Thursday, 15 May 2014

साने सर नावाच्या महान व्यक्तिस सलाम !




















सल्लागार म्हणून माझी सर्वात मोठी ताकद म्हणजे अज्ञानी होणे व काही प्रश्न विचारणे ….पीटर ड्रकर

सल्लागार म्हणून या नावाची ओळख करुन देण्याची गरज नाही, आज आपण एका सल्लागारांविषयीच बोलणार आहोत पण जे एक स्ट्रक्चरल डिझायनिंग सल्लागार होते. वृत्तपत्रांमध्ये अलिकडेच एक लहानशी बातमी आली होती की श्री. वाय एस साने यांचे निधन, शहरातील अनेक सामान्य नागरिकांनी या बातमीकडे कदाचित दुर्लक्ष केले असेल! यशवंत शंकर साने, लोक त्यांना वाय एस साने म्हणून ओळखायचे तर माझ्या वयाचे अभियंते त्यांना केवळ साने सर म्हणून ओळखत! ७०च्या दशकात जेव्हा या शहरामध्ये रिअल इस्टेट क्षेत्र बाल्यावस्थेत होते तेव्हा हा माणूस कॉलेज ऑफ इंजिनिरिंग, पुणे येथे  नेटाने स्ट्रक्चरल डिझायनिंग विषय शिकवत होते व त्यानंतर एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे शहरातील रिअल इस्टेट उद्योगाच्या तांत्रिक बाजूविषयी फारशी माहिती नसलेल्या बांधकाम व्यवसायिकांसाठी रचनाशास्त्राविषयी सल्लासेवा सुरु केली. त्यानंतर
वाय एस साने अँड असोसिएट्सने कधीही मागे वळून पाहिले नाही, ८०च्या दशकात पुण्यातला  जवळपास ९०% प्रकल्पांच्या स्ट्रक्चरल डिझायनिंग सरांनी केले, एवढा त्यांचा दबदबा होता.

तोपर्यंत स्थापत्य अभियंता झालेल्या प्रत्येक मुलाचे मध्यपूर्वेत जाऊन नोकरी करणे व सरकारी सेवेत जाणे हेच स्वप्न असे, मात्र वाय एस साने अँड असोसिएट्सच्या स्थापनेनंतर रचनात्मक अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. स्थापत्य अभियंता म्हणून महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर वाय एस सानेमध्ये रुजू होणे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जायचे, असे सरांचे वलय होते. त्यावेळची रिअल इस्टेट क्षेत्रातील परिस्थिती विचारात घेता, सरांच्या कामगिरीचा हा अतिशय महत्वाचा पैलू आहे. सर्वसाधारणपणे चांगला शिक्षणतज्ञ क्वचित चांगला व्यवसायिक किंवा सल्लागार म्हणून यशस्वी होऊ शकतो अशी एक धारणा आहे; कारण शिक्षणतज्ञ म्हणून तुमचा भर थेअरिवर असतो जे सल्लागार म्हणून तुमच्या दूरदृष्टीस मारक ठरते! मात्र सरांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रभुत्वाचा वापर स्वतःला सल्लागार म्हणून प्रस्थापित करण्यासाठी अतिशय नेमकेपणाने केला. ते केवळ सिद्धांताचेच जाणकार नव्हते तर चांगली इमारत बांधण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा आहे हे त्यांना माहिती होते.

महान सल्लागार ड्रकर यांनी म्हटल्याप्रमाणे सल्लागाराचे यश तो त्याच्या ग्राहकास आर्थिक बाबतीत तसेच कामाच्या दर्जाच्या बाबतीत कशाप्रकारे आनंदी व समाधानी ठेवतो यावर अवलंबून असते! साने सरांनी जणु ड्रकरचे तत्व अंगी बाणवले होते, आधि सांगितल्या प्रमाणे तेव्हाचा रिअल इस्टेट उद्योग बाल्यावस्थेत होता त्यामुळे तांत्रिक सल्लागारच महत्व बांधकाम व्यवसायिकांना पटवून देणे हे एक मोठे काम होते. हे काम अजिबात सोपे नव्हते कारण तेव्हा रिअल इस्टेट उद्योगातील लोकांनी ज्ञानाचा किंवा ज्ञानी माणसाचे आदर करणे तर दूरच पण अगदी प्राथमिक सल्लागार/वास्तुविशारद यासारख्या व्यवसायिकांचाही आदर केला जायचा नाही, अशा काळात त्यांना स्ट्रक्चरल डिझायनिंग सारख्या विषयाचे महत्व पटवून देणे प्रचंड मोठे काम होते !
साने सर केवळ तांत्रिक सल्लागारच झाले नाहीत तर अनेक मोठ्या रिअल इस्टेट उद्योगसमूहांचे कौटुंबिक सल्लागार झाले व या उद्योग समूहांच्या अनेक पिढ्यांना बांधकाम विषयक सल्ला देत राहिले. मला आठवते आहे की ते प्रत्येक कामावर जातीने लक्ष ठेवत, स्लॅब तपासण्यासाठी बांधकामाच्या ठिकाण जात, इमारतीचा सर्वात वरचा मजला असलेल्या लिफ्ट रुमच्या वरच्या स्लॅबपर्यंत स्वतः जात !

साने सरांची आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या ग्राहकाने केलेल्या कोणत्याही मागणीसाठी मग ती कितीही विचित्र मागणी असली तरी ते कधीच नाही म्हणत नसत.
केवळ ग्राहकांना खूश करण्यासाठी नाही तर त्यांच्या मागण्या ते रचनेच्या सुरक्षा पैलूस हात न लावता, रचनाशास्त्रातील एक आव्हान म्हणून स्वीकारत. मी वास्तुविशारदांशी नियोजनाविषयी अनेकदा चर्चा करताना, आपण आपल्या गरजेप्रमाणे रचना करु, रचनाशास्त्रानुसार प्रत्यक्षात कसे उतरवायचे ते सर बघून घेतील अशा विधानांनी आमच्या चर्चेची सांगता होत असे ! अलिकडच्य काळात मी एका सिमेंट कंपनीची जाहिरात पाहिली त्यामध्ये लोक एका उंच इमारतीत शांतपणे झोपल्याचे दाखवले जाते व पार्श्वनिवेदन सुरु असते कीलाखो लोग चैन की निंद लेते है हमारी सुरक्षा कवच में व त्यानंतर सिमेंटचे नाव झळकते ! म्हणजेच त्या इमारतींच्या बांधकामात ते विशिष्ट सिमेंट वापरल्यामुळे अनेक लोक शांतपणे झोपू शकतात ! ही अतिशय प्रभावी जाहीरात आहे, अनेक बांधकाम व्यवसायिकांनीही याचप्रमाणे साने सरांच्या हातात इमारतीची रचनात्मक आखणी सोपवून हाच अनुभव घेतल्याचे मी पाहिले आहेसाने सरांनी रचलेल्या व देखरेख केलेल्या सदनिकांमध्ये राहणा-या लाखो लोकांसाठीही हे तितकेच खरे आहे.

मला असे वाटते की साने सरांची अनेक ग्राहक असलेला सर्वात यशस्वी रचनाशास्त्रविषयक सल्लागार होणे ही सर्वात मोठी कामगिरी नाही, तर त्यांनी इमारतीशी संबंधित प्रत्येक व्यक्तिच्या मनात विश्वास, सहजता निर्माण केली ती सर्वात महत्वाची आहे. मग स्वतः बांधकाम व्यवसायिक असो, वास्तुविशारद, बांधकामावरील अभियंता किंवा फिटर जो बांधकामाच्या साखळीतील सर्वात शेवटचा घटक असतो, जो मजबूत करण्याचे काम करतो! बांधकामाच्या ठिकाणी काहीही समस्या आली तरी साने सर आहेत असा विश्वास प्रत्येकाला वाटत असे व सर्वजण आरामात असत !
दुसरा एक महत्वाचा पैलू म्हणजे उपलब्धता, व्यवसायिकदृष्ट्या यशस्वी सल्लागाराच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात त्याच्यापर्यंत पोहोचणे ही कोणत्याही व्यवसायिकासाठी डोकेदुखी असते. मात्र जेव्हा सेलफोन नव्हते त्या काळामध्येही सानेसरांच्या सर्व ग्राहकांना माहिती असायचे की सायंकाळी चार वाजता साने सर त्यांच्या कार्यालयात हजर आहेत व भेटीसाठी कोणतीही वेळ न घेता बांधकामाशी संबंधित कोणतीही समस्या घेऊन त्यांच्याकडे कुणीही जाऊ शके !

ते सल्लागार म्हणून एक आदर्श व्यक्ती होतेच मात्र एक चांगला माणूसही होते. नेमके हेच आजकालचे तथाकथिक यशस्वी लोक विसरत आहेत. साने सर मोठी कॉर्पोरेट रिअल इस्टेट फर्म असो किंवा एका इमारतीपुरता लहान उभरता बांधकाम व्यवसायिक असो ते दोघांनाही त्याच प्रेमाने व प्रामाणिकपणे सेवा देत असत; आजकालचे जग पाहता असा दृष्टिकोन अतिशय दुर्मिळ आहे.
ते कधीही अगदी लहानशाही कामाला नकार देत नसत किंवा बांधकामावरील अभियंत्याची बांधकामाच्या ठिकाणी भेट देण्याची व रचनात्मक समस्येविषयी त्याला मार्गदर्शन करण्याची विनंती कधीही फेटाळत नसत. त्यांचे मार्गदर्शन स्लॅब व खांबांपुरतेच मर्यादित नसे, बांधकामाशी संबंधित कोणतीही समस्या असो मग ती वॉटर प्रूफिंगसंदर्भातील असली तरीही ते त्यावर विचार करण्यास उत्सुक असत!


केवळ बांधकाम व्यवसायिकच त्यांचे ग्राहक नव्हते तर रचनात्मक लेखा व सुरक्षा याविषयावरील अनेक सरकारी संघटनांच्या सल्लागार मंडळावर होते व शहराच्या अनेक सामाजिक समस्यांवर योगदान देत होते. एक सल्लागार व माणूस म्हणून ते परिपूर्ण होते व तेच त्यांचे सर्वात मोठे यश होते असे मला वाटते! पुणे आज महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते व शहराला ही ओळख मिळवून देणा-या आधारास्तंभांपैकी एक साने सर होते व त्यांनी तयार केलेल्या मार्गावर चालून आपण त्यांना सर्वोत्तम आदरांजली देऊ शकतो. दूर्दवाने रिअल इस्टेट क्षेत्र कधीही प्रामाणिकपणा व सचोठीसाठी ओळखले जात नव्हते व जात नाही मात्र आपण साने सरांसारख्या व्यक्तिस आपला आदर्श मानले तरच या उद्योगासाठी काही आशा आहे असेच मी म्हणेन. मला त्यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य मिळाले व मी जे काही पाहिले त्या आधारेच मी हे लिहीत आहे व हीच माझी त्यांना श्रद्धांजली आहे! त्यांनी एका लहानशा सल्लागार संस्थेला एका कॉर्पोरेट (स्ट्रक्चरल डिझायनिंग) समूहात रुपांतरित केले व त्यांचे वारस हे ही जबाबदारी समर्थपणे संभाळत आहेत. मात्र यापुढे पुण्यातील रिअल इस्टेट उद्योग साने सरांच्या पितृतुल्य सल्ल्यास मुकेल हे निश्चित

सरते शेवटी सांगावेसे वाटते कि तुम्ही किती प्रकल्प पूर्ण केले आहेत किंवा तुम्ही किती पैसे कमावले यावरुन तुम्ही किती महान आहात हे ठरत नाही, तर तुम्ही गेल्यानंतर लोक तुम्हाला कसे लक्षात ठेवतात यावरुन तुम्ही किती महान आहात हे ठरते व या निकषानुसार साने सरांचे स्थान त्यांनी रचना केलेल्या व निरीक्षण केलेल्या गगनचुंबी इमारतींपेक्षाही फार उंच आहे !

संजय देशपांडे



संजीवनी डेव्हलपर्स

Sunday, 27 April 2014

बिल्डर नावाचा माणुस !





















ते मूर्त, मजबूत व अतिशय सुंदर आहे. माझ्या मते ते अतिशय कलात्मक आहे मला रिअल इस्टेट क्षेत्र अतिशय आवडतेडोनाल्ड ट्रम्प

मला खात्री आहे की रिअल इस्टेट क्षेत्रातील या दिग्गजाच्या मताशी अनेकजण सहमत होतील. विधानाच्या उत्तरार्धाविषयी म्हणजे ते कलात्मक, सुंदर व मजबूत असण्याविषयी मला खात्री नाही मात्र रिअल इस्टेटचे निरीक्षण करणा-या अनेकांच्या तसेच बिल्डर किंवा आधुनिक शब्दातील विकसकांच्या मते ते नक्कीच मूर्त म्हणजेच  सस्टेनेबल आहे! रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक लोकांना बिल्डर म्हणवून घ्यायला आवडत नाही, त्यांच्यामते ते अतिशय असभ्य किंवा मागासलेले वाटते. आता यापैकी अनेकजण स्वतःला विकसक किंवा पायाभूत सुविधा कंपनी म्हणवून घेतात. घरे हा पायाभूत सुविधांचा आधारस्तंभ असला तरीही आपले सरकार किंवा समाज ते स्वीकारण्यात अपयशी ठरला आहे. अलिकडे काही सहकारी विकासकांच्या एका अनौपचारिक बैठकीमध्ये, एक विकासक सांगत होता की त्याच्या मुलाच्या शाळेमधील एका कार्यक्रमास त्याला जायचे होते व त्याच्या मुलाने त्याला निक्षून सांगितले की शाळेमध्ये तुम्ही बिल्डर आहात असे सांगू नका, तसे सांगितल्यास त्याचे मित्र त्यावरुन त्याला खूप चिडवतील व टोमणे मारतील! यातील विनोदाचा भाग सोडल्यास या देशात राजकारण्यांनंतर सर्वाधिक टीका बिल्डरांवर होते. केवळ आपल्याच देशात नाही तर जगात सर्वत्र रिअल इस्टेट व त्यातील लोक हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.
 सामान्य माणसाच्या मनात बिल्डरविषयी विविध समज असतात, म्हणजे तो अतिशय श्रीमंत असतो, त्याला जगातील सर्व चैनीच्या वस्तू म्हणजे मोठ्या नवीन कार, नवे मोबाईल फोन, ब्रँडेड घड्याळे, डिझायनर शूज व उंची कपडे आवडतात. तो त्याच्या कारसाठी तसेच मोबाईल फोनसाठी नेहमी मनपसंत क्रमांक घेतो जे त्याची ओळख असतात. बिल्डर वर्षभर संपूर्ण जगात फिरतो व तिथे काही काम नसेल तरीही केवळ बिझनेस क्लासमधून प्रवास करतो. बिल्डर केवळ पंचतारांकित किंवा त्यावरील श्रेणींमधील हॉटेलमध्ये राहतो, खातो व पितो. बिल्डरचा  मुलगा प्राथमिक शाळेत उत्तीर्ण झाला यासारख्या लहान-सहान कारणांसाठी सुद्धा मोठी पार्टी देतो व ही पार्टी नेहमी चर्चेचा विषय असते व पेज३ वर त्याविषयीच्या बातम्या येतात.
बिल्डरला क्वचितच प्रत्यक्ष काम असते व तो इतरांच्या पैशांवर जगतो. बिल्डरला मोठे फार्म हाउस असते जिथे दर आठवड्याच्या अखेरीस तो मित्रांसोबत पार्टी करतो. बिल्डर शिकलेला असायला पाहिजे असे नाही किंबहुना जो जितका कमी शिकलेला तितके व्यवसायासाठी अधिक चांगले किंवा तो आर्थिकदृष्ट्या अधिक यशस्वी असतो. या समजुतींची यादी अशीच पुढे सुरु राहू शकते व लोक अतिशय उत्सुकतेने बिल्डरच्या वैयक्तिक जीवनाविषयी वाचतात.
त्यानंतर कामाविषयी किंवा व्यवसायिकांविषयी अनेक दंतकथा आहे व ब-याच बाबतीत त्या चुकीच्या नाहीत. झेनविषयी (इथे मला झेन धर्म अपेक्षित आहे कार नव्हे) म्हणतात की तो सर्वात अधार्मिक धर्म आहे. त्याचप्रमाणे माझ्या सर्व सहकारी बिल्डरविषयी पूर्णपणे आदर राखून मला असे म्हणावेसे वाटते की रिअल इस्टेट हा सर्वात अव्यवसायिक व्यवसाय आहे. याची कारणे सोपी आहेत; या उद्योगामध्ये आश्वासनांची काहीही किंमत नाही. म्हणूनच सामान्य माणूस बिल्डरांविषयीच्या दंतकथा किंवा त्याच्याशी संबंधित लोकांचे अनुभव लगेच स्वीकारतो. यातील काही अनुभवांनुसार बिल्डर दिलेले आश्वासन कधीच पूर्ण करत नाही. त्यानंतर त्याच्या कार्यालयामध्ये कधीच उपलब्ध नसतो याला अपवाद म्हणजे जेव्हा ग्राहकांकडून पैसे घेण्याची वेळ असते. याचप्रमाणे तो त्याच्या कंत्राटदारांसाठी किंवा पुरवठादारांसाठी उपलब्ध नसतो. बिल्डरसाठी कोणतेही वेळापत्रक नसते मग एखादा प्रकल्प कुणाच्या ताब्यात द्यायचा असेल किंवा त्याच्या सल्लागारांसोबतची बैठक असेल. बिल्डर त्याच्या कर्मचा-यांना अतिशय कमी पैसे देतो मात्र त्यांना रात्रंदिवस काम करायला लावतो. बिल्डर कोणत्याही अटी किंवा नियमांचे पालन करत नाही व त्याला कोणताही कायदा लागू होत नाही. बिल्डर मंजूर करण्यात आल्याप्रमाणे कधीच बांधकाम करत नाही व जे बांधले आहे ते कधीच विकत नाही. बिल्डरांना इतरांच्या जमीनींवर अतिक्रमण करायला अतिशय आवडते. बिल्डर कोणतीही जमीन खाली करुन घेऊ शकतो मग ती सरकारी असेल किंवा खाजगी मालकीची. बिल्डरच्या फाइलला सरकारी कार्यालयात एका रात्रीत सर्व विभागांची मंजूरी मिळते. बिल्डर एक इलेक्ट्रिक मीटरमधून शेकडो सदनिकांना वीज पुरवठा देऊ शकतो. बिल्डरला नेहमी कुणा राजकीय व्यक्तिद्वारे निधी पुरवला जातो. बिल्डर उच्च अधिका-यांमार्फत स्वतःला अनुकूल असे कोणतेही सरकारी धोरण तयार करुन घेऊ शकतो. सर्वात शेवटचे म्हणजे बिल्डरचे अंडरवर्ल्डशी संबंध असलेच पाहिजेत.
 माझ्या मते अशा दंतकथांच्या बाबतीत बिल्डरला केवळ रजनीकांतच मात देऊ शकतो! बरेच जण हसतील व मी अतिशयोक्ती करतोय असे म्हणतील, मात्र माझ्यावर विश्वास ठेवा, समाजातील कोणत्याही सामान्य माणसाकडे जाऊन तुम्ही याविषयावर चर्चा सुरु करा व तुम्हाला काय ऐकायला मिळते ते पाहा! तसेच आपले बॉलिवुडचे चित्रपट पाहा जे एकादृष्टिने समाजाचा आरसाच आहेत, त्यामध्येही बिल्डरला खलनायकच दाखवले जाते व वर उल्लेख केलेले सर्व गुणधर्म त्याच्यात असतात. हे सर्व काय दर्शवते? तर यातून सामान्य माणसाला रिअल इस्टेटविषयी व तिच्याशी संबंधित लोकांविषयी काय वाटते हे दिसून येते. यातील काही भाग कदाचित खरा असेल, या व्यवसायामध्ये अशी वैशिष्ट्ये असलेल्या काही व्यक्ती आहेत, मात्र लोकांना वाटते त्याप्रमाणे संपूर्ण उद्योगच तसा आहे असा अर्थ होत नाही. वरील प्रकारच्या बिल्डरचा जमाना केव्हाच संपला आहे. आता इंटरनेट व शिक्षणामुळे लोकांना आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात व तुम्ही त्यांना सहजपणे मूर्ख बनवू शकत नाही.
खरी वस्तुस्थिती अशी आहे की रिअल इस्टेट उद्योग हा देशातील सर्वाधिक जोखीम असलेला व्यवसाय आहे.सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याला स्वतंत्र उद्योगाचा दर्जा नाही. प्रत्यक्षात तो सरकारच्या सर्व विभागांसाठी सर्वाधिक महसूल निर्माण करणारा व्यवसाय आहे व एकप्रकारे तो पायाभूत सुविधा क्षेत्रात मोडतो. कोणत्याही व्यक्तिची घर ही मुख्य व मूलभूत गरज आहे व रिअल इस्टेट उद्योग ही गरज पूर्ण करतो. मात्र केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्यांच्या जमीन व नागरी विकासाविषयीच्या चुकीच्या धोरणांमुळे परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. जमीन अधिग्रहित करण्यापासून ते सीमांकन व्हावे यासाठी तिचा मालकी हक्क घेणे व त्यानंतरच्या मंजूरी प्रक्रियेतून जावे लागते; ही सर्व प्रक्रिया इतकी किचकट असते की इतर कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे बिल्डरलही वैतागतो. तसेच हा उद्योग बँकिंग क्षेत्राचा कधीच लाडका नव्हता व तो प्राधान्य नसलेल्या क्षेत्रांपैकी एक मानला जातो. तुम्हाला सर्वाधिक निधी जमीन अधिग्रहित करण्यासाठी किंवा जमीन खरेदी करण्यासाठी लागतो व कोणत्याही बँका जमीन अधिग्रहित करण्यासाठी किंवा जमीन खरेदी करण्यासाठी पैसे देत नाहीत. मात्र याच बँका गृह कर्जासाठी प्रकल्पातील सदनिकाधारकांना पायघड्या घालतात! त्यामुळे बिल्डरला खाजगी संस्थाकडून कर्ज घ्यावे लागते व इथेच वाईट किंवा चुकीच्या तत्वांशी संबंध दिसून येतात. बिल्डरला कर्ज देणारे कुणी साधू संत नसतात, ते त्यासाठी भरभक्कम व्याज आकारतात व सरतेशेवटी त्याचा भार कुणावर पडतो तर अर्थातच सदनिकेच्या ग्राहकावर!  म्हणूनच अर्थमंत्रालय पुढाकार घेऊन रिअल इस्टेटसाठी वित्तपुरवठ्या विशेष योजना का सुरु करत नाही व त्यास प्राधान्य का देत नाही?
 त्याचप्रमाणे सर्व प्रकारची मंजूरी वेगाने दिली जाणे आवश्यक आहे व प्रत्येक जण त्याविषयी बोलतो मात्र प्रत्यक्षात सरकारी यंत्रणा कशी चालते हे अगदी शाळकरी मुलगाही सांगू शकतो! रिअल इस्टेटसाठी एक धोरण तयार करणे ही महत्वाची बाब आहे; रिअल इस्टेट उद्योगासाठीचे नियम व कायदे कधी बदलायचे झाल्यास काय होईल या विचाराने देवही घाबरेल. टीडीआर असो किंवा इमारतीची उंची यारखे मूलभूत नियम शहरांसाठीही निश्चित करण्यात आलेले नाहीत. हे नियम इतक्या ढोबळपणे तयार करण्यात आले आहेत की प्रत्येक प्रकरणाच्या निवड्यासाठी व्यक्तिला उच्च अधिका-यांकडे जावे लागते व इथे प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते हे तर तुम्ही जाणताच! इथे मोजावी लागणारी किंमत केवळ पैशांच्याच स्वरुपात नाही मंजूरी घेण्यासाठी वाट पाहण्यात वाया गेलेला वेळ व ताण-तणावाच्या स्वरुपातही असते. आजकाल जमीन मालक ही एक वेगळी जमातच आहे व बाजारात काय चालले आहे याच्याशी त्याला काही देणेघेणे नसते. हा केवळ एकमेव असा उद्योग असेल ज्यामध्ये किमान विक्री दर लागू होत नाही कारण कुणीही व्यक्ती तिच्या जमीनीसाठी कितीही पैसे मागू शकते व असे असूनही अंतिम उत्पादन म्हणजे घर सामान्य माणसाला परवडणारे असावे अशी आपली अपेक्षा असते!
सरकारची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होते. मजुरांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, दुस-या एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी थोडीशी पगारवाढ मिळते म्हणून तुमचे कामगार कधी पळून जातील याचा तुम्हाला भरवसा नसतो. जागा मिळणे दुरापास्त होत चालल्याने मजूरांना राहण्यासाठी जागा ही एक मोठी समस्या आहे व प्रत्येक मजूराची ओळख पटवणे व नोंदणी यासारख्या कामगार कायद्यांमुळे चांगले मजूर मिळणे व टिकणे केवळ अशक्य आहे. सुदैवाने साहित्याच्या बाजारातील परिस्थिती जराशी चांगली आहे व बिल्डरला थोडा दिलासा देणारी आहे. येथे किमान योग्य रक्कम देऊन तुम्हाला हवे असलेले साहित्य मिळू शकते.
या उद्योगाने चांगले काम करावे असे आपल्याला वाटत असेल तर ते केवळ एका बाजूने होणार नाही. आपल्याला या व्यवसायाची वस्तुस्थिती समजून घेऊन त्यानुसार धोरणे तयार करणे व ती अपेक्षित परिणाम साध्य करण्याइतकी प्रभावी असतील हे पाहणे आवश्यक आहे. घरांची सहजपणे निर्मिती हे लक्ष्य असले पाहिजे व चांगले लोक या उद्योगात आले पाहिजेत. अनेक प्रशिक्षित तरुण आजकाल कौटुंबिक व्यवसायात शिरत आहेत व आता हा व्यवसाय निरक्षर लोकांची मक्तेदारी असलेला मालमत्ता व्यवसाय राहिलेला नाही. ग्राहकांची काळजी व दर्जाचे नियंत्रण यासारख्या संकल्पना हळूहळू या उद्योगामध्ये स्वीकारल्या जात आहेत व अनेक बिल्डर त्यांच्या ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी किंवा सहका-यांशी थेट संपर्क साधतात. त्याशिवाय अनेक जण अनेक सामाजिक कार्यांमध्ये योगदान देत आहेत व समाजाच्या गरजाही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ग्राहकांनीही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, बिल्डरला प्रश्न विचारले पाहिजेत व त्याला जबाबदार बनविले पाहिजे. त्याचवेळी त्याला स्वतःच्या मर्यादांची जाणीव असली पाहिजे व अशा मर्यादांवर मात करण्यासाठी दबाव गट तयार केला पाहिजे म्हणजे सरकार त्यासाठी योग्य ती धोरणे तयार करेल.

शेवटी बिल्डर समाजासाठी शिक्षक किंवा बँक व्यवसायिकांइतकाच महत्वाचा घटक आहे, त्यामुळे त्याला कुणी परका मानल्याने समस्या सुटणार नाहीत तर बिल्डरांच्या समुदायास माणूस मानल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतील! आणि मी बिल्डर आहे हे या व्यवसायातल्या लोकांना अभिमानाने सांगता आले पाहिजे. F]^मिली डॉक्टरांप्रमाणे प्रत्येकास स्वतःचे घर घेण्यासाठी F]^मिली बिल्डर मिळाल्यास समाजासाठी याहून अधिक चांगले काय असू शकते!


https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif
संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स


Wednesday, 16 April 2014

उमेदवार, मतदार आणि पर्यावरण !




















मतदानात सहभागी होण्यास नकार दिल्यावर मिळणाऱ्या शिक्षेपैकी महत्वाची एक म्हणजे, तुमच्यावर कनिष्ठ प्रतीचे लोक राज्य करतात.... प्लेटो.
अपेक्षेप्रमाणे गेल्या संपूर्ण महिन्यापासून देशातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष एकाच गोष्टीकडे आहे आणि ती म्हणजे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि का नसावे? ही अशी एक गोष्ट आहे, जी पाच वर्षांनंतर होते आणि आपण अभिमानास्पद, पणे आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत. जवळपास पंचावन कोटीच्या वर भारतीयांकडे मोबाईल फोन आहे आणि खात्रीने त्यातील निम्म्या मोबाईलवर इंटरनेट आहे आणि देशात फेसबुक आणि ट्विटरची लक्षावधी खाती व वापरकर्ते आहेत, त्यामुळे यावेळेस निवडणूक अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे सरकारच नाही तर प्रत्येक मिडीया लोकांना मतदान करायचे आवाहन करत आहे, आणि त्यासंदर्भातच मी वर एका महान ग्रीक तत्ववेत्त्याचा विचार उद्धृत केला आहे.
मत हे प्रत्येक बदल किंवा विकासाची पहिली पायरी आहे हे मान्य, पण तेवढेच पुरेसे आहे का? आता जवळपास सर्वच मुख्य राजकीय पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केलेल आहेत  म्हणजे ते सत्तेत आल्यानंतर कशाला प्राधान्य देतील याचा कार्यक्रम हीच गोष्ट मला चक्रावून टाकते. अशाच प्रकारे, आपल्या पुणे शहरातही उमेदवारांनी त्यांचा वैयक्तिक जाहीरनामा जनतेमध्ये प्रसिद्ध केला आहे. हे वेगळे सांगायला नको की, भ्रष्टाचार, चलनफुगवटा (महागाई) हे विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहेत; तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना स्पर्शही केलेला नाही कारण तसे केल्यास त्यांनी त्यातील स्वतःची जबाबदारी मान्य केल्यासारखे होईल. रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणी, झोपड्यांचे पुनर्वसन, रोजगार आणि महानगरांमध्ये परवडण्याजोगी घरे हे प्रत्येकाच्या जाहीरनाम्यातील समान मुद्दे आहेत. काही जाहीरनाम्यांमधअये स्वच्छ नद्यांची वचने आणि कुप्रसिद्ध बीडीपी, बायोडायव्हर्सिडीटी पार्कचा उल्लेख आहे, पण पर्यावरणाबाबत एवढेच आहे. या शहरासाठीच नाही तर देशासाठी अतिशय महत्त्वाची असलेली एक महत्त्वाची बाब आपण मतदार म्हणून विसरत नाही आहोत का? वरील कार्यक्रमपत्रिकांमध्ये नोंदलेले मुद्दे किंवा पैलू पाहिले तर असे वाटत नाही की आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलत आहोत. पाणी, रस्ते आणि पायाभूत सुविधा देणे हे काम महानगरपालिकेचे आणि वीज देणे हे वीज मंडळाचे काम आहे. बीडीपी आणि नदीची स्वच्छता हे शहराच्या विकास आराखड्याचा भाग आहेत, मग यांचा देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांशी काय संबंध आहे? पुन्हा आपण असा विचार करू शकतो की याचा बांधकाम व्यवसाय आणि शहराशी संबंध असू शकतो? तर बांधकाम व्यवसायाचा जमिनीच्या वापराशी संबंध येतो आणि त्यासाठी प्रत्येक यासंबंधीत धोरण महत्त्वाचे असते, विशेषतः पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाशी संबंधित धोरणे! नागरवस्त्यांचा इतिहास पाहिला तर शहरात येणाऱ्या सर्व लोकसंख्येला सामावून घेण्यात यशस्वी ठरलेल्या शहरांचीच भरभराट झाली आहे अन्यथा ही शहरे फक्त सुजतात आणि आपल्या नागरिकांना राहण्याच्या चांगल्या सुविधा देण्यास संपुर्णपणे अपयशी ठरतात आणि बकाल होतात!
आपण निवडून देणारे लोक आपल्या शहराचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करतात आणि ते राष्ट्रीय पातळीवरील धोरण आखण्यात सहभागी होतात. आपण स्थानिक मुद्दे वेगवेगळे करू शकत नाही आणि उच्च पातळीवर वरील मुद्यांचा खासदाराने पाठपुरावा करणे अपेक्षित असते हे मान्य. पण आपल्या शहराची इतर शहरांशी जोडणी, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांची स्थिती आणि रेल्वे यांबाबत काय? जंगल संवर्धन आणि हिरवाई यांच्यासारख्या पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे धोरण काय असेल? सर्व बाजूंनी जंगलांची कत्तल होत आहे आणि मानव-प्राणी संघर्षात बिबट्यांसारखे जंगली पशूंचे शहरांत आणि गावांत घुसणे या सारख्या घटना अधिकाधिक वाढत आहेत, त्याचे काय? शहराच्या पर्यटनाचा विकास आणि शहराभोवती असलेल्या सिंहगडासारख्या ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनाचे काय? 
तसेच शहरामध्ये सैन्याची अनेक आस्थापने आहेत आणि त्यांच्या सभोवातालच्या परिसराबाबत सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे विकासाला नेहमीच धोका निर्माण होतो. वृक्षगणतीसाराख्या साध्या गोष्टी अनेक वर्षांपासून झालेल्या नाहीत आणि कोणलाही त्याची काहीही पर्वा नाही! शहराच्या जैवविविधतेचा निर्देशांक झपाट्याने नष्ट होत आहे आणि चिमण्यांसारखे सामान्य शहरी पक्षी त्यांना राहण्यासाठी जागा नसल्याने दुर्मिळ होत चालले आहेत. आपण मनुष्यप्राणी आहोत आणि आपल्यालाही समस्या आहेत, पण झाडे आणि चिमण्यांसारख्या हजारो प्रजातींच्या समस्या आपण समजून घेतो आणि हे जाणतो की त्यांनाही जीव आहे पण आपण त्यांना मतदान करू देत नाही! मग त्यांचे प्रतिनिधीत्व कोण करणार आणि त्यांच्या समस्या कोण सोडवणार? त्याशिवाय प्रत्येकजण कचऱ्यासारख्या समस्येवर शांत आहे, रोज ही समस्या वाढत चालली आहे आणि आजूबाजूची खेडी कचरा टाकण्यासाठी जागा द्यायला तयार नाहीत. अशा सर्व समस्यांची यादी आणखीही बरीच सांगता येईल!
शहरांशी थेट संबंध नसलेल्या मुद्द्यांवर आपले काय धोरण असेल हे कोणत्याही उमेदवाराने स्पष्ट केलेले नाही, पण शहरे म्हणजे काही बेटे नसतात; आपण सर्व कोणत्या तरी मार्गाने देशाशीही जोडलेले असतो. त्यामुळे ऊर्जानिर्मितीसाठी अपारंपरिक स्रोत आणि त्यांच्या संशोधनाविषयी काय? पश्चिम घाटासारखे संवेदनशील जैवविविधता विभागही पुणे आणि सभोवतालच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. विकासावर परिणाम न होता आपण या विभागाचे संरक्षण कसे करणार आहोत हा मुख्य प्रश्न आहे. देशातील सर्व जंगलांच्या भविष्यासाठी, जंगलांचे संवर्धन आणि वनविभागाचे मजबूतीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी जुनाट वन कायदे बदलण्यासारख्या अनेक सुधारणा गरजेच्या आहेत! तसेच शहरांच्या जैवविविधतेसह योग्य विकासासाठी, नगर विकासाशी संबंधित भूसंपादन कायदे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण त्यामध्ये जितका विलंब होईल तितका या जमिनीवर अतिक्रमणाचा आणि अवैध बांधकामांचा धोका वाढत जातो! दीर्घकाळ लांबणीवर पडलेल्या पीएमआरडीए म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मंजूर करून घेण्यासाठी खासदाराची काय भूमिका असेल, कारण परवडणाऱ्या घरांचे वचन देणे हा एक भाग झाला पण ती वास्तवात कशी उतरणार? लोकांना उमेदवारांकडून याचे उत्तर हवे आहे. त्याशिवाय, निवडणुकांनंतर या कार्यक्रमपत्रिकांचे काय होईल हे सर्वज्ञात सत्य आहे! या कार्यक्रमपत्रिका किंवा जाहीरनामा निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी बंधनकारक का नसाव्यात? आणि ठराविक वेळेनंतर त्यांचा आढावा घेणे त्यांच्यासाठी बंधनकारक असले पाहिजे. कारण त्यामुळे आपण खोट्या आश्वासनांनी फसलो गेलो नाहीत याची मतदारांना खात्री पटेल!
दुर्दैवाने उमेदवार या सर्व गोष्टींबाबत गप्प आहेत आणि त्याहून दुर्दैव हे की कोणत्याही मतदारांना हे सर्व प्रश्न विचारण्यात रस नाही. स्वातंत्र्याला जवळपास सत्तर वर्षे होत आली आणि अजूनही आपल्याला नागरिकांना लोकशाहीतील अगदी प्राथमिक गोष्टीसाठी म्हणजे मतदानासाठी जागृत करावे लागते! कोणत्याही राजकीय पक्षांनी किंवा एनजीओंनी निवडणुकांआधी मतदारांनी उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवाव्यात यासाठी जनजागृती प्रचार हाती घेतला नाही! सत्तर वर्षाच्या या देशामध्ये आपण शहाणपणाने मतदान करण्यासाठी अजूनही फारच अपरिपक्व आहोत आणि वेळ झपाट्याने निघून चालला आहे! मित्रांनो हे ध्यानात घ्या आणि जागरूक व्हा अन्यथा सर्वात मोठ्या लोकशाहीचा अस्त होण्यास फार वेळ शिल्लक राहिलेला नाही!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


Saturday, 5 April 2014

शहराचे आरसे!






















एक शहर म्हणजे निव्वळ समस्या आणि त्यावरील तोडगे याशिवाय आणखी काहीही नसते, शहर नव-नवीन समस्या तयार करत राहते ज्यासाठी अधिकाधिक तोडगे लागतात नील शस्टरमॅन.

पुरस्कार-प्राप्त लेखक नील शस्टरमॅन, न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथे वाढले, त्यांनी तरुण वयातच लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून नील यांनी यशस्वी कादंबरीकार, पटकथालेखक व दूरचित्रवाणी लेखक म्हणून आपला ठसा उमटविला. आपण आपल्या पुण्यात आजूबाजूला नजर टाकली तर या लेखकाचे अवतरण आपण प्रत्यक्षात आणतोय हे जाणवेल याची मला खात्री वाटते! मी कुठेतरी वाचले आहे की शहर जाणून घेण्यासाठी तुम्हाला शहरातील रस्त्यांवर चालावे लागते व त्यांचा स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो! मी पुण्यामध्ये २८ वर्षांपेक्षा अधिक काळापासून राहतोय व तरीही हे शहर अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी अजुनही मी चालतो. आपण चालताना आपल्या आजूबाजूला घडणा-या कितीतरी गोष्टी जवळून पाहू शकतो, ज्या आपल्याला कारच्या वातानुकूलित हवेत बसून, आवडते संगीत ऐकत, डोळे मोबाईल फोनवर ठेवून बाहेरील प्रदूषण, उकाडा व रहदारीच्या गोंगाटापासून सुरक्षित राहून अनुभवता येत नाहीत! आजूबाजूला चाललेल्या ब-याच गमतीजमतींना किंबहुना वेदनेला आपण मुकतो. दुचाकीवर जात असाल तर तुमचे सगळे लक्ष तुमची बाईक पीएमटीच्या बस, ऑटे रिक्षा व भरधाव येणा-या वाहनांपासून तसेच रस्त्यावरील भले मोठे खड्डे व वाहनांचे नुकसान करणा-या गतिरोधकांपासून वाचविण्याकडे असते, त्यामुळे तुमच्याकडे आजूबाजूला पाहण्यासाठी वेळच नसतो.
चालत जाताना तुम्ही आजूबाजूची दृश्ये पाहात असता व त्याविषयी विचार करता अर्थात पादपथावर आहात म्हणून तुम्ही सुरक्षित आहात असा अर्थ होत नाही! असेच एकदा पायी चालत असताना मी एक खाली पडलेला पथदर्शक फलक पाहिला, हा फलक चांगल्या स्थितीत होता व त्यावर जवळपासच्या ठिकाणांची नावे व पीएमसीचे प्रतीक चिन्ह होते. हा फलक माझ्या घराच्या जवळ असल्याने चार दिवसांपासून मी रोजच्या फेरफटक्यात तो धूळ खात पडलेला पाहात होतो. या फलकामुळेच मला नील शस्टरमॅनचे अवतरण आठवले, कारण अशी दृश्ये ही कुणाची जबाबदारी आहे. फलक अपघाताने पडू शकतो मात्र आपल्या महानगरपालिकेचे प्रतीक चिन्ह असलेला एक फलक असाच रस्त्यावर पडून राहतो ही आपल्या सर्वांसाठीच लाजीरवाणी बाब नाही का?
आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी अशी दृश्ये आजूबाजूला पाहतो उदाहरणार्थ रस्त्यावर भरधाव वाहनाखाली मारला गेलेला रस्त्यावरील कुत्रा, त्याचा मृतदेह अनेक दिवस तो तसाच पडून राहतो, येणारा-जाणारा केवळ त्याला टाळून त्याकडे दुर्लक्ष करुन निघून जातो; मात्र कुणीही तो तिथून हटविण्यासाठी पुढे येत नाही. पीएमसीने आपल्या नदीवरील पुलावर कचरा किंवा निर्माल्य टाकू नये असा फलक लावलेला असतो व तिथूनच लोक नदीत निर्माल्यटाकत असतात! आपण एमएसईबीचे पदपथावरील जागा व्यापणारे विद्युत डीबी म्हणजे डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस पाहतो, त्यावर विविध प्रकारच्या जाहिरातींचे स्टिकर्स लावून विद्रूप केलेला असतो. त्यानंतर नव्याने तयार केलेले रस्ते विविध कारणांसाठी खणले जातात व त्यानंतर अनेक दिवस ते पूर्ववत केले जात नाहीत, ज्यामुळे त्यावरुन जाणा-या प्रत्येक वाहनाला धक्के खावे लागतात व काही वेळा त्यामुळे अपघातही होतात; कुणीही रस्ते पूर्ववत करण्याची तसदी घेत नाही. रस्त्याच्या खणलेल्या भागावरुन धक्के खात जाताना हजारो वाहने प्रत्येक धक्क्यासोबत महापालिकेला दूषणे देतात व आपण केवळ त्या बिचा-या वाहन चालकांकडे पाहत राहतो. शहरभर फलक युद्ध सुरु असते, एखाद्या पक्षाचा प्रभाग प्रमुख होण्याची जी काही कामगिरी केली आहे त्यासाठी तथाकथित कार्यकर्ते त्यांचे अभिनंदन करण्यासाठी असे फलक लावतात, त्यावर कुठल्याही सोम्या-गोम्याचेही छायाचित्र असते!
आपण सार्वजनिक शौचालये व मुता-यांची परिस्थिती कशी असते हे जाणतो, अगदी रस्त्यावर राहणा-या भिका-यालाही ते वापरायला आवडत नाही अशी त्यांची परिस्थिती असते. नळ हरवलेले असतात, दुर्गंधी तर एवढी असते की त्यांच्या आजूबाजूनही जाताना अंतर राखावे लागते, ते वापरणे तर दूरच! मी जेव्हा शहराच्या सर्वात गजबजलेल्या भागातून म्हणजे जंगली महाराज रस्त्यावरुन चालत होतो, तो पुण्यासाठी अभिमानाची बाब असणे अपेक्षित आहे कारण सर्व महत्वाची दुकाने व कार्यालये तिथे आहेत व महापालिकेचे मुख्यालय तिथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे; संभाजी बागेच्या प्रवेशद्वारापाशी नागरिक संवाद केंद्र आहे. आता त्याचा काय अर्थ होतो व तो कशासाठी उभारण्यात आला आहे हे विचारु नका, अर्थात हा लेख नागरिकांना जागरुक करण्यासाठी असल्याने ज्यांना जाणून घेण्यात रस आहे त्यांच्यासाठी सांगतो. संवाद केंद्र ही सिंगापूरसारख्या शहरांकडून घेतलेली संकल्पना आहे, या ठिकाणी नागरिक तसेच शहरास भेट देणा-या पर्यटकांना शहराविषयी व ते नागरिकांना कोणकोणत्या सेवा देते याविषयी सर्व माहिती मिळते. मात्र सर्व तथाकथित उपक्रमांप्रमाणे हा उपक्रमही सुरु झाला मात्र तो कधीच जोमाने चालला नाही! सध्याची परिस्थिती म्हणजे नागरिक माहिती केंद्राला कुलूप आहे व ते जीर्ण अवस्थेत आहे, भिकारी व फेरीवाल्यांनी त्याच्या प्रवेशदाराच्या जागेचा ताबा घेतलाय त्यामुळे ते कुणालाही दिसत नाही. पीएमसीचे प्रतीकचिन्ह असलेला फलक अजूनही तिथे आहे ही लाजीरवाणी बाब आहे. या संभाजी बागेतच शहराचे उद्यान प्रमुख बसतात ज्यांच्याकडे शहराच्या सौंदर्यीकरणाचा प्रभार असणे अपेक्षित आहे! या ठिकाणाहून कितीतरी अधिकारी ये-जा करत असतील मात्र कुणीही हे केंद्र सुधरविण्याचा तर सोडाच पण हटविण्याचा सुद्धा विचार करत नाही जे महापालिकेसाठीच नव्हे तर शहरासाठी पण एक कलंक झाले आहे.
या शहराच्या रस्त्यांवरुन दररोज जाताना आपण अशी अनेक दृश्ये पाहतो, मात्र आपण काय करतो किंबहुना आपण त्यांची दखल तरी घेतो का? आपल्यापैकी बहुतेक जणांना ही दृश्ये घरी सकाळी एक कप चहा घेतो त्याप्रमाणे आयुष्याचा एक अविभाज्य भाग असल्यासारखी वाटतात. ते केवळ विचारतील की त्यात काय मोठेसे व त्याच्याशी त्यांचे काय देणे घेणे! तर मग, कल्पना करा की सगळे पादपथ स्वच्छ आहेत, रस्त्यावर सगळीकडे व्यवस्थित मार्गफलक लावलेले आहेत, रस्त्यावर सगळीकडे झाडे बहरली आहेत व कुठेही खणलेले खड्डे किंवा खाच-खळगे नाहीत. कुठेही कचरा टाकलेला नाही व आपल्या शहराच्या मध्यभागातून वाहणा-या नदीतील पाणी नितळ व स्वच्छ आहे! चौकांमध्ये शेकडो फलक, भित्तीचित्रे लावलेली नाहीत, त्यातून तुमच्याकडे कोणतेही चेहरे बघत नाहीत, तुमची नजर क्षितीजापर्यंत पोहोचते आहे. नागरिक संवाद केंद्र सुस्थितीत आहे व त्यामध्ये आपल्याला सुहास्य वदनाने कर्मचारी सेवा देत आहेत, शहराविषयी सर्व माहिती लावण्यात आली आहे.  कल्पना करा एमएसईबीचे फीडर पिलर बॉक्स (प्रमार्ग स्तंभ पेट्या) व्यवस्थित रंगवलेले आहेत व सुरक्षित आहेत. कधी रस्त्यावरील सार्वजनिक मुता-या स्वच्छ व सुगंधी असतील, अशी कल्पना केली आहे आहे का कधी?
हे सगळे एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटते ना? खरे सांगायचे तर हे स्वप्न नाही तर प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे कारण आपण कर भरतो मात्र  आपली जबाबदारी तेवढ्यावरच संपते असे आपल्याला वाटते! महापालिका व सरकारच्या विविध विभागांनी त्यांचे काम केले पाहिजे हे मान्य आहे पण मग ते करत नसतील व त्यांच्यावर काही बंधने असली तर आपण तिथपर्यंत का पोहोचू शकत नाही व काही भार घेत नाही असा माझा प्रश्न आहे? आपण कामवाली आली नाही तर आपले घर किंवा आपली कॉलनी स्वच्छ करण्यासाठी कुणाची वाट पाहतो का? मी असे म्हणत नाही की पुढे होऊन एखाद्या स्वच्छता कर्मचा-याचे काम करु लागा, किमान प्रत्येक मंचावर तुमचा आवाज उठवा व एखाद्या समस्येकडे डोळेझाक करण्याऐवजी  अधिका-यांपर्यंत पोहोचा. जेव्हा तुम्हाला अशी दृश्ये दिसतात तेव्हा एकजूट व्हा व तुमच्या घराभोवती किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्येवर काय तोडगा काढता येईल ते पाहा.
या शहरामध्ये शेकडो कॉर्पोरेट व व्यापारी संस्था आहेत, अनेक व्यवसायिक संघटना आहेत, त्या सार्वजनिक शौचालये व नागरिक संवाद केंद्रासारख्या सुविधा दत्तक का घेऊ शकत नाहीत? वर नमूद केलेली दृश्ये आपल्याला कोणत्याही वाढत्या शहरात दिसून येतील कारण आपल्या नगर नियोजनामध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणांच्या बाबतीत दुर्दैवाने सौंदर्यशास्त्रावर कधीच भर देण्यात आला नाही! मात्र आता ते करण्याची वेळ आली आहे कारण या समस्या केवळ सौंदर्यशास्त्रापुरत्या मर्यादित नाहीत तर ती प्रत्येकाची स्वतःची समस्या बनली आहे आणि नागरिकांना तसेच पर्यटकांना सर्व त्या आवश्यक सेवा देणेही गरजेचे आहे. कोणत्याही महिलेला रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयांसंबंधी विचारा, ती शहर आणि पायाभूत सुविधांवर आगपाखड करेल. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे कोणतेही शहर चांगले किंवा वाईट हे त्यातील गगनचुंबी इमारती किंवा मॉल किंवा हॉटेलवरुन ठरत नसते तर ते नागरिकांना कशाप्रकारे सेवा देते यावरुन ठरत असते! विशेषतः रिअल इस्टेट विकासकांच्या संघटनेने यादृष्टिने विचार केला पाहिजे, कारण हे शहर इतर शहरांच्या तुलनेत राहण्यास अधिक योग्य वाटते म्हणून या शहरातील रिअल इस्टेटला मागणी आहे. या शहराची भरभराट व्हावी असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या प्रकल्पाच्या चार भिंतींवर लक्ष केंद्रित करतानाच या प्रकल्पांच्या भिंतींबाहेर काय सुरु आहे हे देखील आपल्याला विसरुन चालणार नाही. लक्षात ठेवा आपण कितीही सुंदर इमारत बांधली तरीही नागरिकांना आतून काय पाहायला मिळते हे महत्वाचे आहे!
ताजमहालाचे उदाहरण घ्या, तो सुंदर दिसतो कारण तो यमुना नदीच्या काठावर बांधण्यात आला आहे; ताजमहाल धारावीसारख्या झोपडपट्टीच्या मध्यावर बांधला असता तर किती लोकांनी त्याला भेट दिली असती ते पाहा! शेवटी शहरातील सार्वजनिक ठिकाणे समाजाचा आरसा आहेत, ती आपण नागरिक म्हणून सामूहिकपणे कसे आहोत हे दाखवतात! संपूर्ण शहर एका मोठ्या झोपडपट्टीत रुपांतरित होण्यापूर्वी जागे व्हा नाहीतर ही अशी दृश्ये आपली स्वप्ने झाकोळून टाकतील व त्या अंधारातुन आपल्याला कधीच बाहेर पडता येणार नाही!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स