरत असलेली चौकटीची रचना. आपण आरसीसी चौकट उभारतो म्हणजे सर्वप्रथम स्तंभ (कॉलम), तुळई (बीम) व स्लॅब उभारतो व त्यानंतर त्यामध्ये विटा/ठोकळे घालून भिंत बांधतो. यामुळे तुळई किंचित वाकते, खालील भिंतीमुळे या वाकण्यास प्रतिबंध केला जातो व भिंतीवर ताण निर्माण होतो. तुळई व भिंतींच्या जोडापाशी एक विशेष थर देऊन हे सर्व कमी करता येते. हा थर गादीसारखे काम करतो व तुळई वाकत असताना तिला आधार देतो, मानवी डोळ्याला हे दिसत नाही मात्र हे सतत घडत असते.
दुस-याप्रकारच्या भेगांमध्ये एक साम्य असते व सर्वसाधारणपणे त्या स्तंभ व भिंती किंवा तुळई व भितींच्या सांध्यापाशी पडतात. या भेगा प्रामुख्याने घर बांधताना दोन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य जोडल्यामुळे पडतात म्हणजेच आरसीसी व विटा/ठोकळे (ब्लॉक्स). इथेही योग्य कारागिरीद्वारे या भेगा कमी करता येतात, उदाहरणार्थ प्लॅस्टर करताना सांध्याच्या लांबीएवढी चिकन मेश (पोलादी बारीक तारांची जाळी) बांधणे. या जाळीमुळे स्तंभ व भिंतींदरम्यानचा जोड व्यवस्थित सांधला जातो व त्यावरील भेगा कमी होण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे रंग देण्यापूर्वी या भेगा खरवडून त्यात पुट्टी किंवा प्लास्टिक साहित्य भरावे लागते. या दोन्ही प्रकारच्या भेगा दोन वा तीन वर्षांनी घर आतुन रंगल्यावर सहसा परत येत नाहीत.तिस-या प्रकारच्या भेगा गंभीर स्वरुपाच्या असतात कारण त्या भिंतीतून आरपार जाणा-या असतात, भिंतीमधील जोड व्यवस्थित नसेल किंवा विटा निकृष्ट दर्जाच्या असतील किंवा बांधकाम मजबूत नसेल तर अशा भेगा पडतात. या भेगांमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची असल्यास तज्ञांना दाखवले पाहिजे. पहिल्या दोन प्रकारच्या भेगांमुळे बांधकामाला अजिबात धोका नसतो. आपण तीन-चार वर्षांनी घराला रंग देताना या भेगा खरवडून त्यात पुट्टी भरली तर पुढील वर्षांमध्ये त्या पडत नाहीत. मात्र तिस-या प्रकारच्या भेगा काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत, त्यांच्या कारणाचे विश्लेषण करुन सल्लागाराच्या देखरेखीखाली त्यावर उपाययोजना केली पाहिजे. एखाद्या व्यक्तिप्रमाणे घरालाही आजार होतात व या भेगा अगदी नेहमी आढळणा-या आजारांपैकी एक आहेत.
अशाचप्रकारे आढळणारा आणखी एक आजार म्हणजे भिंतींना ओल येणे व गळणे यात फरक आहे. वरील किंवा शेजारच्या सदनिकेच्या Ta^यलेट मधील प्लंबिंगमध्ये काही दोष असल्यास स्लॅबद्वारे पाणी गळते वा भिंतीतुन पण पाणी झिरपते, त्याशिवाय गच्चीवरुन किंवा छतावरुन सुद्धा पावसाळ्यात गळते. मात्र ओल लागणे म्हणजे बाहेरील भिंतीचा ओलसरपणा, जो आतून जाणवतो व दिसतो. हे केवळ बाहेरील भिंतींवर पाऊस पडल्यामुळे होते, भिंतींच्या व तुळईच्या किंवा स्तंभांच्या सांध्यांमधून हे पाणी झिरपत सदनिकेमध्ये येते. ब-याचदा भिंती बाहेरील बाजूने पृष्ठभागावर पडलेल्या भेगांद्वारे पाणी शोषतात, पाणी शोषण्याची क्षमता संपल्यानंतर ते साचते व भिंतींच्या आतमध्ये पसरते. याठिकाणीही कारागिरी अतिशय महत्वाची आहे. बाहेरील प्लास्टरचे दोन थर (डबल कोट) असतील व वर नमूद केलेल्या अधिमिश्रणाचा त्यात वापर केला असेल तर बाह्य पृष्ठभागावर कमीत कमी भेगा पडतील व ओल कमी होईल. त्याशिवाय चांगल्या दर्जाच्या रंगामुळे पावसाचे पाणी शोषले जात नाही व ओल कमी येते. आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे किमान पाच वर्षांनी संपूर्ण इमारतीच्या बाह्य भागास रंग दिला पाहिजे, कारण रंगाचेही आयुष्य असते व हवामानाच्या परिणामामुळे तो निघून जातो. आपण बहुतेकवेळा सदनिकेच्या आतील भागाला रंग देतो, मात्र क्वचितच सर्व सदनिकाधारक एकत्र येवून ठराविक वर्षांनी इमारतीला बाहेरुन रंग देतात!

लक्षात ठेवा कोणत्याही भिंती वॉटरप्रूफ (जलप्रतिबंधक) करता येत नाहीत मात्र चांगल्या कारागिरीने त्या चांगल्या जलप्रतिरोधक बनविता येतात. आपल्या शहरात पाऊस सुरु झाला की सलग काही दिवस पडतो व अशाच वेळी कामाच्या दर्जाची खरी कसोटी असते!
कोणत्याही घरासाठी पाणी गळणे ही अतिशय वाईट समस्या आहे; माणसांशी तुलना केल्यास ती कर्करोगाप्रमाणे आहेमात्र मी एक अभियंता म्हणून सांगू शकतो की पाणी गळणे सहजपणे हाताळता येऊ शकते किंवा ते पूर्णपणे टाळताही येऊ शकते. भेगा किंवा ओल लागण्यावर तुमचे नियंत्रण नसते, मात्र योग्य तंत्र वापरुन व काळजीपूर्वक काम करुन पाणी गळणार नाही याची तुम्ही खबरदारी घेऊ शकता. गळण्याचेही दोन प्रकार आहेत, एक चुकीच्या प्लंबिंगमुळे (नळजोडणी) लागते व दुसरी सदोष वॉटर प्रूफिंगमुळे (जल प्रतिबंधन) लागते. पाणी गळती रोखण्याचे पहिले व अतिशय मूलभूत तत्व म्हणजे पाणी एका ठिकाणी साचू न देणे व योग्य उताराद्वारे त्याचा निचरा करणे. साचलेल्या पाण्यामुळे निश्चितपणे पाणी गळती होते कारण ते बाहेर पडण्यासाठी जागा शोधते मग खालील सदनिकेमध्ये किंवा भिंतीमधून शेजारच्या खोलीत पाणी गळते! बहुतेकवेळा लोक सर्वात वरच्या मजल्यावरील सदनिका खरेदी करायला घाबरतात कारण छतावरुन पाणी गळण्याची शक्यता असते, मात्र योग्य क्राँक्रिटीकरण, काळजीपूर्वक वॉटर प्रूफिंग व छताच्या स्लॅबला योग्य उतार दिल्यास पाणी अजिबात गळत नाही असा माझा अनुभव आहे. ब-याचदा शौचालय किंवा मोरी यासारख्या ओल्या भागांमध्ये जमीनीचा उतार व्यवस्थित नसतो व पाणी जमीनीवर राहिल्याने ते गळते. त्याशिवाय सर्व जलवाहिन्यांची विशेषतः भिंतीच्या आतील (कन्सील्ड) वाहिन्यांची दाब चाचणी करणे आवश्यक आहे ज्यामुळे या वाहिन्यांमधून भविष्यात गळती टाळता येईल.

घराविषयीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत व थोडेसे कुतुहल असेल तर तुम्ही तुमचे घर अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकताकेवळ माहितीपत्रक व जाहिरातीवर न जाता विकासकाच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांना भेट द्या, त्या घरांशी व त्यातील रहिवाशांशी चर्चा करा. यामुळे तुम्हाला तुम्ही शोध घेत असलेल्या तुमच्या घराची जडणघडण कशी झाली आहे याची व्यवस्थित कल्पना येईल. आपण लग्नाच्या वेळी नवीन नाते जोडताना ज्याप्रमाणे नवरा किंवा नवरीचे नातेवाईक किंवा मित्रांशी चर्चा करतो; तो किंवा ती कशा वातावरणात वाढले आहेत हे जाणून घेतो, घराचे देखील तसेच असते! एकदा आपण घराला व्यक्ती मानल्यानंतर पुढील प्रक्रिया सारखीच असते.
तुमचे स्वतःचे घर कसे तयार झाले आहे व त्याचे निर्माते कोण आहेत हे जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहेघर तुमच्या कुटुंबाचा एक भाग झाल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करु नका;तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच त्यालाही तुमच्या काळजीची व आपुलकीची गरज आहेम्हणूनच तुम्ही ज्या घरात राहताय त्यासाठी थोडा वेळ व पैसे खर्च करा, तरच ते तुमचे साथीदार बनेल व आपल्या भावना तुम्हाला सांगेलमला असे वाटते त्यानंतर ते तुमचे खरे घर होईल, एका चालत्या-बोलत्या सजीव व्यक्तिप्रमाणे, मग त्या केवळ तुम्हाला बाह्य जगापासून स्वतंत्र करणा-या चार भिंती राहणार नाहीत तर ते तुमच्या सुख दु:खात सहभागी होणारे एक व्यक्तिमत्व होईल !

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




Tuesday, 1 July 2014

दिल हे छोटासा, छोटीसी आशा !

























शहर हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे असते व त्यामध्ये अनेक इच्छा व थोडे भय पण असते.                           … इटॅलो कॅल्व्हिनो


इटॅलो कॅल्व्हिनो यांचा जन्म क्युबात झाला व ते इटलीत मोठे झाले. ते एक पत्रकार व लघुकथा लेखक व कादंबरीकार होते. ते शहरी जीवनाचे अतिशय बारकाईने निरीक्षण करत असत. ते पुण्याचा रहिवासी नसले तरीही त्यांचे शब्द आपल्या प्रिय पुण्यासाठीच लिहील्यासारखे वाटतात! आपल्यापैकी बहुतेक जण जेव्हा रोज सकाळी आपल्या ताज्या वृत्तपत्राची पाने चाळतात तेव्हा त्यामध्ये आपल्याला इटॅलोच्या अवतरणाचे प्रतिबिंब दिसून येते. बहुतेक पाने या शहरातील समस्या किंवा आपल्याला जाणवणारे सेवा सुविधांविषयीचे भय याविषयीच्या बातम्यांनी भरलेली असतात. शहराला जाणवणा-या या समस्या किंवा भय सर्व पातळ्यांवरील असते मग रस्त्यावरील रहदारी असो किंवा रस्त्यांची स्थिती किंवा सीसी टीव्ही/कॅमेरे किंवा सार्वजनिक शौचलय किंवा पाणी पुरवठा किंवा अगदी महापालिकेच्या शाळांमधील मुलांचा गणवेश सुद्धा जणु यंत्रणेच्या प्रत्येक आघाडीला एखाद्या विषाणुचा संसर्ग झाल्यासारख्या वाटतो आहे व ज्याप्रकारे सबंधित यंत्रणेने काम करणे अपेक्षित आहे त्याप्रकारे ती करत नाहीये. आपण शहराकडून अगदी साध्या अपेक्षा करतो मात्र त्याही कधी पूर्ण होत नाहीत. ज्या यंत्रणा आपले जीवन अधिक उत्कृष्ट नाही तर किमान चांगले बनविण्यासाठी आहेत त्याद्वारे शहरातील नागरिकांना काही चांगला अनुभव आला असे आपण क्वचितच वाचतो!

मला नेहमी आश्चर्य वाटते की आपला दृष्टिकोन नकारात्मक असल्यामुळे आपण क्वचितच चांगल्या कामचे कौतुक करतो किंवा सर्व नागरी पातळ्यांवर आपण इतके वाईट आहोत की नकारात्मकता हेच एकमेव तथ्य आहे व त्यालाच आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे! सीसीटीव्हीसारखी लहानशी गोष्ट घ्या. कुणे एकेकाळी शहर केवळ गुन्ह्यांच्या बाबतीतच नाही तर सामाजिक वातावरणाच्या बाबतीत एखाद्या किल्ल्याइतके सुरक्षित मानले जायचे. मी पुण्याच्या रिअल इस्टेट उद्योगाचे मार्केटिंग करताना अगदी अलिकडेपर्यंत अनिवासी भारतीय वा पुण्याबाहेरील लोकांसमोर पुण्याचे कौतुक करताना सांगत असे, तुम्हाला उत्तम सामाजिक जीवन हवे असेल तर पुण्याकडे पाहा, इथे महिला सुरक्षित आहेत, फक्त येथेच चित्रपटाचा शेवटचा खेळ पाहून त्या रात्री एकट्या दुचाकीवर घरी जाऊ शकतात! सुरक्षेची याहून अधिक चांगली खूण दुसरी काय असू शकते? मात्र आता आपण हे म्हणू शकतो का व मी म्हणालो तरी लोक माझ्यावर विश्वास ठेवतील का? रस्त्यावर आजकाल दिवसाढवळ्या सर्रास महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या साखळ्या खेचल्या जातात व यासाठी सुरक्षा द्यायची सोडून पोलीस महिलांनाच आवाहन करतात की रस्त्यावरुन जाताना दागिने घालू नका, याहून अधिक असुरक्षित जीवन काय असू शकते? असो या लेखाचा हा विषय नाही, मात्र जर्मन बेकरी बाँबस्फोटानंतर शहरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असे प्रत्येक नेता म्हणाला होता व या स्फोटांना जवळपास तीन वर्ष झाल्यानंतर आपल्याला शहरात किती सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले दिसतात? ब-याच रहदारीच्या चौकांमध्ये ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत, सिग्नल तोडणा-या वाहनांची जवळपास दहा लाख छायाचित्रे त्यामध्ये टिपलेली असतील, मात्र या कॅमे-यांची देखभाल कोणते डिपार्टमेंट करणार हे निश्चित नसल्याने त्यातील डाटा वाया गेल्यासारखाच आहे! सीसीटीव्हीतून मिळालेल्या दृश्यांमुळे सिग्नल तोडणा-या एखाद्या व्यक्तिला शिक्षा झाल्याचे आपण ऐकले आहे का? ब-याच ठिकाणी गुन्हे घडत असतात व संबंधित सीसीटीव्हीतील दृश्ये पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे आपण ऐकतो व त्यानंतर आपल्याला समजते की दर्जा खराब असल्याने त्या सीसीटीव्ही दृश्यांचा काही उपयोग नाही! त्याशिवाय सीसीटीव्हीच्या केबल्स टाकण्यासाठी नवीन/जुने डांबरीकरण झालेले रस्ते खणले जातात. सार्वजनिक पैशातून रस्ते बांधले जातात, आपल्याला जर माहिती आहे की सीसीटीव्हीच्या केबल्स टाकायच्या आहेत तर त्यासाठी हे रस्ते तयार करतानाच तरतूद करण्यास कुणाची मनाई आहे का? हे कॅमेरे बसविण्यात आलेच तर ते चांगल्या दर्जाचे असतील व त्यात घेतलेल्या प्रतिमांवर वेळीच प्रक्रिया केली जाईल व ज्या हेतूने ते बसविण्यात आले आहेत त्यासाठी वापरल्या जातील याची खात्री कोण देणार! मी जाणीवपूर्वक सीसीटीव्हीची समस्या घेतली कारण सकृतदर्शनी ती रिअल इस्टेटशी संबंधित नसेलही मात्र शहरासंबंधीच्या या अशा लहान मुद्यांविषयीच्या  आपल्या दृष्टिकोनातूनच पाणी व रहदारीसारख्या मोठ्या समस्यांबाबत काय होईल हे दिसून येते!
शहराविषयीच्या समस्यांबाबत चर्चा करताना सामान्यपणे रहदारी, सार्वजनिक वाहतूक, पाणी व वीज याविषयी चर्चा केली जाते मात्र आपण क्वचितच शौचालये, सार्वजनिक आरोग्य सुविधा, शिक्षण, क्रीडा सुविधा, बाजार, सार्वजनिक बागा तसेच तरणतलाव व अशा इनेक विषयांवर विचार करतो. वर्तमानपत्रे मध्यमवर्गाद्वारे वाचली जातात व वर उल्लेख केलेल्या सर्व सुविधा त्यांच्याद्वारे फारशा वापरल्या जात नाहीत त्यामुळे त्यासाठी ओरड केली जात नाही व नेमक्या याच परिस्थितीचा प्रशासकीय संस्था फायदा घेतात. आपण विसरत आहोत की शहर हे सार्वजनिक सुविधांवर चालते खाजगी नाही. ज्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे व जे डिझायनर फ्लॅटमध्ये राहतात त्यांना बागा, सार्वजनिक शौचालये किंवा सार्वजनिक वाहतुकीची काळजी करायची गरज नाही. त्यांच्याकडे खाजगी तरणतलाव, जिम व त्यांच्या स्वतःच्या कार आहेत, त्यामुळे केवळ त्यांच्या कारसाठी रुंद रस्ते असावेत, त्यांच्या तरणतलावांना किंवा पाण्याच्या टाक्यांना पाणीपुरवठा व्हावा एवढीच त्यांची चिंता असते व ते कितीही पैसे खर्च करुन हे सर्व विकत घेऊ शकतात.

मात्र आपण जेव्हा परवडण्यासारखी घरे असे म्हणतो तेव्हा या पायाभूत सुविधा परवडण्यासारख्या असल्या पाहिजेत व त्या आघाडीवर आपण वारंवार अपयशी ठरलो आहोत व ही परिस्थिती बदलताना दिसत नाही. पुरेशी सार्वजनिक शौचालये असणे, विशेषतः महिलांसाठीची शौचालये व त्यांची देखभाल करणे हे आपल्याला शक्य झालेले नाही. स्थानिक प्रशासकीय संस्था किंवा राजकीय पक्ष याकामात खाजगी क्षेत्राने पुढाकार घ्यावा व पीएमसीला मदत करावी यासाठी प्रयत्नही करताना दिसत नाहीत. कॉर्पोरेट कंपन्यांना सार्वजनिक शौचालये दत्तक घेण्यास सांगण्यासारख्या साध्या गोष्टीही आपण करु शकत नाही, असे करायला कुणी तयार नाही असे नाही, तर यासाठी आवश्यक इच्छाशक्तिचा आपल्याकडे अभाव आहे. एकीकडे आपण शहराचे नाव जागतिक नकाशावर नेण्याचा प्रयत्न करत आहोत तर प्रत्यक्षात मात्र आपण या शहराला बदनाम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे विसरतोय. आपण स्वच्छ सार्वजनिक शौचालयेही देऊ शकत नसू तर इथे येण्या-या पाहुण्यांसमोर आपण आपली चांगली प्रतिमा कशी निर्माण करणार आहोत ?

आपल्या स्थानिक बस सेवेच्या बस थांब्यांची स्थिती पाहा, स्टेनलेस स्टीलच्या चकाचक दिसणा-या बस थांब्यांवर एवढे पैसे खर्च केल्यानंतर ते ज्यासाठी बांधण्यात आले आहेत त्यासाठी त्यांचा उपयोगच होत नाही! कोणत्याही बस थांब्यावर बसचा मार्ग किंवा तिच्या वेळा यासारखी मूलभूत माहितीच दिलेली नसते व लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा अशी आपली अपेक्षा असते! बहुतेक वेळा बस थांबा थेट पादचारी पथावरच बांधलेला असतो त्यामुळे बसथांबाही वापरता येत नाही व पादचारी पथही वापरता येत नाही. त्याशिवाय बस या थांब्यावर कधीच थांबत नाही किमान त्याआधी किंवा पुढे शंभर फूट थांबतात हा तर आणखी एक विनोदच आहे.
महापालिकेच्या शाळांविषयी व रुग्णालयांविषयी कितीतरी वेळा इतके लिहून आले आहे की, आता ब-याच वृत्तपत्रांनी व पत्रकारांनी याविषयी लिहीणेच सोडून दिले आहे. मला नेहमी वाटते की सर्व नेत्यांना तसेच अधिका-यांना या सुविधा स्वतःसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी वर्षातून किमान एकदा तरी वापरण्याची सक्ती का करु नये, म्हणजे सामान्य माणसाला कशाप्रकारच्या सेवा मिळतात याची त्यांना जाणीव होईल असे. जे शहर भावी नागरिकांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही किंवा चांगल्या आरोग्याची खात्री देऊ शकत नाही ते शहर रसातळाला जाईल हे कटू सत्य आहे.
आपण पाणी पुरवठ्याविषयी बोलते मात्र जलवाहिन्यांची लांबी, त्यांचा नकाशा यासारखी तांत्रिक माहिती तर सोडाच मात्र शहराला नेमका किती पाणीपुरवठा होतो, शहराची पाण्याची प्रत्यक्ष मागणी किती आहे अशी मूलभूत माहितीही आपण देऊ शकत नाही. एक नागरिक म्हणून आपल्याला पाणी पुरवठ्याविषयी अचूक माहितीही मिळत नसेल तर प्रत्यक्ष पाणी मिळण्याबाबत भविष्य कसे असेल हे सांगण्यासाठी कुणा महान व्यक्तिची गरज नाही! शहराच्या तथाकथित अधिका-यांकडून आपल्याला विविध प्रकारची मोघम उत्तर वाचायला किंवा ऐकायला मिळतात.

आपण जेवढा अधिक विचार करतो तेवढे अधिक नैराश्य येते, अर्थात सर्वकाही संपलेले नाही. नेहमीप्रमाणे अनेक जणांना प्रश्न पडला असेल की या सगळ्याचा रिअल इस्टेटशी काय संबंध आहे. शेवटी रिअल इस्टेट म्हणजे तरी काय, तर शहरच ना? लोकांना जिथे राहायला आवडते तेथे घरे विकली जातात व आपल्याकडे जशा पायाभूत सुविधा आहेत त्यातून एक दिवस असा येईल की इथे कुणीच राहायला येणार नाही. लोकांचे जीवन सोपे होईल अशी घरे बांधणे ही काळाची गरज आहे व हे केवळ चांगल्या पायाभूत सुविधांमुळेच शक्य आहे. शहराची वाढ कर्करोगाच्या पेशींप्रमाणे झपाट्याने होत आहे मात्र ही निरोगी वाढ नाही; कोणे एकेकाळी निरोगी मानल्या जाणा-या पुणे नावाच्या शरीराला ती हळूहळू विषाक्त करत आहे. आजूबाजूच्या पंधरा गावांच्या समावेशाने शहराचा विस्तार झालाच आहे आता लवकरच आपण आणखी पस्तीस गावेही गिळंकृत करणार आहोत! हे आवश्यक आहे हे मान्य असले तरीही आपल्याकडे जे आहे त्याचे आपण काय केले आहे याचे विश्लेषण करणेही तितकेच महत्वाचे आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला, केवळ रिअल इस्टेट क्षेत्रातीलच नाही तर प्रत्येक सामान्य माणसाला वस्तुस्थितीची जाणीव होत नाही व त्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली जात नाही तोपर्यंत शहराचे भविष्य ठरलेले आहे व ते निश्चितच चांगले नाही! आपल्यापैकी अनेकांना दिल है छोटासा, छोटीसी आशा हे गाणे आठवत असेल, त्याचप्रमाणे हे शहर टिकावे व समृद्ध व्हावे यासाठी त्याच्या आपल्या सर्वांकडून अतिशय लहान गरजा व अपेक्षा आहेत, मात्र आपल्याकडे शहराच्या गरजा जाणून घेण्याइतपत संवेदनशीलता आहे का? केवळ एकमेकांवर आरोप केल्याने शहर वाचणार नाही तर त्यासाठी एकजूट होऊन काम करणे ही काळचीच नाही तर शहराचीही गरज आहे व तसे केले तरच आपण स्वतःला अभिमानाने पुणेकर म्हणू शकू !


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स