“बंदुक हातात असलेल्या माणसापेक्षा ब्रीफकेस हाती असलेला वकील जास्त पैसे कमावु शकतो." - मारिओ पुझो, (गॉडफादर)
“हातात बंदुक हा तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे नेणारा सर्वात जलद मार्ग आहे, जर तुम्ही जिवंत लक्ष्यापर्येंत पोहचलात तर ...!” - इऑन कोल्फर
गुन्हेगारी आणि
गुन्हेगारांचे जीवन हा आपल्या समाजात नेहमीच आकर्षणाचा विषय राहिलेला आहे कारण
आपल्या सगळ्यांमध्ये आत दबलेली वावरणारी एक काळी बाजू असते हे
मानसशास्त्रानेही मान्य केलेले आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण पुणे शहरातल्या
गुन्हेगारीविषयक बातम्यांबदद्ल तावातावाने बोलतो किंवा त्यावर टीका टिप्पणी करतो तेव्हा, वर लिहिलेल्या पहिल्या ओळींसाठी कुठल्याही परिचयाची गरज नाही कारण
ती गॉडफादर या अजरामर कलाकृतीच्या लेखकाने लिहिली आहे आणि दुसरी ओळ जी या
विषयासाठी अगदी चपखल बसते ती कोल्फर यांची. जे आयरिश बालसाहित्यिक आहेत. पूर्ण
वेळ लेखक होण्यापूर्वी त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केले. आर्टेमिस
फाउल या सिरीजचे लेखक म्हणून त्यांची ओळख सुपरिचित आहे. शिक्षक आणि बालकथाकार
असलेले कोल्फर यांनी माझ्या मनात असलेल्या गुन्हेगारी आणि गुन्हेगारांबाबतच्या
भावना अचूकपणे मांडल्या आहेत यात आश्चर्य नाही ! ज्यांनी गॉडफादर लिहिला ते मारिओ
पुझो आणि अभिनेता
मर्लीन ब्रँडो यांनी गुन्हेगारीला एका वेगळ्याच
उंचीवर नेऊन ठेवले आहे, ज्याविषयी मी या आधीही लिहिले आहे. मी ती सुद्धा कबुली देतो की आयुष्य जगणे आणि कामाविषयीच्या गॉडफादरच्या
तत्त्वज्ञानाचा मी प्रचंड चाहता आहे, पण त्या तत्त्वज्ञानाचा उपयोग करण्याच्या त्याच्या पद्धतीचा नव्हे, हे मी इथे आधीच स्पष्ट करू इच्छितो ! हे सर्व
सांगण्याचे कारण म्हणजे सध्या पुण्याच्या गुन्हेगारी जगतात अचानक वाढत
असलेल्या घटना किंवा गुन्हे किंवा गुन्हेगारीच्या
बातम्यांमध्ये झालेली वाढ. पोलिसांच्या मते ही
संघटित गुन्हेगारी नसली तरी खून हा शेवटी खूनच असतो आणि चोरी ही चोरीच असते आणि
याच सर्व गोष्टींना गुन्हेगारी म्हणतात आणि समाजासाठी आणि कोणत्याही व्यवसायासाठी ह्या घटना घातकच असतात. आणि या सर्व गुन्ह्यांमध्ये सर्वात चिंतेची बाब कोणती असेल तर ती
गुन्हेगारीमधला अल्पवयीन मुलांचा किंवा अगदी तरुण मुलांचा सहभाग, यामुळे
पोलिसांसमोरही आव्हान उभे ठाकले आहे आणि ही तरुण मुले गुन्हेगारीच्या रेकॉर्डवरही नसतात !
"रेकॉर्डवरील गुन्हेगार" ही संज्ञा
अनेक वाचकांना समजणार नाही, अनेकदा वर्तमानपत्रात वाचलेली किंवा माध्यमांमधून बघितलेली असली
तरी त्याचा नेमका अर्थ काय? तर जेव्हा पोलिस एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या गुन्ह्यासंबंधी पकडतात
/ अटक करतात, तेव्हा त्याचे /
तिचे नाव, इतर सर्व माहिती गुन्हाच्या तपशीलांसह पोलीसांच्या नोंदींमध्ये
समाविष्ट होते. त्यामुळे जेव्हा कोणताही गुन्हा घडतो तेव्हा पोलिस पहिला संशयित
आरोपी हा त्यांच्याकडील
उपलब्ध नोंदींमधून शोधत असतात, ज्या मध्ये गुन्हेगारांची आणि गुन्हेगारीच्या
पद्धतीची समानता असते त्यांना बरेचदा चौकशीसाठी बोलावले जाते. थोडक्यात
आता तुमच्यावर गुन्हेगार असा शिक्का बसलाय म्हणजेच तुमची पोलिसांकडे नोंद झाली
आहे! (रेकॉर्डवर आलीही) परंतु, अलिकडे गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवर नसतात, म्हणजे त्यांना कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसते, शिवाय बरेचदा ही मुले अल्पवयीन असतात म्हणजेच 18 वर्षे वयाखालील असतात. त्यामुळे त्यांना अटक करणे पोलिसांना अवघड जाते किंवा अल्पवयीन
मुलांबाबतच्या कायद्यातील तरतुदींनुसार त्यांना अधिक काळ तुरुंगात राहण्याची भीती
नसते. आणि हे एकाअर्थी खरेच आहे कारण गुन्हेगारीत अडकलेल्या मुलांना
किंवा तरुणांना जगण्याची दुसरी संधी दिलीच पाहिजे, परंतु दुर्दैवाने याचा वापर शिक्षेविरोधात ढाल म्हणून केला जातो
आणि अनेक सराईत गुन्हेगार स्वत:साठी अल्पवयीन मुलांची नियुक्ती करून / त्यांचा
सहभाग वाढवून पोलिसांच्या मर्यादांचा गैरफायदा घेताना दिसतात, यामुळेच मला या विषयाबद्दल लिहावेसे वाटले !
अनेक वाचक विचार करतील की, मला हे लिहून काय करायचे आहे
किंवा अशा विषयांत मी कधी पासून तज्ञ झालो आणि माझी लिखाणाची चाकोरी जसे
वन्यजीवविषयक (ताडोबा असे वाचावे) किंवा रिअल इस्टेट सोडून मी या विषयात ज्ञान का पाजळत आहे, परंतु मी हे एक समाज म्हणून त्याच्या जागृतीसाठी लिहित आहे, कारण हा धोका आपल्या संपूर्ण भविष्यावर आणि व्यवसायावर आणि दैनंदिन
जीवनाच्या प्रत्येक पैलूवर घोंघावत आहे! पोलीस हे काही देव नसतात, शिवाय ते सर्वत्र
असू शकत नाहीत किंवा ते गुन्हेगाराला योग्य मार्गाने जाण्याचा रस्ता दाखवू शकतात, पण ते त्याचे काम
नव्हे. त्यांचे खरे काम गुन्हेगारी रोखणे हे आहे, गुन्ह्यांचा शोध घेणे आणि
गुन्हेगारांना न्यायालयासमोर उभे करणे हे आहे. परंतु गुन्हेगारीकडे वळणाऱ्या
तरूणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करणे ही काळाजी आणि समाजाची गरज आहे. हे
पोलीस यंत्रणेसमोरचे सर्वात कठीण आव्हान आहे आणि आपण प्रत्येकाने त्यांना या कामात
सहकार्य करायला हवे हा इथे माझा उद्देश आहे !
अधिकाधिक तरूण
गुन्हेगारीकडे वळण्याची कारणे अनेक असू शकतात परंतु एक मुख्य कारण म्हणजे
गुन्हेगारी विश्वाचं आणि गुन्हेगारांचं आकर्षण आणि उदात्तीकरण ही वस्तुस्थिती आहे.
आणि तरुणांना या उदात्तीकरणामागील पोकळपणा आणि कटू सत्याची जाणीव करून देण्यासाठी
आपल्यापैकी प्रत्येकजण मोठे योगदान देऊ शकतो! एखाद्या भाईच्या (स्थानिक गुडांसाठी किंवा
गुन्हेगासाठी वापरण्यात येणारी लोकप्रिय संज्ञा) बेदरकार वृत्तीचे तरुणांच्या गँगद्वारे समर्थन करणे, त्याच्या वाढदिवसाला मोठमोठे होर्डिंग / कटआऊट्स लावणे, भाईचे गोल्डन चेन आणि बेसलेटने मढवलेले फोटो, त्याची राजकीय नेत्यांशी जवळीक, काळा ऊंची गॉगल, महागडी रॅडोच घडयाळ, काळ्या काचेची स्पेशल नंबर प्लेटची एस यूव्ही कार अशा अनेक गोष्टी लहान मुलांना अकर्षित करतात ! सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
भाईला अभ्यास करावा लागत नाही किंवा त्याला परिक्षेतील मार्कांची चिंता नसते किंवा त्याला कुणाच्यातरी आदेशानुसार 10 ते 7 काम करावे लागत नाही, या सर्व
कारणांमुळे भाईबद्दल मुलांमध्ये आकर्षण निर्माण होते आणि अगदी
पोलीसही भाईशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात ! म्हणूनच मग जेईई, एनईईटीसारख्या सामान्य मुलांच्या शर्यतीत का सामील व्हायचे किंवा इतर मुलांशी तुलना होऊन आपल्याला मठ्ठ समजले जाईल अशा शाळेत का जायचे आणि सरतेशेवटी ज्या कार्यालयात मान
मिळणार नाही अशा ठिकाणी का काम करायचे बरोबर ? हे सहजपणे काही न करता मिळणारे आयुष्य याचे प्रमुख कारण आहे. या मुळेच अनेक मुले अभियंता किंवा मॅनेजर किंवा अगदी कुशल कामगार
बनण्यापेक्षा भाई बनणं पसंत करतात हा माझ्या लिखाणाचा विषय आहे! इथेच आपण मारिओ पुझोच्या
विचाराकडे दुर्लक्ष करतो, जिथे तो उपहासात्मकरित्या सांगत असतो की एक विद्वान वकिल
गुन्हेगारापेक्षा अधिक पैसे कमावु शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करायला हवा, जे तुम्हाला भाई बनवण्यासाठी गरजेचं
नसते ! मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात
आणि या भाई नावाच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचे नाव आहे दु:खद अंत, यातूनच मला पोलिस प्रमुखांना पत्र
लिहावेसे वाटले. आणि याची गरज केवळ पोलिसांनाच नाही तर संपूर्ण
समजााला आहे असे मला वाटते. म्हणून मी लिहिलेले पत्र खाली शेअर करत आहे...
प्रति,
मा. रश्मी शुक्ला मॅडम, आयपीएस,
महासंचालक, महाराष्ट्र
पोलीस.
एका भाईची गोष्ट”
विषय: गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये यासाठी तरुणांमध्ये जागरुकता निर्माण
करण्याबाबत काही सूचना.
आदरणीय मॅडम,
मी हे पत्र पुण्यातून लिहित आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात घडणाऱ्या
गुन्ह्यांविषयी आणि त्यातल्या अल्पवयीन युवकांच्या विशेषत: मुले जी 18 वर्षे वयोगटाखालील आहेत, त्यांच्या गुन्हेगारीतल्या वाढत्या सहभागाविषयी आपल्याला माहितच आहे. ही केवळ
पोलिसांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी चिंतेची बाब आहे. हे
युवक करिअर म्हणून गुन्हेगारीकडे का वळत आहेत
याविषयी कारणांच्या तपशिलात मी जाणार नाही पण एक मुख्य कारण म्हणजे सोशल
मिडीयाद्वारे मिळणारी प्रसिद्धी किंवा भाई बनवण्यासाठी स्थानिकांकडून केले जाणारे
उदात्तीकरण आणि चुकीचा आदर! शिवाय चित्रपटांमधून उभी केली जाणारी भाईची प्रतिमा
जसे सत्या सारख्या चित्रपटात भिकू म्हात्रे असेल आणि अलिकडच्या मुळशी पॅटर्न
चित्रपटात नान्या भाईसारखी व्यक्तीरेखा, याकडेही आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण हे थांबवू शकत नाही परंतु
भाईबाबतच्या आकर्षणामागील ही एक वस्तुस्थिती आहे'!
यासाठी आदर किंवा भीती असलेल्या अनेक
स्थानिक भाईच्या केस स्टडीजमधून (सोशल मिडीया पोस्ट) आपण या आकर्षणाच्या
भागाचा सामना करू शकतो, कारण वस्तुस्थिती अशी आहे,
की अशा भाईंचा अंत तीनपैकी एकाच
मार्गाने होऊ शकतो, ते म्हणजे तुरुंग किंवा पोलिसांकडून एन्काऊंटर किंवा प्रतिस्पर्धी टोळीकरून
खून ! समाज माध्यमे
किंवा कोणताही चित्रपट आपल्याला काय दाखवत नाही, तर एखादा भाई
मेल्यावर किंवा तुरुंगात गेल्यावर त्याच्या कुटुंबाचे काय होते, हे आपण
तरुणांना दाखवलेच पाहिजे. मुळशी पॅटर्नमध्ये नान्या भाईचे उदात्तीकरण करण्यात आले आहे पण चित्रपटातच नान्या भाई त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतच तो
ऐन चाळीशीत असताना खून होतो आणि त्यानंतर त्याच्या बायका-पोरांनी आयुष्य कसं जगलं
असेल हे कोणी विचारत नाही! त्याचप्रमाणे जेव्हा एखादा भाई तुरुंगात जातो तेव्हा त्याचे आईवडिल
किंवा भावंडांना समाज कसा तुच्छतेने बघतो हे कुठल्याही चित्रपटात किंवा समाज
माध्यमांमधल्या पोस्टमध्ये सांगितले जात नाही, बरोबर? हेच पोलिस करू शकतात आणि अशा प्रकारच्या गोष्टींना क्रेडाईसारख्या संस्था सहाय्य
देऊ शकतात. शिवाय आपण नामांकित निर्मिती
कंपन्यांना या कथांवर दोन मिनिटांचे लघुपट तयार करायला सांगू शकतो. आणि हे लघुपट चित्रपटगृहात किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रमोट करा. लहान मुले जे सोशल मिडियावर पाहतात
त्यासोबतच वहावत जातात, आणि गुंडा भाईच्या आयुष्याचा करूण अंत दाखवल्याने
निश्चितच मुलांना गुन्हेगारीकडे वळण्याच्या मार्गापासून दूर खेचता येण्यास मदत
होईल. यावर माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच मी हे पत्र आपल्याला लिहिण्याचे धाडस केले!
हे पत्र मी आपल्या विभागातील काही अधिकारी मित्रांनाही पाठवत आहे, कारण कुणीतरी कुठेतरी अधिक चांगला विचार करू शकेल आणि जास्त उशीर होण्यापूर्वी या कार्यासाठी हातभार लावू शकेल! एक व्यक्ती
म्हणून तसेच संस्था म्हणून आम्हाला या कार्यासाठी हातभार लावण्यात आनंद होईल!
हार्दिक शुभेच्छा!
संजय देशपांडे
मित्रांनो, गुन्हेगारी हा आपल्या समजाचा अंगभूत भाग होता, आहे आणि राहिलसुद्धा, पण मुद्दा हा आहे की, आपण गुन्हेगारीला चांगुलपणाविरुद्ध जिंकू द्यायचे की नाही. अगदी मार्वल / डिस्नेच्या चित्रपटांमध्येही सरतेशेवटी चांगुलपणाचाच विजय होतो परंतु तेही वाईटांशी (इथे गुन्हेगारी असे वाचावे) कठोर युद्ध केल्यानंतरच. आणि इथे तर आपण खऱ्याखुऱ्या आयुष्याविषयी बोलत आहोत, जेथे आपल्या मुलांचे भविष्य पणाला लागले आहे आणि वाईटपणा नेहमीच संधीची वाट बघण्यासाठी टपलेला असतो. हे लक्षात असुद्या. या वाक्यावर थांबतो !
धन्यवाद !
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment