Sunday, 2 June 2013

अमेरिकेची, माहित नसलेली बाजू !





















अमेरिका हे संधीचे दुसरे नाव आहे राल्फ वॉल्डू इमर्सन.
या महान लेखकानं कमीत कमी शब्दात अमेरिकेचं वर्णन केलं आहे, तिच्याविषयी कुणाचं काहीही मत असलं तरीही आपल्यापैकी बहुतेकांना तिच्याविषयी आकर्षण वाटतं हे देखील सत्य आहे. जगाच्या कानाकोप-यातून लोक त्यांचं भविष्य घडविण्यासाठी तिथे पोहोचले आहेत व अनेकांचे तसं करण्याची व तिथे पोहोचण्याची महत्वाकांक्षा आहे. प्रत्येकाची किमान या देशास भेट देण्याची व तो सर्वोच्च स्थानी कसा पोहोचला आहे हे पाहण्याची महत्वाकांक्षा असते, या देशाने जो विकास केला आहे त्याविषयी लोकांना उत्सुकता वाटते, आणि का नसावी डिन्सेलँडपासून, लास व्हेगासमधील कॅसिनो, हूवर डॅम ते एम्पायर स्टेट प्रत्येक रचना येत्या अनेक पिढ्यांसाठी पथदर्शी ठरल्या आहेत. या देशाला काही वेळा भेट देण्याचे व बराच काळ राहण्याचे भाग्य मला लाभले, मात्र यावेळची भेट अतिशय वेगळी होती. सर्वप्रथम यावेळी तिथे जायचं कारण म्हणजे माझ्या बायकोचं आजारपण. तो तिथे मुलांसोबत सहलीला गेली असताना तिला बफेलो सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. दुसरं म्हणजे मी जवळपास १५ वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो होतो, तिसरं म्हणजे यावेळी मी बफेलोसारख्या तुलनेनं लहान शहरात सलग १५ दिवस राहिलो. चौथं म्हणजे आर्थिक दृष्ट्या विचार केला तर अमेरिकेचा पूर्वीसारखा दबदबा राहिलेला नाही ती सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. 
या सर्व बाबींमुळे माझा दौरा अतिशय रोचक होता. अर्थात ज्या कारणासाठी मी तिथे गेलो होतो ते फार काही उत्साहवर्धक नसलं तरी खरं अमेरिकन जीवन जवळून पाहण्याची ही एक संधी असल्याचं मी मानलं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बफेलोमध्ये कॅसिनो, किंवा बोस्टन अथवा वॉशिंग्टनसारखी कोणतीही ऐतिहासिक वास्तू वा ठिकाण किंवा डिस्ने लँड किंवा युनिवर्सल स्टुडियोसारखी तथाकथित पर्यटक आकर्षणे नाहीत. नायगरा जवळ आहे मात्र तिथे शेकडो हॉटेल असल्यामुळे, नायगराला भेट देण्यासाठी क्वचितच कुणी बफेलोमध्ये राहतात. अमेरिकेतून कॅनडाला जाण्याच्या मार्गावरील हे एक वैशिष्टपूर्ण जुने शहर आहे. मैलोन् मैल शांत व निःस्तब्ध रस्ते, त्याच्या बाजूंनी व्हिक्टोरियन घरे व झाडे असं हे शहर अतिशय निसर्गसुंदर व टुमदार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात काही गगनचुंबी इमारती आहेत व प्रसिद्ध वास्तुविशारद सुलीव्हॅन यांनी अप्रतिमरित्या साकारलेली सिटी हॉलची इमारत शहराचे केंद्र आहे. इथे वेगवेगळ्या आकाराची व शैलीची अनेक गिरीजाघरे आहेत व महत्वाचे म्हणजे त्यांची अतिशय कष्टपूर्वक देखभाल केली जाते, यामुळे मला पुण्यातल्या वारसा वास्तुंची काय दशा आहे हे आठवल्याशिवाय राहावलं नाही.
माझा बराचसा वेळ रुग्णालयात जायचा व 3 अंश तापमानातील गोठवणा-या वा-यांमुळे सकाळी रस्त्यांवर  फिरायला जाणं अशक्य होतं त्यामुळे मी हॉटेलच्या जिममध्ये चालायचो, तिथूनच मला अमेरिकन समाजाच्या वागणुकीची चुणूक दिसून आली. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की अमेरिकेमध्ये अगदी अनोळखी माणसं स्वागत कक्षात किंवा लिफ्टमध्ये भेटली तरी अभिवादन करतात, सौजन्य म्हणून तुम्ही कसे आहात?” वगैरे प्रश्न हसून विचारतात. त्यादिवशीचं हवामान किंवा हातातील काम याविषयी हास्यविनोद करतात. या अतिशय सोप्या व लहान बाबी आहेत मात्र त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांचं वातावरण जिवंत राहतं. याच्या अगदी विरुद्ध वातावरण भारतात आहे, आपण लिफ्टमध्ये आपल्या शेजा-यांकडे पाहून हसतही नाही. मला अमेरिकेतल्या रुग्णालयातही त्यांच्या सौजन्याचा अनुभव आला, हिल्टन डबल ट्री हॉटेलमध्ये पोहोचल्यापासून सुखद अनुभवांची सुरुवात झाली. त्या हॉटेलच्या समोरच रस्ता ओलांडून बफेलो सिटी हॉस्पिटल आहे, जेव्हा मी हॉटेलमध्ये सांगितलं की मी बायको आजारी असल्यामुळे वैद्यकीय हेतूने आलो आहे तेव्हा आरक्षण करणा-या कारकुनानं लगेच माहिती दिली की खोलीच्या भाड्यात मला ६०% सवलत मिळेल व त्यानं रुग्णालयाकडून खात्री करुन न घेताच मला ते दिलं. त्याचवेळी व्यावसायिक दौ-यावर असलेल्या दुस-या एका ग्राहकास त्यानं नेहमीच्या दरानं खोली दिली व महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही ग्राहकानं आक्षेप घेतला नाही व मी इथे वैद्यकीय हेतूने आलो आहे हे त्याला खोटेही वाटले नाही! हीच पारदर्शकता व स्वयंशिस्त मला पुढील पंधरा दिवस पाहायला मिळणार होती. एवढंच नाही तर तर दररोज मी हॉटेलवर परत आल्यानंतर स्वागतकक्षातील हॉटेलचा कर्मचारी माझ्याकडे बायकोची विचारपूस करे व तिच्यासाठी शुभेच्छा देई! मला इथे जाणवलेली पुढील बाब म्हणजे नागरी जाणीव, मी जिममध्ये दुस-या एकानं ट्रेडमिलवरुन उतरण्याची वाट पाहात होतो तेव्हा त्यानं ट्रेडमिलवरुन उतरल्यानंतर आधी नॅपकिननं त्यावरील घाम पुसून टाकला व नंतरचे मला ट्रेडमिल वापरु दिली! त्यावेळी मला माझ्या जिममधली घामानं भिजलेली साधनं व लोक ती वापरल्यानंतर तशीच सोडून देतात हे आठवलं. मला नेहमी आश्चर्य वाटतं की इथल्या सामान्य माणसाला अशा प्रकारे वागायला कुणी शिकवलं व हे सगळीकडे कसं दिसून येतं? आपण आपल्या समाजात अशा सवयी का रुजवू शकत नाही? खरतर हे करायला काही पैसे पडत नाहीत. आपण आपली सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवू शकत नाहीत व इथे लोक स्वच्छ ठिकाणे अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात! मला इथे फिरताना वर्तनाचे थोडे नवीन धडेही मिळाले; मी हॉटेलबाहेर माझ्या टॅक्सीची वाट पाहात एका कारला टेकून उभा होतो, द्वारपाल मला नम्रपणे विचारलंसर ही तुमची कार आहे का?” मी उत्तर दिलं नाही, ती माझी नाही, त्यावर त्यानं सुचवलंसर मग तुम्ही तिला टेकू नका कारण तिच्या मालकाला कदाचित तसं केलेलं आवडणार नाही!” आपल्याकडचे लोक इतरांच्या मालमत्तेची एवढी काळजी करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांवर ओरखाडे काढतात. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांची छायाचित्रं काढतानाही हे दिसून आलं. छायाचित्रं काढण्यापूर्वी तुम्ही त्याच्या मालकाची परवानगी घेणं अपेक्षित असतं. ज्यावर बहुतेक मालक खुशीनं राजी होतात मात्र छायाचित्रं घेण्यापूर्वी परवानगी घेणं महत्वाचं आहे. 
बफेलो रुग्णालय हे तर एक वेगळच जग आहे; १६ मजली भव्य इमारतीमध्ये हजारो खोल्या आहेत ज्यात जगभरातल्या रुग्णांवर उपचार केले जातात मात्र रुग्णालयांसारख्या मोठ्या सार्वजनिक ठिकाणी आढळणारा गोंधळ इथे दिसत नाही. तिथलं वातावरण, सजावट व रंग आश्चर्यकारकपणे आनंदी व उत्साही आहेत, याउलट आपल्याकडे रुग्णालयांमध्ये नेहमीसारखं उदास वातावरण असतं. रुग्णालयाच्या तळमजल्यावरच्या मुख्य स्वागत कक्षात मातीपासून बनवलेला म्हशीचा एक मोठा पुतळा  जो बफेलो शहराचे  प्रतिक आहे व तिथे येणा-या अनेकांनी तो रंगवला आहे, काहींनी त्यावर ईसीजीही काढले आहेत! प्रत्येक मजल्यावरील कक्षात एक फलक लावण्यात आला आहे ज्यावर रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयाविषयीचे त्यांचे अनुभव शब्दात किंवा चित्रांमधूनही व्यक्त करु शकतात. मी सुद्धा अश्विनीला ठेवण्यात आलेल्या अति दक्षता विभागाच्या सर्व   कर्मचा-यांना एक पत्र लिहीलं व तिच्या खोलीच्या बाहेर असलेल्या भिंतीवर लावलं, तिथल्या परिचारिकेनं केवळ स्वतःच ते पत्र वाचलं नाही तर इतरांनाही ते वाचायला लावलं व त्या सर्वांनी मी त्यांच्यासाठी वापरलेल्या उदार शब्दांसाठी आभार मानले! या सर्व अतिशय लहान गोष्टी आहेत मात्र त्यामुळे वातावरण अगदी घरासारखं, खेळीमेळीचं होतं, व एका रुग्णालयातून मला ही कल्पना मिळाली! इथली व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध आहे, कारण प्रत्येक जण भेटीच्या वेळेचे नियम सकाळच्या कर्मचा-यांशी हुज्जत न घालता पाळतात, त्यामुळे त्यांचं काम सोपं होतं. इथे मला समजलं की अमेरिकेच्या कायद्यानुसार रुग्णालयास त्यांच्याकडे येणा-या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घ्यावच लागतं व एकदा दाखल केल्यानंतर रुग्ण त्यांच्या ताब्यात असतो. काय करायचं, रुग्णाला कधी सोडायचं याचा निर्णय डॉक्टर घेतात व मानवी जीवनाला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. रुग्णालयाच्या परिसरात प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतालयात रुग्ण, पाहुणे व कर्मचारी यांच्यासाठी वेगळी सोय होती, यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना उशीर होत नसे. लिफ्टसाठीही अशीच सोय होती व कुणीही एकमेकांच्या लिफ्ट वापरत नव्हते हे अधिक   महत्वाचे! आपण आपल्या इच्छेनुसार डॉक्टरांना भेटू शकत नाही तर त्यासाठी निश्चित वेळ आहे व ते देखील कॉन्फरन्स रुममध्ये, जिथे प्रभारी डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना भेटतात व रुग्णाच्या तब्येतीविषयीच्या त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात. रुग्णास अतिशय कमी वेळ भेटता येतं, हे रुग्णाच्या भल्यासाठीच केलं जातं ज्यामुळे त्याला किंवा तिला पूर्णपणे विश्रांती मिळावी. मात्र आम्ही भारतातून आलो आहोत या कारणाखाली आम्हाला काही नियमांमधून सवलत मिळाली कारण आपल्याकडे रुग्णांना असं एकांतात राहायची सवय नाही, हे त्यांनी मान्य केलं. आणखी एक सुखद आश्चर्यकारक बाब म्हणजे उपचारादरम्यान आगाऊ पैसे वैगरे मागण्यात आले नाहीत. तिथल्या कर्मचा-यांनी अतिशय मदत केली व रुग्णालयातून सोडल्यानंतर निवासव्यवस्थेसारख्या बाबीत मदत करण्यासाठी स्वतंत्र चमू होता, त्यांनी आम्हाला एक अतिथी गृह शोधण्यास मदत केली जिथे अश्विनीच्या आहारानुसार जेवण बनवता येणार होतं. रुग्णालयातली एकच दुःखद बाब म्हणजे अगदी अति दक्षता विभागात असलेल्या रुग्णांनाही शनिवार-रविवार शिवाय कुणीही भेटायला येत नाही. कुणीही भेटायला न येता केवळ पडून राहिलेल्या रुग्णांना पाहून वाईट वाटतं. त्यांना विश्रांती मिळाली पाहिजे हे मान्य असलं तरीही मित्र, नातेवाईक अशा पाहुण्यांमुळे रुग्णांना मानसिक आधार व विश्वास मिळतो हे देखील खरे आहे. आम्ही सर्वजण सारखे अश्विनीच्या आजूबाजूला पाहून अति दक्षता विभागाच्या कर्मचा-यांना आश्चर्य वाटायचं, त्यांनी तिला बोलूनही दाखवलं की अशी काळजी करणारं कुटुंब असल्यामुळे ती अतिशय नशीबवान आहे. केवळ तिच्यासोबत राहाता यावं म्हणून आम्ही इतक्या लांबून आलो आहोत हे त्यांना माहिती होतं, जे त्यांच्यासाठी कल्पनेपलिकडचं होतं. 
मोकळ्या वेळात आसपास फिरताना,  ग्राहकांशिवाय रिकामे मॉल्स आर्थिक मंदीचं लक्षण होतं व विशेष म्हणजे भारतीयांचा स्मितहास्यानं आदर केला जातो, कारण आता त्यांना आपल्या क्रय शक्तिची जाणीव झाली आहे व अगदी महाग वस्तुंचेही संभाव्य ग्राहक म्हणून वागणूक दिली जाते. अगदी सुंदर बंगल्यापुढेही विक्रीसाठी किंवा भाड्याने देण्यासाठी असे फलक लावले होते, हे मंदीचं आणखी एक लक्षण होतं, मात्र तिथली मंदी भयाण नाही, गरीब व श्रीमंतांमधली दरी आपल्याइतकी रुंद नाही. ही मंदी लवकरच दूर होईल या आशेनं ते स्मितहास्यानं मंदीस सामोरे जात आहेत. आपल्यापेक्षा हे शहर खूप लवकर झोपतं त्यामुळे आमच्यासाठी रात्री १० नंतर जेवणासाठी उपहारगृह शोधणं अवघड व्हायचं. 
इथल्या संपूर्ण अनुभवानं मला आपलं दैनंदिन जीवन व त्यांचं दैनंदिन जीवन यांची तुलना करणं भाग पाडलं. आपल्या शेजारुन जाणा-या व्यक्तिला पाहून स्मित हास्य करण्यासाठी पैसे लागत नाहीत, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत नाही, केवळ आपलं वातावरण अधिक चांगलं असावं हा दृष्टीकोन असायला लागतो. हा दृष्टीकोनच आपण दिवसें दिवस हरवत चालतो आहोत. सार्वजनिक ठिकाणच्या रिकाम्या पदपथावर लघवी करण्यास किंवा थुंकण्यास आपल्याला काहीच वाटत नाही, मग ते स्वच्छ ठेवण्याची बाब तर दूरच सोडा. एखादा देश किती श्रीमंत किंवा समृद्ध आहे हे जीडीपीवा "दर डोई"उत्पन्न  यासारख्या शब्दांमधून ठरत नाही तर त्या देशातील लोकांच्या वर्तनावरुनही ठरतं. सभ्यता म्हणजे दुसरं काही नाही तर आम्ही एकमेकांना व आपल्या परिसरास कसं वागवतो याचे मापदंड आहे. मी बफेलोहून परतल्यानंतर, व्यायाम झाल्यानंतर माझी ट्रेडमिल मी साफ करायचं ठरवलं आहे, किमान ती माझ्यातल्या सुधारणेची सुरुवात आहे. शेवटी जग पाहणं म्हणजे केवळ प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊन, तिथली छायाचित्रं काढून, तुम्ही तिथे गेला होता हे सिद्ध करण्यासाठी ती फेसबुकवर टाकणं नाही तर जगात फिरल्यामुळे आपल्या वर्तनात काय फरक पडला हे महत्वाचं आहे, त्यातूनच आपण नेमकं काय पाहिलं हे दिसून येतं! व इमर्सननं म्हटल्याप्रमाणे आपला देशही संधींचा देश बनवता येईल केवळ आपण त्याकडे तशा दृष्टीकोनातून पाहण्यास शिकलं पाहिजे!
संजय देशपांडे

Smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif


Tuesday, 30 April 2013

दुष्काळ पाण्याचा का इच्छाशक्तीचा आहे



 

 

 

 

 

माणूस त्याचे मूळ विसरला आहे व त्याच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांकडेही तो कानाडोळा करत आहे, अशा युगामध्ये पाणी व इतर साधनसंपत्ती त्याच्या उदासीनतेचे बळी ठरले आहेत... राचेल कार्सन.

आपण आपल्या राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहिली तर प्रसिद्ध अमेरिकी सागरी जैवशास्त्रज्ञाचे वरील शब्द त्यासाठी अतिशय चपखल वाटतात. राज्यभरात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या या विषयावरील एका  राज्यस्तरीय परिषदेत  मी नुकताच उपस्थित होतो, या  परिषदेचे   आयोजन   सकाळ सारख्या  प्रसिद्ध माध्यम वृत्त प्रकाशन संस्थेद्वारे करण्यात आले होते. मी काही जल व्यवस्थापनाचा तज्ञ नाही किंवा कृषी तज्ञही नाही, मात्र मी तिथे एक अभियंता म्हणून, घरांची निर्मिती करणा-या शहरी विकासकांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो, व पाणी कुठल्याही घराचा अविभाज्य भाग आहे! ही कार्यशाळा  मोठया फार व्याप्तीची  होती आणि विषयाबद्दल सांगायचे तर  बरेचसे वक्ते व समस्या म्हणजे २०१३ चा दुष्काळ हा सगळ्यातील दुआ होता! याविषयी बरेच बोलून व लिहून झाले आहे व अजूनही वृत्तपत्रे दुष्काळी भागांमधील बातम्या छापत आहेत. यातील दुःखाची बाब म्हणजे याविषयी इतके प्रकाशित होऊनही ज्यांना भरपूर पाणी मिळत आहे त्यांनी याविषयी आपले काम किंवा डोळे झाकून घेतले आहेत किंवा त्यांच्या सर्व जाणीवा बोथट झाल्या आहेत. मी हे विधान शहरात राहणा-या लोकांविषयी तसेच शासनकर्त्यांविषयी करत आहे, जे धोरणे बनवतात व त्यांना त्यांची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते.

आपण कुठेतरी समाजासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या काही मुद्यांसंदर्भात वारंवार अपयशी ठरत आहोत ते म्हणजे परवडण्यासारखी घरे, रहदारी, चांगले रस्ते, पाणी, स्वच्छता किंवा सार्वजनिक आरोग्य व शिक्षण. वरील सर्व मुद्यांवरील अपयशाबाबत सामान्य माणसाकडून फारशी तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली नाही कारण रस्ते, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व अगदी घर एकवेळ नसेल तर चालेल मात्र पाण्याला काहीच पर्याय नाही! वक्त या जुन्या लोकप्रिय चित्रपटात एक संवाद आहे...
 "
समय सबसे बलवान होता है, हर किसीको एक सतह पर ले आता आता है, उसके सामने कोई ज्यादा या कम ताकदवर नहींम्हणजे " काळ सर्वश्रेष्ठ असतो, तो सर्वांना एकाच पातळीवर आणतो, त्याच्यासमोर कोणीही जास्त किंवा कमी श्रेष्ठ नाही!". इथे पाण्याने काळाची जागा घेतली आहे, यामुळे समाजातील सर्व घटक समान पातळीवर आले आहेत कारण ते कुणालाच उपलब्ध नाही, राज्यातल्या ब-याच जिल्ह्यांमधील अशी परिस्थिती आहे. माणूस कितीही श्रीमंत असला तरीही त्यालाही हातात बादली घेऊन गरीब माणसाच्या बरोबरीने पाण्याचा शोध घ्यावा लागतोय हे सत्य आहे व नेहमी प्रमाणे सरकार व माध्यमे केवळ प्रतिक्रीया देत आहेत. आपण पूर्वसक्रिय होण्यास का अपयशी ठरतो असा प्रश्न मला नेहमी भेडसावतो.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता, ती काही एका रात्रीत निर्माण झालेली नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला ग्रामीण भाग शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो व पावसावर केवळ देवाचे नियंत्रण असते. आपण केवळ तो जे काही देतो त्याच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन करु शकतो. शहरी किंवा ग्रामीण जल व्यवस्थापनाचे हेच मूलभूत तत्व आहे, ते जाणून घेण्यासाठी आपण तज्ञ असायची गरज नाही. आपल्याकडे जेव्हा पुरेसा पाऊस पडतो तेव्हा आपण वर्षभर काय करत असतो असा माझा पुढील प्रश्न आहे? आपल्याकडे दुष्काळ आहे याचा अर्थ आपण जल व्यवस्थापनात अपयशी ठरलो आहोत हे सत्य आहे? माझ्या मते हे सरकार, राजकारणी, माध्यमे, सरकारी अधिकारी तसेच सर्वांचेच अपयश आहे. आपण सर्वच जण याविषयीच्या आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहोत त्यामुळे इतिहासातील आत्तापर्यंतच्या भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जण एक बाब दाखवतोय की आधीचे दुष्काळ व या दुष्काळात एक मुख्य फरक आहे तो म्हणजे यावेळी आपल्याकडे पुरेसे अन्न तसेच नोक-या आहेत व पैसेही आहेत मात्र पाणी नाही! या दुष्काळात एकच समस्या गंभीर आहे ते म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्याचा परिणाम जनावरांसाठी चा-यावर तर   होतच आहे व  पिकांवर  जो परिणाम झाला आहे  त्याचाच परिणाम म्हणजे धान्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्याशिवाय बरेचसे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत, आत्ताशी कुठे एप्रिल संपला आहे, जूनच्या मध्यापर्यंत व्यवस्थित पाऊस सुरु होईल, तोपर्यंत काय, यावर्षीही पुरेसा पाऊस पडला नाही तर काय? आपण त्यासाठी अजिबात तयार नाही व आपण आपल्या निष्काळजीपणाची किंमत आधीच मोजली आहे.

जलसिंचन, पाणी पुरवठा, पर्यावरण, ग्रामीण विकास, भूजल सर्वेक्षण, कृषी, महसूल, वन व शहरी विकास यासारखे अनेक विभाग आहेत व तेवढीच प्राधिकरणेही आहेत मात्र जलसंधारण व वापर यासारख्या महत्वाच्या विषयावर कोणत्याही एका विभागाचे नियंत्रण नाही. जल व्यवस्थापनाची धोरणे व त्याच्याशी संबंधित कामे ठरवण्यासाठी एकच प्राधिकरण का असू शकत नाही. वर उल्लेख करण्यात आलेले विभाग या ना त्या मार्गाने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीस जबाबदार आहेत मात्र कुणीही त्याची जबाबदारी घेत नाही. पाण्याचे टँकर पाठवणे, चारा छावण्या (जनावरांना चारा   देणा-या छावण्या) बांधणे, किंवा दुष्काळग्रस्त भागासाठी मदत जाहीर करणे म्हणजे जबाबदारी उचलणे नव्हे, ते केवळ जखमेवर मलमपट्टी करण्यासारखे आहे. आपण दीर्घकाळ टिकतील व पूर्ण बंदोबस्त होईल अशा योग्य उपाययोजना करायला हव्यात. कोणीही पाऊस कमी पडण्यासाठी सरकारला जबाबदार धरत नाही. अर्थात जंगलतोड, हरित पट्टा कमी होणे यांचा परिणाम पावसावर निश्चितच होत असला तरी, उपलब्ध असलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब वापरला जावा यासाठी योग्य धोरण तयार न करणे व त्यानुसार तळागाळापर्यंत धोरणाची अंमलबजावणी न करणे यामुळे अपयश आले आहे.

पुणे व मुंबईसारख्या महानगरांसाठी पिण्याचे पाणी ही मुख्य समस्या आहे कारण एकूणच शहरी लोकसंख्या वाढत आहे व या लोकसंख्येला दैनंदिन वापरासाठी भरपूर पाणी आवश्यक आहे व हे कोणीही नाकारत नाही, मात्र या लोकांना पुरवले जाणारे किंवा त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेले पाणी योग्य प्रकारे वापरले जाईल याची खात्री कोण करणार, कारण आपण या शहरांसाठी मीटरद्वारे पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत बाबी पुरवण्यात अपयशी ठरलो आहोत. पावसाच्या पाण्याचे संधारण किंवा पाण्याचा पुनर्वापर या संज्ञा केवळ कागदोपत्रीच उरल्या आहेत, कारण अगदी पीएमसीचा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने कार्य करत नाही हे सत्य आहे. संपूर्ण राज्यभर अशीच परिस्थिती आहे त्यामुळेच पाणी वाया घालवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांवर किंवा सामान्य माणसावर आरोप करण्यात काय अर्थ आहे? ज्या नद्या काही वर्षांपूर्वी अर्ध्याहून अधिक भरलेल्या होत्या त्या आता कोरड्या पडल्या आहेत किंवा उगमापाशी असलेल्या शहरांमुळे इतक्या प्रदूषित झाल्या आहेत की प्रवाहाच्या मार्गात असलेल्या शहरांसाठी त्या डोकेदुखी ठरल्या आहेत. यासारख्या परिस्थितींसाठी कोण जबाबदार आहे हा प्रश्न आहे?

आपण २०१३ मध्ये आहोत व हजारो गावे व शेकडो शहरांमध्ये बारमाही पाणी पुरवठ्याची योजना नाही हे सत्य आहे व आपण स्वतःला प्रगत राज्य म्हणवतो! यासाठी कोण जबाबदार आहे? सरासरी पाऊस तसेच भूगोलानुसार प्रत्येक प्रदेशाचे वर्गीकरण करुन त्यानुसार एक रचना तयार करुन, त्या नमुना जल योजनेचा अभ्यास करुन, त्याची निष्पत्ती अभ्यासून, नियोजित वेळेत ती योजना संपूर्ण प्रदेशात का लागू करत नाही. क्रोसिनची गोळी जशी कोणत्याही डोकेदुखीवर चालते तसे या समस्येवर एकच उत्तर नाही! किंबहुना पाणी ही समस्या नाही, तर पाणी हा तोडगा आहे, या तोडग्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन ही समस्या आहे हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. हा दुष्काळ हिमनगाचे केवळ एक टोक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे, आपण जर जागे होऊन कृती केली नाही तर खरा दुष्काळ व त्याचे परिणाम अजून अनुभवायचे आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणा-या आणि शेजारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये व शहरांमध्ये पाण्यासाठी लोकांमध्ये आधीपासूनच वाद सुरु आहेत! संपूर्ण राज्यभरात हे वाद दंगलींमध्ये रुपांतरित व्हायला फार दिवस लागणार नाहीत व त्यानंतर सर्वांसाठीच फार उशीर झालेला असेल.
 वेळ आली आहे आपला पाणी वापराबद्दलचा दृष्टीकोन तपासून पाहण्याची , आणि जबाबदारी त्यांची जास्त आहे ज्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे सुई पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरातील रहिवासी   आणि मनपा सारख्या, त्यांना नियंत्रित करणाऱ्या संस्थाकडे वळते .

दुष्काळाविरुद्धच्या लढाईत आपल्याला सर्वांनाच भूमिका पार पाडायची आहे. दुष्काळग्रस्त लोकांना शक्य त्या प्रकाराने मदत करणे ही एक बाजू झाली, मात्र अशी परिस्थिती उद्भवू नये हाच आपल्यापैकी प्रत्येकाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. आपण एवढे जरी शिकलो तरी परमेश्वरास आनंद होईल की त्याने निर्मिलेल्या सर्वात हुशार जीवात अजूनही थोडेसे शहाणपण उरले आहे! कारण दुष्काळ पाण्याचा नाही तर त्याविरुद्ध लढण्यासाठीच्या इच्छाशक्तीचा आहे!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स


Thursday, 18 April 2013

विकास योजना (डीपी), ठरविणार शहराचा विकास





 
 
 
 
 
सर्व वाढ कृतीवर अवलंबून असते. प्रयत्नांशिवाय शारीरिक किंवा बौद्धिक विकास होत नाही आणि प्रयत्न म्हणजे काम....केल्विन कुलीज

आपण पुण्यासारख्या शहराच्या विकासाची व्याख्या करतो किंवा त्याचे भाकित करतो तेव्हा या ओळी किती महत्वाच्या वाटतात, कारण आपल्या देशातील फार थोड्या शहरांना पुण्याएवढा मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे.  अर्थातच या विधानाचे सार विकास योजना (डीपी) आहे, जो प्रकाशित करण्यात आला आहे व भागधारकांच्या सूचना/हरकतींसाठी खुला करण्यात आला आहे. बरेच जण म्हणतील त्यांचे त्याच्याशी काय देणे घेणे? बांधकाम व्यावसायिक, राजकारणी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिका-यांनी एखादा क्रिकेट अथवा फुटबॉलचा सामना आधीच निश्चित करावा याप्रमाणेच ते नाही का? त्याशिवाय कोणताही डीपी (विकास योजना) निश्चित झाला तरी काय फरक पडतो? अगदी सुशिक्षित लोकही अशा प्रकारची शेरेबाजी करतात त्यामुळे मी त्यांना दोष देत नाही. किंबहुना अनेकांना माहितीही नसते की अशा प्रक्रियांचे पालन केले जाते, ज्यामध्ये या शहराचा कुणीही नागरिक विकास योजनेमधील तरतुदींविषयी त्याच्या कल्पना सुचवू शकतो किंवा जे काही प्रकाशित करण्यात आले आहे त्यास हरकत घेऊ शकतो! या पूर्वेकडील तथाकथित शैक्षणिक राजधानीची व त्यातील लोकांची अशी अवस्था आहे की ज्या लोकांवर या डीपीमुळे परिणाम होणार आहे त्यांना त्याविषयी व त्याच्या निर्मितीविषयी माहितीच नसते, जो त्यांच्या येत्या पिढ्यांचे भविष्य निश्चित करणार आहे!

यासाठी आपल्याला डीपी म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल? डीपी म्हणजे विकास योजना, ही प्रक्रिया दर २० वर्षांनी पार पाडली जाते ज्याद्वारे येत्या २० वर्षांसाठी शहराच्या विकासाची दिशा निश्चित केली जाते. यामध्ये सार्वजनिक वाहतूक व रस्ते, सांडपाणी, पाणी व इतर ब-याच गोष्टींसारख्या पायाभूत सुविधांचा समावेश होतो, ज्या शहरातील चांगल्या जीवनासाठी आवश्यक आहेत. त्याशिवाय नाट्यगृहे, बगीचे, उद्याने यासारख्या मनोरंजनाच्या सुविधा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण अशी सुविधांची यादी वाढत जाते. ही एक योजना आहे तसेच ती प्रत्यक्ष राबवण्याचा कार्यक्रम आहे, जो २० वर्षांच्या म्हणजे एका पिढीच्या कालावधीत राबवला जाईल. त्यामुळेच आपण आज जे निश्चित करु त्याद्वारे येत्या २० वर्षात शहराचे भवितव्य निश्चित होईल. ही २० वर्षे अतिशय महत्वाची आहेत कारण गेल्या दोन डीपींच्या कालावधीत म्हणजे साधारणपणे ४० वर्षांच्या कालावधीत शहरात अनेक बदल घडून आले आहेत. निवृत्त लोकांचे शहर आणि सायकलींचे शहर यापासून ते आयटी केंद्र अशी त्याची ओळख बदलत गेली आहे व आता त्याचा प्रवास महानगर बनण्याच्या दिशेने सुरु आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये ब-याच गोष्टींचा बळी गेल्याचे आपण पाहिले आहे. शहराच्या गरजा बदलल्या आहेत व सायकलींची जागा दुचाकी व चार चाकी वाहनांनी घेतली आहे. आता सकाळ किंवा संध्याकाळ शांत किंवा निवांत असण्याचे दिवस गेले, अगदी भल्या पहाटेपासून कामाच्या ठिकाणी अथवा शाळेत पोहोचण्यासाठी गोंधळ व घाई दिसून येते. अगदी रात्री उशीराचे २-३ तास वगळता रस्ते कधीही मोकळे नसतात. लोकसंख्या अनेक पटींनी वाढली आहे व वाढतच आहे. आपल्याला ही लोकसंख्या व येणा-या नव्या स्थलांतरितांना सामावून घेणे आवश्यक आहे. अशा सर्व समस्या असूनही या शहरात दरवर्षी हजारो लोक येतात कारण त्यांना येथे भवितव्य आहे असे वाटते व ते खरे आहे. या शहरात देशातील बहुदा सर्वोत्तम शिक्षण दिले जाते व रोजगारही उपलब्ध आहे. माहिती तंत्रज्ञान असो, ऑटोमोबाईल, शिक्षण किंवा सेवा उद्योग सर्वांनाच चांगल्या तांत्रिक मनुष्यबळाची गरज आहे आणि हाच शहरातील रिअल इस्टेटच्या विकासाचा कणा आहे.

हे सर्व बरेचसे डीपीवर अवलंबून आहे, ज्यामुळेच हे शहर अधिक चांगले होणार आहे. मी नेहमी म्हणत आलोय की एखाद्या शहरातील जीवन कसे आहे त्यानुसार ते शहर चांगले किंवा वाईट हे ठरत असते. त्यामुळे आगामी काळातील आव्हानांसाठी शहराचे नियोजन करणे अतिशय महत्वाचे आहे व ते काम योग्यप्रकारे तयार केलेल्या डीपीद्वारेच शक्य होऊ शकते. तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम लोक डीपी तयार करतात हे खरे असले तरी ते काही देव नाहीत व ते तसा दावाही करत नाहीत. त्यामुळेच डीपीमध्ये ब-याच अंगांनी सुधारणा होऊ शकते व समाजाच्या सर्व घटकांमधून हे पैलू समजावेत अशी अपेक्षा आहे, त्यामुळेच नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या जात आहेत. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे मतदानाप्रमाणेच याविषयी लोक जागरुक नसतात व डीपीमुळे ज्यांच्यावर परिणाम होणार आहेत ते देखील त्याच्या घटकांचा अभ्यास करण्याची तसदी घेत नाहीत. लोकांना तो पाहता यावा यासाठी पुणे मनपाच्या संकेत स्थळावर तो उपलब्ध करुन देण्यात आला आहे त्याचशिवाय मनपाच्या मुख्य इमारतीत त्याच्या मोठ्या आकारातील छापील प्रती लावण्यात आल्या आहेत.

आता बरेच जण प्रश्न विचारतील यामुळे असा कितीसा फरक पडणार आहे? यावर माझे उत्तर आहे, तुम्ही मतदान का करता? तुमच्या स्वतःच्या शहराच्या विकासात सहभागी होण्याची ही तुम्हाला मिळालेली एकमेव संधी आहे व असा प्रयत्न खरोखर करुन पाहायला पाहिजे. आपण   ब-याच गोष्टी करु शकतो. ज्या लोकांच्या मालमत्तेवर किंवा सध्याच्या इमारतीवर आरक्षण आले असेल ते पर्याय सुचवू शकतात किंवा सार्वजनिक वापराच्या एखाद्या जागेवर मागील डीपीमध्ये असलेले आरक्षण वगळण्यात आल्याचे तुम्हाला आढळून आल्यास तुम्ही हरकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे या डीपीमध्ये आढळून आले आहे की सध्याच्या बहुतेक सर्व रस्त्यांचे रुंदीकरण केले जाईल, त्यामुळे सतत वाढत्या रहदारीसाठी अधिक जागा उपलब्ध होईल हे मान्य असले तरीही सध्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड होईल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकदा झाड कापल्यानंतर क्वचितच त्याऐवजी दुसरे झाड लावले जाते, त्याचशिवाय नवीन झाडास सावली देण्यासाठी, परिसर हिरवा करण्यासाठी अनेक वर्षे लागतील जे काम सध्याचे झाड करत आहे. यामुळे शहर ओसाड होण्याचा धोका आहे! मात्र आपण झाडे कापली नाहीत तर रस्ते रुंद करुन काय उपयोग. सर्व रस्त्यांची रुंदी वाढवणे आवश्यक आहे का, माझ्या मते मुख्य रस्त्यांचेच रुंदीकरण व्हावे कारण केवळ रस्त्यांचे रुंदीकरण केल्याने वाहतुकीची परिस्थिती सुधारणार नाही. आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे, तोच योग्य तोडगा होईल. मात्र त्याऐवजी ब-याच ठिकाणी पीएमपीआयएल सार्वजनिक वाहतुकीचे आरक्षण निवासी विभागांसाठी रुपांतरित करण्यात आल्याची माहिती आहे. असेच प्रकार शहरासाठी तेवढ्याच महत्वाच्या असलेल्या शैक्षणिक, उद्यानांच्या व क्रीडांगणांसाठीच्या आरक्षणांच्या बाबतीतही घडले आहेत.

एक सामान्य नागरिक म्हणून मला एक गोष्ट समजलेली नाही की आरक्षणांची संख्या व हेतू वाढवण्याऐवजी सध्याची आरक्षणे का हटवली जात आहेत, आपण सध्याच्या डीपीचे पालन करत नसू तर त्याचा काय उपयोग आहे. याचा अर्थ असाही होतो की या डीपीमध्ये दाखवण्यात आलेली आरक्षणे त्याप्रमाणे लागू करण्यात आली नाहीत तर २० वर्षांनंतर ती देखील वगळण्यात येतील! त्यामुळे या डीपीमध्ये आपण जे प्रस्तावित करत आहोत ते तर्कशुद्ध असले पाहिजे म्हणजे आपल्याकडील स्रोतांद्वारे त्याची अंमलबजावणी केली जाईल. सध्याच्या डीपीची केवळ ३५% अंमलबजावणी झाली आहे हे तथ्य आहे, म्हणजे गेल्या २० वर्षांमध्ये आपण डीपीमधील प्रस्तावित जागांपैकी केवळ ३५% आरक्षित जागांचाच वापर करु शकलो. विचार करा हे शहर केवळ अत्यावश्यक असलेल्या ३५% वर जगत आहे व येत्या वर्षांमध्ये लोकसंख्या वाढल्यावर परिस्थिती अधिक अवघड होईल कारण आपण जागा वाढवू शकत नाही व या लोकसंख्येसाठी आहे ती जागा अपुरी पडेल. डीपीला योग्य जमीन अधिग्रहण कायद्यांचे पाठबळ हवे व प्रसंगी आरक्षणांसाठी सक्तीने अधिग्रहणाचे अधिकारही वापरले पाहिजेत. कारण कुणालाही त्याची/तिची जमीन कोणत्याही आरक्षणासाठी समर्पित करायला आवडणार नाही, पण त्यांना पुरेशी भरपाई मिळाल्यास ते का आक्षेप घेतील? जर तसे झाले नाही तर आरक्षणांसाठी जमीनींचे अधिग्रह ही एक मोठी समस्या होईल व त्यामुळे डीपीचा मुख्य हेतूच अपयशी होईल. उदाहरणार्थ पटवर्धन बागेमध्ये सध्याचा जमीनीचा दर प्रति चौरस फूट ७०००/- एवढा आहे व टीडीआर म्हणजे विकास हक्कांचे हस्तांतर करायचे असेल तर ज्या जमीन मालकाची जमीन आरक्षणाखाली येणार आहे तो टीडीआरचा प्रति चौरस फूट ३०००/- असा दर मान्य करणार नाही, तर मग तो टीडीआर का स्वीकारेल? मला असे वाटते की प्रशासनाने अशा प्रकरणांचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे शहराची फुफ्फुसे असलेल्या हरित पट्ट्यांमध्ये केवळ ४% बांधकाम करण्यास परवानही आहे व ते देखील जमीनीचा तुकडा ४०,००० चौरस फुटांपेक्षा अधिक असल्यास, त्यामुळे ज्यांच्या जमीनी त्यापेक्षा लहान आहेत त्यांना त्याची देखभाल करणे अव्यवहार्य होते. अशा परिस्थितीत अवैध बांधकामांद्वारे जमीनींचा गैरवापर होऊ लागतो किंवा गोदाम अथवा पार्किंगसाठी त्यांचा वापर होतो ज्यामुळे हरित पट्टा तयार करण्याचा हेतू पूर्ण होत नाही.

अशी कितीतरी प्रकरणे आहेत व तुम्हाला अशा बाबी समजून घेण्यासाठी अभियंता किंवा नगर नियोजक असण्याची गरज नाही, हे सामान्य ज्ञान आहे. आणखी एक बाब म्हणजे सूचना देण्यासाठी किंवा हरकती उपस्थित करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष प्रभावित पक्षच असले पाहिजे असे नाही, या शहराचे नागरिक म्हणून तुम्हीही डीपीचा एक भाग आहात. म्हणूनच शहराच्या नियोजनातील आपली जबाबदारी समजून घेण्याची वेळ आता आली आहे. नाहीतर आपल्याला येत्या काळात शहराच्या अधःपतनासाठी टीका करण्याचा कोणताही नैतिक हक्क राहणार नाही. आता यासाठी रजनीकांतप्रमाणे म्हणावे लागेल, " माईंड इट!"

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
 

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif