Monday, 14 January 2013

चांगला बिल्डर !





 
 
 

खरोखर वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिक नव्हते तो आनंदी काळ होता... सेनेका

मी वरील अवतरण अनेकदा वापरलं आहे, ते खरंच किती समर्पक आहे व ज्याप्रकारे त्या विद्वान माणसाने ते केले आहे त्याचे मला नेहमी आश्चर्य वाटते! अर्थात तेव्हा बांधकाम व्यावसायिक हा शब्द आजच्या इतका प्रचलित नसला तरी त्या जमातीविषयीची सर्वसाधारण भावना आजच्यासारखीच होती! इथे माझे बरेच सहकारी दुखावले जातील, मात्र हे माझे नाही तर सेनेका सारख्या  प्रसिद्ध व्यक्तीचे विधान आहे! माझे मित्र रवी करंदीकर अलिकडेच माझ्याशी चर्चा करत होते, ते स्वतःपण रिअल इस्टेट उद्योगाचे सन्माननीय समीक्षक टिकाकार आहेत. त्यांनी मला सहजपणे प्रश्न विचारला की एक चांगला बांधकाम व्यावसायिक कसा ओळखायचा? क्षणभर मी जरा बुचकळ्यात पडलो कारण चांगला बांधकाम व्यावसायिक तुमच्यासमोर उभा आहे असं म्हणणं जरा आगाऊपणाचं ठरलं असतं! विनोदाचा भाग सोडला, तर मी उत्तर दिलं, की एक चांगला बांधकाम व्यावसायिक सर्वप्रथम एक चांगली व्यक्ती असला पाहिजे! हे उत्तर गृहित धरलेलं असलं तरीही, मला स्वतःला जाणीव झाली की हा तर्क तर प्रत्येक व्यवसायाला लागू होतो, त्यामुळे मूळ प्रश्न तसाच राहतो; चांगल्या बांधकाम व्यावसायिकाची वैशिष्ट्ये काय? येथे  मला आठवतंय एकदा माझ्या शाळकरी मुलानं मला एक विनोद सांगीतला "दोन सरदार बुद्धिबळ खेळत होते!" मी म्हणालो यात काय विनोद आहे? त्याने उत्तर दिले, तोच तर खरा विनोद आहे! इथे मला कोणत्याही संप्रदायाला दुखवायचं नाही, वा त्यांची थट्टा करायची नाही मात्र याच प्रकारे ब-याच लोकांना चांगला बांधकाम व्यावसायिक शोधणं हा प्रश्नच एक विनोद वाटतो! कारण  ब-याच जणांसाठी चांगला बांधकाम व्यावसायिक अशी संकल्पनाच अस्तित्वात नाही!

माझ्या उद्योगासाठी ही दुर्दैवी बाब आहे, आपण कितीही नकार दिला तरी सामान्य माणसाचं रिअल इस्टेट विषयीचं मत कधीच चांगलं नव्हतं व चांगलं नाही, ही बाब बांधकाम व्यावसायिकही मान्य करतील. ही भावना केवळ गेल्या काही वर्षातली किंवा केवळ आपल्या देशापुरती मर्यादित नाही तर ही बांधकाम व्यावसायिकांचं नाव घेताच निर्माण होणारी सार्वत्रिक भावना आहे. तुम्ही अमेरिका किंवा कोणताही विकसित देश घ्या तिथेही बांधकाम व्यावसायिक सर्वात प्रामाणिक असल्याचं मानलं जात नाही. आपल्या सर्व चित्रपटांमधूनही बांधकाम व्यावसायिकांचं वाईट माणूस असंच चित्र रेखाटलं जातं, जो नेहमी कायद्याविरुद्ध वागतो! मग अशा वेळी चांगला बांधकाम व्यावसायिक कसा ओळखायचा? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या व्यवसायाची आजच्यासारखी प्रतिमा का निर्माण झाली हे आपण समजून घेण्याची गरज आहे. चांगली व्यक्ती शोधण्यासाठी आधी वाईट गुण कोणते आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. आर्य चाणक्य, या इतिहासातील अतिशय महान प्रशासकाने, "कौटिल्य अर्थ शास्त्र " हा ग्रंथ लिहीला, ज्यामध्ये त्याने सोनारापासून ते घोड्यांच्या व्यापा-यांपर्यंत अनेक व्यावसायिक कसे ओळखायचे हे सांगीतले आहे. त्याने सांगीतलेले निकष आजही लागू होतात एवढे त्याचं व्यक्तिंचं व त्यांच्या व्यवसायाविषयीच्या दृष्टीकोनाबाबत विश्लेषण अचूक होतं. दुर्दैवानं त्याच्या काळी बांधकाम व्यावसायिक नावाची जमात नव्हती, असती तर रवीच्या प्रश्नाचं उत्तर मला सहजपणे देता आलं असतं, कारण उत्तरादाखल मी त्याला केवळ त्या ग्रंथाची एक प्रत दिली असती!

वेळोवेळी बांधकाम व्यावसायिकांच्या समुदायावर आरोप केला जातो की ते पैशांच्या मागे लागलेले असतात पण मग आजच्या जगात कोण पैशांच्या मागे लागत नाही? बांधकाम व्यवसायिक गर्विष्ठ असतात व ग्राहकांच्या समाधानाची त्यांना अजिबात चिंता नसते अशी आणखी एक तक्रार असते. पण आपल्या देशात बांधकाम व्यावसायिकच कशाला अनेक कंपन्या ग्राहकांना व्यवस्थित सेवा देत नाहीत? तुम्हाला आठवतंय पूर्वी जवळपास वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, अतिरिक्त पैसे देऊन कशा प्रकारच्या स्कूटर किंवा चार चाकी वाहने मिळायची? कंपन्यांना उत्पादनाचे संशोधन व विकास व ग्राहकाच्या उत्पादनाकडून असलेल्या मागण्या यांची कधीच चिंता नसायची; या कंपन्यांना विदेशी ब्रँड्सकडून जोरदार स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यानंतर हे चित्र बदललं! जेव्हा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला तेव्हा आपल्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांची उत्पादनं सुधारण्यास सुरुवात केली, ग्राहक सेवेविषयीचा त्यांचा दृष्टीकोन कसा आहे हे सर्वांना माहिती आहेच, त्यामुळे अशा प्रकारच्या दृष्टीकोनासाठी केवळ बांधकाम व्यावसायिकांनाच का दोष द्यायचा? आणखी एक आरोप म्हणजे ते ग्राहकांसाठी सहजपणे उपलब्ध होत नाहीत; अर्थात आपल्या देशातील एक टाटा सोडले तर कोणतेही उद्योजक किंवा व्यावसायिक यासाठी प्रसिद्ध नव्हते, त्यामुळेच प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तसे टाटा या बाबतीतले अपवाद म्हणावे लागतील!  त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांची, नेते व समाजातील गुंडांशी हातमिळवणी असते असा आरोप होतो; इथेही ब-याच उद्योगांचे सत्ताधा-यांशी संबंध असतात व ते त्याचा वापर करुन त्यांना अनुकूल धोरणे बनवून घेतात याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. ज्या देशात सर्वोच्च राजकीय नेते त्यांच्या देशापेक्षा वैयक्तिक हिताला महत्व देतात तिथे हे नवीन नाही! यासाठी केवळ बांधकाम व्यावसायिकांनाच का दोषी मानायचे?  अजून एक आरोप म्हणजे आपल्या देशात घरासारख्या अतिशय संवेदनशील उत्पादना संदर्भात, बांधकाम व्यावसायिक आश्वासन पाळत नाहीत, आणि हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्यामुळेच विकासकांची प्रतिमा डागाळली आहे. तुम्ही ग्राहकाच्या त्याच्या बांधकाम व्यावसायिकाविरुद्धच्या एकूणच तक्रारी पाहिल्या तर त्यातल्या ९०% या दिलेले आश्वासन पूर्ण न करण्यासंदर्भातल्याच असतील. या वर्गवारीमध्ये ताबा देण्याच्या तारखेची आश्वासने न पाळणं, विशिष्ट बाबी, सुविधा पुरवण्या संदर्भातली आश्वासनं पूर्ण न करणं, परवानगी देणा-या अधिका-यांसमोर मान्य केलेल्या अटी व नियमांचे पालन न करणं इत्यादी व ही यादी वाढतच जाते. तक्रारीचे स्वरुप काहीही असेल मात्र तिचा गाभा एकच असतो की आश्वासनांचं पालन न करणं व विकासकाला त्याचं अपयश नजरेल आणून दिल्यानंतर तो त्याविषयी दिलगिरीही व्यक्त करत नाही!

तर मग दिलेल्या आश्वासनांचं पालन करणा-या बांधकाम व्यावसायिकाला चांगला  म्हणायचं का? खरं सांगायचं तर चांगला म्हणजे नेमकं काय याचं एकच वैशिष्ट्य सांगता येणार नाही, चांगला म्हणजे अनेक वैशिष्ट्यांचं मिश्रण, मात्र माझ्या मते त्याचा मुख्य निकष म्हणजे त्याची बांधीलकी! याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या व्यवसायाचे इतर पैलू म्हणजे त्याचे गुंतवणूकदार, त्याचा ग्राहकांविषयीचा दृष्टीकोन हे महत्वाचे नाहीत असं नाही, मात्र जर एखादी व्यक्ती विशिष्ट उद्दिष्टास बांधील असेल तर तो चुकीच्या गोष्टी करण्याची शक्यता कमी असते. ब-याच दिवसांपूर्वी माझ्या एका सिनीयर मित्राने मला गंमतशीर प्रश्न विचारला होता, "एका गावाला शाळेची गरज आहे, त्यासाठी ते देणग्या मागत आहेत, मूळचा त्या गावातला असलेला एक गुंड महानगरात खंडणी मागणं, तस्करी असे उद्योग करतो. तो शाळेच्या इमारतीसाठी मोठी देणगी द्यायचा निर्णय घेतो, गावक-यांनी ती स्वीकारावी का?"  इथे प्रश्नाचं उत्तर अतिशय अवघड होतं, या ठिकाणी काय अधिक महत्वाचं होतं हेतू का तो ज्याद्वारे पूर्ण होत आहे तो स्रोत? मला असं वाटतं जेव्हा बांधीलकीला महत्व दिलं जातं तेव्हा बांधकाम व्यावसायिकाची कंपनी, त्याचा ग्राहक सेवा व उत्पादनातील सुधारणा याविषयीचा दृष्टीकोन या बाबी प्रकाशझोतात येतात. बांधकाम व्यावसायिक वेळेत चांगल्या दर्जाची घरे देत आहे, मात्र त्याला गुन्हेगारी जगताकडून किंवा भ्रष्ट लोकांकडून अर्थपुरवठा होत असेल तर काय? अनेक जण म्हणतील ग्राहकांना त्याची चिंता करायची काय गरज आहे; त्याला जे आश्वासन देण्यात आले आहे ते त्याला मिळत आहे? इथे मी म्हणेन की तो ज्या चार भिंतींना घर म्हणतो त्या इतर कुणाच्या रक्तावर व घामावर उभारल्या आहेत हे माहिती असूनही त्यात झोपायचं आहे का याचा अंतिम निर्णय ग्राहकालाच घ्यायचा आहे!

आणखी एक बाब म्हणजे माझे बहुतेक ग्राहक बांधकाम व्यावसायिकाचा समूह, वा व्यक्ती म्हणून सामाजिक योगदान, तसंच त्याचा जीवनाविषयक दृष्टीकोन अशा वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करतात. पैसे कमावणे हा कोणत्याही व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे, आणि असावा मात्र तो कशाप्रकारे खर्च केला जातो हे देखील तेवढेच महत्वाचे आहे, कारण त्यातूनच समूह किंवा व्यक्तीचे चारित्र्य दिसते. कोणतीही वाईट व्यक्ती समाजातील गरजू लोकांचा विचार करणार नाही, त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करणार नाही किंवा पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षण, गरीब वर्ग  किंवा कोणत्याही सुदृढ समाजाचा कणा असलेल्या संस्कृतीचे जतन यासारख्या हेतूसाठी खर्च करणार नाही. यामागचा साधा तर्क असा आहे की तुम्ही इतरांचा विचार करु शकत असाल तर तुम्ही ज्यांना आश्वासन दिले आहे त्यांची नक्की काळजी घ्याल. त्यामुळे चांगला बांधकाम व्यावसायिक शोधताना तो किंवा त्याचा समूह समाजासाठी काय करत आहेत हे मी पाहीन.

बांधकाम व्यावसायिकाची जातकुळी तपासणंही तितकंच महत्वाचं आहे, कारण तुमचा भूतकाळ हा तुमच्या वर्तमानकाळाचा आरसा असतो असं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे.  एखाद्याचं मूल्यांकन केवळ माध्यमांमधील बातम्या, मोठ्या जाहिराती किंवा एखादा प्रसिद्ध ब्रँड प्रतिनिधी याद्वारे करण्याऐवजी; मी केवळ त्या बांधकाम व्यावसायिकानं याआधी बांधलेल्या प्रकल्पांमधील त्याच्या सध्याच्या ग्राहकांना जाऊन भेटेन व त्यांचे सदनिका आरक्षित करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतचे अनुभव कसे होते हे जाणून घेईन, त्यातून दिसून येणारं सत्य हे आरशासारखं लख्ख असेल! प्रकल्पाचं नियोजन, बांधणी व विक्रीनंतरची सेवा याद्वारे रहिवाशांचं जीवन अधिक आरामदायक होण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले आहेत हे पाहा! कंपनी नवीन असल्यास, सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांना भेट द्या व त्यांच्या कर्मचा-यांशी बोला व ते कशाप्रकारे संवाद साधत आहेत त्यावरुन जोखा म्हणजे तुमच्या प्रश्नांची ते किती झटपट उत्तरे देत आहेत तसंच त्यामधील पारदर्शकता इत्यादी. हे कर्मचारी, बांधकाम व्यावसायिक किंवा संस्थेचा चेहरा असतात, त्यांचे वरिष्ठ त्यांना जशी वागणूक देतात ते तसेच वागतील व त्याद्वारे तुम्हाला मुख्य व्यक्तिविषयी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल.

त्यामुळे एक असा चांगला बांधकाम व्यावसायित शोधण्यास सुरुवात करा व तुम्हाला बरेच चांगले बांधकाम व्यावसायिक सापडतील हे मला तुम्हाला सांगायचंय. त्यापूर्वी सर्वात शेवटची व महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की चांगला बांधकाम व्यावसायिक शोधण्यासाठी तुम्ही एक चांगला ग्राहक असणं आवश्यक आहे! कारण तुम्ही चांगले असाल तरच तुम्हाला चांगुलपणा ओळखता येईल व एक चांगला बांधकाम व्यावसायिक शोधण्याच्या आपल्या प्रवासात आपण याची स्वतःला आठवण करुन देणं आवश्यक आहे


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे
संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा



Saturday, 5 January 2013

नवीन वर्षं आणि सामान्य माणसाच्या घराचा अजेंडा


 
 
 
 
 
 

जग जिंकून आत्मा हरवू नका व सोन्या-चांदीपेक्षा शहाणपण अधिक चांगलं बॉब मार्ली.
मित्रांनो नवीन वर्षं आलं आहे, नवीन वर्षाच्या संकल्पाविषयी विचार करताना वर्तमानपत्रातल्या वरील अवतरणानं माझं लक्षं वेधून घेतलं! ते विधान किती कळकळीनं करण्यात आलं आहे याविषयी अधिक विचार करत असताना मला जाणवलं की तोच नवीन वर्षाचा संकल्प करता येईल. आपल्याला नवीन वर्षात कोणत्या बातम्या ऐकायला मिळाल्या तर, महिलांसंदर्भात गैरवर्तनाचे गुन्हे, रस्त्यावरील अपघात, भ्रष्टाचार, खून, एखादा प्राणी किंवा पक्षी नामशेष होत असल्याची घोषणा, पेट्रोल किंवा डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ, जीवनावश्यक वस्तूंचे सातत्याने वाढते दर, सगळीकडे होणारी वृक्षतोड, अवैध बांधकामे! हुश्श्.... नकारात्मक गोष्टींची यादी रामायणातल्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच आहे! अशा वेळी मला प्रश्न पडला की माझा संकल्प काय असावा व परिस्थिती इतकी निराशाजनक असताना केवळ एका व्यक्तीमुळे कितीसा फरक पडेल? त्याशिवाय अशा गोष्टींशी संबंधित व्यक्तिंचा संकल्प काय असावा यासाठी मी एकट्यानं का विचार करावा? जेव्हा थोडा कल्पना विलास करायचा असतो, तेव्हा मानवी मन खरोखर पेचात टाकतं! तर रिअल इस्टेट व शहरासंबंधी आपल्या आसपास काम करणारी विविध माणसं व संस्था यासंदर्भात माझा कल्पना विकास मी सांगणार आहे
 सर्वप्रथम आपले राजकारणी किंवा या शहराचे शासनकर्ते, त्यांनी असं ठरवलं की या वर्षी ते शहराला प्राधान्य देतील व स्वतःच्या संपत्तीला नाही. शहराच्या विकासासंबधी कोणताही निर्णय घेताना शहराच्या भविष्याचा विचार करुन घेतला जाईल व प्रत्येक पक्ष मतभेद बाजूला ठेवून हा निर्णय, सामायिक कार्यक्रम म्हणून स्वीकारतील. कचरा, वाहतूक, पाणी पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन यासारख्या विषयांवर सर्व पक्ष एकत्र येतील व कोणताही कायदा किंवा धोरण एकत्रितपणे बनवले जाईल, कारण शहर टिकले तरच पक्ष टिकेल. सर्व पक्ष, घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरी प्रशासनावर व्यवस्थित लक्ष ठेवतील व संघटितपणे काम करतील. ते निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने लक्षात ठेवतील व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील व ते करत असलेले प्रयत्न जनतेपुढे ठेवतील, ज्यांचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल. ते अवैध बांधकामांना, रस्ते, पदपथ किंवा सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणांना पाठिंबा देणार नाहीत व ती हटवण्यासाठी प्रशासनास मदत करतील. मला असं वाटतं आपल्या राजकीय नेत्यांनी एवढं जरी ठरवलं व त्याचं पालन केलं तर हे शहर राहण्यासाठी अधिक चांगलं ठिकाण होईल. अनेक राजकारण्यांना हे आवडणार नाही मात्र त्यांनी स्वतःच्या भूतकाळाचं अवलोकन केलं तर जनतेच्या नजरेत आपली काय प्रतिमा आहे हे जाणवेल.
त्यानंतर येतात नागरी संस्था व विविध सरकारी संस्थांचे प्रशासन. यामध्ये महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर सर्वेक्षण कार्यालय, नगर रचना, एमएसईडीसीएल म्हणजे एमएसईबी, शहर विकास मंत्रालय व अगदी आपली न्यायव्यवस्था म्हणजे न्यायालये. या सर्व संस्था नवीन वर्षात लोकांच्या सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतील व केवळ कायद्याचे पालन करुन, टोलवा टोलवी करणार नाहीत. या संस्था विकास योजनांची अंमलबजावणी करताना राजकीय दबावापुढे गुडघे टेकणार नाहीत असा निर्णय घेतील व त्यांच्या टेबलावर येणारे काम रोजच्या रोज संपवतील. त्या खुल्या मनाने व सामान्य माणसाच्या हितासाठी धोरणे बनवतील, केवळ वैयक्तिक फायद्याचा विचार करणा-या मूठभर व्यावसायिक व शासनकर्त्यांसाठी नाही. सद्यस्थितीत अनावश्यक असलेले, अतिशय जुने कायदे बदलण्यात त्या लवचिकता दाखवतील उदाहरणार्थ निवासी विभागातील जमीनींसाठीही बिगर-कृषी जमीनीचा दाखला मागणे. त्या त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करतील लोकांनी त्यांच्याकडे जाण्याऐवजी त्या लोकांपर्यंत पोहोचतील. त्या केवळ प्रतिक्रियात्मक होण्याऐवजी पूर्वसक्रिय होतील व त्यांच्या धोरणांविषयी व्यावसायिक व स्वयंसेवी संघटनांना काय म्हणायचं आहे हे ऐकून घेतील व त्यांनी सुचवलेले बदल खुल्या मनाने स्वीकारतील. त्या शहरातील विविध विकास योजनांसंबंधी त्यांची आश्वासने पूर्ण करतील. केवळ आयटी पार्क किंवा विशेष आर्थिक क्षेत्र किंवा वसाहतींसारख्या प्रकल्पांना मंजुरी देण्याऐवजी, सार्वजनिक वाहतूक, परवडण्यासारखी घरे अशा पायाभूत सुविधा मजबूत करतील. त्या प्रत्येक फाइल व प्रस्तावाविषयी पारदर्शकता राखतील व त्या कुणालाही पाहता याव्यात यासाठी ऑन लाईन उपलब्ध करुन देतील. त्या सामान्य जनतेसाठी एक वेळ राखून ठेवतील व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या वेळात अधिकारी उपलब्ध राहतील. हे सगळं एखाद्या दिवास्वप्नासारखं वाटतंय? पण असं स्वप्न पाहण्यात काहीच अडचण नाही. न्यायालयांनी दिवाणी खटले युद्ध पातळीवर निकाली काढायचं ठरवलं व अनेक दिवस पडून असलेल्या खटल्यांमध्ये योग्य व्यक्तिंना योग्य वेळी न्याय दिला तर त्यांना न्यायव्यवस्थेविषयी विश्वास वाटेल. लोक कायद्याचा धाक व आदर वाटून त्याचे पालन करतील.
त्यानंतर रांगेत आहेत या शहरातील विकासक/बांधकाम व्यवसायिक. हा समुदाय केवळ श्रीमंतांसाठी घरे बनवण्याऐवजी, समाजाच्या प्रत्येक घटकाला परवडतील अशी घरे देण्याची जबाबदारी स्वीकारेल. ते केवळ सर्व सुविधांनी युक्त मोठी घरेच नाही तर लहान घरेही बनवतील, घरांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवण्याऐवजी ते योग्य नफा मिळेल असे माफक दर ठेवतील. ते बांधकामाच्या सर्व कायद्यांचे पालन करतील व शहराच्या पर्यावरणाचे जतन करण्यासाठी पूर्वसक्रिय होऊन प्रयत्न करतील. ते सामाजिक तसंच पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण करण्याच्या उपक्रमांमध्ये योगदान देतील व ग्राहकांना त्याची जाणीव करुन देतील. सर्वात महत्वाचे म्हणजे विकासक ग्राहकांशी पारदर्शकपणे व्यवहार करतील व घराची विक्री करताना दिलेल्या आश्वासनांचे पालन करतील. ते राजकारणी व प्रशासकीय अधिका-यांशी चुकीच्या गोष्टींसाठी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतील व त्याऐवजी आपल्या आर्थिक तसंच जनसंपर्काच्या ताकदीद्वारे दबावगट तयार करुन तो समाजोपयोगी धोरणे तयार करण्यासाठी वापरतील. नवीन वर्षात बांधकाम व्यावसायिक त्यांनी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामांसाठी नाव व प्रसिद्धी मिळवण्याचा निर्णय घेतील व त्याचे पालन करतील. आता इथेही बरेच जण म्हणतील की आम्ही आधीपासूनच त्याचे पालन करत आहोत, मात्र सुधारणा करायला नेहमीच वाव असतो! प्रत्येत सामान्य माणसाला घर मिळावे यासाठी या क्षेत्राकडून शहराच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या शहराने विकासकांना भरपूर उत्पन्न दिले आहे व नवीन वर्षात ते आपल्या कामाद्वारे हे शहर अधिक चांगलं बनवण्याचा निर्णय घेऊन, त्याची किमान काही अंशी परतफेड करायचा निर्णय घेतील.
त्यानंतर येतात विविध नागरी समस्यांसंदर्भात काम करणा-या स्वयंसेवी संस्था उदाहरणार्थ, वाहतूक, वृक्षसंवर्धन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, माहितीचा अधिकार इत्यादी. स्वयंसेवी संस्था योग्य हेतूसाठी लढण्याचा निर्णय घेतील व केवळ सरकारच्या प्रत्येक धोरणाला विनाकारण विरोध करणार नाहीत. त्या व्यावसायिकांकडून तसंच विविध व्यावसायिक संघटनांकडून सूचना स्वीकारतील, ते केवळ पैसे कमावत असल्याचा आरोप करणार नाहीत. स्वयंसेवी संस्था नेमक्या समस्यांवर बोट ठेवून, त्यावर व्यवहार्य तोडगा सुचवतील.
अगदी माध्यमंही नवीन वर्षाच्या या संकल्पामध्ये सहभागी झाली, एखादी व्यक्ती कोणत्या पक्षाशी किंवा व्यावसायिक संस्थेशी संबंधित आहे याचा विचार न करता तटस्थपणे योग्य गोष्टींचे समर्थन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला! त्यांनी केवळ तथ्य छापण्याचा निर्णय घेतला, ते देखील विषयाच्या मूळाशी जाऊन, केवळ टेलिफोनवरील मुलाखती व गुगलवर शोध घेऊन नाही! आपलं उत्पादन अधिकाधिक वाचनीय कसं होईल याचाच विचार न करता, सामान्य माणसाला परिस्थितीची जाणीव करुन देण्याचा व व्यावसायिकांच्या मदतीने योग्य मार्ग दाखवण्याचा निर्णय घेतला.
सर्वात शेवटी सामान्य माणूस जो स्वतःसाठी घर शोधत होता, त्याला जाणीव झाली की वरील सर्व संस्थांनी त्याच्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी करायचं ठरवल्यानंतर त्याला दैनंदिन गरजांसाठी काहीही ठरवायची गरज नाही! आतापर्यंत अशी परिस्थिती कधीच आली नव्हती कारण गेली अनेक वर्षं गरीब सामान्य माणसाला त्याचा नवीन वर्षाचा संकल्प स्वतःच ठरवावा लागायचा, कारण वरील कोणतेही घटक त्याच्या गरजांचा विचार करत नव्हते. त्यामुळे आता तो समाजासाठी काही तरी रचनात्मक करु शकतो व आपल्या कामाद्वारे परिसर चांगला बनवू शकतो. शेवटी एक चांगला समाज म्हणजे काय? चांगला समाज म्हणजे जिथे लोक आधी इतरांचा व नंतर स्वतःचा विचार करतात! मात्र त्यासाठी आपल्याला असं वातावरण निर्माण करायची गरज आहे ज्यात सामान्य माणूस इतरांविषयी विचार करेल.
आपण नवीन वर्षात अधिक चांगला समाज घडण्याशिवाय इतर कोणत्या संकल्पाचा विचार करु शकतो? त्यामुळेच नवीन वर्षाच्या संकल्पाविषयी थोडा कल्पना विलास करताना मी देखील हेच केलं!
-









https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

परवडणारी घरे, कुणाची जबाबदारी ?



 
 
 
 

"मजबूत अर्थव्यवस्थेमुळे घरांच्या मागणीत वाढ होते; घरांच्या वाढत्या मागणीमुळे स्थावर-मालमत्तेच्या किमती आणि भाडे आकाशाला भिडतात. आणि त्यानंतर परवडण्यासारखी घरे पूर्णपणे आवाक्याबाहेर जातात."            विल्यम बाल्डविन

सध्या परवडण्यासारख्या घरांबद्दल बरीच चर्चा होताना दिसते आणि आजकाल प्रत्येक वर्तमानपत्रात याविषयी लिहीले जाते आणि चर्चासत्रांमध्ये या विषयावर चर्चा होतात. मी जेव्हा घराविषयीच्या कुठल्याही मुद्द्यावर विचार करतो, तेव्हा मला जाणवतं की या विषयी आपण किती भावनिक आहोत आणि कदाचित त्यामुळेच आपण गृह बांधणी व्यवसायाबद्दल चांगले धोरण तयार करण्यासाठी काहीतरी करण्यात नेहमी अपयशी ठरलो आहोत. कारण सरते शेवटी धोरणे व्यावहारिकतेच्या आधारावर बनवावी लागतात, केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नाही आणि आपण एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, आपल्या देशात विविध प्रकारच्या जीवनशैली एकाच ठिकाणी आढळतात त्यामुळेच " आपण सर्वांना एकाचवेळी समाधानी करु शकत नाही! "
परवडणारी घरे म्हणजे लोकांना २बीएचके सदनिके ऐवजी १बीएचके सदनिकेवर तडजोड करायला सांगणे किंवा २बीएचके/३बीएचके सदनिकेतील खोल्यांचा आकार लहान करणे नाही! याचा अर्थ असा की घरे बांधण्यापासून ते घर खरेदी करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया साधी आणि स्पष्ट करावी ज्यामुळे प्रत्येक जण स्वतःचा खिसा बघून त्यानुसार पर्याय निवडू शकेल. जसे कारच्या बाजारपेठेमध्ये तुमच्याकडे २.५ लाखांच्या मारुती ऑल्टोचाही पर्याय असतो तसेच १.५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू ७ श्रेणीचाही पर्याय असतो! या सर्व वाहनांना ४ चाकेच असतात,  मात्र ग्राहकाची गरज आणि उद्योगाकडून होणारा वाहनांचा पुरवठा यामध्ये संतुलन साधणे महत्वाचे असते. आणि ग्राहकांना जे हवे आहे त्यानुसार उद्योगाला पुरवठा करता येईल अशी धोरणे असणे आवश्यक असते.
घरांविषयीच्या कुठल्याही धोरणांबाबत आपण वारंवार नेमकी हीच चूक करतो, उदाहरणार्थ आपल्याला जमीनीचे मालक, बांधकाम व्यावसायिक, झोपडपट्टीवासी, मध्यमवर्गीय, पर्यावरणवादी, बांधकामाच्या कच्च्यामालाचे मोठे उत्पादक, गृहकर्ज वितरण संस्था, बँका, राजकारणी आणि सर्वात शेवटी स्थानिक प्रशासकीय संस्था, या सर्वांना एकाचवेळी खुश करायचे असते! कारण जमीनीच्या मालकांना त्यांच्या जमीनीवर किती टीडीआर वापरता येईल याचा विचार करुन तिचे पुरेपूर मूल्य हवे असते! बांधकाम व्यवसायिकांना घरे विकून पैसा कमवायचा असतो कारण तो त्यांचा व्यवसाय आहे, झोपडपट्टीवासीयांना एक पैसाही खर्च करावा न लागता मोठ्यात मोठे घर हवे असते ज्याची काहीही देखभाल करावी लागणार नाही, मध्यमवर्गीयांना कमीत कमी व्याजदरात शहराच्या मध्यभागी घर हवे असते, पर्यावरणवाद्यांना स्वच्छ, प्रदूषणमुक्त हिरवे आणि चांगल्या पायाभूत सुविधा असलेले शहर हव असते, बांधकामासाठी स्टील, सिमेंट यासारखा कच्चा माल उत्पादन करणाऱ्यांना त्यांच्या मालाच्या दरावर सरकारी नियंत्रण नको असते, गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या त्यांचे व्याजदर कमी करत नाहीत, बँका बांधकाम व्यवसायिकांना विश्वसनीय ग्राहक मानत नाहीत, राजकारण्यांना त्यांच्या मतदारांना दुखवायचे नसते आणि स्थानिक महानगरपालिकेला महसूल हवा असतो मात्र कुठल्याही एका वर्गाशी सलगी केल्याचा आरोप नको असतो!
आता या सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या?
सर्वप्रथम गृहनिर्माण उद्योगाला समजावून घ्या, त्याला एका उद्योगाचा दर्जा द्या, त्यानुसार नियम तयार करा आणि त्यांची वेगाने आणि निष्ठूरपणे अंमलबजावणी करा. इथे निष्ठूरपणे म्हणजे एकदा कायदा करण्यात आल्यानंतर वरीलपैकी कुठल्याही घटकाने त्याचे उल्लंघन केल्यास त्याला त्यातून सवलत देऊ नका. आपण जेव्हा धोरणे तयार करतो तेव्हा कुणी त्यांचे उल्लंघन केले तर काय होईल याचा विचार करुन ती तयार करतो का? खरेतर आपण जर कुणाच्याही प्रभावाखाली न येता त्यांची अंमलबजावणी केली आणि कुठल्याही वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही तर कुणीही त्यांचे उल्लंघन करणार नाही. योग्य कायदे, त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचा आधार यामुळे नेहमी वेळ वाचतो आणि इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे इथेही वेळ म्हणजेच पैसा आहे. कुणी कधी विश्लेषण केले आहे का की दुबई किंवा हाँगकाँगमध्ये ७०-८० मजली इमारत ३ वर्षात बांधून पूर्ण होते. इथे आपल्याला अशा प्रकारच्या उंच इमारतीला मंजुरी मिळण्यासाठीच तेवढी वर्षे लागतील! या वेळाची भरपाई कोण करणार आहे? उशीर होण्याचं कारण अतिशय सोपं आहे, वारंवार होणाऱ्या घोटाळ्यांमुळे प्रत्येकालाच कशावरही स्वाक्षरी करायची भीती वाटते आणि तो भरपूर वेळ घेतो त्यामुळे उशीर होतो. कायदे स्पष्ट नाहीत आणि बऱ्याचदा वैयक्तिक प्रकरणांची धोरणे होतात. हा यंत्रणेचा पराभव आहे. जमीनी आणि इमारती हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे हे मान्य केले, तरीही ९०-९५% प्रकरणांचा आपण धोरणांमध्ये समावेश करु शकतो आणि उरलेली वैयक्तिक प्रकरणे म्हणून हाताळली जाऊ शकतात आणि त्यासाठीसुद्धा एक लवाद नेमला जाऊ शकतो.
एक खिडकी मंजुरी केवळ परीकथेप्रमाणे आहे आणि त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क, मूल्यवर्धित कर, सेवाशुल्क, तसेच स्थानिक संस्थांनी आकारलेले विकास शुल्क, पायाभूत सुविधांसाठी रस्ता खोदण्याचे शुल्क अशी विविध करांची यादी वाढतच जाते! सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीचा फायदा सर्वांनाच हवा असतो त्यामुळे कुणालाच आपला फायदा सोडायचा नसतो! आपण हे विसरत आहोत की घर बांधताना खर्च होणाऱ्या पै-पैचा आपल्याला योग्य वापर करायचा आहे तरच आपण घरांच्या किंमती रास्त करु शकू.
घरे बांधण्यासाठी मूलभूत कच्चा माल म्हणजे जमीन आणि ती मर्यादित आहे हे सत्य आहे.जर प्रत्येकालाच शाळा, बाजारपेठ, वैद्यकीय सुविधा, नोकरीचे ठिकाण जवळ हवे असेल, तसेच पाणी, वीज, सांडपाणी यासारख्या पायाभूत सुविधा हव्या असतील तर स्वाभाविकपणे अशा जमीनींच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तूट असते. त्यामुळेच आपण सर्वांना परवडणारी घरे देऊ शकत नाही, कारण परवडणाऱ्या या शब्दाची व्याख्या समाजाच्या प्रत्येक वर्गात वेगळी असते. उदाहरणार्थ महिन्याला ५० हजार रुपये कमावणाऱ्या जोडप्यासाठी ४० लाख रुपयांची २ बीएचके सदनिका खरेदी करणे फार मोठी बाब नाही कारण त्यांना नोकरीमुळे सहजपणे कर्ज मिळते मात्र एका यशस्वी छोट्या व्यापाऱ्याला किंवा व्यावसायिकाला असे घर घेता येत नाही कारण त्यांना कर्ज मिळत नाही! तर मग तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीतल्या लोकांची गोष्टच सोडा कारण त्यांचे बजेट किंवा त्यांचे प्रश्न वेगळे आहेत.
स्थानिक प्रशासकीय संस्था शहराच्या सर्व बाजूंनी पालिकेच्या हद्दीबाहेर मोठ्या जमीनी खरेदी करुन, पाणी पुरवठा, शहरात जाण्यासाठी परिवहन सुविधा इत्यादी मूलभूत सुविधा पुरवून, त्यांचे दर का निश्चित करत नाहीत? जर आपण विकासकांकडून याची अपेक्षा करत असू तर आपण त्यांना स्टील आणि सिमेंट यासारखा कच्चा माल निश्चित किंमतीला विकला जाईल याची खात्री दिली पाहिजे. जेव्हा आपण परवडणारे असे म्हणतो तेव्हा तो अंतिम उत्पादनाशी संबंधित प्रत्येकाशी संबंधित असतो. मी विकासकांची बाजू घेत नाही मात्र आपण जर त्यांना निश्चित नफ्याचे आश्वासन देऊ शकत नसू तर त्यांना निश्चित दराने विकण्यास सांगण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही, कुठलेही न्यायालय हे मान्य करणार नाही.
जमीनीच्या किमती हा देखील मागणीनुसार ठरणारा विषय आहे, विचार करा की शहरामध्ये जर सगळीकडे संतुलित पायाभूत सुविधा उपलब्ध असतील, तर एका विशिष्ट भागामध्येच अधिक मागणी असणार नाही. आणि जरी मागणी असली तरी ती एका विशिष्ट वर्गामध्येच असेल, त्यांना परवडत असेल तर त्यांना मोठी किंमत देऊन खरेदी करु दे मात्र किमान बहुतांश लोकांना शहराच्या आजूबाजूला त्यांचे स्वतःचे घर मिळेल.
विकासकावर किती सरकारी/निमसरकारी संस्थांचे नियंत्रण असते आणि त्यांच्या नफ्यावर काहीही बंधन नसते. हा कदाचित सर्वाधिक अव्यावसायिक पद्धतीने चालवला जाणारा व्यवसाय असेल आणि म्हणूनच नफा व जोखीम प्रचंड असते. हे सर्व मान्य केले तरी, प्रत्येकाला आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणे आणि नफा स्वतः निश्चित केलेल्या एका मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे, या क्षेत्रासाठी काही निश्चित नियम ठरवले जाईपर्यंत आपण किमान एवढे तरी करु शकतो. मूलभूत कच्चा माल उत्पादक बांधकाम व्यवसायिकांची अजिबात काळजी करत नाहीत कारण त्यांचा मुख्य ग्राहक सरकार असते. धरण, रस्ते यासारख्या बहुतेक पायाभूत सुविधा सरकार उभारते. इथेच सिमेंट आणि स्टीलचा खप सर्वाधिक असतो. त्यामुळेच आपल्याला घरांच्या किमती नियंत्रणात ठेवायच्या असतील तर अशा सर्व कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. या उद्योगामध्ये आपल्याला संशोधन आणि विकासाचीही गरज आहे आणि तो प्रत्यक्षात उतरवण्यासारखा असावा कारण आपण उंच इमारती माती आणि वाळलेल्या गवताने बनवू शकत नाही. वर्षानुवर्षे बांधकामाच्या पद्धती तशाच आहेत आणि नियोजनाच्या संकल्पनाही बदललेल्या नाहीत.
सर्वात शेवटचा जो घटक आहे त्यासाठी फारसे बोलले जात नाही किंवा त्यात फारसे बदल केले जात नाहीत, तो म्हणजे बांधकाम व्यवसायाला अर्थपुरवठा करणारी संपूर्ण यंत्रणा. गृहकर्ज पुरवणाऱ्या कंपन्याचे व्याज दर आणि कर्जासाठीच्या पात्रतेचे निकष अधिक स्पष्ट आणि पारदर्शक हवेत कारण त्यावरच ग्राहकाला परवडणे अवलंबून असते. जे लोक डिपार्टमेंटल दुकानांमध्ये काम करतात किंवा ज्यांचे लहान व्यवसाय असतात त्यांच्याकडे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांप्रमाणे पुरेशी हमी नसते त्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही! विकासकांपासून ते आर्थिक संस्थांपर्यंत सर्वजण मोठ्या रकमेची कर्ज घेऊ शकणाऱ्या आणि ते फेडू शकणाऱ्या लोकांनाच लक्ष्य करतात, मात्र ज्यांचे मर्यादित बजेट आहे त्या वर्गाचे काय? कारण त्यांना प्रकल्पांमध्येही काही पर्याय उपलब्ध नसतो आणि आर्थिक संस्थांमध्येही! कर्ज २५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर व्याजदरात १% ची विशेष कपात केली जाते हे किती जणांना माहिती आहे? तुम्हाला जर २५ लाख रुपयांचे ८०% कर्ज जरी मिळाले तरी याचा अर्थ होतो की सदनिकेची किंमत ३० लाखांपर्यंत असली पाहिजे कारण २०% सहभाग तुमचा असेल, आता या श्रेणीतील सदनिका कुठे उपलब्ध आहेत? त्यामुळे फार थोड्या जणांना व्याजदरातील विशेष कपातीचा फायदा मिळतो! कमी व्याज दर आणि कमी किंमतीच्या मोठ्या अर्थपुरवठा योजना राबवण्याची गरज आहे. आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ज्यांचे नियमित मासिक उत्पन्न आहे मात्र जे २-३ लाखांचे सुरुवातीचे भांडवल गोळा करु शकत नाहीत त्या वर्गासाठी परवडण्यासारखी घरे आहेत. त्यामुळे त्यांना अर्थपुरवठा करण्यासाठी विशेष दृष्टीकोन आवश्यक आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडित सर्वच आर्थिक संस्थांची सध्या सारखीच परिस्थिती आहे. अगदी राष्ट्रीयीकृत बँकासुद्धा आधी नफा बघतात आणि तरीही आपण घरांच्या किमती परवडण्यासारख्या असाव्यात अशी अपेक्षा करतो! इतर बँकांबाबतही हीच परिस्थिती आहे, त्या बांधकाम व्यवसायिकांना शेवटचे प्राधान्य देतात. सदनिकाधारकांना कर्ज देण्यास बँका अतिशय खुश असतात कारण त्यांना गृहकर्ज पुरवठ्यात प्रचंड क्षमता दिसते पण त्याच वेळी त्या बांधकाम व्यावसायिकांना विशेषतः छोट्या व्यावसायिकांना कर्ज देण्यास त्या फारशा उत्सुक नसतात! आजकाल कुठलाही जमीनमालक पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय विक्री करत नाहीत आणि बँका जमीनीसाठी कर्ज देणार नसतील तर विकासक हा पैसा खाजगी बाजारपेठेकडून उभा करतो ज्यामध्ये व्याजदर वर्षाला २४% पर्यंत असू शकतात. आणि या अतिरिक्त ओझ्याचा भार कुणाला उचलावा लागेल? अर्थात सदनिकाधारकांना, ज्यांना गृहकर्जाचे हप्तेही फेडावे लागतात!

विकासकांची काहीच जबाबदारी नाही असं म्हणायचा माझा अजिबात हेतू नाही, त्यांनी याविषयी विचार करायला हवा यात काही शंकाच नाही आणि बांधकामाच्या आधुनिक पद्धती वापरुन जी काही बचत करणे शक्य आहे तिचा फायदा सदनिका खरेदी करणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र वर उल्लेख केलेल्या घटकांच्या अनिश्चिततेमुळे ज्यांना स्वस्त दरात जमीन मिळाली आहे ते चढ्या दराने, बाजारभावानुसार अंतिम उत्पादन म्हणजेच सदनिका विकतात हे दुर्देव आहे, त्यामुळे परवडण्यासारखी किंवा रास्त या शब्दांनाही जागा उरत नाही! त्यामुळेच केवळ नफा कमावणे हा आपला उद्देश नसून समाजाला हवी तशी घरे देणे हा सुद्धा उद्देश असल्याची आठवण या उद्योगाला करुन देण्याची गरज आहे.
सर्वात शेवटी आपल्या राजकारण्यांनी आणि राज्यकर्त्यांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या बजेटमध्ये त्यांच्या आवडीचे घर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एकमेकांवर आरोप केल्याने कुणाचेच भले होणार नाही; त्याऐवजी त्यांनी स्वतःकडील अधिकारांचा वापर, स्थानिक प्रशासकीय संस्था/सरकारला कायदे तयार करायला मदत करण्यासाठी आणि त्यातून अपेक्षित परिणाम साधण्यासाठी करावा. यामध्येच सामान्य माणसाला परवडण्यासारख्या घरांची किल्ली दडलेली आहे.
 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!

 http://visonoflife.blogspot.com/ 

संजीवनीची सामाजिक बाजू!