Tuesday, 16 January 2024


नाजुक नात्याची जबाबदारी स्वीकारतांना !













नाजुक नात्याची जबाबदारी स्वीकारतांना !


२५ डिसें २३

एका स्त्रीशी विवाह करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे जी एक पुरुष स्वेच्छेने स्वीकारतो मी.

 प्रिय दादा,

    माझा मुलगा म्हणून आज मी तुला शेवटचे लिहीतो आहे कारण उद्यापासून तू फक्त माझा मुलगा राहाणार नाहीस, अर्थात माझ्यासाठी मुलगा, दादा वगैरे राहशीलच पण आता केवळ एक मुलगा असणार नाहीस, म्हणूनच हा दिवस विशेष आहे व माझे आजचे शब्दही. मला असे वाटते लग्न ही सर्वात मोठी जबाबदारी आहे कारण प्रत्येक पुरुष एखाद्या महिलेचा मुलगा असतो, अनेक पुरुष कोणा कोठल्या तरी स्त्रीचे भाऊ, दीर, मेव्हणे, सख्खे, चुलत, आत्ते, मामे भाऊ असतात. परंतु पुरुषाला ही सर्व नाती जन्मतःच मिळतात, तो ही नाती नाकारू शकत नाही किंवा फेटाळू शकत नाही. खरे तर प्रत्येक नाते ही एक जबाबदारीच असते, केवळ तुम्ही नाते या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर. परंतु एका स्त्रीशी लग्न करणे हा पूर्णपणे त्या पुरुषाचा स्वतःचा निर्णय असतो. म्हणूनच ही जबाबदारी तो आपणहून स्वीकारतो असे मी म्हटले. ही जबाबदारी तुम्ही स्वतःसाठी स्वीकारलेली असते व पुरुष म्हणून तुम्हाला ही जबाबदारी नेहमी पार पाडावी लागेल असेही मला तुला सांगावेसे वाटते. दादा, रक्ताची नातीही तुटतात किंवा लोक दुरावतात किंवा त्यांच्या नात्यातील जबाबदारीकडे पाठ करतात कारण ती आपणहून स्वीकारलेली नसते, एखादा पुरुष (म्हणजे भित्रा) हे अतिशय सोपे कारण देऊ शकतो, परंतु लग्नाच्या बाबतीत असे करता येत नाही. इथे तुम्ही अशा एका स्त्रीचा हात हातात घेता जिचा जन्म तुमच्या कुटुंबामध्ये झालेला नसतो, तुमची ओळखही अगदी नवीन असते व ती केवळ तुम्ही तिचा हात घट्ट धरून ठेवला आहे या भरवशावर तिचे घर, कुटुंब, मायेची माणसे सोडून आलेली असते. म्हणूनच तुम्ही नेहमी तिच्यासोबत असाल असा विश्वास तिला देणे ही एका पुरुषासाठी सर्वात मोठी जबाबदारी असते.

     मला माहिती आहे की, नव्या पिढीतल्या (आजच्या युगातील) मुलांना हे कदाचित वायफळ किंवा मूर्खपणाचे वाटेल परंतु एक लक्षात ठेव, जुने विचार व त्यामागचे तत्वज्ञान नेहमी टिकून राहते व हे सिद्ध झालेले आहे. मी इथे लिंगभेद करत नाही व महिलांच्या क्षमतेचा पूर्णपणे आदर करतो तरीही किती पुरुष त्यांचे घर सोडून लग्नानंतर बायकोच्या घरी राहायला जातात. किंवा त्यांच्यापैकी कितीजण त्यांचे अडनाव बदलतात व त्यांच्या डनावाऐवजी बायकोचे माहेरचे अडनाव वापरतात, लग्नानंतर नाव बदलले म्हणून किती पुरुषांना नवीन पारपत्र, पॅनकार्ड, चालक परवान्यासाठी अर्ज करायला आवडेल किंवा किती पुरुषांमध्ये लग्नानंतर त्यांचे घर बदलले म्हणून त्यांची नोकरी सोडण्याची किंवा नोकरीमध्ये बदलीसाठी विनंती करण्याची हिंमत आहे, ही यादी अतिशय मोठी आहे. या यादीमधील बाबींपेक्षाही महिलांना आपल्या नवऱ्याचा हात धरण्यासाठी अतिशय मोठा त्याग करावा लागतो व मी खरोखरच सांगतो की फारसे पुरुष हे करू शकणार नाहीत व तुम्ही त्या त्यागाचा आदर केला पाहिजे. दादा, आज कुटुंब चालवताना तुला सल्ला देण्यासाठी तुझी आई सोबत नाही व तो देण्यासाठी मीदेखील काही आदर्श नाही, परंतु मी भोवताली व आपल्या घरी, तसेच माझ्या आई-वडिलांसोबत जे काही पाहिले आहे, त्याचप्रमाणे सुदैवाने मला मित्रांकडूनही थोडे शहाणपण मिळाले आहे. म्हणूनच मी लग्न, कुटुंब (म्हणजे संसार) व तुला ज्या जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे त्याविषयी माझी मते व्यक्त करत आहे. व्यवस्थापन, व्यवसाय, यश व सारख्या विषयांवर बरीच पुस्तके आहेत, परंतु एक यशस्वी गृहस्थ कसे व्हायचे याविषयी कोणतही पुस्तके नाहीत, कारण यातील यशाचे मोजमाप कोणत्याही पट्टीने करता येत नाही, हेच अनेक लोक समजून घेण्यास विसरतात. त्याऐवजी, मनाने स्वस्थ होण्याचा प्रयत्न करणे हाच यशस्वी गृहस्थ होण्याचा राजमार्ग आहे व तुम्ही जेव्हा तुमच्या पत्नीचा इतर कशाहीपेक्षा, सर्वाधिक आदर करता तेव्हाच हे शक्य होते. मी म्हणेन की तुम्ही स्वतःपेक्षाही पत्नीचा जास्त आदर करा, कारण हा तिचा हक्क आहे, तुम्ही तिचा आदर करून तिच्यावर उपकार करत नसता या वस्तुस्थितीचा आधी स्वीकार करा. केवळ एखादा पुरुष एखाद्या स्त्रीचा ती जी काही आहे त्यासाठी आदर करत असेल तरच तो स्वतःला पुरुष म्हणवण्यासाठी पात्र आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मी हे शिकलोय की एखादी स्त्री अख्ख्या जगाकडून दुखावले जाणे, अपमान सहन करू शकते परंतु दोन पुरुषांकडून अपमान कधीच स्विकारु शकत नाही; एक म्हणजे तिचा नवरा व दुसरा म्हणजे तिला मुलगा, माझे हे शब्द कधीही विसरू नकोस. मी तुझ्या आईसाठी अगदी आदर्श नवरा नव्हतो परंतु मी प्रयत्न केला हे मी सांगू शकतो व मी तुझ्याकडूनही हीच अपेक्षा करतो. ही जबाबदारी समाधानाने निभावण्याचा हाच एक खात्रीशीर मार्ग आहे, कारण तू अपयशी झालास तरीही तू शंभर टक्के प्रयत्न केलेस हे समाधान असेल, हा देखील याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. आता जबाबदाऱ्या कशा हाताळायच्या हे शिकताना, एक लक्षात ठेव कोणतेही नाते महागड्या भेटवस्तू किंवा सर्व सुखसोयींनीयुक्त सुट्ट्यांमुळे जिवंत राहात नाही (अर्थात तुमच्या पिढीसाठी तेदेखील आवश्यक आहे !), तर लहान-सहान गोष्टींमुळे राहाते, त्यासाठी तुला तुझ्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. तिने तुझ्यापर्यंत पोहोचावे अशी कधीही अपेक्षा करू नकोस, त्यासाठी तुला काही पायऱ्या खाली उतराव्या लागल्या तरीही त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला जे काही वाटते ते मनमोकळेपणाने व योग्य प्रकारे बोल, हेच महत्त्वाचे आहे.

    दादा, अनेक वर्षांपूर्वी तुम्ही लहान होता, तेव्हा आम्ही आमच्या मित्रांना जेवायला घरी बोलायचो, आमच्या जनसंपर्काचा भाग म्हणूनही काही मंडळी घरी जेवायला असायची. तेव्हा तुझी आईच स्वयंपाक करायची. तेव्हा आपल्याला कामासाठी पूर्णवेळ बाई ठेवणे परवडण्यासारखे नव्हते. पाहुण्यांची जेवणे होऊन, ते निघेपर्यंत बरेचदा आईला उशीरापर्यंत जागे राहावे लागत असे. एका रात्री, पेयपानानंतर, एक मित्र म्हणाला (अतिशय ज्येष्ठ अधिकारी) त्याचे स्नॅक्सनीच  पोट भरले असल्याने तो जेवू शकणार नाही. हे ऐकून दुसरा एक मित्र जोदेखील पदाने तसेच वयानेही ज्येष्ठ अधिकारी होता त्याला रागावला व म्हणाला की तुला जेवावेच लागेल, कारण घरातल्या गृहिणीने आपल्याकरता रांधण्यासाठी इतके कष्ट घेतले आहेत व आता न जेवणे म्हणजे तिचा अपमान केल्यासारखे होईल. ते शब्द मी अजूनही लक्षात ठेवले आहेत, त्यादिवसापासून मी नेहमी एक नियम केला आहे की मी दुपारी किंवा रात्री घरी जेवायला नसलो तर घरी वेळेत कळवायचे. तसेच मी जेव्हा घरी असतो तेव्हा माझ्यासाठी जो काही स्वयंपाक करून ठेवला असेल ते मी खाण्यास मी शिकलो आहे, आधी तो तुझ्या आईने बनवलेला असायचा, आता माझ्या आईने बनवलेला असतो. ही अतिशय लहान गोष्ट आहे पण यामुळे घरातल्या गृहिणीला अतिशय आनंद होतो, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तुझ्या आजीला विचार.

    अन्नाविषयी आणखी एक गोष्ट म्हणजे, मी माझ्या आईने जेवणाच्या चवीकरता घरी माझ्या बाबांचे टोमणे खातांना अनुभवले आहे (मी अनेक महिलांना त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या स्वयंपाकाच्या कौशल्यावरून त्यांचा अपमान होताना पाहिले आहे) व मी एक गोष्ट स्वतःसाठीतरी ठरवली आहे ती म्हणजे, तुमच्या ताटात वाढलेल्या अन्नाला कधीही नावे ठेवू का, मग ते तुमच्या घरात असो किंवा इतरत्र कुठेही. एकदा दुपारी आपल्या घरी जेवताना आमटी अळणी होती, मी तुझ्या आईला त्याविषयी काहीही न बोलता जेवलो. नंतर ती जेवायला बसली तेव्हा तिच्या हे लक्षाते आले व तिने मला आमटी अळणी असल्याचे माझ्या लक्षात आले नाही का असे विचारले. त्यावर मी उत्तर दिले, मी सुद्धा कामाच्या ठिकाणी अनेक गोष्टी विसरतो व विसरण्यासाठी बोलणीही खातो, तेव्हा किती वाईट वाटते हे मला माहिती आहे, त्यामुळे मी तक्रार केली नाही. अर्थात म्हणून मी सर्वोत्तम किंवा सर्वात यशस्वी पती होतो असा अर्थ होत नाही, परंतु तू नेहमी या सूचनावरून अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करू शकतोस, एवढेच मी म्हणेन. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे खोटी स्तुती करू नकोस, परंतु तू बायकोचे प्रयत्न जाणतोस व त्याचा आदर करतोस याची तिला जाणीव करून दे, एखाद्या नात्याचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.

सरतेशेवटी, पाच मुद्दे, जरा जास्त होतील परंतु तुझ्या आगामी जबाबदारीसंदर्भात माझी मतं म्हणुन सांगतोय …

. तुझ्या अहंकारापेक्षाही तुझ्या बायकोचा जास्त आदर कर, कधीही म्हणजे अगदी तुझ्या जिवलग मित्राकडेही        अथवा विनोदाच्या ओघातही तिच्याविषयी टीका करू नकोस.

. तू तुझ्या बायकोच्या बाबतीत किंवा घरात एखादी चूक केली हे तुला माहिती असताना कधीही माफी मागण्यास     लाजू नकोस.

. पत्नीच्या अडचणी किंवा गरजा येऊन तुला सांगेल अशी वाट पाहात बसू नकोस, तू पुढाकार घे आणि तिच्या         गरजा काय आहेत हे जाणून घे.

. पत्नीच्या कामगिरीसाठी तिला प्रोत्साहन दे, तिचा प्रशिक्षक होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिचा सहाय्यक हो.

. तू जेव्हा दमलेला - भागलेला किंवा निराश असशील, तेव्हा तुला पुन्हा उभारी मिळावी यासाठी तिची मदत           मागायला संकोच करू नकोस, ती नेहमी तुझ्यासोबत असेल. 

मी म्हटल्याप्रमाणे, पत्नीची जबाबदारी घेणे म्हणजे काय याविषयी मला हे समजले आहे, माझ्या हे कदाचित उशीरा लक्षात आले परंतु तुझ्यापुढे संपूर्ण आयुष्य उरलेले आहे, म्हणून तू या अनुभवातून शिकून अधिक चांगल्याप्रकारे वापर करू शकतो तुझे वैवाहिक आयुष्य समाधानी व जबाबदार असावे याच शुभेच्छा व तुझ्या आईनेही अशाच शुभेच्छा दिल्या असत्या!

 

बाबा (व आई जेथे असेल तेथून)


 

संजय देशपांडे

smd156812@gmail.com
























Wednesday, 3 January 2024


बांधकाम स्थळीचे अपघात टाळतांना, भाग 2












बांधकाम स्थळीचे अपघात टाळतांना, भाग 2


तुम्ही जेव्हा बांधकामस्थळी होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेच्या सर्व संभाव्य शक्यतांचा विचार करता व त्यानुसार त्या टाळण्यासाठी तरतूद करता व त्यानंतरही दुर्घटना घडते व कुणाचा तरी जीव जातो, तेव्हा त्याला मी अपघात असे म्हणतो”… मी.

     मित्रांनोवरील अवतरण हे प्रत्यक्ष एक अवतरण नाही तर तुम्हाला एक विचार प्रक्रिया सांगतोय कारण हा लेख बांधकाम स्थळावरील अपघातांविषयी व ते कसे टाळायचे व त्यातून काय शिकायचे याविषयी आहे याचा तुम्ही सहज अंदाज लावू शकता. पुण्यामध्ये एका बांधकामस्थळी नुकत्याच झालेल्या अपघाताच्या कारणांचे विश्लेषण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तथ्य-शोधन समितीच्या चर्चा सत्रामध्ये माझ्या डोक्यात हे शब्द आले. या लेखाचे जे सार आहे त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करून, नुकतीच जी घटना घडून गेली तिचा अभ्यास करून एक व्यवहार्य यंत्रणा तयार करू ज्यामुळे बांधकामस्थळी अपघात कमी होण्यासाठी (मी थांबवण्यासाठी असे म्हणत नाही) मदत होईल.

   सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या देशामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी मधील बरीचशी कामे अजूनही प्रामुख्याने माणसांद्वारे केल्या जातात कारण या देशामध्ये मजूर स्वस्त आहेत (दुर्दैवाने,आयुष्यही स्वस्त आहे) व त्याचवेळी त्यांच्यापैकी बरेचजण या प्रकारच्या व्यवसायामध्ये (गवंडी, प्लंबर आणि ईतर) आहेत कारण त्यांना करण्यासारखे दुसरे काहीच नाही व उपजीविका चालविण्यासाठी त्यांना ते सोपे वाटते व ती काही त्यांची मनाःपासुनची निवड नाही. यामुळेच या लोकांना प्रशिक्षित करणे हे एक मोठे आव्हान आहे कारण काही संस्था सोडल्या तर अशाप्रकारच्या कामांचे व्यावसायिकरित्या प्रशिक्षण देणाऱ्या फारशा शाळा किंवा संस्था नाहीत उदाहरणार्थ टाईल्स बसविणे, गवंडीकाम, नळजोडणी, सुतारकाम, किंवा पोलादी तुळया बसविणे व इतरही अनेक बाबींचा यामध्ये समावेश होतो. यामुळे या मजुरांना सुरक्षिततेच्या आघाडीवर प्रशिक्षित करणे अधिक अवघड होते कारण त्यांच्यापैकी बहुतेक निरक्षर असतात व त्यांना त्यांच्या पारंपरिक पद्धतीने काम करण्याची सवय असते ज्यामध्ये सुरक्षितताविषयक प्रशिक्षणाचा समावेश केला जात नाही. त्यानंतर येतो तांत्रीक देखरेखीचा भाग, मी स्वतः स्थापत्य अभियंता असल्यामुळे, खात्रीशीरपणे सांगू शकतो की अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते तुम्हाला सुरक्षितता हा विषय सखोल शिकवत नाहीत (अगदी वरवरही शिकवत नाहीत) व त्यामुळे बांधकाम उद्योगामध्ये (केवळ रिअल इस्टेट उद्योगामध्ये नव्हे) एक चांगला स्थापत्य अभियंता बांधकामाचे ठिकाण सुरक्षित ठेवण्यात चांगला असेलच असे नाही. बांधकाम स्थळावरील बहुतेक अपघातांच्यामागचे मुख्य कारण म्हणजे, स्थापत्य अभियांत्रिकी शिकवण्यापासून ते कोणतीही इमारत बांधताना कधीही सुरक्षितता हा दर्जासाठी महत्त्वाचा घटक आहे असे मानले गेले नाही. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षितता साध्य करण्यासाठी आपण हा पैलू लक्षात घेतला पाहिजे.

  कंत्राटदारांसाठी म्हणजे ठेकेदार (मी बांधकामाच्या सगळ्या कामांबाबत बोलतोय) कंत्राट मिळवताना जर तुम्ही खर्चामध्ये सुरक्षिततेसाठीच्या खर्चाचा विचार केला नाही तर तुम्ही मोठी चूक करत आहात कारण केवळ एका अपघातामुळे, त्या कामातून मिळणारा तुमचा नफा तर बुडू शकतो, तसेच तुमचे सर्व आयुष्यही बुडू शकते, त्यामुळे कोणत्याही कंत्राटासाठी निविदा भरताना कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुमच्या उप कंत्राटदारांसोबतचे अटींचे पत्रक किंवा निविदा किंवा कार्यादेश सुरक्षितेतेच्या कलमांनुसार तपासून घ्या व त्यांचे पालन करा.

   सर्वात शेवटचे मालक किंवा बांधकाम व्यावसायिकांसाठी (मी रिअल इस्टेटपुरतेच बोलत आहे),कोणताही अपघात होतो तेव्हा तुमचे मानगुट आधी पकडले जाते व त्यामुळेच मला बांधकामाच्या स्थळी विकासकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाविषयी काहीही वेगळी टिप्पणी करायची गरज भासत नाही!

आता पुन्हा मुळ विषयाकडे वळू,आधी बांधकाम स्थळावरील संभाव्य टप्प्यांची यादी करू जेव्हा अपघात होऊ शकतात व त्यानंतरच आपण ते टाळण्याची सोय करू शकू, बरोबर?

.तुम्ही भूखंड खरेदी करताना

आपल्याला असे वाटते की एका त्या मोकळ्या भूखंडामुळे कसा अपघात होईल, परंतु ते भौगोलिक स्थिती, प्रदेश रचना व भूरचनेवर अवलंबून असते. भूखंडाच्या या सर्व पैलूंचा काळजीपूर्वक अभ्यास करा, तुम्ही भूखंड खरेदी करत असताना कुंपणाची भिंत बांधण्याआधी भूखंडाची स्थिती कशी आहे, तसेच त्याच्या आजूबाजूला कशाप्रकारची कामे सुरू आहेत याची कागदोपत्री नोंद करा, कारण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ तुमच्या भूखंडातील किंवा जवळच्या नैसर्गिक जलस्रोताचा मार्ग, भूस्खलन होऊ शकतील असे उतार किंवा पाणी तुंबणारे भाग किंवा खोल भाग, कारण या सर्व बाबी भूखंड रिकामा असतानाही व तुम्ही जेव्हा येथे मजुरांसाठी वस्ती उभारता तेव्हा त्या अपघाताचे कारण होऊ शकतात.

. मजुरांच्या बांधकामावरी वस्तीगृहे !

हा सर्वाधिक दुर्लक्षित व अपघात होण्याचा सर्वात जास्त धोका असलेला भाग असतो, त्याचे ठिकाण, त्याची रचना तसेच त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य सगळे काही महत्त्वाचे असते. त्यामुळेच या मजुरांसाठी तात्पुरती घरे उभारतांना सर्व प्रकारची काळजी घेऊनच त्या बांधणे आवश्यक आहे आणि नियमीत देखभाल सुद्धा! 

. बांधकामाच्या कुंपणाच्या भिंती

भूखंडाचा आकार तसेच मातीचे थर यानुसार कुंपणाची भिंत घालणे खार्चिक असू शकते, परंतु तुम्ही कुंपणाची भिंत बांधताना पैसे वाचविण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे पुढे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो, त्यामुळे रचना सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच ते करा ती केवळ दिसायलाच आकर्षक नव्हे तर मजबूतही असली पाहिजे!

. पाया किंवा तळघरासाठी खोदकाम

बहुतेक अपघात या टप्प्यात होतात व जेव्हा आपल्याला तीस/चाळीस मजली इमारती बांधायच्या असतात तेव्हा आपल्याला जमिनीमध्येही तेवढेच खोल खणावे लागते व तिथेच नेमकी अडचणीची सुरुवात होते. तुम्ही तुमच्या भूखंडामध्ये खोलवर खोदकाम करता तेव्हा सुरक्षिततेची किंवा तेथे काम करणाऱ्या लोकांचीच नव्हे तर त्या भूखंडाला लागून असलेल्या मालमत्तांचीही अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे जर भूजल पातळी जास्त असेल तर ते पाणी काढूनही टाकावे लागते. पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतेक भागात जमीनीच्या सर्वात वरच्या थरात काळी माती असते व तिचे वर्तन अतिशय चकवणारे असते. जेव्हा ती पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा आक्रसते व जेव्हा कोरडी होते तेव्हा प्रसरण पावते, यामुळे ती वाहून गेल्याने सर्वाधिक अपघात होतात. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा खणता तेव्हा पावसाळ्यामध्ये पूर येण्याचीही चिंता असते. पुनर्विकासाच्या प्रकल्पांमध्ये किंवा काही बंगल्यांचे काम करतेवेळीही आधीचे बांधकाम पाडायचे असते, कामाच्या या दोन्ही टप्प्यांमध्ये अपघात टाळण्यासाठी सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक असते.

. आरसीसी/ गवंडीकाम/ प्लास्टर

इथे दोन बाबी तपासल्या पाहिजेत, एक म्हणजे स्लॅब टाकण्यासाठी शटरिंग करताना किंवा स्लॅबचे कास्टिंग करताना होणारे अपघात व गवंडी काम व बाहेरून प्लास्टर करण्यासाठी मचाण बांधताना होणारे अपघात. त्याचप्रमाणे बांधकाम केले जात असताना प्रत्येक स्लॅबवर विविध सेवांसाठीच्या वाहिन्या म्हणजे लिफ्टसाठीची वाहिनी, विजेच्या मुख्य तारांसाठीची वाहिनी व इतरही बऱ्याच धोकादायक जागा असतात.

 . इमारतीच्या दर्शनी भागाची वा ईतर बाह्य भागाची कामे

इमारतीचा बाह्य भाग आकर्षक करण्याकडे तसेच व्यावसायिक इमारतींच्या दर्शनी भागात काचेची तावदाने लावण्याकडे कल असल्यामुळे, आपल्याला बाहेरून संपूर्ण उंचीवर वेगळी प्रक्रिया करावी लागते व जेव्हा इमारत बहुमजली असते तेव्हा हे धोकादायक असते. बाहेरून रंगकाम करतानादेखील हे विचारात घेणे आवश्यक असते. मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी, बाहेरून रंगकाम करताना संपूर्ण मचाणच कोसळून त्यावर काम करत असलेल्या पंधराहून अधिक रंगाऱ्यांचा जीव गेलाची घटना ताजी आहे!

. काम पूर्ण होण्याच्या वेळच्या बाबी

या वेळेपर्यंत इमारतीची जवळपास सर्व कामे पूर्ण झालेली असली तरीही टाईल्स बसविणे, लॉबीचा आतला भाग तयार करणे अशी कामे करत असताना आग, विजेच्या तारांमुळे शॉर्ट-सर्किट होणे यासारख्या गोष्टी अपघातांचे मुख्य कारण असतात. त्याचशिवाय निसरड्या पृष्ठभागामुळेही घसरण्याची शक्यता असल्यामुळेही अंतिम टप्प्यात अपघात होऊ शकतात. त्याचप्रमाणे इमारतीच्या वर किंवा जमीनीखाली असलेल्या पाण्याच्या टाक्यांचे वॉटर प्रूफिंग हेदेखील धोकादायक काम असते.

. बांधकाम स्थळावरील साधने व सेवा

टॉवर क्रेन, वर्क-लिफ्ट यासारखी बांधकामाची साधने ही बांधकामाच्या टप्प्यातील अपघातांचे मुख्य कारण असतात व त्यांची चांगल्याप्रकारे व नियमित देखभाल केली पाहिजे. त्याचप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये अपघात टाळण्यासाठी इमारतीच्या लिफ्ट, एक्सलेटर, जनरेटर, ट्रान्स्फॉर्मर इत्यादी सेवांची काळजीपूर्वक देखभाल केली पाहिजे. त्याचप्रमाणे फोर्क-लिफ्ट किंवा डंपर किंवा वॉटर टँकर किंवा काँक्रिट मिक्सर यासारखी हलवता येणारी यंत्रसामग्री चालविण्याची परवानगी केवळ प्रशिक्षित व्यक्तींनाच द्यावी, जेणेकरून ती चुकीच्या पद्धतीने चालविल्यामुळे होणारे अपघात टाळता येतील.

. बांधकाम स्थळावरील मजुरांची लहान मुले

बहुतेक लहान मुले सवयीमुळ त्यांच्या पालकांसोबत कामाच्या जागीही जात असल्यामुळे त्यांना अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे  या मुलांवर देखरेख करणे आणि त्यांना बांधकाम चालु असलेल्या भागांपासुन दुर ठेवणे हे महत्वाचे आहे

१०बांधकामाचा शेजार-पाजार

बांधकाम ठिकाणांच्या शेजाऱ्यांना अधिक धोका असतो कारण त्यांचा बांधकाम स्थळाशी परिचय नसतो, आपण त्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे, ग्राहक व बाहेरून बांधकामस्थळी भेट देणाऱ्यांचीही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली पाहिजे.

आता आपण वरील सर्व टप्प्यांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय करावे व काय करू नये याची यादी तयार करू शकतो, तरीही मी वर म्हटल्याप्रमाणे यापेक्षा पूर्णपणे वेगळे काहीतरी असू शकते व त्यामुळे अपघात होऊ शकतो. परंतु तो अपघात असेल व पुढील वेळी आपल्या सुरक्षिततेच्या उपाय योजनांमध्ये आपण ती शक्यताही विचारात घेतली पाहिजे, हेच अपघातातून शिकले पाहिजे!

   शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्रशासकीय सार्वजनिक संस्था तसेच पोलीसांसारख्या तपास संस्थांकडे बांधकाम स्थळावरील अपघात हाताळण्यासाठी एक व्यवस्थित यंत्रणा असली पाहिजे व एखादी घटना घडून गेल्यानंतर व माध्यमांच्या दबावाखाली प्रतिक्रिया देण्याऐवजी व बचावात्मक पवित्रा घेण्याऐवजी,वास्तववादी व व्यवहार्य भूमिका घेतली पाहिजे, तरच अपघात थांबवता जरी नाही आले तरी कमी नक्कीच करता येतील!

 

 संजय देशपांडे

smd156812@gmail.com