"जेव्हा एखाद्या माणसाला वाघाची शिकार करायची असते तेव्हा तो त्याला खेळ (sports) म्हणतो; जेव्हा एखाद्या वाघ माणसाला मारतो, तेव्हा आपण त्याला हिंस्र प्राणी म्हणतो” …. जॉर्ज बर्नार्ड शॉ.
सर शॉ हे निःसंशयपणे सर्वकालीन महान लेखक होते व ते काही वाघांविषयी तज्ज्ञ नव्हते तरीही ते मानवी वर्तनाविषयी मात्र ते अधिकाराने लिहीत असत व त्यांच्या वरील अवतरणात त्यांनी नेमके हेच मांडले आहे. हा लेख वाघांविषयी असल्याने (म्हणजे वाघांच्या जगण्या किंवा मरण्याबद्दल) मी महान लेखक शॉ यांच्या शब्दात थोडा बदल करेन, “जेव्हा एखाद्या माणसाला वाघाला मारायचे असते तेव्हा ते स्व-संरक्षण किंवा गरज किंवा अपघात असतो परंतु जेव्हा वाघ माणसाला मारतो तेव्हा तो नरभक्षक ठरतो!” हा बदल अलिकडच्या घटनांमुळे झाला आहे जेथे वाघ मारला गेला (किंबहुना बरेच वाघ मारले गेले) अश्या बातम्या अनेक लोकं वाचतात व त्याबाबत विसरूनही जातात, नुकताच वाघांना असलेल्या अवैध शिकारीच्या धोक्याविषयी एका प्रसिद्ध मराठी दैनिकामध्ये भलामोठा लेखही आला होता. सर्वप्रथम, माध्यमांनी वन्यजीवनाला (वाघांना) असलेल्या धोक्याचा मुद्दा सातत्याने लावून धरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, परंतु समस्या अशी आहे की हे बर्याच पत्रकारांचे लेखन बंदुकीतून स्वैरपणे गोळ्या झाडल्यासारखे असल्यामुळे परिणामी जे लोक दोषी नाहीत त्यांचेही यामुळे नुकसान होते. जागरुकता निर्माण करायला माझी काही हरकत नाही, परंतु अशा बातम्या कितपत योग्य परिणामकारक असतात हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. आपण जाणतो की एकूणच वन्यजीवन हे धोक्यात आहे, परंतु त्यासाठी केवळ वन विभागाला जबाबदार धरता येणार नाही, किंबहुना हा विभाग एखाद्या दात व पंजे नसलेल्या वाघासारखाच आहे, जेव्हा वन्यजीवन सुरक्षित ठेवणे हा जंगलाच्या हद्दीबाहेरचा मुद्दा असतो. वन्य पर्यटनासंदर्भात काहीही चुकीचे घडले तर माध्यमांनी (म्हणजेच पत्रकारांनी) व स्वघोषित वन्यजीव तज्ज्ञांनी (वन्यप्रेमींनी) वन विभागावर व वन्यजीव पर्यटनावर टीका करायची ही अलिकडे फॅशनच झाली आहे. आपल्या माननीय न्यायालयाविषयी (न्याय यंत्रणेविषयी) पूर्णपणे आदर राखत असे म्हणावेसे वाटते की ते देखील हस्तक्षेप करते व वन्यजीवनाच्या या दोन घटकांवर ताशेरे ओढते. माय बाप सरकार म्हणजेच मंत्रालये व संबंधित विभागांचे सर्वोच्च अधिकारी कारवाई करतात व शिक्षा सामान्यपणे वन्यजीवनाशी संबंधित गाईड, जिप्सी चालक, आरएफओ व जंगलातील प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अशा तळागाळातील लोकांना भोगावी लागते. विनोद म्हणजे, तुम्ही जर वाघाचा मृत्यू दर पाहिला तर या मृत्यूंपैकी जेमतेम १% (होय, एक टक्का) संरक्षित वन क्षेत्रात झालेले असतात जेथे पर्यटन नियंत्रित असते, तर इतर मृत्यू जिथे पर्यटन अजिबातच अस्तित्वात नाही अशा ठिकाणी झालेले आहेत हा माझ्या लेखाचा विषय आहे.
त्यानंतर राज्य मंत्र्यांची आणखी एक बातमी होती, ज्यामध्ये त्यांनी वन्यजीवन सुधारण्यासाठी वन विभाग व स्थानिकांची बैठक घेतल्याचे नमूद करण्यात आले होते. या बैठकीमध्ये केवळ वन विभागांना वाघांचे मृत्यू तसेच माणूस-प्राण्यातील संघर्ष नियंत्रित करण्यासंदर्भातील असमर्थतेबद्दल बोलणी खावी लागली. यातील सर्वोत्तम भाग असा होता की, या बैठकीमध्ये जंगलाभोवताली राहणारे गावकरी वन्यजीवन पर्यटनास चालना देण्याच्या मताचे होते व या ओघात वाघांकडून काही माणसे मारली गेली तर त्यालाही त्यांची काही हरकत नव्हती. कारण काही माणसे मारली गेली आहेत व मारली जातील हे त्यांना माहिती आहे परंतु तरीही त्यांच्या अवतीभोवती वाघ असल्यामुळे ते आनंदी आहेत, कारण यामुळेच त्यांची एकत्रितपणे भरभराट होणार आहे व यालाच सहजीवन म्हणतात, ज्यासंदर्भात आपण काहीच करत नाही. मी स्वतःला वन्यजीवन तज्ज्ञ समजत नाही परंतु मी जंगलात व आसपासच्या परिसरात बराच प्रवास केला आहे व मी वन्यजीव प्रेमी आहे परंतु माझे प्रेम आंधळे नाही, हा फरक आहे.
आता वन्यजीवनाला (म्हणजे वाघांना) असलेल्या धोक्याविषयी किंवा धोक्यांविषयी व वाघांच्या मृत्यूच्या कारणांविषयी बोलू, ही संख्या २०२५ च्या पहिल्या दोन महिन्यात जवळपास दहाहून अधिक होती. सर्वप्रथम, या दहा किंवा बारा मृत्यूंपैकी केवळ एखादा अवैध शिकारीमुळेच झाला असावा असे खात्रीशीरपणे सांगता येईल व इतर मृत्यू वाघांच्या एकमेकांशी झालेल्या संघर्षातून व वाहनांनी धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातातून, विहीरीत पडून किंवा विजेचा झटका लागून झालेले होते. यातील आणखी एक मुद्दा म्हणजे, हे सगळे मृत्यू व्याघ्र प्रकल्पाच्या किंवा संरक्षित जंगलाबाहेरील होते. या सगळ्या संज्ञांमध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊ म्हणजे वाघांच्या संवर्धनाच्या कामातील समस्या किंवा आव्हाने तुम्हाला समजतील. व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य किंवा संरक्षित जंगल ही अशी जंगले असतात जिथे केवळ वनविभागाच्या परवानगीनेच बाहेरील कुणाही व्यक्तीला जंगलात प्रवेश मिळतो व त्याची नोंद केली जाते. या जंगलामध्ये गस्त घालण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित कामांसाठी वेगळे कर्मचारी आहेत व रस्त्यावरून प्रवेश केल्या जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणी वन विभागाद्वारे तपासणी केली जाते त्यामुळेच खाजगी वाहनांना परवानगी नसते व जी वाहने पर्यटनासाठी प्रवेश करतात त्यांना वेगाच्या निकषांचे पालन करावे लागते तसेच त्यांची आकडेवारीही निश्चित असते व सोबत गाईडही असतात. जी जंगले व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येतात त्यांना केंद्र सरकारकडून त्यांच्या गरजांसाठी अतिरिक्त निधीही मिळतो तसेच वन अधिकाऱ्यांना इथे विशेष अधिकार असतात जे व्याघ्र प्रकल्प वगळता इतर विभागांना नसतात. त्याचवेळी या जंगलांमध्ये कोणतेही अतिक्रमण हा कायदेशीर गुन्हा आहे, त्याचप्रमाणे विहीर खणणे किंवा या जंगलातून रस्ता बांधणे यासारख्या कामांसाठीसुद्धा व्याघ्र प्रकल्प नियंत्रित करणाऱ्या एनटीसीएसारख्या संस्थांकडून विशेष परवानगीची गरज असते. या सर्व तरतूदींमुळे या जंगलांमधील वाघांचे तसेच वन्यजीवनाचे संवर्धन अधिक सोपे होते, परंतु संरक्षित जंगलांच्या सीमेबाहेरील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
व्याघ्र संवर्धनातील मुख्य समस्या ही संरक्षित जंगलांमध्ये नाही तर त्यांच्या बाहेर आहे जे आपण स्वीकारले पाहिजे तरच आपण वाघ वाचवण्यासाठी योग्य ती धोरणे तयार करू शकू. संरक्षित जंगलांमध्ये पर्यटनाला परवानगी असते व नियंत्रितपणे असते त्यामुळे ती दोनप्रकारे काम करते, सर्वप्रथम तिच्यामुळे गावकऱ्यांना समृद्धी (म्हणजे पैसा) मिळते व अशाप्रकारे ते वाघांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाशी हातमिळवणी करतात व दुसरे म्हणजे ही पर्यटक वाहने जंगलांचे डोळे व कानांसारखी असतात ज्यामुळे वन्यजीवन नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर राहते जे एकट्या वन विभागाला कधीच करता येणार नाही. एकदा का आपण असुरक्षित जंगलांमध्ये बाहेर आलो की पर्यटनाचा हा घटकही नसतो व वाघांना आपले संरक्षण स्वतःच करावे लागते. त्याचवेळी वन्यजीवनाद्वारे माणसांचे किंवा गुराढोरांच्या जीवाचे किंवा पिकाचे जे नुकसान होते त्यासाठी मिळणारी भरपाईही कमी आहे व ती उशीरा मिळते ज्यामुळे हे लोक वन्यजीवनाचे शत्रू होतात किंवा त्यामुळे संघर्ष होतो म्हणजेच विजेच्या कुंपणामुळे किंवा सापळ्यांमुळे वन्य प्राण्यांचे मृत्यू होतात जे खरेतर मानवी मालमत्ता किंवा वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी असतात, वन्य प्राण्यांना मारण्यासाठी नव्हे. या असुरक्षित जंगलात महामार्ग, रेल्वेचे मार्ग आहेत, या रस्त्यांवरून प्रवास करण्यासाठी वाहनांना गतीची मर्यादा नाही त्यामुळे वन्य प्राण्यांचे सर्वाधिक मृत्यू होतात, आपण त्यासंदर्भात काहीच करू शकत नाही. या असुरक्षित जंगलांमध्ये खुल्या विहीरी, कालवे, दगड खणून ठेवलेल्या खाणी असतात जे वन्य प्राण्यांसाठी मृत्यूच्या सापळ्यासारखे असतात व आपण त्यासंदर्भात काहीच करू शकत नाही. इथे पर्यटन नसल्यामुळे, वन्यजीवनातून काही उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे बेरोजगार युवकांना बेकायदा शिकाऱ्यांकडून सहजपणे व झटपट मिळणाऱ्या पैशांची भुरळ पडते व आपण त्याबाबतीत काहीच करू शकत नाही. त्याचप्रमाणे वाघांविषयी बोलायचे झाले तर, त्यांच्यासमोरील समस्या म्हणजे संरक्षित जंगलांच्या आतमध्ये त्यांना त्या भागात वर्चस्व असलेल्या मोठ्या वाघांकडून अधिक धोका असतो जे नव्याने जन्मलेल्या वाघांना हद्दीवरून होणाऱ्या भांडणांमध्ये संरक्षित जंगलातून बाहेर हुसकावून लावतात. अशा वाघांचा जर वर नमूद केलेल्या कारणांमुळे मृत्यू झाला नाही तर ते शिकाऱ्यांचे सहज लक्ष्य ठरतात व आपण त्यासंदर्भात काहीच करू शकत नाही. आणि, वन विभागाकडे मर्यादित अधिकार व निधी असल्यामुळे या बाहेरच्या वाघांचे संरक्षण करण्यास ते असमर्थ असल्याबद्दल फक्त त्यांना दोष देता येणार नाही, अर्थात हे वन विभागाचे काम आहे हे मान्य आहे. परंतु एखादी व्यक्ती युद्ध जिंकेल अशी अपेक्षा तुम्ही करता तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीला युद्ध लढण्यासाठी पुरेसा दारुगोळा दिला जाणे अपेक्षित असते, हे आपण विसरत आहोत!
आता तुम्हाला (म्हणजे माध्यमांना व न्यायपालिकेला व आपल्या शासनकर्त्यांना) मूलभूत समस्या समजली असेल व ती मान्य असेल तर वाघांचे मृत्यू कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो याकडे आपण येऊ शकतो! सर्वप्रथम, वाघांचे मृत्यू कुठे होत आहेत त्या नेमक्या जागा निश्चित करा व या जागी उपाययोजना राबवण्यावर काम करायला लागा. उदाहरणार्थ ताडोबा परिसरातून जाणारा बल्लारशा चंद्रपूर रेल्वेमार्ग जवळपास २०% वाघ, अस्वले व बिबट्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, म्हणूनच आपण त्याचा मार्ग थांबवू किंवा बदलू शकत नसू तर आधी त्याच्याकडेने कुंपण घालायला सुरुवात करा. पुढे अर्थसंकल्पामध्ये या मार्गाच्या खालून ठिकठिकाणी मार्ग तयार करण्यासाठी नियोजन व तरतूद करा म्हणजे वन्यप्राण्यांना हे रेल्वेमार्ग सुरक्षितपणे ओलांडता येतील. जंगलामध्ये व भोवतालच्या भागात सर्व विहिरी आणि जलाशयांभोवती कुठे सुरक्षित बांध घालणे आवश्यक ते ओळखा व बांधायला सुरुवात करा, कारण ते खोल असतात व जर वाघ त्यात पडले तर त्यांना त्यातून बाहेर पडणे अवघड असते. त्याचवेळी अशा सर्व रस्त्यांवर गस्त वाढवा, भरदार वेगात असलेल्या वाहनांमुळे होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या मृत्यूसाठी आकारला जाणारा दंड वाढवा व तुम्हाला वाहन चालवणे आवश्यकच असल्यामुळे वन्यजीवनाची काळजी घेतली जावी यासाठी शहरातील तसेच गावातील चालकांसाठी जागरुकता मोहीम राबवा.
जंगलामध्ये पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी पुरेसे पाणवठे तयार करा म्हणजे उन्हाळ्यामध्ये वाघांना पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर यावे लागणार नाही किंवा त्यांच्या सावजाला तसेच करावे लागणार नाही. वन्यजीवनामुळे होणारी जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानासाठी जलद व योग्य भरपाई देण्यासाठी कायदे तयार करा व संपूर्ण देशभर सारखेच असावेत असे पाहा म्हणजे शेत व्याघ्र प्रकल्पात आहे किंवा त्याला लागून आहे किंवा नाही यावरून वाद होणार नाहीत. एखाद्या वाघाने माणसाला मारले तर ते अभयारण्यात मारले किंवा गावाच्या किंवा शहराच्या वेशीबाहेर मारले यामुळे काही फरक पडत नाही. ज्या प्रमाणे मनुष्य हत्या ही हत्याच असते मग ती देशभरात कुठेही झाली असली तरीही त्यासाठी लागणारी कलमे सारखीच असतात. यामुळे लोकांना त्यांची मालमत्ता किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या जीवितहानीची भरपाई केली जाईल याची खात्री मिळेल व अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या प्राण्यांना मारायला ते जाणार नाहीत. त्याचप्रमाणे वन क्षेत्राभोवती राहणाऱ्या रहिवाशांचे व त्यांच्या शेतांचे वन्यजीवनामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी विमा उतरवण्याचा विचार करा. शक्य असेल तिथे सगळीकडे वनपर्यटनाला सुरुवात करा, कारण वन्यजीवन सुरक्षित ठेवण्याचा तो हमखास मार्ग आहे व हे नियंत्रितपणे केले पाहिजे हे वेगळे सांगायला नको, पर्यटनामुळे वन्यजीवनामध्ये अडथळा येतो या जुनाट विचारसरणीतून बाहेर या. यामुळे थोडा अडथळा निश्चितपणे येईल, परंतु त्यामुळे वाघांचे मृत्यू नक्कीच होणार नाहीत जे सध्या पर्यटन नसल्यामुळे होत आहेत. त्याचवेळी, जंगलाभोवतालच्या परिसरामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जागरुकता निर्माण करा जेणेकरून वन्यजीवनाला सामावून घेऊन आपल्या उपजीविकेसाठी त्याचा कसा वापर करायचा हे शिकता येईल. आपण शाळांवर लक्ष केंद्रित करू शकतो व या वयातच मुलांमध्ये या सहजीवनाचा विचार रुजवू शकतो.
सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे अवैध शिकारी याआधीही होते व यापुढेही नेहमी असतील, हे म्हणजे पुण्यासारख्या शहरांमध्ये बरेच पोलीस असूनही गुन्हे घडतात त्याचप्रमाणे आहे, परंतु आपण कायद्यांमध्ये सुधारणा करू शकतो म्हणजे आणखी शिकाऱ्यांना कडक आणि जलद शिक्षा होऊ शकेल तसेच शिकाऱ्यांना शिकार करण्याआधीच पकडता यावे म्हणून वन विभागाला पुरेसे अधिकार दिले पाहिजेत. त्यासाठी खबऱ्यांचे जाळे तयार करणे व त्यांना पैसे देणे हा अवैध शिकार रोखण्यासाठी एक खात्रीशीर मार्ग आहे. वाढीव निधी व अधिकाराद्वारे वन विभागाला तो साध्य होऊ शकतो. माध्यमांसाठी तसेच न्यालपालिकेसाठीही वन्यजीवनाविषयी जागरुकता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा घेणे आवश्यक आहे, म्हणजे त्यांनाही त्याविषयीची तथ्ये समजतील व ते त्यांच्या अधिकारामध्ये या हेतूने योग्य प्रकारे योगदान देऊ शकतील.
मित्रांनो, ज्याप्रकारे आपल्याला जगण्यासाठी जागा लागते, आपल्या वन्यजीवनालाही (म्हणजेच वाघांना) जागा हवी असते व ते त्यांची घरे बांधू शकत नाही, तर केवळ निसर्ग त्यांना जे काही देतो त्यातच केवळ त्यांना भागवावे लागते. आपण वाघांची संख्या वाढत असली तरीही वन जमीन वाढवू शकत नाही कारण त्यासाठीही जमीन आवश्यक असते. यासाठी एकमेव मार्ग म्हणजे, वाघांना आपल्या आयुष्यात सामावून घेणे व सहजीवन जगणे व त्यासाठी माणसानेच वन्यजीवनासंदर्भातील
आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे व ते केवळ आपण खुल्या मनाने विचार केला तरच शक्य होईल. असे झाले तरच वाघांसाठी व आपल्यासाठीही काही आशा असेल, असा इशारा देऊन निरोप घेतो!
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in
No comments:
Post a Comment