Monday 16 August 2021

इतिहास घडविताना , ऑलिम्पिक 21

 





































































































एक महान खेळाडू आणि इतरांमधील फरक शारिरीक क्षमतेची कमतरता अथवा कौशल्याची कमतरता हा नसतो तर इच्छाशक्तिची कमतरता हा असतो व्हिन्स लोंबार्डी

खेळाची (खरेतर जीवनाची) इतकी चांगली जाण असणाऱ्या व्हिन्स लोंबार्डी यांना अमेरिकी फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम प्रशिक्षक मानले जाते. म्हणूनच ऑलिंपिकसारख्या विषयावर लिहीताना मी प्रस्तावनेमध्ये त्याच वरील अवतरण वापरले. आत्तापर्यंत आपण सगळे भरभरून ऑलिंपिकविषयी बातम्या ऐकत आहोत, नीरज, बंजरंग, दहिया, रानी रामपाल, चानू, सिंधू अशा इतरही अनेक नावांच्या कृपेने, आपण (म्हणजे १३० कोटींहून अधिक भारतीय) अलिकडच्या अनेक वर्षात अनुभवले नाहीत किंवा विसरून गेलो आहोत असे क्षण आपल्याला अनुभवायला मिळाले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊन गेली मात्र या काळात केवळ ऑलिंपिकमध्ये केवळ एकच सुवर्ण पदक मिळाले होते, ते देखील नेमबाजीसारख्या खेळामध्ये जो खेळ खेळणे अनेक जणांना परवडतही नाही, अर्थात त्यामुळे अभिनव बिंद्रासारख्या खेळाडूचे श्रेय नक्कीच हिरावून घेता येणार नाही. मात्र अशा देशाला ऑलिंपिकमध्ये सात पदके मिळाली आहेत त्यापैकी सहा वैयक्तिक खेळांमधील आहेत, हे आपण कधीच अनुभवले नव्हते हे मात्र नक्की. सांघिक खेळांमध्येही, तब्बल चाळीस वर्षांनी आपल्या राष्ट्रीय खेळामध्ये (तो खेळ क्रिकेट नाही) म्हणजेच हॉकीमध्ये, आपली रौप्य किंवा सुवर्ण पदकाची गाडी केवळ एका सामान्यामुळे चुकली. मात्र हा अनुभव अतिशय रोमांचक होता. त्याचशिवाय महिला हॉकी, बॉक्सिंग, कुस्ती, गोल्फ अशा जवळपास पाच ते सहा वर्गवाऱ्यांमध्ये अगदी थोड्या फरकाने आपले पदक चुकले, नाहीतर पदकतालिकेमध्ये आणखी पदकांची भर पडली असती हे नक्की. पण काही हरकत नाही, ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी जे काही साध्य केले त्यामुळे प्रत्येक भारतीय खेळाडू पुरूष महिलेचे (मी जाणीवपूर्वक प्रत्येक भारतीयाचे असे म्हणत नाही, का हे मी नंतर समजून सांगेन) ऊर अभिमानाने भरून आले असेल, अर्थातच अजूनही बरेच काही साध्य करायचे आहे ही भावनाही असेल.

आता बरेच जण म्हणतील (नेहमीप्रमाणे) की त्यात काय मोठेसे, चीन, यूएसए, जपान किंवा अगदी इंडोनेशिया, कतार किंवा जमैकासारख्या देशांकडे पाहा. त्या तुलनेत आपली लोकसंख्या १३० कोटी असूनही आपण कुठे आहोत, मी त्यांना दोष देणार नाही किंबहुना म्हणूनच ऑलिंपिकमध्ये एक नवीन इतिहास रचला गेला आहे, एवढेच मी म्हणेन. एक क्रिकेटसारखा लोकप्रिय खेळ सोडला तर इतर खेळातील आपला इतिहास पाहता या तथाकथित टीकाकारांपैकी कितीजण त्यांच्या मुलाला किंवा मुलीला करिअर म्हणून क्रिकेटऐवजी दुसरा एखादा खेळ घेण्यास प्रोत्साहन देतील याचे मला कुतुहल वाटते. म्हणूनच ऑलिंपिकमध्ये मिळालेली ही सात पदके महत्त्वाची आहेत. कारण आज जेव्हा मी वर्तमानपत्र उघडले तेव्हा या देशात मला गेल्या पन्नास वर्षात जे अनुभवायला मिळाले नाही ते मला दिसले. भारतीय संघ इंग्लंमध्ये क्रिकेट खेळत आहे, पहिल्या कसोटी सामन्यात तो आघाडीवर आहे मात्र सर्व वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी केवळ एका कॉलमची तीसुद्धा पानाच्या तळाशी छापण्यात आली होती. त्याचवेळी, ऑथलेटिक्स, गोल्फ, हॉकी, कुस्ती यासारख्या खेळांमधील कामगिरीच्या ठळक बातम्यांनी संपूर्ण पान व्यापले होते, या बातम्यांनी भारतीय क्रिकेट संघाची बातमी झाकोळून टाकली होती. आपल्या देशामध्ये असे काही घडू शकेल यावर आपल्यापैकी कुणाचाही विश्वास बसला असता का कारण आपला इतिहासच तसा आहे, आपण स्वातंत्र्यानंतर तब्बल ७४ वर्षे तो घेऊनच जगत आलोय. आज तो इतिहास पुसला गेलाय एक नवा इतिहास लिहीला गेलाय आपल्या देशातील क्रीडा जगतासाठी हा नक्कीच विशेष क्षण आहे, ज्याचा प्रत्येक खेळाडू पुरुष महिलेला अभिमान आनंद आहे!

आता मी भारतीय खेळाडू पुरुष महिला असे का म्हणालो, प्रत्येक भारतीय असे का नाही म्हणालो हे सांगतो, सगळ्यांविषयी पूर्णपणे आदर राखत सांगावेसे वाटते की कोणत्याही गोष्टीचे कौतुक करताना किंवा काही साजरे करताना आपल्यापैकी प्रत्येक जण त्या यशाचे भागीदार होण्यासाठी त्यामध्ये सहभागी होतात, मात्र आपल्याला मनापासून त्याविषयी काही वाटत असते असे नाही. किती जणांना भालाफेक हा एक  खेळ आहे हे तरी माहिती होते किंवा हा खेळ ऑलिंपिकमध्ये खेळला जातो हेसुद्धा किती जणांना माहिती होते ?  मी पैजेवर सांगतो की १३० कोटी नागरिकांपैकी अगदी कोटी जणांनाही हा खेळ माहिती नसेल. मात्र आता प्रत्येकजण उत्साहाने नीरजची छायाचित्रे पोस्ट करतोय. सगळे जण जे काही करताहेत ती चांगली गोष्ट असली तरी हा उत्साह केवळ समाज माध्यमांवर छायाचित्रे पोस्ट करून त्याला मिळणारे लाईक मोजण्यापुरताच मर्यादित ठेवू नका, तर नीरजसारख्या पदक मिळवण्याची क्षमता असलेल्या मात्र त्या क्षमतेचा वापर करण्यासाठी कोणताही पाठिंबा नसलेल्या अनेकांना मार्ग दाखवा, असे मला सांगावेसे वाटते.

या पार्श्वभूमीवर, एकूण खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मला हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे तसेच त्यांच्या संपूर्ण राज्यसरकारचे कौतुक करावेसे वाटते. कारण आपल्या देशाच्या ऑलिंपिक पथकातील सर्वाधिक खेळाडू या राज्यातील आहेत हा काही निव्वळ योगायोग किंवा अपघात नाही. हरियाणा आपल्या देशातील सर्वात श्रीमंत तसेच संपन्न राज्य आहे म्हणूनच केवळ हे शक्य झाले आहे असे नाही, तर हरियाणा सरकारने वर्षानुवर्षे एकूणच खेळांना सर्वतोपरी पाठिंबा दिला आहे, कारण असे यश तुम्हाला एका रात्रीत मिळत नाही. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नोकरीत बढती देणे तसेच नोकऱ्या देणे (म्हणजे तात्काळ, कोणत्याही लाल फितीच्या कारभाराशिवाय), या खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रशिक्षकांची नियुक्ती करणे यासारखे सगळे प्रयत्न ते करत आहेत. या प्रयत्नांचा परिणाम म्हणूनच हरियाणा राज्य आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्याचवेळी आपण या खेळाडूंच्या कुटुंबियांचेही कौतुक अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या त्याग केला आहे. अशा खेळांमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेणे अतिशय अवघड आहेविचार करा त्यांच्याकडे सुरूवात करण्यासाठी हाताशी पैसा नव्हता जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध खेळण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य तसेच शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी प्रशिक्षणामध्ये किती खडतर प्रयत्न करावे लागले असतील. चार वर्षातून एकदा होणाऱ्या स्पर्धेतील काही मिनिटांच्या कामगिरीसाठी हे सगळे करावे लागते. व या खेळाडूंचे करिअर जेमतेम वयाच्या तीस वर्षांपर्यंत असते, त्याचवेळी इतर नोकऱ्या तुम्हाला साठ वर्षांचे होईपर्यंत उत्पन्नाची सुरक्षितता देतात, असे असताना आपल्यापैकी किती जण अशा खेळांचे पूर्ण वेळ खेळाडू व्हायला धजावतील हे मला सांगा.  त्यातूनही तुम्ही अपयशी ठरलात तर कुणी तुमचा चेहराच काय नावही लक्षात ठेवणार नाही हे कटू सत्य आहे. तरीही या सगळ्या आई-वडिलांनी कुटुंबीयांनी त्यांच्या मुलांना अशा खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले, जे ते स्वतः कधीही खेळले नव्हते किंवा त्याचे भविष्य काय असेल हे त्यांना माहिती नव्हते. यातही हरियाणाचे पालक आघाडीवर आहेत, या राज्यातील अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांना डॉक्टर, बँकिंग, सरकारी नोकरी किंवा आयआयएम/आयआयटी यासारख्या पारंपरिक सुरक्षित संपन्न करिअरऐवजी या खेळांचा मार्ग पत्करू दिला.

या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वात विकसित, हुशार, समृद्ध, सांस्कृतिक, माहिती तंत्रज्ञानाचे माहेरघर (अजूनही काय काय) असलेल्या आपल्या राज्याने ऑलिंपिकच्या पथकामध्ये किंवा कुठल्याही खेळामध्ये आपल्या राज्यातील फारशी नावे का नसतात (अजिबातच नसतात) याविषयी थोडे आत्मनिरीक्षण (शेवटी मी इतर कुणाला नाही तर स्वतःला मूर्ख बनवतोय) करायची वेळ आता आलीय. हो जलतरणात वीर धवल खाडे धावण्यामध्ये सावरखेड्याची जाधव यासारखी नावे काही वर्षांपूर्वी होऊन गेली, बाकी आपल्या राज्यातून खेळांच्या आघाडीवर अंधारच आहे ही वस्तूस्थिती आहे. आपल्या राज्यातील फारसे खेळाडू विविध खेळात प्रतिनिधीत्व दिसत नाहीत याचे कारण म्हणजे आपल्या राज्यसरकारचा खेळांविषयीचा दृष्टीकोन तसेच मुलांसाठी सुरक्षित करिअर निवडण्याची आपली मराठी मानसिकता. आपण आपल्या मुलांना क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊ द्यायला धजावत नाही, आपल्याकडचे श्रीमंत व्यावसायिक स्वतः उंची स्पोर्ट्स कार चालवतील मात्र स्पोर्ट्स साठी (क्रिकेटचा अपवाद वगळता) किंवा खेळाडूंसाठी खिशातून पैसे देणार नाहीत. पर्यावरणाच्या आघाडीवर किंवा वन्य जीवन संवर्धनाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे (म्हणजे दृष्टिकोन आहे), यासाठी केवळ समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या जातात प्रत्यक्षात योगदान मात्र शून्य असते. आता मुंबईतील अनेक उद्योगपतींना अचानक जाग येईल ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जाहीर करतील तसेच आपल्या उत्पादनांचे दूत म्हणून त्यांच्याशी करार करतील. मात्र या खेळाडूंच्या प्रशिक्षणाच्यावेळीच हे व्हायला हवे होते, नाही काया ऑलिंपिकची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, केवळ देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने भारतीय खेळाडूंनी प्रत्येक खेळामध्ये ज्याप्रकारे लढत दिली त्याचे कौतुक केले. काही खेळांडूंना पदक मिळाले नसेल, मात्र त्यांच्यामध्ये प्रत्येक पदक जिंकण्याची क्षमता आहे भारतीय खेळाडू अतिशय कडवी झुंज देऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. आत्तापर्यंत याच दृष्टिकोनाची उणीव होती तो आता मिळाला आहे.

म्हणूनच प्रिय महाराष्ट्र सरकार मराठी जनहो, “देर आए दुरुस्त आए” (म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी कधीच उशीर होत नाही), आता जागे व्हा, आपल्या खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे, आता आपल्याला इतिहास घडवणाऱ्या या संघाचा भाग व्हायचे आहे की इतिहासजमा व्हायचे आहे हे आपणच ठरवायचे आहे; तोपर्यंतचक दे इंडिया”…

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/08/history-re-written-olympic-21.html  

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com

 

 


No comments:

Post a Comment