Thursday, 5 September 2013

गृह कर्ज !






















घर घेणे ही संपत्तीची कोनशिला आहे- त्यामुळे आर्थिक संपन्नता व भावनिक सुरक्षा दोन्हीही मिळते.... सुझे ऑर्मन

सुझॅन लिन सुझे ऑर्मन ही अमेरिकी लेखिका, आर्थिक सल्लागार, प्रेरणादायी व्याख्याने देणारी व टीव्हीवरील अर्थविषयक कार्यक्रमांची सूत्रसंचालिका आहे. लोक घर खरेदी का करतात व बँकांसाठी वित्तपुरवठ्यापैकी गृह कर्ज हा इतका जिव्हाळ्याचा विषय का आहे हे अतिशय नेमक्या शब्दात तिने मांडले आहे!
मी काही वित्त पुरवठा क्षेत्रातील तज्ञ नाही व माझी खात्री आहे की माझ्यासारख्या अनेकांना त्यातले फारसे काहीही समजत नाही, किंवा या देशातील विविध नोक-यांमध्ये तासंतास मेहनत करणारे लाखो लोक प्रामुख्याने केवळ दोनदाच वित्त पुरवठ्याविषयी विचार करतात, एक म्हणजे वाहन खरेदी करताना, दुसरे म्हणजे घर खरेदी करताना! आर्थिक मंदीच्या काळात, आता याचा नेमका अर्थ काय हे मला माहिती नाही मात्र सर्व माध्यमांमध्ये याचीच चर्चा होतेय म्हणून हा शब्द वापरला, वित्त पुरवठ्याविषयी दोन बातम्या नुकत्याच ठळकपणे वर्तमानपत्रात झळकल्या. एक वाहन खरेदी वित्त पुरवठ्याविषयी होती व दुसरी गृहकर्जाविषयी रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांसाठीची होती! वाहन खरेदी हा आपला विषय नाही मात्र गृह कर्जाकडे आपल्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही, अर्थात वाहन खरेदी वित्त पुरवठ्याचा एका अर्थाने घरांची योजना किंवा प्रकल्पांवर परिणाम होतोच मात्र तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, त्यामुळे त्याविषयी नंतर कधीतरी बोलू!

गृह कर्जाच्या नव्या मार्गदर्शक तत्वांविषयी चर्चा करण्यापूर्वी रिअल इस्टेटमध्ये काय परिस्थिती आहे हे एका सामान्य माणसाच्या नजरेने समजून घेऊ. अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजे ८० च्या दशकाच्या शेवटापासून ते ९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत गृह कर्जाच्या क्षेत्रात एचडीएफसी, एलआयसी हाउसिंग फायनान्स किंवा दिवाण हाउसिंग यासारखी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे होती. राष्ट्रीयकृत बँकांनी या क्षेत्राकडे फारसे लक्ष दिलेले नव्हते. तेव्हा देखील बांधकाम व्यावसायिकांना वित्त पुरवठा आजच्यासारखाच निषिद्ध होता! सदनिका खरेदी करण्यासाठी केला जाणारा वित्त पुरवठाही घराच्या एकूण किमतीच्या केवळ ६०% ते ७०% इतकाच असायचा. कर्जाचे प्रकरण मंजूर करुन घेणे हे माउंट एव्हरेस्ट चढण्याएवढे कठीण असायचे व कर्ज वितरित होणे हे माउंट एव्हरेस्टवरुन सुरक्षितपणे परतण्यासारखे असायचे! या संपूर्ण प्रक्रियेला महिने काही वेळा वर्षही लागायचे. कर्जासाठी पात्रतेचे निकष अतिशय कडक होते व केवळ सरकारी किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्मचारीच हे निकष पूर्ण करु शकत असत, त्यामुळे रिअल इस्टेटचा ग्राहकवर्ग अतिशय मर्यादित होता

२००० सालच्या सुरवातीपासुन अर्थव्यवस्था बरीचशी खुली व्हायला सुरुवात झाली होती व प्रत्येक वित्त संस्थेला गृह कर्ज क्षेत्राचे महत्व व त्यातील प्रचंड क्षमता लक्षात आली होती. त्यामुळे स्टेट बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँकाही यात उतरल्या व बरोबरीने आयसीआयसीआयसारख्या व इतर खाजगी बँकाही यामध्ये उतरल्या. यामुळे या क्षेत्रात बराच निधी आला. मोबाईल क्षेत्रात जसे झाले तसेच या क्षेत्रातही झाले, त्याचा फायदा ग्राहकांना झाला. कारण स्पर्धेमुळे व्याजदर कमी झाले तसेच पात्रतेचे निकषही शिथील करण्यात आले. ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती व प्रस्ताव दिले जातात. अशा सर्व योजनांमध्ये घर घेण्यासाठी गाहकांचे स्वतःचे योगदान ही सर्वात प्रमुख अडचण होती. ९० च्या दशकाच्या तुलनेत आता सदनिका खरेदी करणारी प्रामुख्याने नवीन पिढी होती व त्यांची बचतही तुलनेने कमी होती व अतिशय कमी जण घराच्या एकूण किमतीच्या ३०% ते ४०% रक्कम भरण्याचा निकष पूर्ण करु शकत होते. त्यामुळे हा निकष शिथील करण्यात आला व काही प्रकरणांमध्ये तो ५% च्याही खाली गेला, याचा अर्थ असा की तुम्हाला घराच्या एकूण किमतीच्या केवळ ५% रक्कम भरावी लागेल व उरलेली रक्कम वित्त संस्था कर्ज म्हणून देतील! अशाप्रकारच्या योजनांमुळे स्वाभाविकपणे गृहकर्ज सर्वात लोकप्रिय झाले, कारण आपल्या देशात अजूनही घर ही एक भावनिक बाब आहे, केवळ उपयोगी वस्तू नाही! दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात बँक अख्खे घर तारण ठेवते, मग कर्जाची रक्कम कितीही लहान असो! सातत्याने वाढती लोकसंख्या व मर्यादित जमीन यामुळे जमीनीचे दर वाढण्याचाच कल आहे व तो भविष्यातही कायम राहणार आहे. याचा अर्थ वित्त संस्थांकडे तारण असलेल्या मालमत्तेचे मूल्य वाढतच राहणार आहे, थोडक्यात एखाद्यासाठी हा अतिशय सुरक्षित सौदा असू शकतो! त्यानंतर आगाऊ रक्कम देण्यासारख्या योजना आल्या, म्हणजे तुमची बँक तुमच्या विकासकाला जवळपास सर्व पैसे आगाऊ देते व तुम्हाला कर्ज देण्यात आल्यानंतर लगेच ईएमआय (समान मासिक हप्ता) सुरु होतो. एरवी सामान्य प्रकरणात हा हप्ता भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सुरु झाला असता, त्यामुळे प्रकल्पाचा पूर्ण होण्याचा कालावधी दोन वर्षांचा असेल तर ग्राहकाला दोन वर्षे केवळ कर्जावरील व्याज भरावे लागले असते, जो एका अर्थाने त्याचा तोटा होता! माझ्यासारख्या वित्तीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसासाठी ईएमआय म्हणजे सोप्या शब्दात कर्जाच्या मुद्दलाची परतफेड.  अशाप्रकारच्या योजना विकासकालाही प्रिय होत्या कारण त्याला सर्व पैसे आगाऊ वापरण्यासाठी मिळायचे. एक गोष्ट मला तेव्हा किंवा अगदी अजूनही समजलेले नाही की वित्तीय संस्था घराच्या ग्राहकास कर्जपुरवठा करण्यास उत्सुक असतात, तर मग त्या विकासकालाच वित्तपुरवठा का करत नाहीत? आजही कोणतीही बँक जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देत नाही किंवा रिअल इस्टेट हे प्राधान्य असलेले क्षेत्र नाही. या उद्योगासाठी जमीन ही कच्च्या मालाप्रमाणे आहे, कोणत्याही प्रकल्पाच्या किमतीमधील मुख्य खर्च हा जमीनीचाच असतो. स्वाभाविकपणे बांधकाम व्यवसायिकास अतिशय चढ्या दराने बाहेरुन कर्ज घ्यावे लागते व हे टाळण्यासाठी त्याला आगाऊ गृह कर्जासारख्या योजनांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे हा तोडगा विकासक, ग्राहक व कर्ज पुरवठादार या सर्वांचाच फायद्याचा असल्यासारखा होता, शिवाय या स्कीममध्ये बरेचसे पैसे आगाऊ मिळत असल्याने विकसक सुद्धा घरांच्या किमतींवर चांगल्यापैकी सवलत देऊ शकत होते!

मात्र यामध्येच काही गोष्टींचा अतिरेक झाल्याने, नुकतीच काही मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली.  गृह कर्जातील आगाऊ रक्कम देण्याच्या योजनेमध्ये काही गोष्टींचा विचार करण्यात आला नव्हता, त्या म्हणजे बांधकाम व्यावसायिकाच्या सदनिकांचे पुरेसे आरक्षण झाले नाही तर काय? याचा अर्थ असा की प्रकल्पासाठी पुरेसा निधी मिळणार नाही व त्यामुळे तो प्रकल्प वेळेत पूर्ण करु शकणार नाही? किंवा एखाद्या कायदेशीर समस्येमुळे प्रकल्पाच्या कामकाजात अडथळा आला तर काय किंवा बांधकाम व्यवसायिकाने त्याला आगाऊ मिळालेले पैसे त्याच प्रकल्पासाठी वापरले नाहीत व दुस-याच प्रकल्पासाठी वापरले व त्याच्या ग्राहकांना ज्या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यात आला आहे तो अडचणीत आला तर काय?

माझ्या मते याच कारणाने आरबीआयने आगाऊ वित्त पुरवठ्यासारख्या योजनांचे निकष कडक केले व सकृत दर्शनी त्यात काहीही चुकीचे नाही, मात्र नेहमीप्रमाणे आपण मुख्य समस्येकडे दुर्लक्ष करत नाही का? सर्वप्रथम आपण घर खरेदी करणा-यांना कर्ज पुरवठा का करत आहोत हे ठरविले पाहिजे, अर्थातच थोडेफार पैसे कमावणे हा त्यामागचा उद्देश आहे, मात्र केवळ तेच एक उद्दिष्ट नसावे. या देशातल्या लाखो लोकांसाठी घर ही एक जीवनावश्यक बाब आहे, मूलभूत गरज आहे व आपला जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे जे खरोखर अतिशय गरजू आहेत त्यांना घर परवडावे हे उद्दिष्ट असावे व त्यानुसार धोरणे तयार केली पाहिजेत. सुरुवातीला गृह कर्ज केवळ श्रीमंतांनाच मिळायचे मात्र थोडी उदार धोरणे आल्यानंतर ते सामान्य माणसालाही परवडू लागले, त्यामुळेच अनेक लोक अलिकडच्या काळात घर घेऊ शकले. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही व आपण जर विकासकांना जमीनीसाठी कर्ज पुरवठा करणार नसू व रिअल इस्टेट क्षेत्राला प्राधान्य देणार नसू तर घरे परवडणार कशी, घराचा ग्राहक वित्त पुरवठ्याची तरतूद कशी करणार आहे हा प्रश्न आपण आरबीआयला विचारायला हवा!

इथे आपण एखाद्या सुरक्षित उपायाचा विचार करु शकत नाही का किंवा विकासकाने प्रकल्प पूर्ण करण्याविषयी दिलेली आश्वासने किती पूर्ण केलेली आहेत याचा विचार करुन, त्याची पार्श्वभूमी तपासून व त्यानंतर बँकांना आगाऊ रक्कम देणा-या वित्तपुरवठा योजना तयार करायला सांगू शकत नाही का? त्याशिवाय आरबीआय रिअल इस्टेटचा प्राधान्य दिल्या जाणा-या वित्तीय क्षेत्रात का समाविष्ट करु शकत नाही व त्यानुसार धोरणे का तयार करत नाही, कारण घरे मोठ्या संख्येने आवश्यक असतात. असे झाल्यास विकासकाकडे स्वतःचा पुरेसा निधी असेल व त्याला अशा आगाऊ रक्कम देणा-या योजनांची गरजच पडणार नाही व पर्यायाने गृह कर्जाची समस्या सुटेल. अशी धोरणे तयार करणे ही काळाची गरज आहे व अशा प्रकल्पांसाठी देण्यात आलेला निधी केवळ त्याच प्रकल्पांसाठी व व्यवस्थितपणे वापरला जाईल हे पाहण्यासाठी योग्य नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र सद्य निर्देश पाहता, जे सर्वजण कायदे व नियमांचे पालन करुन पूर्ण समर्पणाने व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे!  

मी नेहमी म्हटल्याप्रमाणे, सर्वजण कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी दोषी आहेत असे गृहित धरुन कोणताही नियम किंवा धोरण बनवले जाऊ नये, मात्र असा कायदा किंवा धोरण बनविण्यामागे आपले काय उद्दिष्ट आहे, आपल्याला कसा परिणाम हवा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. पुन्हा एकदा हे झालेले नाही व आधीच आजारपणाकडे वाटचाल करत असलेल्या रिअल इस्टेट उद्योगावर याचा अजुनच नकारात्मक परिणाम होणार आहे. एकीकडे या उद्योगाला स्थानिक तसेच राज्याच्या गृहनिर्माण व शहरी विकासाबाबतच्या धोरणांमधील त्रुटींना तोंड द्यावे लागत आहे; परवानगीची प्रक्रिया, त्यासाठी लागणारा वेळ प्रकल्पाच्या खर्चात भर घालतो व आता वित्त पुरवठा क्षेत्राकडूनही पाठिंबा मिळणार नसेल तर मग विशेषतः महानगरांमध्ये घरांची सतत वाढती मागणी आम्ही पूर्ण करु शकू अशी अपेक्षा कशी करता येईल? आरबीआयच्या नव्या गर्व्हनरनी नुकताच पदभार स्वीकारला आहे व रिअल इस्टेट क्षेत्राने आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, म्हणजे ते शहरी भारतातील या सर्वात महत्वाच्या क्षेत्राला नवी भरारी देऊ शकतील!

रिअल इस्टेट क्षेत्राचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे, नाहीतर सामान्य माणसाचे घराचे स्वप्न केवळ स्वप्नच राहील व त्यास आपण कारणीभूत होऊ!

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif
संजय देशपांडे

Smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

Sunday, 1 September 2013

जंगल नावाचे पुस्तक वाचताना !






















मी जेव्हा काही क्षण समुद्र किना-यावर किंवा डोंगरांवर किंवा एखाद्या शांत जंगलामध्ये घालवतो, तेव्हा यासाठीच पर्यावरणाचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते …. बिल ब्रॅडली

विल्यम वॉरेन बिल ब्रॅडली हा अमेरिकन हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट बास्केटबॉलपटू आहे, तो होड्सचा विद्यार्थी व तीन वेळा डेमोक्रॅटिक पक्षाचा न्यू जर्सीचा सिनेटरही होता. त्याने पर्यावरणाविषयी विशेषतः जंगलांविषयी घेतलेली भूमिका सर्वज्ञात आहे! त्याने म्हटल्याप्रमाणे मी देखील माझ्या स्वतःचे असे काही क्षण अनुभवण्यासाठी नेहमी जंगलात जातो. अशी प्रत्येक सफर जंगल नावाच्या पुस्तकाचे आणखी एक पान वाचण्यासारखी असते व त्याच्या पुढील पानावर काय असेल याची उत्सुकता आपल्याला कायमच असते! जंगलाची प्रत्येक सफर करताना मला असेच वाटते. मी अलिकडेच मध्यप्रदेश वनविभागास कान्हा व पेंच येथे काही तांत्रिक मुद्यासंदर्भात फ़ॊरेस्ट डीपार्टमेंटला मदत करण्यासाठी या जंगलांमध्ये गेलो होतो. पेंच येथील जंगलात गेम रेंजर श्री. तिवारी यांच्यासोबत एक फेरफटका मारत असताना एक अतिशय रोमांचक घटना घडली. आम्ही आरामात जंगलात फिरत होतो, तेव्हा जवळपास २०० चितळांचा (ठिपकेदार हरिण) एक कळप रस्त्यावर चरत होता व आम्हाला काही समजण्याच्या आत एक मोठी वाघीण अक्षरशः  कळपाच्या मधुन आली, मात्र तिने त्यांच्याकडे पाहिलेही नाही, ती आपल्याच नादात चालत सरळ आमच्या दिशेनी आली आणि जंगलात लुप्त झाली! क्षणभर आम्ही थक्क होऊन, मंत्रमुग्ध होऊन पाहात होतो, इतके की मी माझा कॅमेरा उचलून छायाचित्रे घेण्याचेही विसरुन गेलो! या अनुभवामुळे वाघ दिसण्याबाबतच्या माझ्या मतावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले, की जेव्हा तुम्हाला वाघ दिसण्याची अपेक्षा नसते तेव्हा तुम्हाला तो हमखास दिसतो!
उत्साहाच्या भरात मी शक्य तेवढी छायाचित्रे काढली व खोलीवर परतल्यानंतर मी काय छायाचित्रे काढली हे तपासले. त्यानंतर वाघीण चितळांच्या कळपास ओलांडून जातानाचे छायाचित्र मी घेतले होते, या छायाचित्राला पाहताच माझ्या मनात मथळा सुचला मी माझ्या गरजांसाठी जगते, हव्यासासाठी नाही वाघीणीचे पोट भरलेले होते त्यामुळे तिला उगाच हरिणांना मारण्यात रस नव्हता, इथेच निसर्गातील प्राणी मानवापेक्षा सरस ठरतात. आपण अन्न किंवा पैशामागे लागतो, आपल्यापैकी ब-याच जणांसाठी काहीही पुरेसे नसते व आपल्या सभोवतालाच्या निसर्गाचा -हास होण्याचे हेच मुख्य कारण आहे! आपल्याला जगण्यासाठी आपल्या हव्यास पूर्ण होणे आवश्यक असते तर वाघासारख्या हिंस्त्र श्वापदालाही जगण्यासाठी केवळ गरजा पूर्ण होणे आवश्यक असते! मी ही छायाचित्रे सँक्च्युरी एशियाच्या फेसबुक पेजवरपण टाकली व त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रियांद्वारे प्रचंड प्रतिसाद मिळाला. फेसबुकवर किती लाईक किंवा डिसलाईक मिळाल्या यावरुन एखाद्या गोष्टीचे किंवा कृतीचे यश मोजणा-या व्यक्तिंपैकी मी नाही, मात्र सँक्च्युरी एशियाचे फेसबुक पेज केवळ वेळ घालविण्यासाठी किंवा मजा म्हणून तयार करण्यात आलेले नाही. वन्यजीवनातील काही सर्वोत्तम क्षण, वन्यजीवन संरक्षणाच्या क्षेत्रातील ज्येष्ठांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे! अशा लोकांकडून तुमच्या छायाचित्रावर काही प्रतिक्रिया मिळणे म्हणजे तुमची छायाचित्रे खरोखरच गांभिर्याने काढण्यात आली आहेत याचीच पावती असते. यावेळी मी माझ्या सफारी विषयी नेहमीप्रमाणे लिहीण्याऐवजी, त्या छायाचित्रांवर देण्यात आलेल्या प्रतिक्रियांबाबत माझ्या टिप्पण्या एकत्र केल्या आहेत! माझ्या अशा प्रकारच्या पहिल्या टिपणीची (शेअर-अपची) सुरुवात पाहू...
मित्रांनो, नीरव, शांत पेंच जंगलात कामानंतर आरामात फेरफटका मारत आहे, बुरबुर पाऊस पडतोय, इथली ताजी हिरवीगार हवा व उबदार सूर्यप्रकाशही अनुभवतोय. वाघ पाहण्यासाठी वेडावलेल्या पर्यटकांच्या गोष्टी व जंगलातील कर्मचा-यांचे अनुभव ऐकतोय, आणि अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या सुमारे २०० चितळांच्या कळपातून एक मोठी वाघीण आली, इकडे तिकडे पाहता, सरळ आमच्या दिशेने चालत आली! त्यावेळी चितळही शांत होते, कोणीही धोक्याचा इशाराही दिला नाही! आम्ही सर्वच जण त्यामुळे एवढे आश्चर्यचकित झालो की मी काही वेळ कॅमेरा उचलून छायाचित्रे काढण्याचेच विसरलो. त्या जंगलाच्या राणीच्या चालीचा रुबाबच तसा होता! तुम्ही जेव्हा एका मोठ्या वाघीणीच्या साम्राज्यात, तिला इतक्या जवळून, तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहता तेव्हा तो मोहिनी घालणारा अनुभव असतो.... तुम्हाला असे वाटते की तिच्या शक्तिशाली हिरव्या डोळ्यांच्या जादूने तुम्हाला बांधून ठेवले आहे, ती तुम्हाला तिच्या रस्त्यातून बाजूला व्हायला सांगतेय व तुमच्याशी किंवा तुमच्या कॅमे-याशी तिला जराही घेणे देणे नाही! मी शेकडो वाघ पाहिले आहेत, व महान जिम कॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे, मला त्यातील प्रत्येक वाघ आठवतो कारण प्रत्येक भेटीत काही तरी वेगळे पाहायला मिळते त्यामुळे ती अविस्मरणीय ठरते. जंगलाचा प्रत्येक पैलू विशेष असतो, अगदी एखादा लहानसा कीटक किंवा एखादे जंगली फूलही तेवढेच महत्वाचे असते, तरीही काही दृष्ये ही इतर दृष्यांपेक्षा वेगळी असतात, काही सर्वोत्तम असतात! ऑगस्टमध्ये गेल्या आठवड्यात पेंचच्या जंगलातील हा अनुभव होता, तिथे वनविभागाला मदत करायला गेलो होतो. गेम रेंज अधिकारी श्री. तिवारी यांचे काम खरोखर वाखणण्याजोगे आहे, ते अतिशय चांगले क्षेत्र अधिकारी आहेत, माहिती देण्याबाबत ते नेहमी उत्साही असत. अशी दृष्ये व घटना पुन्हा पुन्हा या जंगलात खेचून आणतात, ज्यामुळे त्या हिरव्या डोळ्यांची मोहिनी पुन्हा अनुभवता येईल, किमान माझ्याबाबतीत तरी असे घडते.
असे अनुभव सांगितल्याने जागरुकता निर्माण होते, ज्ञान मिळते असे मला वाटते, त्यामुळे कुणाचा तरी फायदा होतो, व सरतेशेवटी निसर्गाला त्याचा लाभ होतो, ही छायाचित्रे सर्वांना दाखविण्यामागचा उद्देश हाच आहे. वाघीण दिसायच्या थोड्याच वेळ आधी  मी आणि श्री. तिवारी चर्चा करत होतो की जंगल पर्यटनामधील विसंगती म्हणजे लोक जीवतोड करुन वाघ शोधत असतात मात्र त्या उत्साहात जंगलाचे सौंदर्य अनुभवायचे विसरुन जातात! मात्र हा दुर्मिळ प्राणी व त्याचे सौंदर्य यातच त्याचे उत्तर दडलेले आहे, तो सहजपणे दिसला असता तर त्यातली मजा निघून गेली असती हे देखील तितकेच खरे आहे! अशा दृष्यांमधूनच आपल्याला निसर्ग व त्याच्या वर्तनाविषयी अधिक माहिती समजते, खरं म्हणजे मला कॅमेरा काढायला क्षणभर उशीरच झाला होता. ती वाघीण अक्षरशः त्या चितळांना ओलांडून आली व तिने त्यांच्याकडे एकदाही पाहिले नाही! आमच्यासाठी ते अविश्वसनीय होते, मात्र चितळांना ते कदाचित माहिती असावे कारण त्यातल्या एकानेही धोक्याचा इशारा दिला नाही! मी इतक्यावर्षांपासून जंगलात जात आहे, मात्र दरवेळी काही तरी नवीनच अनुभव मिळतो व म्हणूनच कदाचित ती सर्वोत्तम शाळा आहे, प्रत्येक क्लासमध्ये काहीतरी नवीन शिकवणारी!
अगदी जंगलाचे अधिकारी सुद्धा म्हणाले की त्यांच्या इतक्या वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी वाघीण चितळांच्या कळपातून चालत येत आहे व तरीही चितळ आरामात असल्याचे दुर्मिळ दृश्य पाहिलेले नाही. मात्र अशाच प्रकारची अनेक दुर्मिळ दृश्ये त्यांना दररोज दिसतात, कारण जंगलात नेहमी असे काही ना काही घडतच असते!
 आमच्यासारख्या नेहमी जंगलात जाणा-या लोकांना मित्रमंडळी व कुटुंबियांकडून एक प्रश्न नेहमी विचारला जातो की, तिथे असे काय आहे ज्यामुळे तुम्ही वारंवार जाता?" त्याचे उत्तर या सर्वांपलिकडचे आहे! आम्ही दरवेळी काही तरी नवीन अनुभव घेऊन येतो व आम्ही जेव्हा जंगलात प्रवेश करतो तेव्हा काय घेऊन परत येणार आहोत हे माहिती नसते! माहिती नसलेले जाणून घेण्याची ही भावनाच आम्हाला जंगलात वारंवार यायला लावते, प्रत्येक वेळी वाघच असायला पाहिजे असे नाही, अगदी फुलपाखरु किंवा एखादे जंगली फूल पाहणे देखील रोमांचक अनुभव असू शकतो व ते जंगलासाठी तितकेच महत्वाचे आहेत. जंगलाविषयी वाटणा-या या जिव्हाळ्यातूनच असे अविस्मरणीय क्षण मिळतात व यातूनच जंगल टिकण्याची आशा निर्माण होते असे मला वाटते! केवळ जंगलात जाऊन त्याचे सौंदर्य न्याहाळणेच महत्वाचे नसते तर आपली त्याच्याबाबतीत व जंगलाच्या यंत्रणेचा भाग असलेल्या प्रत्येकाच्या बाबतीतली जबाबदारी त्याहून कित्येक पटींनी जास्त आहे. चला तर मग एकजूट होऊन काम करु व जंगलांमध्ये वाघ व इतर प्रजातींना सुरक्षित करु!
 मी दिलेल्या शब्दाला जागत, आमचा संजीवनी ग्रुप वन्यजीव संरक्षणातील आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. नुकत्याच अशाच एका कार्यक्रमात कान्हातील शाळेत जाणा-या मुलांना शाळेचे दप्तर व पाण्याची बाटली असे जवळपास १५० संच वाटले. त्यापैकी बहुतेक मुले अभयारण्यात काम करणा-या स्थानिक वाटाड्यांची तसेच बैगा आदिवासींची होती. एका छोटेखानी समारंभात आम्ही ते संच कान्हा अभयारण्याच्या वाटाड्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींच्या हाती सुपूर्द केले. कान्हा अभयारण्याचे संचालक श्री. जसबीर चौहानही त्याप्रसंगी उपस्थित होते. मित्रांनो मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे, आम्ही किती समाजकार्य करत आहोत हे दाखविण्यासाठी मी ही माहिती येथे दिलेली नाही, मात्र यामुळे कुणाला तरी प्रेरणा मिळू शकते व या चांगल्या हेतूला थोडासा हातभार लागू शकतो म्हणुन हे शेअरिंग आहे ! आपण केवळ मौज म्हणून आपल्या मुलांसाठी आठवड्याच्या कोणत्याही दिवशी maa^लमध्ये जाऊन काहीही खरेदी करत असतो, तो केवळ आपला हव्यास असतो, ती आपली गरज नसते, कान्हासारख्या ठिकाणच्या लोकांच्या गरजा आपण विसरुन जातो. तिथे शाळेत  जाणा-या अनेक मुलांनी कधी दप्तरही पाहिलेले नाही! जंगलांचे संरक्षण करणे ही केवळ एखाद्या विभागाची किंवा व्यक्तिची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणती व्यक्ती कोणत्या क्षणी वन्यजीव संरक्षक बनेल काही सांगता येत नाही, कारण ती एक मनस्थिती आहे एखादे पद नाही!
मी फेसबुकवर टाकलेल्या छायाचित्रांचे तसेच आम्ही वन संरक्षणासाठी करत असलेल्या कामाचे जे कौतुक झाले त्याविषयी मी माझ्या मुलांना उद्देशून काही तरी लिहीले, या लेखाच्या शेवटी ते देत आहे
 प्रिय रोहित, रोहन, निखिल,
सँक्च्युरी-एशियासारख्या व्यासपीठावर एक साधेसे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि माझ्यावर प्रतिक्रिया आणि कौतुकाचा वर्षाव होतोय! चित्र खरोखरच अतिशय चांगले आले हे मान्य असले तरीही ते मिळणे हे माझे  फक्त नशीबच होते, मी केवळ थोडी तत्परता दाखवली, कॅमेरा उचलला आणि ते दृश्य टिपले! सँक्च्युरी एशियाद्वारे घेतल्या जाणा-या वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत हे छायाचित्र पाठवावे असे त्यांचे म्हणणे आहे!
यातून मी शिकलो की तुमचा छंद हा तुमचा आनंदाचा ठेवाही असू शकतो! आपण जे करतो ते पूर्णपणे समर्पित होऊन केले पाहिजे. तसे केले तर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. सर्वात शेवटचे म्हणजे मी हे सर्व कौतुकाच्या आशेने नाही तर माझ्या आनंदासाठी केले व त्यासोबत जे मिळाले तो केवळ बोनस होता. मी या छायाचित्राचा निर्माता आहे अशी हवा माझ्या डोक्यात जाऊ नये कारण मी केवळ पोस्टमनचे काम केले आहे, ज्याला चांगली बातमी इतरांना कळविण्याचे भाग्य मिळाले! विशेषतः तुमच्यापर्यंत हे विचार पोहोचावेत म्हणून हे लिहीत आहे, कारण एक दिवस तुम्हीही कदाचित अशा परिस्थितीत असाल, तेव्हा छायाचित्र काढणे नव्हे तर अशा ठिकाणांचे संरक्षण करणे हे तुमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे लक्षात ठेवा!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif


Sunday, 25 August 2013

गुन्हा आणि शहर !




















शक्तिशाली लोकांसाठी, इतर करतात ते गुन्हे असतात.”...नोआम चॉमस्की

या अमेरिकी भाषातज्ञ, तत्वज्ञ, कार्यकर्ता व बहुआयामी व्यक्तिमत्वाचे हे शब्द आपल्या सध्याच्या परिस्थितीला किती चपखलपणे लागू होतात! आपले शहर एकेकाळी निवृत्तवेतनधारकांचा स्वर्ग होता, ते दिवस आता सरले आहेत! हे शहर कुणालाही कोणलाही भुरळ पाडणारे होते, इथले सुरक्षित वातावरण तसेच संस्कृती यामुळे लोक या शहरावर प्रेम करायचे. इथे संस्कृती, आदर, शांतता या शब्दांची जागा पैसा, वाढ, समृद्धी या शब्दांनी कशी घेतली हे पाहणे खरोखर आवश्यक आहे! देशातील इतर महानगरांप्रमाणेच पुण्याचीही सर्वच पातळ्यांवर झपाट्याने वाढ झाली मात्र ही वाढ संस्कृती, आदर किंवा शांतता या तीन घटकांच्या बाबतीत झाली नाही. हे सर्वकाही केवळ वीस वर्षांच्या म्हणजे १९९०-२०१० या कालावधीत झाले आहे व या आघाड्यांवरील अधःपतन अधिकाधिक ठळक होत आहे. एकीकडे आपली प्रगती दाखविणारे मॉल, आयटी पार्क, मोठी निवासी संकुले, मल्टीप्लेक्स, शैक्षणिक संस्था आहेत व त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसरीकडे आपल्या वृत्तपत्रांमध्ये सर्व प्रकारच्या गुन्हांच्या बातम्या दिसतात, त्यामध्ये बॉम्बस्फोट, खून, दरोडा, वाहनांमुळे रस्त्यांवर होणारे अपघात, बलात्कार अशा अनेक बातम्या असतात! सोन्याची साखळी खेचण्यासारखे गुन्हे तर नेहमीचे झाले आहेत, त्यामुळे आपल्याला त्याविषयी काही वाटतच नाही. प्रत्येक पोलीस प्रमुख आजकाल मनुष्यबळाची कमतरता, पोलिसांकडील अपुरी साधने व पोलीस दलाकडे पायाभूत सुविधांची कमतरता अशा समस्यांचे रडगाणे गात असतो. रस्त्यांवर विविध ठिकाणी लावलेल्या कॅमे-याद्वारे घेण्यात आलेली लाखो चित्रे पाहून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिका-यांमध्ये चाललेला वाद आपण पाहिला आहे! सरकारमधील कोणत्याही वरिष्ठ अधिका-यांनी या गंभीर प्रश्नाबाबत काहीही पावले उचलेली नाहीत, जो थेट शहराच्या सुरक्षेशी निगडित आहे!
आपण प्रत्येक नेत्याची आश्वासने ऐकतो की संपूर्ण शहरात सीसी टीव्ही कॅमेरे लावू, मात्र त्यानंतर त्यासाठी किती पैसे द्यायचे व त्याच्या निविदेविषयी कोण निर्णय घेईल हे ठरविण्यात अनेक वर्षे जातात! हे सर्व नवीन नाही, देशातील प्रत्येक महानगराची हीच कहाणी आहे. मात्र राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहराची अशी गत झाल्यानंतर सुरक्षा व शांतता या जीवनाच्या मूलभूत घटकांबाबत चिंता निर्माण होते. जेव्हा बाँबस्फोटांसारख्या पार्श्वभूमीवर आपले शासनकर्ते अशाप्रकारची आश्वासने देतात व ती पूर्ण करीत नाहीत तेव्हा ती फसवणूक होत नाही का, जो एक गुन्हाच आहे!
वर नमूद केल्याप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, साखळी खेचणे, घरफोडी, रस्त्यावरील टोळ्यांमध्ये होणा-या चकमकी व खून या शहरासाठी नेहमीच्या बाबी झाल्या आहेत. मात्र जेव्हा भाडोत्री मारेकरु समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिची हत्या करतात तेव्हा आपल्या संपूर्ण यंत्रणेचा व शहराच्या भवितव्याचा विचार करायची वेळ खरोखर आली आहे असे जाणवते! आपल्या शहरासाठी ही घटनादेखील नवीन नाही कारण मेजर जनरल वैद्य यांची सुमारे २५ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, मात्र ते एक दहशतवादी कृत्य होते. श्री दाभोलकरांच्या बाबतीत जे झाले ते समजासाठी अतिशय धक्कादायक आहे कारण ते दहशतवादाचा बळी ठरलेले नाहीत तर राज्यातील किंबहुना शहरातीलच एखाद्या गटाने त्यांना मारले असण्याची शक्यता आहे! दाभोलकर सरांच्या दुःखद अंताविषयी थोडेसे बोलले पाहिजे...
इथे कुठेतरी यंत्रणाही जबाबदार आहे, ज्यामध्ये अशा घटना सहजपणे होऊ शकतात. आज दाभोलकर सरांची हत्या झाली उद्या त्याजागी दुस-या कुणाची हत्या होऊ शकते. ज्या व्यक्ती आपली मते माध्यमांद्वारे स्पष्टपणे मांडतात त्यांच्या चेह-याला काळे फासणे, भांडारकर संस्थेत काही वर्षापूर्वी करण्यात आलेली मोडतोड, किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी एखाद्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात धुडगूस घालण्यासारखे सत्ता केंद्रांद्वारे केले जाणारे अनेक गुन्हे घडतात! हे सर्व काय दर्शवतात? पोलीस स्वतःहून अगदी लहानसहान राजकीय नेत्याला स्वतःहून संरक्षण देतात, मग श्री. दाभोलकरांच्या जीवाला धोका होता तरीही त्यांना संरक्षण का देण्यात आले नाही? पोलिसांना त्यांचा निर्णय योग्य होता असे वाटत असेल तर मग या हत्येच्या पार्श्वभूमीवर अचानक काही सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण का देण्यात आले आहे? पोलिसांना हा धोका आधी का ओळखता आला नाही व सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा दाभोलकरांना सुरक्षा देण्यात आली नव्हती व त्यांची हत्या झाली तेव्हा हे सगळे मी दाभोलकर आहे अशा टोप्या घातलेले तथाकथित कार्यकर्ते कुठे होते? श्री. दाभोलकरांना सुरक्षा देण्यासाठी अशी निदर्शने का करण्यात आली नाहीत, ज्यामुळे कदाचित त्यांचा जीव वाचला असता?  या घटनेचे माध्यमांमध्ये अनेक पडसाद उमटतील पुणे बंद वगैरे करुन निषेध केला जाईल मात्र प्रत्येक वेळी अशा कृत्यांमागील खरे गुन्हेगार, तसेच अशी कृत्ये करणा-या मारेक-यांना लवकरात लवकर अटक होत नाही व त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा दाभोलकर सरांसारख्या लोकांचा नाहक जीव जाईल!
दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, समाजातील सधन व निर्धन लोकांमधील वाढती दरी यामुळे अधिक लोक गुन्ह्यांकडे वळत आहेत व पोलीस प्रत्येकाला सुरक्षा देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे मान्य आहे. आपण स्वतःही आपल्या सुरक्षेबाबत अतिशय निष्काळजी असतो, हे वारंवार दिसून आले आहे. गृहसंकुलातील निवासी त्यांच्या घराच्या सजावटीवर हजारो रुपये खर्च करतील मात्र प्रवेशद्वारापाशी किंवा सामाईक जागेत सुरक्षा कॅमेरे बसविणार नाहीत. ते चोवीस तासांच्या चांगल्या सुरक्षा सेवेसाठीही पैसे देत नाहीत, ही सगळी सरकारची किंवा पोलिसांची जबाबदारी असल्याचे त्यांना वाटते! सुरक्षेच्या बाबतीत आपण अतिशय निष्काळजी असतो व आपल्याला कोणताही त्रास न होता सुरक्षेची जबाबदारी कुणीतरी घ्यावी असे आपल्याला वाटते. एफसी रस्त्यावर पार्किंगला मनाई करण्यात आल्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली हे त्याचे एक उदाहरण आहे. पार्किंगसाठी पर्यायी सोय असली पाहिजे हे मान्य आहे मात्र इतर ठिकाणी जाणा-यांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे जे बाँबस्फोटासारख्या घटनांचे संभाव्य लक्ष्य असू शकतात! अशा घटनांना आपली प्रतिक्रिया हा देखील चिंतेचा विषय आहे, बरेचजण गुन्हा झालेल्या ठिकाणांची छायाचित्रे काढण्यात व ती सोशल मीडियावर टाकण्यात गुंतलेले असतात, असे करणे अवैध असल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. केवळ गुन्हेगार हीच समस्या नाही तर आपण गुन्ह्याला ज्या प्रकारे प्रतिकार करतो ती देखील एक समस्या आहे. आपण एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होतो व ते देखील अगदी अल्पावधीसाठी! दिवसेंदिवस कायद्याचा धाक कमी होत चालला आहे, मग येथे पार्किंग करु नये असे लिहीलेल्या फलकाखालीच गाडी लावणे असो किंवा काही रुपयांसाठी कुणाला मारण्याची सुपारी घेणे असो, कायदा आपल्या हातात आहे ही मानसिकताच समाजासाठी घातक आहे! त्यास वेळीच आळा घातला नाही तर आपण केवळ अशा कृत्यांचा निषेधच करत राहू, जी एक नेहमीची बाब होईल. वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे जे शासनकर्ते कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करत आहेत व केवळ आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्यात गुंतलेले आहेत त्यांच्या कृत्यांचा भस्मासूर एकदिवस त्यांनाच गिळंकृत करुन टाकेल, मात्र तोपर्यंत सर्वांसाठीच फार उशीर झालेला असेल. कोणत्याही शहराचे यश ते शहर नागरिकांसाठी किती सुरक्षित व शांत आहे यावर अवलंबून असते व ते शहराच्या संस्कृतीद्वारेच ठरते. सामान्य माणसासाठी हे शहर सुरक्षित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, आपण वेळीच कृती केली नाही तर आपले काहीही भविष्य नसेल!
https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स