Saturday 23 September 2023

 पुण्याची वाढ आणि नितीन गडकरीजी !














पुण्याची वाढ आणि नितीन गडकरीजी !

 

बरेचदा, आयुष्य हे  एक नवीन व्यक्ती बनण्यापेक्षाही,तुम्हाला जी व्यक्ती व्हायचे होते परंतु कसे व्हायचे हे माहिती नव्हते याविषयीच असते.” …  हीथ एल.बकमास्टर

       हीथ बकमास्टर हे विपणन, निधी संकलन व व्यवसाय विकास सल्लागार आहेत, व तरुणांसाठी व प्रौढांसाठी काल्पनिक  कादंबऱ्या लिहीणारे अमेरिकी लेखक आहेत. हीथ यांच्या कारकिर्दीतील प्रौढांसाठीच्या कादंबऱ्यांचा भाग सोडा, परंतु त्यांनी कुणीतरी होण्याविषयी जे लिहीले आहे ते व्यक्तीच्या संदर्भात असले तरीही ते आपल्या पुणे  शहरातील अनेक गोष्टींनाही लागू होते. मला हीथ यांचे हे अवतरण आठवण्याचे कारण म्हणजे आपले माननीय केंद्रीय परिवहन (रस्ते) मंत्री, श्री. नितीन गडकरी ! आपण सगळे जाणतो की हाती घेतलेले काम तडीस नेणारच अशी नितीन भाऊंची ( मी देखील नागपूरचाअसल्यामुळे त्यांच्यासाठी हक्काने नितीन भाऊ हे लाडके टोपणनाव वापरणार आहे ) ख्याती आहे व त्यांनी १५० कोटी लोकसंख्येच्या या विशाल देशात रस्ते बांधणीचे महाकाय काम केले आहे. परंतु व्यक्तीमत्वात बदल व शहर यांच्यात काय संबंध आहे, मला वाचकांच्या कपाळाला पडलेल्या आठ्या दिसताहेत. तर नितीन भाऊ अलिकडेच “आपल्या ” पुण्यामध्ये क्रेडाई पुणे या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या एका बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते व विषय होता रिअल इस्टेट व पायाभूत सुविधांची भूमिका, कारण कोणत्याही देशामध्ये पायाभूत सुविधांच्या आघाडीवर रस्त्यांना अनन्य साधारण महत्त्व असते, तसेच रिअल इस्टेटलाही ( अर्थात रिअल इस्टेटला त्यासाठीचे वलय किंवा श्रेय कधी मिळाले नाही हा स्वतंत्र मुद्दा झाला ) व कोणत्याही देशाच्या विकासाचे इंजिन असलेल्या या दोन पैलूंविषयी बोलण्यासाठी नितीन भाऊंशिवाय अधिक चांगली व्यक्ती कोण असू शकते ?

      म्हणुनच  या कार्यक्रमामध्ये नितीन भाऊ आले व आपल्या खास रोखठोक शैलीत मनापासून वरील विषयांवर बोलले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पुण्यात आता इमारती पुरे झाल्या  व विकासकांनी ( म्हणजे बांधकाम व्यावसायिकांनी ) पुण्याच्या पलिकडे सुद्धा घरे बांधण्याचा विचार केला पाहिजे , वाटल्यास पश्चिम महाराष्ट्रातील गावांवर लक्ष केंद्रित करा कारण तेथील सधन  शेतकऱ्यांकडे भरपूर पैसा असतो व बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्यासाठी त्यांच्या गावामध्येच चांगली घरे बांधली तर दोघांचाही फायदाच होईल. तसेच बांधकाम व्यवसायिकांनी बांधकामाच्या जुन्या-पुराण्या पद्धती सोडून दिल्या पाहिजेत, बांधकाम खर्च वाचविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे ( गैरफायदा नव्हे ), म्हणजे घराच्या किमती नियंत्रणात राहतील ( कुणाच्या हा एक प्रश्नच आहे ). बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी आयआयटीसारख्या तांत्रीक शिक्षण  संस्थांशी नाविन्यपूर्ण कल्पना तसेच संशोधन व विकासासाठी हात मिळवणी केली पाहिजे, ज्यामुळे वापरकर्त्याचा, म्हणजे घर घेणाऱ्या ग्राहकांचाही फायदा होईल. नितीन भाऊंनी पुण्यातील बदललेल्या  दृश्यावरही ( परिस्थितीवरही ) टिप्पणी केली, इथे प्रदूषण किती वाढले आहे व या शहराने काय होणे अपेक्षित होते व ते आज काय झाले आहे व पुण्याला त्याचा जो जुना दिमाख पुन्हा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले. त्यांनी अशीही घोषणा केली की वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात व भोवतालच्या परिसरात 50,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे उड्डाणपूल/रस्त्यांचे जाळे उभारले जाईल परंतु तो खरा तोडगा नाही. हे पण ते म्हणाले ! त्यांनी प्रश्न विचारला की ( कुणाला ) मुंबईजवळ ज्याप्रमाणे नवी मुंबई उभारण्यात आली, नवी दिल्लीजवळ नोएडा उभारण्यात आले त्याप्रमाणे पुण्याभोवती नवे पुणे का उभारले गेले नाही. पुण्याची आहे त्याच स्वरुपामध्ये कोंडी का होत आहे, तरीही वेगवेगळ्या भागातील लोकांना इथे यायची व स्थायिक व्हायची इच्छा असते व इतर प्रदेश विकसित का होत नाहीत ( म्हणजे नागपूर ) व यासारखे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. नितीन भाऊंनी पुण्यातील लोकसंख्येविषयी किंवा वाढीविषयी जे काही मुद्दे मांडले ते खरे आहेत,त्याविषयी पूर्णपणे आदर आहे, परंतु त्यांनी हे प्रश्न त्यांच्या लोकांना किंवा सरकारला विचारायला हवे होते,जे पुण्याचा विकास ज्याप्रकारे होत आहे त्यासाठी जबाबदार आहेत व बांधकाम व्यावसायिक या खेळातील केवळ एक प्यादे आहेत, मी हा लेख लिहीण्याचे हेच कारण आहे.

        नितीन भाऊ, मी तुमचे आभार मानले पाहिजेत कारण तुम्ही पुण्याच्या अवतीभोवती ज्याप्रकारे घडामोडी घडत आहेत त्याचा किमान उघडपणे उल्लेख तरी केला.तरीही अनेक जण त्यांच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी या शहराला प्राधान्य देतात, पण यामध्ये कुणाची चूक आहे किंवा दोष आहे, हा वादाचा मुद्दा आहे. परंतु तुम्ही पुण्याविषयी व बांधकाम व्यावसायिकांविषयी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील गावांसह इतर भागांविषयी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर लक्ष केंद्रित करू. यातून कदाचित आपल्याला काही उपाययोजना सुचू शकतील ज्या तुम्हीच बदल घडवून आणण्यासाठी वापरू शकता. तर, बांधकाम व्यावसायिकांनी पुण्याच्या पलिकडे विचार करण्याविषयी बोलायचे झाले, तर पुण्यामध्ये चाळीस एक वर्षांपूर्वी जेव्हा ते एक शहर होते तेव्हा काय परिस्थिती होती हे मला तुम्हाला सांगावेसे वाटते ( परंतु तोपर्यंत आजची सर्व शहरे त्या काळी लहान गावे किंवा खेडेगावे होती) व मला आठवतेय की तेव्हा नागपूरही पुण्यापेक्षा आकार, विस्तार व व्यवसायाच्या बाबतीत मोठे होते. पुण्याला शैक्षणिक क्षेत्र असल्यामुळे निश्चितच एक वलय होते, परंतु आपण सगळेजण जाणतो की आपल्या देशामध्ये अगदी आजही ( केवळ नोकरी मिळवणे सोडून ) शिक्षणाचे काय मोल आहे. पुणे तेव्हा निवृत्तीवेतनधारकांचे गाव ( शहरही नाही ) मानले जात असे. लोकांना पुणे म्हटले की, चितळेंची बाकरवडी, इथे दुपारी 1-4 मध्ये  दुकाने बंद असतात व पुणे 30 म्हणजे सदाशिव पेठेतील रहिवाशांचा स्वभाव एवढेच माहिती होते. अचानक 70-80 च्या दशकात काहीतरी घडले व बजाज- टेल्कोचा  इथे प्रवेश झाला व पुणे नावाची ट्रेन सुरू झाली. नितीन भाऊ मी देखील तुमच्यासारखाच एक नागपूरकर आहे व माझ्यावर विश्वास ठेवा काही व्यक्तींचा अपवाद वगळता बहुतेक लोकांना ( त्यांच्यापैकी काही आता पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक आहेत ) ही पुण्याची महाराष्ट्र एक्स्प्रेस केवळ चार दशकात वंदे - भारत सुपर फास्ट ट्रेन कशी झाली हे  समजलेच नाही. पुण्याचेही हेच झाले आहे व या ट्रेनचा वेग किती आहे हे ओळखण्याचे व त्यानुसार आवश्यक ते बदल करण्याचे व इतर पॅसेंजर ट्रेनना एक्सप्रेस ट्रेनमध्ये रुपांतरित करण्याचे म्हणजेच इतर प्रदेशांचाही विकास करण्याचे काम कुणाचे आहे. तर  ते काम  सरकारचे होते परंतु कोणत्याही सरकारला किंवा विरोधकांना पुण्यामध्ये असलेल्या क्षमतेची तसेच वाढीच्या वेगाची जाणीवच झाली नाही. म्हणूनच वाढीच्या संदर्भात पुण्याचे आज जे काही झाले आहे त्यामध्ये त्यांची काही भूमिका नाही. तसेच यामध्ये बांधकाम व्यावसायिकांची किंवा पुण्याच्या व्यापारी वर्गाची किंवा समाजाच्या कोणत्याही घटकाची काहीच भूमिका नाही. प्रत्येकाने ते जास्तीत जास्त जे चांगले करू शकतात तेच केले, ते म्हणजे या ट्रेनचा फायदा घेत राहणे. त्यामुळेच कोणत्याही वर्गाला विशेषतः बांधकाम व्यावसायिकांना प्रदूषणासाठी किंवा पुण्याची आज जी काही वाईट परिस्थिती आहे असे तुम्हाला वाटते त्यासाठी दोष देता येऊ शकत नाही व माझेही त्याविषयी वेगळे मत आहे.

    नितीन भाऊ, पुण्याचे प्रदूषण(हवा,नदी) वाहतुकीची कोंडी या काळजी करण्यासारख्या बाबी आहेतच.परंतु एखाद्या शहराच्या किंवा समाजाच्या संदर्भात या वाईट गोष्टी आहेत असे तुम्हाला वाटत असेल,तर भाऊ आपण आपल्या  लाडक्या ताडोबाच्या जंगलाजवळ असलेल्या  कोलारा सारखा गावांमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहू.इथे तुम्हाला काहीही प्रदूषण दिसणार नाही कारण हा जंगलाचा भाग आहे,परंतु तुम्हाला इथे प्रत्येक गावाकडे ये-जा करण्याच्या रस्त्यावर माणसांच्या शौचाचा कचऱ्याचा उग्र दर्प येईल. हे देखील प्रदूषणच आहे आपण इथे कुणाला दोष देऊ, इथे कुणा बांधकाम व्यावसायिकांनाही दोष देता येणार नाही.हा आपल्या व्यवस्थांचा दोष आहेपुण्यातील प्रत्येकाने त्याला किंवा तिला जे काही सर्वोत्तम करता येते केवळ ते करून त्याच्या वाढीमध्ये योगदान दिले आहे, सरकारने पुढाकार घेतला नाही व भवितव्याला दिशा दिली नाही तर शहरांचे भवितव्य असेच घडते, पुण्याच्या बाबतीतही काही वेगळे झाले  नाहीसरकारनेच(ते कोणतेही असो)नवीन मुंबई नोएडाच्या विकासाचे नियोजन केले घोषणा केली त्यानंतर नगर नियोजनामध्ये ज्याप्रकारने सरकारने एखाद्या प्रदेशाविषयी किंवा शहराविषयी जे काही ठरवले आहे त्याचे बांधकाम व्यावसायिक केवळ पालन करतात,त्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांनी त्याचे पालन केले, मला असे वाटते की तुम्ही रिअल इस्टेटचा हा पैलू विचारात घेतला नाही.नगर नियोजन म्हणजे ज्याप्रमाणे केवळ रस्ते, विकास नियंत्रण नियम, पाणी पुरवठा, किंवा सांडपाण्याची यंत्रणा व सार्वजनिक वाहतूक नाही, तर त्यामध्ये पर्यावरण व संस्कृतीचाही, तसेच लोकांच्या दृष्टिकोनाचाही समावेश होतो. इथेच इतर सर्व प्रदेश पुण्याच्या तुलनेत मागे पडले, पुणे प्रदेशाच्या विकासासंदर्भात हे मोठे तथ्य आहे. आणि नवीन पुणे अस्तित्वात आहे, फक्त सरकारने अधिकृतपणे तशी घोषणा केलेली नाही , कुणाही अस्सल पुणेकराला विचारा ( पुणे 4 किंवा पुणे 30 ) तो वाकड, प्राधिकरण, फुरसुंगी, आंबेगाव, खराडीला पुणे म्हणून कधीच स्वीकारणार नाही . तरीही या उपनगरांमध्ये  घर घेणारी व्यक्ती या सर्व ठिकाणांचा विचार व स्वीकार पुणे म्हणून करते, रिअल इस्टेटसाठी हेच महत्त्वाचे आहे !

       आता बांधकाम उद्योगातील तंत्रज्ञानाच्या मुद्द्याविषयी बोलू व आयआयटीसारख्या संस्थांशी हातमिळवणी करण्याबाबत तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर होता, पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा प्रश्न आहे. निश्चितपणे, रिअल इस्टेट क्षेत्राने संघटित होणे अपेक्षित आहे जे होत आहे परंतु या गोष्टी एखाद्या उद्योगाला मान्यता मिळाल्यावर येतात व मान्यता केवळ आदर असेल तरच मिळते. रिअल इस्टेटचा कुणीच आदर करत नाही ही वस्तुस्थिती आहे. नितीन भाऊ, एक व्यक्ती म्हणून तुम्ही विषेश आहात, कारण तुमच्यासारख्या मोठ्या पदावरची एखादी व्यक्ती पहिल्यांदाच बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेला संबोधित करत होती व तुम्ही ज्वलंत मुद्द्यांना स्पर्श केलात. हा तुमचा उद्योग नसला तरीही राज्यातील किंवा केंद्रातील नगर  विकास विभागाच्या प्रमुखाने पुण्याच्या समस्यांना कधीही वेळ दिला नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही व या शहराचा ऱ्हास होण्याचे हेच मुख्य कारण आहे. रिअल इस्टेटला उद्योग क्षेत्राचा दर्जाही देण्यात आलेला नाही त्यामुळे जीएसटीसारखे कर इथे अतिशय वाईट आहेत व धोरणे म्हणजे चेष्टा आहे. कारण ताबा देण्यासाठी तयार घरावर काहीही जीएसटी आकारला जात नाही परंतु बांधकाम सुरू असलेल्या घरावर 12 % जीएसटी आकारला जातो, हे कोणत्या प्रकारचे धोरण आहे. अनेक अत्यावश्यक घटकांचीही हीच गत आहे व सरकारचेच प्रशासन असलेल्या आयआयटीला त्यांच्याकडे बांधकाम उद्योगावर व साहित्यावर लक्ष केंद्रित करणारी संशोधन शाखा सुरू करण्यापासून कुणी रोखले आहे, रिअल इस्टेट उद्योग आनंदाने त्यांना मदत करेल याची मला खात्री आहे, परंतु हे उलट पद्धतीने होऊ शकत नाही, बरोबर ? रिअल इस्टेटशी संबंधित व्यक्तींनी व्यक्तींनी  यासंदर्भात काहीतरी केले पाहिजे हे मी एका दशकभरापासून लिहीतो आहे, तुमच्या शब्दांमुळे या प्रक्रियेला थोडा वेग येईल अशी अपेक्षा करू. त्याचप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्राचे नियंत्रण करणारे नियम व कायदे ( विकास नियंत्रण नियम ) बांधकामातील बदल विचारात घेऊन करण्यात आले तर बांधकाम खर्चात बरीच बचत करत येऊ शकते. इथे एक विभाग इमारतीची उंची ज्या मजल्यावर लोक राहतात तिथपासून मोजतो तर दुसरा विभाग इमारतीची रस्त्याच्या पातळीपासून मोजतो. अशाप्रकारचे विनोद घडत असतात, त्यामुळे विकासक प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष खर्चाविषयी नेहमी अंधारात असतात. एकीकडे तुम्ही म्हणता की पुण्याच्या मध्यवर्ती भागातील गर्दी कमी केली पाहिजे व दुसरीकडे नगर  विकास विभाग मेट्रोच्या मार्गावरील घरांची घनता वाढविण्याविषयी आग्रही आहे यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये घरे ( सदनिका ) लहान होत आहेत, ज्यामुळे बांधकाम खर्चामध्ये थेट वाढ होते, हे केवळ मेट्रो फायदेशीर व्हावी यासाठी होत आहे. इथेही, तुम्ही तुमच्या वजनाचा वापर करून संबंधित विभागांना लोकोपयोगी धोरणे तयार करण्यासाठी रिअल इस्टेटमधील काही लोकांना विश्वासात घेण्यास सांगू शकता. आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे शहरांच्या विकास योजना तयार करणे व त्यांची एका ठराविक वेळेत अंमलबजावणी करणे, त्यामुळे आपोआपच बांधकाम खर्चात मोठी कपात होईल. कारण सध्या विकास योजना मंजूर होईपर्यंत बांधकाम व्यावसायिकांना  लक्षावधी चौरस फूट जमीन अडकवुन ठेवावी लागते , या गुंतवणुकीवरील व्याज हे घरांच्या वाढत्या दरांचे कारण आहे. ही यादी हनुमानाच्या शेपटीपेक्षाही मोठी आहे परंतु अशा संवेदनशील मुद्द्यावर उघडपणे बोलायचे तुम्ही धाडस केलेत म्हणून मी अतिशय आनंदी व आभारी आहे

        शेवटचा मुद्दा म्हणजे, तुम्ही बांधकाम व्यावसायिकांनी आतिथ्य ( उपाहारगृहे ) व पर्यटन क्षेत्रामध्ये शिरण्याविषयी जे काही बोलतात त्यावर विचार केला पाहिजे, कारण पुणे अतिशय महत्त्वाचे शहर  असून या दोन्ही गोष्टींचा विकासाशी घनिष्ट संबंध आहे तसेच रिअल इस्टेटमधील नफ्याचे प्रमाण घटत चालले आहे व तुम्ही फक्त त्यावर अवलंबून राहू शकत नाही , विशेषतः पुण्याची नागरी विकासाची सध्याची धोरणे पाहता.

       नितीन भाऊ, सरतेशेवटी मला एवढेच सांगावेसे वाटते की, मीसुद्धा तुमच्यासारखाच पक्का वैदर्भीय माणूस आहे, परंतु आपल्या  भागातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून लोक इथे येऊन का स्थायिक होतात? या लोकांचे पुण्यावर अतिशय प्रेम आहे किंवा या शहरामध्ये त्यांना काहीतरी जगावेगळे मिळते असे नाही, तर त्यांच्या मूळ गावी त्यांच्या जीवनाच्या मूलभूत गरजा म्हणजे रोजगार, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य किंवा अगदी पिण्याचे पाणी यांचीही पूर्तता होत नाही. यामध्ये पुणेकरांचा काहीही दोष नाही, पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांचाही नक्कीच दोष नाही तर हे सरकार ( मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असो ) नावाच्या यंत्रणेचे अपयश आहे. आपल्याला  पुण्याचे गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे असेल तर आपण सगळ्यांनी याचा स्वीकार केला पाहिजे. आम्ही या कामामध्ये तुमच्यासोबत आहोत याची मी निश्चितपणे खात्री देऊ शकतो.

--

संजय देशपांडे 

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

कृपया पुण्यामध्ये योग्य घर/कार्यालय शोधण्याविषयी माझे विचार, तुम्ही खालील यूट्यूब लिंकवर जाणून घेऊ शकता व आवडले तर शेअर करा...

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345

 

 


No comments:

Post a Comment